Sunday, June 28, 2020

The Great Indian Novel ( महा भारत कादंबरी ) - शशी थरूर : प्रिया दुर्योधनी आणि जयप्रकाश द्रोण :४

प्रिया दुर्योधनी आणि जयप्रकाश द्रोण 

The GREAT  INDIAN  Novel (महा भारत कादंबरी  ) 
धृतराष्ट्रानंतर पंतप्रधानपदाची धुरा शिशुपालानी सांभाळली . शेजारच्या राष्ट्रांबरोबर त्यांना युद्ध करायची वेळ आली . 'Peace Demands Compromise', असे जे म्हणतात तेच झाले. शिशुपालाने युद्ध जिंकले पण ते तहात हरले. काय झाले, हे आजही निश्चिपणे माहित नाही. ज्या ठिकाणी तहाची बोलणी झाली त्याच शहरात त्यांचा मृत्यू ते ज्या हॉटेलात रहात होते तेथेच  झाला. देश पुन्हा संकटात सापडला. कौरवा पार्टी संकटात सापडली. नेतृत्वाचा प्रश्न उभा राहिला . पंतप्रधानपद कोणाला द्यावयाचे ?,ह्यासाठी पक्षात वादंग माजले.त्यांच्यात रस्सीखेच सुरु झाली. काही जणांना आंतरराष्ट्रीय समुदायासमोर चमकणारा स्त्री चेहरा हवा होता . शिशुपालाला हे काम  जमले नाही असे काहींचे मत होते . Father's Daughter म्हणून काहीजण धृतराष्ट्राच्या 'गुंगी गुडिया' कडे बघत होते .शेवटी प्रधानमंत्रीपदाची माळ धृतराष्ट्राची कन्या प्रिया दुर्योधनी हिच्याच गळ्यात पडली.
त्याचवेळी अर्जुन दक्षिण भारताच्या दौऱ्यावर गेला . त्याचा  मुक्काम गोकर्णनला होता. त्याची आणि श्रीकृष्णाची भेट होत नव्हती. श्रीकृष्ण म्हणजे D Krishna Parthsarthi.तो दक्षिणेचा कौरव पार्टीचा प्रमुख नेता  होता . अर्जुन श्रीकृष्णाची भेट घेण्यासाठी तेथे मुक्काम करून होता .श्रीकृष्णाची  बहीण  सुभद्रा . अर्जुन तिला कसे  पळवितो . हे सर्व थरूरांनी एका प्रकरणात खूप रंगवून सांगितले आहे . ही अर्जुन -सुभद्रा ह्यांची भन्नाट कथा आहे.

दुर्योधनीने  हस्तिनापुरचा कारभार तर जोरात  सुरु केला .प्रथम तिची पार्टीवर  पकड नव्हती. हळूहळू कौरवा पार्टीत भांडणे सुरु झाली. युधिष्टिर  दुर्योधनीच्या मंत्रिमंडळात होता पण ती त्याला काहीच न विचारता निर्णय घेत होती. त्यांच्यांत सत्तेसाठी  भांडणे सुरु झाली.  युधिष्ठिराला उपपंतप्रधानपद मिळाले. वेद व्यासानी युधिष्ठिर - दुर्योधनी ह्यांच्यात  मध्यस्थी घडवून आणली . तरीही युधिष्ठिराला पाहिजे तो मान मंत्रिमंडळाच्या बैठकीत  मिळत नव्हता . तो त्यामुळे नाराज होता. दुर्योधनीला लोकांनी जोरदार पाठिंबा दिला. त्यामुळे ती अधिकच उन्मत्त झाली. तिचा अरोगन्स वाढू लागला . युधिष्ठिराची नाराजी  दिवसेंदिवस वाढूच लागली आणि त्याने काहीदिवसांनी पक्ष सोडला. त्यावेळी कौरवा पार्टीत  मोठी फूट पडली . दुर्योधनाने त्याच्या  पार्टीला कौरवा  पार्टी ( डी ) असे नवे नांव दिले तर युधिष्ठिराने इतर सहकार्यांना घेऊन कौरवा ( ओ ) असे नांव देऊन वेगळा पक्ष स्थापन केला . त्याचवेळी दुर्योधनीला अश्वत्थामा येऊन मिळाला .तो तिचा चाहता होता . तो सहकार्यांना सांगत असे ,'दुर्योधनीने आजपर्यंत खूप सहन केले आहे . तिने खूप त्याग केला आहे. धृतराष्ट्राची  ती कन्या आहे. तिच्यात वडिलांसारखेच सर्वगुण  आहेत . ती समाजवादी विचारसरणाची आहे . गरिबांचा विचार करूनच ती राज्यकारभार करते'. असे तिचे इतर सहकारीही  लोकांना सांगत  असत . तिची स्तुती करणारा एक मोठा गट तिच्यामागे उभा होता.  युधिष्ठिराचे असे मत होते की  दुर्योधनी  राज्यघटना नीट पाळत नाही. ती हुकूमशाही वृत्तीची आहे .
दुर्योधनीने धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली. बँक राष्ट्रीयीकरण करुन  समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्षांचा पाठिंबा मिळविला. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत कम्युनिस्ट आणि समाजवादी लोकांची मदत घेऊन आपल्याच पार्टीचा उमेदवार पाडला. रबरी शिक्का असलेला राष्ट्रपती निवडून आणला व घेतलेले निर्णय कायद्यात बदलून स्वतःची हुकूमशाही निर्माण केली. एकलव्याला  भारताचे नवे अध्यक्ष केले. कारण द्रोण तिच्या विरोधात वातावरण निर्मिती करीत होता .'गरिबी हटाव ',अशी घोषणा देऊन तिने लोकांना मूर्ख बनविले . स्वतःची प्रतिमा मात्र उजळून घेतली. दुर्योधनीने पार्लमेंटला सुप्रीम केले. कारण ती पार्लमेंट पूर्णपणे  कंट्रोल करीत होती. एकीकडे बेरोजगारी वाढत होती. भूकबळींची संख्या वाढत होती. आणि तिने एकेदिवशी देशात अचानक आणीबाणी जाहीर केली. त्यापूर्वी दुर्योधनी विरोधकांनी बेजार केल्यामुळे राजीनामाच  देणार होती. पण शकुनी मामांनी तिला राजीनामा द्यायची काही गरज नाही असा सल्ला दिला.  हा शकुनी शंकर डे  नावाजलेला कायदातज्ज्ञ  होता . तो तिचा घटनातज्ज्ञ होता  वनंतर  तिचा कायदामंत्री झाला . त्यानेच  ती राजीनामा देते असे म्हंटल्यावर तिला आणीबाणी जाहीर करण्याचा  सल्ला दिला . तो तिचा शकुनी मामा होता. त्याने तिला अनेक कारस्थाने करावयास लावली. लोक हे समजल्यावर त्याच्यावर खूप वैतागले . शकुनी मामानी दुर्योधनीला असा सल्ला दिला होता  की सद्य परिस्थितीत तिने राजीनामा देण्याची काहीही गरज नाही. राज्य करायची मिळालेली संधी मुळीच सोडायची नसते. हे तिने प्रथम लक्षात घ्यावे. त्याने असे ही  सांगितले की आणीबाणी आणायची आणि कायदेच बदलून टाकायचे. आज देशाला बाहेरचा धोका नाही तरीही आणीबाणी जाहीर करून विरोधकांना पूर्णपणे अडचणीत आणणे अधिक सोयीचे आहे. असे सल्ला देणारे होते शकुनी मामा.
जयप्रकाश द्रोणांनी ह्याचवेळी भारतभर प्रवास करून विरोधी एकजूट घडवून आणली  व नवीन आंदोलन उभे केले होते .कौरवा ( O ) पार्टी  , विविध समाजवादी पक्ष , राष्ट्रवादी पक्ष  , जनसंघी , प्रसिद्ध मुखपत्राचे पत्रकार आणि प्रतिष्ठित नागरिक ह्यांनी एकत्र येऊन आणिबाणीविरुद्ध  नवा लढा उभा केला पाहिजे असे त्यांनी  ठरविले . त्यासाठी  त्यांनी देशभर चळवळ सुरु केली. युधिष्ठिराने  द्रोणाच्या अध्यक्षतेखाली बोटक्लबची सभा खूप गाजवली. शकुनीने  दुर्योधनीला अटकसत्र सुरु करण्याचा सल्ला दिला आणि  भारतभर अटकसत्र सुरु झाले.  द्रोण , पांडव आणि इतर नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा सल्ला दिला गेला . देशभर विरोधकांची पकड सुरु  झाली. सगळ्यांना निरनिराळ्या तुरुंगात डांबले गेले . युधिष्ठिर आणि जयप्रकाश द्रोण ह्यांना दक्षिणेतील  तुरुंगात डांबण्यात आले.  भारतातील सर्व तुरुंग भरले. Whom the gods wish to destroy , they first make them mad. दुर्योधनीचे तसेच झाले . सत्ता माणसाला असेच बनविते , असे म्हणतात. 'भारत राजकारणाशिवाय म्हणजे अटलांटिक ( हिंदी महासागर ) पाण्याशिवाय', असे एका पत्रकाराने लिहिले.अर्जुन हा त्यावेळचा हस्तिनापुरचा  प्रभावी पत्रकार होता. पहिला पंतप्रधान असलेल्या धृतराष्ट्राच्या  काही चुका झाल्या होत्या. पण त्याने लोकांचा घात  केला नव्हता. त्याने घटनेचे राज्य मान्य केले होते. शकुनी मामाच्या सल्ल्याने दुर्योधनीने  घटनाच गुंडाळून टाकली . संसदीय लोकशाहीला काळिमा फासला . अशा एका एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीचा प्रयोग प्रिया दुर्योधनीने रेटून पुढे नेला. तो जयप्रकाश द्रोणाने मोडून काढला आणि एक नवा इतिहास निर्माण केला.  पार्लमेंट मोठे का लोक मोठे?, असा प्रश्न द्रोणाने उभा केला . कृष्ण दुर्योधनीच्या विरुद्ध उभा राहिला. त्यापूर्वी झालेल्या निवडणूका म्हणजे एक फार्स होता. त्या योग्यवेळी होत नसत. निवडणुकीचा कागद खराब असे.  निवडणूक अधिकारी जंगलात /बर्फात पायी जात असत. निवडणूक पेट्या लंपास होत असत. शाईचा घोटाळा होत असे. निवडणूक एजंटचे खून होत असत. पेट्या पळवून नेत  असत. पैसे चारले जात असत . मतदारांचे नांव यादीतून गायब होत असे . भरपूर पैसा  खर्च केला जात असे. निवडणुकीत भ्रष्टाचार खूपच वाढला होता. भारतातील निवडणूक म्हणजे महाभारतातील युद्धच होते. हा धर्म आणि अधर्म ह्यांच्यातील लढा होता. तसे कुरुक्षेत्रावर कोणीच युद्ध जिंकले नव्हते. भारतातील लोकशाही Arrogant Form of Democracy होती. कारण राज्य चालविणारे लोक भ्रष्ट होते. त्यावेळी पत्रकार  लोकांची बाजू घेत नव्हते .ते खूप घाबरून गेले होते.  लोक  भारतीय वर्तमानपत्रावर विश्वास नं  ठेवता बीबीसीवर  अधिक विश्वास ठेवत असत.  दुर्योधनीचे भ्रष्ट्र सरकार द्रोणाने खूप मोठी चळवळ उभारून पाडले आणि नवे जनता राज्य आले.  युधिष्ठिर पंतप्रधान झाला . पांडवांचे राज्य सुरु झाले असे लोकांना वाटले .ते फार काळ टिकले नाही, हे लोकांचे दुर्दैव. पांडव आणि  द्रोण एकत्र होते आणि इतर विरोधी पक्षही त्यांच्या खांद्याला खांदा देऊन लढत होते. ही  विरोधकांची एकजूट फारकाळ टिकली नाही. युधिष्टिराला राज्यकारभार करणे विरोधी पक्षाच्या लोकांनी असह्य केले . त्यात समाजवादी आणि प्रादेशिक पक्षांचा समावेश होता.  वयोवृध्द द्रोण खूप आजारी पडले .  त्यावेळच्या समाजवादी गटांनी जनता पार्टी फोडली . द्रोण दुःखी कष्टी झाले  आणि प्रिया दूर्योधनी पुन्हा प्रचंड बहुमताने निवडून आली. ७० कोटी लोकांना आपला नेता निवडून आणता येत नाही . हे जगाला कळून  चुकले .Immorality बद्दल लोकांना काही वाटत नाही असे जनतेच्या लक्षात आले .प्रिया दुर्योधनी पुन्हा सम्राज्ञी झाली. दुर्दैव असे की काही दिवसातच तिचा खून झाला  आणि एक पर्व संपले . कौरवा पार्टी पुन्हा संकटात आली.
अशी ही नव्या ' महा भारताची ' कादंबरी लिहिली आहे शशी थरूरांनी.  तशी ती आहे बरीचशी  खरी . पण त्यांनी खूपच अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरून गंगाजी, धृतराष्ट्र , जयप्रकाश द्रोण , प्रिया दुर्योधनी आणि युधीष्ठीर ह्यांच्यावर जे काही लिहिले आहे ते काहीसे  खरे लिहिले आहे पण अनेक वेळा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून कल्पनाविलास केल्यामुळे ह्या पात्रावर  अन्याय झाला  आहे असे मला तरी वाटते. आपले मनोरंजन मात्र  होते. तशी ही कादंबरी फारच  मोठी आहे. कंटाळवाणी वाटत नाही. ज्यांनी हा काळ पाहिला आहे त्यांना आपण एक राजकीय  चित्रपट पाहतो आहोत असे वाटते.  

No comments:

Post a Comment