Monday, June 8, 2020

मी पाहिलेले बाबासाहेब पुरंदरे

महाराष्ट्रभूषण ब मो पुरंदरे .....

१९६३-६६ च्या काळात द मा मिरासदार औरंगाबादेत होते. ते अभाविपचे अध्यक्ष होते. त्यांच्यामुळे ब मो पुरंदरे शिवाजीवर व्याख्यान देण्यासाठी दरवर्षी औरंगाबादला येऊ लागले. त्यांच्या मंत्रमुग्ध  व्याख्यांनाने सर्वच जण प्रभावित होत असत. एरव्ही कंटाळवाणा वाटणारा इतिहास ऐकणार कोण ?
शिवरायाचे आयुष्यच  नाट्यमय की   तो इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा करणारा आणि आपले मनोरंजन करणारा शिवशाहीर अधिक नाट्यमय ?,असा भास व्हावा. वसंत कानेटकरांनी शिवरायावर एका मागून एक नाटके लिहिली तर रणजीत देसाई ह्यांनी त्यांच्या जीवनावर कादंबरी लिहिली. परंतु बाबासाहेब पुरंदरे ह्या व्यक्तीने साऱ्या महाराष्ट्राला शिवरायाचा इतिहास आपल्या भाषणातून शाहिरी पद्धतीने सांगून मंत्रमुग्ध केले. पु ल देशपांडे ह्यांचा 'हसविण्याचा धंदा' होता पण बाबासाहेब  पुरंदरे आपल्या भाषणातून शिवसृष्टीच निर्माण करीत असत.
अभाविपचे एक शिबीर वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिराच्या परिसरात होते. मी त्या शिबिराला गेलो होतो. प्रमुख आकर्षण होते ब मो पुरंदरे + सुधीर फडके + द मा मिरासदार. त्यांच्या शिबिरार्थीबरोबरच्या रात्रीच्या रंगलेल्या गप्पा आजही अंधुकशा आठवतात.
पुरंदरे आणि गो नि दांडेकर ह्यांच्या बरोबर महाराष्ट्रातील किल्ले बघणे हा एक वेगळाच अनुभव होता. माझे काही मित्र नित्यनेमाने हे करीत असत. त्या सहलीवरून परत आल्यावर ते काही दिवस त्यातच रमलेले असत आणि वर्तमानकाळ विसरून जात असत.
हा माणूस सतत शिवकाळात राहतो. त्यांचा  तोच एक ध्यास. त्यांचे सगळे जीवन शिवमय.
काही वर्षापूर्वी विलेपार्ल्यात लोकमान्य सेवा संघात  सावरकरांच्यासंबंधी एक कार्यक्रम होता म्हणून खूप वर्षांनी त्यांना प्रत्यक्ष ऐकण्यासाठी गेलो होतो. बाबासाहेब प्रमुख वक्ते होते.ते बोलण्यासाठी उठले. बोलू लागले आणि एकही शब्द सावरकरांच्या बद्दल न बोलता ते शिवकालात गेले आणि तेथेच रमले. हा बहुधा वयाचा प्रश्न असावा.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासकार कमी आणि शाहीर जास्त ,असे काहीजण म्हणतात. ते तितकेसे बरोबर नसले तरी त्यांचा ध्यास हा शिवाजी आणि शिवकाल हाच आहे , हे मान्य केले पाहिजे.
मी इतिहासकार सेतू माधवराव पगडी ह्यांना प्रत्यक्ष भेटलो आहे . त्यांची व्याख्याने ऐकली आहेत. त्यांची एका दिवाळी अंकासाठी प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे. ४-५ तास गप्पा मारल्या आहेत. त्यांचे बोलणेही रसाळ. पण इतिहासकार म्हणून पुरावे असल्याशिवाय काहीही मत व्यक्त करीत नसत. त्यामुळे बोलण्यात काटेकोरपणा असे. ते वेगळे व्यक्तिमत्व होते.
पु ल नी जसं महाराष्ट्राला वेड लावलं तसच शिवशाहीर  पुरंदरे ह्यांनी महाराष्ट्राला शिवकालीन इतिहास  ऐकण्याचे वेड लावले ह्यात वाद नाही. त्यांचा प्रचंड उत्साह आणि त्यांची उर्जा खूपच वाखाणण्यासारखी आहे व माणसाने आपल्या ध्यासासाठी कसं वेडं व्हावे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. 


No comments:

Post a Comment