Friday, February 13, 2015

मध्यप्रदेशचा दौरा - १


मध्यप्रदेश 
खजुराहो - हिंदू देव देवतांची शिल्पे असलेले हे जैन मंदिर . खजुराहो येथे ८५ हिंदू व २५ जैन देऊळे आहेत. ही मंदिरे बांधण्याचा काळ तोच होता .

भारताचा मध्यवर्ती प्रदेश , विन्द्य पर्वताच्या लांबच लांब रांगा. उत्तर आणि दक्षिण भारताला वेगळ्या करणाऱ्या. नर्मदा, तापी , चंबळ, बेटवा, सोने आणि महानदी ह्या नद्यांनी हिरवागार करणारी शेती. सुजलाम – सुफलाम असलेला हरित प्रदेश.  हिंदू – बुद्ध –जैन – मुस्लीम एकत्र गुण्यागोविंदाने राहणारा शांत प्रदेश. उज्जैन येथील हिंदू देवालये , सांचीचा स्तूप , असंख्य जैन मंदिरे , इस्लामी राजवटीच्या प्रभावामुळे स्थापित झालेल्या जुन्या मशिदी येथे सर्वधर्मभाव नांदतो हेच दर्शवितात. अनेक संस्कृतीचा जणू संगम. विन्न्द्य आणि सातपुडा ह्या पर्वत रांगांमध्ये पसरलेला सपाट प्रदेश. आजूबाजूला घनदाट जंगले. वन्यप्राणी अजूनही वस्तीला आहेत अशी जंगले. कान्हा आणि बांधवगढ येथील वाघ मुक्त संचार करतात.
खजुराहो : आज ४-५ हिंदू देवालये चांगल्या स्थितीत आहेत . त्यापैकी हे एक. 

शाकुंतलकार कवी कालिदास येथीलच. तानसेन इथलाच. खजुराहो येथील अप्रतिम हिंदू आणि जैन देवालये म्हणजे वास्तुकला आणि शिल्पकला ह्या क्षेत्रात भारतीयांनी घेतलेली प्रचंड झेप.  भीमबेटका येथील गुहा पाहिल्यावर  अश्मयुगीन भारतीय जीवन कसे होते ह्याची कल्पना तर येतेच पण  ई.स .पूर्व दहा हजार वर्षापूर्वी येथिल माणसांची चित्रकला आपल्याला थक्क करून टाकते.

भीमबेटका : अश्मयुगीन गुहा ( इ,स, पूर्व १०००० वर्षे )
 ह्या एकाच प्रांतातील तीन ठिकाणे ( खजुराहो , सांची आणि भीमबेटका ) WORLD HERITAGE SITES म्हणून प्रसिद्ध आहेत. इंदूरजवळील मांडू हे इतिहासकालीन शहर , प्रेमाच्या जगात प्रसिद्ध असलेल्या राणी रूपवतीचा महल ,  विक्रमादित्याचे उज्जैन , नर्मदेच्या काठावर असलेल्या विविध रंगी संगमरवरी दगडांच्या टेकड्या ( भेडाघाट ), बांधवगढचे जंगल आणि पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण , ही सारी ठिकाणे पहावयाची असतील तर २००० कि.मी. पेक्षा अधिक प्रवास करावा लागतो.
सांचीचा स्तूप 

 त्यासाठी आम्ही इंदूर – उज्जैन - भोपाळ – भीमबेटका – पंचमढी – जबलपूर – भेडाघाट – बांधवगढ – खजुराहो –झांशी – ग्वाल्हेर असा आडवा – तिडवा मध्यप्रदेश पादाक्रांत केला. ह्यावर्षी प्रचंड थंडी होती. काही ठिकाणी पारा चार  डिग्रीच्या खाली गेला होता.

नर्मदा : धुंवाधार धबधबा 

मी अनेकदा कामानिमित्त इंदूर – ग्वाल्हेरला गेलो होतो. पण इतर ठिकाणांना भेटी दिल्या नव्हत्या. काही वर्षापूर्वी ह्या प्रांतात फिरणे तसे कठीणच होते. चंबळचे खोरे दरोड्यासाठी आणि डाकूसाठी प्रसिद्ध होते. रस्ते जवळ जवळ नव्हतेच. मोठी शहरे नव्हती. आज चित्र खूप बदलले आहे. रस्ते एकदम सुंदर. खड्डेमुक्त रस्ते पहायचे असतील तर मध्यप्रदेशमध्ये रोडने प्रवास करावा. अहुनही शहरे विकसित झालेली नाहीत. इंदूर – ग्वाल्हेर – भोपाळ आणि जबलपूर ही प्रमुख शहरे. अजून SMART CITY होण्यास अनेक वर्षे लागतील. सोई-सुविधा जेमतेम. विक्रमादित्याचे उज्जैन हे फार दुर्दशा झालेले शहर दिसते. इंदूरचा जुना भाग खूप वाईट अवस्थेत आहे. जैन लोकांचे कांच मंदिर ज्या भागात आहे तेथे वाहतूक व्यवस्था पूर्ण कोलमडलेली आहे . 
राणी रुपमतीचा महल , मांडवगढ , इंदूरपासून १०५ कि.मी. 

ग्वाल्हेर शहर तसे अविकसितच आहे. इंदूर – ग्वाल्हेर येथील राजे मंडळी सुखात राहत होती. पण जनता मात्र वाईट अवस्थेत रहात होती. आजूबाजूच्या परिसराकडे ह्या राजे मंडळीनी काहीही लक्ष दिले नव्हते . शहराची वाट लागली आहे. जबलपूर थोडे बरे वाटले. पण अजूनही विकसित झालेले नाही.  पंचमढीसारखे थंड हवेचे ठिकाण. 

पंचमढी 
फारसे प्रगत नाही. लष्करी वस्तीचे ठिकाण असल्यामुळे थोडे वेगळे. मधुचंद्राला जाणारी युगुले तेथे असतात. परिसर निसर्गरम्य. उंच धबधबे. सातपुडा पर्वतांच्या रांगा. लाखो वर्षापूर्वी समुद्रातील प्रचंड हालचालीमुळे ,व ज्वालामुखीच्या स्फोटामुळे तयार झालेला हा भूभाग. काही अंतरावर अश्मयुगीन गुहा .  खजुराहोला पर्यटकासाठी खूप चांगल्या सुविधा नाहीत. गावातील रस्ते वाईट . स्वच्छता नाहीच. नवे विमानतळ होते आहे. दोन चार पंचतारांकित हॉटेल्स दिसून येतात. 
बांधवगढला जाण्यासाठी चांगले रस्ते होत आहेत. पण जंगल कमी होत आहे असे म्हणतात.

बेडाघाट - नर्मदाकाठी संगमरवरी दगडाच्या खाणी  

सध्याचे सरकार खूप काही करताना दिसत आहे. विकास होताना दिसतो आहे . रस्ते – पाणी आणि वीज ह्या तीन बाबतीत प्रगती दिसून येते. हिरवीगार गव्हाची शेती डोळ्यात भरते. कुठेही वैराण वाळवंट दिसत नाही. नर्मदेच्या काठाने प्रवास करताना डोळे दिपून जातात. काही भागात पात्रातील पाणी खूप कमी झाले आहे. त्यामुळे तो प्रदेश वाळूकामय दिसतो. नर्मदा हे ह्या प्रदेशाला मिळालेले वरदानच आहे. नर्मदेच्या आणि इतर नद्यांच्या काठाचा प्रदेश सुंदर करण्यासाठी प्रयत्न व्हावयास हवे.

ग्वाल्हेरचा किल्ला : मोगलांच्या पूर्वी  यवनांनी अनेक हल्ले केले  पण किल्ला  जिंकता आला नाही. 

विकासाचा वेग वाढला तर मध्यप्रदेश काही वर्षात विकसित प्रांत असेल. बिमारू ( बिहार – मध्यप्रदेश – राजस्थान – उत्तरप्रदेश )प्रदेशातील “म” कमी होईल.

मराठी माणसाला मध्यप्रदेश जवळचा आहे. आपुलकीचा वाटतो. मावळ  भाग तसा मराठी मावळ्याचा . अटकेपार मराठी माणसे झेंडा लावून आली. हा प्रदेश जिंकल्यावर काही मराठी सरदार इथे स्थिरावले . त्यांना जहागिरी मिळाल्या . ते राजे झाले . इंदूरचे होळकर आणि ग्वाल्हेरचे शिंदे एकेकाळचे मराठी सरदारच. झांशीची राणी तशी मुळची महाराष्ट्रातीलच. त्यानंतरही अनेक मराठी कुटुंबे येथे आली व स्थाईक झाली. एवढेच काय , फार पूर्वी म्हणजे इब्राहीम लोदीच्या दक्षिण स्वारीच्या आधी मांडवगढला परमार ( म्हणजे पवार ) राज्य करीत होते, असे म्हणतात. असा हा मावळ प्रांत .
असा हा मध्यप्रदेश पहाण्यासारखा आहे. प्रवास थोडासा त्रासदायक आहे . सोई-सुविधा अधिक उपलब्ध झाल्यातर अधिक पर्यटक आकर्षक होतील.  पुढील भागात खजुराहो , मांडू , भीमबेटका ,बेडाघाट , ग्वाल्हेर  ह्यांच्यावर विस्तारित लिहिणार आहे . 

मध्यप्रदेश -२  

 भीमबेटका म्हणजे भारतातील अश्मयुगीन मानवी संस्कृतीचा इतिहास
मध्यप्रदेश मधील भीमबेटका
इ.स. पूर्व दहा हजार वर्षापूर्वीची चित्रकला  
डॉ नरेंद्र गंगाखेडकर 

Friday, February 6, 2015

आनंदवन: एक प्रयोगशाळा






बाबा आमटे 
बर्याच वर्षांनी काही कौटुंबिक कामासाठी नागपूरला जाण्याचे ठरत होते. त्यावेळी बाबा आमटे ह्यांच्या "आनंदवना"ला भेट देण्याचे ठरविले. त्यासाठी एक पूर्ण दिवस राखून ठेवला. ३ फेब्रुवारीला जाण्याचे ठरविले . डॉ विकास आमटे ह्यांना फेसबुकवरून मेसेज  पाठविला . त्यांचे दुसर्या दिवशी उत्तर मिळाले. त्यांनी गेस्ट कोऑरडीनेटर श्री प्रभूंचा मोबाईल नंबर दिला व संपर्क साधण्यास सांगितले. भेटीची सर्व व्यवस्था ते करणार होते. त्यांच्याशी नागपूरला पोहोचल्यावर संपर्क साधला. 
मी महाविद्यालयीन जीवनात बाबा आमटे ह्यांच्या बद्दल खूप वाचले होते . ऐकले होते. त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती झाली होती. त्यावेळी बाबा आमटे युवकांच्यासाठी उन्हाळी शिबिरे घेत असत. माझे औरंगाबादचे काही मित्र त्या शिबिरांना जाऊन आले होते. ते खूप प्रभावित झाले होते. त्यातील काहीजण समाजसेवक झाले तर काहीजण समाजवादी चळवळीतून राजकारणात गेले. त्यांच्याशी नंतर संपर्क तुटला.


तीन चाकाची सायकल निर्मिती.: सौर उर्जेचा उपयोग 
बाबा आमटे ह्यांची ओळख महाराष्ट्राला झाली ती पु.ल.देशपांडे ह्यांच्यामुळे. ते दरवर्षी बाबा आमटे ह्यांच्या संस्थेला भेट देत असत. अनेक साहित्यिक त्यांच्या बरोबर तेथे जात असत. एक साहित्य जत्राच भरत असे. त्यांनीच ह्या संस्थेला 'आनंदवन' असे नाव सुचविले . त्यानंतर " जोडो भारत " आणि " नर्मदा बचाव आंदोलन " ह्या चळवळीमुळे बाबा आमटे पुन्हा प्रकाशझोतात आले. 
प्रत्येक हाताला काम : स्वयंपूर्ण होण्याचा अधिकार 
काही वर्षापूर्वी डोंबिवलीला झालेल्या रोटरीच्या वार्षिक परिषदेला डॉ विकास आमटे ह्यांना वक्ता म्हणून आमंत्रित केले होते तेंव्हा "आनंदवन" ह्या विषयावरचे त्यांचे प्रभावी भाषण अजूनही स्मरणात आहे. त्यावेळी आनंदवनाला भेट द्यायचे ठरविले होते. स्वतःच्या व्यावसायिक अडचणीमुळे तो योग जुळून आला नाही. 
रोजगार निर्मिती तर होते. माणूस स्वावलंबी होतो.
महात्मा गांधींची प्रेरणा विनोबा भावे ह्यांचा सहवास आणि मार्गदर्शन आणि बाबा आमटे ह्यांची स्वतःची सामाजिक जाणीव, त्यामुळेच आज आनंदवन उभे राहिले आहे. त्यांनी विलक्षण जिद्दीने हा प्रकल्प उभा केला आहे . वेदनाग्रस्त महारोग्यांच्या जीवनात आनंद तर निर्माण केलाच पण त्यांना स्वावलंबी केले.  आज तेथे  अनेक नवीन प्रकल्प चालू आहेत. बाबा आमटे ह्यांच्या तिसर्या पिढीने  सुद्धा या कामात स्वतःला गुंतवून घेतले आहे.
पॉवरलूमवर कापड निर्मिती. 
आनंदवनात फेरफटका मारताना “ज्यांची हृदये झाडाची असतात , त्यांनाच फक्त फुले येतात”, ही दत्ता हलसगीकारांची कविता पावलापावलावर आठवत राहते. म्हणूनच पु.ल.देशपांडे ह्यांनी “ आनंदवन “ हे नाव ह्या संस्थेला सुचविले असावे.  

हातमागावर कापड निर्मिती 

“ आनंदवनात प्रत्यक्ष काम  बघावयाचे असेल तर सकाळी ९ ते ११:३० किंवा दुपारी २:३० नंतर या. येथे रहावयाचे असेल तर गेस्ट हाउस आहे पण बुकिंग करावे लागेल." असा निरोप प्रभूनी दिला होता म्हणून आम्ही सकाळी ९ वाजताच तेथे पोहोचलो. आम्हाला एक दिवसात सर्व पहावयाचे होते कारण संध्याकाळी मुंबईला परतणार होतो.
स्वागतकक्षात प्रभूंची भेट झाली. त्यांनी दोन मार्गदर्शक आमच्याबरोबर दिले. 
आमचे गाईड : साळुंखे आणि अशोक 
साळुंखे तीन चाकाची सायकल चालवत आम्हाला परिसर दाखवीत होते तर अशोक इमारतीमधील निरनिराळे विभाग दाखविताना सर्व माहिती देत होते. साळुंखे ३५ वर्षापूर्वी आनंद्वानात आले होते. बाबा आमटे ह्यांच्या अनेक आठवणी ते सांगत. बाबांचे विचार आणि दृष्टी काय होती , हे ही समजावून सांगत.  ५०० एकराचा मोठा हिरवागार परिसर. अनेक इमारती झाडामध्ये लपून बसलेल्या. परिसर सुंदर आणि स्वछ  होता. काही इमारती आज जुन्या झाल्या आहेत.
अगदी सुरुवातीला हॉस्पीटलची इमारत लागली .
नेत्र चिकित्सा शिबीर / कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरे येथे होतात.
तेथे कुष्ट रोग्यावर उपचार केले जातात. त्यानंतर जवळच एक मोठी इमारत आहे. त्या ठिकाणी नेत्रचिकित्सा शिबिर भरते. मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ लहाने दरवर्षी येथे येत असतात. आजूबाजूच्या भागातून लोक शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी येथे येतात.त्यांना मोफत सेवा उपलब्ध करून दिली जाते. सर्व सोयीनी युक्त असे हे हॉस्पिटल आहे. त्या ठिकाणीच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जातात. अनेक शिबिरे भरतात. 
“प्रत्येक हाताला काम “ हे येथील तत्व. “ संधीनिकेतन” ही नवी संस्था किती सुंदर नाव. ह्या संस्थेत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे शिक्षण दिले जाते. विविध उद्योगांना लागणारे कुशल कामगार येथे शिक्षित होतात. नवी कौशल्ये – Skill Development चा हा प्रकल्प अगदी वाखाणण्यासारखा आहे. अपंग मुलानाही आपले कौशल्य विकसित करता येते. ह्या कुशल कामगारांचे काही फोटो खाली देत आहोत.

संधीनिकेतन : संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य शिक्षण येथे दिले जाते
आनंदवन ही एक प्रयोगशाळाच आहे. कुष्टरोग्यासाठी ते हक्काचे घर आहे. त्याची सुरुवात त्यासाठी झाली असली तरी आज त्या ठिकाणी अनेक प्रयोग चालू आहेत. हे एक अनोखे विश्व आहे. प्रत्यक्ष पाहून आल्यावर आपल्याला ह्या प्रयोगाची पूर्ण कल्पना येते. हस्तकला , काष्ठ्कला  , विणकाम , कापड निर्मिती एवढेच काय तीन चाकी सायकल निर्मिती , सौर विजेवर चालणारी तीन चाकी सायकल असे ४० हून अधिक उद्योग येथे चालू आहेत.

 Handloom आणि Powerloomचा विभाग खूप मोठा आहे. कुशल कामगार उत्कृष्ट कापड  निर्मिती करतात. अनेक कुटीर उद्योग आहेत. उत्तम प्रतीच्या लेदरच्या वस्तूंची निर्मिती ( चपला , बूट , पर्स इत्यादी) येथे होते. फेब्रीकेशन प्लांट आहे. सौर उर्जेवर चालणारी यंत्रे तयार होत आहेत. टायर आणि प्लास्टिक चा वापर करून बंधारे ही बांधले आहेत.

मूक-बधीर मुली हसत हसत काम करीत असताना आपले काम आम्हाला समजावून सांगत होत्या.
ह्या दोन मूक-बधीर मुली यंत्रावर फार सुरेख स्वेटर विणतात. त्या आपल्याशी हातवारे करून बोलतात. त्यांना चांगले लिहिता येते. आपल्याला सतत काहीतरी सांगत असतात. त्यांचा मुद्राभिनय खूप काही सांगून जातो. आपण बोललेले त्यांना चांगले समजते. त्यांची व्यक्त करण्याची भाषा खूप गोड आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे निरागस हास्य खूप काही सांगून जाते. मी ह्या पूर्वी पार्ल्याच्या मूक – बधीर विद्यालयातील मुला-मुलींशी संवाद साधला होता. पण येथील मुलींच्या कल्पकतेमुळे मी चकित झालो. मन लावून काम  करीत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हे वेगळेच होते. मुंबईच्या कोणत्याही कामगारांच्या चेहऱ्यावर मी असे हास्य कधीच पाहिले नाही. म्हणून हे खरोखर नावाप्रमाणे आनंदवन आहे.

ह्या भल्या मोठ्या सतरंजीची Order मिळाली आहे, चार स्त्रिया ती विणताना .
 आनंदवनातील ह्या स्त्रिया सतरंजी विणताना दिसत आहेत. अतिशय सुंदर वस्तूंची निर्मिती येथे होते. त्यांना चांगले प्रशिक्षण दिले गेले आहे. अगदी मन लावून त्या काम करतात. आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो. त्या दु:खी कष्टी दिसत नाहीत.
विविध रंगाच्या , विविध डिझाईनच्या  सतरंज्या येथे तयार होतात 














एक अपंग मुलगी पायात सुई-दोरा धरून ग्रीटिंग कार्डवरील चित्र बनवीत आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य खूप बोलके आहे
हाताने जे करता येत नाही ते पायाने सहज करता येते. सुंदर ग्रीटिंग कार्ड बनवणारी ही अपंग मुलगी. अपंग कसे म्हणणार ? ही जिद्द .. हे कौशल्य कुठून येते ?  सलाम ह्या हसर्या कुशल कामगाराला.
चित्रकलेत पारंगत असलेल्या ह्या स्त्रिया

ह्या स्त्रिया चित्रकलेत तरबेज आहेत. पेंटिंग करताना त्या रंगाशी खेळत आहेत आणि अतिशय सुरेख ग्रीटिंग कार्ड तयार करताना दिसत आहेत . केळ्याच्या सालीपासून त्या Wall Pieces तयार करतात. कलाकुसर वाखाणण्यासारखी आहे. हस्तकला कौशल्य पाहून आपण थक्क होतो.   


हे कलाकार, रंगाशी खेळत असतात. कलेची निर्मिती करताना ते आपली वेदना विसरतात. दु:ख विसरतात. जगण्याचा आनंद लुटतात.

केळीच्या सालीचा उपयोग करून तयार केलेली ही चित्रे
काष्ठशिल्प ही एक अनोखी शिल्पकला. निरनिराळ्या प्रकारच्या लाकडापासून तयार केलेली ही काष्ठशिल्पे. बाटल्यामध्ये सुटे भाग टाकल्यानंतर विशिष्ट प्रकारची नानाविध  अवजारे वापरून बाटलीत शिल्प निर्मिती केली जाते. अतिशय गुंतागुंतीचे व कठीण काम. त्यांच्यातील ह्या कलागुणांना सलाम.
बाटलीमध्ये शिल्प 
हे काम किती गुंतागुंतीचे व कठीण आहे हे पाहून आपण थक्क होतो. व आपल्या तोंडातून WOW !! असे उदगार बाहेर पडतात. काही शिल्पे इतकी सुंदर आहेत की कोणीही कला रसिक कोणतीही किमंत देऊन ह्या कलावस्तू विकत घेईल. पण ह्या वस्तू विक्रीसाठी नाहीत. आनंदवनातील कलादालनात त्या ठेवल्या आहेत. एक अप्रतिम कलादालन.
विविध प्रकारच्या लाकडापासून तयार केलेली शिल्पे - निरनिराळ्या झाडांची लाकडे 

येथे शेती केली जाते . फुलबागा-फळबागा  आहेत. भाज्या निर्मिती होते. शेती शाळा आहे. मोठे जंगल आहे. वन्य प्राणी आहेत. तलाव आहेत. नीट-नेटका निसर्ग आहे. हजारो झाडी आहेत. आनंद सागर हा मोठा तलाव आहे .

आनंद सागर

 दूर देशीचे पक्षी येथे मुक्कामाला येतात. पाण्याचे सुंदर नियोजन आहे.
आनंदवनात अनेक इमारती आहेत. प्रत्येकवेळी इमारत बांधताना काही झाडं तोडावी लागली. पर्यावरण महत्वाचे आहे म्हणून बाबा आमटे ह्यांनी एक झाड तोडलं तर दहा झाडं लावायची असा नियम केला आणि अभयारण्य निर्माण झालं.आनंदवनाच्या आजूबाजूचा परिसर एवढा हिरवागार नाही हे नागपूरकडे जाताना लक्षात येते.
अभयारण्याकडे जाणारा रस्ता

आमच्या मार्गदर्शकाने एका शीघ्र कवीची ओळख करून दिली. त्यांचे दोन कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. माझ्या विनंतीवरून त्यांनी दोन कविता गाऊन दाखविल्या. असे गुणी कलाकार भेटले. वारणानगरचा लहान मुलांचा प्रसिद्ध वाद्यवृंद आपल्याला माहित आहे. त्याच धर्तीवर आनंदवनातील कलाकारांचा एक Orchestra आहे. तेथे एक सभागृह आहे. हा कार्यक्रम म्हणजे एक धमाल असते. संगीतात रमलेली ही आनंदयात्री मंडळी वेगळी आहेत. संगीताची अनोखी मैफल ऐकण्यासारखी आहे.
आनंदवन - स्वरानंदवन 

एक माणूस दुसर्या माणसाची वेदना पाहून व्याकूळ होतो. त्याची सेवा करताना त्याला अशा माणसाना निवारा असावा , हक्काचे व प्रेमाचे घर असावे असे वाटते. रोग मुक्त करण्यासाठी तो प्रयत्न तर करतोच पण त्याच्या हाताला काम  देऊन स्वावलंबी करतो व मानाने जगण्यासाठी मदतीचा नव्हे तर मायेचा हात पुढे करतो.कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेत हेच व्यक्त केले आहे. एका भिंतीवर ही कविता लिहिली आहे. ह्या कवितेतून आनंदवनाची प्रेरणा लक्षात येते. 
प्रत्येक कळीत जगत असतो , निर्धार फुल होण्याचा ......... आनंदवनाची प्रेरणा 

हे देवाचे काम करणारा हा माणूस खरा देवमाणूस आहे. गमंत म्हणजे तो देव मानत नाही. तो देव शोधत फिरत नाही. आज तो माणूस तेथे नाही. पण त्याच्या कुटुंबातील सर्व माणसे हेच काम निष्ठेने मन लावून करताना दिसतात. त्यांच्यात ही आवड त्यांनीच तर निर्माण केली. अनेक जणांनी त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन अशीच सेवाकेंद्रे इतरत्र उभी केली आहेत. हे खूप मोलाचे कार्य करणारा हा माणूस.
देव नाही देव्हार्यात  - कुठे शोधशी मानवा - बाबा आमट्यांना  येथे देव दिसला 

आनंदवनात त्याच्या समाधीसमोर मी उभा होतो. प्रत्यक्ष त्यांना कधी पाहिले नाही. पण आनंदवनात मला ते सर्वत्र दिसले.

बाबा आमटे ह्यांची समाधी 
डॉ विकास आमटे ह्यांच्या पत्नी डॉ भारती आमटे ह्या माझी पत्नी नीलिमा हिच्या वर्ग मैत्रीण. त्या शारदा मंदिर , औरंगाबादच्या शाळेत एकाच वर्गात होत्या. मला हे अनेक वर्षे माहित नव्हते. शारदा मंदिरच्या मुख्याध्यापिका वैशंपायन बाईंची भारती ही मुलगी. हे माहित होते .औरंगाबादचे कॉंग्रेसचे माजी खासदार भाऊसाहेब वैशंपायन त्यांचे वडील. आम्ही आनंदवनाला भेट देणार आहोत असे आम्ही त्यांना कळविले होते. डॉ विकास आमटे ह्यांनी त्यांचा फोन नंबर दिला होता .त्यांना खूप आनंद झाला. आनंदवनातून निघताना त्यांची भेट घेतली. दोन वर्ग मैत्रिणी भेटल्या. जुन्या आठवणी जागा झाल्या. त्या दोघी बराच वेळ बोलत होत्या. इतर वर्ग मैत्रिणींची चौकशी चालू होती. कौटुंबिक चौकश्या झाल्या. नीलिमाने भारती आमटेंचा शाल देऊन गौरव केला. 
डॉ भारती आमटे -  प्रा ,नीलिमा गंगाखेडकर( ( कल्पना देशपांडे )  -  वर्ग मैत्रिणी - खूप वर्षांनी भेटल्या 
त्यांनी तेथील भोजनालयात आमच्यासोबत भोजन केले. जेवताना गप्पा खूप रंगल्या. जुन्या आठवणीना उजाळा आला.शाळेतील मैत्री तशी विसरत नसते. माणसे मोठी होतात.निरनिराळ्या क्षेत्रात नाव मिळवतात. पण बालमैत्री वेगळीच असते. ते ऋणानुबंध कायम असतात.
अशी ही आमची आनंदवनाची भेट. नं विसरता येणारी . खूप काही उर्जा देणारी . जगण्याचे प्रयोजन सांगणारी. आम्हाला आनंदयात्री करणारी.