Thursday, October 5, 2023

“आठवणीच्या जावे गावा” - दीपक पत्की


आमच्या ऑफिसच्या सोसायटीची एजीम मीटिंग होती. त्यावेळी आमचे मित्र दीपक पत्की भेटले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि बोलताना त्यांनी मला एक आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी पिशवीतून एक गिफ्ट काढले आणि मला दिले. मी घरी आल्यावर ते उघडून बघितले आणि त्यात त्यांनी लिहिलेले पुस्तक निघाले. “आठवणीच्या जावे गावा” हे त्यांचे पुस्तक. ते लेखक आहेत हे पहिल्यांदा समजले आणि थोडेसे आश्चर्यच वाटले. मी त्यांना १५/२० वर्षापासून ओळखतो. एक आर्किटेक्ट/इंटेरियर डिझायनर म्हणून. त्यांचे कार्यालय आमच्या संकुलातच आहे. येताजाता भेट होत असते. आमच्या गप्पा होत असतात. पण ते लिहितात हे माहीत नव्हते. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक चाळले आणि एक दोन लेख वाचले. एक लेख होता बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीचा आणि दूसरा लेख होता प्रसिद्ध चित्रकार श्याम जोशी यांचा. माझी श्याम जोशीशी ओळख झाली होती. मी त्यांच्या घरीही गेलो होतो. मी हौस म्हणून प्रकाशक झालो होतो. त्यावेळी मी प्रसिद्ध पत्रमहर्षी अनंत भालेराव यांचे “कावड” हे पुस्तक प्रसिद्ध केले होते. त्या पुस्तकाचे कव्हर शाम जोशी यांनी केले होते. त्यावेळी त्यांची ओळख झाली होती. आमच्या गप्पा झाल्या होत्या. पत्की यांनी या पुस्तकात त्यांच्यावर “श्या” हा फार सुंदर लेख लिहिला आणि मला ते व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. पत्की हे त्यांचे खास मित्र. त्या मित्रावरचा लेख खूप आवडला. मी लगेच त्यांना फोन केला आणि त्यांना ते दोन्ही लेख आवडल्याचे सांगितले. नंतर एक दमात ते पुस्तक वाचून काढले.

दीपक या मित्राने त्यांच्या व्यवसायात कितीतरी माणसं बघितली आहेत. त्यांना खूप मजेशीर अनुभव आले आहेत. त्यांची आयुष्याकडे बघण्याची जीवनदृष्टी खूप वेगळी आहे. गंमत म्हणजे या आठवणी शब्दबद्ध करताना हा लेखकू आपल्याला गुदगुल्या करून हसवीत असतो. त्यांना काही भेटलेल्या माणसांच्या आठवणी मात्र आपल्याला फार गंभीर करून टाकतात. काही माणसं आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला कुठे कुठे भेटत असतात.

खरं म्हणजे पत्की सारखी व्यावसायिक माणसं तशी रोजच असंख्य माणसं बघत असतात. पण ते लेखक नसतात. आणि जी लेखक माणसं प्रसिद्धीस येतात त्यांना अशा माणसांची आणि त्यांच्या जगण्याची फारशी माहिती नसते. कारण त्यांनी त्यांचे जीवन आणि समस्या ह्या जवळून बघितलेल्या नसतात. म्हणून दीपक पत्की यांचे हे लिखाण खूप वेगळं आहे. सुंदर आहे.

या पुस्तकात “परदेशवारी” हा एक भग आहे. त्यांनी आफ्रिकेतील काही देशात व्यावसायिक कामासाठी अनेक वेळा भेटी दिल्या आणि आफ्रिकेतील जीवन आणि माणसं खूप जवळून बघितली. त्यांच्या आठवणी आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला आफ्रिकन जीवनाची माहिती तर होतेच पण या अविकसित देशात व्यवसाय करणे किती कठीण आहे याची जाणीव होते. मी स्वत: ७० देश बघितले आहेत. अमेरिका, युरोप आणि इंग्लंडमध्ये व्यवसायासाठी अनेकदा गेलो आहे. तेथील लेखकांची पुस्तके आणि प्रवासवर्णनेही वाचली आहेत. पण आफ्रिकेत जाण्याची संधी मला मिळाली नाही आणि पर्यटनासाठीही मी गेलो नाही. दीपक पत्की यांनी व्यवसायासनिमित्त आफ्रिका खूपच जवळून बघितला आहे. त्यांच्या त्या आठवणी वाचताना आपल्याला आफ्रिकन जीवन समजत जाते व वेगळा अनुभव गाठी पडतो.

त्यांचे हे ललित लेख हे ३-४ पानाचेच असतात पण त्यांची लेखनशैली आपल्याला समृद्ध करते. त्यांची विनोदी शैली आपल्याला हसवत राहते.

वर मी त्यांनी लिहिलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखावरचा उल्लेख केला आहे. पत्की हे चित्रकार आहेत तसेच ते व्यंगचित्रकारही आहेत. त्यांची काही व्यंगचित्रे ही मार्मिक मध्ये प्रसिद्ध झाली होती. हंस, मोहिनी, मनोहर आणि किर्लोस्कर या मासिकातून त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली होती. पुढे स्वत:च्या व्यवसायामुळे त्यांनी ते काम बंद केले असावे असे दिसते.

श्याम जोशी त्यांचे खास मित्र. त्यांनी श्याम जोशीना चित्रकलेचा व्यवसाय परदेशात मिळवून दिला आणि अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या हॉटेलातून त्यांची भिंतीचित्रे लावली. पत्की श्याम जोशीचे फॅन होते. खूप जवळचे मित्र होते. त्यांचे व्यक्तीचित्र आपल्याला खूप काही सांगून जाते. श्याम जोशी एकदा त्यांना म्हणाले, “दोन दोन पत्की डबल पैसे घेऊन आले”. हे त्यांचे बोल आपल्याला त्यांच्या मैत्रीबद्दल तर सांगतात पण व्यावसायिक मैत्रीबद्दलही सांगतात.

त्यांच्या प्रवासातील असंख्य आठवणी आणि त्यांनी पाहिलेली माणसं आपल्या मनात घर करून बसतात. आफ्रिकेतील एक हॉटेल मधील टेबल पुसणारा पोरगा त्यांनी दिलेली टीप सांभाळून ठेवतो व जेव्हा तो स्वत: हॉटेल मालक होतो तेव्हा त्यांना एका ट्रीपमध्ये भेटतो तेव्हा ती अमूल्य टीप त्यांना दाखवतो आणि त्यांचे शब्द त्यांना कसे कमी आले हे मोठ्या अभिमानाने सांगतो.

दारी चालून आलेल्या लक्ष्मीकडेही पाठ फिरवून केवळ मनाच्या शांततेसाठी तपश्चर्या करणारा असाच एक ‘योगी’ माणूस त्यांना भेटतो.

‘पागल’ म्हणून कामाला आलेला सुतार हा तर एक खरा इंटेरियर डिझायनर निघतो. त्याची गोष्ट मजेशीर आहे.

“प्राण गेला तरी चालेल पण कोणाला लाच देणार नाही’ या तत्वाला चिकटून राहणारा त्यांचा मामा आपल्याला खूप काही सांगून जातो.

त्यांना एक भिकारी भेटतो आणि म्हणतो, ‘मुझे तो भगवानने बहोत दिया है!’. त्यातून ते आपल्याला सांगतात, ‘शेवटी समाधान हे मिळवण्यावर नव्हे तर मानण्यावर असते’. हेच खरे.

लोकानी त्यांना “बुवा” कसे केलं ही गोष्ट असेच खूप काही सांगून जाते.

दैवी चमत्काराच्या घडलेल्या तीन घटना ते सांगतात आणि आपण आश्चर्यचकित होतो.

असाच एक माणूस त्यांना भेटतो. तो त्यांच्या व्यवसायातील नसतो. तो त्यांना Detailingचे महत्व नीट समजावून सांगतो तेव्हा ते म्हणतात आपल्याला ‘गुरु’ कुठेही भेटतात आणि शिकवून जातात.

आफ्रिकेतील व्यवसायाची पहिली संधी त्यांना दैवयोगाने मिळाली खरी पण त्यांच्या कामातील कौशल्य, प्रामाणिकपणा व वैयक्तिक संबंध' या तीन गोष्टीमुळे त्यांचा व्यवसाय टिकून तर राहीला पण त्यांच्या जीवनाचे सोने झाले, असे ते मानतात. त्यांचे परदेशवारीचे अनुभव खूप वेगळे आहेत. निराळे आहेत. गंमतीदार आहेत. ‘हकुम मटाटा’ आणि ‘मोकांबो कुशवा’ हे लेख वाचून आपण खुश होतो.

असे हे पुस्तक खूप काही सांगून जाते. आपले मन प्रसन्न करते. असा व्यावसायिक माणूस अनुभवाचे बोल बोलू लागला की आपल्याला त्याच्यातील लेखक भावतो. आवडतो. 

(आठवणींच्या जावे गावा – दीपक पत्की, अश्वमेध प्रकाशन, १२४३, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०)

 

 

Friday, August 18, 2023

ओपनहायमर - ३


हिरोशिमा आणि नागासकी येथे टाकलेल्या अणुबॉम्बमुळे जी प्रचंड हानी झाली व त्यामुळे लाखों लोकांच्या मृत्यूला आपणच कारणीभूत आहोत हे ओपमहायमरच्या लक्षात आल्यामुळे तो मानसिक विषण्णतेमुळे विलक्षण दु:खी झाला. तो पूर्णपणे बदलला. त्यानंतर अमेरिकेने हायड्रोजन बॉम्ब निर्मिती करण्याचे ठरविले व तसे शासकीय निर्णय झाले. त्यावेळी ओपनहायमरने कोणत्याही अण्वस्त्र निर्मितीला आपला विरोध आहे अशीच भूमिका घेण्यास सुरुवात केली. मानवजातीच्या कल्याणासाठी अण्वस्त्र निर्मितीचा हा विचार योग्य नाही, असे विचार त्याने त्यावेळी मांडावयास सुरुवात केली. ‘न्यूक्लियर पाथ’ आणि ‘लष्करी सामर्थ्य’ यामुळे मानव हानी होणारच हे त्याला पटले असल्यामुळे तो विरोध करू लागला. आपण ‘Destroyer’ आहोत, हे शल्य त्याला विषण्ण करीत असे. त्याच्या या विरोधामुळे हा आपल्या देशाचा विचार न करिता सोव्हिएत रशियासाठी काम करणारा हेर तर नसावा, अशी शंका काही लष्करी अधिकारी घेऊ लागले. त्याच्यावर देशद्रोह्याचा आरोप होऊ लागला. त्यामुळे १९५४साली त्या संशयामुळे सरकारने एक चौकशी समिती गठित केली व त्याच्यावर ‘देशद्रोही’ म्हणून गंभीर आरोप केले. अणुबॉम्बमुळे झालेली मनुष्य हानी त्याला मान्य नव्हती, हे जसे खरे असले तरी त्याच्या आयुष्यातील दोन स्त्रिया ही तशाच जबाबदार असाव्यात, असे सरकारी अधिकाऱ्याना वाटत होते. त्या दोन्ही स्त्रिया ह्या कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. एक पूर्वीची प्रेयसी होती आणि दुसरीने तर ओपनहायमर बरोबर लग्न केले होते व त्यांना दोन मुले होती. लष्करी अधिकाऱ्याना या स्त्रिया हेरगिरी करणाऱ्याच असाव्यात, असा दाट संशय होता. त्यामुळेच ओपनहायमरचे सोव्हिएत रशियाशी संबंध असावेत, असे सरकारला वाटू लागले. त्याच्या देशप्रेमाबद्दल शंका निर्माण झाली व देशाच्या सुरक्षेसाठी त्याच्यापासून धोका आहे असे त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले.
"The Bomb for Bohr and Oppenheimer was a weapon of death that might also end war and redeem mankind", असेच त्या दोघांना आणि अनेक शास्त्रज्ञांना वाटू लागले होते. अणूशक्तीचा उपयोग संहारा करिता न करिता शांततेकरिता करणे अधिक महत्वाचे आहे, असे मानणारा मोठा वर्ग शास्त्रज्ञात तयार होऊ लागला होता.
Max Born हा शास्त्रज्ञ ओपनहायमरला म्हणाला, “See, Blood on my hands, I have made this tragic mistake”. त्यावेळी ओपनहायमर लगेच उत्तरला, “Yes, my disapproval for much I have done”.
एक प्रसिद्ध कवियत्री Ai लिहिते ..
“My soul, a wound that will not heal ……./
We strip away the tattered fabric…. /
Of the Universe ………
We become our own transcendent annihilation”
ओपनहायमर आणि अनेक शास्त्रज्ञांनी “Nuclear Ethics” चे महत्व अमेरिकन जनतेला समजावून सांगण्याचे प्रयत्न नेटाने सुरू केले.
Emily Strasser ही ओपनहायमरची नात. आपल्या आजोबावरील चित्रपट पाहिल्यानंतर
“Bulletin of Atomic Scientists” च्या ऑगस्ट ९, २०२३ च्या अंकात त्यांनी एक लेख लिहिला आहे. त्याचा मथळा आहे, “My grandfather helped build the bomb. “Oppenheimer” sanitized its impact”. जेव्हा अणुस्फोट झाला होता त्यावेळी त्या जन्मल्याही नव्हत्या. त्यांनी आपल्या आजोबाला बघितलेही नव्हते. आज जग खूपच बदललेले आहे. त्या म्हणतात, “The nine nuclear armed states collectively possess more than 12,500 warheads; the more than 9500 nuclear weapons available for use in military stockpiles have the combined power of more than 1,35,000 Hiroshima sized bombs”.
अण्वस्त्र निर्मिती करणारी ही राष्ट्रे “Destroyer of the Worlds” आहेत, हे लक्षात असू देणे महत्वाचे आहे.
ओपनहायमर हा चित्रपट बघितल्यानंतर सर्व जगातील प्रेक्षक हीच चर्चा करीत आहेत. ते सर्व अण्वस्त्र निर्मिती विरोधी आवाज उठवीत असतील तर ह्या चित्रपटामुळे जागृती झाली असे आपण म्हणू शकू. त्यातच मानवी कल्याण आहे.
Ethical Cultural Society साठी ह्या चित्रपटाचा संदेश महत्वाचा आहे.
ओपनहायमरने अणुबॉम्ब स्फोटाचे परिणाम बघितल्यानंतर भगवतगीतेतील खालील ओळी आपल्या समोरच्या वाळूवर हाताने लिहिल्या होत्या, त्याची आठवण त्यांच्या नातीला झाली. त्या ओळी होत्या ..
“Now, I am become Death, the destroyer of worlds”
असा वाळूवर लिहिलेला एक फोटो त्या लेखात छापला आहे. This was seen written in the dust on a deactivated nuclear missile.
*****


Wednesday, August 9, 2023

ओपनहायमर - २


( चित्रपट पाहिल्यानंतर Los Alamos येथील प्रयोगशाळेबद्दल मिळवलेली माहिती )

न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात अमेरिकन सरकारने Los Almos येथे अणुबॉम्ब निर्मितीसाठी एक संशोधन केंद्र उभारले होते. Manhattan Project प्रोजेक्ट असे त्याला नाव दिले होते. त्या प्रकल्पाचे प्रमुख होते जॉर्ज रॉबर्ट ओपनहायमर. त्या प्रयोगशाळेत  रॉय ग्लुबेर हे शास्त्रज्ञ काम करीत होते. Atomic Scientists ह्या नियतकालिकाच्या जुलै २०२३च्या अंकात त्यांची एक मुलाखत Dan Drollette Jr. यांनी घेतली आहे. Memories of Oppenheimer या लेखात ते म्हणतात “Oppenheimer did not speak the ordinary language”. Roy J. Glauber यांनी हार्वर्ड विद्यापीठातून Ph.D. पूर्ण केले होते. त्यावेळी तेथील प्रयोगशाळेतील Hans Bethe यांच्याबरोबर ते काम करीत होते. त्या प्रयोगशाळेत १४०० शास्त्रज्ञ काम करीत होते. २००५ मध्ये Glauber यांना पदार्थविज्ञानात नोबेल पुरस्कार मिळाला होता. ह्या मुलाखतीत त्यांनी अणुबॉम्ब निर्मिती करताना त्यांना जो अनुभव मिळाला त्यासंबंधीची माहिती दिली आहे. त्यावेळी त्यांना ओपनहायमर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव मिळाला. अर्थात या क्षेत्रात काम करताना खूप गुप्तता पाळावी लागते. त्यामुळे सर्व माहिती अशा मुलाखतीत मिळू शकत नाही. त्या मुलाखतीच्या आधारावर जी माहिती मिळाली ती येथे संक्षेपात देत आहे.

Dorothy McKibbin ही ओपनहायमर यांची सचिव होती. त्यांना ह्या प्रकल्पाची संपूर्ण माहिती होती. सांता फे येथील कार्यालय त्या बघत असत. Richard Feynman हा एक प्रमुख शास्त्रज्ञ त्याच प्रयोगशाळेत काम करीत होता. Feynman यांनी पदार्थविज्ञान विषयावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. पदार्थविज्ञानशास्त्राच्या विद्यार्थ्याना हे चांगलेच माहीत आहे. आम्ही ती पुस्तके अभ्यासली आहेत. तरुण Feynman हे एक विनोदी व्यक्तिमत्व होते. Glauber यांनी Feynmanच्या विनोदी स्वभावाचे खूप कौतुक केले आहे. त्यामुळे तेथील वसतीगृहातील ते एक आवडते शास्त्रज्ञ होते. तेथील शास्त्रज्ञांच्या गप्पा रंगून जात असत ते त्यांच्या विनोदी बोलण्याने. त्यांच्या गप्पामध्ये सतत हास्यकारंजी उडत असत. खरे म्हणजे Feynman हे एक बुद्धिमान गणीतज्ञही होते. अणुबॉम्ब पूर्वी जी Trinity Test झाली होती ती दूरच्या अंतरावरून कारमध्ये बसून बघणारे Feynman हे एकटेच शास्त्रज्ञ असावेत. त्यावेळी Glauber हे १८ वर्षाचे हुशार विद्यार्थी होते. त्या प्रयोगशाळेत कोण शास्त्रज्ञ काय काम करतो?, हे बाजूच्या शास्त्रज्ञालाही माहीत नसे. तेथे इतकी गुप्तता पाळली जात असे.

१९३० च्या आसपास Enrico Fermi या अणूशास्त्रज्ञाने न्यूट्रॉनचा उपयोग करून यूरेनियम विघटणावर काम सुरू केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नव्या अणूकणांचा शोध लावला होता. युरेनियम फिशनप्रक्रिया त्यांनीच शोधून काढली होती. फिशन चेन रिअॅक्शनची प्रक्रिया सुद्धा  त्यानीच शोधून काढली. त्या आधारेच अणुबॉम्ब निर्मितीचे काम तेथे सुरू झाले होते. त्यावेळच्या संशोधाकाना हे सर्व नवीनच होते. Nuclear Fissionया प्रतिक्रियेबद्दल त्यावेळी खूप गुप्तता पाळण्यात येत होती. तेथील शास्त्रज्ञांना आणि तंत्रज्ञांना असे वाटत असे की तेथे युद्ध तयारीसाठी काही अण्वस्त्र/क्षेपणास्त्रे निर्मिती चालू असावी. तेथे जे तरुण विद्यार्थी भरती केले जात होते त्यासाठी एक National Roster of Scientific Personnel तयार करण्यात आले होते. अनेक हुशार विद्यार्थी त्यांचा चालू असलेला अभ्यासक्रम सोडून ह्या प्रकल्पासाठी निवडले गेले व ते नेमके कशासाठी निवडले गेले याची ही त्यांना पूर्ण माहिती नव्हती. निवडल्यानंतर त्यांना ट्रेनचे तिकीट काढून दिले जात असे व त्यांचे सामान पोस्टाने पाठविले जात असे. 

Albert Einstein and Robert Oppenheimer

Glauberला शिकागो नंतर कुठे जायचे हेच माहीत नव्हते. आपण न्यू मेक्सिकोला जात आहोत, हे ही नीट माहीत नव्हते. त्याच्यासाठी सांता फे रेल रोडचा प्रवास नवीन होता. त्यांना स्टेशनवर भेटण्यासाठी आलेला एक तरुण पोरगा वेगळ्या रंगाची फर टोपी घालणारा होता व तो एक ब्लँकेट घेऊन त्याच्याकडे आला आणि त्यांना घेऊन पुढे निघाला. जेव्हा तो स्टेशनवर उतरला तेव्हा त्याला घेऊन जाणारा Lamy हा मुलगा पिवळ्या रंगाचा शर्ट घालून १० गॅलनची Hat घालुन त्याला शोधत आला होता. आणि तो मुलगा एक चांगला गणीतज्ञ होता. ते दोघे चालत असताना तो गणित या विषयावरच सारखा बोलत होता. त्याचे नाव होते न्यूमन. ते दोघे टेकडीवरच्या शास्त्रज्ञांच्या हॉस्टेलकडे जात होते. असे होते तेथील प्रयोगशाळेत काम करण्यासाठी आलेले नवे होऊ घातलेले शास्त्रज्ञ आणि त्यांचे जगणे. त्या ठिकाणी एका उंच टेकडीवर छोटी छोटी टुमदार घरे होती. तेथे मुलांच्या करिता शाळा होत्या. सुंदर 

फ्लॅटस असलेल्या छोट्या छोट्या अनेक इमारती होत्या. तेथे राहणाऱ्या शास्त्रज्ञांच्या छोट्या कुटुंबाची थोड्याच दिवसात मोठी कुटुंबे झाली. काही दिवसातच तेथील छोट्या प्रसूतीगृहाचे रूपांतर एका मोठ्या प्रसूतीगृहात झाले होते यावरून लक्षात येईल की तेथील तरुण वैज्ञानिकांचा विरंगुळा काय होता. तो गजबजलेला भाग झाला होता. तेथे यु.एस.आर्मी असल्यामुळे लष्करी सैनिकांची संख्या सारखी वाढत होती. असा तो गजबजलेला Los Almos चा परिसर. एका शास्त्रज्ञाला दूसरा शास्त्रज्ञ काय काम करतो आहे?,  याची काहीही कल्पना नव्हती. अनेक विद्यापीठातील नावाजलेले पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ आणि गणितशास्त्र प्राध्यापक त्यांच्या विद्यापीठाची नोकरी सोडून येथे आले होते व त्यांच्या हाताखाली तरुण विद्यार्थी मदतनीस म्हणून काम करीत होते. नवीन विद्यार्थ्याना काही दिवस विविध विभागात ट्रेनिंग दिले जात असे. आपण तेथे काय काम करणार आहोत?, व कशा करिता निवडले गेलो आहोत याची त्यांना काहीही कल्पना नव्हती. तेथील वाचनालय फार छान होते. पण तेथे जी गुप्त कागदपत्रे ठेवली होती ती फक्त ठराविक शास्त्रज्ञांनाच मिळत असत. काही दिवसांनी वरिष्ठ वैज्ञानिक तरुण सहाय्यकाला आपण कोणते काम करणार आहोत याची थोडीशी कल्पना देत असत. बऱ्याच तरुण शास्त्रज्ञांना हे खूप उशिरा समजत असे. जेव्हा Glauberला समजले की अणुबॉम्ब निर्मितीचे काम तो करणार आहे तेव्हा तो काहीसा अपसेट झाला. पण त्याची प्रतिक्रिया अशी होती – “I was really quite upset by that – the notion that this was not going to be so much about a gift to mankind, but a weapon.  And it did take some weeks and months to overcome that feeling … and to discover that there were really interesting mathematical problems involved in making this bomb. त्यांचे संशोधन विविध विषयावर व विविध अंगाने चालू असे. That kept him busy for next two years. तेथे वयोवृद्ध नागरिकांना प्रवेशच नसे आणि त्यांना कसलीही नोकरी देत नसत. या वसाहतीचे सगळेच गूढ होते. तेथे दळणवळणाची फारशी सोय नव्हती. फारच थोड्या लोकांच्या जवळ मोटारी होत्या. वाहने अशी नव्हती. रस्ते ही फारसे चांगले नव्हते. तेथे रेशनिंग होतं. गॅसची उपलब्धता कमी होती. फोन / रेडिओ संपर्क नव्हता. ते अतिशय गुप्त ठिकाण होते. इतराना तेथे जाण्यास बंदी होती. अतिशय कडक सुरक्षाव्यवस्था होती.  हे सर्व जाणून घ्यायचे असेल तर वर उल्लेख केलेल्या नियतकालिकातील Glauberची मुलाखत असलेला लेख वाचावा. Glauberला ओपनहायमर बद्दल विचारले असता तो म्हणाला, “Oppenheimer was an ultra-intellectual American, and he loved to express himself in poetic images and phrases. When Oppenheimer was in college – I think it took him only three years to go through Harvard – he developed the knack of reading Sanskrit and a passion of Indic poetry. Oppenheimer was a very different personality. He did not sound like a typical American Leader at all. He was about as opposite an individual as you could imagine from General Groves, the head of military side of operations. They were like two polar opposites. They often appeared together in public – the leader of science and the leader of the military. They were very careful that at important, strategic times, they would both appear together. 


                                Richard Feynman 


Jean Tatlok and Robert Oppenheimer 

तेथे अनेक स्त्री वैज्ञानिक/तंत्रज्ञ संशोधन करीत होत्या. Maria Goeppert Mayer या तेथे काम करणाऱ्या स्त्री वैज्ञानिकेला १९६३ साली नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यांनी येथील  प्रकल्पात अतिशय महत्वाची भूमिका निभावली होती. तेथे एक लायब्ररियन स्त्री (Charlotte Server) होती. ती ओपनहायमरचीची खास सल्लागार होती. तिचा उल्लेख त्यांनी अनेकदा केला होता. लिली होरनिग ह्या झेक-अमेरिकन स्त्री वैज्ञानिकेने या प्रकल्पात अतिशय महत्वाचे काम केले होते. तिने प्लुटोनियम ह्या रसायनावर काम केले होते. तिचे पती डोनाल्ड होरनिग यांना तेथेच नेमणूक मिळाली होती. Katherine KITTY” Opppenheimer was a German- American botanist and she played a role of wife of Los Almos Scientific Direcor J. Robert Oppenheimer. तेथील प्रयोगशाळेत Elezabeth Riddle Graves या स्त्री वैज्ञानिकेने जेव्हा पहिला चाचणी अणूस्फोट (Trinity) झाला तेव्हा दूरच्या अंतरावरून चाचणी प्रयोगात भाग घेतला होता. आणि त्यावेळी ती गरोदर होती. अलिस स्मिथ आणि तिचा नवरा हे दोघेही ह्या प्रयोगशाळेत संशोधन करीत होते. त्यावेळीच त्यांच्या लक्षांत आले होते की तेथे जगाची प्रचंड हानी करणारे एक अण्वस्त्र निर्माण करण्याचे  प्रयोग चालू आहेत. त्यामुळे जग उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. अनेक लोक मृत्युमुखी पडणार आहेत. ती Nuclearismची ती सुरुवात आहे असे त्यांना व तेथील काही शास्त्रज्ञांना वाटू लागले होते.पहिल्या अणुबॉम्ब चाचणी स्फोटाचे Code Name होते Triniti. १६ जुलै १९४५ला सकाळी ५ वाजून २९ मिनिटांनी हा अणुस्फोट करण्यात आला. Los Almos पासून २१० मैलावर हा स्फोट करण्यात आला. तो अणुस्फोट २५ किलोटन टीएनटी क्षमतेचा होता. यू.एस.आर्मीच्या सहकार्याने तो स्फोट घडवून आणण्यात आला होता. जेव्हा Trinityचा चाचणी अणुस्फोट झाला तेव्हा वीजा चमकत होत्या. पाऊस पडत होता. रात्रभर काम करून सकाळी ५:३० वाजता काही शास्त्रज्ञ त्या ठिकाणाहून त्यांच्या घरी परतले होते. वीज ज्या ठिकाणी पडली होती त्याच्या जवळच चाचणी अणुबॉम्ब ठेवला होता. एका १०० फुट उंचीवरील टॉवरवर अणुबॉम्ब ठेवला होता. वीज जर त्यावर पडली असती तर एक मोठे संकट निर्माण झाले असते. काही शास्त्रज्ञ चाचणी अणुस्फोट कसा होतो?, हे पाहण्यासाठी तेथेच दुरवरच्या अंतरावर थांबले होते. जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा Enrico Fermi, Hans Bethe, Richard Feynman, Leslie Groves, Robert Oppenheimer, Frank Oppenheimer, Geoffrey Taylor, Richard C.Tolman, Edward Teller, आणि  John Von Neumann हे शास्त्रज्ञ स्फोटाच्या जागेपासून दूर अंतरावर उभे होते. त्यांच्या प्रयत्नाना मिळालेल्या यशामुळे ते खूप आनंदी होते.   

वर उल्लेख केलेल्या मुलाखतीत पत्रकाराने Glauber या शास्त्रज्ञाला शेवटचा प्रश्न हायड्रोजन बॉम्ब बद्दल विचारला होता, तेव्हा तो लगेच म्हणाला..

Hydrogen bomb has never done anybody any good. It does exist, and it is an enormous threat, but it has accomplished nothing in constructive terms.

Nothing for science.

Nothing for anybody.

Nothing for security.

*****

* All photos from Google 


Saturday, August 5, 2023

ओपनहायमर - १

 

तुझा मुख ज्वाळ आणि जिव्हा चळण I

तेणे करूनी होतसे सर्व लोक ग्रासन II

त्या ज्वाळा भितरी त्रिभुवन I

ऐसे उग्र रूप विष्णू तुझे II

विनोबाची गीताई (अध्याय ११, श्लोक ३०-३२)

ऑगस्ट, १९४५ला सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी पहिला अणुबॉम्ब स्फोट झाला तो जपानच्या हिरोशिमावर. त्यात एक लाख लोक मृत्युमुखी झाले. केवळ सहा लोकच जिवंत होते आणि त्यांना असे वाटत होते की आपणच कसे जिवंत राहिलो. ७ ऑगस्टला जपानच्या लक्षात आलं की एक नव्या प्रकारचा अणुस्फोट घडवून आणण्यात आला आहे व त्याची निर्मिती अमेरिकेने केली आहे. सूर्यामध्ये रोज असंख्य अणुस्फोट होत असतात. त्याला अग्निसूर्य असे म्हणतात. सूर्य म्हणजे अग्निसूर्य. ती एक अग्निदेवता. गीतेमध्ये त्या अग्निसूर्याचे जे वर्णन केले आहे ते वर दिलेले आहे.

अमेरिकेने केलेल्या अणुस्फोटाचे जनक होते जॉर्ज रॉबर्ट ओपनहायमर. ते अणुबॉम्ब स्फोटाचे निर्माताप्रमुख होते. ते एक नावाजलेले पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ होते. त्या अग्निसूर्याची निर्मिती त्यांनी केली. त्यांच्यावर काढलेला “ओपनहायमर” हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. American Prometheus ह्या ओपनहायमर यांच्या चरित्रावर आधारित हा चित्रपट काढला आहे Christopher Nolan यांनी. चरित्र लेखक आहेत Kai Bird आणि Martin j. Smith. हे चारित्रात्मक पुस्तक म्हणजे, “It is triumph and tragedy of J Robert Oppenheimer”. हा एका वैज्ञानिकावर केलेला चित्रपट आहे. त्यामुळे काही लोकाना तो समजण्यास थोडासा कठीण आहे.

Prometheus म्हणजे God of Fire) - अग्निदेवता. अग्निसूर्याला आपण अग्निदेवता म्हणतो कारण त्यात सतत अग्निस्फोट होतच असतात म्हणूनच ‘तेज’ निर्माण होते. परमेश्वराची रुपे म्हणजेच पंचमहाभूते असे आपण मानतो (पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश.) American Prometheus म्हणजे अमेरिकन अग्निसूर्य. अमेरिकन अणुस्फोटाचा निर्माता ओपनहायमर. त्यामुळेच Prometheus ह्या शब्दाचा उपयोग लेखकांनी केला असावा. त्यांना हेच अभिप्रेत असावे, असे दिसते.

हिरोशिमावर हा अणुस्फोट झाल्यानंतर आणि तेथील जीवितहानी बघितल्यानंतर ओपनहायमर म्हणाला, “I am become death, the destroyer of the world’s”? श्रीकृष्णाचा अर्जुनाशी झालेला संवाद त्यांना आठवला. ह्या अग्निसूर्याच्या स्फोटातील मनुष्यहानी बघून त्यांना गीतेची आठवण झाली. त्यांनी गीतेचा अभ्यास केला होता. त्यांना गीतेतील खालील श्लोकांची आठवण झाली.

मी काळ लोकांतक वाढलेला I

भक्षावया सिद्ध इथे जनांस II

नष्ट होतील तुझ्या विना हि I

झाले उभे जे उभयत्र वीर II

तो अणुस्फोट व त्याचे परिणाम बघून ओपनहायमरला वाटले ..

जसे नद्यांचे सगळे प्रवाह I

वेगे समुद्रांत चि धावं घेती II

तसे तुझ्या हे जळत्या मुखांत I

धावूनी जाती नरवीर सारे II

(संदर्भ: विनोबांची “गीताई” किंवा सोपनदेवाची “सोपानदेवी”)

ओपनहायमर यांना त्या अणुस्फोटाची भयानकता लक्षात आली. ते विषण्ण झाले. म्हणूनच त्यांना गीतेतील वरील तत्वज्ञानाची प्रकर्षाने आठवण झाली असावी.

ओपन हायमर एक ज्यू. त्यांचे आई-वडील अमेरिकेत स्थाईक झालेले. त्यांनी व्यवसायात बऱ्यापैकी धनसंपत्ती जमा केली होती. ओपनहायमर शिक्षणासाठी इंग्लंडच्या Cavendish प्रयोगशाळेत काम करीत होते. त्यांचे मन प्रयोगशाळेत फारसे रमत नसे. Patrick Blackett हा त्यांचा प्रयोगशाळेतील शिक्षक. काही कारणामुळे ते त्याच्यावर रागावलेले असावेत. त्यांनी रागाच्या भरात त्यांच्या शिक्षकांच्या सफरचंदला एक विषारी Injection दिले. शिक्षकांनी ते सफरचंद खाण्यापूर्वीच ओपनहायमरला त्यांची चूक लक्षात आली व त्यांनी ते सफरचंद शिक्षकाच्या हाती पडू दिले नाही. असे होते विद्यार्थीदशेतील ओपनहायमर! त्यांचे मन इंग्लंडच्या शिक्षणात रमले नाही. Niels Bohr, Enrico Fermi, Einstein, Heisenberg या शास्त्रज्ञांनी गाजविलेला तो काळ होता. ओपनहायमर त्यानंतर जर्मनीला पदार्थविज्ञान शास्त्रात Ph.D. करण्यासाठी गेले. ते University of Gottingen मध्ये Max Born यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करीत होते. त्यांना २२ व्या वर्षीच पदार्थविज्ञान शास्त्रात डॉक्टरेट मिळाली. अमेरिकेत परतले ते एक नावाजलेले शास्त्रज्ञ म्हणूनच. १९२०च्या आसपास पदार्थविज्ञान शास्त्रात Quantum Mechanics हे नवे संशोधन क्षेत्र सुरू झाले. जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे अमेरिकेने अणुबॉम्ब निर्मिती करण्याचे ठरविले होते. न्यू मेक्सिको येथिल Los Alamos येथे अणुबॉम्ब निर्मितीसाठी मोठी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली होती. त्या प्रयोगशाळेचे मुख्यप्रमुख म्हणून ओपनहायमर यांची नेमणूक करण्यात आली. त्या संशोधन केंद्रात ४००० वैज्ञानिक/तंत्रज्ञ काम करीत असत. त्यावेळी अमेरिकेने शास्त्रज्ञांची एक मोठी साखळी निर्माण केली. Hans Bethe, Philip Morison, Herbert York, George KristiyaKowaski यासारख्या शास्त्रज्ञानी ओपनहायमरच्या नेतृत्वाला तेव्हा सलाम केला होता. Niels Bohr हा ओपनहायमरचा शिक्षक आणि मार्गदर्शक. त्यांची खास मैत्री होती. त्याने अनेक वेळा अणूसंशोधन केंद्राला भेट दिली होती व संशोधनात मार्गदर्शन केले होते. प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइनचा अणूविज्ञान क्षेत्राशी तसा फारसा संबंध नव्हता. पण त्यांनी अमेरिकन अध्यक्षाना पत्र लिहून अमेरिकेने अणुबॉम्ब निर्मिती करावी असा सल्ला दिला होता. कारण त्यावेळी जर्मनी हा एक युद्धखोर देश होता व या क्षेत्रात खूप पुढे होता. आइनस्टाइन हा तसा ओपनहायमरचा मित्र होता व त्यांची विविध विषयावर चर्चा होत असे. या सिनेमात ते दोन तीन शॉटमध्ये दाखविले आहे.

Albert Einstein and Oppenheimer

ओपनहायमरच्या सहवासात दोन स्त्रिया आल्या होत्या. त्याची पहिली प्रेयसी Jean Tatlock आणि दुसरी Kitty. किटी बरोबर त्याचे लग्न झाले होते. Jean Tatlok वर त्याचे प्रेम होते पण तिने विवाह करण्यास नकार दिला होता. या दोन्ही स्त्रिया चित्रपटात दिसतात. The Trouble with Oppenheimer is that he loves a woman who does not love him or marry him. या दोन्ही स्त्रिया कम्यूनिस्ट कार्यकर्त्या होत्या. त्याच कारणामुळे नंतर सरकारने त्याच्यावर देशद्रोहाचा खटला भरला होता. ओपनहायमर यांचे रशिया किंवा जर्मनी बरोबर लागेबांधे असावेत असा एक संशय पसरला होता

ओपनहायमरचे आयुष्य, त्याच्या जीवनातील अनेक चढउतार, त्याने मिळविलेले यश, अणुस्फोट झाल्यानंतर लाखो लोकांच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत, असे सतत वाटत असल्यामुळे त्याच्या मनात निर्माण झालेली विषण्णता, - म्हणजे हा चित्रपट. Oppenheimer’s creation of atom bomb was a Faustian bargain. It was based on his knowledge of physics and not for power or riches. It was for his own country. Oppenheimer stood for “Nuclear Ethics” after explosion of Atom Bomb.

मी या लेखाच्या दुसऱ्या भागात Manhattan projectवर आणि तिसऱ्या भागात त्याच्यावर चाललेल्या देशद्रोही खटल्यावर लिहिणार आहे.

(फोटो: गुगल वरुन घेतले आहेत)

 

*****

Friday, June 9, 2023

ज्ञानोबांची ज्ञानदेवी, सोपानाची सोपानदेवी, विनोबांची गीताई

ज्ञानोबांची ज्ञानदेवी
सोपानाची सोपानदेवी
विनोबांची गीताई
मंजुश्री गोखले यांचे 'ज्ञानसूर्याची सावली' ही सुंदर कादंबरी वाचायला घेतली. सोपानदेवांच्या 'सोपानदेवी'चा शोध लागला. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी अनेकदा वाचायला घेतली पण प्राकृत भाषेमुळे मला ती फारशी समजली नाही. संस्कृतमधील भगवदगीता समजणे कठीणच होते; कारण संस्कृत ही भाषा मला येतच नसल्यामुळे ती समजणे शक्य नव्हते. विज्ञान तंत्रज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे इंग्रजी भाषा येत होती, त्यामुळे स्वामी चिन्मयानंद यांची गीतेवरील प्रवचने ऐकली असल्यामुळे त्यांची गीतेवरची पुस्तके वाचली आणि माझी गीतेशी ओळख झाली. महाविद्यालयात असतांना विनोबा भूदान चळवळीच्या पदयात्रा करीता औरंगाबादला आले होते तेंव्हा त्यांना एकदा पहावे म्हणून त्यांच्या भाषणाला गेलो होतो. त्यावेळी बुकस्टॉलवर 'गीताई' चे पुस्तक हाती पडले आणि 'गीताई' वाचल्यामुळे गीतेचा अर्थ समजू लागला. विनोबांच्या आईला संस्कृतमधील गीता माहित होती पण समजत नव्हती. त्या विनोबांना म्हणाल्या ,' विनू , तूच गीता मराठीमध्ये लिही म्हणजे मला आणि इतरांना ती समजण्यास मदत होईल'. त्यांची आई असेपर्यंत विनोबा गीतेचे मराठी रूपांतर करू शकले नाहीत. आई गेल्यानंतर पंधरा वर्षांनी विनोबांनी 'गीताई' लिहिली. अनेकांना त्यामुळे गीतेची ओळख झाली. गीताईचे मी जेंव्हा जेंव्हा वाचन करतो तेंव्हा तेंव्हा मला गीतेचा अर्थ अधिक स्पष्ट होत जातो.
ज्ञानेश्वरांची ज्ञानदेवी म्हणजे भगवदगीतेवरील प्राकृतात केलेले भाष्य आहे.
'माझी मराठीची ये बोल कौतुके I
परी अमृताते ही पैजा जिंके I
ऐसी अक्षरे रसिके मेळवीन I I ,
असे ज्ञानदेव म्हणाले आणि अमृताची अवीट गोडी असलेला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांनी लिहिला. ती प्राकृत भाषा आज कोणालाही फारशी समजत नाही. त्यावेळी सुद्धा ही प्राकृत समजणे अवघडच होते. त्यावेळच्या बहुजन समाजाला ज्ञानेश्वरी समजत नव्हती. सोपानदेव ज्ञानेश्वरीतील काही ओव्यांचा अर्थ भक्तजनांना समजावून सांगत होते. चोखोबा सोपानदेवांना म्हणाले, "सोपानदेवा, ज्ञानेसरी तुम्ही वाचताय आणि आम्हाला अर्थ समजावून देताय म्हणून आम्हाला थोडं थोडं समजतंय; पण ज्ञानोबा माउलीची भाषा निसती वाचुन कोणालाच समजत नाही. त्या भाषेचे वैभव मोठं आहे. माउली बोलू लागते आणि आमचे डोळे दिपून जातात; पण आम्हाला समजत न्हायी काही". त्यावेळी शेजारी बसलेले सावता माळी म्हणाले, " सोपाना , आमचे जाऊ दे, अनंतभट पण हेच म्हणत होता". सोपानाच्या हे लक्षात आलं . निवृत्ती दादाबरोबर बोलताना त्यांनी हा विषय काढला. निवृत्ती दादाला हा मुद्दा पटला आणि त्यांनी सोपानदेवांना साध्या सोप्या नागर मराठी भाषेत गीतेवर लिहिण्याचे सुचविले. ते त्यांच्या मागेच लागले व त्यांनी 'सोपानदेवी' हा ग्रंथ लिहून घेतला व गीतेचे ओवीबद्ध भाषांतर करून घेतले. आणि गंमत म्हणजे 'सोपानदेवी' हा ओवीबद्ध ग्रंथ हा सोपानदेवांनी लिहिला आहे का नाही?, या बद्दल मतभेद आहेत. नवव्या , दहाव्या आणि पंधराव्या अध्यायातील ओव्यात 'सोपान म्हणे' असा उल्लेख आढळतो. मग हा सोपान कोण ?
मंजुश्री गोखले यांच्या ललित लेखन असलेल्या "ज्ञानसूर्याची सावली" ह्या कादंबरीत १८ अध्यायातील अनेक ओव्या दिल्या आहेत. त्या वाचताना मी आश्चर्यचकित झालो. हा १८ अध्याय असलेला गीतेचा मराठी अनुवाद आहे. तो खूप साधा, सोपा आणि सर्वांना सहज समजणारा तर आहेच. ही ओवीबद्ध सुंदर आणि देखणी रचना आहे . ती समश्लोकी गीता आहे.
सोपानदेवीची प्रत आळंदीला दत्त बुक डेपोकडे मिळते असे मला समजले. मी त्यांच्याकडून पुस्तक मागविले आहे. नंतर इंटरनेटवर शोध घेतला असता ई साहित्य प्रतिष्ठान ह्यांच्या वेबवर हे पुस्तक सहज उपलब्ध झाले. गंमत म्हणजे माझ्याकडे विनोबांची 'गीताई' आहे. मी गीताईतील श्लोक आणि सोपानदेवीतील ओवीबद्ध गीता यांची तुलना करू लागलो. दोन्हीही अतिशय साधे, सहज समजणारे सुंदर लिखाण वाचून मी खूप आनंदून गेलो. मी माहितीसाठी दोघांची एक ओवीबद्ध / श्लोक रचना देत आहे.
सोपानदेवी (अध्याय दुसरा ओवी २२)
जैशी वस्त्रे जीर्ण जालीयावरी I
पुरुष नवी वस्त्रे परिधान I I
तैसे देहभोग त्यजूनि दुरी I
आत्मा आणिक देहि व्रतें करी I I
गीताई (अध्याय दुसरा ओवी २२)
सांडूनियां जर्जर जीर्ण वस्त्रे I
मनुष्य घेतो दुसरी नविन I I
तशीच टाकुनि जुनी शरीरे I
आत्मा हि घेतो दुसरी निराळी I I
हे उदाहरण म्हणून दिले आहे. मी अनेक श्लोक आणि ओव्या पहात गेलो. सर्वच ओव्या /श्लोक साधे, सोपे व अर्थपूर्ण गीतेचे भाषांतर आहेत.
मंजुश्री गोखले यांचे पुस्तक माझ्या हाती पडलं आणि वाचताना इतका आनंद देत होतं की 'सोपानदेवी'चा आनंद घेताना मला एक वेगळाच अध्यात्मिक आनंद मिळत होता.

*****

Sunday, March 26, 2023

नर्मदा परिक्रमा - ३

 

महेश्वर – नेमावर – जबलपूर

आमचा परिक्रमेचा मार्ग होता तो असा – ओंकारेश्वर- ममलेश्वर, शूलपाणी जंगल, विमलेश्वर, काटेश्वर, रेवसागर जेथे नर्मदा अरबी समुद्राला मिळते ते भरूच जवळील भृगुतीर्थ, जवळच गोल्डन ब्रिज लागतो तेथे नर्मदा न ओलांडता रेवासागर पार करून नर्मदेच्या दुसऱ्या तटावर जायचे – गरुदेशवर, सरदार सरोवर, Statue of Unity, शूलपाणी परिसर, महेश्वर, मंडलेश्वर, इंदूर, ओंकारेश्वर, नर्मदासागर, नेमावर, भेदघाट जवळून जबलपूर मार्गे नर्मदा कुंड म्हणजे आमरकंटंक, मैय्या की बगिया, दिंडोरी, त्रिवेणी संगम, बरनीगाव, बरमान घाट, नर्मदापूर (होशंगाबाद), खंडवा मार्गे ओंकारेश्वर-ममलेश्वर, नागरघाट आणि शेवटी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर.










गरुडेश्वर नंतर निघालो महेश्वर- नेमावरकडे. उज्जैन मार्गे महेश्वरला पोहोचलो. २५० किलोमीटर अंतर. रात्रीचा मुक्काम महेश्वरलाच होता. महेश्वर म्हणजे राणी अहिल्याबाई होळकर यांची त्यावेळची राजधानी. जगतगुरू शंकराचार्य यांच्यानंतर हिंदू सनातन धर्माची पताका उंच फडकवली ती राणी अहिल्याबाई होळकरांनी. मुगल सम्राट औरंगजेब आणि त्यापूर्वीच्या यवनांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी अनेक मंदिरांना उद्ध्वस्त केले होते. काशी विश्वेश्वर, रामेश्वर आणि भारतातील अनेक मंदिरांना राणी अहिल्याबाई होळकरांनी पुन्हा  नव्याने बांधून काढले. महेश्वर आजही खूप छान अवस्थेत आहे. तेथील नर्मदा घाट फार सुंदर आहे. राजराजेश्वर मंदिराच्या परिसरातील हा प्रसिद्ध घाट. आदीगुरु शंकराचार्य यांचे येथे वास्तव्य होते. महेश्वर या शहराचा इतिहास खूप प्राचीन आहे. हैवानशी राजा सहसत्रार्जुन याची ही राजधानी होती. त्याने रावणाचा पराभव केला होता. हेच ते ठिकाण. ऋषि जमदग्नी येथीलच. त्यांचे पुत्र भगवान परशुराम यांनी वध केला होता सहस्त्ररंग यांचा. 


 





महेश्वरचे फोटो दिले आहेत ते त्यावेळच्या राजधानीचे शहर किती सुंदर असेल याची कल्पना देईल. राणी अहिल्यादेवींचा अतिभव्य राजवाडा सुरेख आहे. त्यावेळचा राजदरबार कसा भरत होता याची कल्पना येईल. अहिल्याबाईंनी किल्ला आणि राजवाडा फार सुंदर बांधला होता. त्यांचा काळ होता १७६५ ते १७९६. बाजूचा नर्मदा घाट देखणा तर आहेच. विशेष लक्ष वेधते ते अहिल्याबाईनीं बांधलेले देऊळ. त्या स्वत: रोज पूजा करीत असत ते ह्या मंदिरात. त्या रोज १००० शिवलिंगाची पूजा करीत असत असे गाईड सांगत होता.

सुलभ्य देह दुर्लभं  

महेश धाम गौरवं  


येथील प्रसिद्ध महेश्वरी साडी खूप प्रसिद्ध आहे. राणी अहिल्याबाई होळकरांनी स्त्रीयांच्या हाताला काम असावे. त्यांनी स्वावलंबी असावे. त्यासाठी हँडलुम साडीचा प्रयोग सुरू केला. तो खूप यशस्वी झाला. अहिल्याबाईंनी बांधलेले राजराजेशवर मंदिर वास्तूकलेचा अप्रतिम नमूना आहे. 






महेश्वरहून निघालो ते देवास जिल्ह्यातील नेमावरकडे. सिद्धनाथ नेमावर हे आहे सुप्रसिद्ध तीर्थस्थान. नर्मदेचे हे बेंबीस्थान. जमदग्नी ऋषींचे हे राहण्याचे ठिकाण. परशूरामांचा जन्म येथेच जानापाव गांवी झाला. जवळ ग्वाल टेकडी आहे. त्याला मणिगिरि असेही म्हणतात. सिद्धनाथाचे प्राचीन मंदिर म्हणजे पाषाण कारगिरिचा अद्भुत नमूना आहे. पांडवानी ह्या मंदिराची निर्मिती केली होती. ते त्यांना पूर्ण करता आले नाही म्हणून कौरवानी ते पूर्ण केले असे सांगतात. सध्या जीर्णशीर्ण अवस्थेतील हे तसे सर्वात जूने मंदिर आहे.




नेमावरचे सिद्धार्थ महादेव मंदिर आणि नर्मदा मैया दर्शन मन प्रसन्न करते.

सिद्धेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेतले आणि लक्षात आले ते कितीतरी टन वजन असलेले ते भव्य शिवलिंग. ही एक अद्भुत मूर्तीकला! या शिवलिंगाची स्थापना चार सिद्ध ऋषि – सनक, सननंदन, सनातन, सनतकुमार यांनी केली. तेथील ब्रम्हानंद घाट बघण्यासारखा आहे. नेमावर सोडले आणि भोपाळमार्गे ३५० किलोमीटरवर असलेल्या जबलपूरला पोहोचलो. रस्ते चांगले आहेत म्हणून बरे!  मान-पाठ आकसून जातात पण प्रवासतील गप्पा मनोरंजन करतात म्हणून मजा येते. जबलपूरच्या सरस्वती घाटावर नर्मदेचे छान दर्शन झाले आणि सारा थकवा निघून गेला.





तेथील ग्वारी घाटावरील नर्मदा आरती बघण्यासारखी आहे. आठवण झाली ती काशीच्या गंगा आरतीची.






 

नर्मदेत नर्मदा देवी मंदिर 


*****