Friday, August 19, 2022

घाचर घोचर: विवेक शानबाग

Ghacher Ghochar: Vivek Shanbhag
प्रसिद्ध कन्नड लेखक विवेक शानबाग यांची Ghacher Ghochar ही कादंबरी वाचायला घेतली. श्रीनाथ पेरूर यांनी ह्या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केला आहे. विवेक शानभाग यांची आज पर्यन्त कथेची ५ पुस्तके, २ नाटके आणि ३ कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या असून त्या सर्व कन्नड लेखनाचे इंग्रजीत भाषांतर झालेले असल्यामुळे त्यांना जागतिक वाचक वर्ग लाभला आहे. ते स्वत: इंजिनियर आहेत आणि त्यांनी ‘देश काला’ हे कन्नड पाक्षिक ७ वर्षे संपादन केले आहे. घाचर घोचर ही ११५ पानाची सुटसुटीत असलेली एक छोटी कादंबरी अतिशय अर्थपूर्ण आणि खूप काही सांगून जाणारी उल्लेखनीय कादंबरी आहे. अनेक मोठे कादंबरीकार ५००/७०० पानाच्या कादंबऱ्या लिहितात. त्या वाचताना कंटाळा येतो आणि वेळही खूप जातो. कादंबरी अशीच सुटसुटीत असावी. विवेक शानभाग यांचा उल्लेख साहित्य जगतात Indian Chekov असा करतात हे एक विशेष. ह्या कादंबरीबद्दल जगभरच्या सर्व प्रसिद्ध वर्तमानपत्रातील कॉलम मधून समीक्षकानी तोंड भरून कौतुक केले आहे. ते वाचताना एक लक्षात आलं की एका कन्नड कुटुंबाची ही भारतीय देशी कथा जगातील विदेशी वाचकाना आवडली कशी? म्हणूनच मी ही कादंबरी वाचायला घेतली आणि मला ती खूप आवडली. ह्या कादंबरीत एक मध्यमवर्गीय छोटे कुटुंब आहे. सेल्समन असलेले पन्नाशीचे वडील, त्यांची बायको, त्यांचा एक मुलगा आणि एक मुलगी आणि एक फारसे काहीच न करणारा व अवलंबून असलेला त्यांचा एक भाऊ. अशी माणसं आपण आजूबाजूच्या कुटुंबात पहात असतो. त्यांचं जगणं हे तसे सर्व सामान्य माणसासारखे असते. आर्थिक विवंचना तर मागे असतातच. मध्यमवर्गीय कुटुंबाला भेडसावणारे आर्थिक प्रश्न नेहमीचेच असतात. त्यामुळे त्यांची तयार झालेली मानसिक वृत्ती.
पैसा कमविणे तर आलेच पण खर्च कसं भागवायचा हाच प्रमुख प्रश्न. त्यामुळे वैतागलेले कुटुंब. त्यांचा ध्यास असतो अधिक पैसे मिळवण्याचा. मध्यमवर्गीय जीवनातून जायचे असते उच्च मध्यमवर्गीय जीवनाकडे. व्हायचे असते Neo Rich. अशी ही भारतीय कुटुंबाची कथा विदेशी वाचकाना का बरे आवडली असावी? विवेक शानभाग ह्यांच्या कादंबरीला हे असंख्य वाचक कसे आकर्षित झाले असतील? ते त्यांना जमलं आहे ह्याचे कारण त्यांची सुरेख भाषाशैली. गोष्ट सांगण्याची त्यांची पद्धत. सामान्य माणसाच्या स्वभावातील उकलून दाखविलेले धागेदोरे. सामान्य माणसांच्या सुखदु:खातील प्रसंग वर्णने. वाचक नकळत कादंबरीतील पात्रात गुंतत जातो. त्याला ही आपल्या अवती भोवतीची ओळखीची माणसं वाटू लागतात. तो त्या पात्रातून आपल्या आजूबाजूच्या माणसाचा शोध घेऊ लागतो. ही माणसं जगभर तशीच असतात. त्यामुळे वाचकाला आपण ही त्यापैकी एक आहोत असे वाटू लागते, वाचक माणूसशोध करत कादंबरी वाचत जातो. वाचकाला कथेत कसे गुंतवायचे हे विवेक शानबाग यांना फार छान जमले आहे. ह्या कादंबरीत लेखकाने मांडल्या आहेत त्या कुटुंबाच्या आर्थिक समस्या. एके ठिकाणी ते लिहितात.. “It is true what they say – it is not who control money, it is the money that controls us. When there is only a little , it behaves meekly; when it grows, it becomes brash and has its way with us”. पैशाबद्दल मांडलेले हे एक सत्य. हे आपल्याला लक्षात येते. कनिष्ठ मध्यमवर्गातील माणसं जेव्हा उच्च मध्यमवर्गीय आयुष्य जगू लागतात तेव्हा त्यांना पैसा वेगळा दिसू लागतो. त्यांची खर्च करण्याची प्रवृत्ती बदलू लागते. पैसा आपले जीवन बदलून टाकतो आहे, हे लक्षात येऊ लागते. छोट्या चाळीच्या घरातून जेव्हा कुटुंब दोन मजली बंगल्यात राहायला जाते तेव्हा त्यांची Life Style बदललेली असते. माणसं बदललेली असतात. जगण्याचे नवे स्वातंत्र्य त्यांना बदलून टाकते. त्यांची मने बदललेली असतात. ह्या कादंबरीचा नायक म्हणजे त्या कुटुंबातील मुलगा आपल्याशी संवाद साधत असतो. त्याला माहीत असते की त्याने काहीही विशेष प्रयत्न न करता तो त्याच्या काकाच्या छोट्या उद्योगामुळे कंपनीचा संचालक झालेला आहे. आणि काहीही काम न करता कंपनीकडून भरपूर पगार घेत आहे. तसा तो एकाकी जीवन जगत असल्यामुळे तो रोज एका कॉफी हाऊसमध्ये जाऊन वेळ काढताना तेथील वेटर बरोबर गप्पा मारीत आपले मन मोकळे करीत असतो. बायको असूनही तो तिच्याबरोबर बोलू शकत नाही. त्याची घटस्फोट घेतलेली बहीण ही असेच दुर्दैवी एकटेपण भोगीत असते. अकाली नोकरी गेलेले वडील आपल्या भावाबरोबर छोटासा उद्योग उभा करण्यासाठी नोकरी गेल्यानंतर मिळालेला फंड भांडवल म्हणून भावाच्या व्यवसायात गुंतवतात आणि काहीच न करणाऱ्या मुलाच्या पोटापाण्याची व्यवस्था करतात. त्यांचा भाऊ मिळालेल्या भांडवलामुळे व्यवसाय सुरू करतो आणि त्याचा धंदा जोरात चालतो. त्यामुळे कुटुंबाकडे पैशाचा ओघ सुरू होतो. हा पैसाच त्यांचे जगणे बदलून टाकतो. अशी ही कौटुंबिक यशाची आणि अपयशाची सामान्य कहाणी. विवेक शानभाग हीच कहाणी नाट्यमय पद्धतीने आपल्याला सांगत असतात. तशी ही एक साधी कुटुंब कथा. कुटुंबातील माणसांच्या मनात चाललेले द्वंद. कादंबरीकार हे कुटुंबनाट्य आपल्यासमोर उभे करतो. आपण ह्या पात्रात नकळत गुंतत जातो. अशी ही कादंबरी तुमचीआमची. The New Yorker मध्ये ह्या कादंबरीवर लिहिताना समीक्षक लिहितो, “It is a classic tale of wealth and moral ruin and a parable about capitalism and Indian Society”. Kirkus Reviews writes,“A compact novel that crackles with tension.’ Suketu Mehta says, “ Vivek Shanbhag is an Indian Chekov”. *****

Tuesday, August 9, 2022

कमला मार्कंडेय: Nectar in a Sieve

पार्थ हा माझा नातू. अलीकडेच आम्हाला भेटण्यासाठी दिल्लीहून बंगलोरला जाताना मुंबईला आमच्याकडे आला. तो दिल्लीला एस.आर.सी.सी.मध्ये पदवी शिक्षणासाठी होता. त्याचे वाचन तूफान. लिहितोही खूप छान. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व. गप्पा मारताना त्याला सहज विचारले, ‘अलीकडे कोणती पुस्तके वाचली आहेस?’. त्याने लगेच बॅगेतून काही पुस्तके काढून माझ्यासमोर ठेवली आणि मी ती पुस्तके चाळू लागलो. त्यात इंग्रजी कथा-कादंबऱ्या होत्या. मी फार थोड्याच गाजलेल्या इंग्रजी कादंबऱ्या वाचल्या असतील. माझे जे काही वाचन झाले आहे ते शाळा-महाविद्यालयात असतानाच. नंतरच्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात मला दीर्घ कादंबऱ्या वाचने वेळे अभावी तसे कठीणच होते . गेल्या दहा वर्षात वाचन हाच माझा विरंगुळा आहे. पार्थची पुस्तके चाळताना Nectar in a Sieve हे कमला मार्कंडेय ह्यांचे पुस्तक वाचायला घेतले आणि एका बैठकीत वाचून टाकले. पुस्तकाच्या मलपृष्ठावर शशी थरूर ह्यांनी ह्या लेखिकेविषयी जे लिहिले आहे ते विशेष लक्षवेधी होते. ते लिहितात, ‘कल्पना मार्कंडेय ह्या ब्रिटिश भारतीय लेखिकेने भारतीय लेखकांना इंग्रजी कथा-कादंबऱ्या लिहिण्यास प्रोत्साहित केलं’. Nectar in a Sieve ही कादंबरी त्यांनी १९५४ लिहिली. भारतीय ग्रामीण जीवनावर इंग्रजीत लिहिलेली ही कादंबरी जगभर लोकप्रिय व्हावी, हे ह्या लेखिकेचे मोठेच कर्तृत्व आहे आणि त्यामुळे इतर भारतीय लेखकांना इंग्रजीतून लिहिण्यासाठी स्फूर्ती मिळणे साहजिकच आहे. जगातील १७भाषेतून ही कादंबरी भाषांतरीत झालेली आहे आणि तिचा खप वीस लाखाहून अधिक झालेला आहे. अशी ही लोकप्रिय कादंबरी आहे.
कल्पना मार्कंडेय (१९२४-२००४) ह्या म्हैसूरच्या एका मध्यमवर्गीय मध्व कुटुंबातील. त्यांनी मद्रासच्या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी मिळविली आणि पत्रकारीतेत काही वर्षे काम केलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे १९४८साली त्या इंग्लंडला गेल्या आणि तेथेच स्थाईक झाल्या. Taylor ह्या लेखक/ पत्रकाराशी त्यांचा विवाह झाला. १९५३साली त्यांनी ही पहिलीच कादंबरी लिहिली आणि त्यांना भरपूर प्रसिद्धी आणि यश मिळाले. त्यांच्या दहा कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या कथाही खूप गाजल्या. एक Indian Novelist in English असा American Library Association Notable Book in 1955 सन्मान त्यांना मिळाला. म्हैसूर जवळील एका खेड्यात नाथन हा भातशेती करणारा एक शेतकरी. त्याच्या कुटुंबाची ही दर्दभरी कहाणी. १९४८-५१चा तो काळ. एका गरीब दरिद्री कुटुंबाचे ते हलाखीचे ते दिवस. नाथन, त्याची बायको रुक्मिणी, तिची मुलगी इरा आणि पाच भाऊ. ह्यांची ही कहाणी. त्याकाळचे ते ग्रामीण जीवन. मी ही कादंबरी वाचू लागलो तेव्हा मला आठवली ती व्यंकटेश माडगूळकरांची ‘बनगरवाडी’ ही कादंबरी. दक्षिण महाराष्ट्रातील ती मानदेशी माणसं. भातशेती करणारा नाथन जेव्हा वाचू लागलो तेव्हा मला आठवले ती श्री. ना. पेंडसे ह्यांची ‘तुंबाडचे खोत’ ही कादंबरी आणि कोकणातील ती माणसं. बनगरवाडी हे पुस्तक आम्हाला अकरावीला नॉनडिटेल म्हणून अभ्यासक्रमात होते. त्यामुळे त्याचा खूप बारकाईने अभ्यास केला होता. हे दोन्हीही लेखक आणि कल्पना मार्कंडेय हे एकाच काळातले. (१९२०-२००९). कमला मार्कंडेय म्हैसूरच्या तर व्यंकटेश माडगूळकर दक्षिण महाराष्ट्रातील. पेंडसे कोकणचे. ह्या तीनही कादंबऱ्यातील पात्रे आणि जनजीवन हयात खूपच साम्य आहे. गरीबी तर सर्वत्रच तशीच होती आणि आजही आहेच. कोकणातला खोत असो का म्हैसूर जवळच्या खेड्यातला नाथन असो. दोघांचेही जगणे सारखेच. प्रश्न ही तसेच. माणसंही तशीच. दारिद्र्य आपण नेहमीच सर्वत्र बघतो. सर्वच भारतीय कुटुंबाचे जगणे तसे सारखेच. ही माणसं आपल्या रोजच्या जीवनात आपण जवळून पहात असतोच. असं असूनही कमला मार्कंडेय ह्यांची ही कादंबरी पुढे वाचवीशी वाटते. अशा विषयावर अशी कादंबरी लिहून जगातील वीस लाखाहून अधिक वाचकांना आकर्षित करणे तसे सोपे नाही. ते एक आश्चर्यच आहे. अशा कादंबरीकडे लक्ष वेधून घेणे सोपे नाही. हे त्यांना कसे जमले असेल असा मी विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात आलं ते ह्या लेखिकेचे भाषासामर्थ्य! तशी ही कादंबरी ही प्रेमकहाणी नाही किंवा तरुणांचे मनोरंजन करणारी एखादी गोष्टही नाही. आपण ही कादंबरी वाचत राहतो ह्याचे प्रमुख कारण म्हणजे ह्या लेखिकेचे भाषावैशिष्ट्य. साधीसोपी भाषा असली तरी इंग्रजी भाषेतील शब्दांचे वेगळे सौन्दर्य. व्यक्त करण्यासाठी वापरलेले असंख्य इंग्रजी शब्द. ते आपल्याला अपरिचित असले तरी वाक्यरचनाच इतकी सुरेख आणि बोलकी की आपण ही कादंबरी पुढे वाचत जातो. ह्या कादंबरीतील नाथन, रुक्मिणी, इरा ही आपण पाहिलेली आपल्या आजूबाजूचीच माणसं. आपल्याच जीवनातील. त्यांच्या भावभवना ह्या आपल्याच असतात. आपल्याच जवळच्या माणसांच्या असतात. विशेष म्हणजे जगातील वीस लाख वाचकाना ही माणसं आणि त्यांची दु:खे आपली वाटावीत हेच खूप काही सांगून जातं. Nectar in Sieve हे कादंबरीचे नाव कमला मार्कंडेय हयानी घेतले आहे ते Samuel Taylor Coleridge ह्यांच्या १८८५ च्या “World Without Hope” ह्या एका कवितेतून. तसं हे नाव खूपच बोलकं आहे आणि खूप काही सांगून जातं. ह्या मथळ्याचा अर्थ असा.. “Hope or Sweetness in Life (Nectar म्हणजे अमृत). It is difficult to hold on to almost like trying to carry in Sieve(Strainer). Nectar म्हणजे मध, मधुरस, मकरंद – मधमाश्या फुलातून गोळा करतात तो मध. Sieve म्हणजे चाळणी / गाळणी. ह्याचा थोडक्यात अर्थ असा की आपल्या ह्या दरिद्री जीवनातील मध (म्हणजे आनंद) गोळा करून जगणे. हेच नाथन- रुक्मिणी आपल्याला सांगत असतात. खरं म्हणजे रुक्मिणीच आपल्याशी बोलत असते. कमला मार्कंडेय आपल्याशी बोलत असतात ते रुक्मिणीच्या संवादातून. त्या एके ठिकाणी म्हणतात, “Change I had known before, and it had been gradual. But the change that now came into our life, into all our lives, blasting its way into our village, seemed wrought in the twinkling of an eye”. असे हे खूप समर्पक शब्द. अशी शब्दाची उधळण त्यांच्या भाषेतील सौंदऱ्यातून जागोजागी दिसून येते. ह्या कादंबरीत नाथन कुटुंबाच्या दारिद्र्याचे भयानक दर्शन उभे केले असले तरी आशेच्या पाठीमागे जाऊन नवा मार्ग शोधणारी रुक्मिणी लक्षात राहते कारण समोर येणाऱ्या नव्या निराशेचे ढग बघून पुनः निराश होण्याची वेळ आली तरी न डगमगणारी ती वेगळी स्त्री आहे. आहे नाही ते गमावल्यानंतर काहीच हाताशी नसताना जगायचे कसे हे सांगणारी रुक्मिणी- नाथन आणि त्यांच्या कुटुंबाची ही कहाणी दर्दभरी आहे तशीच खूप काही सांगणारी आहे.
*****  

Sunday, May 22, 2022

त्रिपर्ण - मोनिका गजेंद्रगडकर

देशी – विदेशी – अदेशी कथासंग्रह
खूप मोठ्या म्हणजे ४०-५० पानाच्या दीर्घकथा वाचायचा मला फार कंटाळा आहे. फार मोठ्या कादंबऱ्या वाचण्याइतकेच ते अवघड काम आहे. मला लघुकथा आवडतात. थोडक्यात लिहिणारे काही लेखक तसे खूप काही सांगून जातात. मोनिका गजेंद्रगडकर ह्यांच्या काही कथा मी दिवाळी अंकातून वाचल्या होत्या. त्या एक आघाडीच्या कथाकार आहेत, हे मला माहीत आहे. त्यांचे ‘त्रिपर्ण’ हे कथेचे पुस्तक माझ्या हाती आलं. तीनच कथा असलेले हे पुस्तक. त्यातील २४ पानांची त्यामानाने छोटी असलेली ‘फ्लेमिंगो’ ही कथा प्रथम वाचावयास घेतली. ती आवडली. देशी-विदेशी माणसांची ही कथा. एका एन.आर.आय. असलेल्या माणसाची आणि त्याच्या छोट्या कुटुंबाची ही दर्दभरी कहाणी. ४०-५० वर्षापूर्वी परदेशी स्थलांतरीत झालेल्या अनेक भारतीय कुटुंबातील ५-१० कुटुंबात तरी अशा कथा ऐकावयास मिळतात. अशा एन.आर.आय.चे वृद्ध मातापिता आपल्या आजूबाजूलाच रहात असतात. त्यांच्या दु:खाची आपल्याला थोडीशी कल्पना असते. सुरवातीला शिक्षणासाठी गेलेले हे भारतीय तेथे पैसा आणि प्रतिष्ठा मिळविल्यानंतर तेथील विदेशी मुलीबरोबर संसार थाटतात. पहिली काही वर्षे ते भारतात आई-वडिलांना भेटायला येतात. आई-वडिलही एक-दोनवेळा त्यांच्याकडे जाऊन येतात व आपल्या मुलाच्या कर्तृत्वावर खूश होतात. तेथील संसारात रमलेला हा मुलगा नंतर वृद्ध आई-वडिलांच्याकडे फारसे लक्ष देत नाही. हे तर आपण आजूबाजूला पहात असतोच. ह्या कथेतील असाच एक भारतीय मुलगा. त्याचे दुर्दैव;आणि तो तरुण वयातच जातो. त्याला सॅम नावाचा एक मुलगा असतो. त्याची आई तिकडलीच असते. आणि अचानक सॅम् आणि त्याची आई सॅमच्या आजोबा-आजीला भेटायला भारतात येतात. तो आजोबा-आजीला एक सुखद धक्काच असतो. सॅमसारखा परक्या भूमीत रुजलेला हा मुलगा फ्लेमिंगोसारखा स्थलांतर करून आजोबा-आजीला भेटायला भारतात येतो. आपल्या वडिलांचे मूळ शोधायला तो येतो खरा; पण ते शोधताशोधता त्याला स्वत:चे स्वत्व गवसते. त्याचीच ही आपल्या मनाला चटका लावणारी कहाणी. ही कथा मला आवडली म्हणून पुस्तकातील इतर दोन कथा मी वाचल्या. मोनिका गजेंद्रगडकर ह्या आपल्या कथातून डोरोथी, इसाबेला, जेसी, केटी ह्या परदेशी स्त्रियांच्या व्यक्तिरेखा छान रेखाटतात. मानवी नात्यातील गुंतागुंत शोधताना तेथील मूल्यांचा त्या शोध घेताना दिसतात. एन.आर.आय. जेव्हा तेथील जीवनात स्थिरस्थावर होत असतात तेव्हा नकळत त्यांच्या जीवनात तेथील विदेशी स्त्रियांचा प्रवेश होतो आणि तेथील भिन्न संस्कृतीमुळे त्यांच्यात जगण्याचे नवे ताणतणाव निर्माण होतात. त्यामुळेच त्यांच्या नातेसंबंधात अनेक अडचणी निर्माण होतात. रंग आणि वंश यांच्यातील भेदामुळे जगण्याचे नवे प्रश्न निर्माण होतात. जगातील वर्णभेद फक्त जातीभेदाच्या पोटातून जातात असे नाही. त्याचे उच्चाटन हे होऊ नं शकणाऱ्या एखाद्या रक्तपिपासू, जिवट रोगासारखे असते. ‘वंश’ ह्या कथेतून हेच विदारक सत्य लेखिकेने मांडलं आहे. हे मांडताना कथेतील पात्रांच्या जीवनावर झालेले असंख्य चरे आपल्याला सहज दिसून येतात. ही परदेशी स्थाईक झालेली मुलं आणि त्यांचे इकडे स्वदेशात मदतीशिवाय वृद्धापकाळात जगणारे आई-बाप. हे आजच्या कुटुंब व्यवस्थेतील दु:ख. ह्या भोवतीच ही कथा फिरते. हे दु:ख माणसाचं वयही झटकन पिकवते! वृद्धापकाळातील शारीरिक दुखण्याची नस त्यांना पकडता येते; पण त्यांना झालेल्या मानसिक आजारांची नस आपल्याला पहायला मिळत नाही. मोनिका गजेंद्रगडकर ह्यांनी तीच नस पकडून सुंदर कथा निर्मिती केली आहे. ‘रिलेशनशिप’ हा विषय समजून घेताना त्या एक कथा सांगत जातात. आयुष्यभरासाठी असणाऱ्या रिलेशनशिपला ती संपताक्षणी तिच्या जागी दुसरी रिलेशनशिप उभी करणे हा काही मानवाच्या दु:खावरचा पर्याय नसतो. हेच सांगण्यासाठी त्यांनी ‘सारांश’ ही कथा लिहिली आहे. ही कथा खूप मोठी असली तरी आपण वाचत जातो आणि आपल्या लक्षात येतं की ह्या कथेतील आईला आठवणीवर जगताना असं वाटते की आठवणीनाही असतो एक मूर्त चेहर असतो! त्यालाच चिकटून आहे आपलं जगणं! ह्याच कथेत मोनिका गजेंद्रगडकर कृष्ण आणि जीझस ह्या दोन देवतामधील फरक सांगताना लिहितात.. कृष्ण आणि जीझस दोन्ही गॉड, बट लॉट ऑफ डीफरन्सेस. कृष्ण हसरा, प्रसन्न. त्याचा मुकुटही प्रेशीअस. आणि जीझस ऑलवेज सॅड, ही लूक्स डाऊन आणि कृष्णाची नजर समोर .. तुमच्याकडे पाहणारी .. तरी जीझसच्या वाट्याला त्याच्या जन्मापासून एक काटेरी मुकुट आला .. दु:खवेदनेचा.. दूतच होता ना तो देवाचा! .. जगातल्या सगळ्यांच्या वाटच्या यातना ओळखून त्याने आपल्या मुकूटात त्या एकेका काट्याच्या रूपात खोवून घेतल्या असतील कृष्णाच्या मोरपिसासारख्या! किती सुंदर व्यक्त झाली आहे ही लेखिका! तरीही ती म्हणून जाते .....नाही सापडत माणूस आपल्याला .. माणूस शोध आपण घेत जातो. ह्या तीन दीर्घ कथातून ,,, त्यातील पात्रातून.. कारण ती पात्रे आपल्या आजूबाजूचीच असतात.. ती तुमची-माझी जवळची माणसं असतात .. ही लेखिका ‘सारांश’ ह्या कथेत म्हणते .. आपला जन्म म्हणजे माणूस असण्याचा सुरू झालेला प्रवास .. नि मृत्यू म्हणजे प्रवासाचा अंत नाही, तर मोक्ष! देहमुक्ती .. सगळ्यांच्या पलीकडे पोहोचणे .. स्पर्शापलीकडे, जाणिवापलीकडे आणि ‘स्व’पलीकडे. माणसं गमावण्याचा शाप आपल्याला मिळाला आहे .. हे सांगताना मोनिका गजेंद्रगडकर आपल्याला गीतेचा ‘सारांश’ सांगतात .. गीता म्हणजे .. एक संवाद आहे. कृष्णाने केलेला .. माणसाच्या आयुष्याबद्दलचा, माणसाच्या वाटेला आलेल्या दु:खशोक – यातनांचा, त्याच्या कर्माचा – धर्माचा, भक्तीचा आणि जन्म-मृत्युचाही. गीता तत्व आहे, संगती आहे आणि आत्मशोधाच्या वाटेने घेऊन जाणारा दीपस्तंभही .. गीतेचे हे सार.... ‘सारांश’ ह्या कथेला एक ऊंची देते. मला ह्या तीन कथातून दिसणारी ही देशी-विदेशी-अदेशी माणसं .. खूप काही सांगून जातात आणि मी समजून घेतो जगण्याचा नवा अर्थ. ( मौज प्रकाशन - मार्च २०२१)

Thursday, May 19, 2022

‘थेरॅनॉस’ ‘सिलिकॉन व्हॅलीतील साहसी फसवणूक’

‘थेरॅनॉस’ ‘सिलिकॉन व्हॅलीतील साहसी फसवणूक’ - अतुल कहाते सिलिकॉन व्हॅली म्हणजे जगाला डिजिटल वर्ल्ड बनविणारी एक अनोखी वसाहत. अॅडम फिशर ह्यांचे Valley of Genius हे पुस्तक मी वाचले होते. त्या पुस्तकामुळे सिलिकॉन व्हॅलीत नवे उद्योजक कसे निर्माण होतात ह्याची माहिती झाली होती. अतुल कहाते ह्यांचेी ‘थेरॅनॉस’ हे पुस्तक वाचनालयात चाळत होतो. ‘सिलिकॉन व्हॅलीतील साहसी फसवणूक’ अशी पुस्तकाच्या मथळ्याखालील ओळ वाचली आणि हे पुस्तक वाचण्यासाठी निवडले. हा कादंबरीकार आय.टी.तज्ञ. १७ वर्षाचा अनुभव. अनेक आय.टी. कंपन्यात विविध पदावर काम केलेला. ४०००पेक्षा अधिक ब्लॉगचे लेखन केलेला. अतिशय जवळून ह्या क्षेत्रातील उद्योजकाना भेटलेला. त्याचे पुस्तक म्हणजे भन्नाट असणार अशी खात्री होती. हे पुस्तक एका दमात वाचून टाकले आणि आय.टी. क्षेत्रातील म्हणजे सिलिकॉन व्हॅलीतील फसवणूक करणाऱ्या उद्योजकाचे एक वेगळे विश्व समोर दिसले. जिनिअस माणसे ही सुद्धा फसवणूक करणारे उद्योजक कशी होतात?, ह्याची कहाणी म्हणजे हे पुस्तक. स्टीव्ह जॉब्स आणि बील गेट्स हे दोघे आय.टी. मधील तंत्रज्ञ मंडळींचे आदर्श. त्यांच्यासारखे आपणही उद्योजक व्हावे असे अनेक तंत्रज्ञ आणि इंजिनीअर लोकाना वाटणे साहजिक आहे. रोल मॉडेल असलेली ही मंडळी. एलिझाबेथ अॅन होम्स ही वॉशिंग्टन डीसीत ९ ते ५ नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय माणसाची एक हुशार मुलगी. स्टीव्ह जॉब्सच्या कर्तृत्वामुळे खूप प्रभावित झालेली. ‘इनोव्हेशन’चा ध्यास असलेली. नवे तंत्रज्ञान निर्मितीसाठी प्रयत्नशील असलेली. उद्योजक होण्याचे स्वप्न पाहणारी. अशी ही एलिझाबेथ. तिला निर्मिती करावयाची असते रक्त चाचण्याशी संबंधित एक छोटे यंत्र बनविण्याची. त्यासाठी ती सिलिकॉन व्हॅलीतील अतिशय हुशार तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञांची नेमणूक करते. त्यासाठी सिलिकॉन व्हॅलीतील छोट्यामोठ्या गुंतवणूकदारांना गाठते. नावाजलेल्या डॉक्टरांची आणि औषधकंपन्यांशी संपर्क साधते. अशी ही अतिशय हुशार तरुणी फसवणूक करणारी अट्टल गुन्हेगार कशी होते, त्याची कथा म्हणजे ‘थेरॅनॉस’ ही कादंबरी. हाताच्या बोटाला हलके सुई टोचून क्रेडिट कार्डाच्या आकाराच्या पांढऱ्या डबी सारख्या वस्तूवर रक्ताचे थेंब गोल करायचे. ती छोटी डबी प्रिंटर कार्टेज सारखी यंत्राच्या खाचेत बसवून रक्ताच्या विविध चाचण्याचे निष्कर्ष काढायचे. ते यंत्र संगणकाला जोडायचे आणि रिपोर्ट डॉक्टरपर्यन्त सहज पोहोचवायचे. असे यंत्र बनविण्यासाठी प्रयत्नशील असणारी एलिझाबेथ. ती स्टँफर्ड विद्यापीठाची प्रेसिडेंट स्कॉलर. थेरपी आणि डायग्नोसिस पासून तयार झालेला शब्द म्हणजे ‘थेरॅनॉस’. अशा रक्तचाचणी यंत्र निर्मितीतून औषधक्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचे स्वप्न पाहणारी एक उद्योजिका. कार्टेज आणि रीडर ह्यावर एडिसन हे यंत्र निर्मिती करण्याचा उद्योग उभारण्याचा प्रयत्न करणारी एलिझाबेथ. हे उभे करताना ती अनेक हुशार तंत्रज्ञाना आपल्या कंपनीत खेचून आणते. त्यांना आकर्षित करते. तिला सनी बलवानी सारखा मोठमोठ्या गप्पा मारणारा एक सहकारी मिळतो तसेच चेलसीसारखे गुणवंत सहकारी मिळतात. विचारवंत आणि कृतीशील माणसेच नवनिर्मिती करू शकतात हे खरे आहे; पण हे मोहमयी जग तितके सरळ नाही. आणि माणूस नकळत बदलतो आणि तो फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारी विश्वात कधी प्रवेश करतो हेच लक्षात येत नाही. मग तो निर्माण करतो एक Evil Empire. एलिझाबेथ असे विश्व निर्माण करते. एलिझाबेथला सहकारी तर चांगले मिळतात. पण तिच्या विचित्र स्वभावामुळे कोणीही तिच्या कंपनीत २-३ वर्षापेक्षा अधिक टिकत नाही. नव्याचा ध्यास असलेले हे सहकारी येतात आणि निघून जातात. ते तर सिलिकॉन व्हॅलीचे वैशिष्ट्य आहे. अशा छोट्या कंपनीसाठी हवे असतात भांडवल पूरविणारे गुंतवणूकदार. सिलिकॉन व्हॅलीत असंख्य असे असंख्य गुंतवणूकदार आहेत. अल कॉर्न ह्या भांडवल पूरविणाऱ्या उद्योजकाने स्टीव्ह जॉब्सला नव्वद दिवसाची मुदत असलेला करार करून क्रेडिट अकाऊंट काढून दिले होते. त्याप्रमाणेच गूगलचे निर्माते पेज आणि ब्रिन ह्याना Andy Bechtolsheim सारखा पैसे गुंतवणारा भांडवलदार मिळाला आणि त्याने आस्तित्वात नसलेल्या “Google Inc,” अशा कंपनीच्या नावाने मोठ्या रकमेचा चेक देऊन नवी कंपनीच चालू करून दिली. एलिझाबेथला गुंतवणूकदार कसे मिळवायचे हे चांगलेच अवगत होते. तिने अनेक गुंतवणूकदाराकडून असेच पैसे उभे केले. Fast – Faster – Fastestचे वेड असणारे हे तंत्रज्ञ. त्यांना उभे करावयाचे असते आपले साम्राज्य. शौनक रॉय आणि मोझलीसारखे तिचे सहकारी एलिझाबेथ ही फसवणूक करून उद्योग उभा करते आहे, हे लक्षात आल्यावर तिला सोडून जातात. एलिझाबेथ वॉलग्रीन सारख्या औषधकंपनीला सहज गुंडाळते. राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध ठेवण्यातही ती चांगलीच तरबेज असते. फसवे गिरी कशी करावयाची, संचालक मंडळात अधिकारी कसे निवडायचे, मोठमोठ्या कंपन्याना कसे आकर्षित करावयाचे, मार्केटिंग आणि सेल्समध्ये तज्ञ असले की गंडा कसा घालायचा हे तिला चांगलेच माहीत होते. अशी ही एलिझाबेथ. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’चा शोधपत्रकारिता करणारा जॉन क्यारिरू हा पत्रकार कुप मोठा धोका पत्करून फसवणूक करणाऱ्या एलिझाबेथच्या मागे लागतो आणि तिच्या उद्योगाचे भांडं कसं फोडतो हे वाचताना आपण एक थरारपट पहात आहोत असे वाटते. त्यामुळे ही कादंबरी आगळीवेगळी झाली आहे. एलिझाबेथ आणि सनी बलवानी ह्यांच्या दिवास्वप्नामुळे निर्माण झालेला फसवणुकीचा डाव उघडकीला आणला तो क्यारिरू ह्या पत्रकाराने. सिलिकॉन व्हॅलीचा आपल्याला माहीत नसलेला हा एक दूसरा चेहरा. एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारी ही कादंबरी. आय,टी./ तंत्रज्ञान क्षेत्रात पैशाच्या मागे लागून फसवणूक करणारे अनेक लोक आहेत हे पाहिले म्हणजे सिलिकॉन व्हॅलीचा हा पैलू आपला भ्रमनिरास करतो. ही कादंबरी अवश्य वाचा आणि हे जग ओळखून घ्या,

Thursday, April 21, 2022

मधु मंगेश कर्णिकांची 'प्राप्तकाल' ही नवी कादंबरी

माहिमच्या खाडी' नंतर कायम लक्षात राहील अशी मधु मंगेश कर्णिकांची 'प्राप्तकाल' ही नवी कादंबरी.
तीस चाळीस वर्षापूर्वी महाविद्यालयात असताना परिघाबाहेरचे जग चित्रीत करणारी मधु मंगेश कर्णिक ह्यांची 'माहिमची खाडी' ही कादंबरी वाचली होती. त्यानंतर त्यांच्या अनेक कथा वाचत गेलो. मुंबईला १९६९साली आलो तेंव्हा माहिमच्या खाडीतील परिसरात मुद्दाम गेलो आणि तेथील जीवन जवळून पाहिले. त्याच काळात वासूनाका परिसरातही फिरून आलो होतो. माहिमची खाडी आता विशाल धारावी झाली आहे तर मुंबईच्या अनेक भागात मानखुर्द-चेंबुर सारख्या अशाच वस्त्या आणि माणसं दिसून येतात. हे आपले आजचे विकासचित्र. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या वीस वर्षाच्या अनुभवावरून मधु मंगेश कर्णिकांनी वयाच्या ९०व्या वर्षी 'प्राप्तकाल" ही कादंबरी लिहून कोकणवासीयांचे सध्याचे जीवन चित्रीत करून महाराष्ट्रातील एक प्रादेशिक चित्र उभे केले आहे. त्यामुळे नकळत मला आजचा मराठवाडा आणि विदर्भही समोर दिसू लागतो. त्याचे प्रमुख कारण म्हणजे ही कादंबरी राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरे चित्रीत करते. कॉंग्रेसची झालेली पडझड, जनता राजवट, समाजवाद्यांची शोकांतिका आणि हिंदुत्वामुळे झालेला शिवसेना- भाजपचा उदय. ह्या राजकीय पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात होवू घातलेला राजकीय आणि सामाजिक बदल ह्या कादंबरीत चित्रीत झाला आहे. ह्या कादंबरीचा नायक प्रसाद हा आर.एस.एस.च्या पठडीत वाढलेला. विवेकानंद ह्यांच्या विवेकप्रणित, पुरोगामी, सर्वसमावेशक हिदुत्ववादी विचाराने प्रभावित झालेला हा युवक. कोकणातील आवळसगांवी वाढलेला. हूशार म्हणून नावाजलेला. गरिबीचे चटके सहन करणारा. एका शिक्षिकेचा मुलगा. त्याच्याच गावातील समाजसेवी असलेला आर.एस. एसचा एक कार्यकर्ता त्याच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था पुण्याच्या अप्पा खाडीलकरांच्या वाड्यात करतो आणि तेथील संघ शाखेचा तो स्वयंसेवक होवून पुढील शिक्षण घेत असतांना हिंदुत्ववादी होतो.
ह्या हुशार मुलाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आर. एस. एस. ची मंडळी त्याला भाजपच्या खासदारपदाच्या निवडणूकीस उभे करण्याचा प्रयत्न करतात. धर्मकारणावर आधारित राजकारण करणारा भाजप त्याला मान्य नसतो. त्याचे वडील समाजवादी चळवळीशी संबंधित होते आणि सर्व प्रमुख समाजवादी नेत्यांशी त्यांचे संबंध होते: पण ते प्रसाद लहान असतानाच गेलेले असतात. त्याच्या आईनेच त्याला वाढविलेले असते. ती त्याला शिकविते. नियती म्हणतात ती अशी. संघाच्या कार्यकर्त्यांनी त्याला शिक्षणासाठी मदत केली आणि त्याच्यावर हिंदुत्ववादी संस्कार केले. कार्यकर्ता घडविला जातो तो असा. त्यानी प्रसादला राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला. कर्णिकांनी कादंबरीत अशी वीण तयार करून ही राजकीय कादंबरी लिहिली आहे. त्यांनी संघकार्य आणि संघकार्यकर्ते ह्यांना जवळून पाहिले आहे,असे दिसते. ज्यांनी संघ कार्यकर्त्यांना जवळून पाहिले आहे, त्यांना हे माहित आहे. संघाच्या भाऊराव खाडीलकरांनी प्रसाद सारखी तरुण पिढी कशी उभी केली आणि हिंदुत्ववादी भाजपला कार्यकर्ते कसे मिळतात हे कर्णिकांनी कादंबरीतून छान चित्रीत केलं आहे. हिंदू आणि हिंदुत्व ह्या भोवती फिरणारे आजचे राजकारण, त्या विचारसरणीकडे काहीशी आकर्षित झालेली आजची तरुण पिढी, कॉंग्रेसला पर्याय शोधणारी कोकणातील माणसे ह्याचा वेध घेतलाय कर्णिकांनी. कोकणातील ग्रामपंचायती पासून जिल्हा स्तरावरील असलेला भ्रष्टाचार आणि विवेकशून्य राजकारणी लोकांचे धंदे ह्या कादंबरीत चित्रीत केले आहेत. कादंबरीतील ही पात्रे कर्णिकांनी खुप सुंदर पध्दतीने चित्रीत केली आहेत. आवळसगावातील राजकारणी मंडळींची खाबूगिरी ह्या कादंबरीतून दिसून येते. ते चित्र सर्वच खेड्यातून दिसून येते. प्रसादसारख्या नव्या तरुणांना राजकारणाचे हे रंगढंग मान्य नसतात. त्यामुळे विवेकानंद ह्याच्या पुरोगामी हिंदुत्वाने प्रभावीत झालेला प्रसाद ह्या प्रमुख पात्राच्या माध्यमातून कर्णिक आपल्याला त्यांची भूमिका सांगत राहतात. अर्थात हे सारे संयमाने. आर.एस.एस. ही संस्था कार्यकर्ते कशी तयार करते, हे कर्णिकांनी छान चित्रीत केले आहे. नेहरु-गांधींच्या कॉंग्रेसची पडझड का झाली, ह्यावर नकळत भाष्य करण्यात कर्णिक यशस्वी झाले आहेत. तसा हा ह्या शतकातील वीस वर्षाचा काळ आहे. असा हा "प्राप्तकाळ". राजकारणाचा मूल्यर्हास सर्वांनाच खटकणारा आहे. ह.ना.आपटे ह्यांच्या "काळ तर मोठा कठिण आला आहे", ह्या जुन्या कादंबरीची आठवण करून देणारा. शंभर वर्षांपूर्वी केशवसूत लिहून गेले ... प्राप्तकाल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा.... ह्या काव्यपंक्तीवरूनच हे नाव ह्या कादंबरीला सूचले असावे. कादंबरी रुक्ष वाटू नये म्हणून त्यात प्रेमकथा ही हवीच. 'काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात' असं विवेकानंद ह्यांच्या तत्वज्ञाने भारून गेलेल्या प्रसादला जाईला पाहून वाटू लागते आणि त्यांची एक प्रेमकहाणी फुलू लागते; पण ती एक शोकांतिका होते. ही प्रेमकथा आपल्याला कादंबरी पुढे वाचण्यासाठी मदत करते. नाही तर आपण हीक्षराजकीय कादंबरी अर्धवट वाचून सोडून दिली असती. ह्या कादंबरीतील प्रेमपत्रे ह्या तशा प्रेमकविताच आहेत. त्या वाचताना आपण रमून जातो. राजकारणापासून अलिप्त राहून वैद्यकीय क्षेत्रातील कोकणातील आरस कुटुंबिय समाजसेवा कशी करतात, हा ही या कादंबरीचा विषय आहे. आपण खूप काही मिळवलं आहे. आता कोकणवासीयांसाठी म्हणजे आपल्या गावासाठी काही तरी केलं पाहिजे, ह्या विचारांनी भारावलेली ही माणसं. त्यांच्यापुढे उभ्या राहतात त्या असंख्य राजकीय आणि सामाजिक अडचणी आणि कोकणातील भ्रष्ट राजकारण. ह्या किडलेल्या समाजव्यवस्थेमुळे हतबल झालेली ही माणसं पाहिली की वाटतं,' नको ती समाजसेवा'. असा विचार आपल्या मनात डोकावतो. ह्या कादंबरीत काय आहे? प्रेमाची गोष्ट आहे, हिंदुत्ववादी विचार सांगणारी ही एक राजकीय कादंबरी आहे, शहरातील समाजसेवी लोकांनी आपल्या गावच्या लोकांच्यासाठी उभे केलेले प्रकल्प आहेत. कोकणी माणूस आणि त्याचा निसर्ग आहे, माणूस आणि नियती ह्यांची ही कथा आहे. अशा विविध रंगांनी 'माणूस शोध' घेणारी मधु मंगेश कर्णिक ह्यांची ही कादंबरी सुंदर आहे. मन वेधून घेणारी आहे. नव्वदीचा हा लेखक आणि त्यांचा हा लेखनउत्साह पाहिला म्हणजे "जीवन ह्यांना कळले हो", ह्या ओळींची मला आठवण येते. कर्णिक, असेच लिहित रहा. 'माहिमच्या खाडी' नंतर कायम लक्षात राहील अशी मधु मंगेश कर्णिकांची 'प्राप्तकाल' ही कादंबरी.

Tuesday, January 25, 2022

Indian Muslims

भारतातील मुस्लिमांनी एकदा अंतर्मुख होऊन नव्याने विचार करावयास हवा. समाजवादी आझमखान किंवा ओवैसी ह्यांच्या मागे राहून जीनांचा 'मुस्लिम भारत' हा विचार सोडून द्यावा. मुस्लिमांनी एकदा झडझडून द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताला विरोध करण्याची आवश्यकता आहे. आरिफ मोहमद खान ह्यांनी हाच मुद्दा अनेकदा स्पष्टपणे मांडला आहे.
अखिलेश/मुलायम, मायावती, ममता, डावे-उजवे कम्युनिस्ट, समाजवादी आणि काँग्रेस ह्यांनी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अल्पसंख्य असलेल्या मुस्लिम जनतेची कायम मनधरणी केली आहे  आणि त्यांच्यासाठी फक्त तोंडपाटीलकी केली आहे. त्यांच्या विकासासाठी काहीच केलेले  नाही. हे आजही भारतीय मुस्लिमांच्या लक्षात आले नाही.
नेहमी गोध्रा-बाबरीकांडचा उल्लेख होतो. दोन्ही बाजूच्या तरुणांच्या उकळत्या रक्तात आततायी विचार प्रकट झाल्यामुळे अशा घटना घडल्या. त्या जखमा तशाच रहाव्यात म्हणून राजकीय पक्षांनी प्रयत्न केले आहेत, हे ह्या देशाचे दुर्दैव. गांधीजींचे नाव उठताबसता घेणार्यांनी त्यासाठी काहीच प्रयत्न न करता बहुसंख्य हिंदूंना जबाबदार धरून अल्पसंख्य मुस्लिमांचा स्वतःच्या राजकारणासाठी उपयोग करून घेतला आहे आणि हिंदूंमध्ये जातीयवादाची/धर्मवादाची पेरणी करून फूट पाडली आहे  व सत्तेचे राजकारण केले आहे. मायावती/ मुसलमानांना तिकिटे देतात तर अखिलेश/मुलायम सिंग ही तशीच खेळी  करीत आले आहेत.
भारतातील मुस्लिमांची सद्यस्थिती काय आहे? भारतातले बहुतेक पक्ष मुसलमानांच्या अपेक्षांना अनुसरून एकजात कुचकामी आहेत. ह्या सर्वांनी निवडणुकीत मुसलमानांचा एक गठ्ठा मते मिळवण्यासाठीच उपयोग करून घेतला व हिंदूत जातीय विद्वेष निर्माण केला.
भारतातील मुसलमानांना सर्व पक्षांनी असे सतत बजावले आहे की बहुसंख्य असलेल्या हिंदूंचा धर्मवाद फार भयंकर असू शकतो. मुसलमानांना ह्या देशात चांगले दिवस बघावयाचे असतील तर त्यांनी हिंदू जातीयवादी शक्ती वाढणार नाहीत म्हणून आमच्याकडेच बघावे, आम्हालाच निवडणून द्यावे,  असे राजकारण ज्यांनी केले त्यामुळेच हिंदू एकजुटीचे प्रयत्न झाले, ही वस्तुस्थिती आहे. हिंदुत्वाची पताका त्यामुळे फडकू लागली.
आझमखान ह्यांचा मुस्लिम धर्मवाद मुलायमसिंग/अखिलेश ह्यांनी पोसला. दिल्लीचे जामा  मशिदीचे इमाम बुखारी आणि एमआयएमचे ओवैसी ह्यांच्या 'मुस्लिम इंडिया' ला प्रत्युत्तर म्हणून 'हिंदू इंडिया' विचारधारा वाढते आहे. पडद्यामागे जातीयवाद पोसणारी ही मंडळी धोकादायक आहेत. हेच लक्षात येऊ नये, हे आपल्या देशाचे दुर्दैव.
भारतात मुसलमान मोकळेपणाने मागण्या तरी करू शकतात. त्यांचे प्रतिनिधित्व संसदेत आणि राज्यांच्या विधानसभेत दिसून येते.
काही लोकांना देशाच्या अखंडतेपेक्षा बाबरी मशिदीचा बचाव अधिक महत्वाचा का वाटतो? बाबरी-गोध्रा ही जखम त्यांना बरी व्हावी असे वाटत नाही. आता तर हा प्रश्न सुटला आहे आणि राम  मंदिराचे भूमिपूजन झाले आहे. आता मशिदीची उभारणी लवकरच होत आहे व तेथे रुग्णालय आणि मोठे वाचनालय उभारण्याचे ठरत आहे. हे चांगलेच आहे पण त्यासाठी राजकारण चालूच असून नवे उचकवणे चालू ठेवले असून मोदी/योगीवर टीका केली जात आहे.
हा देश सर्वधर्मसमभाव  मानणारा देश आहे, हे येथील मुसलमानांना मान्य असेल तर त्यांनी त्यांच्या धर्माच्या प्रभावाच्या मर्यादा ठरवून घेतल्या पाहिजेत.
धर्माचा आधार पोकळ आणि चुकीचा असेल तर काश्मीरला वेगळा दर्जा मागून चालणार नाही व समान नागरी कायदा अंमलात आणण्यास विरोध करता कामा नये. आता ३७० कलम रद्द झाले आहेच. लडाखला वेगळे केले आहे. ट्रिपल तलाक कायदा रद्द झाला आहे.
अल्पसंख्य मुस्लिम नकळत जीनांच्या 'मुस्लिम इंडियाची'ची भाषा बोलत असतात. त्यामुळेच 'हिंदु राष्ट्रा'च्या गोष्टी येथे बोलल्या जातात. पाकिस्तान हे 'मुस्लिम राष्ट्र' जिनांच्यामुळे उदयास आले आहे. भारत हे बहुसंख्य हिंदूंचे राष्ट्र असले तरी ते येथील 'भारतीय मुसलमानां'चेही राष्ट्र आहे. पाकिस्तानात 'हिंदू पाकिस्तान' कुठे आहे? हा फरक लक्षात घेणे आवश्यक आहे.
आझमखान असो का ओवैसी, ह्यांच्यासारख्या मुसलमानात जिना सारखा 'मुस्लिम भारत' डोक्यात असतो. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून योगी आदित्यनाथ सारखे नेते 'हिंदू भारत' ह्या संकल्पनेसाठी प्रयत्नशील असतात.
स्वतःला सेक्युलर समजणारे समाजवादी मुस्लिम लोकांना ठणकावून सांगत असतात की बहुसंख्य हिंदूंचा धर्मवाद हा भयंकर आहे व तुम्हाला आम्हीच खरे संरक्षण देत असतो. हा गेम प्लॅन माहित असल्यामुळे हिंदुत्ववादी संपूर्ण हिंदू राष्ट्राचे स्वप्न पहात आहेत.
धर्मनिरपेक्षतेचा अर्थ तथाकथित पुरोगाम्यांनी फ़ारच सवंग करून टाकला आहे. मुस्लिम जातीयवाद नको तसा आक्रमक राष्ट्रवाद नको.

Monday, January 24, 2022

दोन मित्र - भारत सासणे
आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे होणारे अध्यक्ष भारत सासणे ह्यांची दिवाळी अंकात प्रसिद्ध होणाऱ्या कथामधून ओळख झाली होती. काही वर्षापुरी त्यांच्या काही कथा वाचल्याचे स्मरते. बहुधा मराठवाडा' दिवाळी अंकातून वाचल्या असतील. तसे ते मराठवाड्याचे आहेत. ह्यावेळी सर्व मराठी भाषिक साहित्य परिषदांनी त्यांची बिनविरोध निवड केली आहे, हे विशेष. 'दोन मित्र' ही २००४ साली लिहिलेली त्यांची कादंबरी वाचनालयात शोधतांना मिळाली. 'बौद्धिक मनोरंजन' हा शब्द कादंबरी चाळतांना दिसला. छोटी छोटी वाक्ये लक्ष वेधून घेत होती. त्यांची साधी सोपी भाषाशैली आवडू लागली. आणि एका दमात ही कादंबरी वाचून संपवली. असं फार कमी वेळा होतं. मनोहर आणि कानिफनाथ ह्या दोन मित्रांची ही गोष्ट आहे असं वाटलं; आणि लक्षात आलं की ही गोष्ट आहे ती 'मकरंद आणि जयमंगला' ह्या प्रेमात पडलेल्या मनोहरचा मुलगा आणि कानिफनाथच्या मुलीची. भिन्न जातीत जन्मलेली ही दोघे. आपल्या समाजातील जातीच्या भिंतीमुळे ती दोघे लग्न का करू शकत नाहीत ह्यांची ही गोष्ट. त्या दोन मित्रांचा एक तिसरा मित्र असतो एक लेखक. त्याला ते 'रद्दीवाला' म्हणतात. आणि हाच रद्दीवाला आपल्याला ही कथा सांगत जातो. कादंबरीकार भारत सासणे आपल्याशी बोलत असतात ते ह्या पात्राच्या तोंडून. लेखकाला जे काही सांगायचं आहे, ते त्यांनी फार सुंदर शब्दात सांगितलं आहे आणि खऱ्या अर्थाने आपलं 'बौद्धिक मनोरंजन' केलं आहे. हेच ह्या कादंबरीचे वैशिष्ट्य. रद्दीवाला लेखक आपल्याशी संवाद साधताना अगदी सहजपणे बोलत असतो. त्यातील कांही वाक्ये येथे मुद्दाम देत आहे. तेच सांगितलं आहे कादंबरीकाराने. * माणसाकडे माणूस म्हणून बघणे अधिक अवघड झालंय, कारण तो माणूस असण्यापेक्षा काहीतरी असतो आधी - जसं आंबेडकरवादी. बहुजन समाजाचा किंवा ब्राम्हण, किंवा संघवाला किंवा हिंदुत्ववाला, किंवा मुसलमान, किंवा समाजवादी इत्यादी .... * माणूस तुकड्या-तुकड्यानी वाटला गेलाय आणि मुखवट्याआड दडलाय. * संस्कृती एकमेकांना छेदतात तेंव्हा काही देवाणघेवाण अटळ असते. * लोक फार लवकर इमोशनल होतात! त्यांना भडकवणं सोपं असतं. * बौद्धिक मनोरंजन! मनोजन्य मनोरंजन! * मुलांनी बुद्धिजीवी व्हायचं की बाह्या सारून गुंड व्हायचं ..... की राजकारण करायचं सांगा! * अरे, धर्म म्हणजे मनुष्य जातीचा प्रेमाचा मार्ग! * दंगलखोरांना धर्म नसतो! * इथं झिंगलेला बुद्धिवादी होता, आणि तो जास्त धोकादायक असतो, हे मला माहित आहे. एकूणच बुद्धिजीवींची शोकांतिका! * आयुष्यात लॉजिक असलं पाहिजे असा नियम नाही. बौद्धिक भाषणबाजी करणारी माणसं .... आपण पुरोगामी आहोत असं दाखवायला असं अधूनमधून वागावं लागतं. काका, शिकवाल मला आता पुरोगामी व्हायला! * ज्याचं त्याचं स्थान असतं. ते सोडलं की रोप मरतं. नियतीवाद. * संस्कार आधी धावतात ना पुढे बुद्धीच्या! * जगण्याचे प्रत्येकाचे संदर्भ वेगळे असतात. कोणाचे काय तर कोणाचे काय? * आज काय दिसतंय. तुम्ही ज्यालात्याला खिजवायचं काम करतां! .... आज सगळे जण जय श्री राम !, जय जय रघुवीर समर्थ !, जय ख्रिस्त!, अल्ला हो अकबर! असं म्हणून एकमेकाला खिजवत असतात? आपण माणुसकी कधी शिकवणार? * स्त्री - काडीकाडीने ती सर्व जमवते; म्हणून स्त्रीला विध्वंस सहन होत नाही. * बेकार तरुणांचे तांडे आहेत, वैफल्यग्रस्त. याना जीवितहेतू हवा आहे. यांना जगण्याचा बहाणा हवा आहे. ... नाहीतर ही पोकळी ह्यांना गिळून टाकील. 'बोअर होत आहेत', असा मंत्र ते जपतात. 'काय आणि कशासाठी?', हे त्यांना समजत नाही. कोण टिळा लावतंय, कोण भगव्याच्या सावलीत आहे, कोण 'जय भवानी' म्हणतंय, कोण रघुवीर सेनेत आहे, कोण अल्लाच्या नावाखाली खुनशी बनलंय, .......सगळ्यांना काहीतरी 'बिजनेस' पाहिजे आहे. नसता हे जणू स्वतःला कुरतडत खाऊन टाकतील. हे विफल, बेकार तरुणांचे तांडे. * कधी कधी ..... एकदम सकाळ झाल्यासारखं वाटलं. वाटलं अजून जगणं शिल्लक आहे. अजून आशा आहे असं म्हणतात ..... शेवटी रद्दीवाला लेखक लिहितो ......मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती चमकते, प्रकाशाने प्रज्वलित होते. ती सतत आणि अप्रतिहत वाहत असते. अखिल जातीजातीबद्दल प्रेम निर्माण करते. तोपर्यंत ह्यांची मैत्री टिकली पाहिजे. दोन मित्रांची. अशी आशावादी वृत्ती समोर ठेऊन लेखक कादंबरी संपवतो. हा लेखक आपल्याशी सतत बोलत असतो. ही कादंबरी रद्दीत टाकण्याची नसून बौद्धिक चिंतन करून मैत्री वाढविण्याचा संदेश देणारी आहे. बऱ्याच दिवसांनी एक सुंदर कादंबरी वाचताना आपल्या समाजाचा आरसा समोर दिसत होता.अशी ही कादंबरी का आवडली हे सांगण्यासाठी हा खटाटोप. भारत सासणे ह्यांना खूप शुभेच्छा आणि येत्या साहित्य संमेलनातील तुमच्या भाषणाची वाट पाहतोय.

काळे करडे स्ट्रोक्स - प्रणव सखदेव

साहित्य अकादमी युवा पुरस्कारप्राप्त लेखकाचे हे पुस्तक वाचनालयातून आणलं आणि एका दमात वाचून टाकलं. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे म्हणजे पुस्तक विशेषच असणार ही एक अपेक्षा होती आणि वाचून मात्र माझी निराशा झाली. वाचताना कधीकधी पुस्तक आवडत होतं तर बऱ्याचदा मला जाम कंटाळा आला. माझी संमीश्र प्रतिक्रिया उमटत होती.
समीर हा एक अंगात वारा शिरलेला व मनांत उदास पोकळी असलेला कादंबरीचा नायक. बारावीचा रुईया कॉलेजचा विद्यार्थी. एस.वाय. पर्यंतचे त्याचे त्या महाविद्यालयातील आयुष्य. प्राचार्य त्याला कॉलेजमधून काढून टाकतात ते त्याच्या उद्योगामुळे. त्याच्या ह्या 'पेनड्राइव्ह आयुष्या'त सेक्स व्हायरसच्या इन्फेकशनमुळं येतं एक झपाटलेपन आणि मग त्याची होते वाताहत. सानिका आणि सलोनी ह्या त्याच्या मैत्रिणी. चैतन्य आणि अरुण हे त्यांचे मित्र. ह्या चार मित्र-मैत्रीणींची ही कथा. ही त्यांच्या रुईया कॉलेज मधील सोनेरी जीवनाला पोखरून टाकणारी एक शोकांतिका आहे. समीरच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण करणारी कथा आपल्याला सांगितली आहे प्रणव सखदेव ह्यांनी. सेक्सचा इन्फेक्टड व्हायरस ह्या तरुणांचे आयुष्य कसे कुरतडून टाकतो त्याची ही गोष्ट आहे. समीर-सानिका आणि समीर- सलोनी ह्यांचे प्रेमी जीवन म्हणजे सेक्स जीवन रंगवण्यात लेखक रंगून जातो तसेच त्याचे मित्र चैतन्य, अरुण आणि दादू काका ह्यांच्या जीवनकहाण्या सांगण्यात तो रंगून जातो. रुईया कॉलेजच्या शुभ्र आठवणी न लाभलेले हे भरकटलेले मित्र. त्यांच्या जीवनातील हे काळे करडे स्ट्रोक्स! त्यांचे जीवन म्हणजे एक केऑस! भणंग आयुष्याकडे जाणारे हे तरुण! लेखक म्हणूनच ह्या कादंबरीच्या अर्पणपत्रिकेत लिहितो "प्रत्येकाच्या आत डुचमळणाऱ्या एका केऑसला ...." . ही कादंबरी वाचताना श्री ना पेंडसे ह्यांच्या 'गारंबीचा बापू' किंवा 'लव्हाळी' ह्या कादंबऱ्यांची स्टाईल अधूनमधून आठवत राहते तर कधीकधी नेमाड्यांची 'कोसला' आठवते. पण अनेक वेळा आपण भाऊ पाध्ये ह्यांची 'वासूनाका' तर वाचत नाहीना!, असाही भास होत राहतो. प्रणव सखदेव हा नव्या पिढीचा नव्या दमाचा एक लेखक आहे. नव्या पिढीचे प्रश्नही नवेच आहेत. त्यांचे जगणेही भन्नाट आहे. सेक्सभोवती भरकटणाऱ्या तरुणांचे चित्रण करताना मध्यवर्गीय तरुणांमध्ये असे 'वासूनाके' दिसणारच. म्हणून ह्या कादंबरीतील घटना रुईया कॉलेज, दादर-माटुंगा, हिंदू कॉलनी, पारशी कॉलनी, फाईव्ह गार्डन, लालबाग-परळ, दादरची लहान मोठी हॉटेल्स ह्या परिसरातच घडतात. लेखकाने हा परिसर जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा केलाय. हे खूप छान जमतंय. पण आपण पाहिलेल्या रुईया कॉलेजच्या हुशार विद्यार्थ्यांचे किंवा हिंदू कॉलनी / पारशी कॉलनीत रहाणार्या मध्यमवर्गीय जीवनाचे हे चित्रण नाही. लालबाग-परळच्या वस्तीतील वासूनाका मात्र चांगला चित्रीत झाला आहे, तो समीरचा मित्र असलेल्या अरुणची कथा रंगविताना. आज लालबाग-परळ खूप बदलले आहे. मी तिकडे फारसे जात नाही. 50 वर्षांपूर्वी मी ह्याच परिसरात 5-10 वर्षे काढली होती त्यामुळे मला हा परिसर खूप आवडलेला होता. त्यावेळी रुईया कॉलेज म्हणजे हुशार मुलांचे एक नावाजलेले कॉलेज. तेथेही विद्यार्थीकट्टे होते. सिगारेट, दारू, गांजा पिणारे विद्यार्थी त्यावेळीही असतील पण ह्या कादंबरीत दिसणारे समीर आणि त्यांचे मित्र त्यावेळी नव्हते. मी युडीसीटीत संशोधन करीत असताना माझे दोन सहकारी संशोधक विद्यार्थी होते ते रुईयाचे सर्वात हुशार विद्यार्थी. एक मित्र तर त्याच महाविद्यालयात प्राध्यापक झाला आणि तेथूनच रिटायर झाला. त्यांनी मला सांगितलेले रुईया कॉलेज प्रणव सखदेव ह्यांच्या कादंबरीत वर्णन केलेल्या कॉलेजसारखे नव्हते. आता सारेच बदलले असेल. नव्या पिढीचे नवे प्रश्न. नव्या समस्या. नवे जगणे. त्यामुळे फाईव्ह गार्डनचा प्रेमिकांच्या परिसर आता किती बदलला आहे, ह्याची कल्पना कादंबरी वाचताना येते. अर्थात कादंबरीत केलेले वर्णन म्हणजे त्या भागाचे खरं वर्णन नव्हे. कादंबरीत डोंबिवली संस्कृतीत वाढलेला समी. ती मध्यवर्गीय संस्कृती झुगारून देताना त्याचा मित्र असलेल्या अरुणच्या लालबागच्या वासूनाका संस्कृतीचा कसा शिकारी होतो, हे फार छान चित्रीत झाले असले तरी ही कादंबरी नकळत वासूनाका टाईप झाली आहे. लेखकावर झालेला जुन्या लेखकांचा हा प्रभाव आहे की हे ह्या नव्या लेखकाचे नवे तंत्र आहे. तरुणांचे भरकटलेले आयुष्य हा कादंबरीचा विषय आहे. हे मान्य केले तर कादंबरी छान जमली आहे. लेखकाला परिणामकारक चित्रण करणे छान येते, हेच ह्या कादंबरीचे वैशिष्टय. चांगल्या कादंबरीला उंचावर नेण्यासाठी लेखक कमी पडलाय कारण तो सेक्सचे वर्णन करण्यातच अडकलाय. त्याला तेच काळे कोरडे स्ट्रोक्स दिसत असावेत. ह्या कादंबरीत लक्ष वेधून घेते ती सानिका. समीरची मैत्रीण म्हणजे त्याच्या चिन्मय ह्या अंध मित्राची प्रेयसी. कवी मनाची. "पाय सोडूनी जळात बसलेल्या औदुंबरासारखी". बालकवींच्या कवितेत रमणारी. ती एक गूढ स्त्री. समीरला ती स्त्री समजतच नाही पण तो तिच्याकडे आकर्षित होतो. त्याचवेळी तो अडकलेला असतो सलोनीत. तिलाही तो आवडत जातो पण तिच्या शरीरवेदना असतात एका रोगाने पछाडलेल्या. ती त्याच्यावर प्रेम करत असते पण आपले शरीर त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते कारण आपल्यामुळे समीरला किंवा कोणालाही संसर्गरोग होऊ नये असे तिला मनापासून वाटत असते. बिचारा समीर. त्याच्या सेक्स केऑसमध्येच डुचमळलेला. अशीही रुईच्या क्राउडमधील मित्र-मैत्रिणींची कहाणी. एक फसलेली कादंबरी. मध्येमध्ये कंटाळा आणणारी. अधूनमधून मुंबईच्या परिसरातील आजच्या नवतरुणांची कहाणी सांगणारी. साहित्य अकादमी पुरस्कार देणाऱ्या परीक्षकांना ही कादंबरी का आवडली असेल, हे त्यांनी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. कदाचित मलाच ह्या कादंबरीचे साहित्यमूल्य समजलं नसावं. ह्यापुढे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला म्हणजे काहीतरी ग्रेट साहित्य वाचायला मिळेल असे मला वाटत नाही. नव्या दमाच्या ह्या लेखकाला नवा हुरूप येईल आणि त्याच्या हातून नवे छान लिहून होईल, हे मात्र नक्की. प्रणव सखदेव ह्यांना शुभेच्छा! काळे करडे स्ट्रोक्स साहित्य अकादमी युवा पुरस्कारप्राप्त लेखकाचे हे पुस्तक वाचनालयातून आणलं आणि एका दमात वाचून टाकलं. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे म्हणजे पुस्तक विशेषच असणार ही एक अपेक्षा होती आणि वाचून मात्र माझी निराशा झाली. वाचताना कधीकधी पुस्तक आवडत होतं तर बऱ्याचदा मला जाम कंटाळा आला. माझी संमीश्र प्रतिक्रिया उमटत होती. समीर हा एक अंगात वारा शिरलेला व मनांत उदास पोकळी असलेला कादंबरीचा नायक. बारावीचा रुईया कॉलेजचा विद्यार्थी. एस.वाय. पर्यंतचे त्याचे त्या महाविद्यालयातील आयुष्य. प्राचार्य त्याला कॉलेजमधून काढून टाकतात ते त्याच्या उद्योगामुळे. त्याच्या ह्या 'पेनड्राइव्ह आयुष्या'त सेक्स व्हायरसच्या इन्फेकशनमुळं येतं एक झपाटलेपन आणि मग त्याची होते वाताहत. सानिका आणि सलोनी ह्या त्याच्या मैत्रिणी. चैतन्य आणि अरुण हे त्यांचे मित्र. ह्या चार मित्र-मैत्रीणींची ही कथा. ही त्यांच्या रुईया कॉलेज मधील सोनेरी जीवनाला पोखरून टाकणारी एक शोकांतिका आहे. समीरच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण करणारी कथा आपल्याला सांगितली आहे प्रणव सखदेव ह्यांनी. सेक्सचा इन्फेक्टड व्हायरस ह्या तरुणांचे आयुष्य कसे कुरतडून टाकतो त्याची ही गोष्ट आहे. समीर-सानिका आणि समीर- सलोनी ह्यांचे प्रेमी जीवन म्हणजे सेक्स जीवन रंगवण्यात लेखक रंगून जातो तसेच त्याचे मित्र चैतन्य, अरुण आणि दादू काका ह्यांच्या जीवनकहाण्या सांगण्यात तो रंगून जातो. रुईया कॉलेजच्या शुभ्र आठवणी न लाभलेले हे भरकटलेले मित्र. त्यांच्या जीवनातील हे काळे करडे स्ट्रोक्स! त्यांचे जीवन म्हणजे एक केऑस! भणंग आयुष्याकडे जाणारे हे तरुण! लेखक म्हणूनच ह्या कादंबरीच्या अर्पणपत्रिकेत लिहितो "प्रत्येकाच्या आत डुचमळणाऱ्या एका केऑसला ...." . ही कादंबरी वाचताना श्री ना पेंडसे ह्यांच्या 'गारंबीचा बापू' किंवा 'लव्हाळी' ह्या कादंबऱ्यांची स्टाईल अधूनमधून आठवत राहते तर कधीकधी नेमाड्यांची 'कोसला' आठवते. पण अनेक वेळा आपण भाऊ पाध्ये ह्यांची 'वासूनाका' तर वाचत नाहीना!, असाही भास होत राहतो. प्रणव सखदेव हा नव्या पिढीचा नव्या दमाचा एक लेखक आहे. नव्या पिढीचे प्रश्नही नवेच आहेत. त्यांचे जगणेही भन्नाट आहे. सेक्सभोवती भरकटणाऱ्या तरुणांचे चित्रण करताना मध्यवर्गीय तरुणांमध्ये असे 'वासूनाके' दिसणारच. म्हणून ह्या कादंबरीतील घटना रुईया कॉलेज, दादर-माटुंगा, हिंदू कॉलनी, पारशी कॉलनी, फाईव्ह गार्डन, लालबाग-परळ, दादरची लहान मोठी हॉटेल्स ह्या परिसरातच घडतात. लेखकाने हा परिसर जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा केलाय. हे खूप छान जमतंय. पण आपण पाहिलेल्या रुईया कॉलेजच्या हुशार विद्यार्थ्यांचे किंवा हिंदू कॉलनी / पारशी कॉलनीत रहाणार्या मध्यमवर्गीय जीवनाचे हे चित्रण नाही. लालबाग-परळच्या वस्तीतील वासूनाका मात्र चांगला चित्रीत झाला आहे, तो समीरचा मित्र असलेल्या अरुणची कथा रंगविताना. आज लालबाग-परळ खूप बदलले आहे. मी तिकडे फारसे जात नाही. 50 वर्षांपूर्वी मी ह्याच परिसरात 5-10 वर्षे काढली होती त्यामुळे मला हा परिसर खूप आवडलेला होता. त्यावेळी रुईया कॉलेज म्हणजे हुशार मुलांचे एक नावाजलेले कॉलेज. तेथेही विद्यार्थीकट्टे होते. सिगारेट, दारू, गांजा पिणारे विद्यार्थी त्यावेळीही असतील पण ह्या कादंबरीत दिसणारे समीर आणि त्यांचे मित्र त्यावेळी नव्हते. मी युडीसीटीत संशोधन करीत असताना माझे दोन सहकारी संशोधक विद्यार्थी होते ते रुईयाचे सर्वात हुशार विद्यार्थी. एक मित्र तर त्याच महाविद्यालयात प्राध्यापक झाला आणि तेथूनच रिटायर झाला. त्यांनी मला सांगितलेले रुईया कॉलेज प्रणव सखदेव ह्यांच्या कादंबरीत वर्णन केलेल्या कॉलेजसारखे नव्हते. आता सारेच बदलले असेल. नव्या पिढीचे नवे प्रश्न. नव्या समस्या. नवे जगणे. त्यामुळे फाईव्ह गार्डनचा प्रेमिकांच्या परिसर आता किती बदलला आहे, ह्याची कल्पना कादंबरी वाचताना येते. अर्थात कादंबरीत केलेले वर्णन म्हणजे त्या भागाचे खरं वर्णन नव्हे. कादंबरीत डोंबिवली संस्कृतीत वाढलेला समी. ती मध्यवर्गीय संस्कृती झुगारून देताना त्याचा मित्र असलेल्या अरुणच्या लालबागच्या वासूनाका संस्कृतीचा कसा शिकारी होतो, हे फार छान चित्रीत झाले असले तरी ही कादंबरी नकळत वासूनाका टाईप झाली आहे. लेखकावर झालेला जुन्या लेखकांचा हा प्रभाव आहे की हे ह्या नव्या लेखकाचे नवे तंत्र आहे. तरुणांचे भरकटलेले आयुष्य हा कादंबरीचा विषय आहे. हे मान्य केले तर कादंबरी छान जमली आहे. लेखकाला परिणामकारक चित्रण करणे छान येते, हेच ह्या कादंबरीचे वैशिष्टय. चांगल्या कादंबरीला उंचावर नेण्यासाठी लेखक कमी पडलाय कारण तो सेक्सचे वर्णन करण्यातच अडकलाय. त्याला तेच काळे कोरडे स्ट्रोक्स दिसत असावेत. ह्या कादंबरीत लक्ष वेधून घेते ती सानिका. समीरची मैत्रीण म्हणजे त्याच्या चिन्मय ह्या अंध मित्राची प्रेयसी. कवी मनाची. "पाय सोडूनी जळात बसलेल्या औदुंबरासारखी". बालकवींच्या कवितेत रमणारी. ती एक गूढ स्त्री. समीरला ती स्त्री समजतच नाही पण तो तिच्याकडे आकर्षित होतो. त्याचवेळी तो अडकलेला असतो सलोनीत. तिलाही तो आवडत जातो पण तिच्या शरीरवेदना असतात एका रोगाने पछाडलेल्या. ती त्याच्यावर प्रेम करत असते पण आपले शरीर त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते कारण आपल्यामुळे समीरला किंवा कोणालाही संसर्गरोग होऊ नये असे तिला मनापासून वाटत असते. बिचारा समीर. त्याच्या सेक्स केऑसमध्येच डुचमळलेला. अशीही रुईच्या क्राउडमधील मित्र-मैत्रिणींची कहाणी. एक फसलेली कादंबरी. मध्येमध्ये कंटाळा आणणारी. अधूनमधून मुंबईच्या परिसरातील आजच्या नवतरुणांची कहाणी सांगणारी. साहित्य अकादमी पुरस्कार देणाऱ्या परीक्षकांना ही कादंबरी का आवडली असेल, हे त्यांनी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. कदाचित मलाच ह्या कादंबरीचे साहित्यमूल्य समजलं नसावं. ह्यापुढे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला म्हणजे काहीतरी ग्रेट साहित्य वाचायला मिळेल असे मला वाटत नाही. नव्या दमाच्या ह्या लेखकाला नवा हुरूप येईल आणि त्याच्या हातून नवे छान लिहून होईल, हे मात्र नक्की. प्रणव सखदेव ह्यांना शुभेच्छा!