Wednesday, May 13, 2020

फेसबुक लेखनपुराणम


काही वर्षे झाली असतील . फेसबुकवर स्टेटस टाकण्यासाठी लिखाण करायचे किंवा कंमेंट्स टाकायचं . दिसलं काही किंवा वाचलं काही की हा व्यक्त होण्याचा खेळ सुरु झाला. फेबु उघडलं की कुणी काय लिहिलंय हे वाचलं की मनात सुरु होतं विचारचक्र. मग टाकली प्रतिक्रिया . तितक्याच वेगाने येते तिकडून प्रतिक्रिया आणि पुन्हा सुरु होतो नवा विचार . पुन्हा लिहायचे की सोडून पुढे जायचे हा एक प्रश्न . मला वाटतं लेखकाचं असंच होत असावे. विचारचक्रातील क्रिया- प्रतिक्रिया. तशी ती एक प्रकारची विकृती. फेसबुक ही एक विकृती की व्यक्त होण्याची प्रकृती. नव्हे आजची एक संस्कृती. एक व्यासपीठ. गप्पा मारण्याचं . एकटेपणा घालवायला फिरायला जाण्याचे ठिकाण.
मित्र मिळवण्याचे ठिकाण. तसे हे मित्र प्रत्यक्ष जीवनात भेटलेले असतातच असे नाही .मी तर अनेकांना एकदाही भेटलो नाही. असेच मित्र करीत गेलो. त्यात लेखक , पत्रकार, नाटककार , सामाजिक कार्यकर्ते , राजकीय व्यक्ती , विविध क्षेत्रातील मंडळी आहेत. थोडे नातेवाईक आणि ओळखीची मंडळी आहेतच . 'वाढता वाढता वाढे ',असा हा फेबु मित्रपरिवार . ह्या परिवारात मोदी भक्त आहेत तसेच मोदी द्वेषी आहेत. हा नवा क्लासिफाईड वर्ग मजा आणतो . रोज नवे खाद्य असते.वाचायला , कंमेंट्स मारायला मजा येते. इथे रागलोभ भरपूर . फ्रेंड -अनफ्रेंड करणे चालूच असते. कडाक्याने भांडण झाले की ब्लॉक करणे चालूच असते. काहीजण उपद्रवी असतातच. चालायचंच .
बहुतेक जणांना Like  किंवा कंमेंट करण्याची सवय असतेच .Like हे प्रकरण मोठे गंमतीचे आहे. Like म्हणजे दाद. पण ही दाद कुणाकडून मिळाली हे फार महत्वाचे असते. असे दाद देणारे तसे खरे मित्र असतातच असे नव्हे. दोन दिवसांनी ते कडाडून भांडायला येतात ,एखादी तिरकस कंमेंट टाकून. काही जणांना आपल्याला किती Likes मिळाले ह्याचे कौतुक . तसा एक कंपू असतोच . काहीही न वाचता Like  करून पुढे जाणाऱ्या मित्रांचा.
माझ्या दृष्टीने व्यक्त होणं , इतरांना आपले मत सांगणे , आपला आऊट ऑफ बॉक्स विचार काय आहे , हे सांगणे महत्वाचे आहे.ही सहजप्रवृत्ती .
आपल्या अनुभवात इतरांना सहभागी करून घेणाऱ्या मित्रांचे लिखाण खूप आनंद देऊन जाते . प्रवास , प्रवासातील गंमती जमती , फोटो - स्वतःचे, कार्यक्रमाचे , सामाजिक कार्याचे , भेटीगाठींचे , प्रवासाचे वगैरे . हे फोटो लिखाणापेक्षा खूप काही सांगून जातात.
काहीजण सहानुभूती मिळवण्यासाठी लिहितात तर काही जण अगदी खोल , खाजगी व्यक्तिगत अनुभव सांगून स्वतःचे मन मोकळे करीत असतात. असंख्य व्यक्ती. असंख्य प्रकृती. असंख्य स्वभावाचे नमुने .ही माणसं प्रत्यक्ष पाहिलेली नसतात पण ती कशी आहेत?, ह्याचा थोडा अंदाज येतो. १५ - २० स्टेटसवरून ह्या माणसाचा थोडासा अंदाज येतो.
अपरिचितातून परिचितांची प्रचिती किंवा परिचितातून अपरिचितांची प्रचिती म्हणजे हे फेसबुक विश्व्. तसं अनोखे विश्व्.इथे सगळेच लेखक- वाचक . काहीजण नुसतेच like करून पुढे जाणारे. काही जण किती Like मिळाले हे मोजण्यासाठी पुन्हापुन्हा येणारे. काहीजण पिंक टाकतात तशी कंमेंट टाकून पुढे जाणारे.
फेसबुकवरचे लिखाण म्हणजे मुक्तछंद .नुसते शब्द. लिखाण कधी त्रोटक तर कधी विस्तारित . कधी कट्ट्यावरच्या गप्पा. कधी एखादा परिसंवाद. फेसबुक उघडलं की क्षणाक्षणाला ताजेपणा जाणवतो . त्याचे कारण काही मित्र आपले अनुभव फार छान व्यक्त करतात .ते आपल्याशीच बोलतात असे वाटू लागते. काही जण भांडतात , पुन्हा मित्र होतात . जुन्या कंमेंट्स विसरून जातात. फेसबुकवर आपण एकमेकांना किती जाणून घेणार ? तसं ते आभासी जग . माणूस तसा असतोच असे नाही. असा हा मनोव्यापार येथे चालत असतो.
मला अनेकदा वाटतं ,' मी फेसबुकवर का लिहितो ?' . लक्षात येतं . इथे काही मित्र आहेत. त्यांच्याशी बोलावे. जमलं तर चर्चा करावी . त्यांची नवी बाजू समजून घ्यावी . आपले विचार तपासून बघावे. लोकांचा कल समजून घ्यावा . हे एक चांगलं माध्यम आहे. नव्या युगाचं . जोडणारं . म्हंटलं तर मीटिंग ऑफ माईंड्स. गावगप्पा करण्याचे ठिकाण. राजकारणाची चावडी . एक विरंगुळा .
काही प्रतिक्रिया:
शरद मराठे :मनातलं बोललात. आपल्या भावना फक्त आपल्या माहितीतल्या मित्रांमध्ये पोचवण्यामध्ये खूपवेळा मर्यादा असतात, कारण आपणा सगळ्यांचाच एकमेकांमध्ये स्टेक असतो, त्यामुळे व्यक्त होताना काळजी घ्यावी लागते, इगो सांभाळावे लागतात. मात्र फेबुद्वारे तयार झालेल्या मित्रमैत्रिणींमध्ये, अशा मर्यादा राहात नाहीत. कोणत्याही विषयावर आपल्याला योग्य वाटेल तसे व्यक्त होता येते. आपल्या पोस्ट्स, कॉमेंट्स  त्यांच्या द्वारे अधिक जास्त लोकांपर्यंत पोचतात. त्यांच्या पोस्ट्स वाचून आपला परीघ देखील रुंदावतात. त्यांच्याद्वारे आपला मित्रपरिवार वाढत जातो. काही वर्षांपूर्वी अशीच एक फ्रेंड रिक्वेस्ट सौरभ गणपत्ये यांना पाठवली होती. नंतर खूप काही नवीन शिकायला, वाचायला मिळालेच, आपली मते व्यक्त करता आलीच, पण सगळ्यात मोठा फायदा त्याद्वारे अजून काही मित्रमंडळी जोडता आली. आपल्यासारख्या व्यक्तीची ओळख होणे, हा असाच एक सुंदर योग. स्वतःच्याच वर्तुळात राहून आपल्याला मोठे समजायची सवय असणाऱ्यांसाठी समाजमाध्यमे हा खुप मोठा आरसा आहे, जो आभाळाएव्हढ्या व्यक्तिमत्वांसमोर आपण किती खुजे आहोत हे दाखवून देतो.
गिरीश वायंगनकर :छान व्यक्त केलंत
E चावडी ला आत्ताश्या सगळेच सरावलेत. व्यक्त झालेल्या बहुतांश विचारांशी सहमत. फेबु ने प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी स्वत:चा आभासी कोपरा दिला मात्र एक बदल जो मला जाणवतोय तो म्हणजे बर्याच लोकांनी ते आभासी जग जास्तच सिरीयसली घेतलंय
डॉ धुंडिराज कहाळेकर: आपल्या मनांत दाटलेल्या भावभावना,विचार,सुख..दुःख ,राग लोभ,आनंद कुणा बरोबर तरी व्यक्त करण्याची सोय या फे.बु.द्वारे साधल्या जाते.
पण सारासार विचाराने या व्यसनांत कितपत गुंतावे हे ठरवावेच लागेल.कारण
"अति परिचयात् अवज्ञा....हे सूत्र लक्षात घेतलेच पाहिजे.
दत्ता जोशी : अगदी मनातलं. ही खरीच virtual चावडी आहे...
शरद देऊळगावकर: खरंय !
वसंत मैय्या : sir superb !

Monday, May 11, 2020

माझ्या व्यवसायाची सुरुवात


I organised Seminar on ' Computer Color Matching  ' at Hotel Tajmahal in Mumbai in 1986 and launched a small business. 

२० जानेवारी १९८६ साली मी मुंबईच्या हॉटेल ताजमहाल मध्ये Computer Colour Matching For Paints ,Plastis,Inks and Textiles ह्या विषयावर  राष्ट्रीय सेमिनार आयोजित केला होता. देशातील ११० उद्योजक, त्यांचे प्रतिनिधी आणि तंत्रज्ञ त्यावेळी उपस्थित होते. त्याच सेमिनार मध्ये मी माझा छोटा सर्व्हिस उद्योग सुरु केला. माझ्या ९ ते ५ सुखी जीवनाला सुट्टी मिळाली. उद्योगात Idea  महत्वाची असते. रंगविज्ञान आणि तंत्रज्ञान हा माझा विषय . अर्थात हा नंतरचा प्रवास. काही घटना अपघाताने होतात . मी तसा पदार्थवैज्ञानिक. एशियन पेंटसचे टेकनिकल म्यानेजर सी जे भूमकर माझ्या संपर्कात आले . त्यांनी मला त्यांच्या संशोधन विभागात येण्याचे आमंत्रण दिले . माझी कंपनीच्या संचालकाबरोबर मुलाखत ठरली. कंपनीचे एक मालक आणि संचालक अश्विन दाणी ह्यांच्या बरोबर माझी मुलाखत झाली. त्यांचे इडीपी म्यानेजर वीरराघवन त्यावेळी तेथे उपस्थित होते. रंगविज्ञानाचा आधार घेवून आणि संगणकाचा आधार घेवून तंत्रज्ञान विकसित करण्याचे ठरले . मी केंद्र सरकारची सुखासीन नोकरी सोडून खाजगी उद्योगाची असुरक्षित नोकरी स्विकारली म्हणून माझ्या वडिलांनी मला वेड्यात काढले. अर्थात  मला मिळणारा पगार सरकारी नोकरी पेक्षा जास्त होता. मी ६ महिन्यात Computer Color Matching Software विकसित केले. कंपनीत इतर तंत्रज्ञ लोकांचा विरोध सुरु झाला. मी संचालकांचा Blue Eyed Boy होतो. मला युरोप -अमेरिकेच्या दौर्यावर तेथील तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी पाठविण्यात आले. मी अमेरिकेत रेन्सलियर विद्यापीठात विशेष शिक्षण घेवून परत आलो. आम्ही हे तंत्रज्ञान कंपनीत यशस्वी करुन दाखविले. पेंटमध्ये कलरंटची किंमत ६०-७० %असते. आमच्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे त्यामध्ये १५ ते २०℅ बचत झाली. अचूक रंग पहिल्याच झटक्यात मिळणे शक्य झाले. कोणताही रंग द्या , तुम्हाला लगेच तोच रंग तयार करुन देतो ,हे सहज शक्य झाले. रंगक्रांती आणि पैशाची बचत सहज शक्य झाली.
हे चालू असतांना वस्त्रोद्योग समोर होता. तेथे ह्या तंत्रज्ञानाला अधिक वाव होता . एक दोन ठिकाणी मी हा प्रयोग यशस्वी करून दाखविला . आणि लक्षात आले की हे क्षेत्र खूप मोठे आहे. पेंट क्षेत्रात ५-१० कंपन्या तर वस्त्रोद्योग क्षेत्रात असंख्य कंपन्या. मी ठरवले की आपण ह्या क्षेत्रात जावे . आणि स्वतः चा व्यवसाय सुरु केला. हा सेमिनार घेतला.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला . त्या सेमिनारमध्ये जे जे आले होते ,त्यापैकी ६०℅ माझे गिर्हाईक झाले. आणि विशेष म्हणजे मला दोन स्पर्धकही मीच तयार केले. मीच त्यांना शिक्षित केले . हे चालतच असतं. मला व्यवसायात स्पर्धक तयार करु नयेत हे फार उशिरा समजले. मी अहमदाबाद ,मुंबई आणि कोइंबतोर येथील सर्व  मोठ्या कापड उद्योगात माझे तंत्रज्ञान विकले.
असा हा माझा प्रवास . अध्यापन आणि संशोधन सोडून उद्योग व्यवसायात मी आलो ह्याचे आजही मला आश्चर्य वाटते . असेच असते आयुष्य. ठरवतो एक आणि होते एक. संधी येतात . आपण त्याचा फायदा घेतला तर आयुष्याचे गणित जमते.
This is my office . I use to offer Computer Color Matching Service to small industries who can not afford a costly color measuring instrument and computer .

 विजय भाटकर म्हणतात , ' तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय प्रगतच ' . ८० च्या दशकातील हा शास्त्रज्ञ - तंत्रज्ञ . माझ्या पिढीचाच . काही आठवणी जाग्या झाल्या . मी पदार्थविज्ञानातील Ph . D . घेऊन बाहेर पडलो .  अचानक उद्योग क्षेत्रात मला उपयुक्त संशोधनाची संधी चालून आली .एशियन पेंट्स ह्या कंपनीने मला कॉम्पुटर कलर मॅचिंग ह्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी आमंत्रित केले . स्पेट्रोफोटोमीटर - कॉम्पुटर - कलर मॅचिंग सॉफ्टवेअर ह्यांचा एकत्रित उपयोग करून तंत्रज्ञान शोधून काढणे हा प्रकल्प .त्यावेळी  कॉम्पुटर हार्डवेअर व सॉफ्टवेअरवर कस्टम ड्युटी २०० टक्के होती . अतिमहागडे तंत्रज्ञान होते.   आम्ही दोन वर्षात ते  उपयुक्त तंत्रज्ञान विकसित केले . अश्विन दाणी ह्या संचालकाची ती दूरदृष्टी होती . पेंट कंपनीत ३०  टक्के खर्च हा पिगमेंटवर होतो . ह्या नव्या तंत्रज्ञानामुळे  पिगमेंटच्या  खर्चात १५ ते २० टक्के बचत होते हे सिद्ध झाले  होते . इतर अनेक फायदे होते . आम्ही हे तंत्रज्ञान यशस्वी करून दाखविले . आज कोपऱ्यावरच्या हार्डवेअरच्या दुकानात सुद्धा तुम्हाला छोटे कॉम्पुटर कलर मॅचिंग मशिन दिसून येईल .
त्यानंतर हेच तंत्रज्ञान रिलायन्सच्या अहमदाबाद फॅक्टरीत कापड उद्योगात कलर मॅचिंगसाठी वापरण्यास  सुरुवात झाली  आणि तंत्रज्ञान वेगाने पसरत गेले . कापडउद्योग , रंग उद्योग , प्लास्टिक  उद्योग , शाई उद्योग ह्या सर्वच क्षेत्रात त्याचा उपयोग सुरु झाला . करोडो रुपयांची बचत झाली . मी स्वतः ३५० उद्योगांना  हे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले . दोन तीन भारतीय कंपन्या ह्या उद्योगात आल्या . भारतात रंग क्रांती झाली .
संगणकाने सॉफ्टवेअर उद्योगाची उभारणी केली हे खरे .पण संगणकामुळे अशा प्रकारचे नवे तंत्रज्ञान उद्योगासाठी उभे करता येऊ शकते ह्याकडे विशेष लक्ष दिले जात नाही . आज फ्लिपकार्टचा उद्योग ज्यांनी उभा केला तोच उद्योग करोडो डॉलर्सला विकला गेला की आपण डोळे विस्फारून बघत असतो .
This was first Computer Color Matching Instrument installed in Textile Mill,Ahemedabad . It consists of Spectrophotometer integrated with IBM PC XT and Color Matching Software for Textile Dyeing and Printing
आपण भारतीय तंत्रज्ञानात प्रगत आहोत ह्यात वाद नाही . उपयुक्त संशोधन असे राबविले पाहिजे . मूलभूत संशोधनाइतकेच ते अधिक महत्वाचे आहे .
Chromatic Notes हा माझा ब्लॉग आहे . विशेष माहितीसाठी अवश्य वाचा . जगातील ६० हजार पेक्षा अधिक लोकांनी तो  वाचला आहे .