Tuesday, July 21, 2020

एस्कीमोला फ्रीज विकणारा सेल्समन: विली कॉर्नेलियस

मी असा घडलो : ३

विली कॉर्नेलियस: एस्कीमोला फ्रीज विकणारा सेल्समन
Wilhem Cornelius , German  Expert in Color Technology 
Willhem Cornelius ह्या जर्मन माणसाची आणि माझी ओळख झाली आणि माझ्या जीवनाला खरी कलाटणी मिळाली. हा माणूस म्हणजे एस्कीमोला फ्रीज विकणारा विक्रेता. अतिशय गोडबोल्या. पाहिल्या पांच मिनिटात तुम्ही त्याच्या बोलण्यावर खुश व्हाल. तो जे बोलतोय त्याच्याकडेच तुमचे लक्ष असेल. जगभर प्रवास केलेला हा माणूस तसा कामानिमित्त फिरत असतो युरोपभर. आज स्पेन तर उद्या रोम. आठवड्यातून तीन दिवस हा युरोपमधील कोणत्यातरी देशात गेलेला असतो. त्याचे कार्यालय ड्यूसेडोर्फपासून जवळ असलेल्या Marl ह्या गावात आहे. घर आणि कार्यालय त्याच्या स्वतःच्याच  आलिशान बंगल्यात आहे. हा एका अमेरिकन कंपनीचा युरोपमधील कार्यालयाचा संचालक आहे . सर्व युरोपमधील सेल्स आणि मार्केटिंग हा बघतो. हा जर्मन असूनही उत्तम इंग्रजी बोलतो. सहसा जर्मन लोक इतके चांगले इंग्रजी बोलत नाहीत. त्यांच्या बोलण्याला वेग नसतो. जर्मनमध्ये विचार करून इंग्रजीत बोलणारे असतात तसा हा नाही. म्हणजे माझासारखा. मी पूर्वी मराठीत विचार करून इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करीत असे. विलीला युरोपमधील सर्व भाषा येतात त्यामुळे त्याने व्यवसाय वाढविला तो सर्व युरोपभर.
Dr Henry Hemmendinger , A great Physicist turned
Color Scientist and technologist who developed
COMIC (Colorant Mixture Computer).. I am lucky
to meet him and learn the Subject. After 20 years
 he visited Himalyas and while reurning to USA ,
he visited Mumbai to see me. I had arranged a great
meeting with Color Group of India . Mr Chandavarkar,
our President and Sandoz technical manager showing him
      our activities . I  am influenced by such Scientist who
change the industrial world.    
त्याचे असे झाले की मी रंगविज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या विषयात संशोधन करीत असताना एका रंगउद्योग कंपनीत संशोधन करीत होतो.त्यावेळी कंपनीने मला अमेरिकेला एका सेमिनारसाठी पाठविले. मी सेमिनार नंतर दोन तीन विद्यापीठात जेथे हे काम चालते तेथे ३ आठवडे शिकण्यासाठी गेलो. तेथे विविध उद्योगातील – पेंट , प्लास्टीक्स, इंक्स आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील मंडळी आली होती. ह्या क्षेत्रात मुलभूत संशोधन करणारे शास्त्रज्ञ आले होते. त्यांनी उद्योगासाठी नवे तंत्रज्ञान शोधून काढले होते. त्या जोडगोळीचे नांव होते डेव्हिडसन आणि हेमेनडीनजर. 
COMIC I  : Colorant Mixture Computer (1952)
१९५८ साली डेव्हिडन आणि  हेमेनडिंज र ह्यांच्या छोट्या कंपनीने COMIC ( Colorant Mixture Computer) बाजारात आणला होता. त्यामुळेच रंगक्रांतीला सुरुवात झाली होती . कोणताही दिलेला रंग जर तयार करायचा असेल तर त्यात ३ किंवा चार रंगद्रव्ये ( Dyes or Pigments ) असतात. त्याचे अचूक प्रमाण Trial and Error ने नं करता गणकयंत्राने काढण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले होते . त्यावेळी गणकयंत्र डिजिटल नव्हते. ते Analogue गणकयंत्र होते. Give me a Color and I will give you a Instant Formula from hundreds of dyes or pigments with a lowest possible cost and quality match in all lights. ह्या प्रमुख तत्वावर हे तंत्रज्ञान विकसित झाले होते.   
माझी त्या दोघा शास्त्रज्ञाची ओळख झाली. हा सेमिनार आयोजित केला होता प्रोफेसर बिलमेयर ह्यांनी. ह्या क्षेत्रातील प्रोफेसर Allen ह्यानी संगणकाची प्रणाली आणि गणितीरचना शोधून काढली होती. त्यांची माझी ओळख झाली आणि मी त्यांच्याकडून ह्या विषयातील अनेक गोष्टी  शिकलो . त्यांच्या संशोधनावर आधारित अल्गोरिथमवर मी स्वतः कलर म्याचिंग प्रोग्राम विकसित केला. त्यामुळे मला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ह्या दोन्हींची माहिती झाली. हे प्रोग्राम वस्त्रोद्योग आणि पेंटसाठी वेगवेगळे असतात. ते तंत्र मी भारतात विकसित केले.
COMIC II  : Second  Generation Computer Color System 
त्यावेळी जगात केवळ तीनच कंपन्या ह्या क्षेत्रात काम करीत होत्या. एक इंग्लंडची , एक अमेरिकेची आणि एक झ्युरिकची. त्या तिन्ही कंपन्या अमेरिकेतील निरनिराळ्या उद्योगक्षेत्रात आपला व्यवसाय वाढवीत होत्या. ह्या रंग तंत्रज्ञानात तीन गोष्टी आवश्यक असतात. रंग मोजण्यासाठी लागते ते यंत्र . त्याला स्पेक्ट्रोफोटोमीटर असे  म्हणतात. ते जोडायचे असते संगणकाला. त्यावर लिहायचा असतो प्रोग्राम म्हणजे सॉफ्टवेअर . प्रत्येक उद्योगासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर लिहावे लागते. हे सर्व एकत्र करून नवे तंत्रज्ञान तयार होते. त्यासाठी यंत्राची माहिती आवश्यक तर असते पण ते चालवायचे कसे आणि उद्योगातील तंत्रज्ञाला ते शिकवायचे असते. यंत्रात बिघाड झाला की दुरुस्त ही करायचे असते. असे हे तंत्रज्ञान जगातील फारच मोजक्या लोकांना माहित असलेले. त्यावेळी आणि आजही खूप महाग असणारे. हे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मी १९७८ साली अमेरिकेला गेलो. हे तंत्रज्ञान समजून तर घेतलेच . त्याशिवाय तेथील उद्योगात ते कसे वापरतात, हे प्रत्यक्ष भेटी देऊन बघून आलो. माझ्यासाठी हा प्रचंड मोठा अनुभव होता. जे हे तंत्रज्ञान शोधून काढतात ते शास्त्रज्ञ आणि ज्या तीन कंपन्या ही यंत्रे तयार करतात त्याच्या कार्यालयांना भेटी देऊन बरीचशी माहिती मिळविली.
This was the First Computer Color Matching System in Paint Industry of
India. It was integrated Color system with New Generation Spectrophotometer
integrated with PDP 11/34 Computer and Paint Software for Matching, Batch Coorection
and Quality Control of Incoming Pigments and Outgoing Paints . We achieved 15% cost reduction
in pigment cost, matching of New shades was done in Zero Shot and Industrial
Paint Color Matching was done in one Correction.

मी भारतात परत आलो . आमचे मालक स्वतः तंत्रज्ञ होते. त्यांना हे तंत्रज्ञान भारतात आणावयाचे होते. त्यासाठी आमच्याकडे जे इडीपी प्रमुख होते त्यांच्याशी चर्चा करून ते येथेच तयार करावयाचे ठरविले. त्यावेळी आपण दुसर्या जनरेशनचे गणकयंत्र वापरीत होतो. त्या गणकयंत्रात पंचकार्ड सिस्टीम होती. वैज्ञानिक विषयासाठी फोरट्रान ही भाषा वापरीत असत. आमचे ईडीपी प्रोग्रामर ह्यांना फक्त कोबॉल ही भाषा येत असे. मी फोर्ट्रान शिकलो खरा . पण सोबत एका चांगल्या प्रॉग्रॅमर आणि सिस्टीम डेव्हलपरला घेतले. आमचा गणकयंत्र आय सी एल १९०१ होता . ते खूप जुने तंत्रज्ञान होते.  मी इडीपीच्या प्रणाली लिहिणाऱ्या इनजीनिअरच्या सहकार्याने ते Software अवघ्या सहा महिन्यात तयार केले. तो पर्यंत अमेरिकन कंपनीने बरीच प्रगती केली होती व सर्व तंत्रज्ञान नव्याने विकसित केले होते.. आमच्या मालकाला वाटले , कशाला अधिक वेळ वाया घालवायचा? हे तंत्रज्ञान त्यांच्याकडूनच विकत घेऊन त्याचा उपयोग करून घ्यावा. मग माझा पत्रव्यवहार सुरु झाला. अमेरिकन लोक भारतात तंत्रज्ञान विकण्यासाठी तयार नव्हते. ह्या मागासलेल्या देशात येण्यासाठी कोणीही तयार नव्हते. त्यांनी युरोपमध्ये आपला जम बसविला होता आणि विली कॉर्नेलीयस  त्यांचे काम  पहात होता. त्यांनी मला त्याच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. मी त्याला टेलेक्स केला आणि हा महाशय’ चला भारत तर बघून होईल ‘ ह्या उद्देशाने भारतात आला . आठ दिवसात तो येथे पोहोचला. मुंबईच्या हॉटेल ताज मध्ये उतरला. आणि भारतावर एकदम खुश झाला. त्याला नंतर लक्षात आले की हॉटेल ताज म्हणजे भारत नव्हे. आपल्याला कसलीही ऑर्डर मिळणार नाही  . हा मागासलेला देश आहे. 'ही आपली शेवटची भारत भेट', असे त्याने ठरवून टाकले. पण झाले उलटेच. आमच्या बरोबर झालेल्या मिटिंगमुळे त्याच्या लक्षात आले की आम्ही software तयार केले आहे तरीही एकत्रित टेकनॉलोजी घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तो येथे दोन दिवस होता. खूप चर्चा झाल्या. आणि आम्ही हे तंत्रज्ञान त्याच्याकडून घ्यायचे ठरविले. तो तर खूपच आनंदला. माझी आणि त्याची जी ओळख झाली ती अशी. नंतर मी त्याच्याबरोबर २० वर्षे काम  केले आणि त्याच्याकडून खूप शिकलो. असा हा विली कॉर्नेलियस . त्याच्या अनेक गंमतीजमती सांगण्यासारख्या आहेत.
Dr Narendra Gangakhedkar giving a Demo in
Color Technology Seminar. I must have conducted many
seminars for Paint , Plastics, Inks , dyestuff , Pigment and
Textile Industries  in India and made this technology
popular and saved the colorant cost. 
माझ्या कंपनीने त्याच्याकडून कॉम्पुटर कलर सिस्टीम विकत घेतली. त्याची किमंत त्यावेळी १००, ००० डॉलर होती. तेंव्हा डॉलरची किंमत ८ रुपये होती. त्यासाठी Department of Electronics कडून NOC मिळवावी लागे  .मग Import License मिळवावा लागे . त्यावर १५०% कस्टम ड्युटी होती. त्यात तीन भागावर तीन वेगळ्या कस्टम ड्युटी होत्या. स्पेक्ट्रोवर ३०%, कॉम्पुटर Hardware वर १५०% तर Software वर १०० %.. इम्पोर्ट करणे हे महाकठीण काम होते . हे सर्व करण्यासाठी ६-८ महिने लागत असत. तो पर्यंत आंतरराष्ट्रीय किमंती बदलत असत किंवा तंत्रज्ञानात बदलही होत असे. म्हणजे आपल्या उद्योगांना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत असे. हे तंत्रज्ञान का हवे ? त्याचे प्रमुख कारण म्हणजे रंग्द्रव्यावर १२-१५ % बचत होत असे. पेंटमध्ये रंगद्रव्य खर्च हा  एकूण खर्चाच्या ५० ते ६०० % असतो. त्यामुळे सरळ सरळ बचत तर होत असे पण इतर आठ दहा फायदे होते. असे हे तंत्रज्ञान आम्ही विकत घेतले , अंमलात आणले आणि रंगद्रव्यावर जवळजवळ २०% बचत केली. एक दीड वर्षात आमची खूपच प्रगती झाली.
Myself and Willi Cornelius in  Guest House of
ATIC Industries  , Valsad .
विली कॉरनेलीयस त्यावेळी दोन वेळा भारतात येऊन गेला. त्याच्या हे लक्षात आले की भारतात मोठ्या पेंट कंपन्या फक्त  ३-४ च आहेत. खरे मार्केट हे कापड उद्योग आणि रंगद्रव्य उत्पादक ह्यांचे आहे. भारतात १००० हून अधिक मोठ्या कापड गिरण्या होत्या . एका भेटीत तो मला म्हणाला , ‘ तू ह्या विषयात तज्ञ आहेस. तुला थेअरी माहित आहे आणि हे तंत्र कसे अंमलात आणावयाचे हे ही माहित आहे.तू तंत्रज्ञ मंडळीना शिकवू शकतोस. ह्या तंत्रज्ञानाला भारतात खूप वाव आहे. आम्हाला दक्षिण एशियात मार्केट आहे, असे वाटते. तू ह्या क्षेत्रातील एकमेव तज्ञ आहेस. तू आमच्या कंपनीचा Representative होशील का ? तू होणार असशील तर मी तुझी नेमणूक करण्यास तयार आहे. तुझी कंपनी आमचे प्रतिनिधित्व तर करेलच पण येथील लोकांचे प्रश्न सोडविण्यास मार्गदर्शन करेल. तो तुझा स्वतः चा व्यवसाय असेल. बघ विचार कर आणि मला लवकर सांग’ . असा हा Godfather मला अचानक भेटला. त्यावेळी अमेरिका आणि युरोपचे मार्केट थंडावले होते. ते नव्या मार्केटच्या शोधात होते . 
My job was to popularize Color science and
Color Technology and help Color industry to
use modern technology. I have conducted
Color Courses all over India. 

भारतात मार्केट होते पण उद्योगांच्या अनंत अडचणी होत्या. कस्टम ड्युटी खूपच जास्त होत्या. कोणतेही तंत्रज्ञान भारतात आणणे महाकठीण कर्म होते. हे बदलत होते. मी विचार केला की  आपण अशा विविध तंत्रज्ञानाला भारतात आणणे आवश्यक आहे. आपले उद्योग जुनेच तंत्रज्ञान वापरत असतात. मी अनेक आंरराष्ट्रीय परिषदा आणि प्रदर्शने बघितली होती. तेथे तुम्हाला नवे काय येत आहे ह्याची चाहूल लागते. मी निर्णय घेतला आणि नोकरी सोडून स्वतःची कंपनी सुरु केली. विलीच्या कंपनीचा मी एजंट झालो. त्या ८- १० वर्षात तो वर्षातून दोन वेळा तरी भारतात येत असे.
My Office in One BHK .Outside Hall is my office
माझे कार्यालय माझ्या वन बेडरूम हॉलच्या घरात हॉल मध्ये होते. जो माणूस ताज - ओबेरॉय मध्ये उतरतो तो माझ्या घरीच असलेल्या कार्यालयात येतो. माझ्याकडे त्याला घेऊन येण्यासाठी साधी कार नसते. मुख्य म्हणजे माझ्याकडे टेलेक्स मशीन नव्हते. मी चर्चगेटच्या एका टेलेक्स मशीन असणाऱ्या गुजराती माणसाकडून टेलेक्स सेवा भाड्याने घेत होतो. गरज ही शोधाची जननी असते. तुटपुंज्या भांडवलावर व्यवसाय करायचा तर असे मार्ग शोधावे लागतात. त्यानंतर आमचे दौरे चालू झाले . अहमदाबाद , कलकत्ता , लुधियाना , तामिळनाडू, तीरुपूर , मुंबई, राजस्तान मधील भिलवारा  अशा उद्योगक्षेत्रात भेटी सुरु झाल्या. विलीच्या भेटी खूप उपयोगी असत.
Willi Cornelius had a Great Meeting with Chairman of RSWM and he
Sold First PC Based Color System to Bilwara Processors , Bhilwara. 
मी आणि विली कॉर्नेलीयस मुंबईहून सकाळी दिल्लीला गेलो होतो. संध्याकाळी मुंबईला परत येणार होतो. एका राजस्थानातील उद्योगपतींना त्यांच्या दिल्लीच्या कार्यलयात भेटायचे होते. तो अमेरिकन कंपनीचा जर्मन मॅनेजर होता हे त्यांना माहित होते . अमेरिकेतील एका औद्योगिक प्रदर्शनात त्यांची भेट झाली होती . राजस्थानात अतिशय आधुनिक अशा सूतगिरण्यांचे ते मालक होते . त्यांची अतिशय साधी राहणी . पूर्णपणे गांधीवादी . अतिशय बुद्धिमान . त्यांच्या केबिनमध्ये आम्ही प्रवेश केला . पहिला धक्का बसला . त्यांच्या टेबलावर विनोबा भावे ह्यांचा फोटो होता . त्यांनी आमच्यासाठी चहा मागवला .स्वतःकरिता गरम पाणी मागविले .आमचा चहा आला . आम्ही दोघे आमचा चहा तयार करीत होतो . पाहिजे तशी साखर टाकत होतो . त्यांनी त्यांच्या टेबलाच्या खणातून मधाची बाटली काढली आणि त्यांच्या कपात एक चमचा मध आणि गरम पाणी ओतले. आमचा जर्मन मित्र विली माझ्याकडे बघत होता . आमची चर्चा सुरु होती . इतक्यात त्यांचा फोन घणघणला . ते हिंदीतून बोलत होते . फोन त्यावेळचे केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ला ह्यांचा होता . हेवी वेट. त्यांनी फोन खाली ठेवला .
Our Color Computer System was installed at UDCT, Mumbai  and IIT , Delhi.
Professor H T Lokhane of UDCT and Dr M L Gulrajni of IIT, Delhi
took keen interest in Color Science and its Applications. They have carried
out Research and given guidance to many postgraduate students. My
association with them was wonderful. You see Mr David , Ex ICS manager
and Mr Hartzman, a German manager. in photograph. David Colliyer was  British and had a wonderful personality
and we have worked together for more than 10 years.    
ते माझ्याशी हिंदीतून बोलले . त्यांनी मला सांगितले की विनोबा भावे गेले आहेत.  त्यावेळी इंदिराजी रशियाला गेल्या होत्या आणि त्यांना विनोबांच्या मृत्यूची बातमी मंत्र्यांनी सांगितली होती आणि त्या भारताकडे परतण्यासाठी निघाल्या होत्या. .ह्याचा अर्थ राजकारणी मंडळींना विनोबा असे प्रिय होते .ते उद्योगपती भूदान चळवळीमुळे विनोबांच्या जवळ होते . विचाराने ते सर्वोदयी होते . त्यांना त्या दिवशी आमची मिटिंग चालू ठेवणे शक्य नाही असे त्यांनी मला सांगितले .’आपण उद्या दुपारी भेटू यात’, असे मला सांगितले. ‘तुम्ही आमच्या गेस्ट हाऊस मध्ये रहा . मी व्यवस्था करतो’, असेही ते म्हणाले. माझ्या बरोबरच्या जर्मन मित्राला म्हणजे विलीला  हा सगळा प्रकार समजावून सांगताना मला बरेच कष्ट पडले. विलीला मुंबईला जाणे आवश्यक होते . तो ओबेरॉय हॉटेलमध्ये रहात होता. त्याला त्याच्या बायकोचा नेहमीप्रमाणे फोन येणार होता. मुख्य म्हणजे त्यादिवशी तिचा वाढदिवस होता. त्याने आपण कोणत्या दिवशी कुठे आहोत व कोणत्या हॉटेलमध्ये आहोत हे आधीच सांगून ठेवले होते. मिटिंगमधून बाहेर पडल्यावर तो मला म्हणाला,’ मला मुंबईला गेलेच पाहिजे. माझ्या  बायकोचा फोन येईल. मी ओबेरॉय हॉटेलमध्ये पाहिजे’. मी म्हणालो ,तू येथून फोन कर . आपले येणे-जाणे वाचेल. त्याची त्यासाठी तयारी नव्हती. आम्ही मुंबईला गेलो आणि पुन्हा दुसरे दिवशी दिल्लीला त्या उद्योजकाला ठरलेल्या वेळी भेटण्याचे ठरविले . आम्ही दुसरे दिवशी संध्याकाळी त्या उद्योजकांना भेटलो आणि आम्हाला ऑर्डर मिळाली. विली खुश झाला. He was a great Marketing person. व्यवसाय कसा करायचा?, बोलायचे कसे? आपले तंत्रज्ञान सोप्या भाषेत कसे समजावून सांगायचे?, हे सर्व मी शिकलो ते त्याच्याकडून. म्हणूनच मी म्हणतो की हा माणूस एस्कीमोला ही फ्रीज विकेल. मोठा मिठास !. अनुभवी. बारा देशांचे पाणी प्यालेला.
We travelled from one end of India to another. We were in
Madura Coates  who were biggest Thread ,Yarn and Fabric Manufacturer
in India . They had a very Modern Factory at Ambasamuram which
equipped with our Color Computer System.
Narayan Swamy was a Modern Dyer and
achieved great savings in Dyestuff Cost.
 असेच एकदा कलकत्त्याला गेलो होतो. मोठी पेंट कंपनी होती. युरोपियन कंपनीचा भाग होती. त्यांच्या युरोपियन कंपनीत असे तंत्रज्ञान वापरीत असत. भारतातही आपण हे तंत्रज्ञान आणावे असे त्यांना वाटत असे. आमची मिटिंग ठरली. त्यांचा कारखाना नदीच्या पलीकडे होता. त्यामुळे हावडा ब्रिज ओलांडून तिकडे जावे लागत असे. तो सर्व भाग स्लम सारखाच होता. रस्ते व्यवस्थित नाहीत. धूळकट . घाणेरडे. ड्रायव्हर गाडीचा भोंगा सारखा वाजवीत होता. कान किटले होते. विली वैतागला. धुळीने त्याची कॉलर मळकट झाली होती. तो जाम वैतागला होता. 
मला म्हणाला , ‘ This is my last time to come to Calcutta. I will not come again. My wife will not put this new shirt in Washing Machine. She will throw it’. मी काय बोलणार ? आपली शहरे आणि औद्योगिक वसाहती अशाच घाणेरड्या असतात. त्या Industrial Slums असतात. कसेतरी आम्ही कारखान्यात पोहोचलो. त्याने जोरदार Presentation केले. टेक्निकल टीम खुश झाली. संचालकाबरोबर किमतीसंबंधी चर्चा झाली आणि आम्हाला ऑर्डर मिळाली. विली खुश. एक गोष्ट लक्षात घ्या . गोरे कातडेही फार महत्वाचे असते. मालक मंडळी ह्या गोर्या कातड्यावर प्रथम खुश होतात. काही वर्षांनी मला म्हणजे  माझ्या काळ्यासावळ्या कातड्याला बराच मान मिळाला. पण हे ही महत्वाचे की आपण आपले तंत्रज्ञान व्यवस्थित विकले पाहिजे . नुसते तंत्रज्ञ असून उपयोगी नाही.
विलीला कॅन्सर झाला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या बायकोने त्याच्या निधनाची बातमी मला फॅक्सवर कळविली. एक दोन आठवडे सुन्न गेले. तंत्रज्ञानात विषय माहीती असावाच लागतो. पण सेल्स आणि मार्केटिंग चांगले माहित असावे लागते. काही व्यक्तींना ते उपजत माहित असते. अशी माणसे आपल्या सहवासात आली की आपण बदलतो. असा हा माझा मित्र  आणि सहकारी.


We conducted many Seminars on Computer Applications in textiles . 

मी माझा हा छोटासा उद्योग १९८६ साली सुरु केला. २० जानेवारी , १९८६ साली मुंबईच्या हॉटेल ताजमध्ये एक नॅशनल सेमिनार
घेऊन कंपनीचे उदघाटन विली कोर्नेलियस ह्याच्या व्याख्यानाने केले. देशभरातून टेक्सटाईल्स , पेंन्ट्स , प्लास्टिक , रंगद्रव्य आदी  उद्योग क्षेत्रातील मालक लोक आणि त्यांचे तंत्रज्ञ आले होते. तसेच विद्यापीठातील प्राध्यापकही उपस्थित होते. 
मी  ह्या तंत्रज्ञानावर अनेक सेमिनार घेतले. असे अनेक विद्यार्थी मला भारतभर मिळाले. अनेक उद्योगांनी त्यांचे तंत्रज्ञ माझ्या
Short  Term Courses साठी पाठविले. विज्ञानातून तंत्रज्ञानाकडे झालेला माझा हा  प्रवास उद्योगक्षेत्रात
रंगद्रवव्याची भरीव बचत करून गेला .





Thursday, July 16, 2020

मी असा घडलो : २


मी कसा घडत गेलो ह्याचा जेंव्हा मी विचार करतो तेंव्हा त्याचे उत्तर मला माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन आयुष्यात मिळते. मला वाचनाची आवड लहानपपासूनच  होती. त्यात मी रमत असे. माझे खेळाकडे फारसे लक्ष नसे. ते तसे चुकीचेच होते. खेळातून जे सांघिक गुण निर्माण होतात त्याचा माझ्यात अभाव होता आणि आहे.Team Work and Leadership Quality हे दोन गुण अतिशय महत्वाचे असतात. ते खेळातूनच निर्माण होतात किंवा जोपासले जातात. पुढे नोकरी करताना किंवा स्वतःचा व्यवसाय करताना माझ्या हे लक्षात आले की हे गुण आपल्यात नाहीत ते त्यामुळेच. त्याचा परिणाम मी भोगला आहे. माझ्या हे  खूपच उशिरा लक्षात आले, सामाजिक सेवा संस्थेत कार्य करतांना मला हे प्रकर्षाने जाणवू लागले व त्यामुळेच मी हे गुण आत्मसात करण्याचा मनापासून प्रयत्न केला. ते जमले ते सामाजिक संस्थांशी जोडले गेल्यानंतर, Networking हे ही शिकलो ते त्याच काळात. व्यवसाय करताना मार्केटिंग आणि सेल्ससाठी नेट्वर्किंग तर आवश्यक असतेच. हे गुण शाळा – कॉलेजातच कमवायचे असतात. आपल्याच जगात रमले तर पुढे फार कठीण होते किंवा आपण दुसर्यावर अवलंबून राहतो. आपल्या चांगल्या संधी हुकतात किंवा आपल्याला मर्यादित यश मिळते.
       
दुसरा एक महत्वाचा अभाव माझ्यात आहे तो म्हणजे मी संगीत किंवा गाणे कधी शिकलो नाही. माणसाला संगीत आणि गाणे येणे आवश्यक आहे. शास्त्रीय संगीताचा कान असणे आवश्यक आहे .तो स्वतःचा एकलेपणा सहज घालवू शकतो. आपल्याला चांगले नृत्य येणे आवश्यक आहे. जेंव्हा तुम्ही समूहात मजेने वेळ घालवीत असतात तेंव्हा नृत्य करावयास कोणी आमंत्रित केले तर आपल्याला थोडे व्यवस्थित नाचता आले पाहिजे . असे प्रसंग जेंव्हा येतात तेंव्हा आपण त्यात विशेष रस घेऊन भाग घेतला पाहिजे. त्यात  आनंद ही असतो, 
       
मला मराठी भावगीते आणि हिंदी सिनेमातील गाणी आवडतात. पण मी अधिक रमतो ते गाण्यातील शब्दात. मला शब्दांचे खूप आकर्षण आहे .शब्द मला भावतात. त्यातील कवी मन मला अधिक मोहित करते. त्या शब्दातून मला जीवनाची विलाक्षण जाणीव होते. गाण्यातील शब्द मला माझ्या मनाच्या आकाशात उंच उंच घेऊन जातात व मी ते झोके घेताना रमतो.  मला शब्दप्रभू कवींनी नेहमीच भुरळ घातली आहे.
       
लहानपणी मला मोठ्यांनी कविता वाचणे खूप आवडत असे.” काव्यवाहिनी” हे कवितांचे संकलित केलेले सुंदर पुस्तक माझ्याकडे अनेक वर्षे होते. त्या पुस्तकातूनच मला अनेक मोठ्या कवींची ओळख झाली. बालकवींची ‘ ती फुलराणी ‘ आणि केशवसुतांची ‘ तुतारी मला त्या पुस्तकात भेटली. सर्वच अर्वाचीन कवी त्या कवितेच्या पुस्तकामुळे मला परिचित झाले. वसंत बापट , ग दि माडगुळकर , विंदा करंदीकर , मंगेश पाडगावकर, ना धो महानोर , सुरेश भट, शिरीष पै आणि बा भ बोरकर ह्यांच्या  काव्य संमेलनाना मी आवर्जून गेलो आहे . 'माझे विदयापीठ' लिहिणारे नारायण सुर्वे , कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज , माधव ज्युलियन  , वा रा कांत , कवी अनिल ( कुसुमानील) , शांताबाई शेळके , इंदिरा संत असे कितीतरी कवी आणि कवियत्री ह्यांच्या कविता  मी महाविद्यालयीन जीवनातच वाचल्या होत्या.

मी औरंगाबादच्या ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी. तेंव्हा हे एकच शासकीय महाविद्यालय होते. खाजगी महाविद्यालये नुकतीच सुरु झाली होती. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे महाविद्यालय नुकतेच सुरु झाले होते. तसेच देवगिरी महाविद्यालय . ह्या नवीन महाविद्यालयांनी हुशार मुले आपल्या महाविद्यालयात यावी म्हणून आमंत्रणे पाठविली होती व काही सवलती दिल्या होत्या. सरकारी महाविद्यालयात मेरीट लिस्ट लागत असे व शिष्यवृत्ती मिळत असत. तेथे प्रवेश मिळणे अधिक महत्वाचे असे. मला ह्या महाविद्यालयात सरकारी शिष्यवृत्ती मिळाली आणि माझे शिक्षण मोफत झाले . त्यावेळी डॉ आंबेडकरांनी सुरु केलेले  मिलिंद महाविद्यालय खूप प्रसिद्ध होते. त्यांच्या प्रयोगशाळा चांगल्या होत्या. प्राध्यापक प्रसिद्ध होते. बहुतेक जण मुंबईहून आलेले होते. 

मी बी.एससी. झालो असलो तरी पदवीच्या दुसर्या वर्षापर्यंत मराठी ही माझी दुय्यम भाषा होती त्यामुळे मराठी भाषेचा अभ्यास आम्हाला कम्पलसरी होता. पण त्या भाषेची आवड निर्माण करणारे नावाजलेले मराठी प्राध्यापक आमच्या ज्ञान विज्ञान महाविद्यालयात होते. आमचे प्राचार्य होते मराठी विषयाचे  मा गो देशमुख. मराठीच्या  प्राध्यापक मंडळीत होते गो मा पवार आणि वसंत कुंभोजकर. प्रा. भगवंत देशमुखांची बदली कोल्हापूरला झाली होती. त्यावेळी  मराठी विषय घेऊन बी ए , एम. ए झालो असतो तर मराठीचा प्राध्यापक नक्कीच  झालो  असतो. त्यावेळी नव्याने सुरु झालेल्या मराठवाडा विद्यापीठात होते प्रसिद्ध समीक्षक प्रा वा ल कुलकर्णी आणि प्रा सुधीर रसाळ. शेवटी मराठीला पदवीच्या दुसर्या वर्षी सोडले पण वाचनाची आवड कायम राहिली. त्याचवेळी इंग्रजी साहित्याची आवड लावली ती डॉ मुतालिक सरांनी. ते इंग्रजीचे उत्तम प्राध्यापक होते. त्यावेळी निवडक इंग्रजी साहित्य वाचले.त्याचा नंतर उपयोग झाला 
मी विज्ञानाचा विद्यार्थी, आमचे फिजिक्सचे प्राध्यापक होते मार्तंडराव शेळगांवकर आणि उमादीकर. मार्तंडराव ह्यांचा मी आवडता विद्यार्थी. त्यांचे मार्गदर्शन खूप उपयोगी पडले. रसायन शास्त्राचे प्राध्यापक होते डॉ करंबेळकर ( Organic Chemistry ) , संपत राय( Physical Chemistry ) आणि कब्बीनवार Inorganic Chemistry). कब्बीनवार सर एन सी सी चे प्रमुख होते.आम्हाला एन. सी. सी. सक्तीची होती. मला 'B' Certificate मिळाले होते.  डॉ करंबेळकर हे उंच , धिप्पाड आणि गोरे होते. नुकतेच नागपूरहून त्यांची बदली झाली होती. ते खूप छान शिकवत असत. त्यांना  आम्ही 'देवमाणूस ' म्हणत असू. संपत राय छान शिकवत. मला केमिस्ट्री फार आवडत नसे. माझी आवड पदार्थविज्ञान. गणित हा विषय शिकवीत असत मुळे आणि देव सर. मुळे सर नुकतेच नागपूरहून आले होते. ते गणित विषय तज्ञ होते. 
माझ्या हे खूप उशिरा लक्षात आले की विज्ञान विद्यार्थ्याला सर्व विज्ञान विषयात गोडी असणे आवश्यक आहे. पुढे हे सर्व विषय एकमेकात इतके मिसळतात की आपल्याला ह्या विषयांची माहिती नसली की फार जड जाते. मी भाभा अणू संशोधन केंद्रात Radiological Physics हा अभ्यासक्रम करीत असताना मला  Chemistry विषय माहित असल्यामुळे त्रास झाला नाही पण  , Botany , Zoology , Anatomy and Physiology ह्या विषयाची कमी माहिती असल्यामुळे थोडासा त्रास झाला. Anatomy हा विषय अभ्यासक्रमासाठी आवश्यक होता त्यामुळे एक डॉक्टर तो विषय आम्हाला ३ महिने शिकवीत होता. ते जर माहित नसेल तर Use of Isotopes in Medicine हे आम्हाला काय समजणार? तसेच Use of Isotopes in Agriculture ह्या विषयासाठी Botany माहित असणे आवश्यक आहे. पुढे संशोधन करीत असताना लक्षात आले की सर्व विज्ञान शाखांची माहिती आज आवश्यक झाली आहे. तंत्रज्ञान संशोधनात ही ते अतिशय आवश्यक झाले आहे. आपण जी विज्ञान शाखा ऐच्छिक नाही तिकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच विज्ञान शाखेमुळे आपण पुढील शिक्षण - संशोधन करताना अडकून पडतो. सर्व विषयाचे  बर्यापैकी ज्ञान असणे आवश्यक आहे.     
महाविद्यालयात असतानाच माझे वाचन चालूच असे . त्यावेळी मराठीचे पांच लघुकथाकार हे पुस्तक आम्हाला अभ्यासक्रमाला होते. त्यामुळे  अरविंद गोखले , वामन चोरघडे , व्यंकटेश माडगुळकर, गंगाधर गाडगीळ ह्यांच्या कथांची ओळख झाली. नंतर व पु काळे ह्यांनी आपला ठसा उमटविला होता.त्याकाळात अरविंद गोखले आघाडीचे कथाकार होते . त्यांचा ‘ मंजुळा ‘ हा कथासंग्रह खूप आवडला होता. वामन चोरघडे ह्यांच्या कथा वेगळ्या वळणाच्या होत्या. व पु काळे ह्यांचे  कथाकथनाचे एकपात्री प्रयोग जोरात चालू होते . द मा मिरासदार ह्यांचे विनोदी कथावाचन म्हणजे एक हास्याचा धबधबा होता. ते औरंगाबादेतील एका महाविद्यालयात होते. नंतर मराठी साहित्यात भुरळ पाडली ती पु शि रेगे ह्यांच्या कवितेने आणि त्यांच्या वेगळ्या असलेल्या कथेने. रेगे ह्यांचा ‘ मनवा ‘ हा कथासंग्रह भुरळ घालणारा होता.'मनवा' ह्या कथा संग्रहातील मनू ह्या नावामुळेच मी माझ्या मोठ्या मुलीला ‘ मनू’ ह्या नावाने हाक मारीत असे. तिचे शाळेतील नांव होते  ‘ क्षितिजा’ . ते घेतले बां भ बोरकरांच्या कवितेवरून . त्या  कवितेच्या ओळी  आजही मला पाठ आहेत. त्या अशा ..
 "ज्वालांच्या पंखांनी गगनाला भिडत रहा ,
 प्राणांच्या दिप्तीतून क्षितिजाचे स्वप्न पहा". 
ह्यातील 'क्षितिजा' मला खुणावीत होती. माझ्या दुसर्या मुलीचे नांव “ ऋतुगंधा”. हे ही नांव मी मला कोणाच्या तरी कवितेवरून असेच सुचले आहे. 
                
अनेक कविता मला मोहित करून गेल्या. कविता हा प्रकार मला एकट्याला एकांतात आनंद देणारा साहित्य प्रकार वाटतो. गाणे आवडते ते त्यातील शब्द माधुर्यामुळेच. कवितेमुळे मला जीवनाचे तत्वज्ञान समजू लागते. ज्ञानेश्वर आवडतात ते त्यांच्या काव्यप्रतीभेमुळेच. तुकोबा तर खूप सोपा. सहज समजणारा कवी. रामदास ही आवडतात ते जीवन तत्त्वज्ञानामुळे. बहिणाबाईची गाणी पुन्हापुन्हा ऐकावीशी वाटतात. मी लहानपणी माझा आजींची जात्यावरची गाणी ऐकत असे .इतक्या सहजपणे ती आमची नांवे ओव्यात गोवून गात असे व ते अर्थपूर्ण शब्द आम्हाला खूप मोहित करीत असत. सरोजिनी बाबर ह्यांनी ह्या लोकगीतांचा प्रचंड अभ्यास केला . शांताबाई शेळके ह्यांनी त्यावर खूप छान लिहिले होते. माझे शाळेतील शिक्षक प्रभाकर मांडे आम्हां मुलांना 'आजीकडून जात्यावरची गाणी लिहून आणा' असे सांगत असत. आम्ही ती गाणी लिहून आणून त्यांना देत असू. त्यांनी त्याविषयावर अनेक वर्षे संशोधन केले. त्या जात्यावरच्या गाण्यांत गेयता होती. त्यात मराठी स्त्री जीवनाचे सुंदर चित्रण होते. त्या गाण्यात स्त्रियांची वेदना व्यथित केलेली असे. त्या गाण्यातून माहेरी आलेल्या मुलींचा ओसंडून वाहणारा आनंद दिसत असे. तिचा सासूने केलेला छळ व्यक्त होत असे. ती जात्यावरची गाणी त्या स्त्रिया गात असतांना त्या स्त्रियांना  दळण दळण्याचे शारीरिक कष्ट जाणवत नसावेत कारण ते दु:ख विसरण्यासाठीच त्या ती जात्यावरची गाणी गात असाव्यात. बहिणाबाईचाची गाणी त्यामुळेच आवडत असत.अशा  असंख्य बहिणाबाई लिहिता येत नसल्यामुळे त्यांची असंख्य गाणी शब्दांकित झाली नाही आणि आपण ह्या साहित्याला मुकलो असे मला वाटते .
       
महाविद्यालयात असतानाच माझे चौफेर वाचन चालू असे. त्यावेळचे फडके – खांडेकर विलक्षण आवडणारे लेखक होते . मला फडके फारसे आवडत नसत पण खांडेकरांची सुभाषिते माझ्या वह्यांच्या पहिल्या पानावर लिहिलेली असत. फडके हे तारुण्यसुलभ भावना व्यक्त करणारे लेखक. हिंदी सिनेमा नंतर आला. प्रेमी युगुलांच्या गोष्टी फडक्यांनी हिंदी चित्रपटासारख्याच रंगविल्या. त्यांचे हिरो देवानंद सारखेच आकर्षक व्यक्तिमत्वाचे होते. त्यांच्या कादंबर्या खूप वाचल्या. त्यांची शैली बहारदार होती. वाचताना वाचक Romantic अवस्थेत जात असे. 

त्याचवेळी मी विवेकानंद आणि सावरकर ह्यांचे वाचन केले. सावरकरांची ‘ माझी जन्मठेप ‘ ३-४ वेळा वाचली असेल. '१८५७ चे बंड नव्हे युद्ध' ह्या विषयावरचे  पुस्तक देशप्रेमाचे स्फुलिंग फुलवीत असत. सावरकरांची विज्ञानवादी भूमिका तर्कावर आधारलेली होती. ते खरे समाजसुधारक होते. त्यामुळे मला नवा विचार आणि दृष्टी मिळाली. धर्माचे अवडंबर मनाने झिडकारून दिले. धार्मिक चालीरीतीवरचा विश्वास उडाला. त्यावेळी गांधी विशेष समजले नव्हते. ते फार उशिरा लक्षात आले. मी नेहरूच्या प्रेमात पडलो ते ‘आनंदभुवन ‘ हे गोपीनाथ तळवलकरांचे पुस्तक अभ्यासक्रमात अभ्यासिले म्हणून. विज्ञानवादी नेहरू आजही मला नव्या भारताचे खरे शिल्पकार वाटतात. आज सगळेच संदर्भ बदलले आहेत. त्यावेळी नेहरू – गांधी – सरदार – सावरकर हे सारेच वंदनीय होते आणि आजही आहेत. गांधी – नेहरू – सरदार ह्यांच्यातील फरक मला अलीकडे जाणवला तो विजय तेंडूलकर ह्यांचे  ‘ सरदार ‘ हे पुस्तक वाचल्यानंतर .
       
माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात माझे चौफेर वाचन चालू असे. मी सर्व वर्तमान पत्रे आवर्जून वाचत असे रविवारच्या पुरवण्या वाचल्याच पाहिजेत असे मला वाटत असे. बळवंत मोफत वाचनालयात माझे रोज २-३ तास तरी जात असत.
        
औरंगाबादेत राजकीय आणि सामाजिक नेते मंडळी आली की त्यांची व्याख्याने होत असत. एस एम जोशी , आचार्य अत्रे , तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी , नाथ पै , अनंत काणेकर , श्रीपाद अमृत डांगे ,हमीद दलवाई , नरहर कुरुंदकर , जगन्नाथराव जोशी , गोळवलकर गुरुजी , बाबासाहेब पुरंदरे , पु ल देशपांडे अशा कर्तृत्ववान व्यक्तींची भाषणे ऐकली. मिरासदार अभाविपचे अध्यक्ष होते. बाबासाहेब पुरंदरे ह्यांची शिवाजीवरची व्याख्याने त्यांनी दरवर्षी आयोजित केली होती. त्यांनी एकेवर्षी वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात एक विद्यार्थी शिबीर आयोजित केले होते. त्या शिबिराला ३ दिवस आमच्याबरोबर सुधीर फडके , बाबासाहेब पुरंदरे आणि द मा मिरासदार उपस्थित होते. तो एक अनोखा अनुभव होता .   मी विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे डॉ होमी भाभा , मेघनाद सहा ह्या शास्त्रज्ञांचे विचार समजावून घेतले.

मी वादविवाद स्पर्धेत भाग घेत असे. रानडे वादविवाद स्पर्धेत मला दुसरे पारितोषिक मिळाले होते. वादविवादाचा विषय होता ' केंद्र सरकारने सूचित केलेल्या त्रि-भाषिक सूत्राने सांप्रतच्या परिस्थितीत देशाचा भाषिक प्रश्न सुटू शकेल?'. 
        त्यावेळी नियतकालिकांचा जमाना होता. ‘ माणूस ‘ , ‘सोबत’ , ‘ साधना ‘ , ‘मनोहर’, ‘किर्लोस्कर ‘, ‘ ‘किस्त्रीम ‘ह्यांचे वाचन म्हणजे  हा बौद्धिक आनंद असे. ‘माणूस’ मधील विजय तेंडुलकराचे ‘ रातराणी ‘  तर ‘सोबत ‘  मधील माधव मनोहर ह्यांची नाट्यपरीक्षणे  ही माझी आवडीची सदरे होती. रवींद्र पिंगे हे सुद्धा ‘माणूस ‘ मधून सुंदर लिहित असत. 

द्वा भ कर्णिक ह्यांचे महाराष्ट्र टाईम्समधील 'काय सांगू तुम्हाला' हे सदर छान होते. त्यानंतर गोविंद तळवलकरांच्या चौफेर विचारांची ओळख झाली. लोकसत्तेतील ह रा महाजनी ह्यांची ‘ रविवारची चिंतनिका’ आवडत असे. ‘ मराठा’ आणि ‘ नवयुग ‘ चा मी नियमित वाचक होतो. आचार्य अत्रे ह्यांचा fan होतो. अत्रे – फडके वाद जसा आठवतो तसाच प्रबोधनकर ठाकरे आणि अत्रे वाद खूप गाजला होता .अत्रे – मोरारजी देसाई , अत्रे – स का पाटील ह्या राजकीय लढाया रंगल्या होत्या.  साम्यवादी विचारांचे ‘ब्लिट्झ’ चे करंजिया आवर्जून वाचत असे. नेहमीच लक्षात राहते ती अनंत भालेराव ह्यांची निर्भय पत्रकारिता. त्यांचा ‘मराठवाडा’ प्रादेशिक असला तरी म टा – लोकसत्तेपेक्षा अधिक धारदार होता. कारण ते 'पत्र नव्हते तर शस्त्र' होते. अनंतराव ह्यांचे संपादकीय हे लोकमान्य टिळकांची आठवण करून देणारे असे. त्यांच्या लेखणीची धार तीक्ष्ण असे. अनंतराव ह्यांच्या ‘ मराठवाड्या ‘ने आम्हाला वैचारिकता दिली. समृद्ध केले.

       मी त्याकाळात अनेक साहित्य संमेलनाला गेलो. औरंगाबाद , जालना , हैद्राबाद , भोपाळ येथील मराठी साहित्य संमेलने पाहिली . साहित्याचा आस्वाद घेतला. नंतर मात्र माझा उत्साह कमी झाला व इतर महत्वाच्या कामामुळे जाणे सोडून दिले. ह्या संमेलनावर मी वार्तापत्रे लिहिली होती.

मला आठवते ते  जालन्याला झालेले मराठी विज्ञान संमेलन. अध्यक्ष होते जयंत नारळीकर. त्यांनी मराठीतून विज्ञानावर केलेले इतके सुंदर भाषण मी पहिल्यांदाच ऐकले होते. त्या भाषणात त्यांनी एकही इंग्रजी शब्द वापरला नव्हता. ते भाषण आजही माझ्या लक्षात  आहे.
       मी नाटकवेडा होतो. मुंबईत शिक्षणासाठी गेल्यानंतर मी खूप नाटके बघितली . त्याबद्दल मी पूर्वीच्या ब्लॉगमध्ये सविस्तर लिहिले आहे. 

Sunday, July 12, 2020

मी असा घडलो : ३

माझा एकेकाळचा विरंगुळा : नाटक 
मी मुंबईत आलो ते १९६९ साली. माझे विद्यार्थी जीवन म्हणजे तसे मुंबई ह्या गर्दीच्या शहरातील एक एकाकलेपण होते. माझे युडीसीटीचे ते दिवस. माझे संशोधनाचे काम जोरात सुरु केले होते . जवळच हॉस्टेल असल्यामुळे केंव्हाही प्रयोगशाळा किंवा लायब्ररीत जाणे सहज शक्य असे . आपणच ठरवायचे केंव्हा आणि कुठे जावून बसायचे. १०-१२ तास तरी कामासाठी सहज देता येणे शक्य असे. तशी कामांत लवचिकता असे. आमच्या सरांच्या बरोबर चर्चासत्र चालू होत असे ते संध्याकाळी ५ ते ८.  दिवसभर केलेल्या शास्त्रीय प्रयोगावर चर्चा होत असे , उद्या काय करायचे ह्याची चर्चा आणि लायब्ररीत जावून आपल्या विषयाशी संबंधित काय संशोधन चालू आहे ह्याचा शोध किंवा नवे काय शोधता येईल ह्याचाही  शोध चालू असे. ती एक धुंदी असते. डोक्यात विचारांचे चक्र चालू असते . आजूबाजूला फिरतानाही डोक्यात तेच विचार चालू असत.

ही संशोधन अवस्था म्हणजे आपल्यातील हरवलेल्या माणसासारखी असते. माणूस एकाकी होत असतो. हॉस्टेलवर राहणारी मुले अशीच एकाकी असतात. आपला रुममेट जर आपल्यासारखाच संशोधक असेल तर दोन वेडी मुले एका खोलीत त्यांच्या विश्वात हरवलेली असतात.


  मी माझा विरंगुळा शोधून काढला . माझा विरंगुळा होता नाटक बघणे. नवा नवा नाट्यानुभव घेणे ह्याची मला नंतर सवंय लागली . त्यावेळी मराठी रंगभूमी खूपच जोरात होती. मी रहात होतो माटुंगा – किंग सर्कलला. जवळचे नाट्यगृह होते शिवाजी मंदिर , दादर. त्यामुळे रात्रीचा प्रयोग पाहणे सहज जमत असे. शनिवार – रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी मी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यगृहात जात असे. बिर्ला मातोश्रीला कधीकधी चक्कर होत असे. नंतर एनसीपीएला जावू लागलो. प्रायोगिक नाटकासाठी तेजपाल ,एनसीपीएला जावेच लागे . नंतर छबिलदासची नाट्यचळवळ  सुरु आली. ते सभागृह (?) तसे जवळच होते. माझे जवळचे मित्र मला शोधण्यासाठी मी कोणत्या नाटकाला गेलो असेल ह्याचा अंदाज घेऊन त्या सभागृहात येत असत. इतका मी नाटकवेडा झालो होतो. त्यावेळची बहुतेक प्रायोगिक नाटके मी आवर्जून पाहिली. सहसा आम्ही २-३ मित्र बरोबर असू. नाटक नसेल तर चर्चगेट – फोर्टला एखादा इंग्रजी सिनेमा बघण्याचे ठरविलेले असे. त्यावेळी फार मोजके हिंदी सिनेमा मी बघितले असतील.  १९६० साली विजय तेंडूलकर , विजया मेहता आणि श्रीराम लागू ह्यांनी 'रंगायन' ही संस्था प्रायोगिक नाटकाकरिता सुरु केली होती. ६९ -७० च्या काळात 'रंगायन' ची अनेक नाटके प्रायोगिक रंगभूमीवर आली होती. त्यानंतर 'रंगायन' ही संस्था फुटली आणि अरविंद देशपांडे , सुलभा देशपांडे आणि विजय तेंडुलकरांनी  'अविष्कार' ही नवी संस्था उभी केली.  

१९६९-७६ च्या काळात व्यावसायिक रंगभूमी आणि समांतर अशी प्रायोगिक रंगभूमी ह्यांना थोडे बरे दिवस आले होते. व्यावसायिक नाटकात बाळ कोल्हटकर आणि वसंत कानेटकर ह्यांची नाटके जोरात चालत होती तर प्रायोगिक रंगभूमीवर विजात तेंडूलकर पुढे होते. त्यांनी मराठी नाटकाला भारतीय रंगभूमीवर नेले. मी दोन्हीही प्रकारच्या  नाटकांना जात असे. मुंबईच्या प्रायोगिक रंगभूमीवर त्याच वेळी बादल सरकार ( बंगाली ) , मोहन राकेश ( हिंदी ), आणि गिरीश कर्नाड ( कन्नड ) ह्यांची नाटके सादर होत होती. सत्यदेव दुबे आणि विजया मेहता हे  प्रामुख्याने ह्या चार नाटककारांची नाटके सादर करीत होते. बादल सरकार ह्यांचे ' एवं इंद्रजीत ' आणि ' पगला घोडा ' ही नाटके मी पाहिली आहेत . तर मोहन राकेश ह्यांचे ' आधे अधुरे ' आणि ' आषाढ का एक दिन ' हे आवर्जून बघितले . गिरीश कर्नाड ह्यांची नाटके सुरुवातीला  पौराणिक कथावर  (Mythology)  आधारित असायची. त्यावेळी विशेष गाजले ते '  हयवदन' . त्यानंतर 'ययाती ' , 'तुघलक' , नागमंडल' ही नाटके सादर झाली. 'वेडिंग अल्बम' हे नंतरच्या काळात बघितलेले उल्लेखनीय नाटक. आधुनिक भारतीय रंगभूमीचे प्रमुख स्तंभ विजय तेंडूलकर , मोहन राकेश, बादल सरकार आणि गिरीश कर्नाड . त्यांच्या नाटकांना सादर करणारे दिग्दर्शक होते सत्यदेव दुबे.  ते विशेष गाजले ते धर्मवीर भारती ह्यांच्या ' अंधायुग ' ह्या  नाटकला प्रायोगिक रंगभूमीवर सादर केल्यामुळे . त्यांनी वर उल्लेख केलेल्या चारही नाटककारांची नाटके दिमाखात सादर केली होती आणि त्यामुळे प्रायोगिक रंगभूमी खूप गाजू लागली होती.. त्यांच्या नाटकातूनच अनेक मोठे कलाकार रंगभूमीला मिळाले.     

त्याचवेळी  ‘अश्रूंची झाली फुले’. ‘घरात फुलाला पारिजात ‘, ‘ रायगडला जेंव्हा जग येते’ ही वसंत कानेटकरांची नाटके गल्ला भरत होती. काशिनाथ घाणेकर हे त्यावेळचे लोकप्रिय कलाकार होते. त्याच काळात विजया मेहता , श्रीराम लागू ही प्रायोगिक रंगभूमीची मंडळी व्यावसायिक रंगभूमीवर आली आणि नाटकांचा दर्जा अधिक वाढला .” हिमालयाची सावली “ ह्या वि वा शिरवाडकरांच्या नाटकात श्रीराम लागू आणि शांत जोग गाजल्या. श्रीराम लागू आणि दत्ता भट ह्यांची तुलना नंतर होऊ लागली. जयवंत दळवींचे ‘ संध्याछाया’ खूपच गाजले ते श्रीराम लागू आणि शांता जोग ह्यांच्यामुळेच. ती जोडी खूप प्रसिद्ध झाली. महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेतून 'काळे बेट लाल बत्ती’ मुळे  मधुकर तोरडमल पुढे आले आणि त्यानंतर त्यांची सर्वच नाटके खूप गाजली. ‘श्री ना पेंडसे ह्यांच्या गाजलेल्या कादंबर्यांची नाटके रंगभूमीवर आली. ‘ गारंबीचा बापू ‘ काशिनाथ घाणेकरांनी जोरात सादर केला. श्री ना पेंडसे ह्यांना एकदा विचारण्यात आलं होतं , ‘ तुमची आवडती कलाकृती कोणती ?’, त्यांनी पटकन उत्तर दिले ‘ लव्हाळी ‘. मी महाविद्यालयात असताना मला आवडलेली ती एक चांगली कादंबरी. ती नाट्यरूपाने प्रसिद्ध झाली नाही. 
  
त्याच वेळी मराठी संगीत नाटकांची मोठी ल'हर आली. वसंत कानेटकरांचे ‘ मत्सगंधा’ खूप गाजले. पं जितेंद्र अभिषेकी , रामदास कामत ह्यांनी आपला ठसा उमटविला. ‘कट्यार काळजात घुसली ‘ हे  पुरूषोत्तम दारव्हेकरांचे नाटक.  प्रभाकर पणशीकरांच्या नाट्यसंपदाने  ते जोरात सादर  केले. पं जितेंद्र अभिषेकी ,पं वसंतराव देशपांडे आणि फैयाज ह्यांनी  त्या नाटकांत श्रोत्यांची मने जिंकून घेतली . त्यांची ती  नाट्यपदे आजही अनेकजण गुणगुणत असतात. ‘ हे बंध रेशमाचे ‘ हे रणजीत देसाई ह्यांचे नाटक त्याच काळात गाजले. त्या नाटकातील आठवणीतील गाणी आजही घराघरात सीडीमुळे ऐकावयास मिळत असतात. मराठी नाट्यसंगीत हे त्यातील अवीट गोडीमुळे मन उल्हासित करीत असते. हे मोठे कलाकार जेंव्हा रंगभूमीवर ती गाणी सादर करीत असत तेंव्हा ते  बघणे आणि त्यांना ऐकणे हा एक वेगळा आनंद मला  मिळाला. ह्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.  

पु ल देशापडे तर विनोदाचे बादशहा. ‘ बटाट्याची चाळ ‘ आणि वार्यावरची वरात ‘ जोरात गल्ला जमवीत होते. शिवाजी मंदिरला चार तास रांगेत उभे राहून तिकीट काढायची वेळ माझ्यावर पहिल्यांदाच आली. त्यावेळी शिवाजी मंदिरची नेहमीची तिकिटे होती रुपये ५,३ आणि २ .’ पु ल च्या प्रयोगाला थोडे अधिक पैसे द्यावे लागत असत व बराच वेळ रांगेत उभे राहून तिकीट काढावे लागत असे. त्यांचे  'असा मी असा मी ‘ हे नाटक मात्र  मी रवींद्र नाट्य मंदिरात  बघितले. रवींद्र हे चांगले सभागृह आहे असे मला वाटते. ते थोडे सोयीचे नाही. 

अशाच एका महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत विजय तेंडुलकरांचे ‘ अशी पाखरे येती ‘ हे नाटक खूप गाजले. जब्बार पटेल त्या नाटकातून पुढे आले. त्यावेळी ते प्रमुख कलाकार होते. त्यांनी फार सुंदर भूमिका वठवली होती. नंतर मी त्यांना कलाकार म्हणून बघीतले नाही. ते नंतर प्रसिद्ध दिग्दर्शक झाले.   ते रंगभूमीवर आले ते  ह्याच नाटकामुळे. विशेष म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर हे नाटक छान चालले. चि. त्र्यं खानोलकर ह्यांचे ‘ अवध्य ‘ हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेतून गाजले. मी त्याचा प्रयोग रंगभवनमध्ये बघीतला होता. त्त्यानंतर हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आले. तिकडे प्रायोगिक रंगभूमी विजय तेंडूलकर ह्यांच्या नाटकामुळेच पुढे येत होती. ‘ शांतता कोर्ट चालू आहे ‘, ‘गिधाडे ‘, ‘घाशीराम कोतवाल’ ही नाटके मराठी रंगभूमीला जागतिक पातळीवर नेत होती. ‘ पाहिजे जातीचे’ हे खूप नंतरचे नाटक छबिलदासच्या प्रायोगिक रंगभूमीवर पाहिले. त्यांत नाना पाटेकर हिरो होता. ती त्याची सर्वात चांगली भूमिका .तसा नाना पाटेकर  मी पुन्हा पाहिला नाही,  


खानोलकरांचे ‘ एक शून्य बाजीराव ‘ त्याच काळात आलं. प्रायोगिक नाटकांचे प्रयोग तेजपाल सभागृहात होत असत. नंतर ते एन सी पी ए च्या छोट्या सभागृहात होत असत. नंतर ते छाबिलदसला  होऊ लागले. ‘गिधाडे’ चा सुन्न करणारा प्रयोग मी  तेजपालला बघितला होता. त्यात श्रीराम लागू , दीपा , अमोल पालेकर , मीना नाईक  , अमरीश पुरी ही नट मंडळी होती. नाटक हा  इतका  सुन्न करणारा प्रकार आहे, हे मला पहिल्यांदा बघायला मिळाला . ‘ अशी पाखरे येती ‘, हे नाटक लिहिणारे विजय तेंडूलकर ते हेच का ? असा मला प्रश्न पडला. त्याच काळात सत्यदेव दुबे ह्यांची हिंदी नाटके तेजपालमध्य आवर्जून पाहिली. हा एक नाट्यक्षेत्रातला भन्नाट माणूस जवळून पाहिला. ‘ स्टील फ्रेम ‘ हे नाटक आजही आठवते. त्यातील अमरीश पुरींची भूमिका अफलातून होती . हा अमरीश पुरी पुढे हिंदी सिनेमात गेला . तो त्या भूमिकात मला कधीच आवडला नाही.अमोल पालेकर, श्रीराम लागू आणि अमरीश पुरी ह्यांचा तो सुरुवातीचा काळ होता . त्यावेळी ही मंडळी नवे प्रयोग करीत असत. ते रंगभूमीवर धडपडत होते. नंतर ते तिघेही हिंदी सिनेमात मिळेल ती भूमिका का करत होते?  , हे मला कधीच समजले नाही . शेवटी पैसा हा हवाच असतो कलाकारांना . आधी प्रायोगिक, मग  व्यावसायिक आणि शेवटी हिंदी सिनेसृष्टी असा त्यांचा प्रवास होता . खर्या अर्थाने ह्या कलाकारांनी त्यावेळी मराठी रंगभूमी गाजविली.,

वसंत कानेटकर आणि बाळ कोल्हटकरांचा सुरुवातीचा काळ. ताई –माई ह्यांना रडताना बघायला जायचे काय ? असे काही जण म्हणत असत. नंतर माझ्या लक्षात आलं की बाळ कोल्हटकरानी लोकांना त्यावेळी जे आवडते तेच सादर करून वाहवा मिळविली. तसे त्यांना रंगभूमीवर बघणे खूप आनंददायी होते. त्यांचा ' वाहतो ही दुर्वांची जुडी ' ह्या नाटकाचा  प्रयोग जोरात गर्दी खेचत असे. त्यांनी ३० नाटकातून काम केलं होतं . वसंत कानेटकर आणि प्रभाकर पणशीकरांनी एक स्वतःचे गणित जमवून अनेक सुंदर नाटके सादर केली व नाट्यव्यवसाय तेजीत आणला.  बहुधा हे बघूनच प्रायोगिक नाटकातील मंडळी म्हणजे  विजयाबाई – श्रीराम लागू ह्यांच्या सारखे कलाकार  व्यावसायिक  रंगभूमीकडे वळले असावेत . सुरुवातीला व्यावसायिक रंगभूमीकडे फटकून वागणारी ही मंडळी नंतर तिथेच रमली. वसंत कानेटकरांची एकामागून एक नाटके येत गेली पण त्यात तोच तोपणा अधिक होता . ‘अश्रूंची झाली फुले’ पाहिल्यावर ‘ घरात फुलला पारिजात’ चा प्रयोग मला तरी आवडला नाही. तसेच ‘ रायगडला जेंव्हा जाग येते ‘ नंतरची त्यांची ऐतिहासिक  नाटके मला फारशी आवडली नाहीत. 'मागणी तसा पुरवठा' हे कानेटकरांचे व्यावसायिक गणित असावे. अर्थात त्यातूनही त्यांनी अनेक सुंदर नाटके रंगभूमीला दिली हे निर्विवाद. 


जयवंत दळवी ह्यांची एकामागून एक उत्कृष्ट नाटके व्यावसायिक रंगभूमीवर येण्यास सुरुवात झाली होती. त्यात सर्वात गाजले ते 'संध्याछाया'. विजया  मेहता ह्यांचा सुंदर अभिनय. विजयाबाईंनी दिग्दर्शित केलेली अनेक नाटके त्यावेळी  गाजली. मला विशेष आवडलेली त्यातील काही नाटके : चक्र , महासागर , नातीगोती आणि पुरुष. पुरुष ह्या नाटकातील नाना पाटेकर आणि रीमा लागू ह्यांच्या भूमिका अप्रतिम होत्या. दिलीप प्रभावळकर ह्याचा ' नातीगोती ' तील  अभिनय सुरेख होता . त्यावेळी विजया मेहता ह्यांनी व्यावसायिक रंगभूमीला खूप उंचावर नेऊन ठेवले . 'हमीदाबाईंची कोठी  ', 'अजब न्याय वर्तुळाचा , चि त्र्यं खानोलकर ह्यांचे ' एक शून्य बाजीराव' , आणि नंतर  'रावसाहेब' . काही नाटके १९८० च्या नंतरची. विशेष लक्षात राहिली त्यापैकी काही नाटके : 'पुरुष', 'बॅरिस्टर' आणि 'मला उत्तर हवंय'. रंगायननंतर विजयाबाईंनी व्यावसायिक रंगभूमीला अधिक दर्जेदार केले ह्यात वाद नाही. त्यांनी 'झिम्मा' ह्या त्यांच्या आत्मचरित्रात अनेक गोष्टीचा उल्लेख केला नाही असे मला वाटते. ते पुस्तक वाचताना त्यांनी काहीतरी हातचे राखून ठेवले आहे असे मला वाटत राहिले. 

त्याचवेळी प्रायोगिक चित्रपट जमाना सुरु झाला. प्रायोगिक रंगभूमीवरचा नट अमोल पालेकर हिंदी सिनेमात गाजला तो ‘ रजनीगंधा’ ह्या चित्रपटामुळे. एक सुंदर चित्रपट. त्याचवेळी ‘ ‘भुवन सोम’ आणि ‘ सारा आकाश ‘ ह्या दोन प्रायोगिक चित्रपटांनी बहार उडवून दिली होती. निखळ आनंद देणारे हे चित्रपट माझ्या कायमचे लक्षात राहिले आहेत. तेंडुलकरांनी ‘ माणूस' मधील त्यांच्या ' रातराणी ' ह्या  सदरात लिहिले होते , ‘कलाकृती अशी असावी की ती पाहिल्यानंतर घरी घेऊन जावी अशी वाटावी’. हे चित्रपट इतके सुंदर होते की ते कायमचे लक्षात राहतात. ‘ अशी पाखरे येती ‘ असो का  ‘ सारा आकाश ‘ . ह्या कलाकृती निखळ आनंद देणाऱ्या होत्या . काही दिवसांनी मी दादरच्या ‘ चित्रा’ ह्या सिनेमात बघितला सत्यजित रे ह्यांचा ‘ पथेर पांचाली’. हा दिग्दर्शक आपला वेगळा ठसा उमटविणारा होता. 
Our generation is born frustrated ‘  हे त्यांच्या चित्रपटातील नायकाच्या तोंडी ऐकलेले वाक्य मला नेहमीच आठवत असे. तेंव्हा मी खरोखरच frustrated student होतो. एकंदर त्या चित्रपटाचा झालेला परिणाम  आजही  मला अनेकदा आठवतो.

१९९० नंतर माझी नाटककार विजय तेंडुलकरांची चांगली ओळख झाली. त्यांचे 'रामप्रहर' मी प्रकाशित केले होते. त्यांच्या घराजवळच माझं कार्यालय होते. त्यामुळे त्यांच्या अनेक भेटी झाल्या. अनेकदा  त्यांच्याबरोबर गप्पा मारण्याची संधी मिळाली. अशाच एका गप्पात मी त्यांना विचारलं , ' तुम्ही अलीकडे नाटक का लिहीत नाही ?'. तेंव्हा ते मला म्हणाले , ' नाटक हे एकट्या लेखकाचे नसते. त्यात दिग्दर्शक असतो. निर्माता असतो. कलाकार असतात. आपण जे नाटक लिहितो  त्यात खूप बदल केले जातात. ते सर्व आपल्याला आवडतातच असे नाही. काही नाटककारांना तर ते आपणच लिहिले आहे का ? असा प्रश्न पडतो. मला हे फारसे पटत नाही. म्हणून मी ते लिहिणे सध्यातरी थांबवले आहे .लिहीन . मनांत येईन तेंव्हा.' हे त्यांचे म्हणणे खरे आहे. शेवटी नाटक गाजते ते अनेक कारणामुळे. कधी दिग्दर्शकामुळे तर कधी नटामुळे . ते सामूहिक यश असते. त्यानंतर त्यांनी ' सरदार' ह्या चित्रपटासाठी स्क्रिप्ट लिहिले होते. सिनेमा निर्मात्यांकडे गेला होता. चित्रपट तयार होऊन प्रदर्शित होण्यासाठी वेळ लागणार होता. त्यांनी त्या स्क्रिप्टचे पुस्तक आधी प्रकाशित केले. त्यांना स्क्रिप्टमध्ये बदल होऊ नयेत व आपण संशोधन करून जे लिहिले आहे त्यात कसलेही बदल होऊ नयेत असेच वाटत असल्यामुळे ' सरदार ' हे पुस्तक त्यांनी  प्रथम प्रकाशित केले. मी त्या प्रकाशन समारंभाला गेलो होतो. त्या पुस्तकाची प्रत त्यांनी मला दिली होती. ते पुस्तक मी अनेक वेळा वाचले आहे . मला 'गांधी - सरदार - नेहरू' ह्या त्रयींच्या संबंधाबद्दलची इतकी सुंदर माहिती कुठेही बघायला मिळाली नाही. नंतर सिनेमाही आला. त्यात फारसे बदल नव्हते.पण स्क्रिप्टच इतके सुंदर लिहिले होते की त्यात बदल करणे शक्य नव्हते. नाटक असो का चित्रपट , कलाकृती कशी असावी ? तर ती अशी असावी. 


       त्या आठ-दहा वर्षात आणि नंतरही  मी खूप चांगली नाटके पाहिली. त्यावेळी धडपडणारी कलाकार मंडळी पाहिली. नंतर ती खूप मोठे कलाकार झाली. माझ्या जुन्या डायर्या बघितल्या तर त्यांत मी केलेल्या अनेक नोंदी सापडतात. दिवसभर संशोधनात बुडवून घेतल्यानंतर अशा नाटक आणि चित्रपटात मी मन रमविले आणि जगण्याचा नवा अर्थ मला समजत गेला .  ह्या कलाकृती आणि कलाकारांनी माझे जगणे सुसह्य तर केलेच पण  माझ्या जगण्याला नवा अर्थ  दिला . जीवन समजून घेण्यासाठी नाटक उपयोगी पडते. आजूबाजूची माणसं त्यात दिसून येतात. त्यांचे ताणतणाव समजतात. नाटक हा एक आनंद देणारा कलाप्रकार आहे.     
   

Tuesday, July 7, 2020

असा मी घडलो : प्राध्यापक , संशोधक , तंत्रज्ञ आणि उद्योजक


डॉ नरेंद्र गंगाखेडकर 
१९६८ साली मी मराठवाडा विद्यापीठातून एम.एससी. पदार्थविज्ञान ह्या विषयात प्रथम श्रेणीत सर्व विद्यार्थ्यात दुसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. आमची विद्यापीठाची दुसरी Batch. परभणीच्या कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीनिवासन ह्यांनी त्यापूर्वीच माझी मुलाखत घेतली होती. रिझल्ट लागला की लगेच ये . तुला नेमणुकीचे पत्र मिळेल’,  असे त्यांनी मला स्पष्टपणे  सांगितले होते. रिझल्ट लागला आणि मी लगेच परभणीला गेलो आणि त्यांना भेटलो. त्यांनी दुपारीच नेमणूक पत्र दिले व दुसरे दिवशी प्राध्यापक म्हणून कृषी महाविद्यालयात रुजू झालो. त्यांनी मला राहण्यासाठी निवासही दिला .
परभणी हे माझे आजोळ. सगळे नातेवाईक तेथेच रहातात. माझा मोठा भाऊ रवी हा तेथेच मराठवाडा विद्यालयात शिक्षक होता . त्याचे तेथे घर होते. आजोळची बरीचशी  मंडळी परभणी येथेच स्थायिक होती.पण मी कृषी महाविद्यालयातील निवासातच राहिलो .
आमचा पदार्थविज्ञान विभाग Agriculture Engineering विभागाच्या प्रोफेसर घरत सरांच्या हातात होता. ते एक नावाजलेले प्राध्यापक होते . माझा विषय पहिल्या दोन पदवीपूर्व वर्गासाठी होता . पदव्युत्तर मुलांच्यासाठी Agriculture Physics आणि Soil Physics हे विशेष विषय होते. मला ते शिकवायचे होते. पदार्थविज्ञानाची वेगळी प्रयोगशाळा होती. मी त्यांत रमलो होतो . तसे माझे मन परभणीत रमणारे नव्हते.
स्टेशन रोडच्या एका हॉटेलमध्ये एका संध्याकाळी मित्राबरोबर चहा पीत असताना TOI च्या जाहिराती वाचत बसलो होतो. बीएआरसीची एक जाहिरात बघितली. नव्या पदव्युत्तर विद्यार्थ्यासाठी एका ट्रेनिंग कोर्ससाठी अर्ज मागविण्यात आले होते. मी दुसरे दिवशीच त्यासाठी अर्ज केला. एक महिन्यांनी मला मुलाखतीला बोलावण्यात आले. जेमतेम मी दोन अडीच महिने त्या महाविद्यालयात असेल. तेथे रमलो होतो. Agriculture Physics/ Soil Physics ह्या विषयांशी माझी ओळख झाली होती व ते विषय शिकवणे सुरु केले होते.
मुंबईला मुलाखतीला गेलो आणि मुलाखतीनंतर १५ दिवसात माझी निवड झाल्याचे पत्र मला  मिळाले आणि सप्टेंबरमध्ये कोर्स सुरु होणार आहे असे कळविले होते. हा कोर्स होता Diploma in Radiological Physics ( DIP.R.P). सर्व भारतातून विद्यार्थी निवडले गेले होते. महाराष्ट्रातून आम्ही ३ जण  होतो.  त्यात मुंबईचा रामनाथन होता. प्रत्येक राज्यातून एक किंवा दोन विद्यार्थी होते. हा कोर्स होता – Use of Radio Isotopes in Medicine, Agriculture, Research and Industries. आम्हाला शिष्यवृत्ती होती दरमहा रुपये ३००/-. त्यातील रुपये १५०/- हे बीएआरसीकडून मिळत असत तर रुपये १५०/- हे International Atomic Energy Agency ( IAEA ) ह्यांच्यातर्फे मिळत असत. बीएआरसीचे बांद्र्याला Bandstand च्या समुद्र किनारी हॉस्टेल होते.
ह्यापूर्वी मला प्राध्यापक म्हणून दरमहा ५२१/- रुपये पगार होता. म्हणजे मी सुखासीन नोकरी सोडून मुंबईत शिकायला आलो होतो . नातेवाईकांनी मला वेड्यात काढले. वडील म्हणाले, ‘ You are the best judge.You can take your own decision ‘. मी  माझा निर्णय घेतला आणि निघालो मुंबईला.
माझे मूळ धेय्य होते Ph.D. करावे , विद्यापीठात संशोधन करावे व तेथेच प्राध्यापक व्हावे.  मराठवाडा विदयापीठ त्यावेळी नवे होते . आमची दुसरी तुकडी होती . त्यावेळी विद्यापीठात मला  खूप वाव होता. पण तो योग नव्हता. कधी कधी योग्य संधी चालून येतात. त्याचा  योग्य तो फायदा घेतला नाही तर संधी तर हुकतेच पण नवी संधी कधी मिळेल हे सांगता येत नसते. विद्यापीठाचे कुलगुरू होते  प्रसिद्ध पदार्थवैज्ञानिक डॉ नानासाहेब तावडे . आमचे विभागप्रमुख होते डॉ बी बी लाड. दोघांचेही माझावर विशेष लक्ष होते. त्याचे कारण मला त्यावेळी  भारत सरकारच्या Atomic Energy Department ची दरमहा  १५०/-रुपये शिष्यवृत्ती होती. तसे माझे सर्व शिक्षण  इयत्ता वी पासून शिष्यवृत्तीवारच झाले होते . मला बीएआरसीत प्रवेश मिळाला हे ऐकून तावडे आणि लाड सरांना खूप आनंद झाला आणि त्या दोघांनी मला सुंदर शिफारस पत्रे दिली. ती पत्रे मला नंतर खूप कामाला आली. मी त्यांचा विद्यार्थी म्हणून माझे अनेकांनी कौतुक केले. तावडे सर मुंबईलाच रॉयल विज्ञान संस्थेत अनेक वर्षे प्राध्यापक असल्यामुळे खूप प्रसिद्ध होते तर लाड सर पुणे विद्यापीठाचे नावाजलेले प्राध्यापक होते . माझे औरंगाबाद आणि परभणी हे दोन्ही असे सुटले आणि मी मुंबईला आलो. ते एका नव्या विश्वात. एका प्रतिष्ठित अशा बीएआरसीत.
डॉ होमी भाभांनी भारतात जे नवे विज्ञानविश्व उभे केले त्या संस्थेत मला प्रवेश मिळाला . तो एक विलक्षण आनंदाचा क्षण होता. विज्ञान संशोधनासाठी आणि पुढील शिक्षणासाठी ह्यापेक्षा अधिक सुंदर संस्था कोणती असेल? शिष्यवृत्ती मिळून अशी  शिक्षण संधी मिळणे हे तर माझ्यासाठी अधिक महत्वाचे होतेएक नवे विश्व ! एक नवा प्रवास ! एक पाहिलेले नवे स्वप्न !
मी मुंबईत तसा प्रथमच येत होतो असे नाही. एक वर्षापूर्वीच  मराठवाडा विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून मी आणि विद्यापीठाचे चार विद्यार्थी आमच्या दोन प्राध्यापकाबरोबर All India Student's and Teacher’s Camp साठी के एम मुन्शी ह्यांच्या भारतीय विद्याभवनच्या अंधेरी येथील संस्थेत एका शिबिरासाठी आलो होतो. संयोजक होते  मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू न्यायमूर्ती गजेन्द्रगडकर आणि प्रसिद्ध राजकीय नेते जयप्रकाश नारायण.  आमच्याबरोबर होते आमचे रसायन शास्त्राचे प्राध्यापक डॉ जहागीरदार आणि इतिहासाचे प्राध्यापक ( साम्यवादी विचारसरणीचे ) पंढरीनाथ रानडे. माझा रसायनशस्त्र विभागाचा मित्र लिमये बरोबर होता. अगदी धमाल आली ह्या शिबिरात. विविध विषयावर गाजलेली चर्चासत्रे आजही आठवतात . सर्व देशभरच्या विद्यापीठातून आलेले विद्यार्थी आणि त्यांचे प्राध्यापक ह्यांचा हा एक अनोखा मेळावा होता .
द्रोणाचार्य असलेले जयप्रकाश नारायण हे आमच्यासाठी प्रमुख आकर्षण होते .  ही सर्व दिग्गज मंडळी चार दिवस आमच्या बरोबरच होती. असे हे शिबीर मी कधीच विसरणार नाही. पंढरीनाथ रानडे सर श्रीपाद डांगे ह्यांना अगदी जवळून ओळखणारे होते . त्यांनी अनेक राजकीय घडामोडी जवळून पाहिलेल्या होत्या . त्यांचे जयप्रकाशजीबद्दल फारसे चांगले मत नसावे. कम्युनिस्ट आणि समाजवादी वितुष्ट तेंव्हाही होतेच. रानडे सरांनी रामायण महाभारताचा अभ्यास साम्यवादी दृष्टीकोनातून केला होता . त्यावर आमची खूप चर्चा झाली होती  .
के एम मुन्शी प्रमुख संयोजकापैकी एक होते . डॉ गजेन्द्रगडकर हे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते . त्यांचे भाषण म्हणजे एक पर्वणीच होती. जयप्रकाशजीनी नंतर जी युवाचळवळ उभी केली ती अशा विध्यार्थी युवकांना आव्हान करीतच, असे आज मला वाटते. मी कधीही युवक चळवळीच्या भानगडीत पडलो नाही कारण माझे क्षेत्र होते ते विज्ञान आणि संशोधन. ह्या शिबिरातून राजकीय चळवळी आणि Intellectual मंडळींची ओळख झाली हे नक्की. ह्या शिबिरामुळे मला मुंबई दर्शन जवळून झाले. राज्यपालांच्या बंगल्यावर आम्हाला खास पाहुणे म्हणून पार्टी देण्यात आली होती. हे आठवले की राज्यपालांचा तो थाट आजही आठवत राहतो.

बीएआरसीच्या Modular Lab मध्ये Department of Radiation Protection  मध्ये आमचा कोर्स सुरु झाला. अतिशय तज्ञ शास्त्रज्ञ आम्हाला शिकवीत असत. पी एन कृष्णमुर्ती हे विभाग प्रमुख होते. जागतिक अणुशक्ती संस्थांशी संबंधित असलेले त्यांचे व्यक्तिमत्व. आम्ही त्यांचे भारावून टाकणारे वक्तृत्व ऐकून भारावून गेलो होतो . शास्त्रज्ञ सुद्धा चांगला मार्केटिंग करणारा किंवा विक्रेता असावा हे मला त्यावेळी समजले. शास्त्रज्ञ  हा शासक आणि सेल्समन असला पाहिजे तरच तो त्याला हवे  ते करून दाखवू शकतो. सर्वच शास्त्रज्ञाना हे जमत नसते. हे एक सत्य.
आमचे हॉस्टेल बांद्र्याला . समुद्र किनारी . मिलिटरी शेड असणार्या आमच्या  त्या बराकी असलेल्या  खोल्या. जेवणाची उत्तम व्यवस्था होती . आमचा रोजचा प्रवास बीएआरसी बसनेच होत असे  . त्यामुळे मुंबईचा लोकल प्रवास माहित नव्हता. तशी लोकलला आजच्यासारखी गर्दी नसे .आमच्या खोलीच्या बाहेर समुद्राला भरती आली की लाटा कम्पाउंडला येऊन धडकत असत . आमची  रोजची संध्याकाळ फार रम्यच  असे.  ‘सुनील नभ हे सुंदर नभ हे , नभ हे अतलची अहा, सुनील सागर सुंदर सागर , सागर अतलची अहा’, हे वर्णन रोजच अनुभवण्याचे ते सुंदर दिवस होते . मुंबईत इतक्या रम्य ठिकाणी रहाण्याचे ते माझे  सुंदर दिवस. BANDSTAND हेच ते प्रसिद्ध ठिकाण. ते  होते मुंबईतील प्रेमी युगुलांसाठी..आजूबाजूच्या खडकावर ही मंडळी रमलेली असत. आम्ही मात्र आमच्या अभ्यासात कार्यमग्न असू . उद्याचा अभ्यास करण्यासाठी जेवणानंतर रूमवर पळणारे आम्ही तरुण युवक तसे दुर्दैवी  . आज तेथे एक सुंदर हॉटेल झाले आहे. पण एके काळी तेथे मिलिटरीच्या  अर्धगोलाकृती पत्र्याच्या खोल्या होत्या हे सांगितले तर खरे वाटणार नाही . समोर निळा समुद्र. धडकणार्या त्या फेसाळ लाटा. संध्याकाळी त्या परिसरांत फेरफटका मारणे हा एक वेगळा आनंद होता. अधूनमधून सिने कलावंत आजूबाजूला दिसत असत.
माझे सहकारी मित्र भारतातील सर्व प्रांतातून आलेले होते  . कर्नाटकाचा तटीतल्ली, तामिळनाडूचा रामनाथन , केरळचा नायर , राजस्तानचा माथुर , बिहारचा यादव , पंजाबचा गिल , बंगालची असीमा चॅतर्जी  , ओरिसाचा महापात्रा, आसामचा देबनाथ , महाराष्ट्राचा चाबके .. असे माझे माझ्या वर्गातील १७-१८ मित्र होते . मी ह्या सर्वांच्या आठवणीवर  एक  लेख लिहिला होता  – ‘माझे काही अमराठी मित्रह्या नावाने तो मराठवाडादैनिकात प्रसिद्ध झाला होता.  . त्यावेळी मराठी मराठीअसा आवाज उठविणारी सेना मुंबईत सक्रीय झाली होती. मला ती कधीच आपलीशी वाटली नाही. मी मात्र माझ्या अमराठी मित्रात रमलो होतो. त्यांच्याकडून खूप शिकत गेलो. त्यानाही मी वेगळा मराठी माणूस वाटत असे. ते कधीही माझा द्वेष करीत नसत .कोर्सनंतर आम्ही अनेक वर्षे एकमेकांच्या संपर्कात होतो. भारतीय एकात्मतेचे इतके सुंदर दर्शन मी त्या संपूर्ण वर्षात अनुभवले होते . बीएआरसीमध्ये ते नेहमीच दिसून आले.
एक वर्षाचा तो काळ . खूप काही शिकायला मिळाले. Use of Isotopes in Medicine हा आमचा प्रमुख विषय . कोबाल्ट ६० गामा रे चा वापर करून कर्क रोगावर उपचार कसे करावयाचे ? हा आमचा प्रमुख विषय होता . त्यासाठी आम्ही टाटा मेमोरिअलमध्ये प्रात्यक्षिकासाठी जात असू.  त्यावेळी तेथे दोन युनिट होते. तेथील पदार्थवैज्ञानिक ही व्यक्ती इतर डॉक्टर मंडळीसारखीच महत्वाची होती. पदार्थवैज्ञानिक रेडीएशन डोस कसा मोजत असत ह्याचे तंत्र आम्ही तेथे शिकलो . त्यावेळी संगणक नसल्यामुळे हे करणे अतिशय अवघड होते. आम्ही ३ महिने हे तंत्र शिकलो. रेडीएशन तंत्रज्ञान नुकतेच विकसित झाले होते. आजही टाटा मेमोरिअल त्यात अग्रेसर आहे. कोर्सनंतर माझ्या बरोबरचे सर्व मित्र भारतातील निरनिराळ्या हॉस्पिटलमध्ये तज्ञ म्हणून काम करीत होते. 
मी कोर्सनंतर औरंगाबादला गेलो होतो. एका कार्यक्रमात कुलगुरू तावडे ह्यांची भेट झाली. त्यांनी मला सहज विचारले ,' सध्या काय करतोस ?' . मी कोर्स पूर्ण झाल्याचे सांगितले. ते म्हणाले , ' औरंगाबाद मेडिकल कॉलेजला यायचे आहे का ? येथे कोबाल्ट युनिट सुरु होते आहे ' . त्यांनी मेडिकल कॉलेजचे डीन झाला ह्यांना माझ्याबद्दल  सांगितले. मला काही दिवसांनी त्यांचे पत्र आले व त्यात त्यांनी संपर्कात रहाण्याचे सांगितले .  मी मात्र ह्या  कोर्स नंतर हे क्षेत्र सोडून दिले आणि मुंबई विद्यापीठाच्या युडीसीटी ह्या संस्थेत पीएच.डी.साठी प्रवेश घेतला.
मी पुन्हा माझा मार्ग बदलला. मी केलेला कोर्स खूप क्षेत्रासाठी होता. शेती  संशोधयासाठी उपयुक्त होता तसेच औद्योगिक क्षेत्रात विशेष उपयुक्त होता . वैद्यकीय क्षेत्र तर त्याने व्यापून टाकले होते. मिळविलेले ज्ञान हे वाया जात नसते . हे माहित होते. एक वेगळी व्यापक दृष्टी मिळते .
My  Biodata 
मला बीएआरसीतच वैज्ञानिक म्हणून नोकरी मिळाली होती. त्यांनी मला दोनवेळा स्मरणपत्रे पाठविली. ती चांगली संस्था तर होतीच . केंद्रीय नोकरी असल्यामुळे उत्तम पगार होता. माझ्या वडिलांना मी ही केंद्रीय नोकरी सोडू नये असे वाटत असे. अर्थात तेथेही येत्या काळात अनेक संधी मिळण्याची शक्यता होतीच . जीवनात स्थिरस्थावर होण्याची शक्यता निर्माण झाली होती.  
असे सारे असताना मी पुन्हा एक संधी घालवली पण त्याचवेळी मला दुसरी संधी खुणावत होती. अर्थात माझे त्यात आर्थिक नुकसान होते . १८०० रुपये पगाराच्या ऐवजी  मी  २५० रुपयाची शिष्यवृत्ती स्वीकारली. त्याचे प्रमुख कारण म्हणजे मला भेटलेले गाईडमार्गदर्शक. त्यांचे नांव होते  डॉ एन सी चौधरी. ते नुकतेच अमेरिकेतून युडीसीटीत प्राध्यापक म्हणून आले होते. ते मूळ कलकत्याचे. तसे सुरवातीला डाका युनिव्हार्सिटीचे . त्यांनी १६ वर्षे संशोधन करून डी.एससी. ( Doctor Of Science ) ही पदवी मिळविली होती. जगातील प्रसिद्ध अशा नियतकालिकातून त्यांचे सोळा संशोधन पेपर्स  डिग्री मिळवण्यापुर्वीच प्रसिद्ध झाले होते. ते अमेरिकेत प्राध्यापक होते .त्यांची माझी  - वेळा भेट झाली . आमची खूप चर्चा झाली . मी युजीसीच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. 
मला त्यावेळी युजीसी शिष्यवृत्ती मिळाली आणि मी युडीसीटीत त्यांच्या हाताखाली  संशोधक झालो. असा मी शिकत राहिलो. संशोधन हे तसे कठीण असते. मार्गदर्शक हा फार महत्वाचा असतो. प्रयोगात सर्व काही पाहिजे तसे परिणाम  मिळत नसतात . त्यासाठी खूप चिकाटी आवश्यक असतेखूप वेळा प्रयोग करावे लागतात . जे मिळाले आहे ते पुन्हापुन्हा सिद्ध करावे लागते. त्यात अचूकता खूप महत्वाची असते. हे अतिशय जिकीरीचे काम असते. त्यात कसलीही तडजोड नसते. जे आपण शोधून काढतो ते साध्य झाल्यावर आपल्याला विलक्षण आनंद होतो , हे वेगळे  . तो आनंद हा आपला स्वतःचा असतो.
मुलभूत संशोधन हे म्हणूनच इतर संशोधनापेक्षा खूप वेगळे संशोधन असते. मी तो मार्ग स्वतः निवडला होता . त्यात माझी वर्षे गेली. चार वर्षाच्या शिष्यावृत्तीनंतर पुन्हा दोन तात्पुरत्या नोकर्या केल्या .संशोधनात अडथळे येत गेले . मी पिच्छा मात्र  सोडला नाही . मार्गदर्शकाचे उदाहरण समोर होतेच. एक वर्ष औरंगाबादच्या ज्ञान विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक झालो. माझ्या मुंबई- औरंगाबाद चकरा सुरु झाल्या
एका रविवारी प्रोफेसर जे जी काणेयुडीसीटीचे डायरेक्टर माझ्या प्रयोगशाळेत मी काम करीत असताना आले. त्यांना मी औरंगाबाद - मुंबई सतत चकरा मारून राहिलेले संशोधन पूर्ण  करीत आहे हे समजले होते . त्यांनी मला मुंबईतच जवळपास नोकरी शोध असा सल्ला दिला . दुसरे दिवशी त्यांनी मला निरोप पाठविला आणि भेटण्यास बोलविले . मी त्यांच्या कार्यालयात गेलो . त्यांनी मला माटुंग्याच्या कॉटन टेक्नॉलॉजीकल रिसर्च संस्थेत जागा आहे , तेथे अर्ज करण्याचा सल्ला दिला. मी तेथे अर्ज केला . आणि माझी संचालकांचा सहाय्यक म्हणून सायंटिफिक रिसर्च असिस्टंट म्हणून नेमणूक झाली. पगार चांगलाच होता . दिवसभर नव्या नोकरीचे काम आणि संध्याकाळी रात्रीपर्यंत  युडीसीटीत संशोधन करू लागलो. माझे काम संपत आले होते . थिसीस सबमिट केला आणि शेवटी संशोधन पूर्ण झाल्याचे यश पदरांत पडलेडॉ काणे ह्यांनी माझ्यासाठी मार्ग शोधून दिला. मला मार्गदर्शन केले. असे शिक्षक मिळतात तेंव्हा आपले आयुष्य व्यवस्थित मार्गी लागते .अनेक अडथळे दूर होतातअसा मी डॉक्टरेट  ( Ph.D) झालो. माझे मार्गदर्शक मला  D.Sc. साठी प्रयत्न कर असे म्हणत होते. ते मात्र करायचे राहून गेले .
गंमत बघा. मी अध्ययन , अध्यापन आणि संशोधन ह्या त्रिसूत्रीवर आधारित माझे ध्येय निश्चित केले होते. आणि झाले मात्र वेगळेच. मी एशियन पेंट्स ह्या कंपनीत कलर टेकनॉलॉजी शास्त्रज्ञ म्हणून सात वर्षे काम केलेती कम्पनी सात वर्षांनी सोडली आणि स्वतःचा कलर टेक्नॉलॉजी उद्योग उभा केला. माझी  स्वतःची कम्पनी उभारून ३०० हुन अधिक उद्योगांना ( टेक्सटाईल्स , पेंट्स , प्लॅस्टिक , इंक कंपन्या )  सहाय्य करून त्यांना नव्या तंत्रज्ञानामुळे ते वापरत असणाऱ्या रंगद्रव्यात  १५ ते २० टक्के फायदा करून दिला

विज्ञान , मूलभूत संशोधन ,उपयोजित संशोधन , तंत्रज्ञान आणि त्याचा उद्योगासाठी तंत्रज्ञानाचा वापर तसेच मार्केटिंग ह्या सर्वच क्षेत्रात मी भरारी मारली . शेवटी माझे विज्ञान शिक्षण मला कामी आले . आणि असा मी घडलो . घडत गेलो