Sunday, July 12, 2020

मी असा घडलो : ३

माझा एकेकाळचा विरंगुळा : नाटक 
मी मुंबईत आलो ते १९६९ साली. माझे विद्यार्थी जीवन म्हणजे तसे मुंबई ह्या गर्दीच्या शहरातील एक एकाकलेपण होते. माझे युडीसीटीचे ते दिवस. माझे संशोधनाचे काम जोरात सुरु केले होते . जवळच हॉस्टेल असल्यामुळे केंव्हाही प्रयोगशाळा किंवा लायब्ररीत जाणे सहज शक्य असे . आपणच ठरवायचे केंव्हा आणि कुठे जावून बसायचे. १०-१२ तास तरी कामासाठी सहज देता येणे शक्य असे. तशी कामांत लवचिकता असे. आमच्या सरांच्या बरोबर चर्चासत्र चालू होत असे ते संध्याकाळी ५ ते ८.  दिवसभर केलेल्या शास्त्रीय प्रयोगावर चर्चा होत असे , उद्या काय करायचे ह्याची चर्चा आणि लायब्ररीत जावून आपल्या विषयाशी संबंधित काय संशोधन चालू आहे ह्याचा शोध किंवा नवे काय शोधता येईल ह्याचाही  शोध चालू असे. ती एक धुंदी असते. डोक्यात विचारांचे चक्र चालू असते . आजूबाजूला फिरतानाही डोक्यात तेच विचार चालू असत.

ही संशोधन अवस्था म्हणजे आपल्यातील हरवलेल्या माणसासारखी असते. माणूस एकाकी होत असतो. हॉस्टेलवर राहणारी मुले अशीच एकाकी असतात. आपला रुममेट जर आपल्यासारखाच संशोधक असेल तर दोन वेडी मुले एका खोलीत त्यांच्या विश्वात हरवलेली असतात.


  मी माझा विरंगुळा शोधून काढला . माझा विरंगुळा होता नाटक बघणे. नवा नवा नाट्यानुभव घेणे ह्याची मला नंतर सवंय लागली . त्यावेळी मराठी रंगभूमी खूपच जोरात होती. मी रहात होतो माटुंगा – किंग सर्कलला. जवळचे नाट्यगृह होते शिवाजी मंदिर , दादर. त्यामुळे रात्रीचा प्रयोग पाहणे सहज जमत असे. शनिवार – रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी मी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यगृहात जात असे. बिर्ला मातोश्रीला कधीकधी चक्कर होत असे. नंतर एनसीपीएला जावू लागलो. प्रायोगिक नाटकासाठी तेजपाल ,एनसीपीएला जावेच लागे . नंतर छबिलदासची नाट्यचळवळ  सुरु आली. ते सभागृह (?) तसे जवळच होते. माझे जवळचे मित्र मला शोधण्यासाठी मी कोणत्या नाटकाला गेलो असेल ह्याचा अंदाज घेऊन त्या सभागृहात येत असत. इतका मी नाटकवेडा झालो होतो. त्यावेळची बहुतेक प्रायोगिक नाटके मी आवर्जून पाहिली. सहसा आम्ही २-३ मित्र बरोबर असू. नाटक नसेल तर चर्चगेट – फोर्टला एखादा इंग्रजी सिनेमा बघण्याचे ठरविलेले असे. त्यावेळी फार मोजके हिंदी सिनेमा मी बघितले असतील.  १९६० साली विजय तेंडूलकर , विजया मेहता आणि श्रीराम लागू ह्यांनी 'रंगायन' ही संस्था प्रायोगिक नाटकाकरिता सुरु केली होती. ६९ -७० च्या काळात 'रंगायन' ची अनेक नाटके प्रायोगिक रंगभूमीवर आली होती. त्यानंतर 'रंगायन' ही संस्था फुटली आणि अरविंद देशपांडे , सुलभा देशपांडे आणि विजय तेंडुलकरांनी  'अविष्कार' ही नवी संस्था उभी केली.  

१९६९-७६ च्या काळात व्यावसायिक रंगभूमी आणि समांतर अशी प्रायोगिक रंगभूमी ह्यांना थोडे बरे दिवस आले होते. व्यावसायिक नाटकात बाळ कोल्हटकर आणि वसंत कानेटकर ह्यांची नाटके जोरात चालत होती तर प्रायोगिक रंगभूमीवर विजात तेंडूलकर पुढे होते. त्यांनी मराठी नाटकाला भारतीय रंगभूमीवर नेले. मी दोन्हीही प्रकारच्या  नाटकांना जात असे. मुंबईच्या प्रायोगिक रंगभूमीवर त्याच वेळी बादल सरकार ( बंगाली ) , मोहन राकेश ( हिंदी ), आणि गिरीश कर्नाड ( कन्नड ) ह्यांची नाटके सादर होत होती. सत्यदेव दुबे आणि विजया मेहता हे  प्रामुख्याने ह्या चार नाटककारांची नाटके सादर करीत होते. बादल सरकार ह्यांचे ' एवं इंद्रजीत ' आणि ' पगला घोडा ' ही नाटके मी पाहिली आहेत . तर मोहन राकेश ह्यांचे ' आधे अधुरे ' आणि ' आषाढ का एक दिन ' हे आवर्जून बघितले . गिरीश कर्नाड ह्यांची नाटके सुरुवातीला  पौराणिक कथावर  (Mythology)  आधारित असायची. त्यावेळी विशेष गाजले ते '  हयवदन' . त्यानंतर 'ययाती ' , 'तुघलक' , नागमंडल' ही नाटके सादर झाली. 'वेडिंग अल्बम' हे नंतरच्या काळात बघितलेले उल्लेखनीय नाटक. आधुनिक भारतीय रंगभूमीचे प्रमुख स्तंभ विजय तेंडूलकर , मोहन राकेश, बादल सरकार आणि गिरीश कर्नाड . त्यांच्या नाटकांना सादर करणारे दिग्दर्शक होते सत्यदेव दुबे.  ते विशेष गाजले ते धर्मवीर भारती ह्यांच्या ' अंधायुग ' ह्या  नाटकला प्रायोगिक रंगभूमीवर सादर केल्यामुळे . त्यांनी वर उल्लेख केलेल्या चारही नाटककारांची नाटके दिमाखात सादर केली होती आणि त्यामुळे प्रायोगिक रंगभूमी खूप गाजू लागली होती.. त्यांच्या नाटकातूनच अनेक मोठे कलाकार रंगभूमीला मिळाले.     

त्याचवेळी  ‘अश्रूंची झाली फुले’. ‘घरात फुलाला पारिजात ‘, ‘ रायगडला जेंव्हा जग येते’ ही वसंत कानेटकरांची नाटके गल्ला भरत होती. काशिनाथ घाणेकर हे त्यावेळचे लोकप्रिय कलाकार होते. त्याच काळात विजया मेहता , श्रीराम लागू ही प्रायोगिक रंगभूमीची मंडळी व्यावसायिक रंगभूमीवर आली आणि नाटकांचा दर्जा अधिक वाढला .” हिमालयाची सावली “ ह्या वि वा शिरवाडकरांच्या नाटकात श्रीराम लागू आणि शांत जोग गाजल्या. श्रीराम लागू आणि दत्ता भट ह्यांची तुलना नंतर होऊ लागली. जयवंत दळवींचे ‘ संध्याछाया’ खूपच गाजले ते श्रीराम लागू आणि शांता जोग ह्यांच्यामुळेच. ती जोडी खूप प्रसिद्ध झाली. महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेतून 'काळे बेट लाल बत्ती’ मुळे  मधुकर तोरडमल पुढे आले आणि त्यानंतर त्यांची सर्वच नाटके खूप गाजली. ‘श्री ना पेंडसे ह्यांच्या गाजलेल्या कादंबर्यांची नाटके रंगभूमीवर आली. ‘ गारंबीचा बापू ‘ काशिनाथ घाणेकरांनी जोरात सादर केला. श्री ना पेंडसे ह्यांना एकदा विचारण्यात आलं होतं , ‘ तुमची आवडती कलाकृती कोणती ?’, त्यांनी पटकन उत्तर दिले ‘ लव्हाळी ‘. मी महाविद्यालयात असताना मला आवडलेली ती एक चांगली कादंबरी. ती नाट्यरूपाने प्रसिद्ध झाली नाही. 
  
त्याच वेळी मराठी संगीत नाटकांची मोठी ल'हर आली. वसंत कानेटकरांचे ‘ मत्सगंधा’ खूप गाजले. पं जितेंद्र अभिषेकी , रामदास कामत ह्यांनी आपला ठसा उमटविला. ‘कट्यार काळजात घुसली ‘ हे  पुरूषोत्तम दारव्हेकरांचे नाटक.  प्रभाकर पणशीकरांच्या नाट्यसंपदाने  ते जोरात सादर  केले. पं जितेंद्र अभिषेकी ,पं वसंतराव देशपांडे आणि फैयाज ह्यांनी  त्या नाटकांत श्रोत्यांची मने जिंकून घेतली . त्यांची ती  नाट्यपदे आजही अनेकजण गुणगुणत असतात. ‘ हे बंध रेशमाचे ‘ हे रणजीत देसाई ह्यांचे नाटक त्याच काळात गाजले. त्या नाटकातील आठवणीतील गाणी आजही घराघरात सीडीमुळे ऐकावयास मिळत असतात. मराठी नाट्यसंगीत हे त्यातील अवीट गोडीमुळे मन उल्हासित करीत असते. हे मोठे कलाकार जेंव्हा रंगभूमीवर ती गाणी सादर करीत असत तेंव्हा ते  बघणे आणि त्यांना ऐकणे हा एक वेगळा आनंद मला  मिळाला. ह्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.  

पु ल देशापडे तर विनोदाचे बादशहा. ‘ बटाट्याची चाळ ‘ आणि वार्यावरची वरात ‘ जोरात गल्ला जमवीत होते. शिवाजी मंदिरला चार तास रांगेत उभे राहून तिकीट काढायची वेळ माझ्यावर पहिल्यांदाच आली. त्यावेळी शिवाजी मंदिरची नेहमीची तिकिटे होती रुपये ५,३ आणि २ .’ पु ल च्या प्रयोगाला थोडे अधिक पैसे द्यावे लागत असत व बराच वेळ रांगेत उभे राहून तिकीट काढावे लागत असे. त्यांचे  'असा मी असा मी ‘ हे नाटक मात्र  मी रवींद्र नाट्य मंदिरात  बघितले. रवींद्र हे चांगले सभागृह आहे असे मला वाटते. ते थोडे सोयीचे नाही. 

अशाच एका महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत विजय तेंडुलकरांचे ‘ अशी पाखरे येती ‘ हे नाटक खूप गाजले. जब्बार पटेल त्या नाटकातून पुढे आले. त्यावेळी ते प्रमुख कलाकार होते. त्यांनी फार सुंदर भूमिका वठवली होती. नंतर मी त्यांना कलाकार म्हणून बघीतले नाही. ते नंतर प्रसिद्ध दिग्दर्शक झाले.   ते रंगभूमीवर आले ते  ह्याच नाटकामुळे. विशेष म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर हे नाटक छान चालले. चि. त्र्यं खानोलकर ह्यांचे ‘ अवध्य ‘ हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेतून गाजले. मी त्याचा प्रयोग रंगभवनमध्ये बघीतला होता. त्त्यानंतर हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आले. तिकडे प्रायोगिक रंगभूमी विजय तेंडूलकर ह्यांच्या नाटकामुळेच पुढे येत होती. ‘ शांतता कोर्ट चालू आहे ‘, ‘गिधाडे ‘, ‘घाशीराम कोतवाल’ ही नाटके मराठी रंगभूमीला जागतिक पातळीवर नेत होती. ‘ पाहिजे जातीचे’ हे खूप नंतरचे नाटक छबिलदासच्या प्रायोगिक रंगभूमीवर पाहिले. त्यांत नाना पाटेकर हिरो होता. ती त्याची सर्वात चांगली भूमिका .तसा नाना पाटेकर  मी पुन्हा पाहिला नाही,  


खानोलकरांचे ‘ एक शून्य बाजीराव ‘ त्याच काळात आलं. प्रायोगिक नाटकांचे प्रयोग तेजपाल सभागृहात होत असत. नंतर ते एन सी पी ए च्या छोट्या सभागृहात होत असत. नंतर ते छाबिलदसला  होऊ लागले. ‘गिधाडे’ चा सुन्न करणारा प्रयोग मी  तेजपालला बघितला होता. त्यात श्रीराम लागू , दीपा , अमोल पालेकर , मीना नाईक  , अमरीश पुरी ही नट मंडळी होती. नाटक हा  इतका  सुन्न करणारा प्रकार आहे, हे मला पहिल्यांदा बघायला मिळाला . ‘ अशी पाखरे येती ‘, हे नाटक लिहिणारे विजय तेंडूलकर ते हेच का ? असा मला प्रश्न पडला. त्याच काळात सत्यदेव दुबे ह्यांची हिंदी नाटके तेजपालमध्य आवर्जून पाहिली. हा एक नाट्यक्षेत्रातला भन्नाट माणूस जवळून पाहिला. ‘ स्टील फ्रेम ‘ हे नाटक आजही आठवते. त्यातील अमरीश पुरींची भूमिका अफलातून होती . हा अमरीश पुरी पुढे हिंदी सिनेमात गेला . तो त्या भूमिकात मला कधीच आवडला नाही.अमोल पालेकर, श्रीराम लागू आणि अमरीश पुरी ह्यांचा तो सुरुवातीचा काळ होता . त्यावेळी ही मंडळी नवे प्रयोग करीत असत. ते रंगभूमीवर धडपडत होते. नंतर ते तिघेही हिंदी सिनेमात मिळेल ती भूमिका का करत होते?  , हे मला कधीच समजले नाही . शेवटी पैसा हा हवाच असतो कलाकारांना . आधी प्रायोगिक, मग  व्यावसायिक आणि शेवटी हिंदी सिनेसृष्टी असा त्यांचा प्रवास होता . खर्या अर्थाने ह्या कलाकारांनी त्यावेळी मराठी रंगभूमी गाजविली.,

वसंत कानेटकर आणि बाळ कोल्हटकरांचा सुरुवातीचा काळ. ताई –माई ह्यांना रडताना बघायला जायचे काय ? असे काही जण म्हणत असत. नंतर माझ्या लक्षात आलं की बाळ कोल्हटकरानी लोकांना त्यावेळी जे आवडते तेच सादर करून वाहवा मिळविली. तसे त्यांना रंगभूमीवर बघणे खूप आनंददायी होते. त्यांचा ' वाहतो ही दुर्वांची जुडी ' ह्या नाटकाचा  प्रयोग जोरात गर्दी खेचत असे. त्यांनी ३० नाटकातून काम केलं होतं . वसंत कानेटकर आणि प्रभाकर पणशीकरांनी एक स्वतःचे गणित जमवून अनेक सुंदर नाटके सादर केली व नाट्यव्यवसाय तेजीत आणला.  बहुधा हे बघूनच प्रायोगिक नाटकातील मंडळी म्हणजे  विजयाबाई – श्रीराम लागू ह्यांच्या सारखे कलाकार  व्यावसायिक  रंगभूमीकडे वळले असावेत . सुरुवातीला व्यावसायिक रंगभूमीकडे फटकून वागणारी ही मंडळी नंतर तिथेच रमली. वसंत कानेटकरांची एकामागून एक नाटके येत गेली पण त्यात तोच तोपणा अधिक होता . ‘अश्रूंची झाली फुले’ पाहिल्यावर ‘ घरात फुलला पारिजात’ चा प्रयोग मला तरी आवडला नाही. तसेच ‘ रायगडला जेंव्हा जाग येते ‘ नंतरची त्यांची ऐतिहासिक  नाटके मला फारशी आवडली नाहीत. 'मागणी तसा पुरवठा' हे कानेटकरांचे व्यावसायिक गणित असावे. अर्थात त्यातूनही त्यांनी अनेक सुंदर नाटके रंगभूमीला दिली हे निर्विवाद. 


जयवंत दळवी ह्यांची एकामागून एक उत्कृष्ट नाटके व्यावसायिक रंगभूमीवर येण्यास सुरुवात झाली होती. त्यात सर्वात गाजले ते 'संध्याछाया'. विजया  मेहता ह्यांचा सुंदर अभिनय. विजयाबाईंनी दिग्दर्शित केलेली अनेक नाटके त्यावेळी  गाजली. मला विशेष आवडलेली त्यातील काही नाटके : चक्र , महासागर , नातीगोती आणि पुरुष. पुरुष ह्या नाटकातील नाना पाटेकर आणि रीमा लागू ह्यांच्या भूमिका अप्रतिम होत्या. दिलीप प्रभावळकर ह्याचा ' नातीगोती ' तील  अभिनय सुरेख होता . त्यावेळी विजया मेहता ह्यांनी व्यावसायिक रंगभूमीला खूप उंचावर नेऊन ठेवले . 'हमीदाबाईंची कोठी  ', 'अजब न्याय वर्तुळाचा , चि त्र्यं खानोलकर ह्यांचे ' एक शून्य बाजीराव' , आणि नंतर  'रावसाहेब' . काही नाटके १९८० च्या नंतरची. विशेष लक्षात राहिली त्यापैकी काही नाटके : 'पुरुष', 'बॅरिस्टर' आणि 'मला उत्तर हवंय'. रंगायननंतर विजयाबाईंनी व्यावसायिक रंगभूमीला अधिक दर्जेदार केले ह्यात वाद नाही. त्यांनी 'झिम्मा' ह्या त्यांच्या आत्मचरित्रात अनेक गोष्टीचा उल्लेख केला नाही असे मला वाटते. ते पुस्तक वाचताना त्यांनी काहीतरी हातचे राखून ठेवले आहे असे मला वाटत राहिले. 

त्याचवेळी प्रायोगिक चित्रपट जमाना सुरु झाला. प्रायोगिक रंगभूमीवरचा नट अमोल पालेकर हिंदी सिनेमात गाजला तो ‘ रजनीगंधा’ ह्या चित्रपटामुळे. एक सुंदर चित्रपट. त्याचवेळी ‘ ‘भुवन सोम’ आणि ‘ सारा आकाश ‘ ह्या दोन प्रायोगिक चित्रपटांनी बहार उडवून दिली होती. निखळ आनंद देणारे हे चित्रपट माझ्या कायमचे लक्षात राहिले आहेत. तेंडुलकरांनी ‘ माणूस' मधील त्यांच्या ' रातराणी ' ह्या  सदरात लिहिले होते , ‘कलाकृती अशी असावी की ती पाहिल्यानंतर घरी घेऊन जावी अशी वाटावी’. हे चित्रपट इतके सुंदर होते की ते कायमचे लक्षात राहतात. ‘ अशी पाखरे येती ‘ असो का  ‘ सारा आकाश ‘ . ह्या कलाकृती निखळ आनंद देणाऱ्या होत्या . काही दिवसांनी मी दादरच्या ‘ चित्रा’ ह्या सिनेमात बघितला सत्यजित रे ह्यांचा ‘ पथेर पांचाली’. हा दिग्दर्शक आपला वेगळा ठसा उमटविणारा होता. 
Our generation is born frustrated ‘  हे त्यांच्या चित्रपटातील नायकाच्या तोंडी ऐकलेले वाक्य मला नेहमीच आठवत असे. तेंव्हा मी खरोखरच frustrated student होतो. एकंदर त्या चित्रपटाचा झालेला परिणाम  आजही  मला अनेकदा आठवतो.

१९९० नंतर माझी नाटककार विजय तेंडुलकरांची चांगली ओळख झाली. त्यांचे 'रामप्रहर' मी प्रकाशित केले होते. त्यांच्या घराजवळच माझं कार्यालय होते. त्यामुळे त्यांच्या अनेक भेटी झाल्या. अनेकदा  त्यांच्याबरोबर गप्पा मारण्याची संधी मिळाली. अशाच एका गप्पात मी त्यांना विचारलं , ' तुम्ही अलीकडे नाटक का लिहीत नाही ?'. तेंव्हा ते मला म्हणाले , ' नाटक हे एकट्या लेखकाचे नसते. त्यात दिग्दर्शक असतो. निर्माता असतो. कलाकार असतात. आपण जे नाटक लिहितो  त्यात खूप बदल केले जातात. ते सर्व आपल्याला आवडतातच असे नाही. काही नाटककारांना तर ते आपणच लिहिले आहे का ? असा प्रश्न पडतो. मला हे फारसे पटत नाही. म्हणून मी ते लिहिणे सध्यातरी थांबवले आहे .लिहीन . मनांत येईन तेंव्हा.' हे त्यांचे म्हणणे खरे आहे. शेवटी नाटक गाजते ते अनेक कारणामुळे. कधी दिग्दर्शकामुळे तर कधी नटामुळे . ते सामूहिक यश असते. त्यानंतर त्यांनी ' सरदार' ह्या चित्रपटासाठी स्क्रिप्ट लिहिले होते. सिनेमा निर्मात्यांकडे गेला होता. चित्रपट तयार होऊन प्रदर्शित होण्यासाठी वेळ लागणार होता. त्यांनी त्या स्क्रिप्टचे पुस्तक आधी प्रकाशित केले. त्यांना स्क्रिप्टमध्ये बदल होऊ नयेत व आपण संशोधन करून जे लिहिले आहे त्यात कसलेही बदल होऊ नयेत असेच वाटत असल्यामुळे ' सरदार ' हे पुस्तक त्यांनी  प्रथम प्रकाशित केले. मी त्या प्रकाशन समारंभाला गेलो होतो. त्या पुस्तकाची प्रत त्यांनी मला दिली होती. ते पुस्तक मी अनेक वेळा वाचले आहे . मला 'गांधी - सरदार - नेहरू' ह्या त्रयींच्या संबंधाबद्दलची इतकी सुंदर माहिती कुठेही बघायला मिळाली नाही. नंतर सिनेमाही आला. त्यात फारसे बदल नव्हते.पण स्क्रिप्टच इतके सुंदर लिहिले होते की त्यात बदल करणे शक्य नव्हते. नाटक असो का चित्रपट , कलाकृती कशी असावी ? तर ती अशी असावी. 


       त्या आठ-दहा वर्षात आणि नंतरही  मी खूप चांगली नाटके पाहिली. त्यावेळी धडपडणारी कलाकार मंडळी पाहिली. नंतर ती खूप मोठे कलाकार झाली. माझ्या जुन्या डायर्या बघितल्या तर त्यांत मी केलेल्या अनेक नोंदी सापडतात. दिवसभर संशोधनात बुडवून घेतल्यानंतर अशा नाटक आणि चित्रपटात मी मन रमविले आणि जगण्याचा नवा अर्थ मला समजत गेला .  ह्या कलाकृती आणि कलाकारांनी माझे जगणे सुसह्य तर केलेच पण  माझ्या जगण्याला नवा अर्थ  दिला . जीवन समजून घेण्यासाठी नाटक उपयोगी पडते. आजूबाजूची माणसं त्यात दिसून येतात. त्यांचे ताणतणाव समजतात. नाटक हा एक आनंद देणारा कलाप्रकार आहे.     
   

1 comment:

  1. खूप छान लिहिलं आहे. वाचतावाचता तुमच्याबरोबर आमचाही त्या काळात फेरफटका झाला. मजा आली वाचताना. धन्यवाद.

    ReplyDelete