Monday, March 25, 2019

औरंगाबादच्या जुन्या आठवणी - 6

१३, श्रीकुंज , सन्मित्र कॉलनी म्हणजे श्री  केशवराव देशपांडे, माझे सासरे , त्यांचे घर .आमच्या अनेक आठवणी ह्या घराशी निगडीत  आहेत 
औरंगाबादमध्ये आमचे घर आहे रोकडिया हनुमान कॉलनीत. त्याबद्दल मी माझ्या पहिल्या लेखात लिहिले होते. औरंगाबादमधील सन्मित्र कॉलनी म्हणजे माझ्या बायकोचे माहेर. तिच्या वडिलांचे घर '१३, श्रीकुंज' हे सन्मित्र कॉलनीतील एक टुमदार बंगला. तशी सन्मित्र कॉलनी ही खूप प्रसिद्ध वसाहत. ह्या कॉलनीत अनेक प्रसिद्ध व्यक्ती रहात असत. "मराठवाडा" संपादक अनंत भालेराव , समाजवादी नेते बापुसाहेब काळदाते , मराठीचे ख्यातनाम प्राध्यापक भगवंत देशमुख , माझे पदार्थविज्ञान विषयाचे प्राध्यापक मार्तंडराव शेळगांवकर, इतिहास संशोधक न शे पोहनेरकर ह्यांची घरे ह्या कॉलनीत होती / आहेत. तशी ही प्रसिद्ध कॉलनी,ह्या कॉलनीच्या सुरुवातीलाच दैनिक मराठवाड्याचे कार्यालय आणि त्याच्या बाजूलाच मराठवाडा साहित्य परिषदेची इमारत. ह्या कॉलनीच्या पलीकडेच पहाडे Law कॉलेज.
केशवराव देशपांडे माझे सासरे . ते दै .मराठवाड्याचे सरव्यवस्थापक , इल्नाचे अध्यक्ष , मराठवाडा विद्यापीठात त्यावेळी नुकत्याच सुरु झालेल्या वृत्तपत्रविद्या विभागाचे अतिथी प्राध्यापक , अनंत भालेराव ह्यांचे अगदी जवळचे सहकारी. जयहिंद प्रेसच्या बर्दापूरकर आणि अनंतरावांनी त्यांना हैदराबादहून मराठवाडा वर्तमानपत्रासाठी बोलावून घेतले आणि ते ह्या वर्तमानपत्राचे व्यवस्थापन करू लागले. 'कावड' ह्या पुस्तकात अनंतरावांनी केशवराव 'दै मराठवाड्या' तून निवृत्त झाले त्या दिवशी जो लेख लिहिला (केशवराव देशपांडे : आमचे ब्रदर जॉन)  तो त्यांच्या कार्याची संपूर्ण माहिती देतो.  त्यात अनंतराव लिहितात ,' मला पत्रकारितेच्या क्षेत्रात जे काही थोडेफार यश मिळाले असेल त्यावर शंभर टक्क्यांचा अधिकार हा केशवरावांचा आहे . ते प्रत्येक प्रसंगी माझ्या पाठीशी राहिले व खर्या अर्थाने पाठीशी राहिले . प्रसिद्धीच्या झोतात मी सातत्याने राहिलो मात्र केशवराव त्या झोतापासून प्रयत्नपूर्वक दूर राहिले. त्यांच्या परिश्रमाचे , कौशल्याचे व गुणाचे श्रेय नकळत मला मिळत गेले. केशवरावांचा मोठेपणा असा की , ते सदैव उदार दात्याची व घरातल्या वडील माणसांची भूमिका मन:पूर्वक पाडीत राहिले . वयाने ते माझ्यापेक्षा लहान परंतु वृत्तीने जेष्ठ . त्यांचे हे जेष्ठत्व मला अखेरपर्यंत उपयोगी तर पडत गेलेच परंतु मराठवाडा दैनिकाच्या प्रगतीला ते अधिक उपयोगी ठरले. साप्ताहिकापासून दैनिकापर्यंतचा या वृत्तपत्राचा प्रवास प्रामुख्याने केशवरावांच्या नेतृत्वाखालीच होत गेला'.  सेतू माधवराव ह्यांचे जसे ब्रदर जॉन होते तसेच केशवराव अनंतरावांचे 'ब्रदर जॉन ' होते . ह्यात अनंतराव ह्यांचा मोठेपणा दिसून येतो तसाच प्रसिद्धीच्या झोत्यात नसलेल्या केशवरावांचा मोठेपणा दिसून येतो.  निवृत्त झाल्यानंतर गोविंदभाई श्रॉफ ह्यांनी केशवराव काकांना सभु शिक्षणसंस्थेसाठी बोलावून घेतले आणि ते शेवटपर्यंत गोविंदभाईचे अगदी जवळचे सहकारी होते.
मी केशवराव काकांच्याकडून खूप काही शिकलो. ते मुंबईला कामानिमित्त नेहमी येत असत. त्यांच्याबरोबर खूप गप्पा होत . तसे ते कमी बोलणारे. इल्नाचे अध्यक्ष झाल्यावर त्यांचे येणे अधिक वाढले. व्यवसायातील अनेक अनुभव आणि गंमतीजमती त्यांनी सांगितल्या. ती पिढीच वेगळी होती. अशा माणसाकडून खूप कांही शिकण्यासारखे असते. त्यांना बोलते करणे मात्र अवघड असतं.  तीच गोष्ट त्यांची पत्नी कुमुदिनी देशपांडे ह्यांची. शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्यानंतर स्वतःच्याच 'श्री कुंज' मध्ये  किलबिल ही संस्था सुरु करणाऱ्या व त्यासाठी परिश्रम घेणाऱ्या स्त्रीचे कर्तृत्व खूप मोठे आहे .

स्वप्नातील शाळा - अनंत विद्या मंदिर 

मातेच्या ममतेने ,असीम श्रद्धेने आणि अनंत उत्साहाने लावलेले विद्येचे रोपटे म्हणजे  औरंगाबादेतील एक किलबिल बालक मंदिर . आज १५०० विद्यार्थी जेथे शिक्षण घेतात ते विद्यामंदिर .गेल्या ३० वर्षात ह्या ज्ञानपीठातून अनेक जण बाहेर पडले आणि सुजाण नागरिक झाले .संस्था अनेक असतात पण यासम अशी संस्था विरळीच .
२५ वर्षाच्या शैक्षणिक सेवेतून निवृत्त झाल्यानंतर 
कुमुदिनी केशव देशपांडे ह्या आजीने  हे' किलबिल '
सुरु केलं आणि अथक परिश्रम करून ही संस्था उभी  केली . ' मराठवाडा ' कार अनंत भालेराव ह्यांचे प्रोत्साहन मिळाल्यामुळे ही संस्था उभी राहिली आणि शिक्षणक्षेत्रातील ' आनंदाचे झाड ' होऊन बसली .
'श्री कुंज' मधील 'किलबिल' मी अनेकदा पाहिलं आहे. आज हा शिक्षणवृक्ष मोठा डेरेदार झाला आहे .

आज  सन्मित्र कॉलनीतील ही 'सुशीला - अनंत' नावाची इमारत दिसते आहे तेथे अनंत भालेराव रहात असत. मी "कावड " चा प्रकाशक झालो त्यावेळी  माझ्या अनंतरावांच्या अनेक भेटी येथेच असलेल्या त्यांच्या बंगलीवजा घरात झाल्या .

केशवराव देशपांडे ह्यांच्या घरासमोरच बापू काळदाते आणि सुधाताई काळदाते ह्यांचे घर होते . तेथे ही इमारत आज उभी आहे . 
मराठवाड्याचे प्रसिद्ध इतिहासकार न शे पोहनेरकर ह्यांचे हे घर . मी शाळेत असताना दरवर्षी एक हस्तलिखित मासिक काढीत असे. त्या मासिकाला त्यांचा अभिप्राय घेण्यासाठी त्यांच्या घरी जात असे . दोनतीन दिवसात ते अभिप्राय लिहून देत असत . त्यावेळी त्यांचा अभिप्राय वाचून मला खूप उत्साह येत असे . ते मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते त्यावर्षी मी त्या संमेलनाला शाळेत असूनही गेलो होतो. ते पूर्वी हैदराबादेत होते . त्यावेळपासून आमची कौटुंबिक ओळख होती. त्यांची पत्नी माझ्या आईची जवळची मैत्रीण. 

दै मराठवाड्याचे कार्यालय येथे होते . आज येथे ३-४ इमारती झाल्या आहेत. ह्या कॉमप्लेक्सला नांव दिलंय ' अनंत एनक्लेव्ह'. आज ते जुने दिवस आठवतात .कोणाही औरंगाबादकराला ह्या परिसराच्या अनेक आठवणी माहित असणार  मी अनेकदा ह्या कार्यालयात गेलो होतो ते म य दळवी ह्यांना भेटायला . त्यांनी माझे विविध विषयावरचे लेख 'मराठवाड्या'त छापले होते . मी त्यावेळी विज्ञान विषयावर लिखाण केले होते. 'मराठवाडा' वाचूनच आम्ही मोठे झालो होतो  . अनंतराव ह्यांचा अग्रलेख वाचल्याशिवाय तेंव्हा चैनच पडत नसे. त्यांची भाषा वाचताना विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळकांची शैली आठवत असे, त्यावेळी  म टा चे गोविंद तळवलकर  आणि लोकसत्तेचे माधव गडकरी ह्यांच्या अग्रलेखापेक्षा अनंत  भालेराव ह्यांचे अग्रलेख मला अधिक आवडत असत . महाराष्ट्राला मात्र त्यांच्या लेखांची विशेष माहिती झाली नाही. तळवलकर त्यांचे अग्रलेख मटा त पुन्हा छापत असत. परराष्ट्रीय राजकारणावरील त्यांचे लेख अतिशय सुंदर विश्लेषण करणारे असत . हा प्रादेशिक वर्तमानपत्राचा संपादक आहे असे कधीच वाटत नसे. अर्थात मराठवाडा विकासाचे प्रश्न ते  अधिक जोमाने मांडीत असत. अनंतराव आजारी पडल्यानंतर काही दिवसाने निवृत्त झाले . पन्नालाल सुराणा आणि त्यानंतर यदुनाथ थत्ते हे मराठवाड्याचे संपादक झाले. त्याकाळात 'कावड ' ह्या सदरातून अनंतराव भालेराव ह्यांची भेट होऊ लागली. त्यांचे हे लिखाण खूपच वेगळे होते. त्यातील त्यांची शब्दचित्रे म्हणजे माणूस वाचणे आणि समजून घेणे. अप्रतिम. माणूस कसा जोडावा हे ही त्यातून शिकण्यासारखे होते . मी तर ' कावड 'च्या प्रेमात पडलो आणि नंतर योगायोगाने प्रकाशक झालो. तो काळ मला खूप काही शिकवून गेला . मला साहित्याची आवड होती म्हणून मी एक जोड धंदा म्हणून ह्या व्यवसायात आलो आणि प्रकाशक झालो त्यानंतर विजय तेंडुलकरांचे 'रामप्रहर ' हे पुस्तक काढले . असे दोन दिग्गज लेखक मला मिळाले . मी ह्या व्यवसायात रमलो असतो पण माझ्या लक्षात आले की मराठी प्रकाशन व्यवसाय फारसा फायदा करणारा व्यवसाय नाही . पुस्तक विक्रेत्यांचे काहीही न करिता द्यावे लागणारे भरमसाट कमिशन आणि  पुस्तक विकत घेऊन वाचणारे फार थोडे मराठी लोक ह्यामुळे मराठी पुस्तकांची विक्री इंग्रजी पुस्तकांच्या विक्रीसारखी नसते. माझे लेखक खूप मोठे होते . सुंदर छपाई  आणि अप्रतिम कागद  असेल तरच हा व्यवसाय करायचा हे मी ठरविले होते.  मी तसे खूप प्रयत्न केले . मला  खूप शिकायला मिळाले . अनेक माणसं भेटली . माझे जीवन समृद्ध झालं.
एकदा अनंतराव आणि सुशीलाबाई मुंबईला आल्या होत्या. दोघेही  माझ्या पार्ल्याच्या कार्यालयात  आले होते. त्यांना माझ्या उद्योगाची माहिती करून घ्यायची होती. पदार्थविज्ञानातील पी.एच डी, असलेला मी कसला उद्योग करतो , हे त्यांना पहायचे होते . समजून घ्यायचे होते. मी रंग विज्ञान- तंत्रज्ञान- गणकयंत्र ह्या विषयाचा तज्ञ. मी त्यांना कलर फिजिक्स , कलर केमिस्ट्री , रंग तंत्रज्ञान आणि गणकयंत्र ह्या विषयावर एक तास गणकयंत्रावर माहिती देत होतो. ते मला प्रश्न विचारत होते. २-३ तास चर्चा चालू होती. मग ते मला म्हणाले , ' तुझी कमाल आहे . कशाला ह्या प्रकाशन व्यवसायात पडला आहेस? तुझी आवड आणि इतर वाचन छान आहे . पण तू हे सर्व का करतोस .' . तेव्हा मी त्यांना माझे डीटीपी सेंटर दाखविले. माझे दुसरे एक डीटीपी सेंटर औरंगाबादला होते . मग त्यांना थोडे आश्चर्य वाटले . आजही माझी पुतणी गेल्या ३० वर्षापासून ते  डीटीपी सेंटर चालवीत असते आणि तिने शेकडो पुस्तकांची अक्षर जुळवणी केली आहे.  असा मी प्रकाशक झालो होतो आणि मला पहिला मोठा लेखक मिळाला .  

अनंत एनक्लेव्हच्या बाजूलाच आहे मराठवाडा साहित्य परिषद  आहे . येथे अनंत भालेराव ह्यांचा पुतळा दर्शनी भागात दिसतो .
मराठवाडा प्रेसची इमारत येथे होती. त्या भागात  मोठे छपाई यंत्र होते . हजारो प्रती काही मिनिटात छापून होत असत . 'मराठवाडा; आधुनिक होत होता . दर्डांचा 'लोकमत' औरंगाबादेत सुरु झाला आणि  तीव्र स्पर्धेला सुरुवात झाली. वितरण स्पर्धा वाढली. त्यापुढे टिकाव धरणे कठीण होत गेले. अनेक 'मराठवाड्या'तील उपसंपादक , पत्रकार , लेखक  'लोकमत' कडे गेले. दोन्ही वर्तमानपत्रांची स्पर्धा तीव्र होत गेली. दर्डानी आपला जम बसविला आणि एक दिवस 'मराठवाडा ' बंद झाला.  
प्रसिद्ध सरस्वती भुवन शिक्षण संस्था . ह्याच मैदानात अनेक राजकीय सभा गाजल्या . मराठी साहित्य संमेलन येथेच भरले होते . अनेक मोठ्या साहित्यिकांना पाहण्यासाठी मी त्या संमेलनाला आलो होतो. आचार्य अत्रे आणि अनंत कणेकरांनी येथे भरलेले मराठी साहित्य संमेलन गाजविले होते. 

या ठिकाणी शारदा मंदिर ही मुलींची पहिली शाळा सुरु झाली होती . आज त्या शाळेची  नवी इमारत आहे आणि येथे मुलींची प्राथमिक शाळा भरते .

असा हा परिसर . अनेक आठवणी जागा करणारा , 













Wednesday, March 13, 2019

कुंभमेळा आणि स्वच्छता अभियान

कुंभमेळा आणि स्वच्छता अभियान
मला कुंभमेळा असो की खूप गर्दी जेथे होते व तेथील  देवाचे दर्शनही नीट होत नाही अशी  देऊळे ह्याबद्दल फारसे आकर्षण वाटत नाही. तिरुपती असो की पंढरपूर, तेथील रांगेत उभे राहून दर्शन घेणे महाकठीण. दोनतीनदा गेलो आहे ह्या देवळात. आतां जाईलच असे नाही. अजून काशी विश्वेश्वराला गेलो नाही. हृषिकेशला गेलो ते हिमालयात जातांना दिसणारी गंगा पाहण्यासाठी. त्यावेळी गंगा आरती हा प्रकार फार आवडला. पंचमहाभूतांची पूजा म्हणजे निसर्गाची पूजा आणि निसर्ग म्हणजेच देव. मूर्ती ही देवाचे  प्रतीक असते.
ह्यावर्षीचा कुंभमेळा खूप गाजलाय. २१ कोटी लोक ह्या मेळ्याला जाऊन आले. जे लोक प्रत्यक्ष जाऊन आले त्यांनी जी रसभरीत वर्णने केली ती ऐकून मी खरोखरच आश्चर्यचकित झालो.
माझा मुंबईत स्थायिक झालेला युपीचा एक मित्र आहे. त्याने कुंभमेळ्याचे जे वर्णन केले आहे ते कितपत खरे आहे, असे मला वाटत होते. काल माझ्या बायकोची एक  मैत्रीण भेटली. ती जाहिरात क्षेत्राशी संबंधित आहे. काही कामानिमित्त ती यूपीत गेली होती. तिला वाटलं, आलो आहोत तर जाऊन बघावे कुंभमेळा. ती एकटीच रेल्वेने अलाहाबादकडे निघाली. आपण एकटीच आहोत. एव्हढी प्रचंड गर्दी. बरोबर ओळखीचे कोणीही नाही. ह्या बद्दल थोडीशी चिंतीत होती. तरीही  ती  निघाली. तिला रेल्वेत एक कुटुंब भेटले. गप्पा झाल्या. कुटुंब प्रमुख म्हणाला, 'एकट्याच आहात. काही काळजी करू नका. आमच्या बरोबरच चला. आम्ही जेथे रहाणार आहोत तेथेच आमच्याबरोबर रहा. आमच्याबरोबरच वाहनातून प्रवास करा'. प्रवासात असे सहप्रवासी कुटुंब मिळाले. ती त्यांच्याबरोबरच राहिली. ते गंगा दर्शनासाठी निघाले. तिला त्यांच्या वाहनात जागा नसल्यामुळे ती त्यांना म्हणाली, 'तुम्ही जा, मी दुसरे वाहन करून येते. काळजी करू नका'. तिने दुसरे वाहन केले. थोड्या अंतरावर तिची  रिक्षा थांबली. रिक्षेवाल्याने विचारले, 'दोघांना बरोबर घेऊ कां?' .तिला शंका वाटली. एक व्यक्ती अपंग होती. तिने परवानगी दिली. रिक्षा गंगेकडे निघाली. एक थांबा आला. सर्व वाहने तेथेच थांबली आणि लोक वाहनातून उतरून गंगेकडे चालू लागले. एक पोलीस त्यांच्या रिक्षेजवळ आला. त्याने त्या अपंग व्यक्तीला पाहिले आणि तो रिक्षेवाल्याला म्हणाला, 'पुढे जा. जितके गंगेजवळ जाता येईल तितक्या अंतरावर जा आणि ह्यांना तेथे सोडून येथेच परत घेऊन ये'. ते  सर्वजण अगदी गंगे जवळ गेले. आणि  ती आश्चर्यचकित झाली. सर्वत्र स्वच्छता पाहून ती आवाक झाली. आजूबाजूला खूप गर्दी. लोक गंगेतील स्वच्छ पाण्यात डुबकी घेत होते. तिनेही गंगेच्या पाण्यात डुबकी घेतली. आजूबाजूला कपडे बदलण्यासाठी सोयी सुविधा होत्या. स्नानगृहे होती. स्वच्छतागृहे होती. स्वच्छता कर्मचारी स्वच्छता राखीत होते. लोकही स्वच्छता पाळीत होते. तिला सगळेच आश्चर्यकारक वाटले.
हा तिचा - एका मुंबईच्या स्त्रीचा - प्रत्यक्ष अनुभव ऐकून मी मात्र  चाट पडलो.
योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या सरकारने हे जे काम करून दाखविले आहे,  ते खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. लोकांच्या कांही  श्रद्धा असतात. त्यासाठी लोक अशी गर्दी करतात. गर्दी म्हणजे अस्वच्छता. गर्दी म्हणजे  गैरसोयी. एक सरकार अशी नवी यंत्रणा उभी करते. लोकांच्यासाठी सोयीसवलती उभी करते. सर्व परिसर आणि नदीचे पात्र स्वच्छ ठेवते. हे उल्लेखनीय काम आहे.
आजूबाजूला कच्छसारखे टेन्ट सिटी उभारले आहे, असेही वाचले होते. तशी एका प्रवास कंपनीची जाहिरात ही  वाचली होती. हे प्रत्यक्षात उभे केलेले त्या मैत्रिणीने पाहिले आणि आम्हाला सर्व वर्णन करून सांगितले. अश्रध्द व्यक्ती सुध्दा ह्या कामामुळे चाट पडतात.
मोदी आणि आदित्यनाथ ह्यांच्या टीकाकारांनी ह्या त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक केले पाहिजे.
बदल रहा है| भारत बदल रहा है|

Sunday, March 10, 2019

औरंगाबादच्या आठवणी - ५

बळवंत मोफत वाचनालय

१९७४ साली ही नवी इमारत उभी राहिली. मी १९५८ ते १९६८ पर्यंत येथे नियमित येत असे .

औरंगाबादच्या जुन्या आठवणीत मला नेहमी आठवण  होते ती बळवंत मोफत वाचनालयाची. १९२० साली लोकमान्यांच्या स्मरणार्थ सुरु झालेले हे वाचनालय. माझ्या शाळकरी जीवनात मी संध्याकाळचा रोजचा दीडदोन तास वेळ  ह्या वाचनालयात घालविला आहे. औरंगपुर्यातून खडकेश्वरकडे जाताना हे वाचनालय लागत असे. मी ५वी - ६ वीत होतो. वर्तमानपत्र घरी येत नस , वडिलांना तुटपुंजा पगारामुळे वर्तमानपत्र घेणे  परवडत नव्हते. मला खेळापेक्षा वाचनाची अधिक आवड होती. हे मोफत वाचनालय होते. मराठी आणि इंग्रजी दोन्ही वर्तमानपत्रे तेथे येत असत. उभे राहून  Stand वर ठेवलेले वर्तमानपत्र वाचावे लागत असे. काही वर्तमानपत्र वाचण्यासाठी लोकांची रांग लागत असे. त्यावेळी माझे दुसरे वर्तमानपत्र चाळून होत असत. केसरी - मराठा - लोकसत्ता ह्यासाठी वाचक नंबर लावत असत. इंग्रजीमध्ये टाइम्स लोकप्रिय होताच. नोकरीसाठी जाहिराती बघण्यासाठी तरुण मुले आवर्जून हे वर्तमानपत्र वाचत असत. आमच्या इंग्रजी शिक्षकाने रोज इंग्रजी वर्तमानपत्रातील अग्रलेख वाचत जा, असा सल्ला दिला होता. त्यामुळे तुमचे इंग्रजी सुधारेल असे त्यांचे म्हणणे होते. इंग्रजीतील अग्रलेख  वाचून त्यावेळी फारसे कळत नसे. मराठी माध्यमाच्या मुलांना काय कळणार तो इंग्रजी भाषेतील अग्रलेख ?
मला त्यावेळी आचार्य अत्रे ह्यांचा 'मराठा' आणि 'नवयुग' हे दोन्हीही  खूप आवडत असे . त्यानंतर  ह रा महाजनी ह्यांचा 'लोकसत्ता' आवडत असे . 'सकाळ' आणि 'केसरी' ही  वाचत असे . अधूनमधून पुण्याचा 'सह्याद्री'. आमच्या अनंतराव भालेराव ह्यांचा 'मराठवाडा' वाचूनच आम्ही मोठे झालो. आचार्य अत्रे ह्यांचा मराठा वाचल्याशिवाय मात्र चैन पडत नसे. अत्रे -फडके, अत्रे - खांडेकर, अत्रे - प्रबोधनकार, हे सगळे वाद आजही स्मरतात. नुसती धमाल. अत्रे ओरबाडून काढीत असत. त्यांची भाषा शैली तुफान होती. मी ते सारे लेख ह्याच वाचनालयात उभे राहून वाचले होते . त्यावेळी पंडित नेहरू आमचे आराध्य दैवत होते . ते गेले तेंव्हा आचार्य अत्रे ह्यांनी त्यांच्यावर लिहिलेले लेख आजही आठवतात. सावरकर गेले तेंव्हा अत्र्यांनी लिहिलेला लेख आजही आठवतो. मी मुंबईला पहिल्यांदा शिवाजी पार्कला गेलो तेंव्हा सावरकर सदन बघितले ते अत्र्यांनी त्याबद्दल लिहिले होते ते आठवले म्हणून. त्यावेळी अत्र्यांचा 'नवयुग' अधिक आवडत असे.  नंतर 'मार्मिक' मधील व्यंगचित्रे बघू लागलो. अत्रे - ठाकरे वादाने फार गचाळ वळण घेतले होते. ते फारसे आवडत नसे. ह रा महाजनी ह्यांची 'रविवारची चिंतनिका' आवडत असे. महाराष्ट्र टाइम्स सुरु झाला आणि पहिल्या दिवसापासून तो घरी येऊ लागला. कित्येक वर्ष आणि आजही मी 'मटा'चा वाचक आहे . 'काय सांगू तुम्हाला' हे द्वा.भ .कर्णिकांचे सदर हे माझे त्यावेळचे आवडते सदर. विजय तेंडुलकरांची 'कोवळी उन्हे' हे माझे दुसरे आवडते सदर. परुळेकरांचा 'सकाळ' म्हणजे खरे बातमी पत्र. त्यात बातमी ही 'बातमी' असे . तिखटमीठ लावून बातम्या छापत नसत. आज तशा  बातमीपत्राची विशेष गरज आहे असे वाटते. आज आपला पत्रकार किंवा बातमीदार ह्यांच्यावर फारसा विश्वास राहिलेला नाही. विकाऊ पत्रकारिता आणि टेबल न्यूजमुळे वर्तमानपत्रे वाचणे मी जवळजवळ सोडून दिले आहे. केवळ ५-१० मिनिटे वर्तमानपत्र चाळत असतो.

आज ह्या वाचनालयास खूप वर्षाने भेट दिली. वाचनालयाचे सगळे रूपच बदललेले दिसून आले. छान इमारत उभी आहे. १९७१ सालीच बांधलेली आहे. खरोखरच  सुंदर इमारत. बसण्याची छान व्यवस्था आहे. तसे वर्तमानपत्रे वाचणे मोफतच  आहे. वाचकांची चांगली सोय झाली आहे. स्टाफ चांगले स्वागत करतो.
स्टाफच्या परवानगीने मी ह्या वाचनालयाचे काही फोटो घेतले. ते फोटो खाली देत आहे. बदललेल्या औरंगाबादेत हे एक सुरेख वाचनालय आहे . माझे आयुष्य ह्या वाचनालयाने बदलले. त्यामुळे मी विविध विषयावर वाचू लागलो . माझ्यात वाचण्याची आवड निर्माण झाली आणि माझे आयुष्य समृद्ध झाले. असेहे बळवंत मोफत वाचनालय १९२0 साली सुरु झाले होते. औरंगाबादच्या वाचन संस्कृतीचा हा एक भाग.
बळवंत मोफत वाचनालय, औरंगाबाद 

वाचकांची  बसण्याची सुरेख व्यवस्था 

वाचनालयाचा दर्शनी भाग 

आम्ही उभे राहून वाचत होतो. आज अशी सुंदर आसन व्यवस्था आहे . 
ह्या वाचनालयाला भेट दिल्यानंतर खडकेश्वरकडे चालू लागलो. न्यु मिडल स्कूलच्या इमारतीनंतर बाळकृष्ण महाराजांचे मंदिर लागले. बाहेरून ओळखलेच नाही, समोर दोनमजली इमारत उभी आहे. मंदिर मागे आहे. ते शोधत मुख्य गेटमधून मागच्या बाजूस गेलो आणि ते समाधी स्थळ दिसले. मी लहान असताना वडिलांच्या बरोबर येथे आलो होतो. वडिलांची खूप श्रद्धा होती. ते रोज येथे येत असत. आज त्यांची आठवण झाली. ते बरोबर नव्हते: पण मी त्यांच्या आठवणीमुळे ह्या समाधीचे  दर्शन घेतले . एकेकाळी फार सुंदर , शांत आणि टुमदार असे हे मंदिर होते . आज दर्शनी भागात दुकाने आहेत . मंदिराची फारशी देखभाल होत नाही असे दिसते .
गुलमंडीकडून खडकेश्वरकडे जाताना अनेक देवळे लागतात. सरस्वती भुवनकडे जाताना नाथांचे देऊळ लागते. एकनाथ महाराज औरंगाबादेत असत तेंव्हा ते त्यांचे घर होते. त्या नाथ मंदिरात मी लहान असताना अनेक किर्तने ऐकली आहेत. सिन्नरकर महाराज, पाचलेगांवकर महाराज , कीर्तनकार आफळे ही नांवे आठवतात. किर्तन हा प्रकार मनोरंजक आहे. भाषावृद्धीसाठी खूप छान आहे. गोष्ट कशी रंगवावी हे त्यातून समजते. संत वांग्मयाची छान ओळख होते. अभंगाची गोडी लागते.
औरंगपुर्यात एकानंतर एक देवळे आहेत. दत्तमंदिर , नाथ मंदिर , ओंकारेश्वर , नागेश्वर , बाळकृष्ण महाराज समाधी आणि खडकेश्वर. ग्रामदैवत सुपारी मारुती.

बाळकृष्ण महाराज समाधी स्थळ 
बाळकृष्ण महाराज समाधी दर्शनानंतर पुढे चालू लागलो. नागेश्वर मंदिर दिसले. समोरचा भाग वेगळाच वाटत होता .तसाच पुढे चालत गेलो. समोर खडकेश्वर मंदिर दिसले. दुरूनच फोटो घेतला. ह्या मंदिराचे तसे खूप महत्व . ह्या मंदिराजवळ एक मोठी विहीर होती.आजही असेल. औरंगाबाद शहरातील सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे विसर्जन ह्या  विहिरीत होत असे. मिरवणुकीने सर्व गणपती येथे येत. त्यांची सामुदायिक आरती होत असे  आणि त्यानंतर विसर्जन होत असे. मी तो सोहळा अनेक वर्षे पाहीला होता त्याची आठवण झाली. आज मंदिर नवे दिसते आहे. प्रत्यक्ष मंदिरात गेलो नाही.
मंदिरांच्या बाजूला एकनाथ संशोधन मंदिर आहे. मराठवाड्यातील इतिहास संशोधक येथे काम करीत असत . न शे पोहनेरकर ह्यांचा ह्या संस्थेशी जवळचा संबंध होता. आज ही इमारत जुनीच दिसते . ह्या संस्थेने इतिहास संशोधनाचे महत्वपूर्ण काम केले आहे.
खडकेश्वर मंदिर 
एकनाथ संशोधन मंदिर 





Saturday, March 9, 2019

औरंगाबादच्या आठवणी -४

शासकिय ज्ञानविज्ञान महाविद्यालय , औरंगाबाद
Government College of Arts and Science , Aurangabad

मी औरंगाबादच्या सरकारी ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी. १९६२ साली पीपीसीसाठी ह्या महाविद्यालयात दाखल झालो. आमचे महाविद्यालय होते औरंगजेबाने बांधलेल्या किलेअर्क ह्या इमारतीत. त्या इमारतीचे हे सुंदर चित्र . आज तेथे इतर कांही संस्था कार्यरत आहेत असे दिसते. ह्या किलेअर्कमध्ये जनाना महल आणि मर्दाना महल असे दोन महाल होते. आमचे वर्ग आणि प्रयोगशाळा येथेच भरत होते. हा परिसर अतिशय निसर्गरम्य होता. खूप दाट झाडी होती . किलेअर्कच्या मागेच हिमायत बाग होती. अशी ही सुंदर ऐतिहासिक वास्तू. आमचे  वर्ग ज्या दिवाणखान्यात भरत असत तेथे १२०-१३० विद्यार्थी सहज बसत असत, शिक्षकांचा आवाज शेवटच्या बाकावरील मुलालाही स्पष्ट ऐकू येत असे.  काही वर्षांनी सुभेदारी गेस्ट हाउसच्या बाजूला महविद्यालयाची नवी इमारत झाली .

किलेअर्क: औरंगजेबाने बांधलेली ही इमारत. दाट झाडी. सुंदर कारंजी, पायर्या चढून गेल्यावर उजव्या बाजूला तळमजल्यावर गणिताचा वर्ग, डाव्या बाजूला वनस्पतीशास्त्र / जीवशास्त्र वर्ग. इमारतीच्या दुसर्या मजल्यावर पदार्थविज्ञान प्रयोगशाळा आणि  दोन्ही बाजूला दोन मोठे वर्ग . त्याच्याच मागील बाजूस रसायनशास्त्र प्रयोगशाळा. इमारतीच्या मागे हिमायत बाग, एका मोगल राज्याच्या राणीच्या महालात असलेले हे ज्ञानविज्ञान महाविद्यालय.
( Picture: Taken from Google Images - Thanks to Google )

शासकीय गेस्ट हाउसच्या बाजूने गेलो तर किलेअर्कला जाण्यासाठी हा दरवाजा लागत असे. आजची नवी इमारत हा दरवाजा ओलांडलाकी लागते . 
ह्या दरवाजातून सुभेदारी गेस्ट हाउसच्या मार्गे किलेअर्कला जाण्याचा मार्ग आहे. एका बाजूला जिल्ह्याधिकारी निवासस्थान होते. ते आज तेथे  दिसत नाही.
आज  किलेअर्कला असलेले महाविद्यालय राहिलेले नाही. त्यावेळी आमचे प्राचार्य होते डॉ मा. गो.देशमुख. नागपूरहून आलेले. त्यावेळी ह्या मराठी साहित्यिकाने औरंगाबाद खुप  गाजविले. वक्ता असावा तर तो मा.गो. देशमुखासारखा . त्यांची अनेक भाषणे ऐकली. तसा मराठी हा आमचा दुय्यम विषय. आम्ही विज्ञानाचे विद्यार्थी. मराठी साहित्याची गोडी लावली ती त्यांनी आणि त्यांचे सहकारी गो.मा.पवार आणि वसंत कुभोजकर. त्यावेळी अनेक मोठे मराठी साहित्यिक आमच्या महाविद्यालयात येऊन गेले ते ह्या मराठीच्या प्राध्यापकामुळेच.
डॉ मुतालिक हे आमचे इंग्रजी विभागप्रमुख. त्यांचा इंग्रजीचा तास आजही आठवतो. त्यांनी इंग्रजी भाषेची गोडी लावली. त्यांचे रसाळ बोलणे मंत्रमुग्ध करीत असे. Bernard Shaw समजला तो डॉ मुतालिक ह्यांच्यामुळेच. नाट्यवाचन ऐकावे ते त्यांचेच. मला नाट्यविषयाची गोडी लागली ती त्यांच्यामुळेच. नाटक हा प्रकार त्यावेळीपासून आवडू लागला. त्याच वेळी कुलकर्णी नावाचे दुसरे इंग्रजी प्राध्यापक होते. ते होते कर्नाटकी.  नंतर ते मराठवाडा विद्यापीठात गेले.
विज्ञान विषयाचे सर्व प्राध्यापक फार  नावाजलेले होते. डॉ करंबेळकर हे रसायन शास्त्र विभाग प्रमुख. हा माणूस देवमाणूस होता. अतिशय शांत, धीर गंभीर व्यक्तिमत्व. त्यांचा एक  दरारा होता. ते  अतिशय मृदु बोलणारे होते. Organic Chemistry सारखा किचकट विषय  ते फार सुंदर पद्धतीने शिकवीत असत. कब्बीनवाऱ सर Inorganic Chemistry हा विषय शिकवीत असत तर संपतराय  सर Physical chemistry हा विषय अतिशय छान शिकवीत असत. १९६२च्या युद्धानंतर महाविद्यालयात NCCचे  शिक्षण सक्तीचे झाले होते. कब्बीनवार सर  NCC प्रमुख होते. लष्करी शिक्षण सक्तीचे करणे आवश्यक आहे, हे आज मला विशेष जाणवते. माझे अनेक मित्र NCC चे 'C' Certificate घेऊन पदवीनंतर लष्करात गेले आहेत. मला त्यावेळी B Certificate मिळाले होते.
 करंबेळकरांचे धाकटे बंधू आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल होते. हा काहीच न बोलणारा ग्रंथपाल एक आगळावेगळा ग्रंथपाल होता.आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथालय एक सुंदर ग्रंथालय होते . मराठवाड्यात असे दुसरे ग्रंथालय नव्हतेच. जे काही विविध विषयावर वाचन केले ते ह्या ग्रंथालयातच. हा ग्रंथपाल मी कधीही विसरणार नाही.
Mathematics ला यशवंत देव आणि प्रोफेसर मुळे होते. देव सर माझ्या मित्राचे म्हणजे ललित पाठकचे मेव्हणे होते त्यामुळे आमची चांगली ओळख होती. ललितमुळे आमचा घरोबा होता. त्यांचा अनेक वर्षांचा सहवास मला लाभला. नंतर त्यांची मुंबईत  बदली झाली आणि मुंबईत त्यांच्याशी माझा संपर्क होताच. मुळे सर अतिशय कडक, वक्तशीर आणि तापट स्वभावाचे होते. त्यांचे शिकविणे अप्रतिम होते. ते हाडाचे गणित शिक्षक होते. आमचा विज्ञानाचा पाया त्यामुळे पक्का झाला.
पदार्थविज्ञान हा विषय शिकविणारे प्राध्यापक होते - मार्तंडराव शेळगांवकर , मिश्रा आणि मुंबईचे पारसी असलेले उमादीकर . तिघांनीही माझ्यात ह्या विषयाची गोडी निर्माण केली. मी त्यावेळी ह्या विषयात विद्यापीठात दुसरा आलो आणि त्याच विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मला दक्षिणा फेलोशिप मिळाली. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी केंद्रीय अणूउर्जा  खात्याची १५० रुपये दरमहा शिष्यवृत्ती मिळाली. माझे महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षण हे ह्या शिष्यवृत्तीमुळेच शक्य झाले. पुढे मी भाभा अणू संशोधन केंद्रात गेलो व मुंबई विद्यापीठाच्या UDCTमध्ये  पदार्थविज्ञान विषयात Ph.D. केले. मला ह्या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाबद्दल विशेष आपुलकी वाटते त्याचे कारण म्हणजे  माझे जीवन बदलून टाकणारी ही शिक्षणसंस्था आहे. माझा व्यक्तिमत्व विकास येथेच झाला. अनेक विषयांची येथे गोडी येथेच लागली. साहित्य, शास्त्र आणि मनोरंजन ह्या क्षेत्रात मी येथेच रमलो. मी Natural Science Association आणि मराठी मंडळात हिरीहीरीने भाग घेतला. अनेक वादविवाद स्पर्धेत  भाग घेतला. अनेकदा महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.  माझ्या जीवनातील ती सोनेरी वर्षे मी कधीच विसरू शकणार नाही . त्या महाविद्यालयाच्या जागेचे काही फोटो मला गतकाळात रमण्याचा आनंद देतात.
पुढे १९७३-७४ साली ह्याच महाविद्यालयात एक वर्ष पदार्थविज्ञान विषयाचा प्राध्यापक होतो. माझ्या शिक्षकांच्या बरोबरच मी अध्यापन केले. ते वर्ष खूप काही देऊन गेले. माझ्यापूर्वी एक वर्ष  माझी पत्नी ह्याच महाविद्यालयात पदार्थविज्ञान विषयात अध्यापन करीत होती. हा एक योगायोग.

हे आजचे शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. येथे मी १९७३-७४ मध्ये प्राध्यापक होतो.

आजची इमारत ही जुनी झाली आहे. किलेअर्कची मजा ह्या इमारतीत नाही.

हाच तो दिल्ली दरवाजा. आज रस्ता खूप मोठा झाला आहे. दरवाजा अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. हिमायत बागेकडे आणि हरसुल तलावाकडे जाणारा हाच रस्ता. 

शहरातून म्हणजे मच्छली खडक, सिटी चौक मार्गे ह्या मकई गेट मधून किलेअर्क कडे जाता येत असे. आता आजूबाजूला असलेली जागा झोपड्यांनी आणि घरांनीआक्रमित केली असून तेथे बकाल वस्ती झाली आहे . पूर्वी सायकलने ह्या भागातून चढ चढताना आमची दमछाक होत असे. आज कारने रस्ता ओलांडणेही कठीण होऊन बसले आहे. रस्ता असा राहिलाच नाही. सर्वत्र आक्रमण ,


महाविद्यालयात सायकलवरून जाण्याचा रस्ता म्हणजे  व्हाया शहागंज. आज तिकडे जाताना तसाच प्रवास केला. शहागंजाचे  घड्याळ त्यावेळी एक आकर्षण होते . आज तो परिसर पाहिल्यावर अतिशय वाईट वाटले. काय झाले आहे ह्या शहराचे! सर्वत्र अस्वच्छता. येथून जवळच भरणारा आठवडी बाजार आठवतो. येथील कापडाची दुकाने आठवतात. बस स्थानक आठवते. गुलमंडीनंतर बघण्यासारखे शहरातील हे दुसरे ठिकाण होते.   त्याचे काढलेले काही फोटो .

शहागंज 

शहागंजातून सिटी पोलीस चौकीकडे जाणारा हा रस्ता 

शहागंजासमोरील हा आजचा परिसर 

असे हे  आजचे जुने औरंगाबाद शहर 

असे रस्ते, असे शहर. कधी होणार स्मार्ट शहर? पूर्वी हे स्मार्ट शहर होते. छान आणि टुमदार.

Friday, March 8, 2019

तरंग : औरंगाबादच्या जुन्या आठवणी - ३

तरंग : औरंगाबादच्या जुन्या आठवणी - ३: औरंगाबादला नुकताच जाऊन आलो. पुन्हा जुन्या शहरात फेरफटका मारला . आठवणी जाग्या झाल्या . काही फोटो काढले . मागच्या आठवणीत फोटो टाकले नव्हते ...

औरंगाबादच्या जुन्या आठवणी - ३


औरंगाबादला नुकताच जाऊन आलो. पुन्हा जुन्या शहरात फेरफटका मारला. आठवणी जाग्या झाल्या. काही फोटो काढले. मागच्या आठवणीत फोटो टाकले नव्हते पण त्यावर लिहिले होते. ह्यावेळी फोटो काढले.
मी त्यावेळच्या  न्यु मिडल स्कूलचा विद्यार्थी. १९५६ ला त्या शाळेत प्रवेश घेतला. आम्ही हैदराबादहून नुकतेच आलो होतो. भाषिक प्रांतरचनेनंतर मराठी भाषिक आणि मुळ मराठवाड्याचे म्हणून येथे परत आलो. सुपारी मारुतीजवळ रहात होतो. औरंगपुऱ्यातून खडकेश्वरकडे जाणार्या रस्त्यावर आमची शाळा होती. एक दिमाखदार इमारत. त्यापूर्वी त्या शाळेला निझामाच्या काळात उर्दू नावाने ओळखले जात असे. खालील चित्रात ती इमारत दिली आहे . ह्याच इमारतीत मराठवाडा विदयापीठ सुरु झाले होते. आज तेथे जिल्हा परिषदेचे कार्यालय आहे. मूळ इमारत आजही तशीच आहे. ह्या इमारतीबद्दल आजही मला प्रेम वाटते. माध्यमिक शाळेची ३ वर्षे (१९५६-५८) आणि एम.एस,सी (पदार्थविज्ञान) चे एक वर्ष (१९६६ -६७) ह्याच इमारतीत काढले. ते दिवस आठवले की मोठी गंमत वाटते. ह्या भेटीत तो परिसर पुन्हा पाहिला. परिसर स्वच्छ तर नाहीच. इमारतीही पहिल्यासारखी दिमाखदार दिसत नाही. एका सुंदर वास्तूची वाट लावली आहे,असे खेदाने म्हणावेसे वाटते. मूळ इमारत आजही बरी आहे. देखभाल ठीक नाही. समोरची गोलाकार बाग अतिशय सुंदर होती त्याची आठवण झाली.


New Middle School , Aurangabad (1956). In the same Building, Marathwada University was started

New Middle School :This is the right side of the building. Similar building is there on the left side of the main building. These side buildings are now modified. Front portion is totally changed by adding to the main building . Our 6A, 6B , 6C and 6D Classes were held in the Square building.

मूळ इमारतीच्या दोन्ही बाजूला दोन छोट्या इमारती. त्या इमारतीचे रूपच बदलून टाकले आहे, समोरच्या आणि आजूबाजूच्या  भागात उगाचच वाढ केली आहे. वरच्या छतावरून थोडीशी कल्पना येईल. या ठिकाणी आमचे ६वीचे चार मोठे वर्ग होते. दोन पुढे आणि दोन मागे. आज तेथे नुसते केबिनचे जाळे झाले आहे. 
This was the backside of our Marathwada University (1967-68).We  we’re here for a year and shifted to University Campus in 1968
मूळ शाळेच्या इमारतीच्या मागे  मराठवाडा विदयापीठ झाल्यानंतर अशा शेड्स बांधल्या होत्या. आजही त्या इमारती दिसतात. तेथे आमच्या एम.एससी.च्या प्रयोगशाळा होत्या. 
 When Marathwada University was started in School  building of our New Middle School , on the back side of the building  new shades were constructed. Our M.Sc. Physics Lab was in this shade.
(1967-69 ).


This is the backside of Marathwada University in 1967-68. Our M.Sc. Classes were taking place in these shades. University was shifted to New campus in 1968, इन University Campus there are   beautiful buildings for each Department.

येथून पुढे खडकेश्वरकडे जातांना एक नाला ओलांडून जावे लागे. उजव्या बाजूला भडकल गेटकडे जाणारा रस्ता होता. दूरवर सरकारी मल्टीपर्पज हायस्कूलची सुंदर इमारत आहे. तिथे सध्या महाराष्ट्र शासनाचे एक कार्यालय आहे. जाणारा रस्ता अतिशय वाईट अवस्थेत आहे. सध्या इमारत दिसत नाही. समोर शाळेचेच प्रचंड मैदान होते. ते  ताब्यात घेऊन मोठे स्टेडीयम बांधले आहे. आमच्या शाळेच्या इमारतीची वाट लावली आहे. शाळेला खडकेश्वर कडून वळसा घेऊन पुढे जावे लागले. समोरच्या बाजूनी शाळेकडे गेलो. त्याचा दर्शनी भाग हा असा दिसतो. एक दिमाखदार इमारत. अतिशय वाईट अवस्थेत पाहून वाईट वाटले. ह्याच इमारतीत हायस्कूलची चार वर्षे काढली. अनेक आठवणी जाग्या झाल्या. आमचा १० वी एस.एस. सी.चा अभ्यासक्रम नव्हता. ११ वी चा  H.S.M.P.(Higher Secondary Multi-purpose) अभ्यासक्रम होता. मुदलियार कमिशनने सुचविलेला तो अभ्यासक्रम होता . महाविद्यालयाचे एक वर्ष ह्यात समाविष्ट केले होते. अभ्यासक्रम अतिशय अवघड होता. नापास होणार्यांचे प्रमाण ६५ ते ७० % होते. पहिल्या श्रेणीत ४-५ विद्यार्थीच पास होत असत. बायोलॉजी,गणित - पदार्थविज्ञान, सोशलस्टडीज आणि टेक्निकल म्हणजे इंजिनियरीग अभ्यासक्रम आठवीपासूनच  सुरु होत असे.  खालील चित्रात आमच्या शाळेचे चित्र दिले आहे .
This is our Government Multi-Purpose High School, Aurangabad  (1958 - 1963)  I studied in this school  for four years from 8th  to 11th Standard. I got my School certificate HS(MP)SC from this School with Technical subject as optional subject.


This is the backside of  the Govt. Multipurpose High School,  Aurangabad. During Nizam period , it was known as City Intermediate College.
आमच्या शाळेचा हा मागचा भाग. त्या मैदानावरील हा कचरा बघून कुठे आहे "स्वच्छ भारत" असा मला प्रश्न पडला. आजही ही इमारत सुंदर दिसते. येथेच पूर्वी सिटी कॉलेज होते. इंटर झाल्यानंतर विद्यार्थी हैदराबादला उस्मानिया विद्यापीठात पदवी शिक्षणासाठी जात असत. 


This is back side of the Govt. MPHS, Aurangabad. You see shades below the trees. That is our Technical Department equipped with very good Workshop with all industrial equipment. It was the first Technical School in Marathwada. We studied Mechanical and Electrical Engineering, Engineering Drawings, Applied Mathematics, Workshop practical including Carpentry, Lathe Machines, Welding etc. were taught to us from 8th to 11th Standard. If you get first class in 11th standard, admission was given to second year of Diploma in Engineering.
ह्या मूळ इमारतीच्या मागील बाजूस दूरवर ज्या शेड्स दिसत आहेत तेथे टेक्निकल विभाग होता . मोठे वर्कशॉप होते . येथेच मी कारपेंटरी, लेथ मशीन , ड्रिलिंग , वेल्डिंग , इंजिनीअरिंग Drawing इत्यादी अभियांत्रिकी विषय शिकलो . आजही ते स्कील म्हणून मला रोजच्या जीवनात कामाला येत असतात .


आमच्या शाळेच्या मागे प्रचंड मैदान होते . त्या मैदानाचा मोठा भाग सध्या  स्टेडीयमसाठी घेतला आहे . त्याची अवस्था सुद्धा फारशी चांगली नाही.


आज  आमच्या शाळेच्या  इमारतीच्या आजूबाजूची घाण आणि अस्वच्छता बघून वाईट वाटते. भडकल गेटकडून खडकेश्वरकडे जाणारा रस्ता वाईट अवस्थेत आहे. शहराचे जुने सौंदर्य नाहीसे झाले आहे. 'जुने जाऊ द्या मरणालागुनी', असे असले तरी नवे कुठे दिसते आहे .