Saturday, March 9, 2019

औरंगाबादच्या आठवणी -४

शासकिय ज्ञानविज्ञान महाविद्यालय , औरंगाबाद
Government College of Arts and Science , Aurangabad

मी औरंगाबादच्या सरकारी ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी. १९६२ साली पीपीसीसाठी ह्या महाविद्यालयात दाखल झालो. आमचे महाविद्यालय होते औरंगजेबाने बांधलेल्या किलेअर्क ह्या इमारतीत. त्या इमारतीचे हे सुंदर चित्र . आज तेथे इतर कांही संस्था कार्यरत आहेत असे दिसते. ह्या किलेअर्कमध्ये जनाना महल आणि मर्दाना महल असे दोन महाल होते. आमचे वर्ग आणि प्रयोगशाळा येथेच भरत होते. हा परिसर अतिशय निसर्गरम्य होता. खूप दाट झाडी होती . किलेअर्कच्या मागेच हिमायत बाग होती. अशी ही सुंदर ऐतिहासिक वास्तू. आमचे  वर्ग ज्या दिवाणखान्यात भरत असत तेथे १२०-१३० विद्यार्थी सहज बसत असत, शिक्षकांचा आवाज शेवटच्या बाकावरील मुलालाही स्पष्ट ऐकू येत असे.  काही वर्षांनी सुभेदारी गेस्ट हाउसच्या बाजूला महविद्यालयाची नवी इमारत झाली .

किलेअर्क: औरंगजेबाने बांधलेली ही इमारत. दाट झाडी. सुंदर कारंजी, पायर्या चढून गेल्यावर उजव्या बाजूला तळमजल्यावर गणिताचा वर्ग, डाव्या बाजूला वनस्पतीशास्त्र / जीवशास्त्र वर्ग. इमारतीच्या दुसर्या मजल्यावर पदार्थविज्ञान प्रयोगशाळा आणि  दोन्ही बाजूला दोन मोठे वर्ग . त्याच्याच मागील बाजूस रसायनशास्त्र प्रयोगशाळा. इमारतीच्या मागे हिमायत बाग, एका मोगल राज्याच्या राणीच्या महालात असलेले हे ज्ञानविज्ञान महाविद्यालय.
( Picture: Taken from Google Images - Thanks to Google )

शासकीय गेस्ट हाउसच्या बाजूने गेलो तर किलेअर्कला जाण्यासाठी हा दरवाजा लागत असे. आजची नवी इमारत हा दरवाजा ओलांडलाकी लागते . 
ह्या दरवाजातून सुभेदारी गेस्ट हाउसच्या मार्गे किलेअर्कला जाण्याचा मार्ग आहे. एका बाजूला जिल्ह्याधिकारी निवासस्थान होते. ते आज तेथे  दिसत नाही.
आज  किलेअर्कला असलेले महाविद्यालय राहिलेले नाही. त्यावेळी आमचे प्राचार्य होते डॉ मा. गो.देशमुख. नागपूरहून आलेले. त्यावेळी ह्या मराठी साहित्यिकाने औरंगाबाद खुप  गाजविले. वक्ता असावा तर तो मा.गो. देशमुखासारखा . त्यांची अनेक भाषणे ऐकली. तसा मराठी हा आमचा दुय्यम विषय. आम्ही विज्ञानाचे विद्यार्थी. मराठी साहित्याची गोडी लावली ती त्यांनी आणि त्यांचे सहकारी गो.मा.पवार आणि वसंत कुभोजकर. त्यावेळी अनेक मोठे मराठी साहित्यिक आमच्या महाविद्यालयात येऊन गेले ते ह्या मराठीच्या प्राध्यापकामुळेच.
डॉ मुतालिक हे आमचे इंग्रजी विभागप्रमुख. त्यांचा इंग्रजीचा तास आजही आठवतो. त्यांनी इंग्रजी भाषेची गोडी लावली. त्यांचे रसाळ बोलणे मंत्रमुग्ध करीत असे. Bernard Shaw समजला तो डॉ मुतालिक ह्यांच्यामुळेच. नाट्यवाचन ऐकावे ते त्यांचेच. मला नाट्यविषयाची गोडी लागली ती त्यांच्यामुळेच. नाटक हा प्रकार त्यावेळीपासून आवडू लागला. त्याच वेळी कुलकर्णी नावाचे दुसरे इंग्रजी प्राध्यापक होते. ते होते कर्नाटकी.  नंतर ते मराठवाडा विद्यापीठात गेले.
विज्ञान विषयाचे सर्व प्राध्यापक फार  नावाजलेले होते. डॉ करंबेळकर हे रसायन शास्त्र विभाग प्रमुख. हा माणूस देवमाणूस होता. अतिशय शांत, धीर गंभीर व्यक्तिमत्व. त्यांचा एक  दरारा होता. ते  अतिशय मृदु बोलणारे होते. Organic Chemistry सारखा किचकट विषय  ते फार सुंदर पद्धतीने शिकवीत असत. कब्बीनवाऱ सर Inorganic Chemistry हा विषय शिकवीत असत तर संपतराय  सर Physical chemistry हा विषय अतिशय छान शिकवीत असत. १९६२च्या युद्धानंतर महाविद्यालयात NCCचे  शिक्षण सक्तीचे झाले होते. कब्बीनवार सर  NCC प्रमुख होते. लष्करी शिक्षण सक्तीचे करणे आवश्यक आहे, हे आज मला विशेष जाणवते. माझे अनेक मित्र NCC चे 'C' Certificate घेऊन पदवीनंतर लष्करात गेले आहेत. मला त्यावेळी B Certificate मिळाले होते.
 करंबेळकरांचे धाकटे बंधू आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल होते. हा काहीच न बोलणारा ग्रंथपाल एक आगळावेगळा ग्रंथपाल होता.आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथालय एक सुंदर ग्रंथालय होते . मराठवाड्यात असे दुसरे ग्रंथालय नव्हतेच. जे काही विविध विषयावर वाचन केले ते ह्या ग्रंथालयातच. हा ग्रंथपाल मी कधीही विसरणार नाही.
Mathematics ला यशवंत देव आणि प्रोफेसर मुळे होते. देव सर माझ्या मित्राचे म्हणजे ललित पाठकचे मेव्हणे होते त्यामुळे आमची चांगली ओळख होती. ललितमुळे आमचा घरोबा होता. त्यांचा अनेक वर्षांचा सहवास मला लाभला. नंतर त्यांची मुंबईत  बदली झाली आणि मुंबईत त्यांच्याशी माझा संपर्क होताच. मुळे सर अतिशय कडक, वक्तशीर आणि तापट स्वभावाचे होते. त्यांचे शिकविणे अप्रतिम होते. ते हाडाचे गणित शिक्षक होते. आमचा विज्ञानाचा पाया त्यामुळे पक्का झाला.
पदार्थविज्ञान हा विषय शिकविणारे प्राध्यापक होते - मार्तंडराव शेळगांवकर , मिश्रा आणि मुंबईचे पारसी असलेले उमादीकर . तिघांनीही माझ्यात ह्या विषयाची गोडी निर्माण केली. मी त्यावेळी ह्या विषयात विद्यापीठात दुसरा आलो आणि त्याच विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मला दक्षिणा फेलोशिप मिळाली. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी केंद्रीय अणूउर्जा  खात्याची १५० रुपये दरमहा शिष्यवृत्ती मिळाली. माझे महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षण हे ह्या शिष्यवृत्तीमुळेच शक्य झाले. पुढे मी भाभा अणू संशोधन केंद्रात गेलो व मुंबई विद्यापीठाच्या UDCTमध्ये  पदार्थविज्ञान विषयात Ph.D. केले. मला ह्या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाबद्दल विशेष आपुलकी वाटते त्याचे कारण म्हणजे  माझे जीवन बदलून टाकणारी ही शिक्षणसंस्था आहे. माझा व्यक्तिमत्व विकास येथेच झाला. अनेक विषयांची येथे गोडी येथेच लागली. साहित्य, शास्त्र आणि मनोरंजन ह्या क्षेत्रात मी येथेच रमलो. मी Natural Science Association आणि मराठी मंडळात हिरीहीरीने भाग घेतला. अनेक वादविवाद स्पर्धेत  भाग घेतला. अनेकदा महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.  माझ्या जीवनातील ती सोनेरी वर्षे मी कधीच विसरू शकणार नाही . त्या महाविद्यालयाच्या जागेचे काही फोटो मला गतकाळात रमण्याचा आनंद देतात.
पुढे १९७३-७४ साली ह्याच महाविद्यालयात एक वर्ष पदार्थविज्ञान विषयाचा प्राध्यापक होतो. माझ्या शिक्षकांच्या बरोबरच मी अध्यापन केले. ते वर्ष खूप काही देऊन गेले. माझ्यापूर्वी एक वर्ष  माझी पत्नी ह्याच महाविद्यालयात पदार्थविज्ञान विषयात अध्यापन करीत होती. हा एक योगायोग.

हे आजचे शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. येथे मी १९७३-७४ मध्ये प्राध्यापक होतो.

आजची इमारत ही जुनी झाली आहे. किलेअर्कची मजा ह्या इमारतीत नाही.

हाच तो दिल्ली दरवाजा. आज रस्ता खूप मोठा झाला आहे. दरवाजा अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. हिमायत बागेकडे आणि हरसुल तलावाकडे जाणारा हाच रस्ता. 

शहरातून म्हणजे मच्छली खडक, सिटी चौक मार्गे ह्या मकई गेट मधून किलेअर्क कडे जाता येत असे. आता आजूबाजूला असलेली जागा झोपड्यांनी आणि घरांनीआक्रमित केली असून तेथे बकाल वस्ती झाली आहे . पूर्वी सायकलने ह्या भागातून चढ चढताना आमची दमछाक होत असे. आज कारने रस्ता ओलांडणेही कठीण होऊन बसले आहे. रस्ता असा राहिलाच नाही. सर्वत्र आक्रमण ,


महाविद्यालयात सायकलवरून जाण्याचा रस्ता म्हणजे  व्हाया शहागंज. आज तिकडे जाताना तसाच प्रवास केला. शहागंजाचे  घड्याळ त्यावेळी एक आकर्षण होते . आज तो परिसर पाहिल्यावर अतिशय वाईट वाटले. काय झाले आहे ह्या शहराचे! सर्वत्र अस्वच्छता. येथून जवळच भरणारा आठवडी बाजार आठवतो. येथील कापडाची दुकाने आठवतात. बस स्थानक आठवते. गुलमंडीनंतर बघण्यासारखे शहरातील हे दुसरे ठिकाण होते.   त्याचे काढलेले काही फोटो .

शहागंज 

शहागंजातून सिटी पोलीस चौकीकडे जाणारा हा रस्ता 

शहागंजासमोरील हा आजचा परिसर 

असे हे  आजचे जुने औरंगाबाद शहर 

असे रस्ते, असे शहर. कधी होणार स्मार्ट शहर? पूर्वी हे स्मार्ट शहर होते. छान आणि टुमदार.

No comments:

Post a Comment