Thursday, October 6, 2016

आनंदाचे झाड कुठे असते ?


एक जीवनप्रवास ....... सुखाचा .........दु:खाचा .........वेदनेचा........निखळ आनंदाचा........... सुखद सहवासाचा.......... हव्या हव्याशा वाटणाऱ्या कोमल तरल भावनांचा ....... नको असणाऱ्या आठवणींचा ......... यशाच्या ध्येयत्ताऱ्याकडे झेपावणारा ......कधी कधी अगतिकतेचा ......अनेकदा विलक्षण निसर्ग सौंदर्यात हरवलेला ....... तर कधी कधी निसर्गातील भीषण वादळासारखा – नको असणारा – सर्व संपवणारा ..... कधी अंतर्मुखतेकडून अध्यात्माकडे नेणारा .......तर कधी भौतिक सुखाची उधळण करणारा ...... कधी स्वतःला विसरणारा .......तर कधी कधी फक्त स्वतःचाच विचार करणारा ...... मनस्वी ......
आपल्याला सूर्य उर्जा देतो. न चुकता ,नियमितपणे तो त्याचे काम बिनभोबाट खंडही न होऊ देता अविरतपणे चालू ठेवतो. तो रोज सकाळी आपल्याला जागा करतो व जगण्याची नवी आशा निर्माण करून जगण्याचे नवे सामर्थ्य देतो. संध्याकाळी तो मावळल्यानंतर एक उदास अंधार निर्माण करतो. त्या रात्रीच्या गर्भातच असतो उद्याचा उष:काल.
आपलं आयुष्य वाहत राहते ...एखाद्या नदीसारखे – अखंड – न संपणारं ... आपण अनेक अडचणींना तोंड देत पुढे जात असतो . यश-अपयश सामोरे येत असते. नैराश्य आणि आशावाद ह्यांच्या दोन टोकावर आपण झोके घेत असतो. आनंद – सुख , आशा – निराशा ह्यांच्या हिंदोळ्यावर आपण रमतो , दमतो आणि विसावतो.
अगदी छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपले मन आपला आनंद गमावून बसते . त्याचा शोध घेणे तसे कठीणच असते. साधं बघा . आपला शेजारी , मित्र किंवा नातेवाईक जर आनंदी असेल तर आपणही त्याच्या आनंदात सामील व्हावयास हवं . त्यावेळी आपल्याला दु:ख का बरे वाटावे ? आपण कोणताही पाश न स्वीकारता इतरांच्या सुखदु:खात सामील कां होऊ शकत नाही ?
कोणत्याही दु:खाच्या क्षणी आपण हे लक्षात घेतले पाहिजे की “ हे ही दिवस जातील “. तसेच सुखाचे दिवस येतात नि जातात. ते ही असेच येतील आणि जातील.
हे जग बदलतंय . बदलणारच. बदलत राहणं ( Change ) हा एक स्थायीभाव आहे, हे आपल्या लक्षात असावयास हवं .
आपण आणि आपले जीवन इतक्या विविध गोष्टीवर अवलंबून असतं. अनेक बाह्य घडामोडीमुळे आपल्या जीवनावर सतत परिणाम होत असतो. ‘Expect the Unexpected’, हेच आपल्या लक्षात येत नाही.
आपण आपल्या स्वतःला घडवीत गेले पाहिजे. आपला ‘ आत्मानंद ‘ हेच खरे आनंदाचे स्वरूप आहे . मन:शांती ( Inward Peace ) फार महत्वाची असते. आपल्याला जर खरा आत्मिक आनंद हवा असेल तर आपल्याला जे हवे ( श्रेयस किंवा प्रेयस ) त्याचा आपण त्याग करावयास हवा. आपण आपल्याला विसरायला हवं .चित्रकाराला चित्रातून मिळणारा आनंद , शिल्पकाराला शिल्पकृती पूर्ण झाल्याचा आनंद हे आनंदाचे खरे रूप. तेच आपण शोधले पाहिजे.
प्रत्येकाला आनंदी असावे असेच वाटत असते. कोणालाही दु:ख नकोच असते. दु:ख हे आयुष्याच्या जगण्याच्या अवस्थेशी निगडीत आहे. दु:ख आणि त्रास हा जगण्याचा अविभाज्य भाग आहे . आशा – आकांक्षा हे दु:खाचे मूळ आहे असे गौतम बुद्धाला जाणवले म्हणून तो हिमालयात निघून गेला. जगातला कोणताही माणूस मरेपर्यंत आनंदी राहू शकत नाही. माणूस हा आनंद त्याच्या स्मशान यात्रेलाच घेऊन जातो. जगनं म्हणजे जन्मल्यापासून वेदनेला घेऊन राहणं. आपण म्हणूनच निवृत्त होण्याचा प्रयत्न करावयास हवा. आशेपासून दूर जावयास हवे. निवृत्त होणं व राजीनामा देऊन अलिप्त राहणे म्हणजेच जगण्याच्या हव्यासातून बाहेर पडणे . ते जमलं पाहिजे.
जीवनपूर्तता कशी प्राप्त होईल ? मन खरे कसे समाधानी असेल? ज्याच्याजवळ आपल्यापेक्षा खूप काही आहे ,त्याच्याकडे न बघता आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे खूप काही नाही व आपल्याकडे इतरांच्यापेक्षा खूप जास्त आहे , असा विचार केला तरच आपण समाधानी होऊ शकू.
एका ख्रिस्त धर्मगुरुनी म्हंटले आहे की , ‘ मी लहान असताना पायातल्या बुटासाठी रडत होतो पण जेव्हा एका व्यक्तीला पायच नाहीत  हे दिसले तेंव्हा मी बुटासाठी रडणे सोडून दिले ‘. आपल्याला अनेक गोष्टी हव्याहव्याशा वाटतात व त्या मिळवण्यासाठी आपण जीवापाड कष्ट करून मिळवतो. परंतु ह्या मिळवलेल्या गोष्टीच अनेक दु:खे निर्माण करीत असतात. अशा मिळवलेल्या वस्तूतून आनंदाच्याऐवजी अनेक दु:खे निर्माण होताना दिसतात आणि आपला भ्रमनिरास होतो. कित्येक लोकांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान गरजा उपलब्ध नसतात . तरीही ही मंडळी सुखी-समाधानी कशी असतात ? आनंद ही मनाची एक अवस्था आहे . ही अवस्था आपण कशी प्राप्त करून घ्यायची हे आपण ठरवले पाहिजे .
आपण आत्मकेंद्रित असावयास नको. आपण आत्मप्रौढीपासून दूर असावयास हवे. आपण हे जर करू शकलो तर छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपले मन दुभंगणार नाही. आपण बौद्धिक आणि आत्मिक  आनंद मिळवू शकू. भौतिक सुखे व पारमार्थिक सुखे ह्याच्याबरोबर आत्मिक सुख ही फारच महत्वाचे आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
भौतिक सुखे मिळाली तरी मन पूर्णपणे समाधानी होईल ह्याची शक्यता नाही. आपण फार छोट्या छोट्या कारणामुळे आनंद गमावून बसत असतो. जर एखाद्याने आपणास जेवणाचे आमंत्रण दिले नाही म्हणून आपण त्याच्यावर राग धरतो. एखाद्या सहकार्याला जास्त पगाराची बढती मिळाली म्हणून आपण चिडतो. आपला सहकारी परदेश प्रवासाला गेला म्हणून आपण जळफळतो. आपल्या मनात नकळत अशा असूया निर्माण होत असतात. त्यामुळे आपण दुसर्यांच्या आनंदात सहभागी होऊ शकत नाहीत.
जगातली सगळीच माणसे खूप छान किंवा खूप वाईट असू शकत नाहीत. अशी एका टोकाची माणसे असू शकत नाहीत. आज चांगली असलेली माणसे उद्याही चांगली असतीलच असे नाही. ती बदलत असतात. जर आपला मित्र किंवा शेजारी त्याला मिळालेल्या यशामुळे आनंदी झाला असेल तर आपणही त्याच्या आनंदात सहभागी व्हावयास हवे.
आपण आपल्या जवळच्या माणसात गुंतणे स्वाभाविक आहे .परंतु न गुंतता गुंतले पाहिजे. आपण एकरूप असून वेगळे असावयास हवे ( Detached Attachment ). कोणत्याही सुखदु:खाच्या क्षणी हे लक्षात ठेवावयास हवे की ‘ हे ही दिवस जातील ‘. नेहमीच सुखाचे किंवा दु:खाचे दिवस नसतात. ते येतात आणि जातात. सुख हे दिवसासारखे असते. रात्र त्या नंतर येतेच. रात्रीच्या गर्भातच उद्याचा उष:काल असतो. ‘ होता होता काळ रात्र झाली ..... ‘ हे लक्षात घेतले पाहिजे. आनंद शोधला पाहिजे . आनंदाच्या झाडाखाली विसावले पाहिजे.


Saturday, October 1, 2016

‘ललित लेणी' तील विचार –सौंदर्य


काही पुस्तके अशी असतात की जी पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतात . प्रत्येक वेळी मनाला वेगळाच आनंद मिळत असतो. काहीतरी वेगळं सांगितलेले असते. पुस्तकाने मनाची पकड घेतलेली असते. एकदम नवा विचार असतो. अशा पुस्तकापैकी एक मनाची पकड घेणारे पुस्तक म्हणजे डॉ राम मनोहर लोहिया ह्यांच्या हिंदी आणि इंग्रजी लेखांचे मराठीत अनुवाद केलेले पुस्तक ‘ललित लेणी’ . हे साहित्यातले एक सुंदर लेणं आहे एव्हढं नक्की. डॉ राम मनोहर लोहिया हे  एक राजकारणातील वादळी व्यक्तिमत्व. हा एक मोठा माणूस .पण आम्हाला ह्या माणसाचं मोठेपण समजलेच नाही. ह्याचे कारण असे की आम्ही छोटी माणसं एवढी छोटी आहोत की ह्या माणसाचे मोठेपण आपल्याला समजलेच नाही.
डॉ राम मनोहर लोहिया 
लोहियांच्या बाबतीत नेमकं उलटं घडलं. त्याच्याबद्दल अनेक  गैरसमज. लोहिया हे गांधीजींचे शिष्य. तरीही त्यांच्या नशिबी सगळेच उलटे होते. इंग्रजी व पोटभरू वृत्तपत्रांनी लोहियांचे विकृत स्वरूप जनतेसमोर मांडले . ह्या माणसाचे मोठेपण कोणालाच समजले नाही . लोहिया समाजाला पचविता आले नाही.
लोहियांचे राजकारणातील स्थान जरी बाजूला ठेवले तर एक समाजसुधारक , एक अर्थशास्त्रज्ञ , एक सौन्दार्यपूजक असे लोहिया अधिक आकर्षक आहेत. बंडखोर लोहिया त्या वेळच्या तरुणांना समजलेच नाहीत. भारतीय समाजाला लोहिया हा हे समजलेच नाहीत. असे हे लोहिया समजून घ्यायचे असतील तर ‘ललित लेणी ‘ हे त्यांचे पुस्तक वाचलेच पाहिजे. त्यामुळेच हा माणूस अधिक चांगला समजू शकेल . पु ल देशपांडे ह्यांच्यासारख्या मराठी साहित्यिकाने ह्या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना अप्रतिम आहे. ती लोहियांचे खरे व्यक्तिमत्व उभी करते. ह्या पुस्तकातील त्यांचे सर्व लेख अनेक नवे विचार सांगून जातात आणि आपल्याला अधिक विचारप्रवृत्त करतात,
भारतीय संस्कृतीच्या लंब्याचवड्या गप्पा मारणारे आणि तथाकथित राष्ट्रवादाच्या गप्पा मारणार्यांनी   लोहिया विचार समजून घेणे आवश्यक आहेत. लोहिया हे खरे भारतीय संस्कृतीचे पुरस्कर्ते होत. लोहियांनी सुद्धा इतिहास आणि पुराणाचा सखोल अभ्यास केला होता.त्यांनी ह्या देशातील शिल्पसौंदर्याचा व ऐतिहासिक स्थळांचा संपूर्ण अभ्यास केला होता. लोहियांच्या लेखातील काही विचारसौंदर्य वेचून मी येथे सादर करीत आहे.
भारतीय संस्कृती
‘ राम , कृष्ण आणि शिव ही भारतीयांना पडलेली परिपूर्णतेची सुंदर स्वप्ने आहेत. भारतमाते आम्हाला शिवाची मती दे, कृष्णाचे अंत:करण दे व रामाची कृती दे . अपरिमित मन देऊन आमची घडण कर ‘ . असे लिहिणारा हा माणूस भारतीय संस्कृतीचा खरा उपासक नव्हे काय ?
लोहिया म्हणतात , “ जे मन भयहीन , वासनाहीन आणि नैराश्यहीन आहे तेच योग्य विचार करू शकते”. निर्भयता , आशावादी , व निरिच्छता ह्या गुणावरच आपण विचारवंत होऊ शकतो. 
'शिल्प' ह्या लेखात ते म्हणतात इतिहासाचे ग्रंथ कधीतरी नाश पावतात म्हणूनच की काय भारतीय जनतेने अनंत काळ प्रचलित राहणाऱ्या कथा अनेक कहाण्याद्वारे लोकांना सांगून ठेवल्या आहेत. इतिहास संतापला . त्याने आपल्यावर सूड घेतला, असे असले तरी भारतीय धर्माने आपली कथा म्हणूनच पाषाणावर चितारली. त्यामुळे हजारो वर्षाची ही संस्कृती शिल्लक राहिली . वाढली .विकसित झाली.
आपल्या कलाकारांनी शिल्पातून बुद्धाचे निरनिराळे रूप दाखविले आहे . त्याबद्दल ते लिहितात ,’ क्रॉसवर हातापायांना खिळे ठोकलेले जसे ख्रिस्ताचे एकच रूप दिसते पण बुद्ध व महावीर ह्यांची निरनिराळी रूपे दिसतात. कोठे चिंतामग्न , कोठे दया किंवा अभय दाखविणारे तर कोठे विकारावर विजय मिळवणारे योगी दिसतात.' आपले भारतीय शिल्पकार हे संपूर्णपणे स्वतंत्र होते आणि त्यांच्या प्रतिभा शैलीला पूर्ण स्वातंत्र्य होते. ' हेच ते वेगळेपण सहज दिसून येते. श्रवणबेळगोळाची महावीराची मूर्ती पाहून लोहीयाना वाटले , ‘ माणसाला आपल्यावर कधीच विजय मिळविता येत नसतो. मनाच्या बैलाला पकडण्यात यश मिळवले तरी त्याला मोकळे सोडता कामा नये "
शिवाचे पुराणातील व्यक्तिमत्व पाहताना त्यांना वाटले,"पुढच्या क्षणाविषयी माणसाची उत्सुकता कदाचित संपूर्णतया कधीच नाहीशी होणार नाही, परंतु वर्तमानकाळात स्वतः बरेचसे गुंतवून घेऊन त्यातून अधिक फलप्राप्ती करणे त्याला शक्य आहे"
अर्ध्या बाजूने स्त्री आणि अर्ध्या बाजूने पुरुष असलेल्या अर्धनारी नतेशेअरच्य मूर्तीकडे पाहून त्यांना वाटते "अर्धागाने पार्वती आणि अर्धागाने शंकर असलेले अर्धनारी नटेश्वराचे रूप म्हणजे एक सर्वोच्च आणि सजीव असे सारे भेद मिटविणारे सृजन आहे ".
भारतीय कलाकेंद्रे प्रमुख शहरापासून दूर आहेत. का ? तर भारतीय इतिहासाचा आत्मा परक्यांच्या नजरेचे , जिच्यावर सतत आघात होत असतात अशी एक नाजूक सुंदरी आहे म्हणून येणाऱ्या –जाणार्यांची आकस्मिक नजर जाणार नाही अशा दूरच्या व निर्जन ठिकाणी ही सुंदरी शिल्पे लपून राहिली आहेत. त्यांची निर्मिती म्हणूनच अशा दूर ठिकाणी केलेली आहे. संस्कृती जपण्याचा हा प्रयत्न दिसतोय.
प्रेम हे सौंदर्याचे जुळे भावंड
सांची , अजिंठा , वेरूळ , नालंदा व चितोड ही भारतीय अवशेशाची व कलाकृतींची चार महत्वाची केंद्रे. ती केंद्रे म्हणजे एक प्रकारे संस्थाच होत. अजंठाबद्दल ते म्हणतात , ‘ ही लेणी म्हणजे भारतीय माणसाचा इतिहास’ आहे' .वेरूळचा विजयस्तंभ पाहून त्यांना वाटते ,’ महान वस्तूतील सौंदर्य समजायला थोडा वेळ लागतो. म्हणून पुन्हा पुन्हा पाहिल्या म्हणजे त्याचा अर्थ उलगडू लागतो’. तर चितोडचा विजयस्तंभ हा ‘ जीव कासावीस करणारे सौंदर्य आहे ‘ , असे त्यांना वाटते. हा मनोहर विजयस्तंभ उभा करून आपला जणू विजयच झाला असे पराभूत रजपुताना तर वाटलं नसावं ? ,असा विचार ते व्यक्त करतात.
दौलताबादचा छोटा स्तंभ पाहून त्यांना वाटते , ‘ ध्येय उच्च पण त्या मानाने साध्य करण्याचे  प्रयत्न छोटे’. असे हे प्रतिक. आपल्या संस्कृतीच्या अपयशाचे द्योतक.
पाषाणातील सुंदर युवती सर्वाना का आकर्षित करतात ? एखादी प्रिय व्यक्ती सुंदर वाटणे किंवा पूर्णत्वाने दिसणे ही गोष्ट योगायोगावर किंवा पाहणार्याच्या वयावर अवलंबून असते'. शिसवीच्या लाकडासारख्या काळ्या अथवा हस्तीदन्तासारखा फिकट पिवळ्या रंगाचा किंवा रागीट अथवा मट्ठ अथवा कुरूप चेहराही कधी कधी कोणाकोणाला मोहक दिसतो. सयामी जुळ्याप्रमाणे प्रेम हे देखील सौंदर्याचे जुळे भावंड आहे. एखाद्या व्यक्तीवर प्रेम असले म्हणजे ती सुंदर दिसू लागते. ते खरेच आहे.
भरवेगाने धावणारी गंगा व संथ वाहणारी यमुना हे भारतीय शिल्पकारांचे दोन अत्यंत प्रिय विषय. गंगा ही विवाहित प्रौढ स्त्री तर अवखळ असणारी यमुना ही नवजात बालिकाच आहे , असे त्यांना वाटते.
लोहिया ब्रम्हचारी होते तरी ते स्त्री सौंदर्याचे पूजक होते . ते कोणार्क बद्दल सांगतात ..
कोणार्क इतका ठसकेदार स्त्री सौंदर्याचा अविष्कार जगात कोठेही सापडणार नाही. कोणार्क येथील शिल्पात संगीत गाणार्या अनेक युवतींची सुंदर चित्रे आहेत. ते तेथे चढून त्या युवतीचे डोळे ,  ओठ नि शरीराची सुंदर वक्राकार वळणे ह्यावर हात फिरवून पाहतात व त्यांना वाटते ..’ ह्या मानवी युवती नसून पाषाण रूप घेतलेल्या अदृश्य स्वर्गीय आकृती आहेत' – असा हा खरा सौंदर्यपूजक माणूस.
शिल्पकृती विध्वंसक व नष्ट करणाऱ्या रोगट मनोवृत्तीबद्दल त्यांना अतिशय राग आहे. ते म्हणतात –‘ खेड्यातील मूर्ख विध्वंसक व षंढ सुसंकृत लोक आपल्या पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृतीचे जतन तर करू शकले नाहीतच पण नवनिर्मितीही करू शकले नाहीत हेच आपले दुर्दैव.
ते पुढे म्हणतात ,"‘नवनिर्मिती हे स्वतंत्र व सार्थ जीवनाचे प्रतिक होय".
शबरीच्या लोककथेबद्दल सांगताना ते लिहितात.......
‘ काहीतरी असामान्य बंधनाने बांधले गेल्याशिवाय कोणीही स्त्री-पुरुष एकमेकाचे उच्छिष्ट खात नाहीत’. मागास जाती आणि आदिवासी जमाती यांच्या संशोधनाकडे आपण पुरेसे लक्ष दिले पाहिजे . हे संशोधन एका सोन्याच्या खाणीचे संशोधन आहे,असे त्यांना वाटते व त्यांची बघण्याची दृष्टी सर्वस्वी वेगळी आहे.
एके ठिकाणी ते लिहितात ,'हिंदुस्तानच्या भूतकाळाचा शोध हेच त्याचे भविष्यकालीन पुनरज्जीवनही आहे'.
भारतीय लिप्याबद्दल ते म्हणतात , ‘ भारतातील लिप्या या देखील भारतीयांची सारभूत एकता सिद्ध करतात. भारतीय लिप्या ही नागरी लिपिचीच अदलतीबदलती स्वरूपे आहेत.  प्रत्येक गोष्टीवर सुंदरतेचा साज चढविण्याची वृत्ती त्यांच्या लिप्यामध्ये प्रगट झाली आहे. उर्दू व्यतिरिक्त सर्व लिप्या या ध्वनी व आकार या दृष्टीने ९९ % सारख्या आहेत. ९० अंशाच्या कोनाने नागरी लिपी वळविल्यास कानडी अक्षर तयार होते. तमिळ आणि बंगाली लिप्यात दावा कल आणि दोन रेषांनी जोडणे हा प्रकार आहे. असा त्यांचा पाहण्याचा वेगळा भारतीय दृष्टीकोन दिसून येतो. 
महान मानवतेची गाथा
बुभुक्षित माणसाला धर्माचे बंधन नसते , हे खरे नव्हे काय ? उदात्त आशा ,आकांक्षा ,जीवन शक्ती असलेल्या अदम्य कथा , देशाचा प्रादेशिक आणि दैवी इतिहास ह्यां सर्वांची नोंदवही म्हणजे आपली पुराणे. पुराणांचा हेतू सर्वसमावेशक आहे. श्रेष्ठ पुराणकथा म्हणजे सुंदर महाकाव्य व मन र्माव्नार्या लोककथा . पुराणं म्हणजे अनेक लघुकथा किंवा कादंबरया. त्यात अनेक नाट्य विषय आहेत. नाट्य , शास्त्र , काव्य , वेधक कथा , मनोरंजन ह्यांचा मनोहर संगम म्हणजे आपली पुराणं . पूरक म्हणजे कधीच अंत नसलेली कादंबरी. त्यात असतात जनतेच्या रक्तमांसाच्या पेशी. आपली पुराणे ही महान मानवतेची  गाथा आहे. असाही एक बघण्याचा वेगळा दृष्टीकोन.
एके ठिकाणी ते लिहितात ,'हास्य व स्वप्ने अर्थशून्यच असतात पण माणसावर त्याचा विलक्षण प्रभाव पडत असतो. कारण ती माणसाचे अंत: करण विशाल बनवतात. राम म्हणजे मर्यादित व्यक्तित्व पूर्णत्वास पोचल्याचे प्रतिक आहे म्हणून तो सर्व भारतीयांच्या मनात वसलेला आहे – नियोजन व्यवस्था व बाह्याचारावर कायदेकानूनचे बंधन व अंतरीच्या स्वविवेक बुद्धीवर नियंत्रण या दोन गुणांचा  राम हा खरा प्रतिक आहे. धर्माच्या विजयासाठी अधर्माबरोबर वागले पाहिजे ह्याचे प्रतिक म्हणजे कृष्ण.  म्हणूनच राम आणि कृष्ण ही भारतीयांना पडलेली सुंदर स्वप्ने आहेत,

असे एक ना अनेक उतारे त्यांच्या लेखातून देता येतील. खरं म्हणजे हे पुस्तक अप्रतिम आहे. नव्या विचारांनी नटलेले आहे.विचार करावयास लावणारे आहे. संग्रही ठेवण्यासारखे आहे. लोहियांचे खरं भारतीय व्यक्तिमत्व ह्या पुस्तकातून प्रकट होतं . लोहिया ह्यांचे इंग्रजीवर विलाक्ष्ण प्रभुत्व होते. ते हिंदीचे कट्टर पुरस्कर्ते होते. अस्सल इंग्रजी बोलणार्यास लाजवील असा त्यांचा इंग्रजी भाषेचा अभ्यास होता. मुळातच त्यांचे इंग्रजी लिखाण वाचणे अधिक आनंद देणारे आहे. पण मराठीतले हे ‘ ललित लेणं ‘ मला तर मराठी साहित्यातील ‘ वेरुळचे कैलास लेणं ‘ असल्यासारखं वाटते. मला लोहिया जे काही थोडे बहुत समजले ते त्यांच्या ह्या पुस्तकातून. म्हणून हे ‘ ललित लेणं ‘ मला अधिक मोलाचं व जवळचं वाटते. 
( हा लेख १९६९ साली दैनिक मराठवाडा ह्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला होता. )           

Monday, September 12, 2016

डिजिटल क्रांती : साक्षरता अभियान आणि ई-लर्निंग


४० तासात साक्षर व्हा

मरोल येथील साक्षरता केंद्रात शिकणारया स्त्रिया – उर्दू , तमिळ ,हिंदी आणि मराठी भाषेतून शिक्षण उपलब्ध
भारतात ३५ कोटी लोक निरक्षर आहेत . त्यांना साक्षर करण्याचे काम अतिशय अवघड आहे. त्यात निरनिराळे वयोगट आहेत . स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. आपल्या देशाच्या विकासाच्या वाटचालीत निरक्षर प्रौढाना साक्षर करणे अत्यंत आवश्यक आहे. गरिबी आणि निरक्षरता ह्या दोन कारणामुळे विकासाची गती खुंटली आहे. त्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे . १५ ते ३० वयोगटातील हे निरक्षर लोक शाळेत जाण्यासाठी तयार नसतात. वृद्धाना त्यांच्या मुला-मुलीकडून शिकायचे नसते . पोटापाण्यासाठी त्यांना छोटीमोठी कामे करावी लागतात. त्यातून त्यांना वेळ मिळू शकत नाही. त्यांची इच्छा ही नसते. आता ह्या वयात शिकून काय करायचे ?,  असा त्यांचा मूळ प्रश्न. एकदा वय वाढल्यानंतर साक्षर करणे फार कठीण असते. त्यांना विकासात सहभागी करून घ्यायचे असेल तर त्यांना किमान लिहिणे – वाचणे आले पाहिजे . साक्षर असलेल्या व्यक्तीलाच  अधिक चांगल्या प्रकारचे काम  मिळू शकते . त्या व्यक्ती  समाजात इतरांशी अधिक चांगला संवाद साधू शकतात आणि चांगला व्यवहार करू शकतात. त्यांना  स्वतःची स्वाक्षरी करता आली पाहिजे . निरनिराळे फॉर्म भरता आले पाहिजेत. हिशोब समजला पाहिजे आणि किमान दोन अंकी  आकडेमोड आली पाहिजे.  ह्या लोकांना साक्षर करण्यासाठी नवे डिजिटल तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे . प्रौढ शिक्षण सहज शक्य आहे . नव्या डिजिटल क्रांतीमुळे ४० तासात निरक्षर लोकांना साक्षर करणे सहज शक्य आहे . या . वर्गात बसा .एक तास टीव्ही पहात असतात तसे स्क्रीनवर बघा आणि हसत खेळत शिका . टीव्हीवर जशी सिरीयल नेमाने बघतात तसे हे ४०- ५० धडे नुसते मन लावून ऐका .३०० ते ५०० शब्दांची ओळख होईल आणि हे निरक्षर लोक वर्तमानपत्र वाचू लागतील .हे शक्य झाले आहे .ह्या योजनेत २ लाख निरक्षर लोक साक्षर झाले आहेत.
साक्षरता केंद्र , जोगेश्वरी
ह्या साक्षरता अभियानासाठी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस ( टीसीएस )चे पूर्वीचे संचालक फकीरचंद कोहली ह्यांनी संगणकीय तंत्रज्ञानाच्या आधारे एक योजना राबवली . त्यासाठी विशेष संगणकीय प्रणाली तयार केली . प्रौढ शिक्षणतज्ञाचा सल्ला घेऊन एक अतिशय सोपी प्रणाली तयार केली. Audio-Visual तंत्र असल्यामुळे प्रौढ निरक्षर लोक ऐकत–पहात शिकतात . कोणत्याही शिक्षकाची  गरज नसते . क्लिक करा आणि कार्यक्रम बघा . Animation तंत्र वापरून वर्गपाठ  आखलेला असतो.  ह्या प्रणालीमुळे रोज नवे शिकता येते .रोज थोडी थोडी शब्दांची ओळख होत जाते . शिकण्याचा उत्साह वाढत जातो. रोज वर्गावर यावेसे वाटते. आधी शब्द समजू लागतात आणि मग अक्षरओळख होते . निरक्षर व्यक्तीला शब्द माहित असतातच. त्यांना अक्षरओळख नसते. 'शब्दातून अक्षराकडे', असा हा प्रवास आहे. शब्द ओळखू लागले की अक्षरांची ओळख होत जाते . रोज ३० शब्द समजतात .पाच शब्द एका मिनिटात लिहिता येतात .१ ते १०० आकडे मोजता-लिहिता येतात. तीन आकडी बेरीज–वजाबाकी करता येते. दोन आकडी गुणाकार-भागाकार करता येतो. असे हे सोपे तंत्रज्ञान आहे .
‘पोलियो मुक्त जग’ हे स्वप्न साकार झाल्यानंतर रोटरी ( Rotary International) ह्या जागतिक संस्थेने TEACH हा कार्यक्रम हाती घेतला आहे.
T  - Teacher Support
E   - e-Learning
A   - Adult Literacy
C   - Child Development
H   - Happy School
हे उद्देश समोर ठेऊन आमच्या रोटरी क्लब ऑफ मुंबई अंधेरी ह्या संस्थेने ह्या क्षेत्रात काम् सुरु केले व गेल्या दोन वर्षात अंधेरी आणि आजूबाजूच्या भागात ८ साक्षरता केंद्र आणि ८ e-Learning ( ५ वी ते १०वी साठी ) केंद्र सुरु केली आहेत.
 डॉ नरेंद्र गंगाखेडकर ‘साक्षरतेसाठी डिजिटल तंत्रज्ञान’ ह्या विषयावर बोलताना .जकॉब कोशी , अध्यक्ष , रोटरी क्लब ऑफ मुंबई अंधेरी अध्यक्षस्थानी . 
ह्या केंद्रात संगणक किंवा Laptop , प्रोजेक्टर , स्क्रीन , संगणक प्रणाली ( अभ्यासक्रम + टीसीएस साक्षरता अभ्यासक्रम ) देण्यात आले आहेत . शिक्षकांना प्रशिक्षित केले आहे . साक्षरतेच्या वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याला एक पाटी आणि खडू दिला की काम झाले . ऐकणे आणि पाहणे ह्या दोन प्रक्रियेतून शब्दांची ओळख होते व त्यांना अक्षरे  लिहिणे जमू लागते.
Eduprojector with Pen Drive and Speaker Connection :  कोलडोंगरी साक्षरता वर्ग उद्घाटन
अलीकडे संगणकाची आवश्यकता नसते . एक LED Projector ( Tirubaa Eduprojector)  असतो. त्यात पेन drive असतो . तेथे प्रणाली असते. त्याला स्पीकर जोडलेला असतो. स्क्रीनवर सर्व दिसते व ऐकता येते. क्लिक केले की यंत्र सुरु होते. बटन दाबा. पडद्यावर  बघा आणि शिक्षित व्हा . असा हा प्रयोग. खरी डिजिटल क्रांती. तिचा संबंध साक्षरतेशी जोडण्यात यश आले आहे.
प्लग आणि प्ले – बटन दाबा आणि चालू करा . शिक्षक , विद्यार्थी आणि शाळेतील सहाय्यक सहज ह्याचा वापर करू शकतात . ह्यासाठी संगणकाची आवश्यकता नाही. 
कोलडोंगरी रात्रशाळा : ई-लर्निंग ९ वी-१० वीचे विद्यार्थी
रात्रशाळा , दीक्षित रोड , विलेपार्ले , समर्थ रात्रशाळा ,कोलडोंगरी, शामनगर जोगेश्वरी , रात्रशाळा , जोगेश्वरी पूर्व , मरोल येथे केवळ स्त्रीयांच्यासाठी ( तमिळ , उर्दू , हिंदी आणि मराठी ) केंद्र , श्रमिक विद्यालय , जोगेश्वरी, गुरु नानक विद्यालय , महाकाली , ह्या ठिकाणी ही केंद्रे आमच्या रोटरी क्लब तर्फे चालू आहेत.
Wow!!! Just Click and Learn. Very useful technology for learning , improving and understanding. It is a self-learning coaching class for students who can't afford to go for commercial coaching class. 
 “ वाह SS , बटन दाबा , टीव्ही बघा. ४० इपिसोड बघा आणि साक्षर व्हा” , अशी प्रतिक्रिया जोगेश्वरीच्या केंद्र संचालकाची. काही महाविद्यालयीन मुले आणि मुली हे केंद्र चालविण्यासाठी मदत करतात. निरक्षरांना मार्गदर्शन करतात.
कोलडोंगरीचे पोरटेकर सर म्हणाले , ‘ हा संगणक म्हणजे शिक्षकांचा सहाय्यक आहे. रात्रशाळेतील विद्यार्थ्यासाठी पैसे न भरता ट्युशन क्लास आहे . परीक्षेत गुण नक्कीच वाढणार . तो खरा टयूटर आहे.”
जनता रात्रशाळा, विलेपार्लेचे मुख्याध्यापक ह्यांना प्रौढ साक्षरता अभ्यासक्रम खूप वेगळा वाटतो. हे प्रौढ सहसा शिकायला तयार नसतात . त्यांना थोडा न्यूनगंड असतो. शिकण्याची भीती वाटत असते. नवीन तंत्रांचा वापर करून चांगला  प्रयोग केला आहे , असे मत त्यांनी व्यक्त केले.
कोलडोंगरीचे पाटील सर म्हणाले , ‘ सोपे करून कसे शिकवावे , हे आम्हा शिक्षकांना आता चांगले समजले आहे . प्रशिक्षित शिक्षक असण्याची गरज नाही .संगणक हाच एक शिक्षक . तो अभ्यास करून घेतो. प्रश्नाचे उत्तर बरोबर का चूक, हे ही सांगतो . त्यांच्या शाळेत मुलांची गुणवत्ता ५० टक्क्यांनी वाढली आहे. मुले आवडीने वर्गात बसू लागली आहेत.Animation तंत्रामुळे मुले हसतखेळत शिकतात. शिक्षक कार्यक्रम सुरु करून इतर कामे पूर्ण करतात .” ई–लर्निंगसाठी बाजारात विविध प्रकारच्या प्रणाली उपलब्ध आहेत. अभ्यासक्रमाप्रमाणे ह्या प्रणाली तयार केल्या जातात. त्यासाठी अनेक कंपन्या कार्यरत आहेत.
ह्या दोन मुलांची शाळा सुटली होती. लिहिता – वाचता येत नव्हते . ४० तासात त्यांना लोकसत्ता हे वर्तमानपत्र वाचता येऊ लागले.
मी कोलडोंगरीच्या रात्रशाळेत गेलो. केंद्र प्रमुखांनी दोन १६-१८ वयाची मुले माझ्यासमोर उभी केली. त्यांना लिहिता वाचता येत नव्हते . शाळा सोडून बरीच वर्षे झाली होती. एक झिरोक्स मशीन चालवीत असे तर एक वायरमन होता . अशाच एका वायरमनचा सहाय्यक असताना थोडेसे वायरिंग शिकलेला . ते दोघे ४० तास क्लासला आले .  त्यांना किती लिहिता–वाचतां येते हे पहावे म्हणून मी त्यांची छोटी परीक्षा घेतली. मी समोरचा लोकसत्ता त्यांना वाचायला दिला . एका मुलाने अग्रलेख भरभर वाचून दाखविला तर दुसरा थोडे अडखळत वाचत होता . जोडाक्षरे थोडी चुकत होती. त्या मुलांना खूप आनंद झाला होता . त्यांना शिकण्याची गोडी निर्माण झाली . वायरमनला आम्ही एक वायरिंगचे पुस्तक भेट दिले . त्याला ते वाचता येऊ लागले. त्याला अर्थ समजल्यामुळे त्याला त्याच्या कामात अधिक गोडी निर्माण झाली.
महाकालीच्या वृद्ध आजीना आपल्याला वाचता येते ह्याचा इतका आनंद झाला की त्या नातवाबरोबर अभ्यास करू लागल्यात. आपल्याला बसचा नंबर वाचता येतो , स्टेशन कोणते आले हे नाव वाचून समजते ,बँकेत सही करता येते आणि वर्तमानपत्रातील ठळक बातम्या सहज वाचता येतात ह्याचा आनंद अधिक झाला.
सर्वच मोठ्या खाजगी शाळातून संगणक आणि ई-लर्निंग उपलब्ध असतेच. त्यांच्याकडून पैसेही तसेच घेतात. ती मुले संगणक चांगले वापरतात. रात्रशाळा आणि महापालिकेच्या शाळेतील मुलांना ई-लर्निंग माहित नसतेच. ट्युशन क्लास माहित नसतो. अभ्यासात मदत करणारा हा संगणक आणि ही नवी संगणक अभ्यासप्रणाली त्यांच्यात बदल घडवून आणीत आहे.
आमचा रोटरी क्लब आणि मुंबईतील १२० इतर रोटरी क्लब TEACH ह्या प्रकल्पात रमलो आहोत. त्यासाठीचे आर्थिक सहाय्य आम्ही करीतच असतो. अनेक रात्रशाळा आणि प्रौढ शिक्षण वर्ग आम्ही दत्तक घेतले आहेत. हा खारीचा वाटा उचलताना आम्हाला आनंद तर मिळतोच. पण साक्षर झालेल्या प्रौढांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून आम्हाला अधिक आनंद होतो .

       1)The CBFL is developed and implemented by: TCS Corporate Adult Literacy Program (ALP) Group Tata Consultancy Services Ltd. 11th Floor, Air India Building, Nariman Point, Mumbai 400 021, Maharashtra, India Tel : (022) 6778 9393, (022) 6778 9378 (Direct) Fax : (022) 6778 9344 Email : Corporate.CBFL@tcs.com  For more details visit : www.tcs.com/cs 
      2)Contact for e-learning programs and Edu-projector. Sanjiv Kadam, Chief Operating Officer, Tirubaa Technologies Pvt Ltd , Mobile:+91 8805373500, Mail ID:sanjivk@tirubaa.co

     डॉ. नरेंद्र गंगाखेडकर (narendra.gangakhedkar@gmail.com)


      


Wednesday, February 10, 2016

वृद्धाश्रम


एकदा जॉर्डनहून मुंबईकडे परतताना विमानात माझ्या शेजारी एक मुंबईतील तरुण होता. तो इस्रालयमध्ये काम करीत होता. सहज गप्पा मारताना मी त्याची माहिती काढत होतो . 'काय करतोस ? घरी कोण कोण आहेत ? ',वगैरे. लग्न झालेला , एक ३-४ वर्षाचा मुलगा असलेला , मुंबईतील कमी पगाराची नोकरी सोडून इस्रालायला एकटाच गेलेला. 'काय करतोस ? इस्रालयमध्ये ? '.तो म्हणाला,'एका वृद्ध कुटुंबाची देखभाल करतो . त्यांच्याच घरात राहतो . त्यांचे सर्व काम करतो. I am their Assistant . पगार खूप मिळतो . घरी पैसे पाठवितो'. इस्रालयमध्ये वयस्कर मंडळी खूप आहेत. त्यांचे पाहण्यासाठी घरात कोणी नसते. त्याच्यासारखी ४० भारतीय मुलं हे काम करतात. मी त्याला सहज विचारलं , 'तुझे आई - वडील , त्यांचे वय , त्यांच्याकडे कोण पाहतं ?'. त्याचे वृद्ध आई- वडील कोकणातील एका खेड्यात रहातात . तो म्हणाला , ' मी त्यांच्याकरिता काही करू शकत नाही ' आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं .
मी अंधेरीत राहतो. आम्ही रोटरीच्या कामानिमित्त अनेक वृद्धाश्रमाना भेटी देत असतो . अंधेरीत होली फ्यामिली चर्चचे अनेक सामाजिक उपक्रम चालू आहेत. त्यापैकी एक Old Age Home . अतिशय चांगला वृद्धाश्रम. वृद्धांच्यासाठी इतके चांगले वृद्धाश्रम माझ्या पाहण्यात नाही. चर्चकडे खूप पैसा असतो. मिशनरीवृत्तीने काम करणारी ही मंडळी. हिंदूंची अनेक श्रीमंत देवळे आहेत. पण कोणीही अशी वृद्धाश्रमे चालवीत नाहीत . बदललेल्या जगात अशी वृद्धाश्रमांची गरज आहे . हे अजून त्यांच्या लक्षात येऊ नये ह्याचेच वाईट वाटते.
वृद्धाश्रमातील वृद्धांशी बोलताना एक वृद्ध म्हणाले , ' आम्हाला तशी कसलीही गरज नसते. आठवड्यातून एखादा तास काढून आमच्याशी गप्पा मारायला येत जा . तरुण मुलं आमच्याशी बोलायलाच येत नाहीत '. एक वृद्ध आजी म्हणाल्या , ' काही नको , लहान मुला- मुलीबरोबर गोष्टी करायच्या असतात , खेळायचे असते ' . आमच्या बरोबर आम्ही एका शाळेतील काही मुलं- मुली घेऊन गेलो होतो. त्या मुलांनी आजोबा - आजी दत्तक घेतले आणि दर रविवारी एक तास ते त्यांना भेटायला जाऊ लागले .

Saturday, January 16, 2016

Globalization and India – OUR STRENGTHS


Remember, globalization is inescapable. It is good. What we can’t prevent we must embrace.
Thanks to IT industry. We became global force. Secondly. Western world is looking at us as the growing market. Our growing middle class is creating a market and our brain drain and skilled and unskilled labour force is helping the countries to get cheap labour. While the American middle class struggles to stay solvent, India’s has more than tripled in last 20 years to 250 million – almost the size of US population.
India is booming. That is why US is moaning and groaning about us. People are burned up about outsourcing. They get annoyed when they have to go through Indian customer service representatives to get help with their American products. But from the standpoint of infusing business with creativity and opportunity, it is a great thing India has taken this niche and run it. What once was a nation identified with its teeming masses and abject poverty is emerging – somewhat chaotically, but legitimately – as a partner in progress.
NO ONE CAN AFFORD TO TAKE THEIR EYES OFF INDIA.
India is and was known for its poverty. But today India has become fastest-growing economies in the world. THIS IS IN THE LARGE PART DUE TO ITS DOMINANCE IN THE HIGH TECHNOLOGY FIELDS. (If you think Americans are too cell-phone crazy, try walking down a city street in India. Everyone is plugged in all the time, What’s App or Facebook.) 

Conclusion : Make in India, Skill India , Start-Up India Digital India are the projects which will make us global player. We missed the industrial revolution , now we can't miss this globalization.


-         Based on Extracts taken from the Book by Lee Iacocca – ‘Where Have All The Leaders Gone?’   

Monday, January 11, 2016

आपल्या देशाच्या नेतृत्वाला झालं आहे तरी काय ? Where Have All The Leaders Gone ?


आपल्या देशाच्या नेतृत्वाला झालं आहे तरी काय ? पुरे झाला हा राजकीय गोंधळ .
मला माहित आहे की मी एकटाच असा नाही की ज्याला असं वाटतं की हे काय चाललयं ? नुसता वैताग . मोदी – राहुल गांधी – अरविंद केजरीवाल – लालू प्रसाद / नितीशकुमार, ममता , जयललिता ...... ही सगळी सत्ताधारी राजकारणी मंडळी काय करीत आहेत ? विकासाच्या नावाने बोंब. असं वाटलं ,आपण एका बलाढ्य लोकशाही देशात राहतो. पण कसलं काय ? नको ही वाटमारी करणाऱ्या नेत्यांची राजेशाही. आपण निराश आणि वैतागलो आहोत असे बहुतेक लोकांना जाणवते आहे आणि त्याचाच हे लोक फायदा उठविताना दिसत आहेत. आपण बोललंच पाहिजे . त्याचा फारसा उपयोग होईल अशी शक्यता नसतानाही बोललं, लिहिलं पाहिजे म्हणून हा खटाटोप. शेवटी हा देश आपला आहे . त्यांना आंदन दिलेला नाही. देशाच्या राज्यघटनेचा सतत उल्लेख करीत हे लोक आपल्यावर राज्य करीत असतात. ज्या संसदेवर हे निवडून आले आहेत त्या संसदेचे अधिवेशन एक दिवस चालू देत नाहीत. महत्वाच्या बिलावर विधायक चर्चा करीत नाहीत. रोजचे भत्ते मात्र खातात . अशी लोकशाही हवीच कशाला ? त्यासाठी ह्यांना शिक्षाच करावयास हवी ? ह्यांना बहुमत जरी दिलं तरी राज्य करता येत नाही. हे लोक स्वतःचे पगार आणि भत्ते मात्र एकमुखाने मंजूर करून घेतात. त्यावेळी ह्यांना कसलीही लाज वाटत नाही. तिकडे अतिरेकी लचके तोडतच असतात. रोज नवी घटना . सैनिक मरतात . सीमा असुरक्षित असते. कोणालाही काही करावेसे वाटत नाही. टीव्ही च्यानेलवर निष्फळ गप्पा. आरडाओरडा. बघवत नाही तो टीव्ही. ह्यासाठी का आपण स्वातंत्र्यलढा दिला ? मला वाटतं हे जर तुम्हाला सहन करावसं वाटत असेल तर आपण देशप्रेमी नाहीत हेच सिद्ध होते आहे . आपण असे शांत बसणार असू तर हे आपल्याला नागवे करतीलच पण देशाची वाट लावतील. पुरे झाले . ह्यांना ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे . आपण सामान्य माणसानीच आवाज उठविणे आवश्यक आहे . आपण मतदान करतो पण त्यांना ठणकावून सांगत नाही म्हणून ही मंडळी माजली आहेत. आपण आपला आवाज मोठा केला पाहिजे. हे लोक कोण आहेत ? आपणच ह्यांना निवडून देतो . मग हे एवढे माजतात कां ? तुरुंगाची हवा खाऊन आल्यावरही ह्यांचा माज जात नाही. हे एवढे निर्ढावलेले कसे ?
हे सर्व काय चाललं आहे ? आपणच का सहन करायचं ? आपण ह्यांना प्रश्न विचारत नाहीत म्हणून ? अधूनमधून एखाद्या सभेत काही विद्यार्थी / विद्यार्थिनी ह्यांना प्रश्न विचारून त्यांची भंबेरी उडवितात तेव्हा वाटते की ह्यांना असेच विचारत राहिले पाहिजे. ह्यांची बोलती बंद केली पाहिजे . आपण बोलले पाहिजे आणि त्यांनी ऐकले पाहिजे. तीच वेळ आली आहे. We are sick and tired. Enough.
सध्याचा सत्ताधारी भाजप असो की अनेक वर्षे सत्ता भोगलेला कॉंग्रेस पक्ष असो. प्रादेशिक पक्ष ही तसेच. प्रादेशिक नेतेही लुटारू . ही लोकशाही आहे की हुकुमशाही की घराणेशाही. राजे गेले पण नवे राजकीय घराणे निर्माण झाले आहेत. तोंडात शब्द मात्र समाजवाद , पण आहे नुसता माजवाद. आपण हे सहन करतो म्हणून ह्यांचे फावते.
कसले हे राजकीय नेतृत्व ? ज्या नेतृत्वाला आपण सलाम करून गुणगान गातो ते तर खुजे नेतृत्व . हे लोक गांधी – नेहरू –सरदार – नेताजी ह्यांची नावे सतत घेत असतात. शिवाजी – फुले – आंबेडकर ह्यांच्या नावाचा नित्य जप करीत असतात आणि नेमकं उलटं करीत असतात ? आपण ह्यातून काहीच शिकणार नाही असे दिसते ?
मी किंवा माझ्यासारखे असंख्य लोक राजकीय पक्षापासून दूर असतो. पण हे राजकारणच आपल्या जीवनावर सतत परिणाम करीत असते व आपल्याला सुखाने जगू देत नाही. त्यामुळे आपले जीवन राजकारण मुक्त होऊ शकत नाही. त्याकरिता आपल्याला कसे नेतृत्व हवे ह्याचा विचार करीत असताना  खालील दहा नेतृत्व गुणांचा विचार माझ्या डोळ्यासमोर येतो. आपण सर्वांनी सध्याच्या नेतृत्वाबद्दल विचार करताना ह्या नेत्यांचे मूल्यमापन केले पाहिजे . त्यासाठी सध्याच्या ह्या नेत्यांना आपण १ ते १० गुणांपैकी किती गुण देणार आहोत ह्याचा विचार करावा व त्यांचे मूल्यमापन करावे. त्यावरून ह्या नेते मंडळींचे नेमके स्थान समजू शकेल.
१)      A Leader has to show the curiosity.
२)      A Leader has to be a creative.
३)      A Leader has to communicate.
४)      A Leader has to be a person of CHARACTER.
५)      A Leader must have Courage.
६)      To be a Leader, you have got to have CONVICTION.
७)      A Leader should have CHARISMA.
८)      A Leader has to be COMPETENT.
९)      You can’t be a Leader if you don’t have COMMON SENSE.
10)    Leaders are made, not born. Leadership is forged in times of crisis.
वरील दहा गुणांचा विचार करून आपल्याला सध्याच्या नेते मंडळींचे मूल्यमापन करायचे आहे . बघा तुम्हाला काय वाटते? ‘Where Have All The Leaders Gone?’ हे आयोकोका ह्या प्रसिद्ध अमेरिकन विचारवंतांचे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. त्यात त्यांनी अमेरिकन नेत्यांचे केलेले मूल्यमापन लक्षवेधी होते . आजच्या परिस्थितीत आपल्या राजकीय नेत्यांचे मूल्यमापन आपण सर्वांनी केले तर आपल्याला आज हे असे कां होते आहे?, हे तर समजेलच पण आपण योग्य त्या नेत्याकडे नेतृत्व देण्याचा विचार सुरु करू. तेच आपल्या हातात आहे . आपण ह्याचा विचार करून आपले नेते निवडले पाहिजे.
1)      Curiosity: नेता असा असायला पाहिजे की त्याच्या स्वतःच्या वर्तुळाव्यतिरिक्त (जे हांजी हांजी करणारे व Yes Sir संस्कृती मध्ये अडकलेले होयबा असतात अशा लोकांच्या सहवासात असलेला ) त्याने इतर लोकांना समजून घेतले पाहिजे . त्याचे वाचन अफाट असले पाहिजे व जागतिक घडामोडीचे ज्ञान असले पाहिजे .त्या नेत्याने इतर तद्न्य मंडळीशी चर्चा आणि संपर्क साधला पाहिजे . स्वतःच्या विचारांची कक्षा ज्यांना वाढवता येते तेच अधिक चांगले नेतृत्व देऊ शकतात. आपण जे करतो तेच खरे आणि योग्य असा ज्याचा विश्वास असतो तो नेहमीच बरोबर नसतो . कोणत्याही नेत्याला योग्य असे सल्लागार असणे फार महत्वाचे असते . दुसर्यांचे जो ऐकून घेत नाही किंवा समजून घेत नाही तो बहुधा गर्विष्ठ असतो. आपल्या सध्याच्या नेतेमंडळींचा विचार केला तर काय दिसून येते ? मोदींच्या आजूबाजूला हांजी हांजी करणारी मंडळी नाहीत हे खरे आहे . मोदींच्या वर्तुळात शिरणेच कठीण आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाचा फारसा अनुभव नव्हता म्हणून त्यांनी गेले वर्षभर फिरून जागतिक राजकारणात स्वतःचे नाव निर्माण करण्याचा प्रयत्न करून काही जागतिक मित्र मिळविले आहेत ह्यात वाद नाही. स्वतःचा ठसा निर्माण करण्यास काही काळ जावा लागेल . पंडित नेहरुनंतर असा प्रयत्न करणारे ते दुसरे पंतप्रधान आहेत. ह्याउलट सोनिया गांधी गेल्या दहा वर्षात आपला ठसा निर्माण करू शकल्या नाहीत. राहुल गांधी ह्यांच्या आजूबाजूला खुषमस्करे असतात. ती कॉंग्रेस कार्यकर्त्यांची संस्कृतीच आहे. राहुल गांधी परदेशात दौरे करतात पण ती त्यांची वैयक्तिक सुट्टी असते व ते त्या देशात जाऊन नेमके काय करतात हे कोणालाच माहित नसते . एका मोठ्या विरोधी पक्षाचा हा उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणताही  सहभाग घेताना दिसत नाही . तशी छाप ही नाही. राष्ट्रीय राजकारणात त्यांची कसलीही Curiosity दिसत नाही.प्रादेशिक नेते मंडळी ह्या बाबतीत काहीच करताना दिसत नाहीत. जे आडात नाही ते त्यांच्या पोहर्यात कुठून येणार ? केजरीवाल ह्यांचे चांगले सहकारी त्यांना केव्हाच सोडून गेले आहेत. ज्या अण्णा हजारे ह्यांचा हात धरून ते चळवळीत आले होते त्यांनाच त्यांनी रामराम केला.
2)      Creative: नेतृत्व स्वनिर्मितीक्षम असावे लागते. इतरांच्यापेक्षा वेगळे आणि स्वतःचे असे काही विचार असावे लागतात. दूरदृष्टी असावी लागते. निश्चित विचार असावा लागतो. मार्ग शोधून काढण्याचे वेगळे उपाय शोधावे लागतात. कल्पनाशक्ती अफाट असावी लागते. धरसोड वृत्ती नसावी लागते. स्वतःला वाटले आणि अंत:चक्षुना दिसले म्हणून लगेच निर्णय घ्यावयाचा नसतो. ‘आले मनात की केले’, अशी वृत्ती धीकादायक असते. “ MY INSTINCTS” असे म्हणून निर्णय घेणे चुकीचे असते. ते नेहमीच बरोबर नसते . बदल घडवून आणणे हाच नेतृत्वापुढे खरा पर्याय असतो. मोदींचा विचार केला तर त्यांचे अनेक निर्णय हे “MY INSTINCTS” वर अवलंबून असतात. अलीकडेच रशिया – अफगाणिस्तानला भेट दिल्यानंतर येताना पाकिस्तानला दिलेली भेट. अशी Shock Treatment ही ‘My Instinct’ चाच प्रकार आहे .
मोदी ह्यांनी स्वतःच्या अनेक कल्पनांना उदाहरणार्थ  Make in India, Digital India, Skill India, Swachha Bharat, प्रत्येक भारतीयाचे बँक खाते, अशा अनेक योजना अमंलात आणण्यासाठी खूप प्रयत्न करून आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला आहे , हे खरे आहे पण त्याचा परिणाम दिसून येण्यास काही कालावधी जावा लागेल  . राहुल गांधी ह्यांनी पक्ष बळकट करण्यासाठी फारसे प्रयत्न केलेले दिसत नाहीत. ज्या राज्यामध्ये त्यांचे सरकार आहे त्या ठिकाणी त्यांना आपल्या कल्पना पुढे आणण्याची संधी असूनही त्यांचा प्रभाव दिसून येत नाही. प्रचंड बहुमत असूनही आपण दिल्लीचे मुख्यमंत्री आहोत आणि ज्या काही मर्यादा असल्यातरी काहीतरी करून दाखविण्याऐवजी वेगळेच राजकारण करून नुसती सनसनाटी निर्माण करण्याशिवाय केजरीवाल काहीही करू शकले नाहीत.
3)      COMMUNICATE : प्रत्यक्ष परिस्थितीला समजून घेऊन सामोरे जाणे आणि लोकांना सत्य परिस्थितीची जाणीव करून देणे , त्यांना अंधारात न ठेवता सत्य समजावून सांगणे अतिशय महत्वाचे असते. आपल्या कारभारात विलक्षण पारदर्शिकता असली पाहिजे. खोटेपणा असावयास नको. अप्रामाणिकता नको . आपल्या बोलण्यातून लोकांना सत्य जाणवले पाहिजे. निवडणुकीच्या काळात मोदींनी आपण जनतेशी संवाद साधून मते मिळवू शकतो हे सिद्ध केले आहे पण राहुल गांधी त्यात यशस्वी होऊ शकले नाहीत. कोणत्याही प्रकारे उत्तम संवाद साधता येत नसतानाही सोनियाजी ह्यांनी आपले नेतृत्व कसे निर्माण केले हे एक गूढच आहे. कॉंगेसच्या पूर्वीच्या घराणेशाही संस्कृतीमुळेच ते शक्य झाले आहे. ही नेहरू – इंदिरा गांधी ह्यांची पुण्याई त्यांना उपयोगी पडलेली दिसते. आजच्या परिस्थितीत लोकांशी संवाद साधून पक्ष बळकट करणे अत्यंत महत्वाचे असताना दोघेही योग्य ती पाऊले उचलताना दिसून येत नाही. सध्या त्यांच्या नेतृत्वासाठी खरा कसोटीचा काळ आहे.   
4)      CHARACTER : कोणते योग्य आणि कोणते अयोग्य ? कोणते बरोबर आणि कोणते चूक?, ह्याची नेत्याला जाण असणे अत्यंत आवश्यक. जे बरोबर आहे ते पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न करावयाचे असतात ते प्रामाणिक असणे आवश्यक आहे . ज्याच्याजवळ सत्ता असते त्याचे चारित्र्य नुसते शुद्ध असून चालत नाही तर लोकांना त्याची खात्री वाटणे आवश्यक आहे. मोदींनी गुजरातमध्ये Doer म्हणून आपले नाव मिळविले. ‘मी पैसा खाणार नाही आणि कुणाला खाऊ देणार नाही’, असे म्हणणारे मोदी लोकांना आवडले आणि विरोधक कितीही आरोप करू देत त्याचा फारसा परिणाम झालेला नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखविले. ह्याउलट राहुल गांधी ह्यांनी दहा वर्षात एकही मंत्रिपद न स्वीकारून काहीच करून दाखविले नाही. त्या काळात संसदेत त्यांनी कसलाही प्रभाव पाडला नाही. त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही त्यामुळे नेतृत्व गुण वाढण्यास वावच मिळाला नाही.
5)      COURAGE : Tough talk is not Courage. नुसता शूरपणाचा आवेश बोलण्यात असणे म्हणजे धैर्य नव्हे . नव्या बदलत्या युगात शत्रुपक्षाबरोबर वाटाघाटी करण्यासाठी बोलणी करण्यात तरबेज असणे म्हणजे खरा शूरपणा . शक्ती आणि युक्तीच्या बळावर विरोधकावर बाजी उलटवणे ह्यात खरा शूरपणा . कधीकधी लोकांना आवडणार नाही असा निर्णय घेऊन अमंलात आणणे ह्यात तुमच्या नेतृत्वाची खरी कसोटी असते .मोदी बोलण्यात टफ असतात हे त्यांनी अनेकदा दाखवून दिले आहे. ह्या उलट नाटकबाजी करून आपण फार शूर आहोत हे दाखविण्याचा राहुल गांधींचा प्रयोग हास्यास्पद वाटतो . त्यांना युक्तीचा वापर करून लोकांची सहानभूती स्वतःकडे वळविण्यात फारसे यश मिळालेले नाही.
6)      CONVICTION: तुमच्या पोटात आग असली पाहिजे ( Fire in the Belly ) कोणतेही हातात घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्नांची पराकाष्टा आणि संपूर्ण वेळ दिला पाहिजे . स्वतः चा स्वतःच्या कामावर पूर्ण विश्वास आणि निष्ठा असली पाहिजे .मोदी ह्यांच्या भाषणात आणि कृतीत Conviction दिसून येते. ह्याउलट राहुल गांधी ह्यांच्यात ‘Fire in Belly’ दिसून येत नाही . त्यामुळे लोकांना त्यांची तळमळ दिसून येत नाही.  
7)      CHARISMA : करिष्मा ज्यांच्या व्यक्तीमत्वात असतो तोच चांगला नेता होऊ शकतो. असे वलय असावे लागते . आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडता आली पाहिजे . ती आपल्या बोलण्यातून , दिसण्यातून , वागण्यातून व्यक्त होते . आकर्षक व्यक्तिमत्व असणे व ते जपणे फार महत्वाचे आहे . त्यासाठी व्यक्तीमत्वात गोडवा असावा लागतो . लोकांच्यावर छाप पाडता आली पाहिजे . काही जणांना करिष्मा उपजत प्राप्त असतो . काहीजण करिष्मा निर्माण करण्यासाठी  प्रयत्न करीत असतात. मोदींनी आपला करिष्मा निर्माण करण्यात काहीसे यश मिळविले आहे. जसे मोदीद्वेषी आहेत तसेच मोदीभक्त असणार्या लोकांची संख्या खूप आहे. तसे मोदी ह्यांचे व्यक्तिमत्व फारसे आकर्षक नाही. त्यांचे अटलजीसारखे भाषेवर प्रभुत्वही नाही. आपल्या परदेश दौर्यात त्यांनी प्रयत्नपूर्वक आपल्या भाषणांची दखल घेण्याइतकी छाप पाडली आहे. राहुल गांधी ह्यांना आकर्षक व्यक्तिमत्व असूनही ते आपल्या भाषणाची छाप पाडू शकले नाहीत. दहाहून अधिक वर्षे संसदेच असूनही त्यांची छाप पडू शकली नाही. जे मुळातच नाही ते येणार कुठून अशी त्यांची परिस्थिती. तसे पाहिले तर मोदी फर्डा वक्ता नाहीत पण मोदींनी सभा गाजविल्या आहेत. संसदेतही त्यांनी आपले विचार ठासून मांडले आहेत. मोदींना मार्केटिंग चांगले करता येते असे त्यांचे विरोधकच मान्य करतात. नेत्याला स्वतःचे व्यक्तिमत्व विकावेच लागते. केजरीवाल ह्यांनी तसा प्रयत्न केला पण त्यांच्यातील सच्चेपणा लोकांना दिसून आला नाही.    
8)      COMPETENT : आपण नेतृत्वासाठी लायक असले पाहिजे . इतरांच्या तुलनेत अधिक वरचढ व प्रभावी असले पाहिजे . आपल्याकडे तसे कर्तृत्वगुण असले पाहिजेत . तुमच्या आजूबाजूला नुसते हांजी हांजी करणारे स्तुतिपाठक असता कामा नयेत. प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असलेले  नेतृत्वगुण असणे आवश्यक आहे .मोदींनी आपण Competent आहोत हे पक्षात सिद्ध करून दाखविले आहे. त्यांना आजही त्यांच्या पक्षात अनेक स्पर्धक आहेत. तरीही त्यांनी आपले नेतृत्व पक्षात सिद्ध करून दाखविले आहे. राहुल गांधी ह्यांना त्यांच्या पक्षात अनेक चांगले स्पर्धक असले तरी कॉंग्रेसच्या संस्कृतीत ते बसत नसल्यामुळे कोणीही स्पर्धक नाहीत. तरीही आपण Competent आहोत हे त्यांनी सिद्ध केलेले नाही. केजरीवाल ह्यांनी आपल्या पक्षातील स्पर्धकांना बाजूला केले असून ‘मी म्हणेल तीच पूर्व दिशा’ असा संदेश आपल्या  अनुयायांना दिला आहे. आपण competent आहोत हे सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळाली असली तर शासन करण्याऐवजी राजकीय गोंधळ घालण्याकडे त्यांचा अधिक कल आहे.  
9)      Common Sense:  नेत्यासाठी सामान्य ज्ञान आणि आकलन शक्ती फार महत्वाची असते. तुमचे तर्कशास्त्र पक्के असावे लागते . ते तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग असते. प्रश्नांना समजून घेण्याची क्षमता असावी लागते. खरे जग काय आहे ? आजूबाजूचे लोक कसे आहेत ? लोकांना कसे सांभाळले पाहिजे ? राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्या सोडवताना इतर लोकांना बरोबर घेऊन पुढे कसे जाता येईल व दबावापुढे न झुकता ताठ मानेने निर्णय कसा घेता येईल व आपली स्वतःची छाप पडणे अत्यंत महत्वाचे आहे . विरोधकांना नामोहरम तर करायचे पण दुखवायचे नाही , हे जमणे कठीण असते .मोदींना संसदीय राजकारणात विरोधकांना सांभाळणे जमलेले नाही. ते विरोधकांशी संवाद साधू शकत नाही. पण आंतरराष्ट्रीय राजकारणात त्यांनी आपले कौशल्य दाखविले आहे. How to market India?, हे त्यांना बर्यापैकी जमले आहे. राहुल गांधी ह्यांना I am the Boss / King असे वाटत असल्यामुळे ते त्यांच्याच कोशात असावेत असे भासते. त्यांचा इतर विषयाचा चौफेर अभ्यास असेल असे त्यांच्या आजवरच्या भाषणातून वाटत नाही.
१०)  CRISES MANAGEMENT : नेते जन्माला येत नसतात . नेते तयार करावे लागतात . नेतृत्व निर्माण करावे लागते. स्वतः प्रत्यक्ष युद्धभूमीवर न जाता युद्धात हानी न होता युद्ध जिंकता आले पाहिजे. बोर्डरुममध्ये चर्चेत भाग घेताना स्वतः चे वर्चस्व गाजविणे म्हणजे नेतृत्व करणे नव्हे . प्रश्न गुंतागुंतीचा झाला म्हणजे तो कौशल्याने सोडविणे हे अधिक महत्वाचे असते .मोदी ह्यांनी पक्षातील स्पर्धकांना त्यांच्या पद्धतीने हाताळून Crises Management केले आहे. विरोधी पक्षात बसून संसद बंद पाडण्याशिवाय राहुल गांधी पक्षाला फारसे सावरू शकले नाही. त्यांच्याकरिता नेतृत्व सिद्ध करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. त्यांच्याकडे पक्षनेतृत्व तर असेच चालून आले आहे . त्याला धोका नाही. पण पक्षाला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी लागणारे नेतृत्व त्यांना सिद्ध करावयाचे आहे. मी मोदिभक्त नाही किंवा मोदिद्वेशी नाही. तसाच राहुलप्रेमी नाही किंवा कॉंगेसचा नाही. नेतृत्वगुणांचा विचार करताना जे दिसते तेच निकष लाऊन ही चर्चा केली असून भारतीय लोकांना नेता कसा असावा ह्या संबंधी विचार मांडला आहे. येणारी काही वर्षे आपणास चांगला नेता मिळण्यास कठीण जाणार आहे असेच दिसते.
आज आपल्यापुढे अनेक समस्या उभ्या आहेत. विकास महत्वाचा आहे पण जागतिक मंदी ,दशहतवाद, सीमेवरील अशांतता , युद्धाचे भय , गरिबी , अज्ञान , बेकारी , वाढती महागाई , अनारोग्य , आर्थिक मंदी , जागतिकरणामुळे निर्माण झालेल्या असंख्य समस्या, औद्योगिकरण , चलनवाढ , विकासाची धीमी गती , भांडवलाची कमतरता , विजेची कमतरता , पाण्याचे दुर्मिक्ष , दुष्काळ , हवामानातील बदल , पर्यावरण , कामगारांच्या समस्या , सुशासन , भ्रष्टाचार असे असंख्य प्रश्न उभे असताना सर्वच क्षेत्रात प्रगती घडवून आणणे कठीण आहे . एक वैज्ञानीक व तंत्रवैज्ञानिक दृष्टी असणारा नेता असणे आवश्यक आहे . शासन अधिक लोकाभिमुख कसे असेल, हे महत्वाचे आहे . नेतृत्वाला व्यापक दृष्टी असणे महत्वाचे आहे .

आपण सामान्य लोकांनी नेते निवडताना असा सर्वांगीण विचार केला पाहिजे तरच असे नेतृत्व उदयास येऊ शकेल. ते आपल्या हातात आहे . नेत्याच्या हातात नाही. कुठे गेले हे सारे चांगले नेतृत्व ? Where Have All The Leaders Gone? असा प्रश्न अमेरिकन लोकांना पडला आहे तसाच तो भारतीय लोकशाहीलाही पडला आहे ?