Tuesday, November 30, 2021

गंगा मय्या

 

गंगा मय्या

ALAKNANDA

अलीकडेच रस्कीन बॉन्ड ह्या प्रसिद्ध लेखकाचे The Very Best Of Ruskin Bond – The Writer on the Hill" हे अतिशय सुंदर पुस्तक हाती  पडले. त्या पुस्तकाबद्दल खूप लिहिण्यासारखे आहे. त्या पुस्तकातील “Ganga Descends” हा सुंदर लेख मला खूप आवडला. मी फुलांची घाटी म्हणजे “Valley of Flowers” ला गेलो होतो. तेंव्हा अलकनंदा नदीच्या काठाने प्रवास केला होता. तिच्या काठावर राहिलो होतो. तिचे रौद्र रूप बघितले होते. तिचा खळाळणारा प्रवाह माझ्या मनाला मोहित करीत होता. रस्कीन बॉन्ड त्यांच्या लेखाची सुरुवात करीत असताना लिहितात, “खरी गंगा ही अलकनंदा की भागीरथी?" भागीरथी आणि अलकनंदा ह्या एकमेकाला भेटतात त्या देवप्रयागला. मी देवप्रयागला त्यांचा सुंदर संगम  पाहिला आहे. अलकनंदा आणि भागीरथी  दोन्ही नद्या ह्या गंगाच आहेत. मग हा प्रश्न मनांत कां उभा राहतो? भौगोलिक दृष्टीने विचार केला तर अलकनंदा हीच गंगा नदी आहे. तरीही काही लोक गंगा म्हणजे भागीरथी नदीच आहे,असेच मानतात. त्याचे कारण आपल्या  पौराणिक कथा आणि  जुना वेदकालीन इतिहास. हाच प्रश्न रस्कीन बॉन्ड ह्यांनी प्रसिद्ध तज्ञ डॉ सुधाकर मिश्रा ह्यांना विचारला आणि त्यांनी फार सुंदर शब्दात उत्तर दिले. ते म्हणतात, अलकनंदा म्हणजे गंगा पण भागीरथी म्हणजे गंगा-जी” . किती समर्पक उत्तर! अलकनंदा आणि भागीरथी ह्या दोन नद्यांचा संगम झाल्यानंतर गंगा नदी सुरू होते.


अलकनंदा - पंचप्रयाग  आणि भागीरथी (गंगा) / यमुना 

अलकनंदाचा उगम होतो तो सातोपनाथ आणि भगीरथ खरक ह्या दोन ग्लेसियर पासून. अलकनंदेला विष्णुप्रयागला धाउलीगंगा , नंदप्रयागला नंदाकिनी, कर्णप्रयागला पिंडार आणि रुद्रप्रयागला  मंदाकिनी ह्या नद्या येऊन मिळतात.  190 किलोमीटर प्रवास केल्यानंतर अलकनंदा देवप्रयागला भागीरथीला मिळते आणि तेथून गंगेचा प्रवास सुरू होतो. पंचप्रयाग ही पांच महत्वाची तीर्थस्थाने अलकनंदेच्या काठावर वसली आहेत अलकनंदा बद्रीनाथ, विष्णुप्रसाद, जोशीमठ, चामोली, नन्द्प्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, श्रीनगर, आणि देवप्रयाग ह्या तीर्थस्थानाजवळून  वहात देवप्रयागला भागीरथीला मिळते. भागीरथीपेक्षा  अलकनंदा अधिक मोठी असली तरीही भागीरथीलाच 'गंगा' म्हणतात. पाण्याचा अधिक साठा हा अल्कनंदाच पुरविते. ह्याच अलकनंदेला तिबेटमधून वहात  येणारी सरस्वती नदी माना येथे भेटते आणि नंतर लुप्त पावते. अलकनंदा ही भागीरथी नदीपेक्षा अधिक प्रक्षुब्ध, अनावर आणि वेगांत वाहणारी नदी आहे. तर भागीरथी ही खूप शांत, स्वच्छ आणि निळसर पाण्याची नदी आहे. 

Alaknanda – Rafting


VALLEY OF FLOWERSला जाताना पुष्पावती नदीच्या काठाने आपण प्रवास करतो. ही पुष्पावती नदी नंतर अलकनंदेला जाऊन मिळते.


भागीरथी ही एक सुंदर आणि स्वच्छ नदी आहे. लोकांनी तिच्यावर खूप प्रेम केले आहे.  भगवान श्री शिवशंकराच्या जटेमधून तिचा उगम झाला आहे,  अशी पौराणिक कथा आपल्याला माहीत आहे. तो आपल्या  श्रद्धेचा प्रश्न आहे.  गंगा ही  पृथ्वीवर अवतरली ती भगीरथाच्या प्रयत्नामुळेच,  


भागीरथी 

भागीरथीबद्दल असे म्हंटले  जाते की ....

He held the river on his head,

And kept her wandering where,

Dense as Himalaya’s woods were spread,

the tangles of his hair.

गंगोत्री ग्लेसिअर 

भागीरथी ही नदी, हिंदूंची एक प्रसिद्ध देवता मानली जाते. जे कोणी तिच्या जवळ येतात ते तिच्यावर लुब्ध होऊन नुसते प्रेमच करीत नाहीत तर ती त्यांची देवता असते. तिचा उगम होतो तो  हिमालयातील गंगोत्रीला. बॉन्ड ह्यांच्या पुस्तकात, बेले फ्रेजर ह्या भटक्या  इंग्रजाचा उल्लेख केलेला आढळतो. इ.स. १८२० मध्ये  तो गंगोत्रीला भेट देण्यासाठी हिमालयात प्रवास करीत होता. तेंव्हा त्याने त्या प्रवासाचे जे वर्णन केले आहे ते असे.


GANGOTRI GLACIER – BHAGIRATHI

"मी हिमालयाच्या अगदी मध्यभागी पोहोचलो आणि भागीरथी नदीच्या उगमस्थानाचे ते विहंगम दर्शन पाहिले. गढवाल खोर्‍यातून चार नदया उगम पावतात, त्यातील भागीरथी म्हणजेच गंगा ही सर्वात सुंदर नदी आहे. ते विहंगम दृश्य वर्णन करणे अतिशय कठीण आहे. तेथे गेल्यावर आपल्या डोळ्याचे पारणे फिटते. हिमालयाचे आणि गंगेच्या उगमस्थानाचे ते निसर्ग सौंदर्य मला शब्दात व्यक्त करता येत नाही," 


भागीरथी - गंगोत्रीच्या काठाने प्रवास करताना 

मी स्वत: गंगोत्रीपर्यन्त गेलो नाही. तसा योगच जुळून आला नाही. अलकनंदेच्या  काठाने  मात्र मी प्रवास केला आहे. देवप्रयागला भागीरथी आणि अलकनंदेचा संगम मी  पाहिला आहे. भागीरथीच्या काठाने थोडा दाट जंगलातून प्रवास केला आहे. दूरवरच्या हिमालयाच्या रांगा आम्हाला आकर्षित करीत होत्या आणि लांबच लांब पसरलेल्या त्या ग्लेसीयर्स दिसत होत्या. माझे काही मित्र गंगोत्री पर्यन्त गेले होते. त्यांनी त्या देवभूमीला स्पर्श केला होता. रस्कीन बॉन्ड तेथपर्यंत गेले होते आणि त्यांनी ते वर्णन फार सुरेख केले आहे.

काहीजण टेहरी आणि भटवारी पर्यन्त जाऊन आले होते. बॉन्ड ह्यांनी ५००० फूट उंचीवरील नचिकेत तळे आणि ९००० फुटावरील दोडी तळ्यापर्यंतचा प्रवास  केला होता. ओक आणि चेसनट (शाहबलुत) ह्यांच्या जंगलातून प्रवास करण्याचा आनंद काही वेगळाच आहे, असे त्यांनी लिहिले आहे. 

GANGOTRI – DEODAR JUNGLE

गंगाणी ते गंगोत्री ह्या मधील प्रवास आहे देवदारच्या दाट जंगलातून. मध्ये लागते ते सुकणीचे दाट देवदार जंगल. जदगंगा ह्या भागातील देवदार जंगल तर खूप प्रसिद्ध आहे. इंग्रज हे तसे फार साहसी. हिमालयातील जंगलात  ते सर्वत्र फिरले. १८५० मध्ये फेडरीक  विल्सन “पहाडी  हा इंग्रज ह्या भागांत खूप  फिरला आणि देवदारचे जंगल पाहून त्याने टेहरीच्या राजाकडून पाच वर्षाच्या लीजवर हे जंगल ताब्यात घेतले. आणि त्याने देवदारच्या  व्यापारावर भक्कम कमाई केली. त्या भागांत त्याने अनेक गेस्ट हाऊस बांधले. इंग्रज अधिकार्‍यांना नेहमी खुशीत ठेवले. तो  इंग्लंड सोडून इथेच स्थायिक झाला. त्याने मुखबा ह्या खेड्यातील गुलाबी ह्या खेडूत मुलीशी लग्न केले. तो नुसता देवदारचा व्यापार करीत नव्हता तर त्याने विल्सन सफरचंदाची लागवड केली. मोठ्या आकाराची, लाल रंगाची आणि अतिशय गोड आणि रसाळ सफरचंद म्हणजे विल्सन सफरचंदे ! देवदार जंगलाचा हा मालक तर होताच.  त्याने  सफरचंदाची  शेती हा जोडधंदा केला. हे करताना त्याने नदयावर झुलते पूल बांधले. जतगंगा नदीवर ३५० फूट लांबीचा तर भागीरथी नदीवर १२०० फूट लांबीचा पूल बांधणारा हा विल्सन घोड्यावरून सर्वत्र रपेट मारीत असे. लोकांना आजही पोर्णिमेच्या रात्री  ह्या पूलावरून जातांना विल्सनच्या घोड्याच्या टापा ऐकू येतात म्हणे. त्या परिसरातील लोक आजही ही आख्यायिका सांगत असतात. 

UTTARKASHI – ALAKNANDA

भागीरथी - गंगोत्री गोमुख  आणि नंतर 


गंगोत्रीचा हा प्रवास एक कठीण प्रवास आहे. हिमालयातील  ढासळणारे उंचउंच कडे, वळणे घेणार्‍या अवघड वाटा, खोल दर्या,  आपण उत्तरकाशी पर्यन्त प्रवास करतो आणि आपली दमछाक होते. गंगोत्री आहे १०,३०० फूटावर. तेथे  होते गंगोत्री हे छोटेसे देऊळ. एकोणीसाव्या शतकांत अमरसिंग थापर ह्या नेपाळी सेनाधिकारी असलेल्या माणसाने ते देऊळ बांधले होते

GANGOTRI TEMPLE

हिमालयातून गंगा आणली आहे ती भगीरथ ह्या एका शिळेतून.  ही शीळा कोरली आहे. तेथील दगड घासून चकचकीत केलाआहे. गंगोत्रीला हिमालयातील ग्लेसीयर मधून ऊगम पावणारी ही गंगा गोमुखातून बाहेर पडते  आणि पुढे १५०० मैल प्रवास करून मिळते ती बंगालच्या उपमहासागराला मिळते व सर्व  देशाला सुजलाम सुफलाम करते. बॉन्ड लिहितात की  "त्या गौरी कुंडाजवळ एक रात्र राहावे आणि सकाळी सोनेरी किरण पडल्यावर हिमालयातून ग्लेसीयर मधून उगम पावणारी  ही भागीरथी बघत बसावे. ते विहंगम दृश्य ज्याने पाहिले तो धन्य झाला. सकाळची ती सोनेरी किरणे तुमच्या गालांनाही गुलाबी करतात असे जे म्हणतात ते  १०० टक्के सत्य आहे. ती गुलाबी थंडी अनुभवावी. तो ROSE GOLD हिमालय अवर्णनीय  आहे"  अर्थात हे सर्व ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत. नंतर तेथे सर्वत्र बर्फाचे राज्य असते. 

DEVPRAYAG – CONFLUENCE OF ALAKNANDA AND BHAGIRATHI 


अशीही भागीरथी म्हणजे गंगा. हिरवेगार पाणी असलेली ही नदी. अलकनंदा नदी म्हणजे एक अवखळ तरुणी. धडाडणारी. हिमालयातील डोंगराना पोखरत त्यांचे गोटे करणारी. अलकनंदा अडकून पडते डोंगर दर्यात तर भागीरथी वाहत असते संथपणे. देवदारच्या दाट जंगलातून.  उत्तरकाशीतून आपण प्रवास करतो तेंव्हा ही भागीरथी आपल्याबरोबरच चालत असते. संथ गतीने.

आज टेहरी धरण बांधले आहे तिच्यावर. २६६ मीटर उंच. ४२ चौरस मैल परिसरलेले. ३० गावे गिळंकृत केली आहेत ह्या धरणाने. आता टेहरीच्या पुढेच भागीरथीचा प्रवास आपण पाहू शकतो. अशीही गंगा मय्या.  फेडरीक विल्सन सारखे इंग्रज तिच्या प्रेमात पडले ते तेथील निसर्ग सौंदर्‍यामुळे, सफरचंदाच्या शेतीमुळे आणि देवदारच्या दाट जंगलामुळे.  

******

REFERENCE 

GANGA DESCENDS - By Ruskin Bond , THE WRITER ON THE  HILL 

Photos From GOOGLE 


Tuesday, November 16, 2021

अनंतरावांच्या आठवणी

मी “प्रकाशक” झालो आणि मला जीवन समृद्ध करणारा अनुभव मिळाला.  अनंत भालेराव ह्यांचे कावड हे माझे पहिले प्रकाशन होते.  मी प्रकाशक कसा झालो?, ह्यासंबंधी मी जेंव्हा विचार करू लागतो तेंव्हा नकळत “पुस्तकांच्या जन्मकथा“ सांगण्याचा मोह मला होतो.

मी पदार्थविज्ञान संशोधक. रंगविज्ञानावर आधारित रंगतंत्रज्ञान विकसित केल्यानंतर मी  स्वतःचा छोटासा उद्योग सुरू केला. प्रकाशन व्यवसाय हा माझा नवा उपक्रम होता. मी संगणकाच्या व्यवसायाशी निगडीत होतो. 30-32 वर्षापूर्वी डीटीपी तंत्रज्ञान हे संगणकाच्या माध्यमातून पुढे येत होते. त्याची नुकतीच सुरुवात झाली होती. आज इंटरनेटच्या माध्यमातून वेब पब्लिशिंग हे एक मोठे क्षेत्र उपलब्ध झाले आहे. डीटीपी आणि लेझर प्रिंटींग ह्यांच्या विकासामुळे मी नकळत प्रकाशन क्षेत्रात ओढला गेलो व पंचवीस वर्षापूर्वी  एक  स्वतंत्र धंदा म्हणून तीन डीटीपी केंद्रे सुरु केली. काही पुस्तकांची कामे आमच्याकडे येऊ लागली. परचुरे प्रकाशनाचे जी..कुलकर्णी ह्यांचे “कुसुमगुंजा” आणि “माणसे आरभाट आणि चिल्लर” ही दोन पुस्तके संगणकीय अक्षर जुळवणीसाठी आमच्याकडे आली होती. आम्ही  औरंगाबादला क्षितिजा कम्प्युटर सर्व्हिसेस हे डीटीपी सेंटर सुरू केले होते.  “मराठवाडा” आणि  “तरुणभारत” ह्या दैनिकाची कामे आम्हाला मिळत होती. तेथील काही प्रकाशकांची पुस्तके डीटीपीसाठी येऊ लागली. आम्ही काही पुस्तकाची अक्षर जुळवणी आणि पृष्ठरचना केली होती.  तेंव्हाच माझ्या डोक्यात विचार आला की आपणही स्वतःच प्रकाशक व्हावे व चांगली देखणी, सुंदर व विचार करावयास लावणारी, वेगळी पुस्तके बाजारात आणावी.  पुस्तकांचा व लेखकांचा विचार सुरु झाला. माझ्या आवडीचे लेखक शोधत होतो. आणि पहिलाच विचार आला तो “मराठवाडा” दैनिकाचे झुंजार पत्रकार अनंत भालेराव ह्यांच्या लिखाणाचा. त्यावेळी दैनिकाची संपादकीय खुर्ची सोडून अनंतराव विविध लिखाणाकडे वळले होते. “पेटलेले दिवस” प्रसिद्ध झाले होते. “मांदियाळी“ हे पुस्तक मौज प्रकाशनाकडे प्रसिद्धीसाठी दिले होते व प्रकाशनाची वाट पाहत  होते. त्या वेळी अनंतराव आजारी होते पण त्यांचा लिखाणाचा झपाटा चालूच होता. “कावड“ हे सदर ते लिहीत असत. पत्रकार अनंतराव साऱ्या महाराष्ट्राला माहीत होते. परंतु अनंतरावातील साहित्यिक “कावड“ मध्ये प्रकर्षाने दिसत होता. ते लिखाण सर्वस्वी वेगळे होते. मला ते खूप आवडले होते.

अनंतराव भालेराव आणि सुशीला भालेराव मुंबईला आले  होते  तेंव्हा माझ्या कार्यालयात आले होते.  माझ्याबरोबर रंगविज्ञान आणि तंत्रज्ञान हया माझ्या विषयावर त्यांनी चर्चा केली.  

चांगल्या संपादकाची दोन वैशिष्टे असतात. १) चालू राजकीय, सामाजिक घडामोडीवर जनमत तयार करणे. २) वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाज मन व्यक्त करणे. आपले सारे जीवनच राजकारणाने व्यापून टाकलेले असते. राजकारणाचे बरे वाईट परिणाम आपल्या जीवनावर कळत नकळत होत असतात. आपण राजकारणापासून कितीही अलिप्त असलो तरीही त्याचे परिणाम भोगत असतो. अशावेळी आपली काही मते तयार होतात. आपल्याला जे वाटते ते अग्रलेखातून किंवा स्तंभ लेखनातून व्यक्त करणारा ‘संपादक’ आपल्याला आवडतो. अर्थात हे प्रत्येक बाबतीत खरे असते असे नाही. अनंतराव हे असे संपादक होते की जे मला त्यांच्या अग्रलेखामुळे आवडत असत. कारण त्यांची समाजमनाची जाण उल्लेखनीय होती. ते मला आवडणारे संपादक होते.

ह. रा. महाजनी, द्वाभ. कर्णिक, माधव गडकरी आणि गोविंद तळवलकर हे त्या काळातील आघाडीचे पत्रकार. ते मुंबईच्या वर्तमानपत्रांचे संपादक. अनंतराव मराठवाड्याचे संपादक. त्यांचे शब्द म्हणजे शस्त्र होते. महाराष्ट्र टाइम्सच्या गोविंद तळवलकर ह्यांना हे माहीत होते. ते अनंतराव  ह्यांचे चांगले मित्र आणि चाहते होते. त्यांनी अनंतराव ह्यांचे अनेक अग्रलेख महाराष्ट्र टाइम्समध्ये अनेकदा छापले होते. हे आपल्याला खूप काही सांगून जाते.
कावड” मधील लिखाण सर्वच अर्थाने वेगळे होते.
 मला आवडणारे ते सदर होते. त्या लिखाणाचे चांगले संकलन करून सुंदर पुस्तक काढावे, असा विचार डोक्यात आला. पुस्तक “देखणे“ असावे, निर्मीती सुंदर असावी. हा एक विचार तंत्रज्ञ असल्यामुळे प्रभावी होता. अनंतरावाचे लिखाण लक्षवेधी तर होतेच. पुस्तक निर्मीतीही सुंदर झाली पाहिजे, असा माझा ध्यास होता. त्यातूनच माझे पहिले प्रकाशन “कावड” हे बाजारात  आले. अनंतरावांच्या राजकीय आणि सामाजिक कर्तृत्वाचा ठसा मराठवाड्यातील लोकांना चांगलाच माहीत होता. दै.मराठवाडा म्हणजे अनंतराव, हे समीकरण सर्वांनाच ठाऊक होते. त्यांच्या लेखणीचा प्रभाव इतर महाराष्ट्रावर ही दिसू लागला होता. "मराठवाडा मोलाचा नि तोलाचा" हे राज्यकर्त्यांना समजू लागले होते. त्याहीपेक्षा अधिक चिरंतन अशा त्यांच्या भाषाशैलीचा माझ्यावर विशेष प्रभाव होता आणि म्हणूनच त्यांच्या साहित्याचा अनमोल ठेवा असलेला “कावड” ह्या स्तंभ लेखनावर आधारित पुस्तक प्रसिद्ध करावे असे वाटू लागले. मराठवाड्याच्या साहित्य संस्कृतीचा हा ठेवा मला फार मोलाचा वाटला. शब्दांतून व्यक्त होणार्या ह्या अलौकिक भाषासौंदर्याला उत्कृष्ट रचनेचे कोंदण असावे व तशी पुस्तक निर्मिती करावी असे वाटू लागले. मी अनंतरावांना भेटलो. माझा विचार बोलून दाखवला. त्यांना माझी पूर्वपिठीका माहीत होती. त्यामुळे त्यांना थोडेसे आश्चर्यच वाटले. "हा काय नवा उद्योग सुरु करतोयस?", असे ते म्हणाले. त्या नंतर ते “हो“ म्हणाले. प्रा. सुधीर रसाळ, प्रा. भगवंत देशमुख आणि अनंतराव ह्यांनी लेखांची निवड केली. आणि मी प्रकाशनाचे काम हाती घेतले. चित्रकार श्याम जोशी ह्यांनी मुखपृष्ठाचे सुंदर चित्र काढले. अरुण नाईक ह्यांच्या छापखान्यात पुस्तक छापले.  माझ्या ह्या पहिल्याच प्रकाशनाचे खूप कौतुक झाले. “पुस्तक फार छान काढले आहे, देखणे आहे“, असा अभिप्राय कविवर्य कुसुमाग्रजांनी पत्र लिहून कळविला. माझे  मन आनंदून गेले.
शब्द व भाषा या मानवी अभिव्यक्तीच्या व अस्मितेच्या माध्यमाद्वारे व्यक्तिचित्रे, मृत्युलेख, राजकीय भाष्य,
समाजप्रबोधन, आणि अनुभव कथन या निरनिराळ्या विषयावरील बेचाळीस निवडक स्तंभ लेखाचा संग्रह म्हणजे “कावड”. ”ऋतू प्रकाशनाचे हे पहिलेच प्रकाशन असून देखील उत्कृष्ट निर्मिती हा ह्या ग्रंथाचा विशेष आहे“, अशी प्रतिक्रिया “रविवार सकाळ” मध्ये समीक्षकांनी नोंदवली. बहुतेक सर्व मराठी वर्तमानपत्रातून त्यावर समीक्षा लिहून आली. ”लक्षवेधी पुस्तक” म्हणून त्याचा उल्लेख अनेकदा झाला. “कावड”चे मुद्रण आणि मांडणी उत्कृष्ट आहे, असा अभिप्राय अनेकांनी नोंदवला.
ह्या पु
स्तकाचा प्रकाशन समारंभ परभणीला विजय तेंडुलकराच्या हस्ते झाला होता. “शब्द नव्हे शस्त्र”, असा अनंतरावाच्या लेखनशैलीचा गौरव करणारे तेंडुलकरांचे ते भाषण खूप रंगले आणि गाजले. सर्व मराठवाड्यातून निरनिराळ्या ठिकाणाहून,  दूरदूरची  मंडळी कार्यक्रमाला आली होती. दीड दोन हजार लोक पुस्तक प्रकाशनासाठी येतात आणि अनंतरावाचे पुस्तक विकत घेतात हा अनुभव विलक्षण होता. अनंतराव ह्यांच्यावर असलेल्या प्रेमामुळे ही सारी मंडळी जमली होती. विजय तेंडुलकरही भारावून गेले होते. बहुधा, अनंतरावाचा तो शेवटचा सार्वजनिक कायक्रम असावा. त्या दिवशीचे त्यांचे भाषण मनाला चटका लावणारेच होते. “कावड”चा प्रकाशन समारंभ सर्वांनाच भारावून टाकणारा होता. कार्यक्रमाच्या स्मृती आजही ताज्याच वाटतात. जेव्हाजेव्हा मी मराठवाड्यात जातो तेव्हातेव्हा सारेच जण त्या कार्यक्रमाची आवर्जून आठवण काढतात. कावड नंतर रामप्रहर हे विजय तेंडुलकर ह्यांचे पुस्तक आमच्याकडे प्रकाशनासाठी आले. ही दोन्ही पुस्तके म्हणजे वर्तमानपत्रीय लिखाणाचे मानदंड आहेत.

मी जेंव्हा “कावड” आणि विजय तेंडुलकरांच्या “कोवळी उन्हे” ह्या दोन पुस्तकांची
 तुलना करतो  तेंव्हा मला त्या दोन पुस्तकातील काही  साम्य लक्षात येतात. तसेच दोघांच्या लेखनशैलीची वेगळी वैशिष्ट्ये माझ्यासमोर येतात,  म्हणून दोघांचेही लिखाण मला विशेष आवडते॰

पुस्तक मिळाल्यावर महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या  पु..देशपांडे ह्यांनी आपली प्रतिक्रिया  अनंतराव ह्यांना पत्र लिहून कळविली होती. ती अशी: एखाद्या कुमार गंधर्वाने मैफिलीत शांतपणे मांडलेल्या एखाद्या रागातला धीमा ख्याल असो की सहज बोलता बोलता गळ्यातून निघालेली लकेर असो, तिच्या मधून कुमारचं गंधर्वपण आपल्या अस्तित्वाची खूण पटविल्याशिवाय रहात नाही. “कावड“ मधले तुमचे लेखन “झरा मुळचाचि खरा“ ह्याची आल्हाददायक साक्ष पटवून देते. अचानक धनलाभ व्हावा तसा ग्रंथलाभ झाल्याच्या आनंदात मी आहे“

श्रीखंड्याने एकनाथांच्या घरच्या रांजणात रोज कावड घातली. अनंतरावांनी वाचकांच्या रांजणात घातलेल्या कावडीचे रसग्रहण करताना प्रा. . प्र. प्रधान म्हणतात “परिपक्व पत्रकाराच्या व्यक्तिमत्वाचा विलोभनीय अविष्कार म्हणजे “कावड”.  असे खूप काही लिहून आले. पंतप्रधान नरसिंहराव ह्यांनीही ह्या पुस्तकाचे कौतुक केले. ते अनंतरावांचे चाहते होते व मराठी साहित्याचे रसिक वाचक होते.

प्रकाशकाला मान्यवरांचे अभिप्राय जसे मोलाचे वाटतात तसेच सामान्य वाचकांच्या प्रतिक्रिया ही खूप काही सांगून जातात. मला खूप वाचकांची पत्रे मिळाली.  श्री न. सा. सत्तूर मला लिहितात, माझे जीवनच मुद्रणालयमय झाले आहे. कारण मी मुद्रितशोधक म्हणून येरवडा कारागृहातील शास्त्रीय मुद्रणालयातून निवृत्त झालो. वाचनाची गोडी. त्यातील निवडक विचार टिपणे हा माझा छंद. मराठवाड्याचा संपूर्ण इतिहास मला “कावड” मधून भावला. ही कावड अनेकांच्या घरी आपले म्हणणे सांगत राहील.” किती बोलका अभिप्राय.
शब्द नव्हे शस्त्र
असा ज्यांचा बाणा होता त्या “मराठवाडा” कार अनंत भालेराव आणि स्वातंत्र्यसेनानी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ ह्या दोघांचे अगदी जवळचे सहकारी, जयहिंद प्रकाशनाचे प्रमुख जगन्नाथराव बर्दापूरकर ह्यांचे निकटतम मित्र आणि सहकारी अशी ज्यांची सार्वजनिक ओळख होती ते केशवराव देशपांडे. मराठवाडा” ह्या भाषिक वर्तमानपत्राचे ते सरव्यवस्थापक होते. अनंतराव, जगन्नाथराव बर्दापूरकर आणि  केशवराव देशपांडे हे प्रसिद्ध त्रिकुट आणि एकमेकांचे सहकारी. आपले सहकारी  “केशवराव देशपांडे: आमचे ब्रदर जॉन” ह्या लेखात अनंतराव लिहितात, 'मला पत्रकारितेच्या क्षेत्रात जे काही थोडेफार यश मिळाले असेल त्यावर शंभर टक्क्यांचा अधिकार हा केशवरावांचा आहे. ते प्रत्येक प्रसंगी माझ्या पाठीशी राहिले व खर्या अर्थाने पाठीशी राहिले. प्रसिद्धीच्या झोतात मी सातत्याने राहिलो मात्र केशवराव त्या झोतापासून प्रयत्नपूर्वक दूर राहिले. त्यांच्या परिश्रमाचे, कौशल्याचे व गुणाचे श्रेय नकळत मला मिळत गेले. केशवरावांचा मोठेपणा असा की, ते सदैव उदार दात्याची व घरातल्या वडील माणसांची भूमिका मन:पूर्वक पाडीत राहिले. वयाने ते माझ्यापेक्षा लहान परंतु वृत्तीने जेष्ठ. त्यांचे हे जेष्ठत्व मला अखेरपर्यंत उपयोगी तर पडत गेलेच परंतु मराठवाडा दैनिकाच्या प्रगतीला ते अधिक उपयोगी ठरले. साप्ताहिकापासून दैनिकापर्यंतचा या वृत्तपत्राचा प्रवास प्रामुख्याने केशवरावांच्या नेतृत्वाखालीच होत गेला'. सेतू माधवराव ह्यांचे जसे ब्रदर जॉन होते तसेच केशवराव अनंतरावांचे 'ब्रदर जॉन' होते. ह्यात अनंतराव ह्यांचा मोठेपणा दिसून येतो. त्यांची आपल्या सहकार्याबद्दलची आत्मीयता दिसून येते.   

“मराठवाडा” हे भांडवलदाराचे वर्तमानपत्र नव्हते. सरकार आणि सरकारी धोरणावर सतत हल्ले करणारे व घनघोर टीका करणारे वर्तमानपत्र म्हणून त्याचा नावलौकिक होता. टिळक-आगरकरांच्या परंपरेतील वृतपत्र म्हणून ते नावाजले होते. "मराठवाड्या"चा श्वास होता. मराठवाड्याची अस्मिता होती. मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न घेऊन सरकारशी लढणारे वर्तमानपत्र होते. अशा वर्तमानपत्राला शासकीय जाहिरातींचा पाठिंबा नसतो. असे वर्तमानपत्र चालविण्याचे अर्थशास्त्र फार कठीण असते. त्यामुळेच अनंत भालेराव नेहमी म्हणत असत की अग्रलेख लिहिणे सोपे आहे परंतु  रोजचे वर्तमानपत्र काढण्यासाठी करावे लागणारे व्यवस्थापन अतिशय अवघड आहे. त्या काळात वर्तमानपत्राला कागद मिळवण्यासाठी फार कष्ट पडत असत. टंचाईच्या काळात कागद कसा उपलब्ध करून घ्यायचा हे अतिशय कर्मकठीण काम होते. त्याच बरोबर भांडवली वर्तमानपत्राची स्पर्धा जीवघेणी होती. वृतपत्र वितरकांना फूस लाऊन देणे हे स्पर्धात्मक वर्तमानपत्राचे काम जोरांत चालू होते. आणि अशी स्पर्धा औरंगाबादेत नुकतीच सुरु झाली होती. नियमित कागद पुरवठा आणि आवश्यक असलेल्या जाहिराती ह्यावर वर्तमानपत्र चालतात. त्यामुळेच ती रोजच्या रोज प्रसिद्ध करता येतात. त्याचे गणित अनंतराव भालेराव ह्यांना चांगले जमले आणि त्यांचा “मराठवाडा” महाराष्ट्रात गाजू लागला. असंख्य व्यावसायिक अडचणींना तोंड देत मराठवाडा दैनिक लोकांचे प्रश्न मांडत प्रसिद्ध होत होते.

मराठवाड्याचा दिवाळी अंक अगदी झोकात निघत असे. अनंत भालेरावांच्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यिक, लेखक आणि कवी मराठवाडा दिवाळी अंकासाठी आवर्जून लिहित असत. मराठवाड्यातील आजचे जे नावाजलेले साहित्यिक, कवी आणि चित्रकार आहेत ते मराठवाडा दिवाळी अंकातील लिखाणामुळेच पुढे आले आहेत. “मराठवाडा’ दिवाळी अंकाला मुंबई पत्रकार संघाचा उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून लागोपाठ तीन चार वर्षे पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे मराठवाडा दिवाळी अंक खूप नावाजला होता.  "मराठवाडा" दिवाळी अंक नेहमीच लक्षवेधी ठरला.
माझा मोठा भाऊ रवींद्र गंगाखेडकर  हा “मराठवाड्या”चा परभणी जिल्ह्याचा
प्रतिनिधी होता. मुलाखती घेणे, संपादन करणे हा त्याचा आवडीचा विषय होता. राजकीय मंडळींच्या गोटातून बातम्या कशा मिळवायच्या हे त्याला अवगत होते. जेंव्हा नुकताच ‘दैनिक मराठवाडा’ सुरु झाला होता  तेंव्हा परभणी जिल्ह्याचा वार्ताहर म्हणून त्याची नेमणूक झाली. सामाजिक आणि राजकीय मंडळीत त्याची उठबस असे. त्याची परभणी जिल्ह्याची वार्तापत्रे दर आठवड्याला प्रसिद्ध होत असत. ती खूप गाजली. मानवत खून खटला उजेडात आणण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. ते प्रकरण खूपच गाजले. त्यावेळी तो अनेकदा जीव धोक्यात घालून खूप हिंडला. स्थानिक राजकारणाची त्याला चांगलीच जाणीव होती. त्याने अनेक गोष्टी उजेडात आणल्या. भ्रष्टाचार शोधून काढले. 'शोध पत्रकारिता', असे ज्याला म्हणतात ते त्याने 3०-3५ वर्षापूर्वी प्रस्थापित केले ते मराठवाड्याचा एक वार्ताहर म्हणूनच. अनंत भालेराव ह्यांचा त्याच्यावर खूप विश्वास होता. त्यांच्या पठडीतच तो पत्रकार म्हणून तयार झाला. आठवड्यातून एकदा तो औरंगाबादला येत असे आणि त्याची अनंतरावांशी भेट होत असे. त्यांच्याशी चर्चा होत असे. मी अनंतराव भालेराव ह्यांचे ‘कावड’ हे पुस्तक प्रकाशित केले होते. त्या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ आम्ही परभणीला ठरविला होता. तो देखणा समारंभ तेथे आयोजित केला त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी रवींद्रनेच घेतली होती. अनंतराव ह्यांच्यावरील प्रेमामुळे सर्व मराठवाड्यातून लोक आले होते. सभागृह संपूर्ण भरले होते. दोन दिवस परभणी शहरात रवीने ३ कार्यक्रम ठेवले होते. कार्यक्रमाच्या आयोजनावर अनंतराव खूष होते. त्यांचे परभणीवर विशेष प्रेम होते.  आजही परभणीकर त्या कार्यक्रमाची नेहमी आठवण काढतात.

असा पत्रकार पुन्हा होणे नाही.

****