Friday, February 13, 2015

मध्यप्रदेशचा दौरा - १


मध्यप्रदेश 
खजुराहो - हिंदू देव देवतांची शिल्पे असलेले हे जैन मंदिर . खजुराहो येथे ८५ हिंदू व २५ जैन देऊळे आहेत. ही मंदिरे बांधण्याचा काळ तोच होता .

भारताचा मध्यवर्ती प्रदेश , विन्द्य पर्वताच्या लांबच लांब रांगा. उत्तर आणि दक्षिण भारताला वेगळ्या करणाऱ्या. नर्मदा, तापी , चंबळ, बेटवा, सोने आणि महानदी ह्या नद्यांनी हिरवागार करणारी शेती. सुजलाम – सुफलाम असलेला हरित प्रदेश.  हिंदू – बुद्ध –जैन – मुस्लीम एकत्र गुण्यागोविंदाने राहणारा शांत प्रदेश. उज्जैन येथील हिंदू देवालये , सांचीचा स्तूप , असंख्य जैन मंदिरे , इस्लामी राजवटीच्या प्रभावामुळे स्थापित झालेल्या जुन्या मशिदी येथे सर्वधर्मभाव नांदतो हेच दर्शवितात. अनेक संस्कृतीचा जणू संगम. विन्न्द्य आणि सातपुडा ह्या पर्वत रांगांमध्ये पसरलेला सपाट प्रदेश. आजूबाजूला घनदाट जंगले. वन्यप्राणी अजूनही वस्तीला आहेत अशी जंगले. कान्हा आणि बांधवगढ येथील वाघ मुक्त संचार करतात.
खजुराहो : आज ४-५ हिंदू देवालये चांगल्या स्थितीत आहेत . त्यापैकी हे एक. 

शाकुंतलकार कवी कालिदास येथीलच. तानसेन इथलाच. खजुराहो येथील अप्रतिम हिंदू आणि जैन देवालये म्हणजे वास्तुकला आणि शिल्पकला ह्या क्षेत्रात भारतीयांनी घेतलेली प्रचंड झेप.  भीमबेटका येथील गुहा पाहिल्यावर  अश्मयुगीन भारतीय जीवन कसे होते ह्याची कल्पना तर येतेच पण  ई.स .पूर्व दहा हजार वर्षापूर्वी येथिल माणसांची चित्रकला आपल्याला थक्क करून टाकते.

भीमबेटका : अश्मयुगीन गुहा ( इ,स, पूर्व १०००० वर्षे )
 ह्या एकाच प्रांतातील तीन ठिकाणे ( खजुराहो , सांची आणि भीमबेटका ) WORLD HERITAGE SITES म्हणून प्रसिद्ध आहेत. इंदूरजवळील मांडू हे इतिहासकालीन शहर , प्रेमाच्या जगात प्रसिद्ध असलेल्या राणी रूपवतीचा महल ,  विक्रमादित्याचे उज्जैन , नर्मदेच्या काठावर असलेल्या विविध रंगी संगमरवरी दगडांच्या टेकड्या ( भेडाघाट ), बांधवगढचे जंगल आणि पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण , ही सारी ठिकाणे पहावयाची असतील तर २००० कि.मी. पेक्षा अधिक प्रवास करावा लागतो.
सांचीचा स्तूप 

 त्यासाठी आम्ही इंदूर – उज्जैन - भोपाळ – भीमबेटका – पंचमढी – जबलपूर – भेडाघाट – बांधवगढ – खजुराहो –झांशी – ग्वाल्हेर असा आडवा – तिडवा मध्यप्रदेश पादाक्रांत केला. ह्यावर्षी प्रचंड थंडी होती. काही ठिकाणी पारा चार  डिग्रीच्या खाली गेला होता.

नर्मदा : धुंवाधार धबधबा 

मी अनेकदा कामानिमित्त इंदूर – ग्वाल्हेरला गेलो होतो. पण इतर ठिकाणांना भेटी दिल्या नव्हत्या. काही वर्षापूर्वी ह्या प्रांतात फिरणे तसे कठीणच होते. चंबळचे खोरे दरोड्यासाठी आणि डाकूसाठी प्रसिद्ध होते. रस्ते जवळ जवळ नव्हतेच. मोठी शहरे नव्हती. आज चित्र खूप बदलले आहे. रस्ते एकदम सुंदर. खड्डेमुक्त रस्ते पहायचे असतील तर मध्यप्रदेशमध्ये रोडने प्रवास करावा. अहुनही शहरे विकसित झालेली नाहीत. इंदूर – ग्वाल्हेर – भोपाळ आणि जबलपूर ही प्रमुख शहरे. अजून SMART CITY होण्यास अनेक वर्षे लागतील. सोई-सुविधा जेमतेम. विक्रमादित्याचे उज्जैन हे फार दुर्दशा झालेले शहर दिसते. इंदूरचा जुना भाग खूप वाईट अवस्थेत आहे. जैन लोकांचे कांच मंदिर ज्या भागात आहे तेथे वाहतूक व्यवस्था पूर्ण कोलमडलेली आहे . 
राणी रुपमतीचा महल , मांडवगढ , इंदूरपासून १०५ कि.मी. 

ग्वाल्हेर शहर तसे अविकसितच आहे. इंदूर – ग्वाल्हेर येथील राजे मंडळी सुखात राहत होती. पण जनता मात्र वाईट अवस्थेत रहात होती. आजूबाजूच्या परिसराकडे ह्या राजे मंडळीनी काहीही लक्ष दिले नव्हते . शहराची वाट लागली आहे. जबलपूर थोडे बरे वाटले. पण अजूनही विकसित झालेले नाही.  पंचमढीसारखे थंड हवेचे ठिकाण. 

पंचमढी 
फारसे प्रगत नाही. लष्करी वस्तीचे ठिकाण असल्यामुळे थोडे वेगळे. मधुचंद्राला जाणारी युगुले तेथे असतात. परिसर निसर्गरम्य. उंच धबधबे. सातपुडा पर्वतांच्या रांगा. लाखो वर्षापूर्वी समुद्रातील प्रचंड हालचालीमुळे ,व ज्वालामुखीच्या स्फोटामुळे तयार झालेला हा भूभाग. काही अंतरावर अश्मयुगीन गुहा .  खजुराहोला पर्यटकासाठी खूप चांगल्या सुविधा नाहीत. गावातील रस्ते वाईट . स्वच्छता नाहीच. नवे विमानतळ होते आहे. दोन चार पंचतारांकित हॉटेल्स दिसून येतात. 
बांधवगढला जाण्यासाठी चांगले रस्ते होत आहेत. पण जंगल कमी होत आहे असे म्हणतात.

बेडाघाट - नर्मदाकाठी संगमरवरी दगडाच्या खाणी  

सध्याचे सरकार खूप काही करताना दिसत आहे. विकास होताना दिसतो आहे . रस्ते – पाणी आणि वीज ह्या तीन बाबतीत प्रगती दिसून येते. हिरवीगार गव्हाची शेती डोळ्यात भरते. कुठेही वैराण वाळवंट दिसत नाही. नर्मदेच्या काठाने प्रवास करताना डोळे दिपून जातात. काही भागात पात्रातील पाणी खूप कमी झाले आहे. त्यामुळे तो प्रदेश वाळूकामय दिसतो. नर्मदा हे ह्या प्रदेशाला मिळालेले वरदानच आहे. नर्मदेच्या आणि इतर नद्यांच्या काठाचा प्रदेश सुंदर करण्यासाठी प्रयत्न व्हावयास हवे.

ग्वाल्हेरचा किल्ला : मोगलांच्या पूर्वी  यवनांनी अनेक हल्ले केले  पण किल्ला  जिंकता आला नाही. 

विकासाचा वेग वाढला तर मध्यप्रदेश काही वर्षात विकसित प्रांत असेल. बिमारू ( बिहार – मध्यप्रदेश – राजस्थान – उत्तरप्रदेश )प्रदेशातील “म” कमी होईल.

मराठी माणसाला मध्यप्रदेश जवळचा आहे. आपुलकीचा वाटतो. मावळ  भाग तसा मराठी मावळ्याचा . अटकेपार मराठी माणसे झेंडा लावून आली. हा प्रदेश जिंकल्यावर काही मराठी सरदार इथे स्थिरावले . त्यांना जहागिरी मिळाल्या . ते राजे झाले . इंदूरचे होळकर आणि ग्वाल्हेरचे शिंदे एकेकाळचे मराठी सरदारच. झांशीची राणी तशी मुळची महाराष्ट्रातीलच. त्यानंतरही अनेक मराठी कुटुंबे येथे आली व स्थाईक झाली. एवढेच काय , फार पूर्वी म्हणजे इब्राहीम लोदीच्या दक्षिण स्वारीच्या आधी मांडवगढला परमार ( म्हणजे पवार ) राज्य करीत होते, असे म्हणतात. असा हा मावळ प्रांत .
असा हा मध्यप्रदेश पहाण्यासारखा आहे. प्रवास थोडासा त्रासदायक आहे . सोई-सुविधा अधिक उपलब्ध झाल्यातर अधिक पर्यटक आकर्षक होतील.  पुढील भागात खजुराहो , मांडू , भीमबेटका ,बेडाघाट , ग्वाल्हेर  ह्यांच्यावर विस्तारित लिहिणार आहे . 

मध्यप्रदेश -२  

 भीमबेटका म्हणजे भारतातील अश्मयुगीन मानवी संस्कृतीचा इतिहास
मध्यप्रदेश मधील भीमबेटका
इ.स. पूर्व दहा हजार वर्षापूर्वीची चित्रकला  
डॉ नरेंद्र गंगाखेडकर 

No comments:

Post a Comment