Tuesday, June 16, 2020

The Great Indian Novel : महा भारत कादंबरी -१ - शशी थरूर

The Great  ( महा )  Indian ( भारत )  Novel ( कादंबरी )

हे शशी थरूर  ह्यांचे खूप गाजलेलं पुस्तक हाताशी आलं . त्याच्या २५ आवृत्या निघाल्या आहेत . थरूर ह्यांनी ही  कादंबरी लिहिली तेंव्हा ते भारतीय राजकारणात नव्हते . वयाने फार तरुण होते . इंटुक होते . म्हणजे आजही आहेतच. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय ? , हे त्यांना चांगले माहित असल्यामुळे इतिहास लेखन नं  करता त्यांनी कादंबरी लेखन केलं . त्यांना स्फूर्ती मिळाली ती महाभारताकडून . रामायण आणि महाभारत हे असे दोन ग्रंथ आहेत की जे  आपल्या जगण्याचे विश्व व्यापून टाकतात. इतके सुंदर ग्रंथ दुसऱ्या भाषेत सापडणे कठीण. त्यातही महाभारताचे वैशिष्ट्य वेगळे . ह्या ग्रंथात आपल्याला जी माणसे दिसून येतात ती आपल्या आजूबाजूला आपण रोजच बघत असतो. आणि नकळत आपण बोलताना म्हणतो , ' तो बघ शकुनी मामा चालला आहे '. अशी ही  विविधरंगी,  विविध स्वभावाची माणसं आपल्याला महाभारतात सापडतात. कादंबरीकार शशी थरूर ह्यांना   गेल्या २०० वर्षाच्या भारतीय इतिहासावर कादंबरी लिहावी असे वाटले. भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास  म्हणजे एक आधुनिक महाभारत आहे ,असे त्यांना वाटलं असावं . महा भारत कादंबरी  असेच नांव त्यांना सुचलेलं दिसतं . मग ह्या आधुनिक  महाभारतात तीच जुनी गाजलेली पात्रे त्यांनी शोधली. पण ह्या त्यांच्या  महा भारतातील पात्रे म्हणजे भीष्म , धृतराष्ट्र ,पडूं  ह्या व्यक्ती  कोण आहेत हे मात्र आपणच शोधायचे आहे. लेखकाने हे लेखन   कादंबरीच्या स्वरूपात  केलेले असल्यामुळे त्याने सम्पूर्ण अभिव्यक्ती  स्वातंत्र्य  घेतले आहे . त्यामुळे त्याची इंटरप्रिटेशनची म्हणजे अर्थ लावण्याची जबादारी संपते. ते काम वाचकाचे आहे . त्यामुळे  आपल्यालाच त्या व्यक्ती कोण आहेत हे मात्र शोधावे लागते. कारण लेखक असे सांगतो की  ही कादंबरी ही भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाची म्हणजे गेल्या २०० वर्षाच्या भारताच्या इतिहासाची ही कथा  आहे. महाभारतात जी  पात्रे आहेत तीच पात्रे ह्या कादंबरीत दिसून येतात. वेद व्यास म्हणजे स्वतः शशी थरूर असावेत . तेच हे नवे महाभारत आपणास सांगत आहेत. महाभारतात धृतराष्ट्र , पंडू , विदुर , दुर्योधन ,शकुनी ही जी पात्रे आहेत तीच आपल्याला ह्या कादंबरीत भेटतात. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील गांधीजी , पंडित नेहरु  आणि नेताजी सुभाष ह्यांना आपण ओळखतो . नेहरुनंतरचे लाल बहाद्दुर शास्त्री , इंदिरा गांधी , जयप्रकाश नारायण आणि मोरारजी देसाई ह्यांनाही  आपण चांगलेच ओळखतो. ह्या मंडळीत महाभारतातील कोणते पात्र शशी थरूर ह्यांना अभिप्रेत आहे हे कादंबरी वाचताना आपणच शोधून काढायचे आहे. स्वातंत्र्यलढ्यात  ज्या पक्षाने भाग घेतला तो पक्ष काँग्रेस म्हणून आपण ओळखतो. महाभारतात  कौरव - पांडव आहेत. कुंतीचा कर्ण आहे. आधुनिक भारताच्या इतिहासात मुस्लिम लीग आणि फाळणीला जबादार असलेले पाकिस्तानचे महंमद अली जीना  आपणास माहित आहेत. शशी थरूर ह्यांच्या ह्या महाभारतात  कर्ण  आणि कर्णीस्तान   म्हणजे कोण?, हे आपल्याला शोधायचे आहे. इंग्रजांशी स्वातंत्र्य लढा देणारी पार्टी काँग्रेस होती तर थरूर ह्यांच्या ह्या महाभारतात म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारी पार्टी आहे कौरवा पार्टी. कुंतीचा सूर्यपूत्र म्हणून आपण कर्णाला ओळखतो. थरूरांच्या महाभारतातील कर्ण  म्हणजे महंमद अली कर्ण . महमंद अली कर्ण हे कर्णीस्तानचे भाग्यविधाते.  म्हणजेच  पाकिस्तानचे निर्माते.  ही  कादंबरी असल्यामुळे कर्ण म्हणजे जीना हे समजल्यानंतर आपल्याला  थोडा शॉक बसतो.   महाभारतात आपण ओळखतो भीष्मपितामह ह्यांना. ह्या महाभारतात आपण भेटतो गंगाजी म्हणजे गंगाद्त्त ह्यांना .  हे गंगाजी म्हणजे गांधीजींचं असे आपणास वाटू लागते  कारण तशाच चळवळी त्यांनी उभ्या केल्या होत्या  आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले . भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु हे आपण ओळखतो . काँग्रेस पार्टीचे गांधीजींनंतरचे  ते प्रमुख नेते. महाभारतातील भीष्म हे कौरव पार्टीचे असले तरी हस्तिनापूरचे सम्राट झाले नाही. तसे गांधीजीही काँगेसचे पितामह असले तरी भारताचे पंतप्रधान झाले नाहीत . हा खरा मान धृतराष्ट्राचा. कौरवाचा तो प्रमुख. पंडित नेहरु  म्हणजे थरूरांच्या महाभारतातील धृतराष्ट्र. तेच हस्तिनापूरचे म्हणजे  दिल्लीचे राजे झाले. धृतराष्ट्र हा अंध. पंडितजी तर दुरदृष्टीचे नेते . ते अंध कसे असतील.  Nehru was Blind Idealist असे थरूरांना  अभिप्रेत असावे. धृतराष्ट्राचे भाऊ पंडू आणि विदुर. थरूरांच्या महाभारतातील पंडू म्हणजे नेताजी सुभाष आणि विदुर म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. पडूंचे गंगाजींशी जमले   नाही आणि त्यांनी कौरवा पार्टी सोडून एक सेना उभी केली. नेताजींची आझाद हिंद सेना आपण ओळखतो कारण नेताजींना अहिंसेवर आधारित चळवळीमुळे स्वातंत्र्य मिळेल ह्यावर विश्वास नव्हता  म्हणून ते काँग्रेसचा राजीनामा देऊन  त्यांनी आझाद हिंद  सेनेसारखी   सशस्र  सेना  उभारली .
धृतराष्ट्राचा मोठा मुलगा म्हणजे दुर्योधन. थरूरांच्या महाभारतात धृतराष्ट्राला आहे मुलगी. तिचे नांव आहे प्रिया दुर्योधनी . आधुनिक महाभारतात पंडित नेहरु  नंतर त्यांची मुलगी इंदिरा गांधी ह्यांनी त्यांची गादी  मिळविली ती लाल बहाद्दूर शास्त्री ह्यांच्या मृत्यूनंतर.  ह्या महाभारतात धृतराष्ट्राला मुलगी आहे म्हणून थरूरांनी ते पात्र उभे केलं आहे ते प्रिया दुर्योधनी . ते ह्यामुळेच. लाल बहाद्दूर शास्त्री ह्यांना त्यांनी केलं आहे माद्रीचा भाऊ शिशुपाल . ह्या  कादंबरीत प्रिया दुर्योधनीला कायदेशीर मदत करणारा सल्लागार आहे शकुनी शंकर डे . म्हणजे इंदिरा गांधी ह्यांचे आणीबाणीच्या काळातील सल्लागार  सिद्धार्थ शंकर रे . अशी ही  सगळी गंमत . कधी काही विनोद निर्माण करणारी . आपल्याला मनसोक्त हसविणारी. आपण एखादा वग पाहताना जसे हसत असतो तसे हसत राहतो.
थरूरांच्या महाभारतात द्रोणाचार्य आहेत जयप्रकाश द्रोण . म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासातील काँग्रेसची सत्ता उलथून टाकून इंदिरा गांधींचा पराभव करणारे नेते  जयप्रकाश नारायण. प्रिया दुर्योधनीचा पराभव करून हस्तिनापूरची गादी मिळवतो तो युधिष्ठिर. हा युधिष्ठिर म्हणजे मोरारजी देसाई .दुर्योधन आणि युधिष्ठिर ह्यांच्यात जसा सत्तेसाठी झगडा होतो तसाच झगडा आपण राजकारणात पाहिला आहे तो  मोरारजी देसाई आणि इंदिरा गांधी ह्यांच्यात. द्रोणाचार्य आणि युधीष्ठीर दुर्योधनाला सत्तेपासून दूर करतात तसेच जयप्रकाश आणि मोरारजी देसाई हे जनता राज्य आणून  काँग्रेसला पराभूत करतात.
महाभारतातील अनेक पात्रे ह्या आधुनिक महाभारतात आहेत. थरूरांनी कादंबरी खूपच मनोरंजक केली आहे . आपण राजकारणातील ही पात्रे ओळखतो.  कादंबरीत कणिका  हे पात्र आहे, ते म्हणजे  व्ही के कृष्णमेनन . लेडी माउंटबॅटन ह्यांना आपण ओळखतो. कादंबरीत ते पात्र आहे लेडी जिऑग्रिना . भारतीय लोकशाही म्हणजे द्रौपदी .काँग्रेस ( आय ) म्हणजे कादंबरीतील  कौरवा ( आर ) तर खरी काँग्रेस म्हणजे कौरव ( ओ ). जनता दल म्हणजे  पीपल्स पार्टी .अशी सर्व पात्रे  आपल्या ओळखीची  आहेत .आपण त्यांना  कादंबरी वाचताना ओळखत जातो आणि काही वेळा खूप  हसतो.अलीकडीला स्वातंत्र्यानंतरचा राजकीय इतिहास तर आपल्याला माहीतच आहे  त्यामुळे आपण रमतो.. थरूर ह्यांनी आजच्या स्वतः च्या पार्टीला कौरवा पार्टी केले आहे . त्यावेळी ते पक्षीय राजकारणात नव्हते. आज ते काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत . धृतराष्ट्र आणि प्रिया दुर्योधनी ही दोन पात्रे त्यांनी अशी कशी रंगवली  असे आपल्याला वाटते आणि तरीही ते आज काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते कसे आहेत ?,असा प्रश्न माझ्यासारख्या अराजकीय व्यक्तीला पडतो.  This great Indian Novel might upset a few people असे आपल्याला वाटते पण तसे तर काहीच दिसून येत नाही . उलट This novel entertains and amuses us. शशी थरूर ह्यांचा कल्पनाविलास भन्नाट आहे. धन्य आहे हा आधुनिक महाभारत सांगणारा वेद व्यास !महाभारताचा आधार घेऊन म्हणजे मायथॉलॉजीच्या पदराखाली  लपून त्यांनी  हे महाभारत मनोरंजक केले आहे ,हे खरे असले तरी काही मोठ्या व्यक्तींचे मूर्तिभंजन केले आहे . ही कादंबरी आहे हे खरे . असे असले तरी हे भारतीय नेते  The  Great Indian Heros आहेत हे दुर्लक्षून चालणार नाही. आजही ह्या कादंबरीच्या नव्या आवृत्या निघत असतात आणि खूप खपत असतात.
पुढील ब्लॉगमध्ये मी  थरूर ह्यांच्या गंगाजी, धृतराष्ट्र , पंडू , प्रिया दुर्योधनी, युधिष्ठिर आणि  जयप्रकाश द्रोण ह्यांच्यावर लिहिणार आहे .इंग्रजीत हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. मराठी वाचकांना ते फारसे माहित नसल्यामुळे  माझा हा खटाटोप. 

No comments:

Post a Comment