Sunday, June 21, 2020

The Great Indian Novel ( महा भारत कादंबरी) , शशी थरूर : गंगाजी -२

गंगाजी 

आपण महाभारताशी प्रामाणिक  राहून ही  आधुनिक ' महा भारताची कादंबरी 'लिहिली आहे असे थरूर  एका ठिकाणी नमूद करतात. त्यांची कादंबरी सुरु होते ती सत्यवती आणि पाराशर ह्या साधूच्या प्रेमकथेपासून. ही प्रेम कथा लिहिताना थरूर कामसूत्रातील प्रेम ह्या कल्पनेचा आधार घेऊन अनैतिक असलेली  प्रेमकथा रंगवीत जातात. महाभारतात किंवा त्याकाळच्या समाजव्यवस्थेत रामायणासारखी  एकपत्नी कुटुंब व्यवस्था नव्हती.  शशी थरूर ह्यांना कामसूत्र हे महाभारताचा एक भाग आहे, असे वाटते.  . कामसूत्र हा  एक वेदाचाच  भाग आहे असे त्यांना वाटते. The way to man 's soul is through his bowels असे त्यांचे मत आहे. अनेकदा ही प्रेमकथा अश्लीलतेकडे केंव्हा सरकते ते आपल्याला समजत नाही. आता कादंबरी म्हंटलं की असे प्रसंग रंगविण्याची नामी संधी. पाराशर हा ब्राम्हण साधू. सत्यवती एका कोळी राजाची मुलगी. ती नदी किनारी स्नानासाठी जाते आणि  पाराशर ह्या ब्राम्हणाला ती ओलेती स्त्री दिसते आणि तो तो तिच्यावर भाळतो आणि ते दोघे प्रेमात रंगून जातात व सत्यवती त्याला आपले सर्वस्व देते. हा प्रेमप्रसंग थरूर खूप  रंगवून सांगतात. मला तर ना सी फडक्यांची कादंबरी वाचतो आहोत असाच भास झाला.  हा साधू मग कोळी राजाकडे जातो व त्याला एक वर्षासाठी तुझ्या मुलीला घरकामासाठी घेऊन जातो व नंतर येथे पाठवून  देतो असे सांगतो. ब्राम्हणाने केलेली ही मागणी कोळी कशी नाकारणार? सत्यवती त्याच्याबरोबर खुशीने निघून जाते . त्यावेळी पाराशरपासून तिला एक पुत्र रत्न होते . ते पुत्ररत्न म्हणजे वेदव्यास. पाराशर तिचा उपभोग घेतल्यानंतर एक वर्षाने कोळ्याकडे सत्यवतीला  परत पाठवितो. वेदव्यास हा तिचा मुलगा मात्र पाराशर ह्याच्याकडेच सोडून ती आपल्या वडिलांकडे निघून जाते. ह्याच वेद व्यासांनी नंतर  चार वेद आणि महाभारत लिहिले.आहे   सत्यवतीला नंतर शंतनू.राजा मागणी घालतो. त्याची पहिली बायको देवाघरी गेलेली असते .शंतनूला पहिल्या बायकोपासून एक मुलगा झालेला असतो. त्यांचे नांव असते गंगाद्त्त . त्यालाच  पुढे गंगाजी म्हणतात. सत्यवती  शंतनुशी लग्न करण्यास एका अटीवर तयार होते . तीची अट अशी   असते की राजाने पहिल्या बायकोपासून  झालेल्या गंगादत्तला आपला वारस म्हणून राजसिंहासनावर बसू द्यायचे नाही . तिच्यापासून होणाऱ्या मुलालाच गादीवर बसवायचे. शंतनू अडचणीत सापडतो. त्याचवेळी गंगाद्त्त आपल्या वडिलांना असे आश्वासन  देतो की  तो गादीवर कधीच हक्क सांगणार नाही. हीच ती  गंगाद्त्त म्हणजे भीष्माची भीष्मप्रतिज्ञा.  आपल्या वडिलांसाठी केलेला हा त्याचा त्याग .सत्यवतीला चित्रगंधा आणि  विचित्रवीर्य  ही दोन मुले होतात. चित्रगंधा  लहानपणीच जातो.  विचित्रवीर्य हाच  पुढे राजा होतो. . गंगाद्त्त मात्र राजा होऊ शकत  नाही. हे सारे प्रकरण थरूर ह्यांनी खूप रंगवून सांगितले आहे. विचित्रवीर्याला अंबिका आणि अंबालिका ह्या दोन राण्या असतात व त्याची एक दासी असते. लग्नानंतर त्याला क्षय रोग होतो व तो लवकर जातो. त्यावेळी  सत्यवती तिच्या पाराशर  ह्या साधूपासून झालेल्या मुलाला म्हणजे वेद  व्यासांना  बोलावून घेते आणि  त्याला  अंबिका , अंबालिका   आणि दासी परिशमी ह्यांचा सांभाळ कर असे सांगते.  त्या तिघींना  वेदव्यासांपासून एक एक मूलगा होतो.  धृतराष्ट्र हा अंबिके चा तर  पंडू  हा अंबालिकेचे पुत्र असतात.    दासी परिशमीला   विदुर हा पुत्र होतो.   हे सारे थरूरांनी खुप  रंगवून सांगितले आहे . विचित्रवीर्यानंतर  वेदव्यास हस्तिनापूरची  गादी  चालवितात तर गंगाजीं हस्तिनापूरच्या राजाचे सल्लागार होतात.
ह्यानंतरची कथा तर अधिक भन्नाट आहे . धृतराष्ट्राचे लग्न होते गांधारीशी . पंडूचे लग्न होते कुंतीशी. विदुराचे लग्न होते देवकीशी.  पंगू असलेल्या पंडुला पुत्रप्राप्ती होणे शक्य नसते. तेंव्हा तो कुंतीला पुत्र प्राप्त करून घेण्यासाठी १२ वेगवेगळे प्रकार सांगतो.. संतती ह्या १२ पैकी कोणत्याही प्रकाराने झाली तरी त्या राजपुत्राला  राजसिंहासनावर आपला  हक्क सांगता येतो. ही असते त्यावेळची कुटुंब व्यवस्था. रामायणकालीन समाजव्यवस्थेपेक्षा खूप वेगळी.  पंडू  कुंतीला असा सल्ला देतो की तीने योग्य  तो  माणूस शोधावा आणि पुत्रप्राप्ती करून घ्यावी. असा हा सल्ला  त्या काळात एक पती आपल्या पत्नीला देतो. Find a man who is my equal or my superor as I can't give you a Son. तेंव्हा कुंती पण्डूला आपल्यालाही  अशी एक पुत्रप्राप्ती झाली होती. तो पुत्र आहे पणआतां  तो शोधून काढावा लागेलं असे ती पण्डूला सांगते.  त्यावेळी पंडू तो पुत्र शोधायची आता गरज नाही . मला पुत्र प्राप्ती हवी आहे त्यासाठी तू मी सांगितलेला मार्ग अवलंब असे तो सांगतो. कुंती त्याचा सल्ला पतीची इच्छा म्हणून नाईलाजाने मान्य करते . तिला  धर्मापासून युधिष्ठिर  , वायूपासून भीम आणि  इंद्रापासून अर्जुन असे ३ पुत्र होतात . माद्री ही पंडूची  दासी असते आणि  पंडू तीला ही कुंतीला दिला आहे तसाच  सल्ला देतो.  तिला  नकुल आणि सहदेव ही दोन मुले  होतात. हे पंडूचेच पांच पुत्र म्हणजे  पांडव   कुंतीचा सूर्यपुत्र म्हणजे कर्ण . तो लग्नापूर्वीच झालेला पण नदीत एका टोपलीत घालून सोडून दिलेला .कुंतीचा हा मुलगा  एका सारथीला नदीपात्रात सापडतो तो   . त्याला स्वतःचे पुत्ररत्न नसते. तो एका मुस्लिम राजाचा सारथी  असतो. त्याला आणि त्याच्या पत्नीला ही  एक अल्लाने  आपल्यासाठी पाठविलेली भेट आहे असे वाटते.  त्यांच्याकडेच  हा  कुंतीपुत्र कर्ण वाढतो व मोठा होतो.  तोच कर्ण म्हणजे थरूरांचा  कादंबरीतील महंमद अली कर्ण . म्हणजे थरूरांनी ह्यालाच त्यांच्या ह्या नव्या महाभारतात केलं आहे महंमद अली जीना.
गंगाद्त्त - गंगाजी म्हणजे भीष्म ( थरूरांचे गांधीजी )
थरूरांनी त्यांच्या भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील प्रमुख पात्र असलेल्या गांधीजींना केलं आहे भीष्मपितामह म्हणजे  गंगाजी . ह्या कादंबरीत गंगाजी ह्या पात्राला खूप चांगला न्याय दिला असून हे पात्र त्यांनी  चांगले रेखाटले आहे असे मला वाटते. तरीही काही ठिकाणी  त्यांनी गंगाजींवर थोडा अन्याय केला असे वाटते. कादंबरी म्हणजे वास्तव नसते . म्हणून त्यांनी बरेचसे स्वातंत्र्य घेतले आहे. कारण तो काही खरा इतिहास नाही. ती तर ललित साहित्याची गंमत. आपल्याला खऱ्या महाभारताची आणि स्वातंत्र्याच्या इतिहासाची माहिती असते म्हणून काही गोष्टी खटकतात. पण हे असते कादंबरीकाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य.
कौरवा  पार्टीचे पितामह असतात  गंगाजी. इंग्रजांशी लढताना अहिंसा तत्वावर आधारित चळवळी त्यांनी उभ्या केल्या. त्यापूर्वी  रेल्वेच्या तृतीय श्रेणी डब्यातून केलेला त्यांचा भारत दौरा  थरूर रंगवून सांगतात.  हिंदू मुसलमानांना त्यावेळी रेल्वे स्टेशनवर  मुस्लिम पाणी - हिंदू पाणी असे वेगळे पाणी मिळत होते हे गंगाजींना खटकत होते.   त्यावेळची  भारतीय समाजाची धर्मामुळे झालेली विभागणी  कादंबरीकाराने  वर्णन  केली आहे ती अशी.  रेल्वेतून गंगाजींना  भारतीय समाजाची पराकोटीची गरिबी  दिसून येते .त्यामुळेच गंगाजी पंचा हे आपले नेहमी घालायचे वस्त्र असे ठरवून टाकतात.  गंगाजींनी  ह्या भारत दौऱ्यानंतर ३-४ मोठे लढे ब्रिटिश राजवटीबरोबर केले आणि कौरवा पार्टीवर आपले वर्चस्व स्थापन केले  ते  थरूरांनी व्यवस्थित वर्णन केले आहे.
१) मोतीहारीचा इंडिगो - नील शेतीचा लढा २) बिबिगढच्या बागेतील ब्रिटिशांचा बेछूट गोळीबार ३) कलकत्त्यातील ज्यूट कामगारांचा संप ४) इंग्रजांनी आंब्यावर लावलेला कर. अशा  लढ्यातून गंगाजी शिकत गेले . त्यांनी आपले ब्रिटिशांबरोबर लढण्याचे मार्ग शोधले व त्यात ते बदल करीत गेले  . देशातील खेड्यापाड्यातील  लोकांचे दारिद्र्य बघून आणि स्त्रियांचे हाल बघून त्यांचे हृदय विदीर्ण झाले आणि त्यांनी ह्या लोकांनाच आपल्या चळवळीचे खरे सैनिक बनविले. नील शेतीचीलढाई त्यांनी गरीब शेतकऱ्यांच्याकरीत  लढली . पण त्यात फायदा  झाला तो इंग्रजांचाच . हे त्यांना बऱ्याच उशिराच कळले . त्याचे कारण असे होते की  औद्योगिक क्रांतीमुळे इंडिगोची गरजच ब्रिटिशाना नव्हती. ब्रिटनमधील कारखाने बंद पडले होते. नीळ  विकत घेणारे इंग्रज कारखानदार आणि विक्री करणारे मध्यस्थच अडचणीत आले होते . त्यामुळे इंग्रज गंगाजींच्या ह्या चळवळीमुळे एका संकटातून सुटले. हे गंगाजींना उशिरा समजले व ते दुसऱ्या चळवळीकडे वळले.
बिबिगढच्या गोळीबारामुळे शेकडो भारतीय माणसे इंग्रज अधिकाऱ्यांनी मारली. ती इंग्रजांची विनाश काले  विपरीत बुद्धी होती. असे त्यांना वाटले.  Whom the God wish to destroy , they first make them  mad असे गंगाजींना त्यावेळच्या ब्रिटिशांबद्दल  वाटले. हा इंग्रजांचा बेछूट गोळीबार बघितल्यानंतर गंगाजींना असं वाटू लागलं की सशस्त्र इंग्रजांबरोबर लढायचे असेल तर अहिंसेवर आधारित स्वातंत्र्य चळवळ फारशी उपयोगी नाही. तरीही त्यांनी तो मार्ग चालूच ठेवला . त्याच काळात क्रांतिकारकांनी आपल्या चळवळीला जोर आणला. कौरवा पार्टीत मतभेद उफाळून आले . शांततामय चळवळ फारशी उपयोगी नाही असे पण्डूला वाटू लागले तर धृतराष्ट्र हा  गंगाजींचे बोट धरून पार्टीवर आपली हुकमत चालवू लागला. इंग्रजांनी अतिशय श्रीमंत देश असलेल्या भारताला लुटून टाकले आहे व ब्रिटनला बरे दिवस येऊ लागले आहेत हे भारतीयांना समजू लागले.. भारतीय संपत्ती लुटून नेली जात असताना आपण लढा दिला पाहिजे असा विचार कौरवा पार्टीतील नेते करू लागले. अशा राजकीय परिस्थितीत काही इंग्रज गंगाजींचे चाहते होते. त्यांच्या अहिंसेच्या चळवळीकडे काहीजण आकर्षित झालेले होते.  काही इंग्रज गंगाजींचे शिष्य झाले व अगदी साधेपणाने ते गंगाजींचे शिष्य म्हणून त्यांच्या आश्रमात राहू लागले. त्यांत गंगाजींची  एक ब्रिटिश शिष्या होती. तिचे नांव  होते  सराह बेन. सुरुवातीला ती गंगाजींवर खूप खुश होती. गंगाजी तिच्या आलेशान  गेस्ट हाऊसवर रहात असत . तिच्या आरामशीर गाडीतून प्रवास करीत असत.  त्यावेळी कलकत्याच्या ज्यूट मिल कामगाराचा संप गंगाजी चालवीत होते. तो  यशस्वी होण्याची चिन्हे नव्हती. कामगारांना गंगाजींचे मोठ्या गाडीतून फिरणे व आलिशान गेस्ट हाऊस वर राहणे व सोबत ब्रिटिश महिला असणे हे फार खटकले व गंगाजी हे इंग्रजांचे एजंट आहेत असे त्यांना वाटू लागले . गंगाजींना कामगार आपल्याविरोधी का जात आहेत?, हे लक्षात आल्यावर त्यांनी पदयात्रा आणि उपोषण हे दोन नवे  मार्ग स्वीकारले. ते कामगारांच्या वस्तीतच राहू लागले . त्यांची ब्रिटिश शिष्या त्यांच्यासारखीच  साधी राहू लागली आणि तिने त्यांच्या आश्रमात राहणे सुरु केले. पदयात्रा,  सत्याग्रह आणि उपोषण ही तीन नवी शस्त्रे  गंगाजीनी  प्रभावीपणे वापरण्यास सुरु केली . त्यामुळे कलकत्याच्या  ज्यूट कामगारांचा संप काहीसा यशस्वी झाला व  चांगली तडजोड झाली. इथे त्यांच्या चळवळीला मर्यादित यश मिळाले.
गंगाजी , धृतराष्ट्र आणि पंडू : कौरवा पार्टीच्या नेतेपदासाठी 
Fasting is my business. असे गंगाजींनी  आपल्या शिष्याना पटवून देण्याचा प्रयत्न केला. कौरवा पार्टीतील पण्डूला मात्र हे मान्य नव्हते.  'रणाविन  स्वातंत्र्य कोणा  मिळाले?'  , असे पण्डूला वाटत होते. त्यामुळे  गंगाजींचा विरोध असूनही त्याने कौरवा पार्टीचे अध्यक्षपद  मिळवण्यासाठी  निवडणूक लढवली . त्या निवडणुकीत  पंडुने  यशही  मिळवून दाखविले.  गंगाजींना हा आपला पराभव वाटला . त्यांचे महत्व कमी होणार हे त्यांना दिसू लागले . त्याच वेळी ब्रिटिश व्हाईस रॉय बदलून आला . त्याने लोकांवर नवे कर लादण्यास सुरुवात केली. शेती उत्पन्नावर कर , संपत्तीवर कर असे अनेक कर लावले गेले. त्याच वेळी कौरव पार्टीत भांडणे सुरु झाली. मतभेद वाढू लागले . गंगाजी आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी धृतराष्ट्राची अधिक मदत घेऊ लागले.  सराह  बेन  ही  इंग्रज महिला गंगाजींची सचिव होती. तिचे परदेशी पत्रकारांशी चांगले संबंध होते. त्यामुळे गंगाजींना अमेरिकन आणि ब्रिटिश वर्तमानपत्रातून खूप प्रसिद्धी मिळू लागली.गंगाजींची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उजळून निघाली. पदयात्रा , उपोषणाला खूप प्रसिद्धी मिळू लागली. गंगाजींचे अंतर्गत राजकारण कधीच सरळ नव्हते. त्यांचे धृतराष्ट्राला झुकते माप  होते. त्यांचा पण्डूला  अंतर्गत विरोध होता. पण्डू पुढे न येण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. पार्टीमध्ये  पण्डूला सळो  का पळो  करून सोडले. पण्डुने पार्टी सोडावी म्हणून त्यांनी अनेक कारस्थाने केली. शेवटी पंडू ने कौरवा पार्टी चा अध्यक्ष असूनही पार्टी सोडली . त्याचे मुख्य कारण म्हणजे  त्याला असे वाटत असे की गंगाजींच्या अहिंसेच्या चळवळीवर आधारित सत्याग्रह केल्यामुळे इंग्रज हा देश सोडून जाणार नाहीत.  सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच आपला  देश स्वतंत्र होईल. ह्या विचाराने त्यांनी  पार्टी सोडली आणि सशस्त्र हिंद सेना उभारली.
थरूरांनी हे  प्रकरण एका  दीर्घ काव्यात लिहिलं आहे. ते छान जमले आहे.
गंगाजी आणि महंमद अली कर्ण 
देशव्यापी चळवळ आणि कौरवा पार्टीची प्रतिमा जर कोणी उजळ केली असेल तर गंगाजींनीच . त्यामुळे त्यांचा पार्टीत  अधिक प्रभाव होता. हा One Man Show आहे असे महंमद अली कर्णाला वाटू लागले. त्याचे कारण म्हणजे व्हाईसरॉय बरोबर गंगाजींची  बोलणी सुरु झाली. महंमद अली कर्णाला हे मान्य नव्हते. मुसलमानात खूप जातीपंथ होते. शिया , सुन्नी, मोपला , बोहरा , खोजा , इस्माईलस , अहमदिया , कच्छी मेनन आणि अल्ला. भिन्न राहणी, भिन्न भाषा , भिन्न चालीरीती , वेगळे खाणेपिणे , सर्वच वेगळे .कारण ही  मंडळी वेगवेगळ्या प्रांतात विखुरलेली होती. हिंदू समाज तर त्याहून अधिक विखुरलेला होता . प्रत्येक प्रांताचे सुलतान आणि महाराज इंग्रजांचे मंडलिक होते. ते आपले ऐषआरामी जीवन जगत होते. ब्रिटिशांचे Divide and Rule असेच धोरण होते. कौरवा पार्टी ही मध्यममार्गी राष्ट्रवादी पार्टी होती तर मुस्लिम लीग ही  मुसलमानांचे प्रतिनिधित्व करीत होती. मुसलमानांना प्रभावी असा  नेता नव्हता. गंगाजींच्या सहवासात काही सौम्य विचारसरणीचे मुसलमान होते. त्यावेळच्या मुसलमानांचा नेता गागा शाह  ह्याला महंमद अली कर्णाला मुस्लिम लीग मध्ये आणायचे होते. महंमद अली कर्ण कौरव पार्टीपासून दूर जात होते .कारण त्यांना गंगाजी हे हिंदूंचे नेते आहेत . ते सनातनी आहेत . पुरोगामी नाहीत. कौरवा पार्टीच्या सभा ह्या प्रार्थना सभेने सुरु होतात हे त्यांना अधिक खटकत होते. उपोषण , पदयात्रा हे मार्ग त्यांना मान्य नव्हते. मुख्य म्हणजे गंगाजींचे नेतृत्वच  कर्णाला मान्य नव्हते. कर्णाला गंगाजींचे अंतर्गत राजकारण  मान्य नव्हतेच.  महंमद अली कर्ण मुल्ला मौलवींना न मानणारा होता. तो अधिक आधुनिक विचारसरणीचा होता. इस्लामिक वृत्ती नसलेला हा कर्ण  . त्यांची मुस्लिम लीग आणि हिंदुत्वादी विचारांशी अधिक जवळीक असलेली गंगाजींची कौरवा पार्टी ह्यांच्यात तणाव निर्माण होत गेले. गंगाजी  हिंदू होते. अध्यात्मिक वृत्तीचे होते. जुन्या हिंदू धर्मग्रंथावर त्यांचा गाढ विश्वास होता. त्यांचे आश्रमात राहणे , प्रार्थना करणे, उपास करणे हे मुस्लिम नेत्यांना खटकत असे. गंगाजी लोकांचा अनुनय करताना दिसत. गंगाजी वयाने वृद्ध होते. त्यांच्या वाणीमध्ये चमक नव्हती.  पदयात्रेत त्यांचा एक हात इंग्रज बहिणीच्या खांद्यावर असे. आश्रमातील त्यांचे हिंदू संस्कारित जगणे सहज लक्षात येई  . परदेशी पत्रकार आणि फोटोग्राफर ह्यांचा  त्यांच्या आजूबाजूला असलेला घोळका  त्यांना खूप प्रसिद्धी देत असे.. त्यामुळे आपण जागतिक नेते आहोत असा त्यांचा आविर्भाव असे . नेहमी स्पिरिच्युअल आणि मॉरल बोलणे हे गंगाजींचे खास  वैशिष्ट्य.  हे सारे महंमद अली कर्णाला मान्य नव्हते. गंगाजी तसे सेक्युलर नाहीत असेच त्यांना वाटत असे. त्यामुळे मुस्लिम समाजाचे भले त्यांच्याकडून होईल अशी आशा कर्णाला नव्हती.  I am a Hindu, a christian, a Zorostrian, a jew असे फक्त हिंदूच म्हणू शकतात ,असे महंमद अली कर्णाला  वाटत असे. कौरवा पार्टी सेक्युलर नाही आणि मुस्लिमाना तेथे न्याय मिळणार नाही असे त्यांना वाटू लागले. महंमद अली कर्णाचे दिसणे  इंग्रज व्हाइसरॉय सारखे रुबाबदार. तो बुद्धिमान तर होता पण वक्ता होता. इंग्रजीवर प्रभुत्व होते . लोकांवर छाप पाडण्याची वक्तृत्व कला त्यांना अवगत होती.  त्यांचे शैलीदार  वक्तव्य लोकांच्यावर छाप पाडे . आवश्यक असलेली आक्रमकता त्यांच्यात होती.. तसे त्यांच्ये वागणे इंग्रजी वळणाचे व अतिशय रुबाबदार. ब्रिटिश आचारविचारांचा खूपच  प्रभाव. त्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यावर त्यांची सहज छाप पडे . मुस्लिम लोकांनाही ते व्हाइसरॉयसारखेच व्यक्तिमत्व आहे असे वाटे. गागा शाह ह्या मुस्लिम नेत्याने नेतृत्वाची धुरा महंमद अली कर्णाकडे  दिली आणि मुस्लिम लीगचे स्वरूच त्यांनी  बदलले.  कर्णाने मुस्लिम लीगवर घट्ट  पकड बसविली.  गंगाजी विरुद्ध कर्ण असा नवा झगडा सुरु झाला , गंगाजी म्हणजे 'हिंदू मोबोक्रसी' आणि कर्णाची मुस्लिम लीग म्हणजे 'मोरीबंद' असे समीकरण झाले.इंग्रज अधिकाऱ्यांनी गंगाजी आणि महंमद अली कर्ण ह्यांच्यात वाटाघाटी सुरु करण्याचे नाटक सुरु केले. इंग्रज अधिकाऱ्यांनी कौरवा पार्टीला कमी महत्व देऊन मुस्लिम लीगचा आवाज वाढविण्यास मुद्दाम  मदत केली. गंगाजींच्या भारतात आपल्याला स्थान  नसेल म्हणून कर्णाने करणीस्तानची मागणी पुढे रेटली. मला स्वातंत्र्य हवे पण हिंदूंचे वर्चस्व नसलेला भारत हवा असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. . त्याला त्यांनी करणीस्तान असे नांव दिले. कौरवा पार्टी आणि मुस्लिम लीग ह्यांच्यात तीव्र झगडा सुरु झाला आणि इंग्रजांनी त्याचा पुरता फायदा घेतला व  भारताचे स्वातंत्र्य पुढे गेले.
महंमद अली कर्णाच्या मुस्लिम ग्रुपमध्ये आणि  कौरवा पार्टीतील मुस्लिम ग्रुप मधील मतभेदामुळे प्रांतिक निवडणुकात गंगाजीला  थोडे यश मिळाले. पण नंतर महंमद अली कर्णाचा मुस्लिम प्रभाव वाढत गेला त्यांना अधिक यश  मिळत गेले. आणि इंग्रजांनी महंमद अली कर्णाच्या मुस्लिम लीगच्या पारड्यात अधिक वजन टाकले व त्यांना  स्वतंत्र राष्ट्र देण्याचे ठरविले. त्याचवेळी गंगाजींची छोडो भारत चळवळ झाली तरी करणीस्तानचे महंमद अली कर्णाचे स्वप्न साकार होणार हे अधिक स्पष्ट  होत गेले. गंगाजी आणि महंमद अली कर्ण  हे कौरवा पार्टीत एकत्र राहिले असते व धृतराष्ट्राला अधिक स्थान मिळाले नसते तर कदाचित वेगळा  भारत झाला  असता. पण इंग्रजांचे राजकारण वेगळेच होते व त्यांनी हुशारीने भारताची फाळणी केली . ह्याचे सर्वात अधिक दुःख गंगाजींना झाले.

No comments:

Post a Comment