Thursday, June 6, 2019

अस्तु


अस्तु : म्हातारपणची शोकांतिका
काही दिवसापूर्वीच Being Mortal हे अतुल गवांडे ह्यांचे ‘म्हरातारपणाचं  जगणं’ ह्या विषयावरचं पुस्तक वाचलं आणि गेले कित्येक दिवस म्हातारपण आणि वृद्धाश्रम  ह्या विषयाचा भुंगा पाठीमागे लागला. काल “ अस्तु “ हा ह्याच विषयावरचा मराठी चित्रपट पाहिला. डिसेंबर २०१३ चा हा चित्रपट . दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि अनेक पुरस्कार प्राप्त झालेला . मुंबईत आतां चित्रपटगृह मिळाले. फारच थोड्या ठिकाणी चालू आहे .मुद्दाम जिथे चालू आहे तेथे जाऊन पहावा लागतोय. तिकडे सलमान खानचा चित्रपट ५०० कोटीचा गल्ला मिळवतोय आणि इकडे ह्या सुंदर चित्रपटाला १०० म्हातारी डोकी काठी टेकवत येत आहेत . कोण पहाणार? शरीराने जिवंत पण मनाने मेलेल्या असलेल्या (स्मृतीभंश झालेल्या )  एका म्हाताऱ्याची शोकांतिका ?
म्हातारे होणं ( Ageing ) मोठं कठीण असतं .परावलंबी असलेलं म्हातारपण अधिक कठीण असतं . आपण धडधाकड राहून निवृत्तीनंतरचं शांतपणे सुखाने जगणं वेगळं आणि स्मृतीभंश होऊन म्हातारपण जगणं अधिक कठीण . ती एक शोकांतिकाच असते. आपल्या मुला-मुलीनी ह्या शोकांतिकेला बरोबर घेऊन आणि स्वीकारून कसं जगायचं ? हा खरा प्रश्न आहे . त्यांच्याकरिता हे महाकठीण काम आहे . संवेदनशील मुलामुलींना ते अधिक त्रास देणारं आहे.
एक बुध्दिमान संशोधक प्राध्यापक . संपूर्ण जीवन रसरसून जगलेला . दोन मुलीना जेवढे देता येईल तेवढे देऊन सुखी शांत जगणारा हा म्हातारा. अल्झायमरसारख्या रोगामुळे लहान मुल झालेला . शरीराने जिवंत पण मनाने मेलेला . अशा ह्या मुलाला सांभाळणारी त्याची मुलगी आणि तिचा डॉक्टर जावई. आपण असताना आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात कशाला ठेवायचे ? असा विचार करून वडिलांचीच आई झालेली ही मुलगी संवेदनशील मनाची असल्यामुळे खूप काही सहन करीत वडिलांचे सर्व काही करीत असते आणि एक दिवस तिचे हे म्हातारे वडील नाहीसे होतात . त्यावेळी तिची जी अवस्था झाली आहे त्याची  गोष्ट सांगणारा हा चित्रपट. माणूस संवेदनशील असला की त्याची जी फरफट होते ते आपण अनेक कुटुंबातून पहात असतोच. तिची धाकटी बहिण. दूर राहणारी . Intimacy at a distance असा Rational विचार करणारी आणि स्वतःच्या करिअरमध्येच रमलेली . दूर असलेल्या मुलीला मात्र असे वाटत असते की बाबांचे प्रेम जवळ असलेल्या मुलीवरच अधिक आहे . अनेक कुटुंबात असे प्रकर्षाने जाणवते . ते कौटुंबिक ताणतणाव सर्वत्रच दिसून येतात.
म्हाताऱ्या मंडळीकडे सुखाने जगण्यासाठी पैसा आहे , घर आहे. तरीपण अधिक म्हातारे होणं आणि कसल्याही प्रकारचे पंगुत्व येणे हे आपल्या अपत्यासाठी त्रासदायक आहेच. आपल्याला लहान मुलासारखं जपताना त्यांना बरेच काही सहन करावे लागते. ती मुलं अधिक संवेदनशील असतील तर त्यांचा अधिक कोंडमारा होत असतो. त्यांच्या जगण्याच्या वेगात आपण एक अडथळाच असतो. असे होणे फार क्लेशकारक असते. आपल्याकडे वृद्धाश्रम इतके चांगले नाहीत. Assisted Living हा प्रकार फारसा उपलब्ध नाही.
आपण ज्या वडिलावर प्रेम करतो आणि त्यांना सांभाळतो ते वडील ( अप्पा) आपल्याला साधे ओळखत नाहीत हे दु:ख फार मोठं आहे . त्या मुलीची ( इराची) भूमिका  इरावती हर्षे ह्यांनी फार सुंदर केली आहे . मनाला चटका लावून देणारी ही भूमिका पहाण्यासाठी तरी हा चित्रपट एकदा पहावा. वडिलांची भूमिका करणारे मोहन आगाशे म्हणजे डॉ लागू नंतरचे नटसम्राट . अतिशय सुंदर भूमिका करणारे . त्यांची ही भूमिका पाहिल्यानंतर असे म्हातारपण आपल्या वाटेला येऊ नये असा विचार अनेकदा डोक्यात येतो आणि मग आपल्या डोक्यातून जातच नाही. अर्थात हे आपल्या हातात नसते. जावई ( मिलिंद सोमण ) आणि धाकटी मुलगी ( देविका दप्तरदार ) ह्यांच्या भूमिका उल्लेखनीय आहेत. अमृता सुभाष पारितोषिक विजेती आहेच. तिच्या भूमिकेतील 'माणूसपण' कायम लक्षात राहतं. चित्रपट अस्वस्थ करणारा आहे .

ओळख सियाचेनची
ग्रंथालीने प्रकाशित केलेले अनुराधा गोरे ह्यांचे ' ओळख सियाचेनची ' हे पुस्तक हाती आले . थोडेसे चाळले आणि लक्षात आले की हे पुस्तक वाचायलाच हवे .
१९४७ साली पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर पाकिस्तानच्या सैनिकांनी ब्रिटिश सेनाधिकारी ह्यांच्या सहकार्याने गिलगिट - कारगिल ह्या सिंधू नदीच्या आजूबाजूने दौड करीत लेह काबीज केले होते . त्यावेळी आपले दिल्लीश्वर गाफीलच राहिले होते आणि जीनांच्या आक्रमक लष्करी कारवाया चालूच होत्या . काश्मीरचा हिंदू राजा हरिसिंग जेव्हा हतबल झाला तेव्हा मदतीसाठी धावला पण शेख अब्दुल्ला स्वतंत्र काश्मीरचे स्वप्न बघत दोन्ही डग्र्यावर पाय रोवित होते .ह्या पुस्तकातील एका प्रकरणात काश्मीरचा सर्व इतिहास संक्षेपाने लिहिला आहे . तो वाचणे आणि समजून घेणे फार महत्वाचे आहे . हा इतिहास जितका महत्वाचा आहे तितकाच ह्या भागाचा भूगोल . काश्मीर - सियाचेन - लेह लडाख - अकसाई चीन ह्या भूभागाची पूर्ण माहिती समजून घेतल्याशिवाय तेथील लष्करी कारवाई समजणे अवघड आहे . हा ह्या पुस्तकाचा मुख्य विषय आहे . अतिशय अभ्यासपूर्ण माहिती असलेले हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला आपल्या संरक्षण प्रश्नाविषयी अधिक जाण होते . वेळ काढून अवश्य वाचावे असे हे पुस्तक .

No comments:

Post a Comment