Wednesday, June 26, 2019

पुरोगामी - समाजवादी- हिंदुत्ववादी

समाजवादी मंडळींची शोकांतिका कशामुळे झाली?, हे आजचे समाजवादी तपासून बघत नाहीत, हेच लक्षांत घेणे आवश्यक आहे. त्यांना पक्ष बांधणी जमली नाही. सगळेच नेते. कार्यकर्ते नाहीतच. पक्षफुटीचा रोग लागलेला. आतां तर घराणेशाही चालू आहे. कुठे डॉ लोहिया ? कुठे जयप्रकाशजी ? ह्या समाजवादी मंडळीनी Congress  सोडली नसती तर चित्र बदलले असते.
ह्या मंडळींनी आधी वेगळा गट केला. मग Congress सोडली. पक्ष बांधनी केलीच नाही. सगळेच बुध्दीवादी. स्वयंभू नेते. एकत्र राहिले नाहीत. लोहिया- जयप्रकाश, एस एम - गोरे  वगैरे...

पुरोगामी कोणाला म्हणायचं? सेक्युलर म्हणजेच पुरोगामी का?
 राज्यघटनेत सेक्युलर शब्द नंतर घातला. तो घातला तसा काढूनही टाकता येतो. समाजवादी हा शब्द असाच घातला. जगातूनच समाजवाद नाहीसा होत आहे. माओचा किंवा कार्ल मार्क्सचा साम्यवाद आहे कुठे? एकपक्षीय लोकशाही मान्य आहे काय?
भारतात समाजवाद्यांच्या बारा पार्ट्या. कोणता समाजवाद खरा? ते सर्व समाजवादी सेक्युलर आहेत काय? सेक्युलरमध्ये जातीयवाद येत नाही का?
गांधीजी समाजवादी होते का? नेहरू रशियन दौऱ्यावरून आल्यावर समाजवादी समाजरचनेच्या गोष्टी बोलू लागले. त्यापूर्वीच जयप्रकाश - लोहिया वगैरे समाजवादी गट काँग्रेसमधून बाहेर पडला. इंदिरा गांधींनी बँकांचे राष्टियीकरण करून समाजवादी पाऊल उचलले तेव्हा धारिया - चंद्रशेखर समाजवादी तरुण तुर्क बाहेर पडले. काँग्रेस खरीच समाजवादी आहे का? राहुल गांधी ह्यांची विचारसरणी कोणती?
गांधीजींनी समाजवादी समाजरचनेचा कधी उल्लेख केला नाही. डॉ आंबेडकरांनी कम्युनिझमचा विरोधच केला. त्यांनी समाजवादी आणि सेक्युलर शब्द राज्यघटनेमध्ये समाविष्ट का केले नसावेत?

एक  वर्षापुर्वीचा 'प्रतिगामी पुरोगामित्व' हा गिरीश कुबेर ह्यांचा झणझणीत अंजन घालणारा अग्रलेख अप्रतिम आहे. ह्यातील महत्वाचे मुद्दे :
* काँग्रेसचा मुस्लिम अनुनय
* सनातनी मुस्लिम धर्ममार्तंड आणि त्यांच्या आवाजात  आवाज मिसळणाऱ्या अन्य तथाकथित पुरोगामी मंडळींचा बोटचेपेपणा
* पुरोगामित्वाचे ध्वजधारक म्हणविणारे डावे आणि समाजवादी
* पुरोगाम्यांची तोंडपाटीलकी आणि डाव्यांचे खेळ
* पुरोगाम्यांची भंपक बोटचेपी बौद्धिके आणि बेगडी पुरोगामित्व
ह्यावर टाकलेला प्रकाश खूप काही सांगून जातो .
ह्यामुळेच पुरोगामी,  समाजवादी  आणि निधर्मी ह्या शब्दांचा अर्थ हरवून बसला आहे. 
* नेहरू असो का गांधी, लोहिया असो का जयप्रकाश, सावरकर असो का हेडगेवार प्रत्येकाने काहीतरी चांगले दिलेच आहे. ते घेतलेच पाहिजे.
भारतातील मुस्लिमांनी एकदा अंतर्मुख होऊन नव्याने विचार करावयास हवा. आझमखान किंवा ओवैसी ह्यांच्या मागे राहून जीनांचा 'मुस्लिम भारत' हा विचार सोडून द्यावा. मुस्लिमांनी एकदा झडझडून द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताला विरोध करण्याची आवश्यकता आहे. आरिफ मोहमद खान ह्यांनी हाच मुद्दा अनेकदा स्पष्टपणे मांडला.
मुलायम, मायावती, ममता, डावे- उजवे कम्युनिस्ट, समाजवादी आणि काँग्रेस ह्यांनी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अल्पसंख्य असलेल्या मुस्लिम जनतेची कायम मनधरणी केली आणि त्यांच्यासाठी फक्त तोंडपाटीलकी केली. त्यांच्या विकासासाठी काहीच केले नाही. हे भारतीय मुस्लिमांच्या लक्षात आले नाही.
नेहमी गोध्रा - बाबरी कांडचा उल्लेख होतो. दोन्ही बाजूच्या तरुणांच्या उकळत्या रक्तात आततायी विचार प्रकट झाल्यामुळे अशा घटना घडल्या. त्या जखमा तशाच राहाव्यात म्हणून राजकीय पक्षांनी प्रयत्न केलेत हे ह्या देशाचे दुर्दैव. गांधीजींचे नाव उठताबसता घेणार्यांनी त्यासाठी काहीच प्रयत्न न करता बहुसंख्य हिंदूंना जबादार धरून अल्पसंख्य मुस्लिमांचा स्वतःच्या राजकारणासाठी उपयोग करून घेतला आणि हिंदूंमध्ये जातीयवादाची पेरणी करून फूट पाडली व सत्तेचे राजकारण केले. मायावती मुसलमानांना १०० तिकिटे देतात तर मुलायम सिंग ही तशीच खेळी करीत आले आहेत.
भारतातील मुस्लिमांची सद्यस्थिती काय आहे? भारतातले बहुतेक पक्ष मुसलमानांच्या अपेक्षांना अनुसरून एकजात कुचकामी आहेत. ह्या सर्वांनी निवडणुकीत मुसलमानांचा एक गठ्ठा मते मिळवण्यासाठीच उपयोग करून घेतला व हिंदूत जातीय विद्वेष निर्माण केला.
भारतातील मुसलमानांना सर्व पक्षांनी असे सतत बजावले की बहुसंख्य असलेल्या हिंदूंचा धर्मवाद फार भयंकर असू शकतो. मुसलमानांना ह्या देशात चांगले दिवस बघावयाचे असतील तर त्यांनी हिंदू जातीयवादी शक्ती वाढणार नाहीत म्हणून आमच्याकडेच बघावे, आम्हालाच निवडणून द्यावे,  असे राजकारण ज्यांनी केले त्यामुळेच हिंदू एकजुटीचे प्रयत्न झाले, ही वस्तुस्थिती आहे. हिंदुत्वाची पताका त्यामुळे फडकू लागली.
आझमखान ह्यांचा मुस्लिम धर्मवाद मुलायमसिंग ह्यांनी पोसला. दिल्लीचे जामे मशिदीचे इमाम बुखारी आणि एमआयएमचे ओवैसी ह्यांच्या 'मुस्लिम इंडिया' ला प्रत्युत्तर म्हणून 'हिंदू इंडिया' विचारधारा वाढते आहे. पडद्यामागे जातीयवाद पोसणारी ही मंडळी धोकादायक आहेत. हेच लक्षात येऊ नये, हे दुर्दैव.
भारतात मुसलमान मोकळेपणाने मागण्या तरी करू शकतात. त्यांचे प्रतिनिधित्व संसदेत आणि राज्यांच्या विधानसभेत दिसून येते.
काही लोकांना देशाच्या अखंडतेपेक्षा बाबरी मशिदीचा बचाव अधिक महत्वाचा का वाटतो? बाबरी- गोध्रा ही जखम त्यांना बरी व्हावी असे वाटत नाही.
हा देश सर्वधर्मसमभाव  मानणारा देश आहे हे येथील मुसलमानांना मान्य असेल तर त्यांनी त्यांच्या धर्माच्या प्रभावाच्या मर्यादा ठरवून घेतल्या पाहिजेत.
धर्माचा आधार पोकळ आणि चुकीचा असेल तर काश्मीरला वेगळा दर्जा मागून चालणार नाही व समान नागरी कायदा अंमलात आणण्यास विरोध करता कामा नये.
समान नागरी कायदा, मुस्लिम स्त्रियांना तलाख मुक्ती, काश्मीरचे ३७० कलम रद्द करणे, राम मंदिराचा वाद  सामोपचाराने मिटवणे ह्यातच सर्वांचे हित आहे.
अल्पसंख्य मुस्लिम नकळत जीनांच्या 'मुस्लिम इंडियाची'ची भाषा बोलत असतात त्यामुळेच 'हिंदु राष्ट्रा'च्या गोष्टी येथे बोलल्या जातात. पाकिस्तान हे 'मुस्लिम राष्ट्र ' जिनांच्यामुळे उदयास आले आहे. भारत हे बहुसंख्य हिंदूंचे राष्ट्र असले तरी ते येथील 'भारतीय मुसलमानां'चेही राष्ट्र आहे. पाकिस्तानात 'हिंदू पाकिस्तान' कुठे आहे? हा फरक लक्षात घेणे आवश्यक आहे.
आझमखान असो का ओवैसी, ह्यांच्यासारख्या मुसलमानात जिना सारखा 'मुस्लिम भारत' डोक्यात असतो. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून योगी आदित्यनाथ सारखे 'हिंदू भारत' ह्या संकल्पनेसाठी प्रयत्नशील असतात.
स्वतःला सेक्युलर समजणारे समाजवादी मुस्लिम लोकांना ठणकावून सांगत असतात की बहुसंख्य हिंदूंचा धर्मवाद हा भयंकर आहे व तुम्हाला आम्हीच खरे संरक्षण देत असतो. हा गेम प्लॅन माहित असल्यामुळे हिंदुत्ववादी संपूर्ण हिंदू राष्ट्राचे स्वप्न पहात आहेत .
धर्मनिरपेक्षतेचा अर्थ तथाकथित पुरोगाम्यांनी फ़ारच सवंग करून टाकला आहे. मुस्लिम जातीयवाद नको तसा आक्रमक राष्ट्रवाद नको.
अहो! प्रंचड बहुमताने अनंत कोटी ब्रम्हांड नायक निवडून आलेत, तुमच्या मागण्यांची पूर्तता करायचा त्यांना आग्रह का करत नाही? फुकट जुनी घिसीपिटी तुणतुणं वाजवताय!..
आपला इतिहास आणि राजकारणी फार गुंतागुंतीचे आहे. डॉ हेडगेवार  हे काँग्रेसमध्ये होते. डॉ शामा प्रसाद मुखर्जी हे सुद्धा काँग्रेसमध्ये होते. ते हिंदू महासभेत होते. ते पंडित नेहरूंच्या सर्वपक्षीय मंत्रिमंडळात मंत्री होते. डॉ शामा प्रसाद मुखर्जी बंगालमध्ये हिंदू महासभा - मुस्लिम लीग ह्या संयुक्त मंत्रिमंडळात होते. मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा ह्यांची संयुक्त सरकारे अनेक राज्यात होती .
सुरुवातीला एका हिंदू महासभेच्या अधिवेशनाला महात्मा गांधी उपस्थित होते.
मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत राय हिंदुमहासभेचे नेते होते. डॉ हेडगेवारांनी हिंदुमहासभा सोडून रा.स्व. सं स्थापन केला व सक्रिय राजकारण सोडलेल्या. डॉ शामा प्रसाद मुखर्जी ह्यांनी हिंदू महासभा सोडून जनसंघ स्थापन केला. बंगालच्या राजकारणात ते मुस्लिम लीग बरोबर सत्तेत होते. काश्मीर प्रश्नावर त्यांची मते सर्वांना माहीतच आहेत. आज त्याच काश्मीरमध्ये त्यांचा पक्ष पीडीपी बरोबर सत्तेत आहे. हिंदू महासभा आणि भाजप एकमेकांजवळ नाहीत . रा स्व सं हा हिंदू महासभेला जवळचा नाही. अलीकडे सत्तेच्या राजकारणामुळे अनेक दुसऱ्या विचाराचे लोक भाजपत आहेत त्यांचा रास्वसंशी कसलाही संबंध नाही. काँग्रेसमध्ये अनेक नेते हिंदूमहासभा विचारसरणीचे होते. त्यांना नेहरूंचे सेक्युलर विचार मान्य नव्हते.
जीना आणि मुस्लिम लीग काँग्रेसला हिंदूंचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष असे समजत होती. त्यांनी महात्मा गांधींना हिंदूंचाच नेता मानले होते. 
मोदीना गांधी जवळचे तर नेहरू दूरचे
मोदी पंतप्रधान झाल्यापासून गांधीजींचे नाव सतत घेत असतात. कॉंग्रसचे लोक गांधीजींना केव्हाच विसरून गेले आहेत. त्यांच्या तोंडात नेहरू, इंदिरा, राजीव आणि राहुल ह्यांचेच नाव असते.
गांधीजी आणि नेहरू ह्यांच्यात वैचारिक मतभेद होते. त्यांच्या दोघांमध्ये झालेला पत्र व्यवहार खूप काही सांगून जातो. एम जे अकबर (अलीकडे भाजपकडे वळलेले) ह्यांनी नेहरूवर एक पुस्तक लिहिले आहे. त्यात गांधी- नेहरू ह्यांच्यातील मतभेदावर चांगला प्रकाश पडतो.
नेहरू १९२७ साली रशियाला जाऊन आले आणि समाजवादी / साम्यवादी विचारसरणीमुळे खूप प्रभावित झाले. ते भारतात परतले ते क्रांतिकारी बदलाच्या स्फूर्तीने फुद्फुदतच. ते इतके उत्तेजित झाले की गांधीजींना त्यांच्या पोरकटपणाकडे दुर्लक्ष करावे लागले असे म्हणतात .
त्याचवेळी राष्ट्रीय नियोजन समिती स्थापित झाली. नेहरू त्याचे अध्यक्ष होते. गांधीजींना ते फारसे आवडले नसावे. 'नेहरुंना आकाशात उंच भरार्या घ्यायला आवडते. मला नाही. ' अशी त्यांची धारणा होती.
मोदीनी नियोजन आयोग रद्द केला त्यावर किती टीका होते आहे. गांधीजींना नियोजन आयोगाची साम्यवादी विचारांनी प्रेरित झालेली संकल्पना आवडली नव्हती. मोदीनी गांधीजींच्या विचारांनाच पुढे नेले , असे म्हंटले तर चुकीचे नाही.
मोदींना नेहरूसारखे उंच भरार्या मारणे आवडते हे ही लक्षात घेण्यासारखे आहे. नेहरू रशियाला गेले आणि समाजवादी विचारांनी प्रभावित झाले तर मोदी गेल्या अनेक वर्षात माओनंतरच्या चीनला अनेकदा भेटी देऊन प्रभावित झाले आणि ' मेक इन इंडिया ' चे स्वप्न घेऊन आले .
गांधीजी म्हणत , 'मला जो भारत अभिप्रेत आहे , त्यात मी राजे महाराजे , संस्थानिक आणि जमीनदार या सर्वाना जागा ठेवली आहे '
मोदींना अदानी- अंबानी हवे आहेत असा आरोप केला जातो. कारण ते समाजवादी विचारसरणीचे नाहीत म्हणून ते गांधीजीच्या विचारांशी जवळचे आहेत. म्हणूनच ते बोलताना गांधी - लोहिया - दिनदयाळ उपाध्याय ह्यांचा उल्लेख करतात. ते गांधीजींच्या विचारांशी जवळचे पण कृती करताना त्यांची बाह्य वागणूक ही नेहरू सारखी दिसते. नेहरूंचे शेरवानीवरचे गुलाब पुष्प जसे प्रसिद्ध तसे मोदींचे सेल्फी फोटो घेणे लोकांना माहित झाले आहे. नेहरूंचे कपडे इंग्लंडला धुण्यासाठी जात असत असे म्हणतात तर मोदींचा डिझायनर त्यांच्यासाठी खास खास कपडे शिवत असतो. त्यामुळे मोदी सरकार म्हणजे सूटबूट सरकार असे त्यांचे विरोधक म्हणतात. तरी बरं , मणीशंकर अय्यर त्यांना कॉंग्रेस अधिवेशनात 'चाय की दुकान' साठी stall देण्यास तयार झाला.
गांधी 'खेड्यात चला ' म्हणत असत तर नेहरू शहरी विकासाकडे लक्ष केंद्रीय करीत. मोदी स्मार्ट सिटीचा विचार करतात. त्यांना खेड्यात किंवा शहरात न जाता मध्यम असलेल्या छोट्या शहरांचा विकास करावयाचा आहे . खेड्यांना शहरी सोयी सुविधा मिळवून द्यावयाच्या आहेत.
गांधी खेड्यात वास्तव्य करा असे म्हणत तर मोदी मोठ्या खेड्यांना स्मार्ट शहर बनवा असे म्हणतात.
गांधीजी म्हणत , ' मला आधुनिक विज्ञानाविषयी आदर असला तरी जुनेच आधुनिक विज्ञानाच्या उजेडात तपासून योग्य पद्धतीने पुनरुज्जीवित करायला हवे ' . मोदी एका बाजूने ' डिजिटल इंडिया ' हा विज्ञानवादी दृष्टीकोन मांडतात तर जुन्या संस्कृतीला चिकटून राहतात.
नेहरुंना वाटते खेडे हे वैचारिक व सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेले असते व मागासलेल्या भोवताल मधून प्रगती साधने अशक्य असते . कारण संकुचित वृत्तीचे लोकच खोटारडे असण्याची शक्यता असते. ह्याउलट मोदींना दिनदयाळ उपाध्याय व नानाजी देशमुख ह्यांची ग्रामविकास योजना अधिक आवडते म्हणून ते प्रत्येक खासदाराला एक गाव विकसित करण्यासाठी पैसे देण्याची योजना आखतात . ही योजना गांधीजींच्या खेड्याकडे चला ह्या विचारांशी जुळती आहे. विकसित खेडे असेल तर शहरात कोण येईल ?
गांधीजींची ' हिंद स्वराज ' ही संकल्पनाच नेहरुंना ६०-७० वर्षापूर्वी जुनाट वाटली होती.
आतातर जग खूप बदलले आहे. मोदींना त्याची जाणीव आहे. ह्या बदललेल्या जगात भारताला टिकायचे असेल तर ' मेक इन इंडिया  , डिजिटल इंडिया , स्मार्ट सिटी , स्किल इंडिया , बुलेट ट्रेन,  स्वच्छ भारत  ' ह्या नव्या योजना त्यांनी पुढे आणल्या आहेत.
नेहरू - गांधी ह्यांच्यात भारत विकासाच्या कल्पना फार भिन्न होत्या . गेल्या अनेक वर्षात नेहरू नंतर नरसिंह राव आणि अटलजी ह्यांनीच विकासाच्या दिशा बदलून वेगळा मार्ग निवडला. आता मोदीनी नेहरूंच्या विचारापासून दूर जावून गांधी विचारातील काही संकल्पना समोर ठेऊन नव्या भारताची नवी स्वप्ने दाखविली आहेत.
( Based on  my  observations -  political essay )


No comments:

Post a Comment