Sunday, March 26, 2023

नर्मदा परिक्रमा – ४


अमरकंटक 


नर्मदाकुंड 


कवी कालिदासाने अमरकंटकला अमरकुटा असे म्हंटले आहे.   

अमरकंटक निज धाम तुम्हारा, दो धारा के बीच  

जहां शिवशंकर करे तपस्या, उच्य शिखर कैलास .. ओ मैया !


जबलपूरहून २५० किलोमीटर अंतरावर अमरकंटक आहे. अमरकंटक हे नर्मदेचे उगमस्थान. त्याला कोटीतार्थमां असे म्हणतात. तेथून ही परिक्रमा सुरू करता येते. हा पहाडी भाग आहे. विंदय आणि सातपुडा ह्या पर्वतांच्या रांगा एकमेकाना भेटतात. तेथेच मैकल पर्वताच्या रांगाही ह्या दोन्ही पर्वत रांगांना मिळतात. हे दाट जंगल आहे. येथे ६०० विविध प्रकारची वनौषधी झाडे आहेत. ऊन्हामुळे पानझड झाली होती. पावसाळ्यात हा परिसर खूप सुंदर दिसत असेल. येथे एकूण ३४ मंदिरे आहेत. सूर्य. लक्ष्मी, शिव, गणेश, आणि विष्णु ह्या पांच देवतांची प्रमुख मंदिरे आहेत. नर्मदा जेथे उगम पावते ते ठिकाण म्हणजे नर्मदा कुंड. या ठिकाणी ती उगम पावते आणि थोड्याच अंतरानंतर ती लुप्त होते. ती छोट्या कुंडातून एका मोठ्या कुंडात जाऊन मिळते.  नंतर काही किलोमीटर अंतरानंतर रेवाकुंडात दिसते. तेथून तिचे वाहणे सुरू होते. मांडवगडच्या राणीने तिच्या महालासमोर हे कुंड उभारले. ती वयस्कर झाली होती आणि रोज नर्मदा घाटावर जाऊन स्नान करणे हा तिचा नियम होता. त्यासाठी तिने हे कुंड बांधले. त्या कुंडाच्या आजूबाजूला मंदिर समूह आहे.







रेवाकुंड - नर्मदा येथे पुनः प्रगट होते 

रेवाकुंडच्या आजूबाजूची मंदिरे  

                                                                                नर्मदा माता 





दुर्वासऋषी यांचे वास्तव्य येथेच होते. 


नर्मदा 


अमरकंटक ते नरसिंगपूर हे अंतर ३५० किलोमीटर आहे. ह्या जंगलातून जातांना आपण नर्मदेच्या काठाकाठानेच चालू लागतो. नर्मदेची विविध रुपे आपले मन प्रसन्न करतात. कपिलमुनींनी येथेच १२ वर्षे तपस्या केली. त्या परिसराला कपिलधारा असे म्हणतात. कपिलधारा हा नर्मदेवरील पहिला मोठा धबधबा. नर्मदा येथून वहात असतांना एखाद्या अवखळ मुलीसारखी दिसते. त्या नंतर थोड्याच अंतरावर आपण दूसरा धबधबा बघतो. त्याचे नाव आहे दुग्धधारा. पाण्याचा रंग आहे दुग्धरंग. या धबधब्याजवळच दुर्वास ऋषींचा आश्रम होता. हा सर्व परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. नर्मदेची मोहक रुपे बघत आपण चालत रहातो.

कपिलधारा 


                                    कपिलधारा 

दुग्धधारा  


                हम रेवा मां के बालक, मैया दूध पिलावत है

रेवा आणि पद्मावती 

पद्मावती रेवा जंगल 

पद्मावती - आमचा ग्रुप 

नर्मदा तटाकी 


असे अनेक धबधबे ह्या परिसरात दिसले 

विंदय सातपुडा पर्वत रांग  - सर्वात उंचावर  


जैन मंदिर स्तंभ 

जैन मंदिर 





भगवान महावीर 


अतिशय सुंदर शिल्प 

 
शबरी 

नर्मदा 

नर्मदा घाट - नर्मदापूर 








महादेव 



रामकृष्ण मिशन आश्रम - येथे राहिलो 


येथील महत्वाचे मंदिर ज्वालेश्वर. त्याच्या अनेक दंतकथा ऐकल्या. नर्मदा जेथे उगम पावते तेथे अमरेश्वर महालिंगम हे महादेवाचे सुंदर मंदिर आहे. ५१ टन वजनाची हे लिंग ११ फुट लांबीचे आहे. हा परिसर छत्तीसगढ मध्ये आहे. येथील जंगलाला मैय्या की बगिया असेही म्हणतात. गुलबकावलीची फुले सर्वत्र आहेत. आंबा – केळीच्या बागा आहेत, कालाचुरी  महाराजांनी येथे त्रीमुखी देऊळ बांधले. (१४४१ – १०७३ AD). 

 

नर्मदेला एकूण ४२ नद्या येऊन मिळतात. त्यातील पांच मोठ्या नद्या. नर्मदा, सोन आणि जोहिला या तीन प्रमुख नद्या. मसलन, हिरन, बंजर, बुढनेर, डेब, गोई, कारम, चोरल, बेदा या इतर प्रमुख उपनद्या. यात्रेकरूसाठी नर्मदा परिक्रमा हा पंचकोशी यात्रा असते.

नर्मदेला १५ नावे आहेत: १) नर्मदा २)त्रिकुटा ३) दक्षिण गंगा ४) महती ५) सुरसा ६) कृपा

७) मंदाकिनी ८) महार्णवा ९) रेवा १०) विपापा ११) विपाशा १२) विमला १३) करभा १४) रंजना १५) वायुवाहिनी / बालूवाहिनी    

नर्मदेच्या ११३ उपनद्या आहेत. २५ पक्के घाट बांधले आहेत. ३/४ ज्योतिर्लिंग आहेत. नर्मदेतील गोटे म्हणजे शालिग्राम. साक्षात शिवशंकर  

मैय्या की गलिया आडी तेडी, हम से चलो न जाय 



 



अमरकंटकजवळच एक धबधबा दिसतो त्याला शंभू धारा असेही म्हणतात. तेथे नर्मदेला पद्मावती ही नदी मिळते. तो भाग खूपच सुंदर आहे. तेथून पुढे पद्मावती- अमरावती या दोन नद्यांचा संगम दिसतो. जवळच एक जैन मंदिर बांधण्याचे काम चालू आहे. अतिशय भव्य मंदिर उभे होत आहे. तेथील शिल्पकला अप्रतिम आहे. 1008 भगवान मुनिस व्रतनाथाची २४ टन वजनाची भव्य मूर्ती लक्ष वेधून घेते. तेथील संगमरवर भेडाघाटचा आहे. जवळच धर्मपाणी हे मंदिर आहे व एक सुंदर आश्रम आहे.


अमरकंटकच्या जंगलातून आपण होशंगाबादकडे म्हणजे नर्मदापुराकडे जातो.(१७५ किलोमीटर)१५५१ मध्ये मालवा नरेश यांनी हे गाव वसवले. जानकीबाई यांनी पक्का घाट बांधला (१८८१). त्यालाच सेठानी घाट असे म्हणतात.

रस्त्यात आपण बरमान घाट बघतो. हा घाट खूप सुंदर आहे. नरसिंह जिल्ह्यातील हा घाट प्रसिद्ध धार्मिक स्थान आहे. ब्रम्हदेवाची ही तपोभूमी आहे, असे म्हणतात. येथून जवळच लोकनाथ तीर्थ महाराजांचा सुंदर मठ/आश्रम आहे. तेथे रहाण्याची सुंदर व्यवस्था आहे. ह्या आश्रमात यात्रेकरूना जेवण फुकट असते. जवळच शेठाणी घाट आहे. आपण नर्मदेच्या दर्शनासाठी घाटावर जातो आणि ते विहंगम दृश्य पाहून खूप आनंदी होतो. ते आनंद तरंग आजही आठवतात.

राम बिना कोई पाले नही,

कृष्ण बिना कोई तारे नही

जयतू नर्मदे I

तेरे पद पंकंन मे रेवा I

सदा वंदना मेरी मा II


आमचे स्वयंपाकी बरोबरच होते. त्यांना मठातील स्वयंपाकघर मिळाले आणि त्यांनी ३०-४० मिनिटातच सुंदर स्वयंपाक केला व आमची क्षुधाशांती झाली. येथून जवळच असलेला दूसरा खारा घाट बघितला.


नर्मदा उत्तरतट: भरूच येथील भृगु ऋषी आश्रम, मिठी तलाई, नील कंठेश्वर, गरुडेश्वर, सरदार सरोवर, कुक्षी, मांडू, महेश्वर, महू, इंदूर, नेमावर, जबलपूर, भेडाघाट, बरमान, अमरकंटंक

नर्मदा दक्षिणतट: अमरकंटक, डिंडोरी, नरसिंहपूर, होशंगाबाद, खांडवा, ओंकारेश्वर 

ओंकारेश्वर 

होशंगाबादहून आपला प्रवास पुनः सुरू होतो ओंकारेश्वराकडे. जेथे आपण परिक्रमा सुरू केली त्याच नागर घाटावर आपली संकल्पपूर्ति पूजा सुरू होते. आपले गुरुजी आपली पूजेची व्यवस्था करीत असतात आणि आपण नर्मदेत डुबकी मारून पूजेसाठी तयार होतो. ही पूजा दीड दोन तास चालते. गुरुजी पूजेचा अर्थ समजाऊन सांगत असतात. मंत्रघोष चालू होतो. सुंदर वातावरण निर्मिती होते. हा पूजेचा पहिला भाग. नंतर ममलेश्वर मंदिरात पूजेचा उत्तरार्ध. ती पूजा संपल्यावर आपण नर्मदेवरील जूना पूल ओलांडून ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग जेथे आहे त्या मंदिरात महादेवाच्या पिंडीवर नर्मदा जलाभिषेक करण्यासाठी जातो. आपण ती बाटली जपून ठेवलेली असते. रोज तिची आरती केलेली असते. अशा रीतीने ओंकारेश्वराच्या महादेवाला नर्मदा जलाभिषेक केल्यानंतर आपली परिक्रमापूर्ती होते.

नर्मदा  - जगदानंदी,

मैय्या जय आनंद करणी

मैया सुरमंडल रमती

अमरकंटक से विराजत,

घाटन घाट विराजत

नमामी देवी नर्मदे

नर्मदे हर !   नर्मदे हर !  नर्मदे हर !  

हे नर्मदा परिक्रमेचे वर्णन खास तुमच्यासाठी ..

घर बैठे ही दर्शन देखो

जीवन सफल हो जाय ! 



नर्मदे हर ! शेवटच्या दिवशी नर्मदेत स्नान करून पूजा केली 

संकल्पसिद्धी पूजा करताना 


 



*****   




  

Thursday, March 23, 2023

नर्मदा परिक्रमा – २


रेवासागर / गरुडेश्वर   


पाण्याचा रंग बदलताना 

परिक्रमेचा पहिला दिवस नागर घाटावरील संकल्प पूजेनंतर संपला. भाग्यश्री टुरने सोबत स्वयंपाकी घेतले होते. त्यामुळे रस्त्यात निरनिराळ्या हॉटेलमध्ये वेगवेगळे पदार्थ खाऊन यात्रेकरुचे पोट बिघडू नये याची चांगली दक्षता घेतली होती. स्वयंपाकी रुचकर आणि छान स्वयंपाक करीत असत. कोणतीही तक्रार नसायची. अतिशय थोड्या वेळात त्यांचा स्वयंपाक तयार होत असे. 


नर्मदा परिक्रमा मार्ग ( पायी / बस - कारने 

सकाळी सहा वाजता उठल्यावर चहा, सात वाजता नाश्ता आणि आठ वाजता आम्ही बाहेर निघत असू. सकाळचा कार्यक्रम त्या ठिकाणी असलेली नर्मदाकाठावरील मंदिरे, नर्मदेवरील घाट आणि आजूबाजूचा परिसर बघणे हा असे. त्यानंतर दुपारचे जेवण. जेवणानंतर म्हणजे दुपारी १/२ नंतर आमचा पुढील प्रवास बसने सुरू होत असे. रोज २०० ते २५० किलोमीटर प्रवास झाल्यानंतर पुढील ठिकाणी हॉटेलमध्ये मुक्काम असे. तेथे रात्रीचे जेवण आणि विश्रांती. सकाळी उठले की पुनः तसेच. ओंकारेश्वर सोडले आणि शहादाकडे निघालो. मी सोबत नर्मदेचे दोन नकाशे जोडले आहेत. एक आहे पायी परिक्रमा करताना येणारी गावे व पथमार्ग तर दूसरा आहे नर्मदेच्या दोन्ही बाजूचे रस्ते व बस/कारचा मार्ग (बघा नर्मदा परिक्रमा मार्ग) 

रेवासागरकडे बोटीतून  जाताना 

मध्यप्रदेशमधील रस्ते चांगले आहेत. शहादा हा महाराष्ट्रातील आदिवासी भाग. नंदुरबार जिल्हा. महाराष्ट्र सुरू झाला आणि बस अनेक खडद्यातून हेलकावे खात पुढे जाऊ लागली. आता प्रवास कठीण वाटू लागला. असा आपला महाराष्ट्र! काय रस्ते? हाडांचा हिशोब जुळवू लागलो. शहादाहून गुजरातमधील अंकलेश्वरकडे बस धाऊ लागली. शहादाला सियाराम बाबाचा मठ आहे. जे यात्रेकरू पायी यात्रा करतात ते सहसा मठात मुक्काम करतात. तेथे राहण्यासाठी खोली मिळते. जेवणाची व्यवस्था असते. मठ छान आहेत. तेथील वातावरण धार्मिक/अध्यात्मिक असते. पूजा/आरती कथा/कीर्तने चालू असतात. शहादाजवळ एकमुखी दत्ताचे मंदिर बघण्यासारखे आहे. येथून जवळच प्रकाशा हे ठिकाण आहे. तेथील काशी विश्वेश्वराचे मंदिर सुंदर आहे. हे बघून आम्ही निघालो ते गरुडेश्वराकडे. शुपनेश्वर आणि कुंभेश्वर ही दोन मंदिरे बघून भरूचला मुक्काम करावयाचा होता.  

गुजरातमधील रस्ते महाराष्ट्रातील रस्त्यापेक्षा बरे पण मध्यप्रदेशसारखे चांगले नव्हते. काय अवस्था झाली आहे आपल्या महाराष्ट्राची? माझा अंकलेश्वरशी संबंध आला तो ३०/४० वर्षापूर्वी. मुंबईतील कारखाने बंद होऊ लागले होते. गुजरात राज्यात वीज, पाणी आणि जमीन स्वस्त मिळू लागली होती. मुंबईतील कारखानदार दहिसर नंतर वापी, बलसाड, भरूच आणि अंकलेश्वरला आपले मुंबईतील कारखाने बंद करून नवे कारखाने आणि उद्योग सुरू करू लागले. मुंबईत जागा महाग. मजूर महाग. सोयी – सुविधा तोकड्या. माझा व्यवसाय उद्योगाशी निगडीत होता. त्यामुळे मुंबई – भरूच – अंकलेश्वर हा माझा प्रवास सुरू झाला. सकाळी ट्रेन पकडायची व रात्री मुंबईत परतायचे. तेंव्हा ट्रेनमध्ये भरूचजवळ नर्मदेचे दर्शन होत असे. 

ह्या नर्मदेच्या परिक्रमेत अंकलेश्वरचे महत्व मला माहीत नव्हते. अंकलेश्वर – भरूच अंतर थोडेच आहे. नर्मदा तटपरिवर्तन भरूचला करायचे असल्यामुळे हा प्रवास चालू होता. अंकलेश्वरजवळ केदारेश्वर, विश्वेश्वर आणि पुष्पमंडलेश्वर ही तीन सुंदर मंदिरे आहेत. ती बघण्यासाठीच येथे मुक्काम होता. तसे अंकलेश्वर हे फारसे विकसित शहर नाहीच. उद्योग असल्यामुळे वस्ती वाढली आहे एवढेच. येथून जवळ असलेल्या रावेरखेडीला गेलो. प्रवास सुरू होता तो काटपोरकडे. नर्मदा न ओलांडता म्हणजे अरबी समुद्रात मिळाल्यानंतर दुसऱ्या तटाकडे जायचे. काटपोर म्हणजे आपल्या माहीम खाडीसारखा दलदलीत प्रदेश. त्यामुळे प्रवास करायचा तो बोटीने. जेंव्हा समुद्राला भरती येते तेंव्हाच बोटी सुरू करता येतात. या बोटी म्हणजे आनंद! समुद्रातील मिठीतलाईनंतर नर्मदा समुद्राला पूर्णपणे मिळते. त्यानंतर बोटी या नर्मदेच्या दुसऱ्या तटावर जातात. तेथे आमची बस उभी होती. ही बस नर्मदेवरील एका छोट्या गोल्डन ब्रीजवरुन पलीकडे जाते. नर्मदा जेथे अरबी समुद्राला मिळते त्याला रेवासागर असे म्हणतात. तेथे नदीचे पात्र विस्तीर्ण होते आणि नदी आणि समुद्र यातील फरकच लक्षात येत नाही. पाण्याच्या रंगावरून फरक जाणवू लागतो. अर्थात खारट पाणी सांगते की आपण आता समुद्रातच आहोत. आपण नर्मदा जल भरून घेतलेली अर्धी बाटली समुद्रात ओततो व पुन्हा अर्धे समुद्राचे पाणी बाटलीत भरतो. ओंकारेश्वरला जलाभिषेक करताना हेच जल वापरावयाचे असते. 



रेवसागरकडे जातांना अशी खाडी लागते 


खाडीत भरतीनंतर बोटी सुरू होतात. मला माहीमच्या खाडीतील मासेमारी 
करणाऱ्या कोळयांची आठवण झाली. 


बोटी अशा भरतात आणि आपण रेवासागरकडे जाऊ लागतो 


असा प्रवास सुरु होतो. खचाखच भरलेली ही बोट 

मिठीतलाईला आपण बोटीने जातो. तेथेच नर्मदा समुद्रात विलीन होते. हा प्रवास बोटीचा. ह्या बोटी आणि तेथील नावाडे हे अगदी बेभरवशाचे आहेत. एका बोटीत ४०/५० माणसे कोंबलेली असतात. दाटीवाटीने एकमेकाला चिकटून बसायचे. थोडे सुद्धा हलायला जागा नसते. कसलीही सुविधा नसते. हा अतिशय कठीण समुद्र प्रवास. ३-४ तासाच्या ह्या प्रवासात ‘नर्मदे हर! नर्मदे हर!’ असा गजर करीत पुढे जायचे. शेवटी नर्मदा मैय्याच आपल्याला तारते.

 (छायाचित्रातील आमचे फोटो पहा) 

काय ही सरकारी यंत्रणा? काय ही लोकांची गैरसोय? कोण हे कंत्राडदार नेमतात? कसला धंदा करतात? असे हे यात्रेकरूचे हाल? ज्या यात्रेकरुमुळे ह्या कंत्राटदारांची पोटे भरतात त्यांचे हाल बघा. त्यांच्या सुरक्षेची शून्य काळजी घेणारे हे सरकार! एक प्रवासी आणि यात्रेकरू म्हणून मी हे मुद्दाम लिहीत आहे. हे चांगले शासन नव्हे.


रेवासागरकडे 





रेवासागर - धुके होते 


शेवटी नर्मदेच्या दुसऱ्या तटाकी  पोहोचलो 

रेवासागर/ रत्नासागर सुंदर आहे. विशाल आहे. ते निसर्ग सौन्दर्य डोळयानी टिपले. नर्मदेच्या दुसऱ्या तटाकी जाण्यात यात्रेकरुला आनंद आहे; पण नको हा प्रवास असेच वाटत होते. यात्रेतील यातना आणि त्रास हे दोन्ही अनुभवले ते ह्या प्रवासात. यातना देणारा हा प्रवास! त्याला मूळ कारण आहे ती येथील शासकीय यंत्रणा आणि बोट चालविणारे हे कंत्राटदार! रेवासागरची यात्रा मनात आनंदतरंग उमटविणारी असली तरी हा कठीणतम प्रवास नकोसा वाटणारा आहे! तो अधिक सुखकर करणे हे सरकारच्या हातातच आहे. चांगल्या बोटी हव्यात. प्रत्येकाला बसण्याची सोय हवी. आजूबाजूचे निसर्गसौन्दर्य टिपता आले पाहिजे. मनावर आनंदतरंग तर अशाच प्रवासात उमटत असतात.   



आमची बस तटापलिकडे उभीच होती. आणि आमचा प्रवास सुरू झाला तो गरुडेश्वरकडे. तेथील गरुडेश्वराचे
 देखणे महादेव मंदिर पाहिले. ते २००० वर्षे जूने आहे. महादेवाने गरुडाचे रूप धारण केलेले असल्यामुळे त्याचे नाव गरुडेश्वर! नंतर आम्ही जवळील दत्त मंदिराकडे वळलो. हे मंदिर टेंभे महाराजांनी बांधले आहे.

नर्मदा 


दत्त मंदिर - मी आतील फोटो काढले नाहीत. मनाई असताना कशाला काढायचे ? मूर्ती छान आहे.



                                                                        पुष्पपंडतेश्वर  मंदिर 





                                    केदारेश्वर मंदिर 



येथील दुसरे आकर्षण होते ते Statue of Unity ! 

पंतप्रधान मोदीनी उभारलेले हे सरदार पटेल यांचे नर्मदातिरी असलेले हे स्मारक म्हणजे शिल्पकला आणि इंजिनिअरिंग मधील एक आश्चर्यच आहे. ते प्रत्यक्ष बघितले तरच समजू शकते. ते एक नवे आश्चर्यच आहे. मी ज्या दिवशी हे स्मारक बघितले त्याच दिवशी माझ्या फेसबुक पेजवर फोटोसह सविस्तर लिहिले होते. त्यामुळे पुन्हा येथे लिहीत नाही. 
This is the world's tallest statue, with a height of 182 meters, located near Kevadia in the state of Gujrat, India. It depicts Indian statesman and independence activist Sardar Vallabhbhai Patel, who was the first deputy prime minister and home minister of independent India and adherent of Mahatma Gandhi.
गरुडेशवर जवळील हे स्मारक आणि येथे येण्याकरीता केलेला मिठीतलाईचा बोट प्रवास. ह्या दोन ठिकाणी दिसलेली विसंगती मनाला त्रास देत होती. रेवासागरचा बोट प्रवास अधिक चांगला करण्यासाठी शासन लक्ष देईल तर सरदारांचे  हे स्मारक बघणे यात्रेकरुना सोयीचे होईल. कारण गोल्डन ब्रिजवरुन नर्मदा ओलांडता येत नाही.    


शिल्पकार राम सुतार यांचे हे अप्रतिम शिल्प. हा उंच आणि भव्य पुतळा ही त्यांचीच  निर्मिती. 


            सरदार पटेल यांचा पुतळा नर्मदेकडे पहात असतांना - ह्या ठिकाणी त्यांना धरण हवे होते ते                        बांधण्यात आले आहे . आपण लिफ्टने पुतळ्याच्या आंत जातो आणि नर्मदा आणि त्यावरील हे 
            धरण सरदारांच्या मूर्तीमधून म्हणजे त्यांचे  जाकीट असलेल्या भागातून  बघतो. खालील फोटोत 
            ते स्पष्ट दिसते. पुतळ्याच्या आंत लिफ्टने जाणे, हा अनुभव म्हणजे  आधुनिक अभियांत्रिकी व                        शिल्पकला  यांचे अप्रतिम  उदाहरण आहे

                 लिफ्टने पुतळ्याच्या आतून आपण नर्मदा आणि  त्यावर बांधलेले धरण बघतो ते हे दृश 

STATUE OF UNITY 


आमचा परिक्रमा ग्रुप 
                                                                                    
  

दुसरे दिवशी आम्ही निघणार होतो नेमावरकडे. ते पुढील भागांत. 


*****

 





Wednesday, March 22, 2023

नर्मदा परिक्रमा

त्वदीयपादपंकंजं नमामि देवि नर्मदे !



 मी तसा जगभर प्रवास केला आहे. दरवर्षी कुठे जायचे हे ठरवित असतो. वर्षातून एकदा देशांत आणि एकदा परदेशांत दौरा करायचा असे ठरलेलं असते. शालेय जीवनात असतांना गो. नी. दांडेकरांची “कुणा एकाची भ्रमण गाथा” हे पुस्तक वाचले होते. खूप प्रभावित करणारे ते लिखाण. त्यांनी त्यावेळी केलेली नर्मदा परिक्रमा आठवली. आपणही अशीच नर्मदा परिक्रमा करावी असे त्यावेळपासून मनात येत असे. वयाच्या 76व्या वर्षी आपल्याला नर्मदा परिक्रमा पायी करणे शक्य नाही, हे माहीतच होते. कैलास मानसरोवर यात्रा करून १५ वर्षे झाली होती. त्याची आठवण झाली. काठमांडू ते मानसरोवर हा १८०० किलोमीटर येण्याजण्याचा तो प्रवास आठवला. त्यावेळी ब्रम्हपुत्रेच्या काठाकाठाने केलेला तो प्रवास आठवला. कैलासाच्या अगदी समोर आमचा तंबू टाकला होता. कैलासाचे ते विलोभनीय दर्शन आजही आठवते. कैलास म्हणजे भगवान शंकराचे निवासस्थान. तेथे कुठलेही मंदिर नव्हते. 
‘कैलासाच्या वृद्ध पतीने वरिले, त्रिजटेवरी धरिले’, ही कविता आठवली. कैलास पर्वत तर समोरच उभा होता पण शंकर दिसले नाहीत. एक मात्र विशेष जाणवले. मी कैलासाला स्पर्श केला आणि देवालाच स्पर्श केला अशी मला अनुभूति मिळाली. I had a feeling of touching a God. 

नर्मदा ही तर शंकराची मुलगी. मग लक्षात आले ते आद्य शंकराचार्य यांनी लिहिलेले नर्मदाअष्टक. त्यातील ती ओळ .
त्वदीयपाद पंकंजं नमामि देवि नर्मदे ! मनाने निश्चय केला की नर्मदा परिक्रमा करायलाच पाहिजे. काही दिवस भौतिक जगापासून सुटका करून घ्यायची. वादविवाद, कागाळी, निंदा-स्तुति यापासून दूर जायचे व चिंतामुक्तीचा अनुभव घ्यायचा. स्वभाव तसा बदलत तर नसतोच. भौतिक जगापासून सुटका तर हवी. आपण वानप्रस्थाश्रम तर स्विकारणारे नाहीत. आपल्याजवळ  वैराग्यवृत्ती तर नाही. आपल्याला भारतीय संस्कृती आणि निसर्गविषयी खूप  प्रेम  तर आहेच. नदी – सागर – पर्वत या निसर्गाविषयी एक श्रद्धायुक्त कृतज्ञता आहे. निसर्ग हीच खरी देवता, हे वेदपूर्व काळापासून आपण मानतो. नदी म्हणजे जीवनदायिनी. नदीच्या काठीच जीवन प्रारंभ होते. 
आपल्या नद्या तर जीवनदायिनी. 



गंगा ज्ञान देते, यमुनेत भक्तिरस सांपडतो, ब्रम्हपुत्रा तेज वाढविते, गोदावरी ऐश्वर्य देते, सरस्वती विवेक जागा करते, नर्मदेला कधीच न आटण्याचे वरदान लाभले आहे. भारतीय संस्कृतीत या नद्यांना अनन्य साधारण महत्व आहे.  

 विंदय-सातपुडा या पर्वत रांगातून खळखळत वहाणारी ही नर्मदा एका अवखळ मुलीसारखी आहे. ती अन्नपूर्णा आहे, नर्मदेचा आजूबाजूचा परिसर ही  ऋषीमुनींची तपोभूमी आहे. तिच्या बाजूने प्रवास केला तर उमटणारे आनंदतरंग अनुभवणे  विलक्षण आहे. मार्कंडेय ऋषिनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली आणि मार्कंडेयपुराण लिहिले. नर्मदेच्या तटाकी त्यांनी  खडतर तपस्या केली. अशी ही नर्मदा अध्यात्मिक, धार्मिक आणि भौगोलिक दृष्ट्या तितकीच महत्वाची आहे. 

कैलास परिक्रमा, अयोध्या परिक्रमा, चारध्याम यात्रा जशा महत्वाच्या आहेत तशीच नर्मदा परिक्रमा मानसिक स्थैर्य देणारी आहे. म्हणूनच पांडव आणि कौरवही या परिक्रमेला गेले होते. पापक्षालन करण्याचा मार्ग ह्या नर्मदा मातेने त्यांना दाखविला. परिक्रमा करायचे तर ठरले होते. माझा मित्र आणि साडू असलेल्या डॉ.मधुकर दंडारे यांच्याबरोबर चर्चा चालू झाली. अनेक टुर कंपन्याकडून माहिती मिळविली. परिक्रमेचे चित्र स्पष्ट होऊ लागले. सुरुवातीला छोटा ग्रुप करून निघावे असे वाटत होते. शेवटी पुण्याच्या भाग्यश्री टूर्स ह्या कंपनीची १५ दिवसाची टुर करायचे ठरविले. 
त्या कंपनीचा एक टुर गाईड सहज बोलून गेला. “नर्मदा परिक्रमा ही एक ‘यात्रा’ आहे. यात्रा म्हणजे ‘यातना’ आणि ‘त्रास’ असतो. तेंव्हा ही काही सहल नाही”. आम्ही १५-१६ यात्रेकरू होतो. त्यात आम्ही दोनच पुरुष होतो. बाकी सर्व स्त्रीयाच होत्या. आम्ही सहा नातलग होतो. आम्ही तसे धार्मिक नव्हतो. अनेक कथा-दंतकथा यावर आमचा फारसा विश्वास नव्हता. अर्थात ही परिक्रमा तशी धार्मिक/अध्यात्मिक होती.

धर्म हा तसा महत्वाचा असतोच. आपल्या सनातन धर्माची अनेक वैशिष्ट्ये आहेतच. त्यातील अनेक संकल्पना नीट समजून घेणे तितकेच महत्वाचे आहे. आपल्या देशात अनेक नद्या आहेत. पर्वत रांगा आहेत. समुद्र किनारे आहेत. आपला भौगोलिक इतिहास आहे. आपल्या भारतीय संस्कृतीची खास वैशिष्ट्ये आहेत. नर्मदा ही नदी तर वैराग्याची अधिष्टात्री आहे, असे म्हणतात. हा सत्संग कथा-कीर्तनातून घडतो. रोज नर्मदेत स्नान करायचे, नवा संकल्प सोडायचा, नर्मदेच्या दक्षिणतटाला ओलांडून उत्तरतटाकडे जायचे नाही. ओंकारेश्वर किंवा अमरकंटक पासून प्रवास सुरू करायचा व तेथेच संपवायचा. हा एक धार्मिक नियम आहे. हे नियम यात्रेत पाळणे आवश्यक आहेच. ते आम्ही पाळले. 

ओंकारेश्वर हे इंदूरपासून ८० किलोमीटर दूर आहे. तेथून ही यात्रा सुरू झाली. ओंकारेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक. ममलेश्वर हे त्यापैकीच एक पण ते दुसऱ्या तटावर आहे. तसे ते अर्धे ज्योतिर्लिंग. ज्या नागर घाटावर आपण सुरवातीची संकल्प पूजा करतो त्याच बाजूला ममलेश्वर मंदिर आहे. तर ओंकारेश्वर दुसऱ्या तटावर आहे. तेथे एक जूना पूल आहे. तो ओलांडून जायचा नाही. परिक्रमा संपल्यानंतर नर्मदेचा जलाभिषेक ओंकारेश्वरला महादेवाच्या पिंडीवर करावयाचा असतो. तेंव्हाच आपली परिक्रमा पूर्ण होते. अशी ही नर्मदा परिक्रमा म्हणजे आपले जीवन बदलून टाकणारा एक आगळावेगळा अनुभव आहे. खरं म्हणजे ही परिक्रमा पायीच करावयास हवी. त्यासाठी ३ वर्षे, ३ महीने आणि १० दिवस (१०८ दिवस) लागतात. हा प्रवास २६२४ किलोमीटर आहे. नागर घाटावर मी सपत्नीक संकल्प पूजा केली. तो अनुभव वेगळाच होता. हा घाट फारच सुंदर आहे. संकल्प आणि सिद्धी ह्या दोन्ही पूजा याच घाटावर केल्या. ही संकल्प पूजा झाल्यानंतर घाट उतरून नर्मदेचे पाणी एका बाटलीत भरून घ्यायचे. त्या नर्मदा जलाची रोज पूजा करावयाची व संध्याकाळी सर्वानी जेवणापूर्वी  सामूहिक नर्मदा आरती करावयाची. ही नर्मदा आरती नर्मदेचे फारच सुंदर वर्णन करते. ही एक निसर्ग कविता आहे. 

आद्यगुरु शंकराचार्यानी एक नर्मदाषट्क लिहिले आहे. ते ह्या नदीचे महत्व सांगते.
अलक्षलक्ष – लक्षपाप – लक्ष – सार – सायुधं,
ततस्तु जीव – जंतुतंतु – भुक्तिमुक्ति दायकम !
 
दुरंत – पाप – ताप – हयरि – सर्व जंतु – शर्म दे ! 
त्वदीयपादपंकंजं नमामि देवि नर्मदे !! 

सुलभ्य देहदुर्लभं  महेषधाम  गौरवं ! 
पुनर्भवा नरा न वै विलोकयंति रौरवं !!
 
 ह्याच घाटावर ५ कुमारिकांचे पूजन करतात व त्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करतात. ही तशी धार्मिक कल्पना असली तरी माणसाच्या आयुष्यात स्त्रीचा गौरव करण्याची ही संकल्पना किती सुंदर आहे! आपण ह्या संकल्पनेकडे या दृष्टीने बघायला हवे. त्या घाटावर पाच कुमारिका भेटल्या. त्यांची गरीबी तर दिसून येत होतीच. पण दान देणं हा विचार खूप महत्वाचा आहे. तशी कृती परिक्रमेत करणे हे उत्तम. 
“देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे”, असे म्हणणाऱ्या विं. दा. करंदीकर यांची मला आठवण झाली. खरं आहे, एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावेत. या वाक्याची आठवण झाली. 

 एका हिन्दी कवीच्या शब्दात नर्मदा मैयाचे वर्णन असे आहे .. 
 हम रेवा मा के बालक है, 
 मैया दूध पिलावत है!

 मैया अमरकंठवाली 
 कि तुम हो भोली भाली 
 तेरे गुण गावत है, 
 निर्धनिया को धन देती हो, 
 अज्ञानी को ज्ञान I 
 अभिमानी का मान घटाती, 
 खोती नाम निशान II 
 मैया की गलिया आडी – तेडी, 
 हम से चलो न जाय I 
 घर बैठे ही दर्शन दिखादो 
 जीवन सफल हो जाय II 

नर्मदा संकल्प पूजा 




 नर्मदा – जगदानंदी 
 मैया जय आनंदकरणी II 
 मैया सुरमंडल रमती 
 अमरकंटक से विराजत, घाटन घाट विराजत
 नमामी देवी नर्मदे I

अमरकंठ निज धाम  तुम्हारा दो धारा के बीच I
जहां  शिवशंकर करे तपस्या उच्य शिखर कैलाश II 







Friday, August 19, 2022

घाचर घोचर: विवेक शानबाग

Ghacher Ghochar: Vivek Shanbhag
प्रसिद्ध कन्नड लेखक विवेक शानबाग यांची Ghacher Ghochar ही कादंबरी वाचायला घेतली. श्रीनाथ पेरूर यांनी ह्या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केला आहे. विवेक शानभाग यांची आज पर्यन्त कथेची ५ पुस्तके, २ नाटके आणि ३ कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या असून त्या सर्व कन्नड लेखनाचे इंग्रजीत भाषांतर झालेले असल्यामुळे त्यांना जागतिक वाचक वर्ग लाभला आहे. ते स्वत: इंजिनियर आहेत आणि त्यांनी ‘देश काला’ हे कन्नड पाक्षिक ७ वर्षे संपादन केले आहे. घाचर घोचर ही ११५ पानाची सुटसुटीत असलेली एक छोटी कादंबरी अतिशय अर्थपूर्ण आणि खूप काही सांगून जाणारी उल्लेखनीय कादंबरी आहे. अनेक मोठे कादंबरीकार ५००/७०० पानाच्या कादंबऱ्या लिहितात. त्या वाचताना कंटाळा येतो आणि वेळही खूप जातो. कादंबरी अशीच सुटसुटीत असावी. विवेक शानभाग यांचा उल्लेख साहित्य जगतात Indian Chekov असा करतात हे एक विशेष. ह्या कादंबरीबद्दल जगभरच्या सर्व प्रसिद्ध वर्तमानपत्रातील कॉलम मधून समीक्षकानी तोंड भरून कौतुक केले आहे. ते वाचताना एक लक्षात आलं की एका कन्नड कुटुंबाची ही भारतीय देशी कथा जगातील विदेशी वाचकाना आवडली कशी? म्हणूनच मी ही कादंबरी वाचायला घेतली आणि मला ती खूप आवडली. ह्या कादंबरीत एक मध्यमवर्गीय छोटे कुटुंब आहे. सेल्समन असलेले पन्नाशीचे वडील, त्यांची बायको, त्यांचा एक मुलगा आणि एक मुलगी आणि एक फारसे काहीच न करणारा व अवलंबून असलेला त्यांचा एक भाऊ. अशी माणसं आपण आजूबाजूच्या कुटुंबात पहात असतो. त्यांचं जगणं हे तसे सर्व सामान्य माणसासारखे असते. आर्थिक विवंचना तर मागे असतातच. मध्यमवर्गीय कुटुंबाला भेडसावणारे आर्थिक प्रश्न नेहमीचेच असतात. त्यामुळे त्यांची तयार झालेली मानसिक वृत्ती.
पैसा कमविणे तर आलेच पण खर्च कसं भागवायचा हाच प्रमुख प्रश्न. त्यामुळे वैतागलेले कुटुंब. त्यांचा ध्यास असतो अधिक पैसे मिळवण्याचा. मध्यमवर्गीय जीवनातून जायचे असते उच्च मध्यमवर्गीय जीवनाकडे. व्हायचे असते Neo Rich. अशी ही भारतीय कुटुंबाची कथा विदेशी वाचकाना का बरे आवडली असावी? विवेक शानभाग ह्यांच्या कादंबरीला हे असंख्य वाचक कसे आकर्षित झाले असतील? ते त्यांना जमलं आहे ह्याचे कारण त्यांची सुरेख भाषाशैली. गोष्ट सांगण्याची त्यांची पद्धत. सामान्य माणसाच्या स्वभावातील उकलून दाखविलेले धागेदोरे. सामान्य माणसांच्या सुखदु:खातील प्रसंग वर्णने. वाचक नकळत कादंबरीतील पात्रात गुंतत जातो. त्याला ही आपल्या अवती भोवतीची ओळखीची माणसं वाटू लागतात. तो त्या पात्रातून आपल्या आजूबाजूच्या माणसाचा शोध घेऊ लागतो. ही माणसं जगभर तशीच असतात. त्यामुळे वाचकाला आपण ही त्यापैकी एक आहोत असे वाटू लागते, वाचक माणूसशोध करत कादंबरी वाचत जातो. वाचकाला कथेत कसे गुंतवायचे हे विवेक शानबाग यांना फार छान जमले आहे. ह्या कादंबरीत लेखकाने मांडल्या आहेत त्या कुटुंबाच्या आर्थिक समस्या. एके ठिकाणी ते लिहितात.. “It is true what they say – it is not who control money, it is the money that controls us. When there is only a little , it behaves meekly; when it grows, it becomes brash and has its way with us”. पैशाबद्दल मांडलेले हे एक सत्य. हे आपल्याला लक्षात येते. कनिष्ठ मध्यमवर्गातील माणसं जेव्हा उच्च मध्यमवर्गीय आयुष्य जगू लागतात तेव्हा त्यांना पैसा वेगळा दिसू लागतो. त्यांची खर्च करण्याची प्रवृत्ती बदलू लागते. पैसा आपले जीवन बदलून टाकतो आहे, हे लक्षात येऊ लागते. छोट्या चाळीच्या घरातून जेव्हा कुटुंब दोन मजली बंगल्यात राहायला जाते तेव्हा त्यांची Life Style बदललेली असते. माणसं बदललेली असतात. जगण्याचे नवे स्वातंत्र्य त्यांना बदलून टाकते. त्यांची मने बदललेली असतात. ह्या कादंबरीचा नायक म्हणजे त्या कुटुंबातील मुलगा आपल्याशी संवाद साधत असतो. त्याला माहीत असते की त्याने काहीही विशेष प्रयत्न न करता तो त्याच्या काकाच्या छोट्या उद्योगामुळे कंपनीचा संचालक झालेला आहे. आणि काहीही काम न करता कंपनीकडून भरपूर पगार घेत आहे. तसा तो एकाकी जीवन जगत असल्यामुळे तो रोज एका कॉफी हाऊसमध्ये जाऊन वेळ काढताना तेथील वेटर बरोबर गप्पा मारीत आपले मन मोकळे करीत असतो. बायको असूनही तो तिच्याबरोबर बोलू शकत नाही. त्याची घटस्फोट घेतलेली बहीण ही असेच दुर्दैवी एकटेपण भोगीत असते. अकाली नोकरी गेलेले वडील आपल्या भावाबरोबर छोटासा उद्योग उभा करण्यासाठी नोकरी गेल्यानंतर मिळालेला फंड भांडवल म्हणून भावाच्या व्यवसायात गुंतवतात आणि काहीच न करणाऱ्या मुलाच्या पोटापाण्याची व्यवस्था करतात. त्यांचा भाऊ मिळालेल्या भांडवलामुळे व्यवसाय सुरू करतो आणि त्याचा धंदा जोरात चालतो. त्यामुळे कुटुंबाकडे पैशाचा ओघ सुरू होतो. हा पैसाच त्यांचे जगणे बदलून टाकतो. अशी ही कौटुंबिक यशाची आणि अपयशाची सामान्य कहाणी. विवेक शानभाग हीच कहाणी नाट्यमय पद्धतीने आपल्याला सांगत असतात. तशी ही एक साधी कुटुंब कथा. कुटुंबातील माणसांच्या मनात चाललेले द्वंद. कादंबरीकार हे कुटुंबनाट्य आपल्यासमोर उभे करतो. आपण ह्या पात्रात नकळत गुंतत जातो. अशी ही कादंबरी तुमचीआमची. The New Yorker मध्ये ह्या कादंबरीवर लिहिताना समीक्षक लिहितो, “It is a classic tale of wealth and moral ruin and a parable about capitalism and Indian Society”. Kirkus Reviews writes,“A compact novel that crackles with tension.’ Suketu Mehta says, “ Vivek Shanbhag is an Indian Chekov”. *****

Tuesday, August 9, 2022

कमला मार्कंडेय: Nectar in a Sieve

पार्थ हा माझा नातू. अलीकडेच आम्हाला भेटण्यासाठी दिल्लीहून बंगलोरला जाताना मुंबईला आमच्याकडे आला. तो दिल्लीला एस.आर.सी.सी.मध्ये पदवी शिक्षणासाठी होता. त्याचे वाचन तूफान. लिहितोही खूप छान. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व. गप्पा मारताना त्याला सहज विचारले, ‘अलीकडे कोणती पुस्तके वाचली आहेस?’. त्याने लगेच बॅगेतून काही पुस्तके काढून माझ्यासमोर ठेवली आणि मी ती पुस्तके चाळू लागलो. त्यात इंग्रजी कथा-कादंबऱ्या होत्या. मी फार थोड्याच गाजलेल्या इंग्रजी कादंबऱ्या वाचल्या असतील. माझे जे काही वाचन झाले आहे ते शाळा-महाविद्यालयात असतानाच. नंतरच्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात मला दीर्घ कादंबऱ्या वाचने वेळे अभावी तसे कठीणच होते . गेल्या दहा वर्षात वाचन हाच माझा विरंगुळा आहे. पार्थची पुस्तके चाळताना Nectar in a Sieve हे कमला मार्कंडेय ह्यांचे पुस्तक वाचायला घेतले आणि एका बैठकीत वाचून टाकले. पुस्तकाच्या मलपृष्ठावर शशी थरूर ह्यांनी ह्या लेखिकेविषयी जे लिहिले आहे ते विशेष लक्षवेधी होते. ते लिहितात, ‘कल्पना मार्कंडेय ह्या ब्रिटिश भारतीय लेखिकेने भारतीय लेखकांना इंग्रजी कथा-कादंबऱ्या लिहिण्यास प्रोत्साहित केलं’. Nectar in a Sieve ही कादंबरी त्यांनी १९५४ लिहिली. भारतीय ग्रामीण जीवनावर इंग्रजीत लिहिलेली ही कादंबरी जगभर लोकप्रिय व्हावी, हे ह्या लेखिकेचे मोठेच कर्तृत्व आहे आणि त्यामुळे इतर भारतीय लेखकांना इंग्रजीतून लिहिण्यासाठी स्फूर्ती मिळणे साहजिकच आहे. जगातील १७भाषेतून ही कादंबरी भाषांतरीत झालेली आहे आणि तिचा खप वीस लाखाहून अधिक झालेला आहे. अशी ही लोकप्रिय कादंबरी आहे.
कल्पना मार्कंडेय (१९२४-२००४) ह्या म्हैसूरच्या एका मध्यमवर्गीय मध्व कुटुंबातील. त्यांनी मद्रासच्या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी मिळविली आणि पत्रकारीतेत काही वर्षे काम केलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे १९४८साली त्या इंग्लंडला गेल्या आणि तेथेच स्थाईक झाल्या. Taylor ह्या लेखक/ पत्रकाराशी त्यांचा विवाह झाला. १९५३साली त्यांनी ही पहिलीच कादंबरी लिहिली आणि त्यांना भरपूर प्रसिद्धी आणि यश मिळाले. त्यांच्या दहा कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या कथाही खूप गाजल्या. एक Indian Novelist in English असा American Library Association Notable Book in 1955 सन्मान त्यांना मिळाला. म्हैसूर जवळील एका खेड्यात नाथन हा भातशेती करणारा एक शेतकरी. त्याच्या कुटुंबाची ही दर्दभरी कहाणी. १९४८-५१चा तो काळ. एका गरीब दरिद्री कुटुंबाचे ते हलाखीचे ते दिवस. नाथन, त्याची बायको रुक्मिणी, तिची मुलगी इरा आणि पाच भाऊ. ह्यांची ही कहाणी. त्याकाळचे ते ग्रामीण जीवन. मी ही कादंबरी वाचू लागलो तेव्हा मला आठवली ती व्यंकटेश माडगूळकरांची ‘बनगरवाडी’ ही कादंबरी. दक्षिण महाराष्ट्रातील ती मानदेशी माणसं. भातशेती करणारा नाथन जेव्हा वाचू लागलो तेव्हा मला आठवले ती श्री. ना. पेंडसे ह्यांची ‘तुंबाडचे खोत’ ही कादंबरी आणि कोकणातील ती माणसं. बनगरवाडी हे पुस्तक आम्हाला अकरावीला नॉनडिटेल म्हणून अभ्यासक्रमात होते. त्यामुळे त्याचा खूप बारकाईने अभ्यास केला होता. हे दोन्हीही लेखक आणि कल्पना मार्कंडेय हे एकाच काळातले. (१९२०-२००९). कमला मार्कंडेय म्हैसूरच्या तर व्यंकटेश माडगूळकर दक्षिण महाराष्ट्रातील. पेंडसे कोकणचे. ह्या तीनही कादंबऱ्यातील पात्रे आणि जनजीवन हयात खूपच साम्य आहे. गरीबी तर सर्वत्रच तशीच होती आणि आजही आहेच. कोकणातला खोत असो का म्हैसूर जवळच्या खेड्यातला नाथन असो. दोघांचेही जगणे सारखेच. प्रश्न ही तसेच. माणसंही तशीच. दारिद्र्य आपण नेहमीच सर्वत्र बघतो. सर्वच भारतीय कुटुंबाचे जगणे तसे सारखेच. ही माणसं आपल्या रोजच्या जीवनात आपण जवळून पहात असतोच. असं असूनही कमला मार्कंडेय ह्यांची ही कादंबरी पुढे वाचवीशी वाटते. अशा विषयावर अशी कादंबरी लिहून जगातील वीस लाखाहून अधिक वाचकांना आकर्षित करणे तसे सोपे नाही. ते एक आश्चर्यच आहे. अशा कादंबरीकडे लक्ष वेधून घेणे सोपे नाही. हे त्यांना कसे जमले असेल असा मी विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात आलं ते ह्या लेखिकेचे भाषासामर्थ्य! तशी ही कादंबरी ही प्रेमकहाणी नाही किंवा तरुणांचे मनोरंजन करणारी एखादी गोष्टही नाही. आपण ही कादंबरी वाचत राहतो ह्याचे प्रमुख कारण म्हणजे ह्या लेखिकेचे भाषावैशिष्ट्य. साधीसोपी भाषा असली तरी इंग्रजी भाषेतील शब्दांचे वेगळे सौन्दर्य. व्यक्त करण्यासाठी वापरलेले असंख्य इंग्रजी शब्द. ते आपल्याला अपरिचित असले तरी वाक्यरचनाच इतकी सुरेख आणि बोलकी की आपण ही कादंबरी पुढे वाचत जातो. ह्या कादंबरीतील नाथन, रुक्मिणी, इरा ही आपण पाहिलेली आपल्या आजूबाजूचीच माणसं. आपल्याच जीवनातील. त्यांच्या भावभवना ह्या आपल्याच असतात. आपल्याच जवळच्या माणसांच्या असतात. विशेष म्हणजे जगातील वीस लाख वाचकाना ही माणसं आणि त्यांची दु:खे आपली वाटावीत हेच खूप काही सांगून जातं. Nectar in Sieve हे कादंबरीचे नाव कमला मार्कंडेय हयानी घेतले आहे ते Samuel Taylor Coleridge ह्यांच्या १८८५ च्या “World Without Hope” ह्या एका कवितेतून. तसं हे नाव खूपच बोलकं आहे आणि खूप काही सांगून जातं. ह्या मथळ्याचा अर्थ असा.. “Hope or Sweetness in Life (Nectar म्हणजे अमृत). It is difficult to hold on to almost like trying to carry in Sieve(Strainer). Nectar म्हणजे मध, मधुरस, मकरंद – मधमाश्या फुलातून गोळा करतात तो मध. Sieve म्हणजे चाळणी / गाळणी. ह्याचा थोडक्यात अर्थ असा की आपल्या ह्या दरिद्री जीवनातील मध (म्हणजे आनंद) गोळा करून जगणे. हेच नाथन- रुक्मिणी आपल्याला सांगत असतात. खरं म्हणजे रुक्मिणीच आपल्याशी बोलत असते. कमला मार्कंडेय आपल्याशी बोलत असतात ते रुक्मिणीच्या संवादातून. त्या एके ठिकाणी म्हणतात, “Change I had known before, and it had been gradual. But the change that now came into our life, into all our lives, blasting its way into our village, seemed wrought in the twinkling of an eye”. असे हे खूप समर्पक शब्द. अशी शब्दाची उधळण त्यांच्या भाषेतील सौंदऱ्यातून जागोजागी दिसून येते. ह्या कादंबरीत नाथन कुटुंबाच्या दारिद्र्याचे भयानक दर्शन उभे केले असले तरी आशेच्या पाठीमागे जाऊन नवा मार्ग शोधणारी रुक्मिणी लक्षात राहते कारण समोर येणाऱ्या नव्या निराशेचे ढग बघून पुनः निराश होण्याची वेळ आली तरी न डगमगणारी ती वेगळी स्त्री आहे. आहे नाही ते गमावल्यानंतर काहीच हाताशी नसताना जगायचे कसे हे सांगणारी रुक्मिणी- नाथन आणि त्यांच्या कुटुंबाची ही कहाणी दर्दभरी आहे तशीच खूप काही सांगणारी आहे.
*****  

Sunday, May 22, 2022

त्रिपर्ण - मोनिका गजेंद्रगडकर

देशी – विदेशी – अदेशी कथासंग्रह
खूप मोठ्या म्हणजे ४०-५० पानाच्या दीर्घकथा वाचायचा मला फार कंटाळा आहे. फार मोठ्या कादंबऱ्या वाचण्याइतकेच ते अवघड काम आहे. मला लघुकथा आवडतात. थोडक्यात लिहिणारे काही लेखक तसे खूप काही सांगून जातात. मोनिका गजेंद्रगडकर ह्यांच्या काही कथा मी दिवाळी अंकातून वाचल्या होत्या. त्या एक आघाडीच्या कथाकार आहेत, हे मला माहीत आहे. त्यांचे ‘त्रिपर्ण’ हे कथेचे पुस्तक माझ्या हाती आलं. तीनच कथा असलेले हे पुस्तक. त्यातील २४ पानांची त्यामानाने छोटी असलेली ‘फ्लेमिंगो’ ही कथा प्रथम वाचावयास घेतली. ती आवडली. देशी-विदेशी माणसांची ही कथा. एका एन.आर.आय. असलेल्या माणसाची आणि त्याच्या छोट्या कुटुंबाची ही दर्दभरी कहाणी. ४०-५० वर्षापूर्वी परदेशी स्थलांतरीत झालेल्या अनेक भारतीय कुटुंबातील ५-१० कुटुंबात तरी अशा कथा ऐकावयास मिळतात. अशा एन.आर.आय.चे वृद्ध मातापिता आपल्या आजूबाजूलाच रहात असतात. त्यांच्या दु:खाची आपल्याला थोडीशी कल्पना असते. सुरवातीला शिक्षणासाठी गेलेले हे भारतीय तेथे पैसा आणि प्रतिष्ठा मिळविल्यानंतर तेथील विदेशी मुलीबरोबर संसार थाटतात. पहिली काही वर्षे ते भारतात आई-वडिलांना भेटायला येतात. आई-वडिलही एक-दोनवेळा त्यांच्याकडे जाऊन येतात व आपल्या मुलाच्या कर्तृत्वावर खूश होतात. तेथील संसारात रमलेला हा मुलगा नंतर वृद्ध आई-वडिलांच्याकडे फारसे लक्ष देत नाही. हे तर आपण आजूबाजूला पहात असतोच. ह्या कथेतील असाच एक भारतीय मुलगा. त्याचे दुर्दैव;आणि तो तरुण वयातच जातो. त्याला सॅम नावाचा एक मुलगा असतो. त्याची आई तिकडलीच असते. आणि अचानक सॅम् आणि त्याची आई सॅमच्या आजोबा-आजीला भेटायला भारतात येतात. तो आजोबा-आजीला एक सुखद धक्काच असतो. सॅमसारखा परक्या भूमीत रुजलेला हा मुलगा फ्लेमिंगोसारखा स्थलांतर करून आजोबा-आजीला भेटायला भारतात येतो. आपल्या वडिलांचे मूळ शोधायला तो येतो खरा; पण ते शोधताशोधता त्याला स्वत:चे स्वत्व गवसते. त्याचीच ही आपल्या मनाला चटका लावणारी कहाणी. ही कथा मला आवडली म्हणून पुस्तकातील इतर दोन कथा मी वाचल्या. मोनिका गजेंद्रगडकर ह्या आपल्या कथातून डोरोथी, इसाबेला, जेसी, केटी ह्या परदेशी स्त्रियांच्या व्यक्तिरेखा छान रेखाटतात. मानवी नात्यातील गुंतागुंत शोधताना तेथील मूल्यांचा त्या शोध घेताना दिसतात. एन.आर.आय. जेव्हा तेथील जीवनात स्थिरस्थावर होत असतात तेव्हा नकळत त्यांच्या जीवनात तेथील विदेशी स्त्रियांचा प्रवेश होतो आणि तेथील भिन्न संस्कृतीमुळे त्यांच्यात जगण्याचे नवे ताणतणाव निर्माण होतात. त्यामुळेच त्यांच्या नातेसंबंधात अनेक अडचणी निर्माण होतात. रंग आणि वंश यांच्यातील भेदामुळे जगण्याचे नवे प्रश्न निर्माण होतात. जगातील वर्णभेद फक्त जातीभेदाच्या पोटातून जातात असे नाही. त्याचे उच्चाटन हे होऊ नं शकणाऱ्या एखाद्या रक्तपिपासू, जिवट रोगासारखे असते. ‘वंश’ ह्या कथेतून हेच विदारक सत्य लेखिकेने मांडलं आहे. हे मांडताना कथेतील पात्रांच्या जीवनावर झालेले असंख्य चरे आपल्याला सहज दिसून येतात. ही परदेशी स्थाईक झालेली मुलं आणि त्यांचे इकडे स्वदेशात मदतीशिवाय वृद्धापकाळात जगणारे आई-बाप. हे आजच्या कुटुंब व्यवस्थेतील दु:ख. ह्या भोवतीच ही कथा फिरते. हे दु:ख माणसाचं वयही झटकन पिकवते! वृद्धापकाळातील शारीरिक दुखण्याची नस त्यांना पकडता येते; पण त्यांना झालेल्या मानसिक आजारांची नस आपल्याला पहायला मिळत नाही. मोनिका गजेंद्रगडकर ह्यांनी तीच नस पकडून सुंदर कथा निर्मिती केली आहे. ‘रिलेशनशिप’ हा विषय समजून घेताना त्या एक कथा सांगत जातात. आयुष्यभरासाठी असणाऱ्या रिलेशनशिपला ती संपताक्षणी तिच्या जागी दुसरी रिलेशनशिप उभी करणे हा काही मानवाच्या दु:खावरचा पर्याय नसतो. हेच सांगण्यासाठी त्यांनी ‘सारांश’ ही कथा लिहिली आहे. ही कथा खूप मोठी असली तरी आपण वाचत जातो आणि आपल्या लक्षात येतं की ह्या कथेतील आईला आठवणीवर जगताना असं वाटते की आठवणीनाही असतो एक मूर्त चेहर असतो! त्यालाच चिकटून आहे आपलं जगणं! ह्याच कथेत मोनिका गजेंद्रगडकर कृष्ण आणि जीझस ह्या दोन देवतामधील फरक सांगताना लिहितात.. कृष्ण आणि जीझस दोन्ही गॉड, बट लॉट ऑफ डीफरन्सेस. कृष्ण हसरा, प्रसन्न. त्याचा मुकुटही प्रेशीअस. आणि जीझस ऑलवेज सॅड, ही लूक्स डाऊन आणि कृष्णाची नजर समोर .. तुमच्याकडे पाहणारी .. तरी जीझसच्या वाट्याला त्याच्या जन्मापासून एक काटेरी मुकुट आला .. दु:खवेदनेचा.. दूतच होता ना तो देवाचा! .. जगातल्या सगळ्यांच्या वाटच्या यातना ओळखून त्याने आपल्या मुकूटात त्या एकेका काट्याच्या रूपात खोवून घेतल्या असतील कृष्णाच्या मोरपिसासारख्या! किती सुंदर व्यक्त झाली आहे ही लेखिका! तरीही ती म्हणून जाते .....नाही सापडत माणूस आपल्याला .. माणूस शोध आपण घेत जातो. ह्या तीन दीर्घ कथातून ,,, त्यातील पात्रातून.. कारण ती पात्रे आपल्या आजूबाजूचीच असतात.. ती तुमची-माझी जवळची माणसं असतात .. ही लेखिका ‘सारांश’ ह्या कथेत म्हणते .. आपला जन्म म्हणजे माणूस असण्याचा सुरू झालेला प्रवास .. नि मृत्यू म्हणजे प्रवासाचा अंत नाही, तर मोक्ष! देहमुक्ती .. सगळ्यांच्या पलीकडे पोहोचणे .. स्पर्शापलीकडे, जाणिवापलीकडे आणि ‘स्व’पलीकडे. माणसं गमावण्याचा शाप आपल्याला मिळाला आहे .. हे सांगताना मोनिका गजेंद्रगडकर आपल्याला गीतेचा ‘सारांश’ सांगतात .. गीता म्हणजे .. एक संवाद आहे. कृष्णाने केलेला .. माणसाच्या आयुष्याबद्दलचा, माणसाच्या वाटेला आलेल्या दु:खशोक – यातनांचा, त्याच्या कर्माचा – धर्माचा, भक्तीचा आणि जन्म-मृत्युचाही. गीता तत्व आहे, संगती आहे आणि आत्मशोधाच्या वाटेने घेऊन जाणारा दीपस्तंभही .. गीतेचे हे सार.... ‘सारांश’ ह्या कथेला एक ऊंची देते. मला ह्या तीन कथातून दिसणारी ही देशी-विदेशी-अदेशी माणसं .. खूप काही सांगून जातात आणि मी समजून घेतो जगण्याचा नवा अर्थ. ( मौज प्रकाशन - मार्च २०२१)

Thursday, May 19, 2022

‘थेरॅनॉस’ ‘सिलिकॉन व्हॅलीतील साहसी फसवणूक’

‘थेरॅनॉस’ ‘सिलिकॉन व्हॅलीतील साहसी फसवणूक’ - अतुल कहाते सिलिकॉन व्हॅली म्हणजे जगाला डिजिटल वर्ल्ड बनविणारी एक अनोखी वसाहत. अॅडम फिशर ह्यांचे Valley of Genius हे पुस्तक मी वाचले होते. त्या पुस्तकामुळे सिलिकॉन व्हॅलीत नवे उद्योजक कसे निर्माण होतात ह्याची माहिती झाली होती. अतुल कहाते ह्यांचेी ‘थेरॅनॉस’ हे पुस्तक वाचनालयात चाळत होतो. ‘सिलिकॉन व्हॅलीतील साहसी फसवणूक’ अशी पुस्तकाच्या मथळ्याखालील ओळ वाचली आणि हे पुस्तक वाचण्यासाठी निवडले. हा कादंबरीकार आय.टी.तज्ञ. १७ वर्षाचा अनुभव. अनेक आय.टी. कंपन्यात विविध पदावर काम केलेला. ४०००पेक्षा अधिक ब्लॉगचे लेखन केलेला. अतिशय जवळून ह्या क्षेत्रातील उद्योजकाना भेटलेला. त्याचे पुस्तक म्हणजे भन्नाट असणार अशी खात्री होती. हे पुस्तक एका दमात वाचून टाकले आणि आय.टी. क्षेत्रातील म्हणजे सिलिकॉन व्हॅलीतील फसवणूक करणाऱ्या उद्योजकाचे एक वेगळे विश्व समोर दिसले. जिनिअस माणसे ही सुद्धा फसवणूक करणारे उद्योजक कशी होतात?, ह्याची कहाणी म्हणजे हे पुस्तक. स्टीव्ह जॉब्स आणि बील गेट्स हे दोघे आय.टी. मधील तंत्रज्ञ मंडळींचे आदर्श. त्यांच्यासारखे आपणही उद्योजक व्हावे असे अनेक तंत्रज्ञ आणि इंजिनीअर लोकाना वाटणे साहजिक आहे. रोल मॉडेल असलेली ही मंडळी. एलिझाबेथ अॅन होम्स ही वॉशिंग्टन डीसीत ९ ते ५ नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय माणसाची एक हुशार मुलगी. स्टीव्ह जॉब्सच्या कर्तृत्वामुळे खूप प्रभावित झालेली. ‘इनोव्हेशन’चा ध्यास असलेली. नवे तंत्रज्ञान निर्मितीसाठी प्रयत्नशील असलेली. उद्योजक होण्याचे स्वप्न पाहणारी. अशी ही एलिझाबेथ. तिला निर्मिती करावयाची असते रक्त चाचण्याशी संबंधित एक छोटे यंत्र बनविण्याची. त्यासाठी ती सिलिकॉन व्हॅलीतील अतिशय हुशार तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञांची नेमणूक करते. त्यासाठी सिलिकॉन व्हॅलीतील छोट्यामोठ्या गुंतवणूकदारांना गाठते. नावाजलेल्या डॉक्टरांची आणि औषधकंपन्यांशी संपर्क साधते. अशी ही अतिशय हुशार तरुणी फसवणूक करणारी अट्टल गुन्हेगार कशी होते, त्याची कथा म्हणजे ‘थेरॅनॉस’ ही कादंबरी. हाताच्या बोटाला हलके सुई टोचून क्रेडिट कार्डाच्या आकाराच्या पांढऱ्या डबी सारख्या वस्तूवर रक्ताचे थेंब गोल करायचे. ती छोटी डबी प्रिंटर कार्टेज सारखी यंत्राच्या खाचेत बसवून रक्ताच्या विविध चाचण्याचे निष्कर्ष काढायचे. ते यंत्र संगणकाला जोडायचे आणि रिपोर्ट डॉक्टरपर्यन्त सहज पोहोचवायचे. असे यंत्र बनविण्यासाठी प्रयत्नशील असणारी एलिझाबेथ. ती स्टँफर्ड विद्यापीठाची प्रेसिडेंट स्कॉलर. थेरपी आणि डायग्नोसिस पासून तयार झालेला शब्द म्हणजे ‘थेरॅनॉस’. अशा रक्तचाचणी यंत्र निर्मितीतून औषधक्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचे स्वप्न पाहणारी एक उद्योजिका. कार्टेज आणि रीडर ह्यावर एडिसन हे यंत्र निर्मिती करण्याचा उद्योग उभारण्याचा प्रयत्न करणारी एलिझाबेथ. हे उभे करताना ती अनेक हुशार तंत्रज्ञाना आपल्या कंपनीत खेचून आणते. त्यांना आकर्षित करते. तिला सनी बलवानी सारखा मोठमोठ्या गप्पा मारणारा एक सहकारी मिळतो तसेच चेलसीसारखे गुणवंत सहकारी मिळतात. विचारवंत आणि कृतीशील माणसेच नवनिर्मिती करू शकतात हे खरे आहे; पण हे मोहमयी जग तितके सरळ नाही. आणि माणूस नकळत बदलतो आणि तो फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारी विश्वात कधी प्रवेश करतो हेच लक्षात येत नाही. मग तो निर्माण करतो एक Evil Empire. एलिझाबेथ असे विश्व निर्माण करते. एलिझाबेथला सहकारी तर चांगले मिळतात. पण तिच्या विचित्र स्वभावामुळे कोणीही तिच्या कंपनीत २-३ वर्षापेक्षा अधिक टिकत नाही. नव्याचा ध्यास असलेले हे सहकारी येतात आणि निघून जातात. ते तर सिलिकॉन व्हॅलीचे वैशिष्ट्य आहे. अशा छोट्या कंपनीसाठी हवे असतात भांडवल पूरविणारे गुंतवणूकदार. सिलिकॉन व्हॅलीत असंख्य असे असंख्य गुंतवणूकदार आहेत. अल कॉर्न ह्या भांडवल पूरविणाऱ्या उद्योजकाने स्टीव्ह जॉब्सला नव्वद दिवसाची मुदत असलेला करार करून क्रेडिट अकाऊंट काढून दिले होते. त्याप्रमाणेच गूगलचे निर्माते पेज आणि ब्रिन ह्याना Andy Bechtolsheim सारखा पैसे गुंतवणारा भांडवलदार मिळाला आणि त्याने आस्तित्वात नसलेल्या “Google Inc,” अशा कंपनीच्या नावाने मोठ्या रकमेचा चेक देऊन नवी कंपनीच चालू करून दिली. एलिझाबेथला गुंतवणूकदार कसे मिळवायचे हे चांगलेच अवगत होते. तिने अनेक गुंतवणूकदाराकडून असेच पैसे उभे केले. Fast – Faster – Fastestचे वेड असणारे हे तंत्रज्ञ. त्यांना उभे करावयाचे असते आपले साम्राज्य. शौनक रॉय आणि मोझलीसारखे तिचे सहकारी एलिझाबेथ ही फसवणूक करून उद्योग उभा करते आहे, हे लक्षात आल्यावर तिला सोडून जातात. एलिझाबेथ वॉलग्रीन सारख्या औषधकंपनीला सहज गुंडाळते. राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध ठेवण्यातही ती चांगलीच तरबेज असते. फसवे गिरी कशी करावयाची, संचालक मंडळात अधिकारी कसे निवडायचे, मोठमोठ्या कंपन्याना कसे आकर्षित करावयाचे, मार्केटिंग आणि सेल्समध्ये तज्ञ असले की गंडा कसा घालायचा हे तिला चांगलेच माहीत होते. अशी ही एलिझाबेथ. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’चा शोधपत्रकारिता करणारा जॉन क्यारिरू हा पत्रकार कुप मोठा धोका पत्करून फसवणूक करणाऱ्या एलिझाबेथच्या मागे लागतो आणि तिच्या उद्योगाचे भांडं कसं फोडतो हे वाचताना आपण एक थरारपट पहात आहोत असे वाटते. त्यामुळे ही कादंबरी आगळीवेगळी झाली आहे. एलिझाबेथ आणि सनी बलवानी ह्यांच्या दिवास्वप्नामुळे निर्माण झालेला फसवणुकीचा डाव उघडकीला आणला तो क्यारिरू ह्या पत्रकाराने. सिलिकॉन व्हॅलीचा आपल्याला माहीत नसलेला हा एक दूसरा चेहरा. एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारी ही कादंबरी. आय,टी./ तंत्रज्ञान क्षेत्रात पैशाच्या मागे लागून फसवणूक करणारे अनेक लोक आहेत हे पाहिले म्हणजे सिलिकॉन व्हॅलीचा हा पैलू आपला भ्रमनिरास करतो. ही कादंबरी अवश्य वाचा आणि हे जग ओळखून घ्या,