Wednesday, August 2, 2017

THE DRAMATIC DECADE

आज राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार . प्रणव मुखर्जी निवृत्त होणार. भाजपला युपीमध्ये घवघवीत यश मिळालं नसतं तर त्यांना विरोधी पक्षाला मान्य असलेला राष्ट्रपती उमेदवार निवडावा लागला असता. त्यावेळी प्रणव मुखर्जी ह्यांना प्रथम पसंती मिळाली असती. मोदी ह्यांनी प्रणव मुखर्जी ह्यांचे अनेकदा कौतुक केले असून प्रणव मुखर्जी ह्यांनीही मोदींचे आणि त्यांच्या पॉलिसीचे तोंडभरून कौतुक केले आहे . त्यांच्यात तणाव नव्हता असे दिसून येते. 
काही दिवसापूर्वी त्यांचे आत्मचरित्र वाचले . बंगालच्या राजकारणात स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर मुस्लिम संख्येचे असलेले महत्व ह्यावर त्यांनी विस्ताराने लिहिलेलं आहे. त्यावर मी लवकरच माझ्या ब्लॉगवर लिहिणार आहे.
निवृत्त झाल्यानंतर प्रणव मुखर्जी मोदींच्या कार्यकालावर काय लिहितील हे समजून घेण्यासाठी मी अधिक उत्सुक आहे. बघूयात ते काय लिहितात ते.
आजही असे वाटते की डॉ मनमोहन सिंग ह्यांच्या ऐवजी प्रणव मुखर्जी पंतप्रधान झाले असते तर काँग्रेसला आजचे दिवस आले नसते . किमान युपीए-२ च्या काळात ते पंतप्रधान होणे सहज शक्य होते .

राजकारणातील घडामोडी आपण रोज वर्तमानपत्रातून वाचत असतो . पत्रकार त्यांच्याजवळच्या पुड्या सोडतच असतात . राजकीय विश्लेषक त्यांचे अभ्यासपूर्ण लेख छापतच असतात . अग्रलेखातून प्रतिक्रिया समजतच असतात . गप्पामध्ये राजकारणावर चर्चा चालूच असते .ह्या सर्वाहून अधिक स्फोटक असते ते राजकारणातील व्यक्तींचे चरित्र - आत्मचरित्र . पी व्ही नरसिंहराव ह्यांनी Insider ही कादंबरी लिहिली पण ते त्यांचे आत्मचरित्रच अधिक आहे . संजय बारू ह्यांनी डॉ मनमोहन सिंग ह्यांच्या सहवासातील क्षण टिपताना पंतप्रधानांचे राजकीय जीवन लोकांच्या पुढे आणले . ही दोन्ही पुस्तके राजकारणाची दशा आणि दिशा समजावून सांगणारी होती . प्रणव मुखर्जी ह्यांचे ' The Dramatic Decade ' हे पुस्तक हातात पडलं आणि वाचताना तो सर्व काळ आठवू लागला . आपलं ज्ञान वर्तमानपत्रातील माहितीवरचे . ह्या व्यक्तीने तर ते राजकीय जीवन जगलेलं . स्वतःचे अस्सल अनुभव . राजकारणाची गुंतागुंत पूर्ण माहित असलेली ही व्यक्ती राजकीय गुंता कसा सोडवायचा ह्यातच तद्न्य . राजकीय शक्तिकेंद्राची एक शक्ती . राजकारणात मानलेल्या नेतृत्वाला लॉयल असणारी आणि म्हणूनच प्रभावी असणारी व्यक्ती . रूढार्थाने तळागाळातून वर आलेली लोकप्रिय राजकीय व्यक्ती नव्हे . केवळ बुद्धी सामर्थ्यावर राजकारणात स्थिर असलेली ही राजकीय व्यक्ती . आत्मचरित्रात सगळंच काही लिहायचं नसतं .त्यामुळे ते वाचताना आपणच शोधून काढायचं असतं . नेमकं काय काय झालं असेल त्यावेळी ? दिल्लीच्या राजकारणात प्रदीर्घ काळ ज्यांनी घातला आहे त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला बघायला मिळतं . हाच मोठा वाचन अनुभव . इंदिरा गांधी ह्यांच्याबद्दल अधिकरवाणीने दुसरा कोण सांगणार ? मोरारजी - चरणसिंग - जगजीवनराम ह्या त्रिकुटातील सत्तेतील भांडणे त्यांनीच जवळून पाहिलीत . जॉर्ज फर्नांडिस आणि मधू लिमये ह्यांनी जनता प्रयोग अयशस्वी करण्यासाठी कसा हातभार लावला . राजनारायण ह्यांनी संजय गांधींच्या बरोबर कसा संपर्क साधून जनता पार्टीत खिंडार पाडले . यशवंतराव आणि शरद पवार ह्यांच्या इंदिरा विरोधी राजकारणामुळेच काँग्रेसमध्ये फूट पडण्यास वेग आला पण त्यांना दिल्ली जिंकता आली नाही . देवराज उर्स ह्यांनी इंदिरा गांधी ह्यांना दक्षिणेतून विजय मिळवून दिला आणि त्यांना वाटू लागले की आपणच खरे नेते . शेवटी त्यांना राजकारणातून संपवण्यासाठी कसे प्रयत्न करावे लागले . हे सर्व वाचताना भारतीय राजकारण कसे चालते ह्याची झलक वाचायला मिळते . ही राजकीय मंडळी छोटी वाटू लागतात . शेवटी माणूस असाच असतो . सत्तेचे राजकारण असेच असते . नरसिंहराव ह्यांची 'इनसायडर' ही कादंबरी अधिक मनोरंजक झाली आहे . ह्या आत्मचरित्रातून व्यत्तिचित्रे मात्र अधिक ठळक दिसू लागतात . त्यातील खरं - खोटं मात्र शोधनं आवश्यक आहे . कारण लिहिणार्याची दृष्टी एकांगी असू शकते .

No comments:

Post a Comment