Thursday, August 3, 2017

ओळख सियाचेनची

ग्रंथालीने प्रकाशित केलेले अनुराधा गोरे ह्यांचे ' ओळख सियाचेनची ' हे पुस्तक हाती आले . थोडेसे चाळले आणि लक्षात आले की हे पुस्तक वाचायलाच हवे . मला हिमालयाची ओढ आहे . तो मला सारखा खुणावत असतो . मनाली ते लेह हा प्रवास केला तेव्हा हिमालयाची विविध रूपे पाहीली . लेह ते नुब्रा व्हॅली हा प्रवास तर अवर्णनीय होता. नुब्रा व्हॅलीला सियाचेनच्या प्रवेश द्वारापर्यंत गेलो तेव्हाच सियाचेनला जाणे किती कठीण असेल ह्याची कल्पना आली होती . उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर नुब्रा व्हॅलीला जाणेच इतके कर्म कठीण . अलीकडे बीएसएफ मुळे रस्ते आहेत आणि सैनिकी चौक्या आहेत म्हणून तरी ह्या भागात प्रवास करता येतो . गिर्यारोहकांचे ठीक आहे . आपल्यासारख्या सामान्य प्रवाशाला हा सर्व प्रवास करणे तसे अशक्यच . १२ महिने सियाचेन ह्या ८० किलोमीटर लांब व २० हजार फूट उंचीवरील हिमनदीवर चौकी करून पहारा करणे किती कठीण . त्याचीच कहाणी सांगणारे हे पुस्तक . एका बाजूला पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला चीन असलेला हा काराकोरम पर्वतीय प्रदेश . आपण हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत असं भारताचे वर्णन करतो . त्या ऐवजी काराकोरम ते कन्याकुमारीपर्यंत असंच म्हणायला पाहिजे . सियाचेन हा भारताचा उत्तरेकडील सर्वात शेवटचा भू प्रदेश .
काश्मीर प्रश्नाचा गुंता १९४७ पासून सुटलेला नाहीच .ह्या पुस्तकात काश्मीर प्रश्नाचा इतिहास इतका व्यवस्थित मांडला आहे की जो वाचल्यानंतर आपल्या राज्यकर्त्यांनी केलेल्या असंख्य चुकांमुळे हा प्रश्न आज अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे हे लक्षात येते .


१९४७ साली पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर पाकिस्तानच्या सैनिकांनी ब्रिटिश सेनाधिकारी ह्यांच्या सहकार्याने गिलगिट - कारगिल ह्या सिंधू नदीच्या आजूबाजूने दौड करीत लेह काबीज केले होते . त्यावेळी आपले दिल्लीश्वर गाफीलच राहिले होते आणि जीनांच्या आक्रमक लष्करी कारवाया चालूच होत्या . काश्मीरचा हिंदू राजा हरिसिंग जेव्हा हतबल झाला तेव्हा मदतीसाठी धावला पण शेख अब्दुल्ला स्वतंत्र काश्मीरचे स्वप्न बघत दोन्ही डग्र्यावर पाय रोवित होते .ह्या पुस्तकातील एका प्रकरणात काश्मीरचा सर्व इतिहास संक्षेपाने लिहिला आहे . तो वाचणे आणि समजून घेणे फार महत्वाचे आहे . हा इतिहास जितका महत्वाचा आहे तितकाच ह्या भागाचा भूगोल . काश्मीर - सियाचेन - लेह लडाख - अकसाई चीन ह्या भूभागाची पूर्ण माहिती समजून घेतल्याशिवाय तेथील लष्करी कारवाई समजणे अवघड आहे . हा ह्या पुस्तकाचा मुख्य विषय आहे . अतिशय अभ्यासपूर्ण माहिती असलेले हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला आपल्या संरक्षण प्रश्नाविषयी अधिक जाण होते . वेळ काढून अवश्य वाचावे असे हे पुस्तक .
आपल्या सेनाधिकाऱ्याला रस्त्यावरचा गुंड म्हणणारे माजी संसद सदस्य व अनेक वर्षे राज्य करणारा त्यांचा पक्ष . ह्या लोकांना ह्या भागातील संरक्षणाच्या प्रश्नांची जाण नसल्यामुळेच ते अशी विधाने करतात हे आपले दुर्भाग्य . त्यांनाच शत्रूच्या तोफेच्या तोंडी देण्यासाठी सियाचीनच्या चौकीवर पाठवले म्हणजे कळेल लष्करी नेतृत्व म्हणजे काय असते ते ?
ह्या पुस्तकावर विस्ताराने खूप लिहिण्यासारखे आहे . वेळ काढून वाचा एव्हढेच सांगावेसे वाटते . ह्या पुस्तकाचा इंग्रजी आणि हिंदी अनुवाद झाला तर ते अधिक लोकांपर्यंत पोहचेल असे वाटते .

No comments:

Post a Comment