Saturday, June 21, 2014

सुखाशी भांडतो आम्ही ....


“ एक धागा सुखाचा , शंभर धागे दु:खाचे”, हे गाणे आपण अनेक वेळा ऐकले आहे. जीवनाचे सार अगदी थोड्या शब्दात सांगितले आहे. सुखाच्या शोधात आपण जीवन प्रवास करीत असतो. हे जग दु:खाचे माहेरघर आहे असेच आपल्याला वाटत असते. आपल्या हे लक्षात येत नाही की आपली एक इच्छा पुरी झाली तर दहा अतृप्त असतात. इच्छा अनंत असते. पण परिपूर्ण इच्छापूर्ती मर्यादित असते. भिकाऱ्याला भीक घालावी तसा प्रकार असतो. आजची भिक्षा त्याला जिवंत ठेवते पण त्याबरोबरच उद्या अधिक दु:ख भोगायला जिवंत ठेवते. आपलेही तसेच आहे.
   जोपर्यंत आपण इच्छेचे गुलाम आहोत ,तोपर्यंत शास्वत सुख-शांती कोठली ? आणि इच्छापूर्तीने तृप्ती थोडीच मिळत असते. नव्या इछेचा जन्म झालेला असतो.

    माणसाला ध्येय असावे , “ ध्येयविना जीवन म्हणजे पंखविना पाखरूं”, असे म्हणतात. पण ध्येयाला ध्येयप्राप्तीइतके हानिकारक दुसरे काहीही नसतं, हे आपल्या लक्षात येत नाही. आपणास जितके अधिक यश मिळत जाते तितके आपले जीवन रसहीन व कंटाळवाणे होत जाते.एखादी भारी चिंता आपल्या छातीवरून दूर झाली तर दुसरी एखादी चिंता तेथे येऊन बसते. जागा रिकामी होताच ही चिंता तेथे घुसतेच.
   असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला आवश्यक इतके दु:खाचे माप प्रकृतीने एकदा निश्चित करून टाकलेले असते. तो पेला कधी रिकामा होणार नाही किंवा भरलेला आहे त्याहून अधिक भरला जाणार नाही . हे आपल्या लक्षात येतच नाही. दारिद्र्य ही बहुजन समाजाची जशी कायमची व्यथा आणि डोकेदुखी बनून राहते तशी जीवनाविषयीची नीरसता व कंटाळवाणेपणा उच्चभ्रू व विलासी जगाची व्यथा आणि डोकेदुखी होऊन बसते. मध्यमवर्गाच्या जीवनात ही नीरसता आठवडी सुट्टीच्या दिवशी व्यक्त होते व ते विरंगुळा शोधण्यासाठी घराबाहेर पडतात.
    हे जीवन दुरीतमय आहे , कारण दु:ख हेच जीवांचे मुलभूत यथार्थ स्वरूप आहे.म्हणूनच ज्ञानेश्वरांनी “ दुरितांचे तिमिर जावो” अशी प्रार्थना केली. दु:खातूनच प्रेरणा मिळते . Pain is basic stimulus and reality.  सुख म्हणजे दु:खाचे केवळ थांबणे असते. सुख अभावरुप असते. दु:खाचा अभाव म्हणजे सुख. आपण सुखाच्या शोधात नसतो तर चिंता आणि दु:ख यातून मुक्ती कशी मिळेल ते शोधत असतो. म्हणूनच आपण सुखासाठी भांडत असतो. बहिणाबाईनी अतिशय सोप्या शब्दात सांगितले आहे......
  
  अरे संसार संसार दोन जीवांचा विचार 
  देतो सुखाला नकार आणि दु:खाला होकार 

    गरज व दु:ख जावून माणसाला विसावा मिळतो न मिळतो तेव्हड्यात त्याच क्षणी निरुत्साह व कंटाळवाणेपणा येतो. आणि हा कंटाळाच त्रासदायक होऊन बसतो. मग कंटाळ्याचाही कंटाळा येतो. आपण निराशवादी होतो. Frustation kills us. त्यासाठी आपण करमणूक पाहतो. टीव्ही , सिनेमा बघत बसतो. कसलातरी विरंगुळा शोधतो. त्यात मन रमले नाहीतर आपणास जीवन नीरस वाटू लागते. एकंदर जीवन दु:ख आणि कंटाळा ह्यांच्यामध्ये लंबकाप्रमाणे  मागे-पुढे हेलकावत असते.

  मनुष्याला जितके अधिक स्पष्ट व स्वच्छ ज्ञान  , तो तितका अधिक बुद्धिमान तितके त्याला दु:ख अधिक जाणवते. जो आपले ज्ञान वाढवितो, तो आपले दु:खही वाढवतो. आपल्या दु:खाचा बराचसा भाग काल्पनिक असतो. वैचारिक असतो. भूतकाळ आठवून आणि भविष्यकाळाचे पुर्वचिंतन करून आपण दु:खी होत असतो. प्रत्यक्ष मरणापेक्षा मरणाच्या कल्पनेने , विचाराने आपण दु:खी होत असतो. जीवन म्हणजे झगडा . एक लढाई आहे. झगडा , लढाई , स्पर्धा , जय , पराजय ह्यांनी आपले जीवन व्याप्त झालेले असते आणि तेच दु:खाचे कारण असते . "आशावाद म्हणजे माणसाच्या दु:खावर डागणी आहे , दु:खाची ही क्रूर चेष्टा आहे" असे शोपेन हॉवर ह्या तत्ववेत्त्याचे म्हणणे होते. हे काहीसे निराशवादी वाटते.

     कोणत्याही साहित्यात म्हणजे कथा –कादंबरी – नाटकात सुखासाठी धडपड करणाऱ्याचे चित्रण असते. अनेक अडचणी आणि आपत्तींना तोंड देऊन ध्येय गाठणाऱ्या नायकाचे चित्रण असते. आणि त्याला जेव्हा पाहिजे ते मिळाले त्याठिकाणी नाटक–कथा संपते. दुसरे काही करावयाचे नसते . आणि तो सुखांत आपल्याला भावतो.
    गमंत आहे. आपण लग्न करून दु:खी असतो तर काही जण लग्न नं केल्यामुळे दु:खी असतात. आपण एकटे असलो तरी रडतो व चारचौघात असलो तरी रडतो. आपले एकंदर जीवन पाहू तर ती तशी शोकांतिकाच असते. पण जीवनातील बारीक सारीक गोष्टी पाहू तर ती सुखात्मिका असते हे आपल्या लक्षात येत नाही. त्यासाठी आपण आनंदाचे झाड शोधायचे असते.  तरुणांना वाटते की प्रयत्न करणे , इच्छा करणे , बाळगणे , धडपडणे यात आनंद असतो. इच्छा कधी तृप्त होत नसतात. आपण “आणखी आणखी “च्या मागे लागत असतो. त्याला सीमा नसते. तृप्ती ही निरर्थक असते , हे आपल्या लक्षात येतच नाही. उत्साह , उन्माद आणि जोर आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. जीवन किती थोडे आहे ह्यासाठी आपण अधिक जगले पाहिजे असे वाटत राहते आणि आपण भावी संकटाच्या भीतीमुळे वाढत्या वयाबरोबर मालमत्ता जमवू लागतो. आपल्याला हाव सुटते. स्वार्थ वाढतो. आणि पुन्हा निराशा आपल्या  पदरी पडते. हे म्हातारपण कठीण असते. मनुष्य हा इच्छा व ज्ञान ह्याचे मिश्रण आहे. आणि इच्छा हेच दु:खाचे मूळ आहे. त्यासाठीच सिद्धार्थ हिमालयात गेला व ज्ञान प्राप्त करून इच्छामुक्त झाला. हे सगळ्यांनाच जमत नसते. ज्ञानाने इच्छाचे नियमन करणे त्याला जमले. तो स्वतःवर नियंत्रण करणारा अंतर्यामी होता. सर्वांनाच ते जमत नसते. म्हणून आपण सामान्य माणसे  सुखाशी भांडत असतो. आपण वासनामय जास्त व फार थोडे ज्ञानमय असतो. 

   आनंदाचा स्त्रोत आपल्या अंतरंगात आहे हे आपल्या लक्षातच येत नाही म्हणून आपण दु:खी असतो. आणि सुखासाठी भांडत असतो. त्यामुळे “एक धागा सुखाचा आणि शंभर धागे दु:खाचे” असे आपल्याला वाटत राहते व आपले सुखाशी भांडण चालूच राहते.

संदर्भ : पाश्चिमात्य तत्वज्ञानाची कहाणी : सानेगुरुजी

(संपर्क : drnsg@rediffmail.com)  


  


No comments:

Post a Comment