Thursday, October 3, 2024

Crossing to Talikota: Girish Karnad

विजयनगरचे साम्राज्य 

गिरीश कर्नाड यांचे खिळवून ठेवणारे इंग्रजी नाटक “Crossing to Talikota” – हे पुस्तक हाती पडले आणि एका दमात वाचून काढले. माझा नातू पार्थ कुलकर्णी याने ते पुस्तक वाचायला दिले. “ आजोबा, तुम्हाला हे नाटक आवडेल. मी त्या नाटकाचा प्रयोग नुकताच पाहिला आहे. मला तो आवडला म्हणून मी हे पुस्तक विकत घेतले. तुम्हाला आवडेल. अवश्य वाचा.”, असे त्याने जोरात संगितले व पुस्तक देऊन गेला. मी पूर्वी त्याच्याशी बोलतांना विजय तेंडुलकर आणि गिरीश कर्नाड यांच्या नाटकासंबंधी  अनेकदा बोललो होतो. ते त्याच्या लक्षात असावे. मागच्या वर्षीच तो इंग्लंड मध्ये LSE ला शिक्षणासाठी गेला होता तेव्हा त्याने  तेथून जवळच असलेल्या नाट्यगृहातील अनेक नाटके पाहिली होती. त्यामुळे त्याची नाट्यजगताची जाण खूप वाढली होती. त्याने त्यामुळे हे नाट्य पुस्तक वाचायला दिले.

गिरीश कर्नाड हे माझे आवडते नाटककार. हयवदन हे त्यांचे गाजलेले नाटक मी पाहिले होते. मुंबईच्या प्रयोगिक रंगभूमीवर तेंडुलकर आणि कर्नाड यांची नाटके खूप गाजत होती. त्यावेळी तेंडुलकर-कर्नाड या दोन नाटककारांनी  राष्ट्रीय नाट्यक्षेत्रात एक क्रांती घडवून आणली होती.

धारवाडच्या विद्यापीठातून कर्नाड हे गणित विषयात पदवीधर झाले. त्यांना Rhodes Scholarship मिळाली व ते Oxford ला पदव्युत्तर शिक्षणासाठी गेले. तत्वज्ञान, अर्थशास्त्र व राजकारण हे त्यांचे आवडते विषय. ते पुढे जर नाटककार झाले नसते तर एक गणितज्ञ किंवा अर्थशात्रज्ञ झाले असते. त्यांना त्याचवेळी होमी भाभा शिष्यवृत्ती मिळाली व त्याच वेळी त्यांनी प्रकल्प संशोधनासाठी हयवदन हे नाटक लिहून काढले. ते प्रसिद्ध नाटककार म्हणून कन्नड रंगभूमीवर गाजू लागले. ते नुसते नाटककार नव्हते तर चांगले नट होते. ते प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. त्यांनी कानडी भाषेला व रंगभूमीला समृद्ध केले. त्याचमुळे Film and Television Institute of India आणि संगीत नाटक अकादमी या संस्था त्यांच्या अधिकाराखाली आल्या व त्यांनी आपला राष्ट्रीय ठसा उमटविला. लंडनच्या भारतीय वकिलातीच्या नेहरू सेंटर मधील त्यांचे कार्य लक्षवेधी होते. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात ते नाट्यशास्त्राचे प्राध्यापक होते. त्याच वेळी नागमंडल हे त्यांचे नाटक खूप प्रसिद्ध झाले. त्या नाटकाच सुंदर प्रयोग मी मुंबईत पाहिला होता. The Dream of Tipu Sultan  हे नाटक ही खूप गाजले.

तालिकोटाची लढाई म्हणजे विजयनगरचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी यवनांनी केलेले महायुद्ध. ज्यांनी हम्पी बघितले आहे त्यांना ह्या युद्धाची कल्पना येईल. कृष्णदेवरायाच्या काळात हम्पी ही विजयनगरची राजधानी होती. आज आपण हम्पीला भेट देतो तेंव्हा आपल्याला कल्पना येते की विजयनगरची राजधानी असलेले हे शहर खूप सुंदर शहर होते. चालुक्क्यांनी दक्षिण भारतात आपले प्रस्थ निर्माण केले होते. विजयनगरचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचे मनसुबे यवनांनी रचले होते. आदिलशाही, कुतुबशाही व निझामशाहीच्या राज्यकर्त्यांनी विजयनगरचे साम्राज्य धुळीला मिळवण्यासाठी एकी केली होती. त्यासाठीच तालिकोटाची लढाई झाली. ह्यावर लिहिलेले हे नाटक. तसं हे नाटकाचे पुस्तक ७६ पानाचे आहे. कर्नाड यांनी हे अतिशय सोप्या व सुंदर भाषेत लिहिलेले नाटक वाचतांना आपण विजयनगरचे साम्राज्य यवनांनी कसे धुळीस मिळविले हे समजून घेतो.

नाटक बघणे आणि वाचणे यात खूप फरक आहे. मी हे पुस्तक वाचायला घेतलं आणि समोर हम्पीचा तो परिसर आठवू लागलो. मी हम्पीला दोन वेळा भेट दिली असल्यामुळे मला विजयनगरच्या साम्राज्याची व त्या इतिहासाची थोडीशी माहिती आहे. हे पुस्तक वाचत गेलो आणि हे नाट्यवाचन  करीत असताना त्या काळात रमत गेलो. ते एक युद्धं होते व त्या काळातील विजयनगरची लढाई कशी झाली असेल व हम्पी आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर त्या वेळी कसा असेल? तो उज्वल इतिहास कसा नष्ट झाला असेल हे चित्र समोर उभे रहात होते. आज हम्पीचे जे अवशेष दिसतात त्यावरुन त्या सुंदर राजधानी असलेल्या शहराची कल्पना येते. मन उद्विग्न होते व विजयनगरच्या त्या काळातील वैभवाची कल्पना येते.

गिरीष कर्नाड यांनी नाटकातील संवादातून उभे केलेले चित्र त्यावेळच्या राजकारणाची माहिती देत असते व ती व्यक्तिचित्रे आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात.

विजापूरचा अली आदिल शहा, अहमदनगरचा हुसेन निझाम शहा, बिदरचा अली बरीद शहा आणि गोलकोंड्याचा इब्राहीम कुतुबशहा या चार यवनी सत्ता एकत्र येवून विजयनगरचे साम्राज्य कसे उद्ध्वस्त करतात आणि विजयनगरचा आलिया रामराया कसा मारला जातो हे दृश्य डोळ्यासमोर उभे राहते. त्यावेळी सेनापति असलेले वेंकटाद्री आणि तिरूमला राया हे राजाचे धाकटे बंधू युद्ध कसे हरतात ते दिसून येते. मुख्य म्हणजे विजयनगरचा सम्राट सदाशिव राया हा एक काठपुतळी राजा (पपेट सम्राट) असतो. रामरायाची आई तिरूमलांबा आणि पत्नी सत्यभामा ह्या दोघी स्त्रिया त्यावेळच्या राजकारणात प्रमुख भूमिका बजावताना दिसतात. यवनी सत्तेतही हुसेन निझाम शहाची पत्नी बेगम हुमायून सुलताना ही राजकारणात तरबेज असते व प्रमुख भूमिका बजावत असते. ह्या नाटकात वरील पात्रामध्ये होणारे संवाद आपल्याला त्यावेळच्या युद्ध परिस्थितीची ओळख करून देतात. कर्नाड यांनी या पात्रांच्या होणार्‍या संवादातून आपल्यापुढे त्यावेळचे युद्ध उभे केले आहे. त्यात त्यांचे यश दिसून येते. चित्रपटात तसे करणे सहज शक्य असते. रंगभूमीवर युद्ध कसे सादर करणार ?

ह्या नाटकातील संवाद लक्षवेधी तर आहेतच. या संवादातूनच आपणास त्यावेळच्या यवनी सत्तेची कारस्थाने आणि हिंदू राजांच्या मनोवृत्तीचे दर्शन होत जाते. तेथे कर्नाड यशस्वी झाले आहेत.

ह्या नाटकाचा पहिला प्रवेश थोडासा कंटाळवाणा वाटतो व नाटक पुढे  वाचावे की नाही असा प्रश्न मला पडला. ह्या प्रवेशात आपणा समोर येतात ते दोन शिपाई आणि युद्धमुळे गर्भगळीत झालेले दोन सामान्य लोक. त्याच वेळी घरात लपून बसलेली एक स्त्री रणरागिणी होते व त्या दोन शिपायांचे मुंडके उडविते.

विजापूरच्या अली आदिल शहाला हिंदू राजांच्या बरोबर युद्ध नको असते. व तो प्रत्यक्ष युद्धात भाग ही घेत नाही. शेवटी नाईलाजाने अहमद नगरच्या निझाम शहा, बिदरचा बरीद शहा व गोळकोंड्याचा कुतुबशहा यांच्या युतीत तो सामील होतो. विजयनगरच्या राम रायाची विजापूरच्या अली आदिल शहा बरोबर चांगली मैत्री असते. राम रायाला फारसे अधिकार नसतात. कारण तो विजयनगरचा वंशज नसतो. ती एक शोकांतिका असते.

तिरूमला राया आणि सत्यभामा यांच्यातील संवाद विजयनगरच्या राजघराण्यातील अनेक गोष्टींचा उलगडा करतात. सदाशिव राया हा पपेट सम्राट असतो तर राम राया वंशज नसल्यामुळे राजा होऊ शकत नाही. सत्यभामा ही वंशज असली तरी मुलगी असल्यामुळे राज सिंहासनावर हक्क सांगू शकत नाही व तिचा नवरा राम राया राजा होऊ शकत नाही. आदिल शहा व राम राया यांच्यातील संवाद अनेक गोषतीचा उलगडा करतात पण सत्यभामाला राजकारणाची जी जाण आहे ती राम रायाला नाही. ती त्याला पटवून देण्यात मात्र यशस्वी होते. अहमदनगरच्या निझामाची बेगम ही सूदधा राजकारणात  पारंगत असते. पण निझाम शहा तिच्या शब्दाला किंमत देत नाही. स्त्रियांना राजकारणातील काय कळते ? असा त्याचा विचार असतो. असे असून सूदधा विजापूरच्या अली आदिल शहाला जवळ करण्यासाठी निझाम शहाची बेगम आपली मुलगी चांदबिबी हिला आदिल शहा ला देण्याचा विचार मांडते व तिची खेळी यशस्वी होते व आदिल शहा हा शहा गटात सामील होतो. ती राजकीय खेळी यशस्वी होते.

एका प्रवेशात राम राया, वेंकटाद्री आणि तिरूमला राया यांची बोलणी चालू असतात. तो संवाद कृष्णदेव रायाच्या शत्रूंची माहिती देत असतो. परंतु राजाने राम रायालाच कसे दू:खी केले याची चर्चा करतो. चालुक्य युगात बदल घडवून आणण्यासाठी राम राया त्याच्या हालचाली सुरू करून स्वता:कडे साम्राज्याच्या किल्ल्या कशा राहतील याचीच कारस्थाने करताना  

दिसतो. एका प्रवेशात बरीद शहा, निझाम शहा, आदिल शहा आणि कुतुब शहा यांच्यातील संवाद खूप महत्वाचे आहेत. तेथेच विजयनगरच्या साम्राज्याला खाली खेचण्यासाठी युद्धनीती तयार होते. हा नाट्यप्रवेश अतिशय महत्वाचा आहे. राजकारणाची कूटनीती कशी असते वा असावी हे आपल्यासमोर येते.

आदिल शहा कॅम्प व निझाम शहा कॅम्प मध्ये काय ठरते हे संवडातून उभे करताना विजय नगरचे साम्राज्य लवकरच नष्ट होणार याची जाणीव आपल्याला होते. नाटककाराने हे चांगले उभे केले आहे.

शेवटच्या प्रवेशात रूमी खान राम रायाचे मुंडके कसे उडवितो व विजयनगरचे साम्राज्य यवनाच्याकडे कसे जाते हे चित्रित केले आहे.

विजयनगरचा अस्त कसा होतो यावर आधारलेले हे नाटक म्हणजे तालिकोटची लढाई. Ruthless Ambition, Cast and Religious Conflict, Family Intrigue and Betrayal  म्हणजेच तालिकोटची लढाई – विजयनगर साम्राज्याचा अस्त. कृष्ण देव रायाचा जावई  असलेला राम राया हा विजयनगरचा सम्राट होऊ शकला नाही. तो खरा राजकारण धुरंधर होता. त्याने विजयनगर वर आपली सत्ता गाजवली पण तो लोकांचा राजा झाला नाही. तो अप्रियच होता कारण त्याच्या रक्तात राजघराण्याचे रक्त नव्हते.

या नाटकात गिरीश कर्नाड यांनी उभी केलेली ही व्यक्तीचित्रे सुंदर आहेत. विजयनगर साम्राज्याचा तो वैभवकालीन इतिहास त्यांनी सुंदर पद्धतीने सादर केला आहे. त्यामुळे हे नाटक प्रभावी झाले आहे. त्या वैभवशाली इतिहासाला त्यांनी रंगभूमीवर त्यांच्या शब्द सामर्थ्याने उभे केले आहे. असेहे प्रभावी नाटक. नाट्यप्रयोग देखणा झाला असेलच.

*****


Saturday, September 14, 2024

गीतारहस्य

 लोकमान्य टिळकांचे “गीतारहस्य”

गजानन महाराजांचा आशीर्वाद


गणेशदादा खापर्डे हे अमरावतीचे बडे गृहस्थ. त्यांना लोक अनभिषिक्त राजाच समजत असत. त्यांची इंग्रजांच्या काळातील भारताच्या स्वातंत्र्याची व नव्या राष्ट्रनिर्मितीची तळमळ भारतीय लोकांनी ओळखली होती. त्यांच्यावर लोकांचे अलोट प्रेम होते. लोकांचा खूप लोभ होता. ह्या खापर्डे साहेबावर संत गजानन महाराजांचा वर्दहस्त होता. त्यामुळे त्यांना त्यांच्या कार्यात अपयश कधीच आले नव्हते. खापर्डे ह्यांचे अगदी जवळचे मित्र म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. खापर्डे यांच्यामुळेच टिळक आणि गजानन महाराज यांची नुसती ओळखच झाली नाही तर त्यांनी टिळकावर कृपाप्रसाद केला. त्यांना आशीर्वाद दिला. ज्या प्रमाणे भगवंत श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवदगीतेचा उपदेश केला व त्या गीतेमुळे जगाला थक्क करून सोडले, तसेच कार्य टिळकांच्या हातून होणार हे गजानन महाराजांच्या लक्षात आले होते. पार्थ जरी देवाचा भक्त होता तरी त्यालाही वनवास सहन करावा लागला होता. भगवंताचे प्रेम असूनही अर्जुनाचा वनवास चुकला नाही. अगदी तसेच टिळकांचे झाले. इंग्रजांच्या राजवटीत लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्यलढ्यासाठी मंडालेच्या तुरुंगात जावे लागले. त्या मंडालेच्या कोठडीतच राहून टिळकानी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला आणि तो आबालवृद्धानी मान्य केला. त्यावेळी लोकमान्य टिळकांना गजानन महाराजांनी कोल्हटकरांच्या हस्ते भाकरीचा प्रसाद पाठविला. तो प्रसाद टिळकांना मुंबईत मिळाला खरा. लोकमान्य टिळकांनी गीतेवर लिहिलेले हे सहावे भाष्य होते. त्यातील पहिले भाष्यकार होते आद्य शंकराचार्य. दुसरे भाष्यकार होते रामानुजाचार्य. मध्वस्वामी होते तिसरे भाष्यकार तर वल्लभ गुरु होते चौथे भाष्यकार. पांचवे भाष्यकार होते ज्ञानेश्वर माऊली. त्यांनी नंतर भावार्थदीपिका हा टीकाग्रंथ ही लिहिला. त्यानंतर दोन-तीन जणांनी टीकाग्रंथ लिहिले खरे! पण त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची सर कसली येणार!


ज्ञानेश्वरानंतर गीतेचा खरा अर्थ – कर्मज्ञान – सांगीतले ते लोकमान्य टिळकांनी. गीतारहस्य हा सहावा महान ग्रंथ. गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वाद असल्यामुळे लोकमान्य टिळकांनी तो ग्रंथ पूर्ण केला, असे म्हणतात ते खरे आहे.   

संदर्भ : संतकवी श्री दसगणू विरचित श्री गजानन प्रार्थना स्त्रोत्र श्लोक १३ ते २९

 *****

Wednesday, August 28, 2024

शेगांव: गजानन महाराज समाधी स्थळ

 


आळंदी, पैठण, देहू,आष्टी, तेर

तैसा तो साचार सज्जनगड

अरण, मंगळवेढे, संताची ही गावे

तैसेच लेखावे शेगावला

कोणत्याही अंशी फरक नाही यांत

शेगांव साक्षात संतभूमी

संतकवी दासगणू महाराज  यांनी अतिशय साध्या, सुंदर आणि काव्यमय शब्दात श्री गजानन विजय ग्रंथ लिहून संतपुरुष गजानन महाराजांचे चरित्र लिहिले. ती काव्यमय भाषा इतकी साधी आणि सोपी आहे की त्याच ओवी वापरुन मी हा लेख लिहिला आहे. मी शेगांवला समाधी स्थळ बघितले आणि आजूबाजूचा सुंदर परिसर बघितला आणि थक्क झालो. सिटी बँकेचे माजी चेअरमन विक्रम पंडित यांचे नांव ऐकले होते. त्यांनी शेगांवच्या गजानन महाराज समाधी मंदिर विकासासाठी ३५० कोटी रुपयांची भरघोस देणगी दिली होती. त्या वेळच्या ट्रस्टच्या संचालकांनी केवळ १७ कोटी रुपयांची देणगी स्वीकारली व बाकीचे पैसे पंडितांना परत केले. हे भव्य आणि सुंदर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर हा गजानन भक्तांच्या पैशातून उभा राहिला आहे, हे विशेष.  येथील भव्य प्रसादलयात रोज ४५००/ ५००० गजानन भक्तांना प्रसाद म्हणून जेवण दिले जाते. हे वैशिष्ठ्य. ही व्यवस्था आणि तेथील सेवेकरी बघून आपल्याला आश्चर्यच वाटते. येथे देशाच्या कानाकोपर्‍यातून भक्तगण येतात , त्यांच्यासाठी सुंदर निवास संकुले बांधली आहेत. हे संस्थान विदर्भातील सर्वात मोठे मंदिर ट्रस्ट आहे.

जें जें काही ब्रम्हांडात|
तें तें तुझें रुप सत्य|
तुझ्यापुढे नाही खचित|
कोणाचीही प्रतिष्ठा|

गजानन महाराज वयाच्या 30व्या वर्षी १८७८च्या फेब्रुवारी महिन्यात २३ तारखेला शेगावला दिसले. हा दिन प्रकट दिन म्हणून पाळतात. ते महान संत होते. भक्तिमार्गाने देवापर्यंत पोहोचता येते हा संदेश त्यांनी दिला.


तूंच काशी विश्वेश्वर|
सोमनाथ बद्रिकेदार|
महांकाल तेवि ओंकार|
तूंच की रे त्र्यंबकेश्वरा|

भीमाशंकर मल्लिकार्जुन|
नागनाथ पार्वतीरमणI
श्री घृष्णेश्वर म्हणून|
वेरुळगावी तुंच कीं |
तूंच परळी वैजनाथ|
निधीतटाला तूंच स्थित|
रामेश्वर पार्वतीकांत|
सर्व संकट निवारता|

गजानन महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग आत्मज्ञान देणारे मार्ग आहेत हे भक्तांना संगितले. ते शुद्ध ब्रम्ह होते. एक परमहंस सन्यासी होते. ते पराकोटीचे जीवनमुक्त संत होते म्हणूनच ते दिगंबर अवस्थेत असत.

तुला काय करणे यासी|

चिलीम भरावी वेगेसी|

नसत्या गोष्टीसी|

महत्व न द्यावे |

पादुका, पादत्राणे त्यांनी कधीच वापरली नाहीत.  क्वचित ते चिलीम ओढत त्या चिलीमीवरून ते ओळखळे जात असत.

ते फेब्रुवारी १८७८मध्ये शेगाव मध्ये अचानक प्रकट झाले आणि त्यानंतर ते शेगावचे संत झाले. गजानन महाराज हे गांजा आणि चरस यांचे प्रमुख वापरकरते  होते. त्यांच्या अनेक प्रतिमा मधून हे दिसून येते. काही भक्त त्यांना समर्थ रामदासचे रूप मानतात. काही भक्त त्यांना अक्कलकोट स्वामी समर्थांचे जवळचे शिष्य मानतात. दोघेही परमहंस आणि अजानबाहू होते. ते एकाच स्त्रोतापासून घेतलेल्या वेगवेगळ्या रूपांचे प्रतिनिधित्व करतात असे म्हणतात.

गजानन महाराज म्हणजे कर्म, भक्ती आणि ज्ञान योगाचे खरे प्रतिपादक.


तूं वृंदावनी श्रीहरी|
तूं पांडुरंग पंढै|
व्यंकटेश तूं गिरीवरी|
पुरीमाजी जगन्नाथ|
द्वारकेसी नंदनंदन|
नाम देती तुजकारण|
जैसे भक्तांचे इच्छील मन|
तैसे तुज ठरविती|

ते दरवर्षी भक्तांच्या बरोबर पंढरपूरला जात असत. त्र्यंबकेश्वरला ही जात असत. ब्रम्हगिरी पर्वतावर अनेकदा जाने असे. हरी पाटील यांच्याबरोबर बरोबर ते पंढरपूर ला गेले तेंव्हाच त्यांचा पंढरपूरला समाधी घेण्याचा विचार होता. परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेंगावला समाधी घेतली.

 


गजानन जें स्वरूप कांही|
तें तुझ्याविण वेगळें नाहीं|
दत्त भैरव मार्तंड तेही|
रुपे तुझीच अधोक्षजा|
माघमासी सप्तमीस|
वद्यपक्षीं शेगांवांत|
तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष|
पंथाचिया माझारी|
उष्ट्या पत्रावळी शोधन|
तुम्हीं केल्या म्हणून|
मिळालें कीं नामाभिधान|
पिसा पिसा ऐंसे तुम्हा|

बंकटलाल अग्रवाल या  सावकाराने २३ फेब्रुवारी १८७८ रोजी गजानन महाराजांना अचेतन अवस्थेत रस्त्यावर फेकलेले अन्न खातांना पाहिले. तो सामान्य माणूस नव्हे, हे त्यांच्या लक्षांत आले व त्यांनी त्याला आपल्या घरी रहण्यास संगितले. त्याच वेळी गजाननाने चमत्कार केला आणि जानराव देशमुखांना जीवदान दिले. तो त्यांचा पहिला दैवी चमत्कार
बंकटलालाचे सदनास|
तुम्ही राहिला कांही दिवस|
तेथे जानराव देशमुखास|
मरत असतां वांचविले|

तुंबा बुडेल ऐसें पाणी|
नव्हतें नाल्यालागुनी|
विश्वास ठेवोनिया वचनीं|
ऐसे केलें पितांबरे|

कोरडी विहीर पाण्याने भरणे, हाताने उसांचा काढणे, कुष्ठरोग बरा करणे, असे अनेक चमत्कार करणारे गजानन महाराज शेगांवचे झाले.

तुझें स्वरुप यथातथ्य|
मानवासी नाही कळत|
म्हणून पडती भ्रमांत|
मायावश होऊनी|


जानकीराम सोनार
द्यावयास कुरकुर|
करूं लागला असे कीं|
स़ोनार विस्तव देण्याला |
नाही ऐसे वदला|
म्हणूनिया येता झाला|
राग भगवंताकारणे|
चिलीम विस्तवांवाचून|
पेटूनिया दाविली|
चिंचवणें तें सोनाराचें|
नासले अक्षय तृतीयेंचें|
प्राणघातक किड्यांचे|
झाले त्यांत साम्राज्य|
अवघे टकामका पाहती|
एकमेका सांगती|
हे चिंचवणे खाऊं नका!.....
हे बघून चरण धरीलें
सोनाराने
तुम्ही चिंचवण्यासी लाविले करा..
चिंचवणे तेची झाला झरा|
अमृताचा विबुधह़ो|
जानकी शरण आला
बंकटलाले आपणासी
नेले खावया मक्यासी
मोहळे होती मळ्यांत
मधमाश्यांची भव्य सत्य
लोक करिती पलायन
तुम्ही मात्र निर्धास्त
कांही वेळ  गेल्यावरी
तुम्हीच आज्ञा केली खरी|
मधमाशांस जाया दुरी|
आपल्या आज्ञेनुसार|
मधमाशा झाल्या दूर|
क्षेत्र ओंकारेश्वरी
महानदी नर्मदेत
नौका फुटली अकस्मात
पाणी येऊं लागले आंत
नाव बुडू लागली
त्या नौकेत आपण होता
ऐसा प्रभाव आपला  हो
नौका कांठांसी लावली
नर्मदेनें आणूनी भली
आपणां वंदून गुप्त झाली

 लोकमान्य टिळकांनी खापर्डे यांनी त्यांना अमरावतीला भेट देण्यासाठी आमंत्रित केले होते त्यावेळी गजानन महाराजांचा आशीर्वाद घेतला. त्यावेळी गजानन महाराजांनी त्यांना संगितले की इंग्रज त्यांना कठोर शिक्षा देतील. पण तुम्ही खूप मोठे कार्य करणार आहात. त्यावेळी इंग्रजांनी टिळकांना मंडालेच्या  तुरुंगात पाठविले आणि टिळकानी त्याच तुरुंगात गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. हाच गजानन महाराज यांचा आशीर्वाद होता.  बाळ गंगाधर टिळकाला.

तुम्हीच कृपा केलीत|

संतकृपा असून

त्यांना शिक्षा झाली दारुण

ब्रम्हदेशी नेऊन|

मंडाल्याशीं ठेविले त्या

गीतारहस्य केला ग्रंथ|

मान्य झाला सार्यांना|

या शेगांवाचे भाग्य मोठे|

जरी आपण देह ठेविला|

तरी पावतसे भाविकाला|

याचा अनुभव आला सार्यांना|




शेगांवचा योगीराणा|
सर्वदा पावो तुम्हातें|
गजाननाशी मुळीं न विसरा|
त्याच्या चरणी भाव धरा|
म्हणजे जन्म सफल होई|

महाप्रसादालय


अतिशय सुंदर असा परिसर. गजानन महाराज तेथील संस्थान कार्यकर्त्यांच्या समवेत असताना सहज म्हणू गेले या जगी राहील रे. त्या पवित्र स्थळी १२ विश्वस्थ मंडळाची स्थापना झाली आणि त्यांनी हे समाधी स्थळ तर उभे केलेच पण हे भव्य संकुल उभे केले. भक्तांनी भरघोस देणग्या दिल्या. अनेक शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. आनंद सागर प्रकल्प उभा राहिला.    

गजानन महाराज ट्रस्टतर्फे होणारी ४२समाजसेवी सेवाकार्ये



संदर्भ : श्री दासगणू विरचित – II श्री गजानन विजय सार II संक्षेपकर्ता – कै. ना.श्री.आगाशे

*****