Friday, April 16, 2021

सनातन: डॉ. शरणकुमार लिंबाळे भाग -२

 

सनातन : डॉ. शरणकुमार लिंबाळे

भाग - २

सरस्वती सन्मान मिळालेली डॉ. शरणकुमार लिंबाळे ह्यांची सनातन ही कादंबरी वाचली आणि दलितांचे हजारो वर्षांचे दू:ख त्या कादंबरीतून अधिकाधिक जाणवू लागलं. लहानपणी आजोबाच्या शेतीच्या गांवी जात असे. त्यावेळी म्हणजे 60-70 वर्षापूर्वीचे ते खेडं. देशपांडे – देशमुखांचे भले मोठे दगडी वाडे. ब्राम्हण-मराठा म्हणजे सवर्ण लोकांचा तो रुबाब काही वेगळाच होता. त्यावेळी बारा बलुतेदार लोकांची ओळख झाली होती. त्यांचे होयबा जीवन समजत होतं. हे वाडे सोडून गावात इतरत्र फिरले की ती गरीबी पाहिल्यावर हे कसलं जीवन?’, असा विचार मनांत येऊन गेला होता. सनातन वाचताना ते गांव जसेच्या तसेच डोळ्यासमोर उभे राहिले. ह्या कादंबरीतील माणसे डोळ्यासमोर उभी राहिली. दलितांचे ते जगणे ज्यांनी अनुभवले किंवा जवळून बघितले तेच अशी कादंबरी लिहू शकतात. मी कादंबरी म्हणून विचार न करता लिंबाळे सरांनी जी ही कादंबरी लिहिली आहे आणि  ती लिहिताना त्यांनी जी भाष्ये केली आहेत, जे चिंतन केले आहे आणि ज्या समस्या मांडल्या आहेत त्याचा अधिक विचार करतो. त्यांचे विचार मला खूप अस्वस्थ करतात. कादंबरी वाचताना आपलं मन खिन्न करतात. ज्या सवर्ण समाजाने दलितावर आणि इतर बलुतेदार मंडळीवर वर्षानुवर्षे जो अन्याय केला आहे, तो बघून आपला भारतीय समाज गेल्या 60-70 वर्षात फारसा बदलला नाही, हेच खरे. लिंबाळे ह्यांचे कादंबरीत विखुरलेले हे विचार मी एकत्र केले आहेत. ते अतिशय महत्वाचे आहेत. त्यातून त्यांनी आपल्याशी संवाद साधला आहे. सर्व सवर्ण मंडळींनी तो एकदा वाचावा म्हणून हा प्रयत्न. सामाजिक सुधारणा झाल्याशिवाय आपल्या देशाला बरे दिवस येतील असे मला वाटत नाही. लिंबाळे ह्यांचे हे विचार अवश्य वाचा. थोडा विचार करा आणि आपला समाज सुधारण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करा , हेच आपल्या हातात आहे. ही कादंबरी शाळा – महाविद्यालयात मुलांना शिकवली पाहिजे, तरच खालील विचार नव्या पिढीला समजतील.

 (from "सनातन | Sanatan [ Marathi ] (Marathi Edition)" by शरणकुमार लिंबाळे)

सनातन मधील QUOTABLE QUOTES : वाचा आणि विचार करा आणि हा समाज बदलण्यासाठी प्रयत्न करा.

अहिंसेचा जन्म अस्पर्श समाजामुळे

"अस्पृश्यांनी युगानुयुगे सहन गेलेल्या अपार संयमातून अहिंसेचा जन्म झाला असावा. ह्या व्यवस्थेच्या तळाशी अस्पृश्य आहेत, म्हणूनच ही व्यवस्था डळमळली नाही."

मोगल-मराठे-इंग्रज आणि दलित

"उत्तर हिंदुस्थानात मोगलांचे वर्चस्व आणि दक्षिण हिंदुस्थानात मराठ्यांचे वर्चस्व होते. मोगल-मराठ्यांचा पराभव केल्याशिवाय हिंदुस्थान जिंकता येणार नाही, हे परकीयांच्या लक्षात आले होते. सन १७५७ मध्ये प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबावर विजय मिळवला आणि हिंदुस्थानात इंग्रजी सत्तेचा पाया घातला. इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला, तरी त्यालाच गादीवर बसवले आणि दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली. नवाब नाममात्र सत्ताधारी आणि इंग्रज पूर्ण अधिकारी– अशी दुहेरी राज्यव्यवस्था होती. इंग्रजांनी प्रजेची लूट केली आणि रोष मात्र नवाबाला स्वीकारावा लागला, कारण नवाब गादीवर होता."

"नोकर आणि व्यापाराचे रक्षण करण्यासाठी सैन्यभरती केली. ह्यामध्ये मोठ्या संख्येने मागास जातींतील लोक होते. इंग्रजांकडे आधुनिक ज्ञान आणि आधुनिक शस्त्रास्त्रे होती. त्यामुळे एतद्देशीय सत्ता इंग्रजांपुढे निष्प्रभ ठरल्या. एतद्देशीय सत्तांमध्ये ऐक्य नव्हते. ते आपापसात भांडत होते. जातिव्यवस्थेमुळे खालच्या जाती अस्वस्थ होत्या. इंग्रजांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. पराभूत राज्याच्या संपत्तीची अमाप लूट केली."

"मराठ्यांची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी इंग्रज, हैदराबादचा निजाम आणि टिपू सुलतान टपून बसले होते. मराठ्यांचा शेवटचा पेशवा दुसरा बाजीराव आणि इंग्रज ह्यांच्यात संघर्ष सुरू झाला होता. दुसर्‍या बाजीरावाच्या काळात मराठेशाहीची सर्व सत्ता दुसरा बाजीराव, दौलतराव शिंदे आणि यशवंतराव होळकर ह्यांच्या हाती एकवटली होती. पेशवा दुसरा बाजीराव आणि दौलतराव शिंदे ह्यांनी यशवंतराव होळकर ह्यांचा काटा काढण्यासाठी इंदूरच्या गादीवर काशीरावांना बसवले. त्यामुळे यशवंतराव होळकर आणि त्यांचे बंधू मल्हारराव होळकर व विठोजीराव होळकर चिडले. त्यांनी पेशवाईत भयंकर धुमाकूळ घातला. त्यामुळे दौलतराव शिंदे ह्यांनी मल्हारराव होळकरांच्या छावणीवर हल्ला करून त्यांची हत्या केली. भावाच्या हत्येमुळे यशवंतराव होळकर आणि विठोजीराव होळकर चिडले. त्यांनी पेशव्यांविरुद्ध बंडाळी सुरू केली. पेशव्यांचा पराक्रमी सरदार बापूराव गोखले ह्यांनी विठोजीराव होळकरांच्या छावणीवर हल्ला करून त्यांना अटक केली. त्यांना पुण्याला आणले आणि हत्तीच्या पायी देऊन ठार केले. यशवंतराव होळकरांनी माघार घेतली आणि पेशव्यांशी तडजोडीची भाषा सुरू केली.

"यशवंतराव होळकरांनी पेशव्यांचा पराभव केला. पराभूत झालेल्या पेशव्यांनी इंग्रजांकडे मदत मागितली. इंग्रजांना ही संधी हवीच होती. इंग्रजांच्या फौजा पुण्यात दाखल झाल्या. यशवंतराव होळकरांनी त्यापूर्वीच लढाई थांबवली आणि पुणे सोडले. यशवंतराव होळकर आणि इंग्रजांमध्ये लढाई न होताच हे प्रकरण निकाली लागले. ह्या बदल्यात इंग्रजांनी पेशव्यांवर वसईचा तह लादला."

"इंग्रज भारतात आले, म्हणून हिंदू धर्म वाचला; नाही तर मोगलांनी हिंदू धर्म नष्ट केला असता.’’ ‘‘पेशव्यांनी अस्पृश्यांच्या गळ्यात गाडगी बांधली; इंग्रजांनी त्यांच्या हाती बंदुका दिल्या. पेशव्यांवर इंग्रज गोळी झाडणार नाहीत, महार गोळी झाडेल."

"‘‘ब्राह्मण महाराची निंदा करतात, त्यांना शिव्या देतात; मात्र इंग्रजांजवळ प्रेमाने बसतात. आश्चर्यच आहे! शास्त्राप्रमाणे पाहिले, तर महार आपल्याला जवळचे.’’ ‘‘खिस्ती झालेला महार चालतो, हिंदू महार चालत नाही. हा हिंदू धर्म आहे.’’"

"घोडे, प्रेतांच्या हातांतील निर्जीव शस्त्रे, रक्ताने रंगलेले भीमेचे पाणी, पळ काढणारे सैनिक... पेशव्यांना आपल्या सैन्याचा पराभव होतोय, हे जाणवले. महारांनी अत्यंत निकराने आणि निधड्या छातीने पेशवाईला धूळ चारली होती. सनातनी सत्तेला नामोहरम केले होते. मराठा सैन्य पुलगावच्या दिशेने निघून गेले. पेशव्यांनी पराभूत सैन्य घेऊन कर्नाटकात घटप्रभा नदीपलीकडे पलायन केले. इंग्रजांची फौज त्यांचा पाठलाग करत होती. महारांच्या आरोळ्यांनी आसमंत दुमदुमला होता. त्यांच्यासाठी भीमा कोरेगाव ही वीरभूमी ठरली होती."

मिशनरी लोकांनी महाराना ख्रिश्चन केले तर इंग्रज राज्यकर्त्यांनी त्यांच्या हातात बंदूक दिली.

"तो शरीराने खिश्चन झाला असला, तरी मनाने महारच होता. फिलीफ (पूर्वीचा महार) झोळमध्ये लाल डोंगराच्या पायथ्यावर खिश्चन वसाहतीत राहत होता."

"फिलीफ खिश्चन झाला, सैन्यात गेला; तरी त्याची खरी ओळख महार अशीच होती."

"‘‘महार असलो, तरी धमकी; खिश्चन झालो, तरी धमकी; मुसलमान झालो, तरी धमकी! आता आपण गुंड झालं पाहिजे!’’ –वॉरन." हे दू:ख होते ख्रिश्चन झालेल्या महाराचे

"महारवाड्यापासून त्याचं सांस्कृतिक अंतर वाढलं होतं. त्याची अवस्था ना इकडचा, ना तिकडचा– अशी झाली होती. उच्च जातीचे खिश्चन हलक्या जातीच्या खिश्चनांना मुली देत नसत. गोर्‍या खिश्चनांना काळ्या खिश्चनांविषयी काही देणे-घेणे नव्हते. मिशनरी धर्मप्रसाराचे कार्य करत, पण खिश्चनांमधल्या जाती मिटवण्याचे काम त्यांनी कधी केले नाही. हिंदू धर्मातल्या जातिव्यवस्थेविषयी प्रखर टीका करायचे, पण खिश्चनांमधल्या जातिभेदाविषयी मौन पाळायचे. त्यामुळे धर्मान्तरित अस्पृश्यांना फसवणूक झाल्यासारखे वाटायचे.

इंग्रजांना हिंदुस्थानात सुरक्षित राहाण्यासाठी खिश्चन समुदाय हवा होता.

काळ्या लोकांचे धर्मान्तर आणि त्यांच्या जन्मदरावर त्यांची सामाजिक सुरक्षितता पोसली जात होती. इंग्रजांनी धरणे बांधली. पूल बांधले. दवाखाने काढले. शाळा सुरू केल्या. ह्यामध्ये राज्यकर्त्यांची परोपकारबुद्धी नव्हती; त्यांना वसाहतीची संस्कृती निर्माण करायाची होती. हिंदुस्थान मुळात कधी राष्ट्रच नव्हते; होती छोटी-छोटी राज्ये. मोठा राजा छोट्या राज्यांना गिळंकृत करायचा. सत्तेच्या विकासक्रमातील राजेशाही ही सत्तेची रानटी अवस्था होती. हातात तलवारी घेऊन आमने-सामने लोकांची कत्तलं करणं म्हणजे लढाई. लढाई म्हणजे लूट मिळवणं, खंडणी मिळवणं, युद्धाचा खर्च वसूल करणं आणि सुंदर स्त्रियांचं अपहरण करणं.

"लुटीच्या अमर्याद इच्छेतूनच साम्राज्यवादाचा उदय झाला. वसाहतींच्या लुटीवर इंग्रजांचे साम्राज्य तरले होते. लोकांची संपत्ती लुटण्यासाठी त्यांच्या राजकीय आणि नैतिक अधिकारांवर गदा आणली. लूट मुळात आर्थिक नसतेच कधी. लुटीबरोबर सर्वस्व नष्ट होते. फिलीफ (एकेकाळचा महार) हा सर्वस्व लुटलेल्या सर्वहाराचे उद्ध्वस्त प्रतीक होता."

"जातिव्यवस्था ही लुटीच्या रणांगणासारखीच आहे”

उच्च जाती खालच्या जातींची लूट करतात. वरच्या जातींनी महारांचे सर्वस्व लुटले आहे. वरच्या जाती– मग त्या कोणत्याही धर्मातल्या असोत– त्यांनी खालच्या जातींना दूर ठेवलं आहे. फिलीफला आपल्या मुलाला मुलगी शोधण्यासाठी महारवाड्यातच जावे लागले. हिंदू धर्म हा हिंदूंची जातींमध्ये विभागणी करतो. इतकेच नव्हे, तर त्यांच्यामध्ये उच्च-नीच भेदभाव निर्माण करतो. ह्या षडयंत्राच्या बळी सर्वांत खालच्या जाती अधिक प्रमाणात आहेत."

"‘‘मला तर वाटतं, माणसानं प्रत्येक दहा वर्षांनी धर्म बदलावा. हिंदू व्हावं, खिश्चन व्हावं, मुसलमान व्हावं. एकाच धर्मात मरेपर्यंत कशाला राहायचं?’’ –बलभीम. बलभीमचं बोलणं ऐकून फिलीफ चाट पडला होता. ‘नवी पिढी किती पुढचा विचार करतेय!’ तो विचारांच्या तंद्रीत गुरफटला. ‘हिंदू मदत करत नाहीत आणि मदत करणार्‍याला मदत करू देत नाहीत. ही कसली प्रवृत्ती? प्रेमाने वागणारा तो धर्म. भेदभावाने वागवणारा कसला धर्म?’ फिलीफ विचार करत होता."

"आदिवासींचा जल, जमीन आणि जंगलावरील अधिकार हिरावला गेला होता." हे एक सत्य.

ब्राम्हण कुठे चुकले?

"इतरांना संस्कृत शिकण्याची बंदीच होती. त्यामुळे ब्राह्मणाविरुद्ध कोणी तक्रार केली नाही. आपणही ब्राह्मण्याच्या पलीकडं जाऊन धर्म आणि समाज जाणून घेतला नाही. हिंदू धर्मातील ब्राह्मण्य आणि अस्पृश्यता गाडल्याशिवाय आपण व्यापक समाजहिताची भूमिका घेऊ शकत नाही.’’ विश्वनाथ पोटतिडकीने बोलत होता."

 ‘‘ब्राह्मण म्हणू नकोस, हिंदुत्व म्हण!’’"

 " हिंदू धर्म हा भेदभावाचा जनक आहे. श्रेणीबद्ध उच-नीचतेवर हिंदू धर्म आधारलेला आहे, समतेवर नाही. वर्णव्यवस्था आणि त्यातून पुढे आलेली जातिव्यवस्था ही श्रेणीबद्ध भेदभावावर टिकलेली आहे. ह्या व्यवस्थेत अस्पृश्य पायाखालचे आहेत. गतजन्मी केलेल्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून महार अस्पृश्य जीवन जगत होते."

"अंबरनाकला अधून-मधून हुक्की यायची–मुस्लिम व्हायची. तो बोलून दाखवत असे. त्याला हिंदू धर्माविषयी अतोनात प्रेम वाटायचं आणि द्वेषही. अंबरनाक रिकामा असला की, मीनाराकडे बघत बसायचा. त्याच्या आजोबाचा त्याला गर्व वाटायाचा. त्याच्यावर गर्वाचं वारूळ चढलं होतं."

वरील विचार वाचताना मला जे जाणवले ते हे. हिंदू धर्मात आमुलाग्र सुधारणा होणे आवश्यक आहे. ते काम सवर्ण लोकांचेच आहे. मुगल काळात काही दलित मुस्लिम झाले. इंग्रजांनी त्यांना ख्रिस्त केले आणि हातात बंदूक दिली. प्रतिष्ठा दिली. हिंदू समाज त्यापासून काहीच शिकला नाही. हिंदुत्व हिंदुत्व म्हणून घोषणा देण्यापेक्षा जे हिंदू धर्म सोडून गेले त्याची आपण अवहेलना केली. त्यांना प्रतिष्ठा दिली नाही. हिंदू धर्म सुधारणा झाल्याशिवाय हिंदुत्व ह्या शब्दाला काहीही अर्थ नाही.

धर्मांतर- लोकसंख्या

"धर्मान्तर हे केवळ धार्मिक नसून ते लोकसंख्येशी निगडित आहे. लोकसंख्या ही सत्तेशी निगडित आहे. त्यामुळे सत्तेवर वर्चस्व असलेल्या जाती खडबडून जाग्या झाल्या होत्या. त्यांच्या पायाखालची जमीन घसरू लागली होती. त्यांच्या स्थैर्याला आव्हान मिळालं होतं. धर्मान्तर रोखलं नाही, तर हिंदू धर्मसत्तेला घरघर लागण्याची भीती निर्माण झाली होती. त्यांनी अल्पसंख्याकांवरील वर्चस्व अबाधित ठेवायचं होतं. कोणी डोकं वर काढलं, तर ठेचायचं होतं. पाळकाची हत्या करून हाच संदेश दिला गेला होता

ब्रिटिश सत्ता – 1857 चे बंड – हिंदू धर्म विषमता – फोडा आणि झोडा  

"सैन्य, संस्थानिक आणि स्थानिक एकत्र आले; तर आपली सत्ता टिकणार नाही, ह्याची ब्रिटिश राजकर्त्यांना जाणीव झाली. हिंदुस्थानसारखी वसाहत हातून घालवायची नाही, ह्या उद्देशाने ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीच्या हाती दिलेलं राज्य काढून घेतलं.

"त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य संपले. मोगल-मराठ्यांचे राज्य संपले. हिंदुस्थानवर ब्रिटिश सरकारची राजवट सुरू झाली. अठराशे सत्तावन्नचे बंड यशस्वी झाले असते, तर संस्थानिकांच्या हाती सत्ता गेली असती. मोगल सम्राटाची सत्ता हिंदुस्थानवर कायम राहिली असती. हिंदुस्थानचे इस्लामीकरण झाले असते. धर्मसत्तेचे वर्चस्व अबाधित राहिले असते. अठराशे सत्तावन्नचे बंड अयशस्वी झाल्यामुळे हिंदुस्थानावर इंग्रज, इंग्रजी आणि चर्चची सत्ता राहिली. इंग्रजी आणि खिश्चन धर्म खोलपर्यंत रुजला. ब्रिटिश राजवटीमुळे सार्वजनिक असंतोषाची लाट उदयाला आली आणि ह्या असंतोषातूनच राष्ट्रीय भावनेचा जन्म झाला. इंग्लंडच्या राणीने हिंदुस्थानातील उच्च जातींना खूष करण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात धर्मात ढवळाढवळ केली जाणार नाही, अशी नि:संदिग्ध शब्दांत ग्वाही देण्यात आली. जाहीरनाम्यात दिलेलं वचन पाळण्यासाठी इंग्रजांनी अस्पृश्यांच्या आणि मुसलमानांच्या सैन्यभरतीवर बंदी आणली. हिंदू धर्म हा भेदभावावर आधारला असून विषमता ह्या धर्माचा आत्मा आहे; ह्या धर्मात समानता नाही, हे ब्रिटिशांनी ओळखले. इथून ‘फोडा झोडा’ चे राजकारण सुरु झाले. सैन्यातून काढून टाकल्यामुळे बलभीम आणि लक्ष्मण सोनईला परत आले. सोनईत त्यांचा जीव रमला नाही. खेडी सोडल्याशिवाय उद्धार"

धर्मांतर आणि अस्पृश्यांचा उद्धार

"धर्मान्तर करूनही अस्पृश्यांचा उद्धार झाला नव्हता. त्यांचं दारिद्र्य दूर झालं नव्हतं. इंग्रजी राजवट असूनही नोकर्‍या मिळाल्या नव्हत्या. गोरे खिश्चन काळ्या खिश्चनांकडे सहानुभूतीने पाहायचे. हिंदू धर्मातल्या जातिभेदाचा खिश्चनांना संसर्ग झाला होता. खिश्चनांमध्येही जाती घट्ट झाल्या. चर्चचे धर्मगुरू, नन आणि धर्मान्तरित उच्च जातीचे लोक धर्मान्तरित अस्पृश्यांना समानतेने वागवत नव्हते. वॉरन बुशने बलभीम आणि लक्ष्मणला ओळखलं नव्हतं. बलभीमने मागच्या आठवणींना उजाळा दिला होता

"‘‘अस्पृश्यता नष्ट होईल. खिश्चन व्हा.’’ –वॉरन. ‘‘खिश्चन झालो तरी जात जात नाही. मुस्लिम झालो तरी जात जात नाही. मग धर्मान्तर का करायचे?’’ –बलभीम."

राजकारण आणि समाजकारण

"लोकांना संघटित करण्याचे काम राष्ट्रीय काँग्रेस करत होती. समाजसुधारक तळागाळातल्यांना जागवत होते. प्रतिगामी शक्तींनी भूतकाळाचं आणि इतिहासाचं उदात्तीकरण केलं. समाजाला अधोगतीकडे घेऊन जाणार्‍या विचारांचं समर्थन केलं. सुधारणावाद्यांनी भूतकाळाचं आणि इतिहासाचं वास्तव विश्लेषण केलं. समाजाला प्रगतीच्या दिशा दर्शवल्या. समाजात परिवर्तनाचे वारे वाहू लागले. समाजाची अवस्था चिखलात रुतलेल्या हत्तीसारखी झाली"

ब्राम्हण महार झाले पाहिजेत

"माणिक महाराला ब्राह्मणाचा हेवा वाटला. ‘ब्राह्मण महार झाले पाहिजेत! महार ब्राह्मण झाले पाहिजेत. मी ब्राह्मण झालो तर हिमालयात जाईन, तप करेन, ईश्वर प्राप्त करून घेईन!’ माणिक महार नदीत डुबक्या घेणार्‍या ब्राह्मणांकडे पाहत विचार करत होता." – ही मानसिकता ब्राम्हण समाजाला समजली असती तर?

"अस्पृश्यांना लष्करी खात्यात नोकर्‍या द्याव्यात आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. तब्बल१५८८ महारांच्या सह्या घेऊन प. वा. महादेव गोविंद रानडे ह्यांच्या मदतीने ब्रिटिश सरकारकडे अर्ज करण्यात आला. ह्या सभेला लक्ष्मण आला होता. क्षणभर त्याला हाती रायफल घेऊन उभं असल्याचा भास झाला होता."

"महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ नावाची संस्था सुरू केली आणि अस्पृश्योद्धाराचे कार्य सुरू केले. सर नारायणराव चंदावरकर, संत गाडगेबाबा आणि भाऊराव पाटील ह्यांनीही अस्पृश्यांच्या हिताचे काम केले. इंग्रजांनी हिंदी लोकांच्या हाती सत्ता दिली, तर त्यांच्याकडून नि:पक्षपाती धोरण अवलंबिले जाणार नाही, अस्पृश्यांवर घोर अन्याय होईल, अस्पृश्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे म्हणून चळवळ केली पाहिजे– असा विचार अस्पृश्यांच्या मनात रुजण्याचा हा काळ होता. काळ बदलतो आहे ह्याची जाणीव हिंदुराव पाटलाला - सवर्णाला झाली होती.

वस्त्या

"देवगडात जातीनिहाय वस्त्या होत्या. ब्राह्मण आळी, गुरव गल्ली, शिंपी आळी, धनगर गल्ली, सुतार गल्ली, लोहार वस्ती, मराठा वस्ती, कोळीवाडा, मुसलमान मोहल्ला, रामोशीवाडा, चांभारवाडा आणि महारवाडा अशा वस्त्या होत्या. गाव अनेक जातींत विभागला होता. प्रत्येक जात वेगळी आणि स्वतंत्र होती. वस्त्या एकाला लागून एक असल्या, तरी त्यांची वहिवाट वेगळी होती. लोकांचे संबंध स्नेहावर आधारलेले नसून भेदभावावर आधारलेले होते. हिंदू समाज जाती-जातींत विभागलेला आणि उच्च-नीचतेवर आधारलेला आहे. ह्याचे उदाहरण प्रत्येक गाव होतं. वरच्या जाती खालच्या जातींचा द्वेष करत. खालच्या जातींचे लोक घाणेरडे असतात, त्यांच्याशी संबंध ठेवू नये, अशी वरच्या जातींच्या लोकांची मानसिकता; तर आपण खालच्या जातीचे आहोत, वरच्या जातींचा मान ठेवला पाहिजे, पायरीने राहिले पाहिजे– अशी खालच्या जातींच्या लोकांची मानसिकता. धर्म एक असला, तरी मनं एक नव्हती. देवगडचा महारवाडा मोठा होता. अनेक महार काळ्या वाड्यावर कामाला होते.

"महाराचं शरीर होतं माणसाचं, मन होतं जनावराचं. मुर्दाड. अवहेलना विसरून जगायचं, हे त्यांना जन्मानेच शिकवलं होतं. नशिबामुळे महारजन्म मिळाला, ह्यावर त्यांचा विश्वास होता. हजारो वर्षांची शांती भंग करायची आहे, हे त्यांना कोणी सांगितलं असतं, तर ते त्यांना पटलं नसतं. सामाजिक हिंसेवरच गावगाडा चालला होता. विरोध म्हणजे काय, हे महारांना माहीत नव्हतं. ते कधी गावाविरुद्ध गेले नव्हते. इथंच जगायचं, इथंच मरायचं– अशी त्यांची दृढ समजूत होती. गावाविरुद्ध गेलं तर गाव तोंडात गू घालेल, अशी त्यांची मानसिकता. त्यांनी कधी नशिबाविरुद्ध बंड केलं नव्हतं."

होळी आणि महार

"येसनाकने होळी पेटवली. पोरांनी बोंब ठोकली– ‘‘होळी रे होळी ऽ गावच्या आळी ऽऽ ब्राह्मण मेला ऽ संध्याकाळी ऽऽ’’ होळी पेटली. ठिणग्या उडू लागल्या. होळीचा उजेड दूरवर पसरलेला. जाळाचा आवाज येत होता. आग भडकत होती. धूर निघत"

"‘‘महाराच्या होळीचा विस्तव नेल्याशिवाय गावाची होळी पेटत नाही. आपल्या होळीचा मान आहे!’’"

स्नान आणि अस्पृश्य

"सिदनाकनं कितीही वेळा स्नान केलं, तरी तो अस्पृश्यच राहणार. नदीत स्नान केलं, तर सवर्ण पवित्र होतो. त्याला पुण्य लागते. पाप धुऊन जाते."

गावाची विभागणी

हिंदू, मुलसमान आणि अस्पृश्य अशा ठळक वस्त्यांमध्ये गावाची विभागणी झाली होती. -०-०- गाव तिथं महारवाडा. गावकुसाबाहेरची ही वस्ती. महारांची. कुत्र्यांची, डुकरांची, गाढवांची, उकिरड्यांची, हागणदारीची. गावाची हलकी कामं महार करत. मोबदल्यात त्यांना बलुतं मिळायचंं. महारवाड्यात चार पाडेवार होते. हे गावकी करायचे. अंबरनाक, भूतनाक, यसनाक आणि धोंडामाय ह्यांच्याकडे पाडेवारकी होती. धोंडामायच्या घरी गडी ना गांड्या. तिनं आपल्या अर्ध्या"

महाराची काठी

"महाराची काठी येई. ह्या काठीला घुंगरू लावलेले असत. ह्या काठीला खुळखुळ्याची काठीही म्हणत. महाराला खुळखुळ्याची काठी घेऊन गावात जावं लागे. तो गावात गेला की, काठी जमिनीवर आपटून आवाज काढत असे आणि महार येत असल्याची सूचना देत असे."

"ब्राह्मण मरेल, महार बी. पोहून-पोहून मासे होऊ. आणखी काय– महार मासे!’’ सिदनाक हासत होता."

"पड, कातडं, चान्या, मांद, कुत्री, गाढवं, डुक्करं, उकिरडे, मोडकळीस आलेल्या झोपड्या आणि भ्रमनिरास झालेले चेहरे म्हणजे महारवाडा. कर्मठ हिंदूंनी नासधूस केलेल्या प्राचीन बौद्ध लेण्यांसारखी ही माणसं. मोडलेली, वाकलेली, थकलेली. त्यांच्यापुढं कसलंच भविष्य नव्हतं. सकाळ-संध्याकाळ दहशतीत जगणारी ही शापित माणसं. भीमनाक आणि अंबरनाक चिंचेच्या झाडाकडं निघाले. हे झाड महारांसाठी निवारा होतं.

ब्राम्हणाला मेल्यानंतर नवा जन्म

महार मेल्यानंतर भूत

"ब्राह्मण मरतो. त्याचा आत्मा शरीर बदलतो. दुसर्‍या शरीरात प्रवेश करतो. त्याला दुसरा जन्म मिळतो. त्याला मोक्ष मिळतो. महाराला आत्मा नसतो. त्याचा प्रेतात्मा भटकत राहतो. त्याला मुक्ती नाही. महार मरतो, त्याचं भूत होतं. तो मुक्तीसाठी तडफडत राहतो. ज्याचं जीवन अर्ध्यावरच संपतं, जो पूर्ण आयुष्य जगला नाही; तो भूत होतो आणि"

"लाचारी हे महाराच्या जगण्याचं तत्त्वज्ञान होतं. हिंसा आणि अस्थिरतेच्या भयाखाली जगणारे महार ताठ मानेने कधीच जगले नाहीत. वरच्या जातींचं त्यांच्यावर हमेशा दडपण होतं.

"काळोखच लंगडत चालतो आहे, असा भास होत होता. अस्पृश्यांनी कुठं राहायचं, काय खायचं, कपडे कसले वापरायचे, कसल्या घरात राहायचं, अलंकार कसले घालायचे, कोणती भाषा बोलायची, कोणती भाषा ऐकायची, त्यांनी कोणती नावं धारण करायची, त्यांनी बंधनं नाकारली, तर त्यांना कोणत्या शिक्षा द्यायच्या– हे हिंदूंच्या धर्मशास्त्रात लिहून ठेवलं आहे. अस्पृश्यता दुसरे-तिसरे काही नसून हिंदू धर्मशास्त्रातील हिडीस विचारांचं दृश्य रूप"

"होय. अस्पृश्यांमध्ये ही धर्मशास्त्रे झुगारण्याची हिंमत तेव्हा येईल, जेव्हा ही धर्मशास्त्रे पूर्णांशाने आकलन होतील. धर्मशास्त्रे वाचण्यासाठी बुद्धी हवी, ज्ञान हवे. हिंदू धर्माने अस्पृश्यांचं ज्ञान हिरावून घेतलं आहे. अस्पृश्यांच्या ज्ञानार्जनावर हिंदू धर्माने बंदी घातली आहे. हिंदूंची धर्मशास्त्रे खोटी ठरवल्याशिवाय दलितांची गुलामी संपणार नाही."

"‘‘हिंदूंना विटाळ होतो, इंग्रजांना नाही. इंग्रज महाराच्या हाती मशिनगन देऊन हिंदूंना गोळ्या घालायला लावतील. हिंदूंवर राज्य करतील.’’ धोंडनाक शहाण्यासारखा बोलत होता."

‘‘हिंदू काय, इंग्रज काय– जो चारा देईल, त्याच्या मागं जायाचं!’’ धोंडनाक स्पष्टपणे बोलत होता."

‘‘परक्यांचं राज्य आलं पाहिजे.’’ भीमनाक उत्साहाने बोलत होता. ‘‘महाराच्या हातातला झाडू काढून त्याच्या हाती बंदूक देणं म्हणजे चमत्कारच आहे. वरच्या जातींनी खूप छळलं आहे. अस्पृश्यांना शस्त्रे मिळाली, तर सूड घेतील.’’ अंबरनाक कडवटपणे बोलत होता. ‘‘देवळापुढून उठलं पाहिजे. रात्र झालीय.’’ धोंडनाक."

"विठ्ठ्या महाराने नुकसान भरून दिले, त्यामुळे सुलतानाला आनंद झाला. त्याने विठ्ठ्या महाराला बक्षीस देण्याचे ठरवले. विठ्ठ्या महाराने सुलतानाला नम्रपणे विनंती केली. ‘‘हुजूर, आमच्या महार जातीसाठी बावन्न हक्कांची सनद द्या. ह्या जातीवर खूप अन्याय झालाय.’’ सुलतानाने विठ्ठ्या महाराची मागणी मान्य केली. दामाजीपंतांची शिक्षा टळली. संत दामाजीपंतांची ख्याती पसरली. ते संत झाले. विठ्ठ्या महाराचा मात्र सर्वांनाच विसर पडला. विठ्ठ्या महाराची कहाणी भूतनाक खुलवून सांगत"

"अंबरनाक आणि भूतनाक दोन घंट्यांनी परत आले. अकबर अलीने आपल्या शेतात मढं पुरायला जागा दिली होती. महारांनी मढं उचललं. अकबर अलीच्या शेताकडे निघाले. भूतनाकच्या हातात खोरं आणि कुदळ होती. अंबरनाकनं टोपलं घेतलं होतं. मढंं न वाजवता नेत होते.

"वरच्या जातींrची मानसिकता होती. महाराला पाहिलं की, वरच्या जातींच्या रक्तात श्रेष्ठत्वाची उसळी मारायची. महारापेक्षा ते श्रेष्ठ आहेत, हे त्यांना जन्मानेच शिकवलेलं होतं."

"अस्पृश्यांना मुसलमानांमुळे धर्मांतराचा मार्ग मोकळा झाला होता. केवळ अस्पृश्यांनीच धर्मांतर केलं होतं, असे नव्हे; तर उच्च जातींrतल्या अनेकांनी धर्मांतर केलं होतं. सवर्णांना अस्पृश्यांचं धर्मांतर नको होतं. अस्पृश्यांच्या धर्मांतरामुळे त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्याची परंपरा धोक्यात येत होती, हे खरं दुखणं होतं. इंग्रजांमुळे अस्पृश्यांना धर्मांतराचा आणखी एक राजमार्ग मोकळा झाला होता. भीमनाक संतापानं फणफणला होता. अस्पृश्यांच्या लाचार मनात असंतोषाचा स्फोट झाला होता. अस्पृश्यांच्या स्वप्नांना पालवी फुटण्याचा हा सुंदर क्षण असावा."

‘‘महाराची किंमत गावाला कधीच कळणार नाही. ते आपल्याला पायातली वहाण समजतात.’’ येसनाक कडवटपणे बोलत होता."

"उष्टं अन्न, मृत जनावराचं मांस आणि उकिरड्यावरचं जगणं– ह्यात त्यांनी आनंद शोधला होता. अंबरनाक हसत होता. भूतनाक समाधानी दिसत होता."

संपत्ती आणि स्त्री

"संपत्ती आणि स्त्री ह्या दोन पावलांनी सत्ता चालते. भोग हा सत्तेचा आत्मा असतो. अधिकार हे सत्तेचे सौंदर्य असते. अमर्याद अभिलाषा ही सत्तेची जननी असते. राजा हा सत्तेचे केंद्र असतो.

लोक राजे झाले पाहिजेत

"राजा म्हणजे हजारो लोकांना दुबळे करणारी पाशवी शक्ती

"लोक राजे झाले पाहिजेत. राजा दुबळा झाला पाहिजे. लोकांनी राजाची राजवस्त्रे छिनून घेतली पाहिजेत."

"‘राजवाडे पर्यटनाची स्थळं होतील... शस्त्रास्त्रे वस्तू संग्रहालयात प्रदर्शनासाठी मांडली जातील... ऐरावत लग्नाच्या वरातीत पाहायला मिळेल... राजा आता नाटकात दिसेल...’"

"‘धर्म माणसाचा आत्मा लुटतो, तर सत्ता"

"‘‘इंग्रज आपल्या धर्माचा प्रसार करतील.’’

"हिंदुस्थानात सर्वांत अधिक घातपाती कारवाया ह्या धर्माच्या नावाखाली होत असतात, असा त्याचा दृढ समज होता. जॉर्ज थॉमसने लोकांना जामवबंदीच्या आदेशाविषयी सांगितले आणि आदेश मोडला तर शिक्षा होईल, हेही निक्षून सांगितले. त्यानंतर तो मंदिराबाहेर पडला."

 

मुगल, मराठे आणि इंग्रज

"हिंदुस्थानात लहान-मोठे अनेक राजे होते. मोगलांनी एकेका राजाला जिंकलं आणि तो प्रदेश आपल्या राज्याला जोडला. एकेका राज्याचा विलय झाला आणि ह्यातूनच मोगलांचं साम्राज्य उदयाला आलं. ह्यामुळे छोट्या-छोट्या राज्यांत विभागलेला हिंदुस्थान आता अखंड हिंदुस्थानात रूपांतरित होऊ लागला. इंग्रजांनी हिंदुस्थान जिंकला आणि अखंड प्रादेशिक एकता अस्तित्वात आली. अखंड हिंदुस्थानचा उदय होत असताना प्रादेशिक भाषा आणि संस्कृतीचा अडसर निर्माण होत होता."

"लोकांना सत्ताधार्‍यांचे पाय चाटायला आवडतात."

"सत्ता केवळ राजकीय नसते; तिला अनेक चेहरे असतात, ह्याचा त्याला प्रत्यय येऊ लागला होता."

"पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा दारुण पराभव झाला. मराठ्यांची प्रचंड वाताहत झाली. पानिपतच्या लढाईत मोगलांचा विजय झाला. पण ह्या लढाईमुळे मोगल सत्ता खिळखिळी झाली. मोगल बरबाद झाले. पानिपतच्या लढाईमुळे हिंदुस्थानातले मराठे आणि मोगल ह्या दोन सत्ता निष्प्रभ झाल्या. त्याचा फायदा इंग्रजांना मिळाला. इंग्रजांनी चढाईचे धोरण स्वीकारले. बंगालचा नबाब, दिल्लीचा बादशहा, अयोध्येचा नबाब, राजपूत, जाट, निजाम, मराठे, टिपू सुलतान आणि छोटे पाळेगार ह्यांना इंग्रजांनी नामोहरम केले. एतद्देशीय सत्तांमध्ये ऐक्य नसल्याने इंग्रज वरचढ ठरले. मराठ्यांच्या पानिपतमधल्या पराभवामुळे इंग्रजांनी मराठी सत्तेत पाय रोवण्यास सुरुवात केली. कंपनी सरकार आपल्या बाजारपेठेचा विस्तार करत होते आणि त्यासाठी एकेक राज्य गिळंकृत करत होते. सत्ता ही केवळ राजकीय नसते; सत्ताधार्‍यांचा धर्म आणि संस्कृतीही प्रभुत्व गाजवू लागतात. प्रजा हवालदिल झाली होती. कोणत्या बदलाला सामोरे जावे लागणार आहे, ह्याचा नेमका अंदाज प्रजेला येत नव्हता. रोज नव्या अफवा ऐकायला मिळायच्या."

विलायतेहून ख्रिस्ती थोडेच येणार

येथील मुसलमान बाहेरून आले नाहीत  

‘‘महार-मांग आहेत, आदिवासी आहेत. होतील ते खिस्ती! विलायतेहून खिस्ती थोडेच येणार आहेत? वसईला गेला असालच. आपल्यापासून जवळच आहे. जा, बघा. आपलेच लोक खिस्ती झालेले दिसतील. काळ्या खिस्त्यांना गोरे खिस्ती शिवून घेत नाहीत. आपलेच लोक मुसलमान झालेत."

"इथले मुसलमान काही बाहेरून आले नाहीत. आपल्या लोकांचं आपल्या धर्मावर प्रेम नाही, स्वाभिमान नाही. स्वभाषा, स्वधर्म, स्वराज्य ह्याची लोकांना चाड नाही.’’ महिपतीराव व्यथित होऊन बोलत होता. गोविंद भटाला बोलण्याची फट मिळाली होती. ‘‘अशाने हिंदू धर्म लयाला जाईल.’’ गोविंद भट काळजीच्या सुरात बोलत होता. महिपतीरावाने आगीत तेल ओतावे तशा आविर्भावात आवाज चढवला– ‘‘जॉर्ज थॉमसबरोबर महार सैनिक आहेत. इंग्रजांनी महारांच्या हाती शस्त्रे दिलीत!’’ महिपतीरावाला खूपच मनस्ताप झालेला दिसत होता."

मिशनरी

फादर फ्रान्सिसने त्यांना बाप्तिस्मा दिला. नवी नावं दिली. रतनाक महाराचा स्टीफन झाला. जतनाकचा हॅरी झाला. रतनाक महाराची बायको केरसुनी रिबेका झाली. जतनाकची बायको येसूबाई सेरेना झाली. महारवाड्यात खिश्चन कुटुंब राहू लागलं. महारांना नवी नावे उच्चारताना गंमत वाटत होती. स्टीफनने हिंदू देव-देवता उकिरड्यावर टाकल्या होत्या. गावात तणाव निर्माण झाला होता. स्टीफनच्या मागं चर्च होतं. त्यामुळे स्टीफनवर जुलूम करणं अडचणीचं झालं होतं."

गत जन्माचे पाप

"गतजन्मीच्या पापामुळे महारजन्म मिळाला आहे, अशी महारांची समजूत होती. इतरांप्रमाणे आपणही ईश्वराची लेकरं आहोत, हे ऐकून महारांना अभूतपूर्व वाटत होतं. आपल्यात आणि इतरांत जन्माने भेद नाही, हे महारांना कळू लागलं होतं."

"माणसाला जन्माने जात मिळते, जन्माने धर्म मिळतो. धर्म आणि जात बदलता येत नाही. जन्म हा माणसाच्या गत जन्माच्या कर्माचे फळ आहे. माणसाला त्याच्या नशिबाने जन्म मिळतो. पाप केले, तर तो हीन योनीत जन्म पावतो. पुण्य केले, तर त्याला पुढील जन्म उत्तम लाभतो. पृथ्वीवर पाप वाढले, तर ईश्वर अवतार घेतो आणि दुष्टांचे पारिपत्य करतो... गोविंद भटाने प्रतिवर्षी पोथीचे पारायण करताना हेच लोकांच्या मनांवर बिंबवले होते. लोकांना ह्या जन्मापेक्षा पुढला जन्म महत्त्वाचा वाटत असे. भूतलापेक्षा स्वर्गाचं आकर्षण वाटत असे. मुसलमान आले. लोकांना कळलं, धर्म बदलला येतो. धर्म बदलला की, जात नष्ट होते. कनिष्ठ जातींनी धर्मान्तराचा मार्ग अवलंबला. इंग्रज आले; लोक खिश्चन झाले. कर्म आणि जन्म ह्याला पाप-पुण्याचा आधार नाही, हे लोकांना कळलं. सिदनाक आणि भीमनाक गंभीर झाले होते."

"‘जातिप्रथा हा हिंदू संस्कृतीचा घातक वारसा आहे. उच्च जातींना विकासाचे झुकते माप देणे, हे भेदभावाचे तत्त्व आहे. योग्य-अयोग्यतेच्या नावाखाली कनिष्ठ जातींना अधिकारांपासून वंचित ठेवणे, ही हिंदू धर्माची कुटील नीती आहे. केवळ आर्थिक विकासाने जातिव्यवस्था नष्ट होऊ शकत नाही. त्यासाठी धर्मान्तर हा एकच मार्ग आहे. धर्मान्तरामुळे अस्पृश्यांची गुलामी नष्ट होऊ शकते.’ असा विचार फादर प्रâान्सिस करत होता.

"आदिवासींनी धर्मांतर केलं, तर हिंदू धर्माला धोका संभवतो– अशी चर्चा ब्राह्मण आळीत सुरू झाली होती."

"भीमनाक मात्र धर्मांतरापासून दूर राहिला. ‘‘धर्मांतर केल्याने माणूस आपल्या रक्ताच्या नात्यांपासून तुटतो, समाजापासून दुरावतो. मी माझ्या जातीशी गद्दारी करणार नाही,’’ असे भीमनाकने सिदनाकला सुनावले होते."

" खिश्चन झाल्यावर मोरतळ्याचं पाणी पिता येतं– ह्या एकाच कारणासाठी नऊ महार कुटुंबांनी बाप्तिस्मा घेतला होता. खिश्चन मिशनरींनी धर्मार्थ दवाखाना सुरू केला होता."

पेशवाईतील अस्पृश्यांचा छळ

‘‘अस्पृश्यांचा सर्वत्र छळ होतो... पण पेशवाईत मात्र कळसच गाठला आहे!’’ –इम्रान. ‘‘अस्पृश्यांनी रस्त्यावर थुंकू नये, म्हणून त्याच्या गळ्यात गाडगे बांधले आहे. वाटेवर अस्पृश्यांच्या पाऊलखुणा उमटू नयेत, म्हणून पाठीमागे त्याच्या कमरेला झाडू बांधला आहे.’’ –फिलीफ. ‘‘भयानक आहे हे’’ इम्रान."

"‘‘मुसलमानांचा असा छळ झाला नाही.’’ –इम्रान. ‘‘आमचं गाव बहामनी राज्यात होतं. त्यानंतर निजामाची राजवट. गावावर मुस्लिमांचं दडपण होतं. त्यामुळे आम्ही कधी गाडगं बांधलं नाही.’’ –फिलीफ. ‘‘ज्यांचा छळ होतो, ते कधी ना कधी सूड उगवतातच.’’ –इम्रान

"अस्पृश्यांचं हजारो वर्षांपासून जे नुकसान झालं आहे, त्याचा कधी हिशेब होणार आहे का? फिलीफ निगराणी करत होता– एकाच वेळी पेशव्यांच्या वाटेवर आणि महाराच्या भूतकाळावर."

धर्मांतराने काय मिळालं

"अरब, इराण आणि मध्य आशियातून आलेले मुसलमान स्वत: ला उच्च समजत. अशरफ मुसलमानांनी धर्मान्तरीत पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य मुसलमानांना पसमांदा मुसलमान ठरवले व हीन लेखले. त्यांना मस्जिदीत आणि स्मशानात दुजाभावाची वागणूक दिली. अस्पृश्यांनी धर्मान्तर करून त्यांचा प्रश्न मिटला नाही, उलट बिकट झाला. धर्मान्तरामुळे अन्य धर्मांत अस्पृश्य गेले, त्यामुळे हिंदू धर्मात अल्पसंख्य झाले. अस्पृश्यांनी धर्मान्तर केले, जाती टाकण्यासाठी. ते ज्या धर्मात गेले, तिथंही त्यांना त्यांच्या जातीवरूनच ओळखलं गेलं. अस्पृश्यांनी स्थलांतर केलं. अस्पृश्यांनी देशांतर केलं. ते ज्या देशात गेले, तिथंही त्यांना त्यांच्या जातीवरूनच ओळखलं गेलं. त्यांची कला, त्यांची कौशल्ये, त्यांची प्रतिभा, त्यांचे गुणधर्म कधीच पाहिले गेले नाहीत."

"अस्पृश्यांनी युगानुयुगे सहन गेलेल्या अपार संयमातून अहिंसेचा जन्म झाला असावा. ह्या व्यवस्थेच्या तळाशी अस्पृश्य आहेत, म्हणूनच ही व्यवस्था डळमळली नाही."

"महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ नावाची संस्था सुरू केली आणि अस्पृश्योद्धाराचे कार्य सुरू केले. सर नारायणराव चंदावरकर, संत गाडगेबाबा आणि भाऊराव पाटील ह्यांनीही अस्पृश्यांच्या हिताचे काम केले. इंग्रजांनी हिंदी लोकांच्या हाती सत्ता दिली, तर त्यांच्याकडून नि:पक्षपाती धोरण अवलंबिले जाणार नाही, अस्पृश्यांवर घोर अन्याय होईल, अस्पृश्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे म्हणून चळवळ केली पाहिजे– असा विचार अस्पृश्यांच्या मनात रुजण्याचा हा काळ होता. काळ बदलतो आहे ह्याची जाणीव हिंदुराव पाटलाला झाली होती.

"‘‘जन्मात उच्च-नीच आणि मरणात स्वर्ग-नरक अशा कल्पनेवर हिंदू धर्म आधारला आहे. पाप-पुण्य ह्या कल्पनेमागील मूळ पाया आहे. ब्राह्मणाचं"

"श्रेष्ठत्व सिद्ध करणारी ही कल्पना आहे. हिंदू धर्म भेदभावावर आधारला आहे. ह्यामागे शुद्धतेची संकल्पना आहे. हिंदू धर्माने संकराला निषेधार्ह मानले आहे. ह्या धर्माच्या शिरोभागी ‘अनार्य, द्रविड, राक्षस, दस्यू आणि मानवांचा वध करणारा ईश्वर आहे.’’ मोरोपंत वेदांतला समाजरचना समजावून सांगू इच्छित होते. वेदांत त्यांना नेमके प्रश्न विचारत होता. ‘‘अनार्य, द्रविड, दस्यू आणि दानव ह्यांचे जे आज वारस आहेत, त्यांच्याशी कसे वागावे?’’"

माणुसकी हाच खरा धर्म

‘‘माणुसकीनं प्रत्येकाशी वाग, इतकंच.’’ ‘‘हिंदू धर्म मानवतेवरच आधारलेला आहे.’’ ‘‘कुठलाही धर्म माणुसकीवर आधारलेला नाही, ईश्वरावर आधारलेला आहे. आपण जितकं ईश्वराविषयी बोलतो, तेवढं माणसाविषयी बोललं पाहिजे. आपण जेवढं स्वर्गाविषयी बोलतो, तेवढं समाजाविषयी बोललं पाहिजे. विधवा म्हणून मी जे उपेक्षित जीवन जगलं आहे, त्या जीवनानेच मला ही दृष्टी दिली आहे. माझं जाऊ द्या रेऽ अस्पृश्यांचा"

सवर्ण

"महाराने आपली पायरी ओलांडली. हलक्या जातीचा माणूस इतकं धाडस कसा करू शकतो? पाटलाच्या सुनेला हात लावताना त्याला जरासुद्धा भीती वाटली नसेल का? जोड्याजवळ बसणारी जात इतकी हिंमत कशी करते? आम्ही तलवारी म्यान केल्यामुळे आमची जरब संपली? पाटील पिंजर्‍यातल्या वाघासारखा अस्वस्थ झाला होता. त्याला त्याची प्रतिष्ठा आणि महान परंपरा विटाळल्याचं अपरंपार दु:ख झालं होतं. त्याला सत्याचा छडा लावायचा होता

"हिंदुराव पाटील चांभार टेकडीवर आल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. पाटलाला पाहण्यासाठी झोपडी-झोपडीतून माणसं बाहेर पडत होती. चांभार टेकडीवर पाटील आल्याचं सर्वांना नवल वाटलं. लोक बोलू लागले... ‘‘आजवर फादर येत होता, आता पाटीलही येऊ लागला. चांभार टेकडीला चांगले दिवस येतील!’’ लोकांमध्ये उत्साह संचारला."

इंग्रजांना सगळे इंडियन पिग

"इंडियात कोणी भेटलं की, त्याला ‘कोणत्या जातीचे?’ म्हणून विचारलं जाई. इथं ‘कोणत्या देशाचे?’ असा प्रश्न विचारला जाई.”

इंडियन कुली– मग तो सवर्ण असो वा अस्पृश्य– गोर्‍यांना तो ‘इंडियन पिग’ वाटे. ‘‘कुठल्या देशाचे?’’ ‘‘कुठल्या वंशाचे?’’ ‘‘तुमची भाषा कोणती?’’

"मिंटो कायद्यानुसार मुसलमानांना जातीय प्रतिनिधित्व दिलं होतं. मुसलमानांना हिंदूंची राजकीय ताकद कमी करायची होती. अस्पृश्यांची हिंदू शिरगणतीत नोंद करू नये, अशी मागणी त्यांनी केली होती. साऊथ ब्युरो कमिशन हिंदी लोकांची मतं जाणून घेत होतं. महर्षी शिंदे आणि नारायणराव चंदावरकर ह्यांनी अस्पृश्यांना हिंदू मानावे, अस्पृश्यांना स्वतंत्र राजकीय महत्त्व देऊ नये– अशी मागणी केली होती. त्या वेळी बी. आर. आंबेडकर हे सिडन हॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. त्यांनी गव्हर्नरला पत्र लिहून अस्पृश्यांच्या वतीने साक्ष देण्यासाठी आपली निवड करावी, अशी विनंती केली. गव्हर्नरनं आंबेडकरांची विनंती मान्य केली. आंबेडकरांनी साऊथ ब्युरो कमिशनपुढे अस्पृश्यांच्या वतीनं साक्ष दिली. अस्पृश्यांना मतदानाचा हक्क पाहिजे, त्यांना निवडणुकीस उभे राहता यावे, त्यांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे, अस्पृश्यांचे प्रतिनिधी अस्पृश्य मतदारांनीच निवडले पाहिजेत आणि अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना जागा द्याव्यात– अशा आंबेडकरांनी मागण्या केल्या होत्या. इंडियाचं सामाजिक वास्तव बर्फासारखं वितळू लागलं होतं. हिंदू, अस्पृश्य आणि मुस्लिम असे वेगळे तीन सामाजिक प्रवाह वाहू लागले होते."

" अस्पृश्य मुसलमानांबरोबर जाणार नाहीत, ते हिंदूंबरोबरच राहतील.’’ बर्नाडने आपले मत मांडले होते. बर्नाड गेली दहा वर्षं इंडियात राहत होता, त्यामुळे त्याच्या निष्कर्षांना अर्थ होता. कॉर्टरच्या कानांवर आंबेडकरांचं नाव पडलं होतं. त्याच्या मनात आंबेडकरांना भेटण्याची इच्छा निर्माण झाली होती."

‘‘अस्पृश्यांवर अत्याचार करू नका, त्यांच्यावर खूप अन्याय झाला आहे. त्यांचा छळ थांबला नाही, तर ते धर्मांतर करतील. त्यांच्याशी माणुसकीनं वागलं पाहिजे, नाही तर ते सूडाने पेटतील.’’ मारेकरी खाली माना घालून उभे होते."

हिंदू

‘‘आपण सर्व जण हिंदू आहोत. बंधू-बंधू आहोत. आपण गर्वाने ‘आम्ही हिंदू आहोत’ हे सांगितले पाहिजे.’’ वेदांतचं भावनाप्रधान बोलणं ऐकून ग्रामस्थ गडबडले. गुरुजींना भूतबाधा झाली असल्याचा त्यांना भास झाला. अस्पृश्य आणि सवर्ण जरी हिंदू असले, तरी ते ‘बंधू’ कसे असू शकतात? हिंदू वाहिनीच्या तरूणांमध्ये मागास जातींrतले अनेक तरुण होते. त्यांच्याही मनात भ्रम निर्माण झाला होता. त्यांच्या मनात ‘बंधुते’विषयी शंका निर्माण झाली होती

बंधुता

‘‘बंधुता म्हणजे मानवी सहजीवनातील न्यायाचं उदात्त नातं. बंधुता म्हणजे दुसरे-तिसरे अन्य काही नसून समानतेचं भव्य रूप. बंधुता म्हणजे संस्कृतीचा प्राण, बंधुता म्हणजे राष्ट्र नावाचं रसायन, बंधुता म्हणजे स्वातंत्र्याचा उत्सव. लोकशाहीच्या सुंदर स्वप्नाचं नाव बंधुता आहे. माणसाच्या जगण्याची ऊर्जा बंधुता आहे; देशाचे सौंदर्य म्हणजे बंधुता आहे!’’ आकाशवाणी झाली होती. वावटळ संपली होती. आभाळात धूळ पसरली होती. पालापाचोळा गिरक्या घेत जमिनीवर पडत होता."

 

No comments:

Post a Comment