Tuesday, April 24, 2018

सतत कार्यरत : कुमुदिनी देशपांडे


कुमुदिनी देशपांडे ह्या माझ्या सासूबाई . आज ९० व्या वर्षीही त्यांचा उत्साह 
खूप दांडगा आहे. तेच त्यांच्यापासून शिकण्यासारखे आहे. त्यांचे आयुष्य म्हणजे एक समृद्ध जीवन. त्यांचं बालपण पुण्यात गेलं . त्यामुळे त्या थोड्याशा “ पुणेकर” आहेत, असा आमचा सुरुवातीचा समज. बाकीचं आयुष्य मराठ्वाड्यात गेलेलं असल्यामुळे त्यांच्यात ‘ पुणेरी- मराठवाडी’ संगम दिसून येतो. त्यांच्या स्वयंपाकाला ‘पुणेरी’ गोड चव आहे तसेच ‘ मराठवाडी ‘ तिखटपणा नाही.
मी त्यांचा जावई असल्यामुळे माझे कौतुकच जास्त व बडदास्त खास मराठवाडी 
.हेच तर आमच्या सासू- जावई नात्याचे वैशिष्ट्य.
त्यांच्या घरातील हसत्या-खेळत्या वातावरणात मी तसा गंभीर असे. मी कमी बोलतो असा त्यांच्या घरातील सर्वांचा एक गोड समज होता.  सुरुवातीचे  दिवस तसेच असतात. जसाजसा सहवास वाढत गेला , तसातसा कौटुंबिक जिव्हाळा वाढत गेला , येणे-जाणे वाढत गेले . एकमेकांच्या सुख -दु:खात आम्ही सहभागी होत गेलो. निमित्ताने एकत्र येत गेलो आणि मला त्यांचे ‘सासू’ असूनही “आई” सारखे प्रेम मिळाले.
‘ मुलगी शिकली , प्रगती झाली’ , ही सरकारी जाहिरात मी जेंव्हा जेंव्हा पहातो 

तेंव्हा तेंव्हा मला त्यांची आठवण होते . जाहिरातीतील हे विधान तंतोतंत खरं 

आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या अतिशय कठीण अशा काळात स्त्री शिक्षण असे नव्हतेच, पुण्याच्या नाना सावळेकरांनी त्यांच्या शांतेला ( त्यांचे माहेरचे नांव ) आणि इतर मुलीना शिक्षण दिले . आज त्याच शांतेच्या तीन मुली उच्चविद्याविभूषित झाल्या आहेत . एव्हढेच नव्हे तर त्यांच्या नातीसुद्धा उच्च विद्याविभूषित आहेत व महत्वाच्या पदावर समर्थपणे काम करीत आहेत . 

मराठवाड्यात तर स्त्री शिक्षण फारसे पुढे गेले नव्हते. ७०-८० वर्षापूर्वी लग्नानंतर 

कुमुदिनी देशपांडे ह्यांनी S.Sc. आणि Teacher's Training Course पूर्ण केला.शिक्षिकेची नोकरी केली. एखाद्या शाळेमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा ती शाळा म्हणजे एक इमारत नसते. ते एक ज्ञान मंदिर असते. त्या ज्ञान मंदिरात ज्ञान साधनेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्याचे काम करणारा शिक्षक हा एक दैदिप्यमान माणसांच्या पुंजक्यातील महत्वाचा घटक असतो . त्यांचे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात चमकत आहेत आणि आपल्या बाईना मात्र विसरलेले नाहीत. ते त्यांना आवर्जून भेटत असतात. कारण त्यांनी त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण दिले आहे .
कुमुदिनी देशपांडे ह्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या शाळेतील प्रसिद्ध 
शिक्षिका. समाजकार्याचे भान असलेल्या. त्यांनी  मराठवाडा विकास आंदोलनात सक्रीय भाग घेतला होता. १९८६ साली शाळेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी पुन्हा 
नव्याने सुरुवात केली आणि आपल्या घरातच किलबिल बालक मंदिर सुरु केले. हे लहानसे रोपटे वेगाने मोठे झाले आणि त्याचे रुपांतर ‘अनंत भालेराव विद्या मंदिर’ ह्या प्रसिद्ध शाळेत झाले आहे.
शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्या नव्या उत्साहाने कामाला लागल्या . असे जेष्ठ नागरिक फार थोडे असतात. त्यांचा लोकसंग्रह खूप दांडगा आहे. 
त्यांच्यातील नवे नवे प्रयोग करण्याची जिद्द खूप कांही सांगून जाते .  
सतत स्वतःला कामात गुंतवून ठेवणारी वृत्ती असल्यामुळे जेष्ठ नागरिक 
संघाच्या कामात सहभागी होऊन त्यांनी विविध कार्यक्रम राबविले आणि हे सर्व चालू असतानाच आपले जीवानुभव सांगणारे लेखन चालू ठेवले आहे . समृद्ध 
जीवनानुभव असल्यामुळे मराठी वर्तमानपत्रातून विविध विषयावर सातत्याने सदर लेखन केले आणि त्या  लिहितालिहिता कथाकार झाल्या. त्यांना माणसे वाचतां येतात, हे त्यांच्या कथेतील पात्रावरून दिसून येते . ती माणसे आजूबाजूची असतात , त्यांची सुखदु:खे त्यांनी जाणून घेतलेली असतात. त्यांच्या ह्या कथा विविध मासिकातून प्रसिद्ध होऊ लागल्या. आजवर  त्या चार पुस्तकांच्या लेखिका तर झाल्याच पण औरंगाबादच्या  स्त्री लेखिकांच्या साहित्य चळवळीत त्या सक्रीय सहभाग घेत होत्या . आज ९० व्या वर्षीही त्यांच्यात तोच उत्साह दिसून येतो. सामन्यातील ‘ असामान्य ‘ असलेली माणसे फारसा गाजावाजा न करिता किती मोठी कामे करीत असतात हे त्यांनी सुरु केलेल्या अनंत विद्या मंदिर ह्या शाळेच्या जवळून जाताना मला नेहमी जाणवते.

उच्च हेतूने ध्येयस्वप्ने पहात स्वतःचे आणि इतरांचे जीवन समृद्ध करणारी ही पिढी पाहिली की आपल्या जीवनाला नवी उभारी येते. आपल्याला खूप काही शिकवीत असते . त्यांची जिद्द खूप काही सांगून जाते . त्यांच्या आयुष्याच्या गोष्टीमध्ये जगण्याचा एक मोठा चित्रपट असतो. तो आपण समजून घेतला पाहिजे . त्यांचं आयुष्य साधं नव्हतं . त्यांच्या आयुष्यात गुंते तर होतेच . वैयक्तिक अडचणी होत्या. कौटुंबिक प्रश्न होते . तरीही उत्साह आणि परिश्रम ह्याच्या जोरावर त्यांनी जे यश मिळवले , त्यातून खूप कांही शिकण्यासारखे आहे.
अलीकडेच त्यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आठवणीचे पुस्तक “ स्मृतीची पाने चाळताना” प्रकाशित झाले आहे . त्यांना खूप काही सांगायचं असतं . समृद्ध जीवनाचे असंख्य अनुभव. पुढच्या पिढीने ते ऐकून घेऊन शिकलं पाहिजे. त्यांच्यासारखी माणसं वाचता आली पाहिजेत. त्यांच्या जीवनातून एक गोष्ट घेतली पाहिजे . ती म्हणजे आपण आपलं जीवन जगताना आपल्याबरोबरच्या इतरांची आयुष्ये सुखकर आणि समृद्ध केली पाहिजेत. त्या हाडाच्या शिक्षिका आहेत . “ स्त्री शक्तीच्या पाऊलखुणा “ हे त्यांचे चार बालनाटिका असलेले पुस्तक खूप लक्षवेधी आहे . त्यांच्या तीन मुली , दोन सुना आणि सहा नाती ह्यांच्याकडे जेव्हा मी पहातो तेव्हाच मी आवाक होतो आणि मला स्त्री शक्तीच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसू लागतात ,

त्यांच्या आठवणींच्या पुस्तकात आम्ही (मुले –मुली – जावई – सुना - नाती ) त्यांच्यासंबंधी लिहिलं आहे. ह्या पुस्तकात त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू दिसून येतात . एकच व्यक्ती कुटुंबातील प्रत्येकावर वेगवेगळा ठसा उमटवीत असते. आपली आई – सासू – आजी कशी आहे ह्याचा शोध घेताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असंख्य पैलू माझ्या समोर येतात.
त्यांची मोठी मुलगी डॉ कुंदा दंडारे लिहितात , “ आमच्या आईच्या आईपणाला तोड नाही. हे आईपण तिने फक्त पांचजणावरच शिंपडले नाही तर इतर ही अनेक जणांवर उधळून दिले”. त्या पुढे लिहितात, “ आई , हे माझे ‘ पहिले विदयापीठ ‘ आहे . खरं म्हणजे माझी आई म्हणजे एक ‘ मुक्त विदयापीठ ‘.
नीलिमा गंगाखेडकर ( कल्पना देशपांडे ) ही त्यांची दुसरी मुलगी एका शब्दात आईचे वर्णन करते . “ आभाळमाया” . 
त्यांच्याकरिता आईची दोन मोहक रूपे 
*  ध्रुव तार्यासारखे अढळ स्थान असणारी स्त्री 
फिनीक्स पक्षासारखी उंच भरारी घेण्याचे मनोबळ देणारी आई . 
त्या पुढे लिहितात. कंटाळा हा शब्द माहित नसणारी स्त्री , शांत आणि समजून घेणारी आई , निराशेचा सूर माहित नसणारी स्त्री , दांडगी श्रवणशक्ती असणारी शिक्षिका , मानसिक आधार कसा द्यावा ते शिकविणारी आई , मनाच्या स्पंदनातून ( वाचन  -मनन – चिंतन करून ) लेखनातून व्यक्त होणारी लेखिका , कथाकार आणि बालनाट्य लिहिणारी नाटककार , उत्तुंग मनोबल , दुर्दम्य आशावाद  , विलक्षण जिद्द आणि ध्येयवेडी असलेली स्त्री म्हणजे आमची आई. 
मंजिरी तुलसीदास कुंभारे ( पूनम ) ही त्यांची तिसरी मुलगी “ माझी माय सरस्वती ...” असा उल्लेख करून पुढे लिहितात , ‘ आई म्हणजे उत्साहाचा धबधबा . टापटीपपणा शिकावा तो आईकडूनच . खंबीरपणा , प्रचंड इच्छाशक्ती , न कंटाळता , न कुरकुरता , न चिडता सतत काम करीत रहाणे, हे शिकावे ते आईकडूनच . आईचे वैशिष्ट्य म्हणजे – सर्वासाठी सर्व केलं पण आपलं व्यक्तिमत्व मात्र जपलं .
विनय देशपांडे हा त्यांचा मोठा मुलगा . त्याला नेहमी ‘ आई काय म्हणाली ? ‘ , ह्या पेक्षा ‘ आई –काका काय म्हणतात ?’ असाच प्रश्न पडत असे . त्याला त्याचे आई –काका म्हणजे हायड्रोजनच्या अणूसारखे एकरूप वाटत असत. पती –पत्नीची विलक्षण एकरूपता त्याला दिसते . आई-काकाच्या प्रकृती भिन्न , प्रवृत्ती भिन्न . तरीही एकरूपता वाखाणण्यासारखी . माणूस जोडणे हा त्यांचा एक मोठा गुण. त्याला आपली आई ही विचाराने काळाच्या पुढे असणारी स्त्री वाटते.
केदार देशपांडे हा त्यांचा धाकटा मुलगा . उद्योजक आहे . तो दोन शब्दात आईचे वर्णन करतो . ‘Social Entrepreneur’ . स्वत:च्या कारखान्यात तो जपानी TPM कार्यप्रणालीचा वापर करतो . तेंव्हा त्याच्या  लक्षात येतं की ही प्रणाली तर तो आईकडूनच शिकला . मोठी मुलगी “ पहिले विदयापीठ “ असा आईचा उल्लेख करते तर धाकटा मुलगा आईला “ Management Guru “ असे मानतो. निवृत्तीनंतर सुखाने उर्वरित आयुष्य न जगता नव्या शाळेची उभारणी करणाऱ्या कुमुदिनी देशपांडे ह्या खर्या Social Entrepreneur आहेत.
त्यांचे मोठे जावई डॉ मधुकर दंडारे ह्यांना प्रश्न पडतो , “ ह्या बाईना एवढा उत्साह येतो कुठून ? “ . ते पुढे लिहितात , “ ह्या बाईना ‘ वयस्कर ‘ असे कधी मी बघितलेच नाही ‘. नाविन्याचा लोभ असणारी व मूर्तिमंत नेटकेपणा असणारी ही स्त्री म्हणजे एक वेगळे व्यक्तिमत्व आहे.
मोठी सून कीर्ति विनय देशपांडे लिहितात , “ सासू नव्हे आई “. ‘घराला घरपण कसं द्यावे’,  ह्याचे पहिले धडे मी माझ्या सासूकडूनच शिकले असे त्या आवर्जून सांगतात . सासूची सुनेला भीती न वाटणे ह्यातच त्यांचे वेगळे सासूपण त्यांना दिसून येतं.
धाकटी सून बकुळ केदार देशपांडे . त्यांचे आणि सासूच्या वयातील अंतर ४५ वर्षाचे . दोन पिढ्यांचे अंतर  असणार्या ह्या सासू – सुना . जनरेशन ग्याप. सर्वच बाबतीत . त्या सासूकडून Event Management शिकल्या . संघर्ष न करिता  संसाराची सूत्रे हातात सोपविणारी सासू त्यांना मिळाली . असे करताना त्यांनी पुन्हा स्वतःला समाजकार्यात गुंतून  घेतलं हे त्यांचे वेगळे व्यक्तिमत्व वाटते.
डॉ क्षितिजा कुलकर्णी ही त्यांची नात लिहिते , “ लहानपणी आजोळी जायचे  म्हणजे  खरं ‘व्हेकेशन ‘.  नातवंडाना असे वाटणे ह्याचे सारे क्रेडीट आजीलाच . आजीची घरासमोरील  सुंदर बाग , गुलाबाचे ताटवे, बोगन वेलीची कमान , पेरूचे झाड , प्राजक्ताचा सडा ... असं त्या तिथे पलीकडे .... असलेलं सुंदर घर आजही वाकुल्या दाखवीत बोलवीत असतं .ते आजही स्वप्नघर आहे . ही नात पुढे लिहिते की आजीचा निवृत्ती नंतरचा उत्साह पाहिलाकी आम्ही नातवंडे अचंबित होतो. माझी आजी म्हणजे आम्हा आजच्या स्त्रियासाठी रोल मॉडेल आहे . स्त्री स्वातंत्र्याचे बाळकडू पाजणारी माझी आजी असा विशेष उल्लेख क्षितिजा करते .
पल्लवी गणेश देशपांडे ही डोंबिवलीला वास्तव्य करणारी नात लिहिते ..’ माझी आजी म्हणजे माझी प्रेरणा “ . आजीचा उत्साह दांडगा आहेच. प्रेमळ , लाघवी , व्यवस्थितपणा , नीटनेटकेपणा  ह्या सर्वांचे संस्कार न कळत करणारी आजी म्हणजे आमचे खरे प्रेरणास्थान .आम्ही सामाजिक बांधिलकीचे धडे नकळत शिकलो  ते आजीकडूनच. आधुनिक विचारसरणी आणि परंपरा ह्यांची उत्तम सांगड घालणारी ही वेगळी स्त्री .
फ्लोरिडा हून ऋतुगंधा हृषीकेश नूलकर लिहिते की तिला कायम आठवते ते उन्हाळ्याच्या सुट्टीतील आजोळी जाण्याची गंमत . सकाळी परडीभर फुले गोळा करणे , आजीने केलेली साबूदाणा खिचडी खाणे वगैरे . आजही आजीसारखी पुरणपोळी करता येत नाही ह्याचे तिला वाईट वाटते . आजीचे “ किलबिल” बालक मंदिर तिला नेहमी आठवते . जेव्हा मी माझ्या मुलांना डेकेअर मध्ये सोडायला जाते तेव्हा मला आठवते ते आजीचे किलबिल बालक मंदिर . माहेरी आलेल्या मुलीपेक्षा नातीचेच जास्त लाड  करणारी आजी ! एक उत्साह मूर्ती !

सोहम विनय देशपांडे लिहितो , “  I am sure every grandmother loves 
her grandchildren but my Aaji is on a whole different level because her love for her family will always be measured as an  infinite even by the measurement which is used to measure the area of the universe.”
अनुप्रिता भाले त्यांच्या सहवासात आली ती डीटीपीचे काम करून देणारी संगणक सहाय्यक म्हणून . ती म्हणते , ' नाते माझे व आजीचे' -  ते कायम बहरत राहील. कारण आजीच्या स्वभावातील आपलेपणा , प्रेम आणि माणसं जोडण्याची कला मला त्यांच्या जवळ नेते . 
अशा ह्या नव्वद वर्षाच्या कुमुदिनी देशपांडे . त्यांच्याबद्दल आमची एकच तक्रार आहे . त्या स्वतः वयस्कर कधीच होत नाहीत आणि आम्हा सर्वाना होऊ देत 
नाहीत . त्यांचा उत्साह पाहून आम्ही वयस्कर होऊ शकत नाहीत हेच खरं !
त्यांच्याकडे पाहिलं की खालील काव्यपंक्ती आठवतात .....

What you are is God’s gift to you.

What you are going to make of yourself

Is your gift to God !

'स्मृतीची पाने चाळताना'  आणि 'स्त्री शक्तीच्या पाऊलखुणा' ह्या कुमुदिनी देशपांडे ह्यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन जयदेव डोळे आणि रामकृष्ण जोशी  करीत असताना .



   

No comments:

Post a Comment