Tuesday, April 18, 2017

आपण साधी सामान्य माणसं कशी असतो?


कुणावर तरी जमलं तर प्रेम करतो. नव्या फ्याशन प्रमाणे कपडे घालतो. देशप्रेमाच्या गप्पा मारतो. राजकारणावर चर्चा करतो. जीवनमान किती महागले ह्या विषयावर तासनतास वादविवाद करतो. आपली केश रचना बदलतो. देव- देव करतो. नित्य नेमाने देवळात जातो. परमेश्वराकडे क्षमा याचना करतो. गर्वाने राहतो, मुलांना आपल्या पावलावर पावले पाडण्यास सांगतो. नव्या जास्त पगाराच्या नोकर्या शोधतो. आपल्या शिक्षणाचा उपयोग करून घेतोच असे नाही. बहुधा आपल्या शिक्षणाचा व नोकरीचा काहीं संबंध नसतोच. आपण आई –वडिलांना दु:खी-कष्टी करतो. न कळत दुरावतो. कधी कधी संगीतात रमतो. कधी कधी नाटक सिनेमा पहातो. रिमोटने टीव्हीचे प्रोग्राम बदलतो. फेसबुकवर पिचकारी टाकतो. खूप बडबड करतो, तेच आपल्या आयुष्याचे सार . हेच आपले जगणे. म्हणजे आपण सतत मरत असतो. मरत मरत जगत असतो . असं आपलं जगणं असतं. दु:खाची अनेक कारणे असतात. प्रेम आहे पण लग्न नाही. लग्न आहे पण प्रेम नाही. संसार आहे पण सुख नाही म्हणून जीवनात आनंद नाही. मुलं आहेत पण त्यांच्यापासून त्रास आहे. ते शिकत नाहीत. बेकार आहेत. त्यांची लग्नं होत नाहीत किंवा म्हणावा तसा पैसा कमवीत नाहीत. तर काहीना मुलं  नाहीत म्हणून एकटेपणा असतो.  काहीच्याजवळ पैसा आहे पण आनंद नाही तर काहीच्याजवळ  पैसा नाही म्हणून अनेक विवंचना असतात. सत्ता आहे पण लोकप्रियता नसते. लोक मागे असतात पण सत्तेचे गणित जमत नाही. घर असते पण घरपण नसते. लग्न होते पण दाम्पत्य सुख नसते. अशा ह्या अनेक जणांच्या अनेक चिंता. काहीजण अजूनअजूनच्या मागे लागतात आणि अति व्यस्त झाल्यामुळे अधिक दु:खी कष्टी होतात.
दिवस येतात नि जातात. सूर्य वेळच्या वेळी उगवतो. अंधार संपतो. उजेड होतो. महिनेही उलटतात. उन्हाळे-पावसाळे निघून जातात. न कळत वय वाढत जाते. तरुणाई संपते. संध्याछाया जाणवू लागतात. जगण्याचे नवे प्रयोजन शोधण्यासाठी आपण जगू लागतो. मनाची उभारी नाहीशी झालेली असते. जीवनाची निरर्थकता जाणवू लागते. शरीर आणि मन एकमेकाला थकवू लागतं.
आपण मध्यमवर्गीय माणसे नेहमी हजार चिंतांनी आपले डोके खाजवीत असतो. नको त्या गोष्टीवर विनाकारण अवास्तव विचार करीत बसतो. ही चिंताच आपल्याला खात असते. निराश करते. त्रास देते. ह्या चिंतेपासून दूर होण्यासाठी मन रिझवले पाहिजे.
“वेळ पाहून खेळ मांडणे” प्रवृत्तीची माणसे अनेक गोष्टी सहज साध्य करू शकतात, स्वभावातील ही लवचिकता हा गुण की दुर्गुण. Non-compromising attitude असलेली माणसे जगतांना खूप काहीं त्रास सहन करतात. शासकीय नोकरीत आणि राजकारणात अशी माणसे कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. ह्या स्वभावामुळेच अनेक गोष्टी जमू शकत नाहीत.
Deviating Personality असलेली माणसे वेगळी असतात. मी म्हणतो तीच पूर्व दिशा म्हणणारी माणसे हट्टी असतात. “ मीच ठरविणार दिशा वाहत्या पाण्याची” अशी त्यांची वृत्ती असते. स्वतःवर असलेला पूर्ण विश्वास चांगला आहे पण दुसर्या कोणाचे मत जाणून न घेणे म्हणजे हेकेखोरपण आहे. असा माणूस एकटा असतो. व त्याला एकटेच लढावे लागते. ह्यामुळे आपलेच नुकसान होते हे उशिरा लक्षात येते. वेळ निघून गेलेली असते. एकदा घेतलेला निर्णय. मग त्यासाठी वादळातून चालणारी बोट सोडून देता येत नाही. किनारा गाठणेच महत्वाचे असते.लढणे हाच एक उपाय असतो.
डोंगर चढून जाताना आपण उंचीचाच विचार करतो पण एकदा उंचावर गेले की आपल्याला खोलीच दिसून येते. संपूर्ण उंची गाठता आली नाही तर मर्यादित उंचीवर भक्कम पावले रोवित जाणेच योग्य. यशाचे असेच असते. ते टप्प्या टप्प्यानेच मिळविले पाहिजे. त्यातून समाधान मिळते. आणि जेंव्हा वैफल्याची अवस्था असते तेंव्हा आपल्याला जाम कंटाळा आलेला असतो. काहींच करू नये असे वाटते आणि आपण निष्क्रिय होतो. हा कंटाळाच (Killing) मारक  असतो. आपण आपल्यातील Frustation  थांबवले पाहिजे. उत्साहासाठी आनंदी असणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी जगण्यातील आनंद शोधावयास हवा. मन दुसर्या कशात रमविले पाहिजे . त्यासाठी जगण्याची त्रिज्या वाढविली पाहिजे. इतर अनेक गोष्टीत रस घेतला पाहिजे. बहुविध विषयात रस निर्माण केला पाहिजे व व्यक्तिमत्व बहुविध विद्या पारंगत असले पाहिजे.
पंढरपूरला वारकरी जातात तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. कितीतरी चिंतांचे गाठोडे त्यांच्या डोक्यावर असते. ते सारे विसरून ते कसे विठ्ठलाच्या ओढीने चालत असतात. चंद्रभागेचे दर्शन होताच आणि मंदिराचा कळस दिसताच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. अगदी निरागस बालकाचा आनंद असतो तसा हा आनंद.
आपण मध्यमवर्गीय  माणसे अनेक चिंतांनी डोके खाजवीत बसतो. नको त्या गोष्टीवर विनाकारण अवास्तव विचार करीत बसतो. ही चिंताच आपल्याला खात असते. अशावेळी कसल्यातरी कामात मन रमवले पाहिजे . गाणे ऐकणे , सिनेमा बघणे , बाहेर फिरावयास जाणे, पक्षी निरीक्षण करणे , बागकाम करणे , मुलात रमणे, गप्पा मारणे , मन मोकळे करून बोलणे. आपण मोर व्हायला पाहिजे. आनंदाने नाचावयास शिकले पाहिजे. हळवे मन सुंदर असते. शहाणे असते.आपण सौंदर्याचा पुजारी असावयास हवे. निसर्ग सौंदर्यात रमले पाहिजे. कवी नसलो तरी कवी व्हायला पाहिजे. रम्य क्षण जगले पाहिजेत. जखम झाली तरी फुंकर घालता आली पाहिजे. आपल्याला आपले जगणारे क्षण इतरांच्या बरोबर share करता आले पाहिजेत. जगण्याला प्रयोजन शोधले पाहिजे.रिमझिम पावसात भिजलो की आपल्याला त्रास वाटत नाही. अजून भिजावेसे वाटते. त्याचा ताप वाटत नाही. प्रश्न समोर असतातच.उत्तर ही शोधता येते. चुकले तरी प्रश्न नीट समजतो व योग्य ते उत्तर मिळतेच. त्यामुळेच जगणे हे एक सुंदर गाणे होते. जगण्याची कविता होते. त्यासाठी कवी असण्याची गरज नसते. ह्या जगण्यावर प्रेम करताना न कळत आपण प्रेम कवी होतो.       

1 comment:

  1. फारच सुंदर वास्तव मांडल आहे,,शैली ओघवती आहे,,अप्रतिम

    ReplyDelete