Thursday, October 15, 2015

स्वेतलाना एलेक्सीविच : नोबेल (साहित्य) पुरस्कार २०१५

स्वेतलाना एलेक्सीविच ह्यांना ह्या  वर्षीचे साहित्याचे नोबेल मिळाले आहे. बेलारुसची असलेली ही लेखिका शोधपत्रकार आहे. त्यांचे लिखाण म्हणजे पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमधील लोकांनी जे अतोनात दु:ख सहन केलं आणि असामान्य धैर्य दाखविलं त्यांची ही दर्दभरी कहाणी आहे. हे लिखाण म्हणजे कथा –कादंबरी नव्हे. अफगाणिस्तान मधील सोव्हिएत लढाई , सोव्हिएत साम्राज्याची झालेली पडझड आणि चेर्नोबिलचा अणुशक्ती अपघात व त्याचे भयंकर परिणाम ह्या विषयावरील अभ्यासपूर्ण लिखाण ह्या अस्वस्थ असलेल्या लेखिकेने जगासमोर मांडले आहे . ह्या पुस्तकातून त्या भागातील लोकांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला जावा म्हणून केले गेलेले लिखाण . ह्या सर्व घटना घडताना तेथील लोकांच्या भावभावनांचा जो कल्लोळ झाला त्याचे विदारक व हृदयस्पर्शी चित्रण ह्या पुस्तकातून होतें . त्यांनी रशियन भाषेतून ३  पुस्तके लिहिली आहेत. स्प्यानीश व इटालियन भाषेतून ही पुस्तके उपलब्ध आहेत. अमेझॉनवर इंग्रजी भाषेतील पुस्तकाकरिता माहिती शोधली पण ती उपलब्ध नाहीत. ते इंग्रजी भाषेत आजतरी उपलब्ध नाही. 

“ मला माहीत नाही की मी कशाबद्दल बोलू – मरण की प्रेम ? दोन्हीही एकच तर नाही ना ? कशावर बोलायचं ? हा मला पडलेला प्रश्न” १९९७ मध्ये चेर्नोबिलच्या अणु अपघाताबद्दल लिहिताना त्यांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया. 
नोबेल जाहीर झाले तेव्हा बोलताना जी प्रतिक्रिया दिली ती खूप काही सांगून जाते. ती अशी ....

सध्या जगण्याचा इतका वेग आहे की आपल्याला विचार करावयास वेळच मिळत नाही. आपल्या बाजूला जे वास्तव आहे त्याचा अगदी थोडासा भाग आपल्या माहितीचा असतो. त्यामुळे आपल्याला फार थोडेच समजते . माझे लिखाण हे असेच आहे. आजूबाजूला जे दिसलं त्याचे हे त्या वेळचे चित्रण आहे. तो त्या माणसांच्या भावभावनांचा आवाज आहे.

मी जे बघितले ते वेदनादायक होतं .माझ्या आजूबाजूची परिस्थिती भयावह होती. असह्य होती. आम्ही त्या परिस्थितीचे बळी होतो. आमच्या कुटुंबाने , आमच्या आजूबाजूच्या लोकांनी हे जागतिक युद्धानंतरचे आयुष्य पाहिले आहे , भोगले आहे. प्रत्येकाची सांगण्यासारखी एक वेगळी गोष्ट आहे . त्या परिस्थितीमध्ये ते काय आणि कसे जगले ह्याची ही कहाणी आहे. त्यांचे ते दु:ख आहे. हिटलरच्या छळ छावन्यावर लोकांनी कां लिहिलं ? ते त्यांनी भोगलं . त्यांना ते सांगावेसे वाटलं . मला ही तसेच मी जे पाहिलं ते सांगावेसे वाटते म्हणून मी लिहिते. ह्या वेदनामय जीवनातून आमची पूर्ण सुटका होऊन आम्ही स्वतंत्र का होऊ शकत नाही हा मला पडलेला प्रश्न आहे. आम्ही भीतीयुक्त वातावरणातून कधी बाहेर पडू ? हे मला भेडसावते.


अगदी जवळच्या मित्राशी बोलता यावे असे मला वाटते . म्हणून मी जे लिहिते ते माझे मनोगत माझ्या मित्राकरिता असते. मला जे आयुष्य दिसले ते त्यांना सांगावेसे वाटते. मी स्वत:ला न्यायाधीश समजत नाही. ती माझी भूमिका नसते. आपण ह्या भयानक भीतीयुक्त वाटेवरून किती दिवस चालू शकू?  हा मला पडलेला खरा प्रश्न आहे. त्यामुळे काव्यात्म शोकांतिका मला त्रास देते. ती सतत माझ्याबरोबर असते, लोकांच्या डोळ्यात अश्रू यावेत म्हणून मी हे लिहित नाही तर डोळ्यातील अश्रुना स्वच्छ ( Purifying Tears )करावे म्हणून मी लिहिते. सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करता यावा म्हणून हा लिखाण खटाटोप. 
इतकी स्वच्छ भूमिका समोर ठेऊन लिखाण करणारी ही लेखिका.
  
स्वेतलाना ह्या स्टालीनस्लाव ह्या पश्चिम युक्रेन मधील गावात जन्मल्या. वडील बेलारसियन तर आई युक्रेनची. आई-वडील दोघेही शिक्षक . शाळेत असतानाच लिखाणाची आवड निर्माण झाली. काही दिवस एका ग्रामीण शाळेत शिक्षिकेची नोकरी केली व त्यानंतर मिन्स्क विद्यापीठात पत्रकारितेचा अभ्यास केला. १९७२ ला पदवी मिळाल्यावर बेरेसा आणि मिन्स्क येथे पत्रकार म्हणून काम केलं. Neman ह्या साहित्य विषयाला वाहिलेल्या मासिकात नोकरी केली. एका ९ मजली इमारतीमध्ये वास्तव्य केलं. गुप्तहेर संघटना त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. त्यामुळे महत्वाच्या गोष्टी बोलण्यासाठी फक्त स्वयंपाकघर वापरत असत.

त्यांचे पाहिलं पुस्तक “ I Have Left My Village “ हे कम्युनिस्ट विरोधी असल्यामुळे जप्त करण्यात आलं. ते पूर्णपणे नष्टही केलं गेलं. १९८३ मध्ये “ War’s Unwomanly Face “ हे पुस्तक लिहिलं. दुसऱ्या महायुद्धातील शेकडो स्त्रियांच्यावर जे संकट आलं आणि त्यांनी जे भोगलं त्यावर लिहिलेलं हे पुस्तक.  लिहिल्यानंतर दोन वर्षांनी ते प्रसिद्ध झालं. त्या पुस्तकातील महत्वाचा भाग सेन्सॉरच्या कात्रीत सापडला आणि बराचसा गाळून टाकण्यात आला. ह्या पुस्तकांची फारशी विक्री झाली नाही. २० वर्षानंतात त्यांनी ते पुस्तक पुन्हा लिहिलं आणि गाळून टाकलेला भाग पुन्हा लिहून काढला . कम्युनिस्ट राजवटीत लिखाण स्वातंत्र्यावर कशी बंधने होती हे त्यावरून लक्षात येते.  

Zinky Boys ( १९८९) हे पुस्तक सोव्हिएत -अफगाण युद्धावर लिहिलं होतं, सोव्हिएत संघ  ह्या युद्धानंतर फुटला. त्या युद्धातील लष्करी अधिकारी , सैनिक , त्यांच्या बायका आणि मुले , त्यांचे आई- वडील ह्यांच्या मुलाखती घेऊन ती युद्ध कहाणी चित्रित केली. ज्या सैनिकांच्या प्रेत पेट्या रशियात पोहोचल्या आणि त्या कुटुंबातील लोकांनी जे काही सहन केलं त्याची करूण कहाणी त्यांनी ह्या पुस्तकातून मांडली. “ मला कसलीही राजकीय चर्चा करावयाची नाही. जर तुमची राजकीय चूक झाली असेल तर मला माझे तुटलेले पाय परत करा.” , हे एक सैनिक बोलून दाखवितो तेव्हा युद्धाचे परिणाम कसे भोगावे लागतात हे अनेक सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या करूण कहाण्या ऐकल्यानंतर लक्षात येतं.  अफगाणिस्तानच्या लढाईत ठार झालेल्या मुलाची आई आणि तिचा आक्रोश आणि काबुल येथे वेडा झालेला एक लष्करी अधिकारी आणि त्याची कहाणी ऐकून त्या सुन्न झाल्या आणि त्यांनी ह्या युद्ध कहाण्या लिहिल्या. रशियातील केजीबीला ह्या गोष्टी लोकांच्या समोर येऊ नयेत हे वाटल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर खटले भरण्याचे ठरविलं. सोव्हिएत आर्मीच्या विरोधी हे कटकारस्थान आहे म्हणून त्यांच्यावर दबाव आणला गेला. त्यांचे साहित्य जप्त केलं गेलं.  
त्यांचे लिखाण हे शोध पत्रिके सारखं आहे. ते ललित साहित्य नाही. ते संशोधन करून , अनेकांच्या मुलाखती घेऊन , प्रत्यक्ष पाहणी करून जगापुढे मांडलेला भावना कल्लोळ असलेला रिपोर्ट आहे .युद्धामुळे असहाय झालेल्या  आणि अतीव दु:ख , वेदना सहन केलेल्या माणसांचा तो शोध आहे . ह्या माणसांच्या आशा आणि  त्यांना वाटणार्या भीतीचा इतिहास आहे. चारचार वर्षे संशोधन करून ह्या माणसांचे आयुष्य समजून घेतलं आहे. त्यात माणसांच्या भाव भावनांचा कल्लोळ दिसून येतो . हे त्या राजवटीचे विदारक चित्रण आहे, त्यात मन हेलावून टाकणारे अमानवी प्रसंग आहेत.शेकडो लोकांच्या आर्त भावनांचा पडसाद त्यांनी शब्दबद्ध केला आहे. इतिहास फारसा महत्वाचा नाही तर त्या लोकांचे त्यावेळचे जगणे अधिक त्रासदायक होतं हे जगाला कळावं म्हणून त्यांनी केलेलं हे लिखाण आहे. चेर्नोबिलची कथा १०७ लोकांची प्रत्यक्ष पाहिलेली करूण कहाणी आहे. त्यांच्या वेदनांचा इतिहास आहे. त्यांच्या बहिणीच्या तोंडून त्यांनी  ऐकलेल्या हृदयद्रावक कहाण्या आहेत. “ Your cow sends radiation to my cow “, ही प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे. फेरीटेल वाटाव्या अशा अनेक भयानक  गोष्टी आहेत. “I often thought that the simple fact, the mechanical fact , no closer to the truth than a vague feeling , rumor , vision “ असं त्या प्रसंगाचं  वर्णन त्या करतात.
  
इ.स. २००० मध्ये त्यावेळच्या राजवटीतील दिल्या गेलेल्या  जाचामुळे त्यांनी त्यांचा देश सोडला. त्यांचे लिखाण त्यांच्या देशात प्रसिद्ध होऊ शकलं नाही . Soros Foundation ह्या संस्थेमुळे ते रशियन भाषेत प्रसिद्ध झालं आणि ग्रंथालयात पोहोचलं .पुढे इंग्रजीत आणि इतर युरोपियन भाषात भाषांतरे झाली. 
 Paris, Gothenburg आणि Berlin येथे काही दिवस वास्तव्य केल्यानंतर २०११ मध्ये त्या बेलारुसला परतल्या. त्या स्वत:ला रशियन किंवा बेलारसियन लेखिका समजत नाहीत. ‘I would say I am writer of that epoch, the Soviet utopia, writing the history of that utopia in each of my books’.

2014 मध्ये ‘Le Monde ‘पुस्तक लिहिलं. त्या म्हणतात , ‘That the annexation of Crimea to Russia revealed the country’s return to fundamentalism, to dream of being a great empire and inspire fear. – Empty shelves in stores and long lines for toilet papers may be things of past in Russia, but affluence never led to democracy in Russia. It only helped an imperialistic mindset resurface “. रशियन राजवटीवर व्यक्त केलेलं हे भाष्य साम्यवादी विचारसरणीने लोकांच्या जीवनात फरक पडला नाही हे तर दर्शवितेच पण लोकशाही आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करते .

गेल्या २० वर्षातील रशियातील राजकीय सामाजिक घटनाबद्दल बोलताना त्या पोलंड येथील कार्यक्रमात म्हणाल्या , ‘My book is not hopeless . It describes the strength of human spirit. But I cannot find answer to one question. Why do our sufferings, our grandfathers’ sufferings not convert into freedom? ‘.
साम्यवादी राज्यव्यवस्थेत विचार स्वातंत्र्याची जी गळचेपी होती ती जगापुढे मांडणारी ही लेखिका म्हणूनच वेगळी आहे. नोबेल पुरस्कार देऊन  तिचा योग्य असा गौरव झाला  आहे.  

 



6 comments:

  1. फार सुंदर ओळख करून दिली आहे. धन्यवाद

    ReplyDelete
  2. त्या त्या वेळी घटणार्या घटनांच् चित्रण हे एक स्वच्छ दृष्टी देणार माध्यमच आहे। शासकीय बळजबरी व्यक्तीला एक तर ताकदवान , सहनशील किंवा फक्त किड्याच जीवन जगायला शिकवते।स्वेतलनाच्या लिखाणाची माहिती उद्बोधक आहे।

    ReplyDelete
  3. त्या त्या वेळी घटणार्या घटनांच् चित्रण हे एक स्वच्छ दृष्टी देणार माध्यमच आहे। शासकीय बळजबरी व्यक्तीला एक तर ताकदवान , सहनशील किंवा फक्त किड्याच जीवन जगायला शिकवते।स्वेतलनाच्या लिखाणाची माहिती उद्बोधक आहे।

    ReplyDelete
  4. त्या त्या वेळी घटणार्या घटनांच् चित्रण हे एक स्वच्छ दृष्टी देणार माध्यमच आहे। शासकीय बळजबरी व्यक्तीला एक तर ताकदवान , सहनशील किंवा फक्त किड्याच जीवन जगायला शिकवते।स्वेतलनाच्या लिखाणाची माहिती उद्बोधक आहे।

    ReplyDelete
  5. मस्त लेख, लेखिकेबद्दल बरंच काही कळलं.....

    ReplyDelete
  6. Very good insight about Svetlana's literacy work.

    ReplyDelete