औरंगाबादच्या आठवणी - २
औरंगपुऱ्यातून खडकेश्वरकडे जाणारा रस्ता . माझ्या अनेक आठवणींचा एक धबधबा. १९५७ ते १९६८ पर्यंतचा तो काळ . माझे शालेय जीवन आठवले की मला हा परिसर आठवतो .
आज जिथे जिल्हा परिषदेचे कार्यालय आहे त्या इमारतीत आमची शाळा होती. न्यू मिडल स्कूल , औरंगाबाद . त्यावेळची एक दिमाखदार इमारत . चित्रात जी इमारत दिसते आहे , त्याच्या उजव्या बाजूला एक छोटी इमारत आहे . तेथे आमचा ६ वीचा वर्ग भरत असे . प्रत्येक वर्गाच्या ३ किंवा ४ तुकड्या होत्या . मी ६ वी ( क ) मध्ये होतो. प्रवेश देतांना हुशार मुलांना निरनिराळ्या तुकड्यात प्रवेश देत असत . एकाच वर्गात हुशार मुले नसत . त्यामुळे तुकड्यामध्ये स्पर्धा असे. ६वी (अ )मध्ये सतीश गोटे, ६ वी (ब ) मध्ये मधुकर दंडारे तर ६ वी (क )मध्ये मी होतो . आमच्यात चांगली स्पर्धा असे. लेंभे सर आमचे मुख्याध्यापक होते . ते एक आदर्श शिक्षक होते .
आजही त्यांची ती मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. निवृत्त झाल्यावर ते देवगिरी महाविद्यालयाच्या शिक्षण संस्थेत प्रशासनात होते. त्या संस्थेने मराठवाड्यात इतरत्र महाविद्यालये सुरु केली होती. मी एम. एस सी. झालो . प्राध्यापकीच्या शोधात मुलाखतीला जात होतो. एका मुलाखतीला लेंभे सर समोरच्या निवड करणाऱ्या मंडळात बसलेले होते . माझी मुलाखत चांगलीच झाली. मी मराठवाडा विद्यापीठात दुसरा आलो होतो. मला त्या संस्थेत प्राध्यापकी मिळाली नाही . कारण मी होतो ब्राह्मण. आमच्याच बॅचचा ३ रा आलेला व मराठा असलेला विद्यार्थी निवडला गेला . त्यानंतर लेंभे सर एकदा मला औरंगपुऱ्यात भेटले . ते म्हणाले , ‘ खरं म्हणजे , तुलाच ती पोस्ट मिळायला पाहिजे होतं . मी काहीही करू शकलो नाही. नरेंद्र ,हे असेच आहे. तुला सर्व कल्पना आलेलीच असेलच’. मी त्यांना काय बोलणार ? मला परभणीच्या कृषी महाविद्यालयात प्राध्यापकी मिळाली होती, हे ऐकून त्यांना आनंद झाला. मी तेथे दीड महिनाच होतो . नंतर मुंबईला भाभा अणू संशोधन केंद्रात एका ट्रेनिंगसाठी माझी निवड झाली . माझे औरंगाबाद सुटले ते सुटले .
लेंभे सरांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिले होते . वादविवाद स्पर्धा असो की नाट्यस्पर्धा .शाळा सर्व स्पर्धात भाग घेत असे . ‘ नवे पाऊल’ हे साक्षरतेवर आधारलेले नाटक आम्ही सादर केल्याचे आठवते . रानडे वादविवाद स्पर्धेतही भाग घेऊन मी बक्षिसे मिळविली होती. न्यू मिडल स्कूल ही एक आदर्श शाळा होती. सुरुवातीला आमची फीस फक्त चार आणे होती . हुशार विद्यार्थ्यांना महिना ६० रु शिष्यवृत्ती होती. म्हणजे मला शिकण्यासाठी पैसे मिळत होते . शाळेचा परिसर सुंदर होता .शाळेसमोर गोलाकार बाग होती. मागच्या बाजूला मोठे मैदान होते. शेजारीच मुलींचे सरकारी हायस्कूल होते . आमच्या शाळेच्या इमारतीतच पुढे मराठवाडा विद्यापीठ सुरु झाले . माझे एम. एससी.चे पहिले वर्ष त्याच इमारतीत झाले. समोरच्या इमारतीच्या मागे शेड्स बांधल्या होत्या. तेथेच आमची फिजिक्स लॅब होती. त्यामुळे ही इमारत माझ्याकरिता विद्येचे मंदिरच होते . अशा अनेक आठवणी ह्या इमारतींशी जोडलेल्या आहेत .
एकेकाळचे न्यू मिडल स्कूल आणि सुरुवातीचे मराठवाडा विद्यापीठ ह्याच इमारतीत होते. माझा त्या इमारतींशी आणि परिसराशी जवळचा संबंध होता म्हणून ही इमारत मला आजही खूप आवडते .
औरंगपुऱ्याचा रस्ता खडकेश्वरकडे जातो . खडकेश्वर येण्यापूर्वी उजव्या बाजूला नाला ओलांडून गेलं की एक प्रचंड मोठे मैदान लागते. तेथे आतां भले मोठे क्रीडा संकुल उभे आहे. त्याच्या मागे जी इमारत उभी आहे ती म्हणजे आमचे त्यावेळचे सरकारी मल्टीपर्पज हायस्कूल . एकेकाळी निझामाच्या राज्यात ते सिटी कॉलेज होते. पदवीपूर्व शिक्षण तेथे मिळत असे. त्यानंतर पदवी शिक्षणासाठी हैद्राबादला जावे लागत असे. आमचे मल्टीपर्पज हायस्कुल ते हेच .११ वी पर्यंत ह्या शाळेत शिकलो. आम्हाला नवा अभ्यासक्रम सुरु झाला होता . एस. एस. सी.( दहावी matric) पेक्षा वेगळा . एच .एस.( एम पी) एस.सी . ११वी नंतर सरळ पदवीच्या पहिल्या वर्षात प्रवेश असे . नो पीयूसी . आठवीलाच ऐच्छिक विषय ठरवायचे. पीसीएम , पीसीबी , आर्ट्स किंवा टेक्निकल . मी टेक्निकल ऐच्छिक निवडले होते . ह्या विषयात सिव्हिल - मेकॅनिकल - इलेक्ट्रिकल - workshop - इंजिनिअरिंग ड्रॉईंग हे ऐच्छिक विषय होते. शाळेच्या मुख्य इमारतीच्या मागे आमचा वेगळा विभाग होता. भोळे सर आमच्या विभागाचे प्रमुख होते. आम्ही जे शिकत होतो ते पाहून आम्ही इंजिनिअर झालो असेच आम्हाला वाटू लागले. पुढे आमचा स्वप्नभंग झाला. ‘ आहे मल्टीपर्पज पण एकही पर्पज पूर्ण न करणारा हा अभ्यासक्रम बंद करा’ असा एक लेख मी मराठवाडा साप्ताहिकात लिहिला होता. नंतर तो अभ्यासक्रम बंद झाला. दोनचार बॅचचे नुकसान झाले ते झाले. तेंव्हाच्या मुदलियार कमिशनने शिफारस केलेला तो अभ्यासक्रम नंतर बंद झाला. आम्ही मात्र इंजिनिअर होण्याचे राहिले . अभ्यासक्रम चांगला होता पण पुढील शिक्षणासाठी त्याची जोड जमली नव्हती . एकमात्र झाले. मी थोडासा टर्नर, फिटर, इलेक्ट्रीशीअन, ब्लॅक स्मिथ , ड्रॉईंग काढणारा झालो. ते काम आजही मला छान जमते .
ह्या शाळेत शिक्षक फार चांगले होते . इंग्रजी - मराठी - हिंदी हे त्रिभाषा सूत्र . प्रत्येक भाषा विषय २०० मार्काचे. चार पुस्तके एका भाषेची. गद्य-पद्य- कथा- कादंबरी - व्याकरण ह्याची पुस्तके. हरी नारायण आपटे ह्यांची ‘ मी’ कादंबरी आमच्या अभ्यासक्रमात होती. त्यामुळे आम्ही थोडेसे ‘ समीक्षक’ झालो. उजळंबकर सर आम्हाला इंग्रजी शिकवीत . त्यांचा इंग्रजी क्लास जोरात चाले . मला ते काही फीस न घेता शिकवीत. नव्हे त्यांनी मला त्यांच्या क्लासला आमंत्रित केले होते .आज जे थोडेफार इंग्रजी येते ते त्यांच्यामुळेच . अफजलखान नावाचे दुसरे एक इंग्रजी शिक्षक होते. खूप जाडे. ते छान शिकवीत असत . वली महंमद आमचे मुख्याध्यापक होते . गोरेपान . शेरवानी घालून येत . जिना टोपी घातलेली असे. दरारा होता त्यांचा. ते ऐटीत शाळेत फेरी मारीत असत. निझामी राजवटीतला त्यांचा तोरा होता .
आज आमच्या शाळेच्या इमारतीत महाराष्ट्र शासनाचे दुसरेच एक कार्यालय सुरु झाले आहे असे दिसते . ती शाळा सुद्धा राहिली नाही . भडकल गेटच्या जवळील ती देखणी इमारत पाहिली की जुन्या आठवणी जाग्या होतात . आयष्याला एक पर्पज देणारी आमची मल्टिपर्पज शाळा. टेक्निकल शिक्षण देतानाही भाषा विषयात विलक्षण गोडी निर्माण करणारी ती शाळा आणि त्यावेळचे शिक्षक . सगळेच विलक्षण . ते शाळेचे दिवस जीवनात खूप काही शिकवून गेले .


























