Sunday, March 8, 2020

स्मरणातील नाट्यप्रयोग /चित्रपट

अस्तु : म्हातारपणची शोकांतिका 


काही दिवसापूर्वीच Being Mortal हे अतुल गवांडे ह्यांचे ‘म्हरातारपणाचं  जगणं’ ह्या विषयावरचं पुस्तक वाचलं आणि गेले कित्येक दिवस म्हातारपण आणि वृद्धाश्रम  ह्या विषयाचा भुंगा पाठीमागे लागला. काल “ अस्तु “ हा ह्याच विषयावरचा मराठी चित्रपट पाहिला. डिसेंबर २०१३ चा हा चित्रपट . दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि अनेक पुरस्कार प्राप्त झालेला . मुंबईत आतां चित्रपटगृह मिळाले. फारच थोड्या ठिकाणी चालू आहे .मुद्दाम जिथे चालू आहे तेथे जाऊन पहावा लागतोय. तिकडे सलमान खानचा चित्रपट ५०० कोटीचा गल्ला मिळवतोय आणि इकडे ह्या सुंदर चित्रपटाला १०० म्हातारी डोकी काठी टेकवत येत आहेत . कोण पहाणार? शरीराने जिवंत पण मनाने मेलेल्या असलेल्या (स्मृतीभंश झालेल्या )  एका म्हाताऱ्याची शोकांतिका ? 
म्हातारे होणं ( Ageing ) मोठं कठीण असतं .परावलंबी असलेलं म्हातारपण अधिक कठीण असतं . आपण धडधाकड राहून निवृत्तीनंतरचं शांतपणे सुखाने जगणं वेगळं आणि स्मृतीभंश होऊन म्हातारपण जगणं अधिक कठीण . ती एक शोकांतिकाच असते. आपल्या मुला-मुलीनी ह्या शोकांतिकेला बरोबर घेऊन आणि स्वीकारून कसं जगायचं ? हा खरा प्रश्न आहे . त्यांच्याकरिता हे महाकठीण काम आहे . संवेदनशील मुलामुलींना ते अधिक त्रास देणारं आहे. 
एक बुध्दिमान संशोधक प्राध्यापक . संपूर्ण जीवन रसरसून जगलेला . दोन मुलीना जेवढे देता येईल तेवढे देऊन सुखी शांत जगणारा हा म्हातारा. अल्झायमरसारख्या रोगामुळे लहान मुल झालेला . शरीराने जिवंत पण मनाने मेलेला . अशा ह्या मुलाला सांभाळणारी त्याची मुलगी आणि तिचा डॉक्टर जावई. आपण असताना आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात कशाला ठेवायचे ? असा विचार करून वडिलांचीच आई झालेली ही मुलगी संवेदनशील मनाची असल्यामुळे खूप काही सहन करीत वडिलांचे सर्व काही करीत असते आणि एक दिवस तिचे हे म्हातारे वडील नाहीसे होतात . त्यावेळी तिची जी अवस्था झाली आहे त्याची  गोष्ट सांगणारा हा चित्रपट. माणूस संवेदनशील असला की त्याची जी फरफट होते ते आपण अनेक कुटुंबातून पहात असतोच. तिची धाकटी बहिण. दूर राहणारी . Intimacy at a distance असा Rational विचार करणारी आणि स्वतःच्या करिअरमध्येच रमलेली . दूर असलेल्या मुलीला मात्र असे वाटत असते की बाबांचे प्रेम जवळ असलेल्या मुलीवरच अधिक आहे . अनेक कुटुंबात असे प्रकर्षाने जाणवते . ते कौटुंबिक ताणतणाव सर्वत्रच दिसून येतात. 
म्हाताऱ्या मंडळीकडे सुखाने जगण्यासाठी पैसा आहे , घर आहे. तरीपण अधिक म्हातारे होणं आणि कसल्याही प्रकारचे पंगुत्व येणे हे आपल्या अपत्यासाठी त्रासदायक आहेच. आपल्याला लहान मुलासारखं जपताना त्यांना बरेच काही सहन करावे लागते. ती मुलं अधिक संवेदनशील असतील तर त्यांचा अधिक कोंडमारा होत असतो. त्यांच्या जगण्याच्या वेगात आपण एक अडथळाच असतो. असे होणे फार क्लेशकारक असते. आपल्याकडे वृद्धाश्रम इतके चांगले नाहीत. Assisted Living हा प्रकार फारसा उपलब्ध नाही. 
आपण ज्या वडिलावर प्रेम करतो आणि त्यांना सांभाळतो ते वडील ( अप्पा) आपल्याला साधे ओळखत नाहीत हे दु:ख फार मोठं आहे . त्या मुलीची ( इराची) भूमिका  इरावती हर्षे ह्यांनी फार सुंदर केली आहे . मनाला चटका लावून देणारी ही भूमिका पहाण्यासाठी तरी हा चित्रपट एकदा पहावा. वडिलांची भूमिका करणारे मोहन आगाशे म्हणजे डॉ लागू नंतरचे नटसम्राट . अतिशय सुंदर भूमिका करणारे . त्यांची ही भूमिका पाहिल्यानंतर असे म्हातारपण आपल्या वाटेला येऊ नये असा विचार अनेकदा डोक्यात येतो आणि मग आपल्या डोक्यातून जातच नाही. अर्थात हे आपल्या हातात नसते. जावई ( मिलिंद सोमण ) आणि धाकटी मुलगी ( देविका दप्तरदार ) ह्यांच्या भूमिका उल्लेखनीय आहेत. अमृता सुभाष पारितोषिक विजेती आहेच. तिच्या भूमिकेतील 'माणूसपण' कायम लक्षात राहतं. चित्रपट अस्वस्थ करणारा आहे

मग्न तळ्याकाठी

'वाडा चिरेबंदी' नंतरचा दुसरा भाग 'मग्न तळ्याकाठी' चा देखणा नाट्यप्रयोग पाहिला . हे नाटक अधिक कसदार आणि काव्यात्म आहे . ह्या  नाटकात निसर्गकविता ( नाट्यकाव्य ) आहे . विश्व निर्मिती करणारा कोण हा निर्माता ? ह्या संबंधीचे  थोडेसे गूढ चिंतन आहे .
वाडा चिरेबंदी आहे कारण कॊटुंबिक नात्यात घट्ट वीण आहे .Intimacy at a Distance असे ज्याला म्हणतात त्याचे उदाहरण म्हणजे हे कुटुंब .
महेश एलकुंचवार हा मराठी नाट्यसृष्टीला लाभलेला  जबरदस्त नाटककार आहे . चंद्रकांत कुलकर्णी ह्यांनी आपला दिग्दर्शनाचा ठसा उमटवला असून आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले . सगळे कलाकार ह्या नाटकामुळे अधिक लोकप्रिय होतील ते त्यांच्या कलागुणांमुळे . त्यांनी ह्या नाटकाचे सोने केले आहे . एक कायमचा लक्षात राहणारा नाट्यप्रयोग .

बायोस्कोप 

आज' बायोस्कोप'  हा चित्रपट बघितला . एक वेगळा प्रयोग . चार कथा नि चार कविता . काव्यामुळे चित्रपटाला उंची गाठता आली.' बैल 'सर्वात प्रभावी.मंगेशचा  अभिनय A1 .शेतकरी  आत्महत्या हा विषय खूप प्रभावीपणे हाताळला आहे . गुलजार ह्यांच्या शायरीमुळे  आशय प्रेक्षकापर्यंत पोहोचतो. मोठ्या कलावंत मंडळींचे  उतारवय बहुधा  असेच असते ' मित्रा  ' हा वेगळा विषय तसा सुन्न करून सोडतो .शेवटी असेही आयुष्य काही जणांना लाभते . 'काऊ ' मधील नायक कुशल एकदम प्रभावी नट . फार छान भूमिका केली आहे.

MADAARI


मी सलमान खान आणि शाहरुख खानचा चाहता कधीच नव्हतो . इरफान खान हा सगळ्यात गुणी नट आहे असे माझे मत आहे . त्यामुळेच  'मदारी ' हा चित्रपट आवर्जून पाहिला . सामाजिक - राजकीय भाष्य असलेला हा निशिकांत कामत ह्यांचा चित्रपट निश्चितच बघण्यासारखा आहे . ह्यातील भाष्य असलेला भाग लोकसभेत / राज्यसभेत दाखवावा आणि त्यावर चार तास चर्चा व्हावी अशी वेगळी सूचना करावीशी वाटते . अर्थात हे शक्य नाही, हे  माहित आहे . किमान ह्या राजकीय नेत्यांनी हा सिनेमा एकत्र पाहावा . ते सभागृहातून बाहेर येतील तेव्हा त्यांचे चेहरे आपण पाहावेत . ही कलाकृती त्यांना अंतर्मुख करेल तर बरे होईल . आपण सामान्य नागरिक तर हतबल असतोच . अजून किती वर्षे जातील आणि हे सुधारेल हे सांगणे कठीणच आहे .
'ते जेव्हा द्वेष करतात तेव्हा चालते पण आम्ही जेव्हा द्वेष करतो ,ते मात्र चालत नाही ' , असे अनेक विश्लेषणात्मक संवाद चित्रपटात आहेत .
This is a provocative piece of political cinema . एका सामान्य मध्यमवर्गीय माणसाची शोकांतिका असलेला हा चित्रपट डोळ्यात पाणी आणतो. किडलेल्या राजकीय व्यवस्थेची चीड येते.

CODE मंत्र 



Code "मंत्र " हे एक जबरदस्त नाटक .खुर्चीला खिळवून टाकणारा नाट्यप्रयोग  .उत्तम संवाद असलेले नाट्यलेखन , लष्करी जीवनातले  अनोखे नाट्य , उत्सुकता निर्माण करणारी सुरुवात ,विलक्षण चटका लावणारा शेवट , सीमेवरील लष्करी छावणीचे नेप्प्थय , कोर्ट मार्शल रूममधील दोन वकिलांची  केस जिंकण्यासाठी  चाललेली  धडपड  हे सारे काही असलेले  हे  नाटक .दिग्दर्शन  अभिनय ,संगीत आणि नेपत्थ्य ह्या कशातही थोडीही कसूर नसलेले रहस्यपूर्ण नाटक .
लष्करी जीवनात शिस्त आणि कर्तव्य ह्या गोष्टीला सर्वात जास्त महत्व असते . कर्तव्य आणि कर्तव्याचा अतिरेक या मधली पातळ सीमारेषा दाखविणारे हे नाटक . मानवी हक्कासाठी लढणाऱ्या एका वकिलाला जी झुंज द्यावी लागते त्याचेच हे नाट्य आहे असे वाटत असते व ते पहिल्या अंकात  काहीसं एकांगी वाटू लागते . सीमेवर लढणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यावर अन्याय करणारे वाटते .पण जेव्हा कोर्ट मार्शल समोर तो लष्करी अधिकारी जी साक्ष देतो तेव्हाचा सीन आणि त्याचे वक्तव्य आपल्याला खाड्कन जागे करते . आपल्याला जाणीव करून देते की आपण सुरक्षित जीवन जगतो आहोत ते ह्या सैनिकांमुळे . भारतीय लष्करात  Code मंत्र पद्धत अस्तित्वात नसली तरी काही लष्करी अधिकारी कर्तव्याचा अतिरेक करतात  व  त्यामुळे जे घडू नये ते घडते आणि विनाकारण मनुष्यहानी होते व मानवी हक्काची नुसती पायमल्लीच होत नाही तर जीवितहानी होते . ते  दाखविणारे असे हे नाटक .जबरदस्त नाट्य असलेली कलाकृती . एकदा तरी बघण्यासारखी.

भाई चा उत्तरार्ध

'भाई ' चा उत्तरार्ध आज संध्याकाळी ६ चा शो-  बिग  सिनेमा  संगम , अंधेरी  येथे पाहिला . मोजून १६ प्रेक्षक होते . पहिल्या भागावर लोकसत्तेतील लेखामुळे परिणाम झाला  होता . टीव्ही चॅनेल्सवर उलटसुलट चर्चा झाली . दुसऱ्या भागाकडे प्रेक्षक वळलेच नाही असे दिसते . मिडीयाचा असा परिणाम होतो आणि चित्रपट डब्यात जातो . मीडियावर फारसा विश्वास ठेऊ नका .
हा चित्रपट मला तर आवडला . ज्यांनी पुलंना पाहिले आहेत ,त्यांना ऐकले आहे ,त्यांचे साहित्य वाचले आहे, त्यांना  ह्या चित्रपटातून पुलं सतत भेटत राहतात , त्यांचे संवाद  आपल्या कानांत घुमत राहतात , त्यांचे गाजलेले विनोद  आपल्याला हसवत राहतात .  ' आहे मनोहर तरी ' ह्या त्यांच्या पुस्तकातील सुनीताबाई  आणि पुलं सतत भेटत राहतात . पुलं आणि त्यांचे गायक मित्र - कुमार गंधर्व ,वसंतराव देशपांडे आणि भीमसेन जोशी  चित्रपटातील संगीत मैफलीतून भेटतात आणि त्या सर्वांच्या  अजरामर गाण्यामुळे आपण मंत्रमुग्ध होतो . आपण ती गाणी असंख्य वेळा ऐकलेली असली तरी ह्या मंडळींच्या एकत्र मैफलीची आपल्याला नुसती ऐकीव माहिती असते . त्यांच्या ऋणानुबंधाच्या गाठी ह्या संगीतामुळेच पडल्या  होत्या .त्यांचे  ते  विलक्षण मैत्री असलेले लोभस चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसते . ह्या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम खूप काही सांगून जाते . बाबा आमटे ह्यांच्या आनंदवनात  रमणारे  पुलं बघताना  आपल्याला त्यांचे मोठेपण जाणवत राहते.  पुलं हा  नुसता विनोदाचा बादशहा नाही  तर 'देणार्याने देत जावे ' हे  सांगणारा  महामानव आहे . मध्यांतर होण्यापूर्वी असलेले  ते प्रसंग  नकळत  आपल्या डोळ्यात पाणी आणतात. आणीबाणीतील पुलं आपल्याला माहित आहेतच.   पहिला ' महाराष्ट्र भूषण ' हा राज्य पुरस्कार ज्यांनी त्यांना दिला त्यांचे  त्या मागचे नंतरचे राजकारण आपल्यात विलक्षण  चीड निर्माण करते . पण  पुलं ह्या माणसाची मान कशी ताठ होती ह्याचे दर्शन आपल्याला अधिक आनंद देते .
हा चित्रपट अवश्य पहा . हा एक सुंदर चित्रपट आहे . उत्तरार्ध मला अधिक आवडला . सर्वच कलाकारांचे काम अप्रतिम .पुलंसाठी  पहा  पण ह्या  सर्व कलाकारासाठी  अवश्य पहा . पुलं च्या चित्रपटासाठी   रिकाम्या खुर्च्या  पाहतांना मला थोडं वाईटच वाटलं .

'आहे मनोहर तरी' मधील पु ल आणि आपण पाहिलेले , ऐकलेले आणि आपल्याला समारंभातून दिसलेले पु ल थोडेसे वेगळे आहेत. तसेच मांजरेकर दिग्दर्शित 'भाई 'मधील पु ल अनेक बाबतीत वेगळे आहेत . 'भाई 'मधील संवाद रत्नाकर मतकरी ह्यांचे आहेत .त्यांनी पु ल ना जवळून बघितले असेलच .म्हणूनच पटकथाकार गणेश मतकरी ह्यांनी मांजरेकर ह्यांना रत्नाकर मतकरी ह्यांच्याकडून संवाद लिहून घेण्यास  सांगितले असावे. मांजरेकर ह्यांनी त्यांचे स्वातंत्र्य वापरले असेलच. शेवटी सिनेमाच्या गुणदोषात सर्वच थोडेबहूत जबाबदार आहेत. शेवटी हा सिनेमा त्या सर्वानी मिळून तयार केला आहे. प्रेक्षकांनी ज्याचेत्याचे पु ल शोधावेत .

मुकुंद संगोराम हे चांगले कला समीक्षा करणारे लेखक आहेत. आजचा लोकसत्तेतील त्यांचा ' भाई : पुलंचे भंपक चित्रण ' हा लेख वाचला. त्यांची टीका मला तरी चुकीची वाटते. सिनेमा भंपक नाही. तो बघण्यासारखा आहे. असामान्य माणसेही रोजच्या जीवनात तशी सामान्यच असतात.पुलंचं  ' आहे मनोहर तरी ' असं जे वर्णन सुनीताबाईनी  केलं आहे ते खरं असलं तरी त्यामुळे पुलंचे मोठेपण कमी होत नाही. पु लं च्या जीवनाची विविध रूपे पहायला मिळतात. त्यांच्या आयुष्यातील दु:खद घटना मनाला चटका लावून जातात. हा सिनेमा भंपक मुळीच नाही. असे हेडींग देउन सनसनाटी निर्माण करण्याचा हा प्रयत्न वाटतो.

बायोपिक चित्रपटात असे होत रहाणारच.
आत्मचरित्रात तरी सगळे कुठे खरे असते.

खरं म्हणजे अनेक नावाजलेले कलाकार हे दारू पिल्यानंतर अधिक खुलतात . त्यांच्या संगीत मैफिली त्यानंतर अधिक रंगतात. ह्याची अनेक उदाहरणे माहितीची आहेत. बायोपिक सिनेमात ह्याचा खुबीने वापर करणारे दिग्दर्शक गल्ला भरण्यासाठी ह्याचा उपयोग करून घेतात असे म्हणणे तसे चूकच आहे.

दोन स्पेशल

ह मो मराठे ह्यांची ' एका निष्पर्ण  वृक्षावर भर दुपारी ' ही कादंबरी खूप वर्षापूर्वी वाचली होती . वेगळी होती. तशी निराश आणि दु:खी करणारी .  त्या नंतर त्यांच्या काही कथा दिवाळी अंकातून वाचल्या होत्या. खूप वर्षांनी त्यांच्या ' न्यूज स्टोरी ' ह्या कथेवरून क्षितीज पटवर्धन ह्यांनी ' दोन स्पेशल ' हे नवे नाटक रंगमंचावर आणले . ते सध्या गाजते आहे . १६ पुरस्कार मिळाल्यामुळे प्रेक्षक नाटक पाहायला येऊ लागले आहेत . नाट्यनिर्मिती छान . कलाकार मन लावून काम करणारे . जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक गोडबोले ह्यांचा अप्रतिम अभिनय . जितेंद्र जोशी ह्यांची सहनिर्मिती . दोन जीवांच्या संवादावर चाललेले नाटक. दोघेही पत्रकार . एकाच वर्तमानपत्रात काम करणारे . दोघांचे एकमेकावर प्रेम . नियतीमुळे घटना घडत जातात आणि ते एकमेकांच्या आयुष्यातून नाहीसे होतात . पुन्हा काही वर्षांनी ते समोरासमोर येतात तेव्हा एकदम वेगळेच असतात . परस्पर विरोधी . असहाय . आयुष्याचे भजं असं होतं . हे असं कां होतं ?, काहीच माहित नाही . बहुधा त्याला नियती असे म्हणतात. माणसाचं आयुष्य फार कमी वेळा आखीवरेखीव असतं . त्यामुळेच अशी दोन जीवांची वेगळी गोष्ट पाहायला मिळते . तशी दु:खदायक . निराश करणारी.
पत्रकारितेत असलेला हा नायक . कोणताही दबाव न मानणारा . निर्भीड . पैश्याने विकत न घेता येणारा . संवेदनशील मनाचा . आपल्यापरीने लढणारा . न वाकणारा. आज असे पत्रकार फार थोडे . आजच्या च्यानेल्च्या दुनियेत कोट्याधीश झालेले पत्रकार पाहीले म्हणजे  हा पत्रकार आणि त्याचे असहाय जीवन मनाला निराश करून जाते . पब्लिक रिलेशन ऑफिसर असलेली नायिका काय काय करते आणि तिचे जगणं कसं तिचं रहात नाही. असहाय जगणारी ही स्त्री .
लेखक - नाटककार ह्या दोघांची गोष्ट संवादातून चांगली सांगत जातात. कलाकारांच्या अभिनयामुळे आपण ती शेवट पर्यंत पहात जातो . एक चांगला नाट्यानुभव. आनंद देणारा नसला तरी अंतर्मुख करणारा . प्रेक्षक प्रतिसाद देत आहेत हेच ह्या नाटकाचे खरं यश .
खरं म्हणजे मराठी नाटकाचे आजचे प्रेक्षक हे जेष्ठ नागरिकच . कलाकार तसे तरुण . आणि प्रेक्षक वय झालेले. हा प्रेक्षक वर्ग अधिक वयाचा झाला की मराठी नाटक बंदच पडेल असे दिसते .


No comments:

Post a Comment