Saturday, September 1, 2018

औरंगाबादच्या जुन्या आठवणी




औरंगाबाद - गुलमंडी , शहराचे मध्यवर्ती ठिकाण . पहिले नगराध्यक्ष द्वारकादास पटेल ह्यांचा पुतळा ..ह्या ठिकाणी फार मोठा हौद होता . नंतर तो हौद लहान करण्यात आला . आज तेथे हौद नाही.

१९५६ 
ला राज्य पुनर्रचनेनंतर आम्ही हैद्राबाद सोडले . मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला . वडिलांनी मुंबई ऐवजी औरंगाबादला बदली करून घेतली . मी ४  थ्या  इयत्यत्तेत प्रथम क्रमांकाने पास झालो . ५वीला एक वर्षं परभणीला आजोळी होतो . वडील औरंगाबादला होते . ते नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर म्हणजे मी ६ वीत  गेल्यावर १९५७ साली आम्ही औरंगाबादेत रहावयास आलो . औरंगपुऱ्याच्या शेवटी असलेल्या न्यू मिडल स्कुल ( फोकानिया ) मध्ये मी प्रवेश केला . आमची सरकारी शाळा . तेव्हाची दिमाखदार इमारत . नंतर त्याच इमारतीत मराठवाडा विद्यापीठ सुरु झाले होते .  . १९६७ साली एम. एससी . चे एक वर्ष त्याच इमारतीत काढले . नंतर सोनेरी महालच्या विदयापीठ परिसरात शिक्षण पूर्ण केले . त्या वेळच्या आठवणींनी मन भरून येते . औरंगाबाद आजच्यासारखे मोठे नव्हते . मी ५० वर्षापासून मुंबईत रहातो . औरंगाबादला वर्षातून १-२ वेळा येतो. आणि १ -२ दिवसात परततो . जुन्या शहरात जात नाही . ह्यावेळी थोडेसे  फिरलो . जुन्या आठवणी जाग्या झाल्या . काही भागात पायी फिरलो . आठवणीचे तरंग मनात उमटले . त्यासाठी हा लेखन प्रपंच.
आम्ही सुपारी मारुतीजवळील नगारखाना गल्लीत रहात होतो . केळीबाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर हुंडेकरांची चाळवजा इमारत होती . तेथे दोन वर्षे राहिलो . आज सगळे रूप बदलले आहे . तेथे नवी इमारत दिसते .
येथे हुंडेकरांचा वाडा होता . ह्या चाळीत आम्ही १९५६-५७ साली रहात होतो. मोहित ज्वेलरचा मालक  तेथे भेटला . त्याचे घर तेथेच आहे . 
५५ वर्षांनी तेथून जाताना तो भाग पाहिला . फोटो काढले . सध्या तेथे कोणी ओळखीचे नाहीत .तेथील इमारतीत समोरच्या भागात मोहित ज्वेलर्सचे दुकान आहे . एक तरुण बसला होता . त्याला 'हुंडेकरांचा वाडा कुठे आहे ? ',असे विचारले . तो म्हणाला , ' हाच तो वाडा. ' . मी माझ्या आठवणी सांगितल्या . तो म्हणाला ह्याच इमारतीत आम्ही फ्लॅट्स घेतले आहेत . हे माझेच दुकान आहे . त्याची ओळख झाली . माझ्या पुतण्याचा तो वर्गमित्र निघाला . जुन्या गप्पा झाल्या . त्याने चहा मागविला . जुना चित्रपट डोळ्यासमोरून जात होता . मी तेथून निघालो . नगारखाना गल्लीतील मुळेचा वाडा शोधत .

नगारखाना गल्ली : मुळे मास्तरांचा वाडा येथेच होता . १७ भाडेकरूंची चाळ येथे होती . आम्ही येथे ४-५ वर्षे रहात होतो. आज गल्लीमध्ये  नव्या इमारती झाल्या आहेत . पण गल्ली फारशी सुधारली नाही.

 तेथे आमचे वास्तव्य चार-पांच वर्षे होते .
हुंडेकरी वाड्यातील आमचे घर दीड खोलीचे . अंधारे . कसे रहात होतो देव जाणे ! तुटपुंज्या पगारात वडील घर कसे चालवीत असत ते देव जाणे !
नगारखाना गल्लीत मुळे मास्तरांनी १७ भाडेकरूंची चाळ बांधली होती . हुंडेकरांच्या चाळीपेक्षा थोडी बरी . दोन खोल्यांचे घर . मागच्या बाजूला . अंधारे स्वयंपाकघर . आम्ही पहिल्या मजल्यावर रहात होतो . घरात जाताना कॉमन गॅलरी ओलांडून जावे लागे . त्यामुळे बाजूच्या बिऱ्हाडात डोकावून त्यांचे उघडे संसार बघत पुढे जावे लागे .रात्री बरेच जण गॅलरीतच झोपत असत . त्यांना ओलांडून न तुडवता घराकडे चालत जाणे म्हणजे एक कसरतच होती .
मुळेच्या वाड्यासमोरील हे जुने मंदिर . 
मी नगारखाना गल्लीत प्रवेश केला आणि मूळेंचा वाडा शोधू लागलो . बराच कायापालट झालेला .व्यकंटेश ट्रेडरचे दुकान दिसले . मालक बाहेर खुर्चीवर बसलेला . थोडेसे कमी ऐकू येणारा . सहज विचारले .' इथे मुळे मास्तरांचा वाडा कुठे होता ?'. तो म्हणाला , ' ही समोरची इमारत . त्याने सर्व इतिहास सांगितला . ती जागा कोणी कशी विकली वगैरे . आज तेथे इमारत झाली आहे . पूर्वी चाळ होती . बहुधा पहिल्यांदाच मुंबईसारखी चाळ संस्कृती मुळे मास्तरांनी सुरु केली होती .

व्यंकटेश  ट्रेडरचे दुकान. ह्या मालकाचे घर मुळे वाड्यासमोरच आहे  . त्याने झालेले बदल समजावून सांगितले .

आम्ही त्या चाळीत रहात होतो . १९६९ ला मी मुंबईला गेलो . तेथील चाळी पाहिल्या . श्री ना पेंडसे ह्यांचे ' संभुसाची चाळ ' हे नाटक शिवाजी मंदिराला पाहिलं होतं . मला नाटक पहाताना  मुळे मास्तरांची चाळ आठवली . तशीच पात्रे . तशीच भांडणे . फारसा फरक नव्हता . नळावरची भांडणे होती . कॉमन संडासला लोकांची रांग होती . गाणारी माणसे होती . प्रेम करणारी पोरं- पोरी होत्या .टापटीप राहणारे काही लोक होते . ब्रम्हचारी मुलं एका खोलीत राहणारे होते . खोकलणारे आजोबा होते . दुसऱ्याच्या घरात डोकावणारी माणसे होती . दीड खोलीची ती घरे . स्वयंपाक खोलीत मोरी म्हणजे स्नानगृह . पडदा लावलेला . मुलांचा नुसता आरडाओरडा .
ह्या वाड्यात गुलबर्गा - बिदर  कडील कानडी- मराठी कुटुंबे होती . महाराष्ट्रातच स्थायिक झालेली . ही चाळवजा वस्ती म्हणजे अल्पमध्यम वर्गीय - मध्यमवर्गीय कारकून - मास्तरांची वस्ती . चाळीत बेरकी माणसे खूप होती .
मुळेच्या वाड्यात ३ - ४ कुटुंबे हैद्राबाद सोडून आलेली होती . उमा आत्या गुलगर्ब्याच्या होत्या  . त्याचे पती भाऊराव कुलकर्णी सरकारी नोकरीत होते  . माझ्या वडिलांना भाऊ - बहीण कोणीच नव्हते . माझे वडील उमा आत्याना त्यांची बहीण मानत असत . आमच्या सहा भावांच्या लग्नात त्या आमच्या घरातील मोठ्या व्यक्ती होत्या . त्यांची दोन मुले .शाम आणि श्रीकांत . त्यांच्या दोन मुली -निर्मला आणि लता . खूप घरोबा असलेले त्यांचे घर .
आमच्या बाजूलाच अंबादास काका रहात होते . ते वडिलांचे हैद्राबादपासूनचे मित्र . अंबादास काकांचे भाऊ चंदू काका . ते वडिलांचे खूप जवळचे चांगले मित्र . चंदूकाका सरकारी नोकरीत असताना दौऱ्यावर गेले आणि त्यांना अचानक मृत्यू आला . त्यांना ६ मुली . त्यांच्या बायकोला आणि  ६ मुलींना अंबादास काकांनी सहाय्य केले . आधार दिला . मुलींना वाढविले .त्यांना शिक्षण दिले . त्यांची लग्नें  करून दिली . त्यांच्या  ६ मुली आणि आम्ही ६ भाऊ . सर्व बरोबरीचे . आम्ही एकत्र  वाढलो.  दोन्ही कुटुंबे खूप जवळची .
अशीच दोन - तीन कुटुंबे खूप स्नेहाची होती .
आम्ही पहिल्या मजल्यावर रहात होतो . पाणी खालून भरावे लागत असे . आम्ही भाऊ ठराविक अंतरावर उभे राहून पाण्याची भरलेली घागर  एकमेकांकडे पास करीत असू . पाणी भरणे हा मोठाच कार्यक्रम असे . त्यासाठी आमची खूप भांडणे होत . नळावरची भांडणे नेहमीचीच असत . ते विसरून आमची पुन्हा मैत्री होत असे  .आज गंमत वाटते .
आमच्या बाजूला एका खोलीत एक ब्रम्हचारी पत्रकार रहात होता . त्याचे नांव कल्याणकर. तो दै. अजिंठ्यात होता . रात्रपाळीची नोकरी  असल्यामुळे त्याची खोली रात्री रिकामी असे . मी आणि माझा भाऊ त्या जागेचा अभ्यासाची खोली म्हणून वापर करीत असू .नाहीतर गच्चीवर जाऊन अभ्यास करावा लागे . ते दिवस फार त्रासदायक होते .३ - ४ वर्षे काढली . नंतर गावाच्या बाहेर रोकडीया हनुमान कॉलनीत स्वतःच्या छोट्या घरात रहावयास गेलो आणि चाळीतले आयुष्य संपले .

आजची ही नगारखाना गल्ली . काही पडकी जुनी घरे आणि आजूबाजूला जमलेला कचरा .


मुळे मास्तरांची हीच ती १७ भाडेकरूंची चाळ

आज नगारखाना गल्ली बदलली आहे . पण परिसर सुंदर आणि स्वच्छ नाही . काही जुनी पडकी घरे दिसतात .
श्रीनिवास - १९६१ - १९६८ पर्यंतच्या  काळात  मी येथेच रहात होतो . येथे सुरुवातीला ३ खोल्याचे पत्र्याचे घर होते . नंतर ३ खोल्या बांधल्या . माझ्या मोठ्या भावाने आता हे घर नव्याने बांधून काढले आहे . हे माझे माहेर . 
मृण्मयी - ज्योती नगर .माझ्या बायकोचे माहेर ,
आम्ही १९६१-६२ साली नगारखाना गल्ली सोडली . त्यावेळच्या शहराबाहेर म्हणजे रोकडीया हनुमान कॉलनीत  छोटेसे घर बांधले . ५५ वर्षांनी माझ्या मोठ्या भावाने वयाच्या ७५ व्या वर्षी ते नव्याने बांधून काढले . मी औरंगाबादला वर्षातून एक दोन वेळा येतो . गावात कित्येक वर्षात गेलोच नव्हतो . फारसे कामच पडत नाही . माझी सासुरवाडी सन्मित्र कॉलनीत होती  . तेथे केशवराव देशपांडे ह्यांचा बंगला . त्यांच्या धाकट्या मुलाने सन्मित्र कॉलनी सोडली आणि ज्योतीनगरमध्ये बंगला घेतला . त्यामुळे मी औरंगाबादला आलो की रोकडीया हनुमान कॉलनी ते ज्योती नगर अशीच माझी भटकंती असते .
४० -५० वर्षांनी मी जुने औरंगाबाद ह्या भेटीत नव्याने पाहिले. जुन्या खुणा आठवणीना वाट करून देत होत्या . म्हणून हा लेखन प्रपंच . पुढच्या वेळी इतर भागात जाऊन फोटो काढणार आहे व लिहिणार आहे .
गुलमंडीवरुन उजव्या बाजूला  गेलं की सुपारी मारुती . दौलताबाद्करांचे दुकान दिसले . एका कोपर्यावर कल्याणकर बुक डेपो व अमृतचे पानाचे दुकान होते . अमृतचा  भाऊ प्यारेलाल माझा वर्गमित्र . तो इंजिनिअर झाला . सध्या संपर्क नाही.आजही ते दुकान  एका बाजूला आहे असे कळले . मला दिसले नाही.


सुपारी मारुती - औरंगाबादची ग्रामदेवता 
सुपारी मारुती  आहे तसाच आहे . हा अधिक गजबजलेला भाग. दौलताबादकरांचे दुकान तसेच आहे . कोपऱ्यावर माझे मित्र प्यारेलाल आणि अमृत ह्यांचे पानाचे दुकान होते . ते दिसत नाही . बाजूला कल्याणकर बुक डेपो होता . तोही नाही . सुपारी मारुतीसमोर फार गर्दी दिसते . रस्ता खराब आहे . त्याच रस्त्यावर पुढे गेलं की कसुपारक गल्ली आहे . तेथे सगळे गुजराती रहात असत . त्यांच्या तीन मजली लाकडी हवेल्या होत्या . त्या गल्लीला खूप वर्षाने  भेट दिली . सुखवस्तू गुजराती लोकांची वस्ती .

कसुपारक गल्ली - गुजराती समाज वस्ती 
तेथे रमणलाल रहात होते . ते वडिलांच्या ऑफिसमध्येच काम करीत . सरकारी नोकरी करणारा हा गुजराती माणूस . त्यांचा  फोटोग्राफीचा धंदा होता . फोटोग्राफीची सरकारी कामे त्यांना मिळत असत . त्यांना दोन मुले होती . प्रकाश आणि दीपक . प्राथमिक शाळेत जाणारी . मी ९ वी १० वी ला असताना त्यांच्या दोन्ही मुलांची ट्युशन घेत असे . त्यांच्या घरी जाऊन शिकवीत असे . माझी शिकताना अशी कमाई चालू असे . मला माध्यमिक शाळेत रियायती स्कॉलरशिप / मेरीट स्कॉलरशिप  मिळत असे . तसे माझे शिक्षण स्कॉलरशिपवरच झाले . ट्युशनही घेत असे . रमणलालचे घर शोधत होतो . घर पडलेले होते .
रमणलाल चे ३ माजली लाकडी घर - आता पडायला आले . फार सुंदर हवेली होती  .

वाटेत  रणछोडदास नावाचे वृद्ध गृहस्थ भेटले . त्यांना रमणलालच्या घरासंबंधी विचारले  . त्यांनी सर्व माहिती दिली . मला  घेऊन ते रमणलालजींच्या मुलाच्या  नवीन घरी घेऊन गेले . तेथे तळमजल्यावर प्रकाश  फोटो स्टुडिओ होता . प्रकाशचाचा मुलगा काउंटर बसला होता . मी  माझी ओळख सांगितली .त्याला आश्चर्यच वाटत होते . प्रकाश दुकानात  नव्हता . इतक्यात त्याचा धाकटा भाऊ  दीपक आला . त्याने मला 'सर' म्हणून ओळखले . त्याला खूप आनंद झाला . तो मला वरच्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या घरी  घेऊन गेला . त्याची ८७ वर्षांची आई मला भेटली .५० - ६० वर्षांनी आमची  भेट झाली . आमच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या . मी त्यांच्या मुलांना शिकवीत असे म्हणून त्यांना माझे खूप कौतुक वाटत  असे  .आज  दीपकचा मुलगा सीए झाला आहे .त्याची फर्म आहे .सर्वाना अचानक भेट झाल्यामुळे खूप आनंद झाला  . आम्ही फोटो काढले . जुन्या आठवणीत रमलो . माझे  पहिले विद्यार्थी भेटले . मी त्यांचा शिक्षक . माझी त्यावेळची ट्युशनची कमाई आठवली .  इकडच्या-तिकडच्या  गप्पा झाल्या .आज ते दिवस आठवले की मोठी गंमत वाटते .

रमणलालचा धाकटा मुलगा दीपक आणि त्याची ८७ वर्षाची आई . दीपक आणि प्रकाश माझे विद्यार्थी . त्यांच्या आईला जुने र्दिवस आठवले .५५ वर्षानंतर झालेली आमची ही भेट . खूप गप्पा मारल्या .

माझी पुढची भटकंती सुरु झाली  .केळीबाजारातून गुलजार टॉकीजकडे गेलो . त्या जुन्या टॉकीजमध्ये काही चित्रपट पाहिले होते . त्या टॉकीजसमोर माझा मित्र अविनाश महाजन रहात होता . शाळेत आम्ही बरोबर . तो M.Sc ( जीवशास्त्र ) झाला .मी फिजिक्समध्ये M Sc. झालो . तो परभणीला प्राध्यापक झाला . दोन वर्षांपूर्वी तो  गेला . आम्ही शाळेत एकमेकांचे स्पर्धक होतो  . वादविवाद स्पर्धेत आलटूनपालटून आम्हाला बक्षिसे मिळत असत . तो माझा अगदी जवळचा मित्र . आज त्याचे घर तेथे नाही . चालत थोडे पुढे गेलो . कोपऱ्यावर नाईक वकिलांचे घर होते  . त्यांची दोन मुले . बाळ आणि शाम . बाळ अमेरिकेला शिकायला गेला होता .तेथून परत आल्यावर आरएसएसचे काम करण्यासाठी बंगाल - आसाममध्ये गेला . त्याची नंतर भेट झालीच नाही . आज त्याच्या घराच्या जागी एक  काचेची मोठी इमारत उभी दिसते . बाळच्या अनेक आठवणी आहेत .तो अतिशय हुशार मुलगा . त्यावेळचा आमचा रोल मॉडेल.
गुलजार सिनेमा - आज जुनी इमारत .केळीबाजारकडून  वळल्यावर .

गुलमंडी ते खडकेश्वर व्हाया औरंगपुरा . एवढीच वस्ती होती. औरंगपुर्यातून जाताना अनेक मंदिरे होती . एकनाथ महाराज जेथे रहात होते त्या ठिकाणी नाथ मंदिर होते . मी त्या ठिकाणी अनेक कीर्तनकारांची किर्तने ऐकली आहेत . पाचलेगावकर महाराज , आफळे गुरुजी , सिन्नरकर महाराज इत्यादी प्रसिद्ध किर्तनकार औरंगाबादला येत असत . त्याच रस्त्यावर दत्तमंदिरआहे .बाळकृष्ण महाराजांची समाधी आहे .नागेश्वर  मंदिर आणि खडकेश्वर आहे . औरंगपुर्यातून डावीकडे गेल्यावर स .भु.  शिक्षण  संस्थेची सुंदर इमारत आणि मुलींचे शारदा मंदिर  आहे . तेथेच औरंगाबादचे  पहिले Montessori सुरु झाले होते . ती एक टुमदार इमारत होती.  सभु च्या खूप आठवणी आहेत . स. भु .च्या सभागृहात आणि पटांगणात अनेक राजकीय - सामाजिक नेत्यांना ऐकले आहे . मोठ्या सभा पाहिल्या आहेत . अनंत काणेकर मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते , ते संमेलन आठवते . तेंव्हा स्वयंसेवकाचे काम केले होते त्यामुळे त्यावेळचे अनेक साहित्यिक जवळून पाहिले  होते . औरंगाबादच्या त्यावेळच्या राजकीय - सामाजिक घटनाबद्दल खूप आठवणी आहेत . त्यावर कधीतरी लिहीन.
 ह्यावेळी त्या भागात गेलो नाही .  मछलीखडक - सिटी चौकात मात्र फिरून आलो.


.
सिटी पोलीस चौक - ह्या रस्त्यावरूनच शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाकडे मी सायकलवरून जात असे . भडकल गेट ते शहागंज असा एक मोठा रस्ता ह्या पोलीस चौकीवरून जातो . मच्छलीखडक येथेच येऊन मिळतो . 

अप्पा हलवाई - उत्तम मिठाई भंडारला भेट दिली .



सिटी पोलीस चौकाकडे जातानाची मच्छलीखडकाला समांतर गल्ली . 
गोविंदभाई श्रॉफच्या घरावरून गुलमंडीवर आलो . गोविंदभाईंना औरंगपुऱ्यातून सरस्वतीभुवनकडे पायी जाताना अनेकदा पाहिले होते . त्यांची भाषणे ऐकली होती . डॉ झकेरिया विरुद्ध ते उभे होते तेव्हा त्या निवडणुकीत स्वयंसेवकाचे प्रचाराचे काम केले होते . गोविंदभाई निवडणुकीत पडले .डॉ रफिक  झकेरिया निवडून आले . नंतर ते मंत्री झाले . त्यावेळी गोविंदभाई पडल्यामुळे फार वाईट वाटले होते . मी नंतर कधीही कोणाच्या निवडणुकीत प्रचाराचे काम केले नाही .

पद्मविभूषण डॉ गोविंदभाई श्रॉफ ह्यांचे मच्छलीखडकला जाताना सुपारी मारुतीच्या जवळ असलेले घर .त्यांची पत्नी डॉक्टर होती. मुलगाही डॉक्टर आहे . त्यांच्या हॉस्पिटलच्या  नावाची पाटी  आजही दिसते .

गुलमंडीवर पोहोचलो . आता तेथे हौद नाही . घड्याळ आहे .द्वारकादास पटेल ह्यांचा पुतळा त्यांची आठवण करून देत होता . हा नगराध्यक्ष रोज सकाळी शहरात फेरफटका मारीत असे व शहर स्वच्छ ठेवत असे . आजही त्यांची ती मूर्ती आठवते .
गुलमंडीवर गेलेकी आठवण येते ती कामाक्षी आणि मेवाड ह्या हॉटेलची . कामाक्षीचा डोसा फार आवडत असे . आता ते हॉटेल नाही  . मेवाड आहे . तेथे गेलो . चहा पिला . मालकाशी बोललो . हॉटेल पहिल्यासारखे राहिले नाही .
गुलमंडीवर मेवाड हॉटेल होते . आजही आहे . पाहिल्यासारखे राहिले नाही .

बाटाच्या बाजूला प्रसिद्ध कामाक्षी हॉटेल होते . पार्टीसाठी प्रसिद्ध होते . अनेक पार्ट्या येथे झाल्या . डोसा फार प्रसिद्ध होता . सहकुटुंब सहपरिवार पार्टी येथेच होत असे . येथे मित्रांचा खिसा कापणे हा आमचा उद्योग होता  . मामा परभणीहून आलेकी सर्वाना ह्या हॉटेलमध्ये पार्टी देत असत .


गुलमंडीचा चौक - आता नव्या इमारती उभ्या आहेत 


पुढील चौकात  नवीन दुकाने झाली आहेत . एका कोपऱ्यावर सुरळे कटिंग सलून होते . त्यावरच्या मजल्यावर मधुकर दंडारे रहात असे . तो माझा वर्गमित्र . तो डॉक्टर झाला   . आज तो  माझा साडू आहे . तेथील नवी इमारत पाहून माझ्या जुन्या आठवणी मात्र जाग्या झाल्या . त्याच्या घरासमोर आमचे गणिताचे प्राध्यापक यशवंत देव सर रहात होते . तेथे आता  मोठा मॉल झाला आहे . पुढे चालत पैठण गेटकडे निघालो .

सादिया सिनेमा . औरंगाबादला गुलजार , मोहन आणि सादिया ही ३ सिनेमागृहे होती . त्यापैकी हे एक .
सादीया टॉकीज नव्या स्वरुपात दिसली . आतून तसेच आहे असे समजले . पैठणगेटला टिळकांचा पुतळा आहे  .आजही  तसाच आहे . तेथे झालेले अनेक कार्यक्रम आठवले .  औरंगाबादेतील लोकमान्य टिळकांचे सुंदर स्मारक म्हणजे औरंगपुऱ्यातील बळवंत मोफत वाचनालय . मी रोज संध्याकाळी ह्या वाचनालयात जात असे आणि सर्व पेपर वाचून काढीत असे . माझी वाचनाची आवड वाढवली ती ह्या वाचनालयाने . ह  रा महाजनी आणि आचार्य अत्रे ह्यांचे अग्रलेख वाचण्यासाठी मी ह्याच वाचनालयात जात असे .



पैठण गेट 

आता पैठण गेटच्या  दुसर्या बाजूला गोविंदभाईचा पुतळा दिसला . त्यांनी मराठवाड्यासाठी - विकासासाठी आयुष्य दिले . नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांनी गोविंदभाईंना पदमविभूषण देऊन गौरव केला . औरंगाबादला पैठण गेट - दिल्ली गेट - भडकलं गेट - मकई गेट असे अनेक दरवाजे आहेत . जुन्या शहराचे हे राहिलेले अवशेष . इतिहासाचे साक्षीदार आहेत . तसे औरंगाबाद म्हंटले की बिबीचा मुकबरा , पाणचक्की , अजिंठा-वेरूळ ह्याचीच लोकांना माहिती असते . घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याबरोबर मी ही प्रेक्षणीय स्थळे अनेकदा पाहिली आहेत . अलीकडे गेल्या कित्येक वर्षात तिकडे जाणे झाले नाही .

पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ ह्यांचा पैठण गेटवर असलेला हा पुतळा . ते शहराकडे तोंड करून उभे आहेत . शहराची वाईट अवस्था पाहून त्यांना काय वाटत असेल ? असा विचार माझ्या मनात डोकावून गेला 
पैठण गेटजवळ मराठवाडा विद्यापीठाकडे जाणारी बस मिळत असे . त्या बसच्या अनेक आठवणी आजही ताज्या आहेत . अनेक मित्र-मैत्रिणींचा सहवास ह्या बसप्रवासात लाभला . विविध विषयावर गप्पा झाल्या . बसमध्ये एकमेकांच्या चेष्टा केल्या  . तरुणाईचे ते दिवस. आज तेथे बस थांबा दिसत नाही.
पैठणगेटकडून गुलमंडीकडे जाणारा हा रस्ता . कोपर्यावर बस थांबा होता . ही दुकाने त्यावेळी नव्हती. 

भडकल गेट जवळ मल्टीपर्पज हायस्कूल होते . दिल्ली गेटजवळ शासकीय महाविद्यालय आणि सरकारी गेस्ट हाउस होते . आमच्या शासकीय महाविद्यालयाच्या मागे हिमायत बाग होती .किलेअर्क , जनाना महल ,मर्दाना महल अशा इमारती होत्या . त्यासंबंधी खूप लिहिण्यासारखे आहे . पुढच्या औरंगाबाद भेटीत फोटो काढून त्यावर लिहीन.
आज उत्तम मिठाई भांडार प्रसिद्ध आहे .त्यावेळी अप्पा हलवाई खूप प्रसिद्ध होता .
अशा ह्या आठवणीत २ - ३ तास फिरलो  . काही फोटो काढले . पुढच्या भेटीत बाकीच्या भागात जाणार आहे .

असे हे जुने  औरंगाबाद
असे हे जुने औरंगाबाद शहर .


खूप लिहिण्यासारख्या आठवणी आहेत . शहागंज , चेलीपुरा , करणपुरा , क्रांती चौक , उस्मानपुरा , मराठवाडा विदयापीठ परिसर , मिलिंद महाविद्यालय परिसर , चिकलठाणा , सातारा वगैरे. जुने मित्र फारसे नाहीत . आज  हा जुना शहर फार अस्वच्छ आहे . कसली ही महानगरपालिका ? . द्वारकादासजी शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवीत असत . आज ह्या शहराकडे कोणीच लक्ष देताना दिसत नाहीत .

6 comments:

  1. Thank you Narendra.After going through the photos and details -It is really fantastic ,imagining that I am witnessing all the memorable movements of 1950 to 1965.Waiting for II nd part of the documentary. Keep going. I wish to add that -When you are going from Aurangapura to Khadkeshwer,near Nageshwer nadir there was a locality which was known as Khatikkhana.My father Late L.S.Kulkarni constructed the house in 1951 (Which is still there in New Version BILWA KUNJ and we shifted there from Sarafa(next to Mohan Talkies).My father took the initiative and asked our people to take plots in the locality and develops the area.Many people responded to it including my father's friend Upendrarao Tamne and my sister's husband Vishnupant Adwant.Subsequently because of the initiative of my father the name of the locality was changed to NAGESHWERWADI from Khatikhana.Now the area is well known because of SwatntraSainik Colony and approach road from Nirala Bazar to Khadkeshwer,On which road 4 stories BILWAKUNJ and TAMANE ARCADE are there adjacent to each other.A symbol of Great Friendship.

    ReplyDelete
    Replies
    1. The above post is from PADMAKAR LAXMAN KULKARNI now settled in Mumbai.

      Delete
    2. पद्माकर , खूप लिहिण्यासारखे आहे . मी पुढच्या वेळी फिरणार आहे . फोटो काढणार आहे . तुझ्या वडिलांची आठवण म्हणजे एकनाथ संशोधन मंदिराचे काम . तू जे उल्लेख केले आहेस ते महत्वाचे आहेत .

      Delete
  2. I wish to add some photographs,as a part of our memories.

    ReplyDelete
  3. सर, औरंगाबादच्या जुन्या आठवणी या लेखमालिकेबद्दल आपणास अनेकानेक धन्यवाद. आपण औरंगाबादच्या आठवणी सांगताना सोबत आजच्या औरंगाबादची छायाचित्रेदेखील सोबत दिली आहेत. आज सहज आपला ब्लॉग वाचनात आला. आपण अनेक विषयांवर उत्कृष्ट लिखाण केलं आहे.
    माझा जन्म औरंगाबादचा. औरंगाबाद माझं आजोळ म्हणजेच माझ्या आईचं माहेर. त्यामुळे दरवर्षी औरंगाबादला जाणे होतच असे आणि आजोळचे ते आनंदाचे दिवस, त्या मधुर आठवणी सदैव मनात घर करून आहेत. http://ambajnosmi.blogspot.com/2017/09/post-in-marathi.html
    आपल्या लेखमालेने पुन्हा मला ती स्मरणयात्रा घडवली. आपण लिहिलेले औरंगाबादच्या जुन्या आठवणी भाग १ ते ६ सर्व भाग वाचले. आपल्या लेखनशैलीला दाद द्यावी तितकी थोडीच आणि छायाचित्रेही उत्तम आहेत. आपणाकडे जुन्या औरंगाबादची काही छायाचित्रे असतील तर तीही आपण द्यावी ही नम्र विनंती.
    पुन्हा एकदा मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. आपणास ई मेल द्वारेही अभिप्राय कळवत आहे. ईश्वरकृपेने आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि आपणाकडून उत्तमोत्तम लिखाण होत राहो. धन्यवाद.
    https://ambajnosmi.blogspot.com/
    https://ambajnosmi.blogspot.com/

    ReplyDelete