Friday, June 5, 2015

आजचे बंगलोर

आजचे बंगलोर 
२०-२५ वर्षापूर्वीचे बंगलोर आणि आताचे बंगलोर . किती फरक झाला आहे. 
१९७३-७४ साल असेल . मी पहिल्यांदा बंगलोरला गेलो होतो. निमित्त होते दर वर्षी भरणारी पदार्थविज्ञान परिषद. स्थळ : Indian Institute of Science . जाण्यासाठी प्रचंड उत्साह. सर सी व्ही रामन ह्यांची संस्था. संशोधक सुद्धा भाऊक होऊन जातात. प्रतिभावंत शास्त्रज्ञाचा प्रभावच असतो तसा. त्या निसर्गरम्य परिसरात प्रवेश केला आणि संस्थेचा अभिमान वाटू लागला. रामननंतरचे  अनेक संशोधक आठवू लागले. ही संस्था त्या काळात उभी केली ती टाटांनी. किती दूरदर्शी माणूस. त्याच परिसरातील वसतिगृहात तीन दिवस वास्तव्य. अनेक जेष्ठ आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञासमोर संशोधन पेपर वाचल्यानंतर आपली मान न कळत ताठ झाली. त्यांच्यासमोर आपण तर टिल्लू पिल्लू. तो अनुभव खूप आत्मविश्वास देऊन गेला. 
त्याच परिषदेत यु आर राव ह्या अवकाश संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाचे भाषण ऐकले. आर्यभट ह्या उपग्रहासंबंधीचे.  अजून तो अवकाशात सोडला नव्हता. त्यावेळी खूप प्रभावी झालो होतो. भारतीय शास्त्रज्ञ इतक्या कठीण परस्थितीत कसे संशोधन करीत असत ह्याची पूर्ण जाणीव झाली . आज आपण मंगळापर्यंत मजल मारलीय आणि काही लोक चेष्टा करीत बोलत असतात . ' कशाला हवी मंगळ स्वारी ? आधी शुद्ध पाणी द्या ' . असे बोलणार्या लोकांची कीव करावीशी वाटते. शास्त्रज्ञांची चेष्टा करणारे महाभाग ह्या देशात आहेत. ते लोकांना भडकावत असतात. 
बंगलोरला हल्ली IT  सिटी म्हणतात . म्हणजे Information  Technology शहर.अमेरिकेत एखादा प्रोजेक्ट बंगलोरच्या कंपनीला दिला तर ' Bangalored ' असे म्हणतात .  एका अमेरिकनवारीत ज्या सोसायटीत राहत होतो तेथे सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडत असे. एके दिवशी एक अमेरिकन माझ्याशी बोलण्यासाठी पुढे आला. मी इंडियन आहे हे त्याने ओळखले होते. तो होता मूळचा ब्रिटीश. सध्या अमेरिकेत स्थाईक . एक पेन्शनर. त्याला भारताबद्दल खूप आपुलकी होती . त्याचे कारण म्हणजे त्याचे आजोबा महायुद्धात कोहिमा येथे मारले गेले होते  . तो त्या दफनभूमीला भेट देऊन गेला होता. बोलता बोलता तो Infosys आणि नारायण मूर्ती ह्यांच्याबद्दल बोलू लागला. मला थोडे आश्चर्य वाटले. Infosys मुळे अमेरिकन जॉब कमी झाले अशी तक्रार केली जाते ह्याचे त्यालाच आश्चर्य वाटत होते. ही Infosys ची मूले खूप कष्टाळू आणि चांगली काम करतात. अमेरिकन मागे आहेत असे त्याचे मत होते. त्याला बंगलोर शहराबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. असे हे आपले जागतिक शहर बंगलोर. 
पूर्वीही ते IT शहर होते. म्हणजे Indian Textiles साठी प्रसिद्ध शहर. सिल्कसाठी प्रसिद्ध. परदेशात १३०-१४० डॉलर प्रती मीटर दराने सिल्क कापड विकले जाते .आजही दोन तीन मोठ्या कंपन्या असे कापड तयार करतात. ते कारखाने अत्यंत आधुनिक आहेत. पूर्णपणे गणक यंत्रावर चालतात . मायक्रोप्रोसेसर टेक्नोलॉजी वापरली जाते. 
पूर्वी बिन्नी ही मोठी कापड कंपनी येथे होती. दहा हजार  कामगार कामाला होते. ती बंद पडली. त्यानंतर येथे गारमेंट इंडस्ट्री सुरु झाल्या. आजही सर्वात मोठा व्यवसाय हा गारमेंट इंडस्ट्रीचा आहे हे अनेकांना माहित नाही . आय टी पेक्षा गारमेंट इंडस्ट्रीत जास्त माणसे कामाला आहेत हे सांगितले तर विश्वास बसणार नाही. 
बंगलोरचा विकास केंद्रीय सरकारच्या विविध आस्थापनामुळेच झाला. HAL , NAL , ISRO आणि मिलिटरी बेस वगैरे . 
शेजारच्या तामिळनाडू राज्याने होसूरला Industrial वसाहत विकसित केली आणि बंगलोरच्या विकासाला वेग आला. काम मिळणार होसूरला आणि राहणार बंगलोरमध्ये . विमानतळ आणि इतर सोयीसुविधा बंगलोरच्या. पण कारखाने मात्र तामिळनाडूचे . अगदी असेच नोईडाचे झाले. 
बंगलोर मध्ये खूप काही आहे आणि खूप काही नाही. सर्वात जास्त सिनेमा घरे ह्या एकाच शहरात होती. शास्त्रीय संशोधन , संगीत मैफली आणि शिक्षणाच्यासाठी विविध संस्था हे बंगलोरचे वैशिष्ट्य. पेन्शनर शहर म्हणून प्रसिद्ध . 
कर्नाटकात दुसरी कोणतीही शहरे एवढी विकसित झाली नाहीत . सुरुवातीला केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळेच हे शहर विकसित झाले. 
येथे कानडी येत नसलेतरी रोजचा व्यवहार हिंदीतून करता येतो. लोक आळशी. कामावर येतीलच ह्याचा भरवसा नाही. वृत्तीने भांडकुदळ. आवाज फार मोठा. 
लाचलुचपत जोरात. पैसे देऊनच कामे होतात. ट्राफिक सेन्स शून्य. 
अलिकडे येथील जीवनमान मुंबईपेक्षा महागडे. सुधा मूर्तीचा लेख आठवतो. त्या एकदा बाजारात गेल्या होत्या.  सोबत त्यांचा ड्रायव्हर होता.त्याच्या टी शर्टवर इन्फोसिसचा लोगो होता. त्या भाजीची / फळांची चौकशी करतात. त्यांना भाव जास्त वाटतो . त्या घासाघीस करतात. तो फळवाला त्यांना म्हणतो , ' कशाला एवढी भावाबद्दल घासाघीस करीत आहात. घ्यायचे नसेल तर गुपचूप जा .ते बघा आयटीवाले काहीही कटकट न करता विकत घेतात '. त्या भाजीवाल्याचे लक्ष त्यांच्या ड्रायव्हरकडे असते कारण तो इन्फोसिसचाटी शर्ट घालून आलेला असतो. महागाई ही अशी वाढत असते. लोक असे लुबाडत असतात. 
आयटी संस्कृतीमूळे महागाई अशी वाढली आहे. 



No comments:

Post a Comment