Thursday, June 4, 2015

कलकत्त्याच्या आठवणी

कलकत्त्याच्या आठवणी 

मी कलकत्त्याला अनेकदा व्यवसायानिमित्त गेलो होतो. पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा ठरविले होते की पुन्हा येथे येणे नको. पहिल्यांदा एका सेमिनारसाठी गेलो होतो. मुक्काम महाराष्ट निवास. कलकत्त्याचे महाराष्ट्र मंडळ सर्वात छान आहे . सुरुवातीला अनेकदा मी तेथेच वास्तव्य केले. तेथून सेमिनार जेथे होता ती जागा जवळ होती. बाहेर पडलो  आणि थोड्याच अंतरावर धूम धडाड. गावठी बॉंब स्फोट. सरकार कॉंग्रेसचे. स्फोट करणारे कम्युनिस्ट. सगळे जीव मुठीत जगणे. केव्हा कुठे बॉंब स्फोट होतील हे काही सांगणे कठीण . त्या दोन- तीन दिवसात ४-५ बॉंब स्फोट ऐकू आले. एकदा तर ८-१० फुटावर स्फोट झाला. पुढे मार्क्सवादी मंडळी राज्यावर आली आणि ही मालिका बंद झाली. 

एकदा एक जर्मन माझ्याबरोबर प्रवास करीत होता. मुंबई - दिल्ली - बंगलोरला अनेकदा माझ्याबरोबर आला होता. कलकत्याला पहिल्यांदाच बरोबर आला होता. दिवसभर प्रवास आणि मिटींग्स चालूच होत्या. रात्री जेवताना मला म्हणाला, ' घरी गेल्यावर माझे काही खरे नाही. माझ्या पांढर्या शुभ्र शर्टची कॉलर इतकी काळी झाली आहे की घरी गेल्यावर माझी बायको  तो शर्ट ती फेकून देईल कारण ती वॉशिंग मशीनमध्ये तो शर्ट टाकणार नाही. ' मी त्याला म्हंटले , ' मग तू पुन्हा येथे येणार नाहीस ? ' . तो लगेच म्हणाला, ' त्यात काय ? येथे ऑर्डर मिळत असतील तर मी कितीही वेळा येईल. फारतर काय ? प्रत्येक वेळी नवा शर्ट विकत घ्यावा लागेल. ते सोपे आहे. पक्का सेल्समन होता . 

सर्व कारखाने हावड्याला आणि रीशर्याला. खूप मोठ्या कंपन्या . बर्याचशा खूप जुन्या. आजूबाजूचा परिसर मुंबईच्या धारावी सारखाच. कामगार वस्त्या. बकाल . काही सोयी सुविधा नसलेल्या. रस्ते वाईटच. प्रवास तसा कठीणच. नदीच्या पलीकडे जे कारखाने असत त्यांच्या स्वतःच्या बोटी असत. त्यांचे बोटीचे धक्के असत. त्या जर्मन मित्राला तो प्रवास खूप आवडायचा. संध्याकाळी कलकत्त्याला परतताना बोट प्रवासात खूप मजा वाटायची. 
काही सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बोटी असत. एकदा चार आणे वाढ करण्यात आली तर मोठा संप झाला व वाढ रद्द करून घेण्यात आली. संप , मोर्चे आणि मारामारी म्हणजे कलकत्ता असे समीकरण. 
आज विद्यासागर सेतू वाहतुकीस चालू आहे. बांधण्यासाठी किती तरी वर्षे लागली. मंद गती. 


कम्युनिस्ट राजवटीत थोडी स्थिरता आली. पण पैसे उकळण्याचे तंत्र पुढे आले. कलकत्त्याची सुती साडी प्रसिद्ध . मी बाजारात गेलो . हावडा ब्रिजच्या जवळचा बाजार. सकाळी साडे नऊ दहाचा सुमार असेल . दोन तीन जण मागे लागले. ' काय खरेदी करायचे आहे ? चला तुम्हाला दुकान दाखवितो ? ' असे म्हणून मागेच लागले. दुकाने उशीराच उघडतात. नुकतीच उघडत होती. एका दुकानात शिरलो. ती मंडळीसुद्धा दुकानात शिरली . त्यांची दुकानदाराबरोबर बातचीत सुरु झाली . त्यांनी त्याच्याकडून खंडणी वसूल केली. ते निघून गेले. दुकानदार सांगत होता हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असेच खंडणी वसूल करीत असतात. मुंबईत अशीच खंडणी वसूल करतात असे बोलले जात असे. पण कलकत्त्यात हे नेहमीचेच असे. असे होते ज्योती बसूचे त्या वेळचे सरकार.

कलकत्ता मेट्रो झाली. अनेकदा प्रवास केला. लोकांनी ती स्वच्छ आणि सुंदर ठेवली हे आश्चर्यच. नाहीतर अजूनही चालणारी ती ट्राम बघवत नाही. काय डबे ? काय प्रवास . सगळाच आनंद. 
कलकत्त्यात कोणीही काम करीत नाही. पोस्ट ऑफिसमध्ये खिडकीपाशी कोणीही भेटत नाही. माणूस आळशी. चर्चा करण्यात रमलेला. 

कलकत्त्यात इंग्रजी कंपन्या खूप होत्या. त्यांचे अधिकारी दिमाखात राहत असत. त्यामुळे क्लब संस्कृती जोरात. आजही संध्याकाळी मोठ्या कंपन्याचे अधिकारी क्लब मध्ये भेटतात. तेथेच अनेक व्यवहार ठरतात. चौरंघी रोडवरील मोठ्या हॉटेलमधील अशाच एक दोन क्लबात काहीजणांची भेट घेतली होती. तेव्हा इंग्लंडमध्येच आहोत असा भास झाला. इंग्रज गेले पण इंडियन इंग्रज झालेले पाहिले ते कलकत्त्यात. 


कलकत्त्याचा एक मित्र . त्याने कलकत्त्यातील लोक सुखी कसे ? ह्या प्रश्नाचे उत्तर दिले. त्यावेळी एक रुपया कमावणारा येथील माणूस सुखी असायचा . दोन आण्यात  दोनदा चहा . आठ आण्यात दोनदा जेवण. चार आण्यात एक सिनेमा. सिनेमा पाहणारच आणि मिळेल तेव्हा,  भेटेल त्या माणसाशी चर्चा करत बसणार . कोणत्याही विषयावर. 

गेल्या तीन - चार वर्षात कलकत्ता शहरात गेलो नाही. थोडा बदल झाला असेल . पण मी पाहिलेला कलकत्ता असाच होता. जायचे नाही असे ठरविले पण अनेकदा गेलो. आता बहुतेक कंपन्या बंदच झाल्या आहेत. कम्युनिस्ट राजवटीत सर्वांनी आपला धंदा दुसर्या ठिकाणी हलविला आहे. नाही म्हणायला कार्यालय मात्र चौरंघीवर दिमाखात चालू आहेत . 

No comments:

Post a Comment