Tuesday, October 15, 2013

उद्योजक व्हायचे असेल तर .....

एका महाविद्यालयात व्यावसायिक मार्गदर्शनाच्या चर्चासत्रात भाग घेण्यासाठी गेलो असतां मुलांनी काही प्रश्न विचारले. उद्याची स्वप्ने पाहणारी ही तरुण पिढी. "उद्योजक कसा होता येईल"? असा एक प्रश्न होता. त्यावेळी त्यांच्याशी झालेल्या संवादाचे हे संकलन.
Steve Jobs

आपण जेंव्हा एखादे काम स्विकारतो किंवा एखादी नोकरी स्विकारतो तेंव्हा आपणास त्या कामाचे जे पैसे मिळतात ते हवे असतात म्हणून आपण ते काम किंवा नोकरी स्विकारतो. पण त्यामुळे आनंदी होतोच असे नाही. केवळ जगण्यासाठी आवश्यक असणारया पैशासाठी आपण ती नोकरी स्विकारतो. आणि आपले त्या कामात लक्ष लागत नसल्यामुळे दु:खी कष्टी होतो. तसेच एखादा व्यवसाय किंवा उद्योग  करावयाचा असेल तर आपल्याला तो व्यवसाय/उद्योग  आवडतो का? ह्या प्रश्नाचा विचार सुरुवातीला करणे आवश्यक आहे. " I am the Boss of Myself " असे ज्याला वाटते तोच उद्योजक होऊ शकतो. ९ ते ५ काम करणारी मंडळी , त्यांची मानसिकता अगदी वेगळी असते. ते धाडसी निर्णय घेऊ शकत नाहीत. ते उद्योगात यशस्वी होऊ शकत नाहीत.

व्यवसाय करण्यासाठी सिद्ध असलेल्या व्यावसायिकाने  हे लक्षात घ्यावयास हवे की त्याला मार्केटिंग येणे आवश्यक आहे. मार्केटिंग हे शास्त्र नव्हे. त्यासाठी उपजत शहाणपण आणि अनुभव गाठीशी असावा लागतो. आपल्या सबंधी लोकांना माहिती हवी.आपण विकणाऱ्या वस्तूची चांगली माहिती हवी. तुम्ही स्वतःचे व्यक्तिमत्व विकले पाहिजे .तुम्हाला लोकांनी सहज ओळखले पाहिजे . इतरांच्या तुलनेत तुम्ही तुमची चमक दाखविली पाहिजे .तुम्हाला एस्कीमोलाही फ्रीज विकता आले पाहिजे . आपण जी वस्तू विकणार आहोत त्यांत नाविन्य हवे.त्यासारखी दुसरी वस्तू बाजारात नसावी. नाविन्य आणि वेगळेपणा फार महत्वाचा आहे. तोच खरा व्यावसायिक/ उद्योजक  जो नाविन्यपूर्ण वस्तूंची निर्मिती करून त्या साठी बाजार निर्माण करतो. उदाहरणार्थ स्टीव्ह जॉब्स. I-POD बाजारात आणला . लोकांना त्याची आवश्यकता होती का ? मुळीच नव्हती. तरीही लोकांना ती वस्तू हवी हवीशी वाटते . आणि त्यातून पैसा कमविता येतो . नवीन ग्राहक निर्माण करणे व त्यासाठी बाजारपेठ निर्माण करणे  हे फार महत्वाचे असते. स्टीव्ह जॉब्स यशस्वी झाले त्याचे कारण त्यांनी नव्या वस्तू बाजारात आणल्या. लोकांना त्या हव्या हव्याशा वाटल्या . तुमची सेवा, ह्याबद्दल लोकांना विश्वास वाटायला हवा .जो हे करतो तो खरा व्यावसायिक/ निर्माता. त्या वस्तूची नुसती विक्रीच झाली पाहिजे असे नाही तर त्यामुळे समाज जीवनावर त्याचा प्रभाव पडला पाहिजे. त्यामुळे सामान्य माणसाचे आयुष्य बदलले पाहिजे.
Bill Gates

तुम्ही तुमची बाजारपेठ तयार केली पाहिजे . टिकवून ठेवली पाहिजे .तुमच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा तुम्ही उठून दिसणे आवश्यक आहे  बिल गेट हे उत्तम विक्रेते आहेत. .स्पर्धा ही महत्वाची असतेच. पण स्पर्धेत तुमचे लक्षणीय असणे महत्वाचे असते. स्पर्धा ही असणारच. स्पर्धेला टक्कर देत पुढे गेले पाहिजे. जे खूप लढाऊ असतात त्यांच्या मागेच यश धावत येते.  

कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या नव्या पिढीच्या व्यावसायिकाकडे पाहिले असता हे सहज लक्षात येते की त्यांच्याकडे योग्य ते भांडवल नसते. त्यांच्याकडे नव्या नव्या कल्पना असतात , इच्छाशक्ती असते ,उत्साह असतो. ह्या नव्या कल्पनाश्क्तीमुळेच ते वेगळे दिसून येतात. आपल्या डोक्यात एकाच वेळी अनेक कल्पना असतात. अनेक कल्पनांची गिरणी चालू असते. जेंव्हा वेळ योग्य असते ,जमीन सुपीक असते तेंव्हा कल्पनेला उगवण्याची म्हणजे फुलण्याची संधी मिळते. आपले मन स्वप्नाळू हवे. विचारक्षमता तीव्र हवी.आणि कामाचे योग्य नियोजन हवे. तरच  कल्पना प्रत्यक्षात उतरू शकते .आर गोपीनाथ ह्यांनी सर्वात स्वस्त हवाई प्रवास ही कल्पना पुढे आणली व एक नवा प्रयोग यशस्वी करून दाखविला . आज सामान्य माणसाना हवाई प्रवास शक्य झाला आहे .
R Gopinath - Simply Fly 


बहुतेक व्यवसाय अयशस्वी होतात त्याचे प्रमुख कारण म्हणजे व्यावसायिकांचा अहंगंड. दोन सहकारी व्यावसायिकांचा अहंगंड त्यांना अयशस्वी करतो. आयुष्यातील जगण्याचा अनुभव महत्वाचा असतो. 
सर्वच माणसे स्वप्ने बघतात. सगळ्यांची स्वप्ने सारखी नसतात. काहीं व्यक्ती फक्त रात्री झोपेत असतानाच स्वप्ने बघतात व सकाळी त्या स्वप्नाना  आठवून त्यांचा विचार करतात किंवा विसरून जातात. पण ज्या व्यकी फक्त दिवसाच  स्वप्ने बघतात त्या खूप वेगळ्या असतात. त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीचा पाठलाग करावयाचा असतो. ते त्यासाठी दिवस- रात्र प्रयत्न करतात. मेहनत घेतात . ही ध्यास असलेली माणसेच  खरया अर्थाने यशस्वी होताना दिसतात. अशी स्वप्ने बघणे आणि प्रयत्नशील राहणे हे खऱ्या व्यावसायिकालच जमते.पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या माणसाचे काम करणारा  धिरुभाई अम्बानीसारखा साधा माणूस पुढे जगातील मोठ्या पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीचा मालक कसा झाला हे समजून घेतले  पाहिजे . महाविद्यालयीन शिक्षण  सोडून स्वतःचे  छोटे  उद्योग उभे  करणारे  बिल गेट्स किंवा स्टीव्ह जॉब्स स्वतःचे औद्योगिक साम्राज्य कसे उभे करू शकले हे शिकले पाहिजे ,समजून घेतले पाहिजे. THINK BIG AND START SMALL , हे सूत्र महत्वाचे.
Narayn Murthy

तुम्ही तुमच्यापेक्षा हुशार व्यक्तींना तुमच्या व्यवसायात सहकारी म्हणून घेतले पाहिजे. तुमच्यापेक्षा कमी हुशार व्यक्तींना घ्याल तर तुम्ही ज्यांचे नेतृत्व करणार आहात ते खुजे असल्यामुळे तुमचे नेतृत्व खुजेच असेल. तुमच्या कंपनीत जर जास्त कर्तृत्ववन माणसे असतील तर तुमची कंपनी उंचावर जाईल. नारायण मूर्तींना हे सहज जमले म्हणून त्यांचे नेतृत्व वादातीत आहे . तुमचे नेतृत्व निगर्वी हवे. त्यामुळेच  रतन टाटा यशस्वी झाले. त्यांनी Nano कारचे स्वप्न पाहिले. ते प्रत्यक्षात उतरवून दाखविले. त्यामुळे सगळ्या कंपन्यांनी छोट्या कार बाजारात आणल्या. हा बदल घडून आणला तो Nano कारने. वेगळी अशी नवी वस्तू बाजारात आणणे हे महत्वाचे असते. नवी वस्तू पण सर्वात स्वस्त असा विचार त्यांनी दिला आणि सारे कार उद्योजक त्याच्या मागे धावत गेले कारण त्यांना नव्या बाजाराची जाणीव झाली.
Ratan Tata - NANO 


तुमची इच्छाशक्ती ,तुमची आत्यंतिक आवड ,तुमची निर्मिती क्षमता ,तुमची ध्येयपूर्ती किंवा स्वप्नपूर्ती यासाठी चाललेली धडपड , त्यासाठी तुमचे झोकून देणे ,हेच तुमच्या यशस्वी होण्याचे खरे भांडवल आहे. तुमची विचार क्षमता व कल्पनाशक्ती हे महत्वाचे भांडवल आहे. निवडलेला व्यवसाय हे माध्यम आणि तुमचे कर्म हाच खरा मार्ग आहे . ज्या व्यक्ती ह्याचा सतत पाठलाग करतात त्यांच्यासाठी परमेश्वरही त्यांच्या पाठीशी उभा राहतो. जे नैसर्गिक दृष्ट्या अनुचित व  पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे ते आर्थिक दृष्ट्या फार नुकसानीचे असते हे ही त्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे .

तुम्ही उडप्याचे हॉटेल पाहिले आहे काय ? ते चालविणे महाकठीण काम  आहे,  हे माहित आहे का ? ते हॉटेल चालविणे म्हणजे रोज तुमच्या मुलीचा लग्न समारंभ घडवून आणण्याइतके  कठीण आहे. उद्योजक होणे असेच कठीण आहे असे गोपीनाथ ह्यांचे मत पटण्यासारखे आहे.  
Henry Ford

नुसते ध्येय समोर ठेऊन जगणे किंवा मार्ग क्रमणे महत्वाचे नाही. त्यासाठी आपणास दूरदृष्टी असावयास हवी. खरी दूरदृष्टी असते तीच माणसे व्यवसायात यशस्वी होतात . हेन्री फोर्ड , वॉलट डिस्ने, स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स ह्यानी उद्योगाला सुरुवात केली पण अनेकदा ते अयशस्वी झाले . पण त्यांना दूरदृष्टी होती. काय करावयचे की ज्यामुळे क्रांतीकारक बदल घडून येतील ह्याची त्यांना स्पष्ट जाणीव होती. अशीच मंडळी  काहीतरी भव्य दिव्य करून दाखवितात . उद्योजकाला उद्योग उभारण्यासाठी दूरदृष्टी असावी लागते, नजीकच्या काळापेक्षा भावी काळात उद्योग कसा वाढेल ह्याचा विचार महत्वाचा असतो  . नजीकच्या काळातील समस्या सोडवताना दूरच्या काळातील विचार तेवढाच महत्वाचा असतो.हे ज्यांना जमते तेच यशस्वी होतात .

व्यावसायिक म्हणजे तो माणूस ,जो संपत्तीची निर्मिती करतो . नवी वस्तू , नवा गिर्हाईक ,नवी सेवा ,नवा ग्राहक. नवे असणे ,उपयुक्त असणे व ग्राहकाला हवेहवेसे वाटणे , हे ज्याला सहज जमते तो खरा व्यावसायिक.  नवी कल्पना , नवी वस्तू पण  कमी पैशात निर्मिती ,नवी सहज उपलब्ध होणारी सेवा ह्या त्रि- सूत्रीवर व्यवसाय अवलंबून असतो. स्टीव्ह जॉब्सने I-POD ची निर्मिती करून क्रांतीकारक बदल घडवून आणला. बिल गेटस्ने नवी क्रांती घडवून आणली .अर्थात त्यासाठीचे आवश्यक असलेले मनुष्यबळ त्यांनी उभे केले .
 THOMAS Edison ने विद्युत दिव्याचा नुसता शोधच लावला नाही तर निर्मिती करून जगाला विद्युत्मय केले . Sam Walton चे उदाहरण घ्या . " प्रत्येक दिवशी कमी किमतीत " ह्या संकल्पनेवर त्यांनी नवी बाजारपेठ उभी केली आणि खूप संपत्ती उभी केली. आपल्या अंबानींनी " सारी दुनिया मुठ्ठीमे" अशी घोषणा देऊन सामान्य माणसाना मोबाईल विकला.ही सर्व  उदाहरणे हे दर्शवितात की उद्योजक हा महाविद्यालयात व्यवस्थापकीय शिक्षण घेऊन तयार होत नाही. त्यासाठी त्याला तशी आतून उर्मी असावी लागते . त्यासाठी आपण खूप बुद्धिमान असले पाहिजे असे नाही. परंतु आजूबाजूचे सर्व जाणून घेण्यासाठी उत्सुक असले पाहिजे . तेच महत्वाचे ज्ञान आत्मसात करता आले पाहिजे .

बहुतेक धंदे किंवा व्यवसाय अगदी सुरुवातीच्या काळातच बंद पडतात . जेंव्हा सहकारी एकमेकाला पूरक नसतात किंवा त्यांची विचार करण्याची पद्धती सारखी नसते व काम करण्याचे  मार्ग भिन्न असतात तेंव्हा व्यवसाय बंद पडतात. पूरक सहकारी  निवडणे  फार महत्वाचे असते . तरच तणाव मुक्त व्यवसाय करता येतो. दोन किंवा दोन पेक्षा अधिक पार्टनर असतील तर कोणातरी एकाचे नेतृत्व मान्य करून व्यवसाय करता आला पाहिजे. दोन दोन नेतृत्व असतील तर व्यवसाय चालू शकत नाही.एका जहाजाला दोन कप्तान असू शकत नाहीत. 
बरेच  जण व्यवसाय / उद्योग सुरु करतांना म्हण्तात , " मला नवा व्यवसाय सुरु करावयाचा आहे . माझ्या वरिष्ठांना त्याची काहींच कल्पना नाही . जर व्यवसाय यशस्वी होण्याची चिन्हे दिसली तरच  मी नोकरीचा राजीनामा देईल ." असा विचार करणारे लोक उद्योजक होऊ शकत नाहीत .तुम्हाला जर खरे उद्योजक व्हायचे असेल तर हे लक्षात ठेवा की तुम्हाला स्वतःला झोकून देता आले पाहिजे . अर्थात त्यासाठी हालअपेष्टा सहन करण्याची तयारी हवी. तुम्ही तुमच्या जागेचे भाडे वेळेवर देऊ शकणार नाहीत . कर्मचार्यांना पगार देताना तुमची तारांबळ होईल. बायकोला साडी घेण्यासाठी तुमच्याजवळ पैसे नसतील. मुलांची महागडी शिक्षण फी भरण्यासाठी त्रास होईल. अशा असंख्य अडचणीना तोंड द्यावे लागेल. ह्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी नवे मार्ग शोधावे लागतील. ते सहज जमते . प्रयत्न करावे लागतात . पण त्यासाठी तुमची झोप उडालेली असेल , असे जेंव्हा घडेल तेंव्हाच तुम्ही तावूनसुलाखून निघाल. निसर्ग जसा अडचणी निर्माण करतो तसाच अडचणीवर मात करण्यासाठी मेंदूला चालनाशक्ती देतो. त्या शक्तीचा उपयोग करता आला पाहिजे. 

नवा उद्योग किंवा व्यवसाय उभा करतांना अडचणीचा डोंगर उभा राहणारच. त्या अडचणीवर मात करतानाच तुम्ही घडत जाल. नदीचा गुणधर्म वाहणे आणि समुद्राकडे धावणे . तुम्ही नदीसारखे असाल तर दगड धोंड्यावर मात करून वाहत राहणार व शेवटी समुद्राला मिळणार म्हणजेच यशस्वी होणार. यशाचा समुद्र तुमची वाट पाहत असेल हे लक्षात ठेवा. तुमच्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती हवी . प्रचंड उत्साह हवा. मग यशाची शिखरे तुमचीच. 

सगळ्या लढाया ह्या प्रथम मनाच्या अवकाशात लढल्या जातात. हे लक्षात असू देणे महत्वाचे आहे. आपल्याला आजूबाजूच्या सिमीत अवकाशाची कल्पना असलेली बरी.  जेंव्हा आपण निर्णय घेत नाही तेंव्हाच आपण अपयशाच्या दिशेने वाटचाल करतो.हे ही लक्षात असू द्यावे. 

धंदा करावयाचा असतो तो " नफा " मिळवण्यासाठी. "नफा" हा धंदा करणार्यासाठी पवित्र मंत्र आहे . ते मान्य नसेल तर ह्यात पडू नका. नफा असेल तरच धंदा जगेल. तोटा कमी करणे ही धंद्याची पहिली पायरी. सतत तोटाच होत असेल तर धंदा बंद करणे ही महत्वाची दुसरी पायरी.
आपल्याला यश मिळू लागले की लोक आपल्याला जेवायला या असे आमंत्रण देतात. तेंव्हा हे लक्षात असू द्यावे की कोणीही ,कधीही फुकट जेवायला बोलवित नसते.लोकांना ओळखता आले पाहिजे. 

कोणतीही गोष्ट पूर्ण करावयाची  असेल तर सर्वात प्रथम त्यासाठी कोणत्या दिवसापर्यंत पूर्ण करावयाची हेच प्रथम निश्चित करा. मनामध्ये तो दिवस पक्का करा. हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. Dead Line महत्वाची असते . तरच गोष्टी साध्य होतील.  
व्यवस्थापकीय शिक्षण ठीक. पण जे शिकवले जाते ते सारेच उपयोगी पडते असे  नाही. प्रत्यक्ष व्यावसायिक जीवनात वेगळेच  मार्ग निवडावे लागतो. नुसत्या पुस्तकी शिक्षणाचा फारसा उपयोग होत नाही.
अंटारटीका मोहिमेसाठी एक जाहिरात देण्यात आली होती . ती अशी ....
" अतिशय धोकादायक मोहिमेसाठी माणसे हवीत . अर्ज करा . खूप कमी पगार , मरणाची थंडी असलेला प्रदेश ,सहा सहा महिने रात्रीचे काम , सतत अडचणीशी सामना ,निसर्गाशी युद्ध , जिवंत परत येण्याची कमी शक्यता परंतु यशस्वी झालात तर जागतिक सन्मान नक्कीच ." 
HAZARDOUS JOURNEY : ANTARCTICA

अशी जोखीम घेणारी माणसे किती असतात ?  उद्योगात किंवा व्यवसायात अशीच जोखीम असते . तशी जोखीम घेणार असाल तरच उद्योजक होता येईल. बघा जमते का ?  

( Based on Life and Works of Steve Jobs, Bill Gates, Sam Walton , Capt. G R Gopinath, Narayan Murti and many more people )
Contact : drnsg@rediffmail.com  

Saturday, October 5, 2013

पूर्व युरोपात

आम्ही अलीकडेच पूर्व युरोपातील देशांचा [ पूर्वीची पूर्व जर्मनी ,पोलंड ,हंगेरी ,झेक ,स्लोव्हाकिया( पूर्वीचा झेकोस्लाव्हाकिया) ,क्रोएशिया ( पूर्वीचा युगोस्लाव्हियाचा भाग )]दौरा केला. साम्यवादी राजवटीला धुडकावून टाकल्यानंतर गेल्या २० वर्षात पूर्व युरोपातील ह्या देशांचा झालेला कायापालट प्रत्यक्ष पाहिला. नव्याने विकास होताना दिसतो आहे ,परंतु ह्या देशांच्या इतिहासाची आठवण जागोजागी दिसते. प्राग ,वॉर्सा आणि बुडापेस्ट ह्या ऐतिहासिक शहरांना भेट दिल्यावर पहिल्या आणि दुसर्या महायुद्धाच्या वेळी ह्या देशात काय काय घडले असेल  हे सहज लक्षात येते.
प्राग मधील चर्च 

" दै. मराठवाड्या" चे संपादक अनंत भालेराव ह्यांनी 'कावड ' ह्या सदरात "पूर्व युरोपात : की तोडीला तरु फुटे आणखी भराने' हा लेख २० जानेवारी १९९० लिहिला होता. तो वाचण्यात आला होता. त्यावेळी त्यांचे ते   आंतरराष्ट्रीय घडामोडीवरचे  भाष्य डोळे विस्फारून टाकणारे होते.  आंतरराष्ट्रीय राजकीय घडामोडींचा आढावा असलेल्या ह्या  लेखाचा प्रभाव माझ्या मनावर अनेक दिवस होता. त्या देशांना भेट देताना ह्या लेखातील विवेचन अनेक वेळा समोर आले.
त्या लेखात अनंतराव लिहितात ," पूर्व युरोपात गेल्या काहीं महिन्यापासून राजकीय घटना एवढ्या वेगाने घडून येत  आहेत की ,इतिहास गाजवून गेलेल्या " क्रांत्या " मंद व सौम्य वाटाव्यात. दुसर्या महायुद्धानंतर अक्ष राष्ट्रांच्या व प्रामुख्याने जर्मनीचा पराभव  झाल्यावर मध्य युरोपातील भूखंडाची दोस्त राष्ट्रांनी वाटणी करून घेतली.
पार्लमेंट ,हंगेरी 


 जी राष्ट्रे सोव्हिएत संघाकडे आली तेथे स्टालिनच्या अधिपत्याखाली कम्युनिस्ट राजवटी स्थापन झाल्या. सत्तेवर कम्युनिस्ट पक्षाची मत्तेदारी निर्माण केली गेली.आणि अशा रितीने रशियाने पोलादी पडद्याच्या रक्षणार्थ सहा-सात कम्युनिस्ट राष्ट्रांची संरक्षक तटबंदी उभी केली. हंगेरी ,झेकोस्लोव्हाकिया ,पोलंड ,पूर्व जर्मनी ,रुमानिया या राष्ट्रामध्ये कम्युनिस्ट राजवटी आल्या. रशियाचा लष्करी हस्तक्षेप त्यास कारणीभूत होता."आमचे भवितव्य आम्हाला घडवू द्या व आमचा वर्तमान काळ आमच्या स्वाधीन करा",अशी मागणी ह्या देशातील लोकांनीं अनेकदा केली. लष्कराच्या जोरावर ती दडपली गेली.
गोर्बाचेव्ह यांनी त्यांच्या सुधारणा जाहीर केल्या आणि ह्या राष्ट्रातील स्वातंत्र्याकांक्षेला उत्तेजन मिळाले. रशियन  संघ फुटू लागला. तेच वारे पूर्व युरोपात वाहू लागले. साम्यवाद असो की लोकशाही ,जनतेच्या विश्वासावाचून अस्तित्वात येऊ शकत नाही. कम्युनिस्ट राजवटी धडाधड कोसळू लागल्या. या राष्ट्रांनी कम्युनिस्ट रशियाशी संबंध तोडले. रशिया विरोधी भावना तीव्र होत गेल्या.
बुडा आणि पेस्ट 

 स्टालिनने जे जे म्हणून नष्ट केले ते ते पुन्हा उभे केले. कम्युनिस्टाना धर्म ,चर्च , मशिदी मान्य नव्हत्या. त्या चर्चेस पुन्हा नव्यानी जशाच्या तशा उभारण्यात आल्या. पोलंड झेक ,हंगेरी मध्ये त्या दिसून येतात.. मुक्त बाजारपेठांना   वाव मिळाला. पूर्व युरोप खुला झाला . नवी बाजारपेठ उपलब्ध झाली.साम्यवादी व्यवस्थांचा पराभवच पहावयास मिळतो. स्टालिनच्या काळात कम्युनिस्ट पक्षांनी हजारो पुस्तकावर व लेखकावर बंदी घातली. ती बंदी उठली. साहित्य आणि लोक ह्यांचा संबंध पुन्हा प्रस्थापित झाला.असा साम्यवादाचा बुरखा फाटला."
हे त्यावेळी केलेले वर्णन तंतोतंत बरोबर आहे. आज ह्या देशामधून फिरताना ते जागोजागी दिसून येते. आपण आपल्या देशातील श्रीमंत देवळासंबंधी नेहमी बोलत असतो. पूर्व युरोपातील डोळे दिपवून टाकणारी चर्चेस पाहिलीकी  चर्चचा प्रभाव किती मोठा आहे हे सहज लक्षात येते. ह्या लोकांच्यावर असलेला धार्मिक पगडा कणभरही कमी झालेला दिसत नाही. लोक धार्मिक आहेत. त्यांच्या रूढी आणि परंपरा तशाच आहेत. कदाचित नवी पिढी तेवढी धार्मिक नसेल. पण चर्चचा पगडा आजही कायम आहे.
चर्च - सोनेरी पेंटिंग ,पोलंड

इतर सर्व व्यवस्थांच्या तुलनेत साम्यवादी व्यवस्था निर्दोष असून तिच्यामध्ये वशिलेबाजी ,व्यक्तिगत स्वार्थ भ्रष्टाचार व घराणेशाही यांना वावच मिळू शकत नाही असे दावे कम्युनिस्ट करीत आले आहेत आणि दुर्दैव असें कीं ,आतां जे काहीं परिवर्तन घडून आले आहे त्यांत साम्यवादी व्यवस्थांचा पराभवच जगाच्या निदर्शनास दिसून आला आहे.
स्टालिनच्या काळांत कम्युनिस्ट पक्षांनी हजारो पुस्तकावर आणि लेखकावर बंदी घातली. ज्ञान ही साम्यवादी चाळणीतून चाळले गेले पाहिजे. लोकांपर्यत ते मुक्तपणे पोचून भागणार नाही. अशी त्यांची धारणा होती.
१९४५ मध्ये हिटलर विरोधी मित्र राष्ट्रांनी प्राग ह्या शहराचा ताबा मिळविला. जर्मन आणि नाझी प्रागमधून  पसार झाले .आज प्रागमध्ये जर्मन फारच अल्प आहेत.
१९४८ ते १९८९ ह्या काळात झेकोस्लाव्हाकीयात लष्कराची सत्ता होती व सोव्हियत युनिंच्या वर्चस्वाखाली कम्युनिस्ट प्रणाली सत्तेवर होती. झेकोस्लाव्हाकियामध्ये लेखक, नाटककार आणि बुद्धिवादी वर्ग जागा झाला होता. १९६७ साली लेखकांची आंतरराष्ट्रीय सभा झाली आणि त्यांनी कम्युनिस्ट सत्तेविरुद्ध बुलंद आवाज उठविला. २१ ऑगस्ट १९६८ मध्ये सोव्हियत युनिंयनने झेकोस्लाव्हाकीयावर हल्ला केला आणि चळवळ करणाऱ्या लोकांची मुस्कटदाबी केली. १९८९ मध्ये वेलवेट क्रांती झाली आणि विद्यार्थ्यांनी नवे बंद पुकारले. प्राग मधील सर्व रस्त्यावर मोठ्या संखेने तरुण विद्यार्थी जमा झाले. नवी हवा निर्माण झाली. चळवळीने जोर धरला. आणि १९९३ मध्ये झेक आणि स्लोव्हाकिया हे दोन देश निर्माण झाले. झेक ह्या देशाचा पहिला राष्ट्रपती Dr Havel हा नाटककार होता. त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यांनी नव्या झेकचे स्वप्न पाहिले होते. विजय तेंडुलकरांनी " रामप्रहर " हे त्यांचे पुस्तक ह्या झेक नाटककाराला समर्पित केले होते. मी त्या पुस्तकाचा प्रकाशक होतो. जेंव्हा त्यांनी सगळ्यात शेवटी त्या पुस्तकाची अर्पण पत्रिका लिहिली होती तेंव्हा त्या दिवशी Dr Havel भारतात दिल्लीत होते. झेक आणि प्राग विषयी माझ्या मनात त्या वेळेपासून औत्सुक्य  होते. मी प्रागला भेट दिली तेंव्हा बरोबरच्या गाईडला नाटककार / राष्ट्राध्यक्ष Havel ह्यांच्या संबंधी विचारले तेंव्हा तो सहज बोलून गेला , " तो आमचा भूतकाळ आहे. आतां भविष्याचा विचार हवा. "
राज महाल , वॉर्सा

१९९० पासून प्राग हे पुन्हा युरोपचे प्रमुख केंद्र बनले आहे. राजकीय ,सामाजिक आणि आर्थिक चळवळीचेही केंद्र झाले आहे. इ.स .२००० मध्ये जागतिकरणाच्या विरुद्ध १५००० निदर्शकांनी IMF आणि WORLD BANK ह्यांच्या विरुद्ध मोर्चा काढला होता. आज नव्या अर्थ व्यवस्थेत प्राग शहर महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. पूर्व युरोपचे PARIS असेही म्हंटले जाते. हे खरे ग्लोबल शहर वाटते.
प्राग , बुडापेस्ट आणि वॉर्सा ह्या शहरातून फेरफटका मारला की मुक्त बाजारपेठ पाहून जे परिवर्तन दिसून येते ते पाहिले की साम्यवादी व्यवस्थांचा पराभव निदर्शनास येतो. स्लोव्हाकिया ह्या राष्ट्राने आय टी क्षेत्रात भरारी मारलेली असून बंगलोरशी स्पर्धा चालू आहे .पूर्व युरोपातील ही राष्ट्रे स्वतंत्र झाली आणि जुना( परंपरावादी) आणि नवा ( आधुनिक ) पूर्व युरोप एकाचवेळी पहावयास मिळतो.
ग्लोबल सिटी : वॉर्सा 

दोन महायुद्धे , सतत ३० वर्षे युद्ध परिस्थिती व कम्युनिस्ट राजवटीत झालेली वाताहत हे सर्व  सोसल्यानंतर आज पूर्व युरोपातील प्रमुख शहरे दिमाखाने उभी आहेत. Global Cities म्हणून ह्या शहराकडे पाहिले जाते.
असा हा पूर्व युरोप . खूप बघण्यासारखा आहे.
टिटो चौक , झाग्रेब ,क्रोएशिया 

ह्या प्रवासाचे वर्णन वाचावयाचे असेल तर माझ्या खालील ब्लॉगला अवश्य भेट द्या.
" तरंग "

डॉ नरेंद्र गंगाखेडकर
drnsg@rediffmail.com


Adriyatic Sea, ZAGREB, CROATIA