Thursday, August 15, 2013

पंचाहत्तरी

७५ वर्षे ज्या जेष्ठ नागरिकांनी पूर्ण केली आहेत त्यांचा सत्कार करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला आहे आणि त्यांत सहभागी होण्यासाठी मला आमंत्रित केले आहे त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. आज ह्यां जेष्ठ नागरिकांचा सत्कार करतांना मला खूप आनंद वाटतो आहे. ७५ उन्हाळे पावसाळे पाहिलेल्या ह्या जेष्ठांना मी काय सांगणार ? जगण्याचा विलक्षण अनुभव तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही अनेक चढउतार पाहिले आहेत. यश - अपयश तुमच्या  पदरी पडले आहे. " जीवन ह्यांना कळले हो " हे ही मला माहित आहे. तरीही मला एक गोष्ट नेहमीच वाटत आली आहे की ......
       आपल्याजवळ जगताना जे घांव सोसावे लागतात तीच आपली खरी "सुवर्ण पदके" आहेत हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
जेष्ठ नागरिक संघ 

आज जीवनाच्या उतरणीचा हा  काळ आहे असे तुम्हाला वाटत असणार. त्यांत चूक नाही. जीवनामध्ये एका टप्प्यावर आपली घसरण चालू असते. आपण नेहमीच उंचावर असतो असे नाही. एक उतरणीचा काळ येतोच.
आपण कधीतरी मध्यावर असतो. वाट अर्धीच चालून झालेली असते. पुढची वाट चालावयाची  बाकी असते. आपण अर्ध्या आनंदात आणि अर्ध्या दु:खात  असतो. आपण जीवन भरभरून जगलेले नसते. जीवनात काहींसे निराश झालेले असतो. ऊन-सावलीचा खेळ चालू असतो. ऊन तापदायक वाटते. तर सावलीतही थंडी वाजू लागते. कोवळ्या उन्हाची अपेक्षा असताना रखरखीत उन्हाला सामोरे जावे लागते किंवा ऊब हवी असताना कडाक्याची थंडी सहन करावी लागते. जगणे हे असेच असते.त्यामुळे  आपल्याला जगण्याचा नवा अर्थ समजू लागतो...... मला हिमालयात प्रवास करतांना हे सारखे जाणवत असे.
साठी - सत्तरीला आलेली माणसे आयुष्याच्या ह्या वळणाकडे कशी बघतात ह्याचे वर्णन करायचे असेल तर मला उषा मेहता ह्यांची कविता आठवते ....
मागं ना वळता येत
ना जाता येत पुढं
असल्या विचित्र वळणावर
उभं आयुष्य उभं
पळत सुटलेल्या वर्ष्याच्या
फाडून केल्या चिंध्या
काळ्या तळ्यात बुडवूनदेखील
पाठलाग करीत राहिल्या
फाटतय , पण विटत नाही
रफू करीत राहिलेय
वस्त्र जीर्ण झालं नाही ....पण
सरत आले धागे

अशी अवस्था असते हे खरे आहे.आपण कोणालाही भेटलो की , " काय, कसं काय आहे? ( How are you ? ) असं सहजपणे विचारतो आपल्याला तितक्याच सहजपणे उत्तर मिळते , " मी छान आहे " ( I am fine.) मला सर्व काहीं मिळालं आहे , मी खूप आनंदी आहे. मला जे हवे ते सारं मिळालं आहे " असं असतानांही  डोळ्यात मात्र असमाधान कां दिसते ? .... हा प्रश्न मला नेहमी  भेडसावत असतो. मी त्यामुळे थोडासा अस्वस्थ होतो.
कुटुंब , घर, कार्यालयाचे काम , स्वतःचे आरोग्य  हे सारे म्हणजे आपले रोजचे आयुष्य. काम , कुटुंब , मुलं ह्यांचाच सतत विचार. मुलं मोठी होतात. शिकतात. स्वतःच्या पायावर उभे राहतात. स्वतःचा संसार थाटतात.
कामासाठी घर सोडून दुसरीकडे जातात. आपली बायको आणि आपण आपलं नातं काहीसे विसरतो. जणू काही दूरचे मित्र आहोत असे वागू लागतो . एक दिवस निवृत्तीचा येतो. त्यावेळी विलक्षण पोकळी अनुभवायास येते. त्यामुळेच आयुष्य संपल्यासारखे वाटू लागते. निरर्थक वाटू लागते. आयुष्याला काही प्रयोजनच नाही असं वाटू लागते. तेंव्हाच आयुष्याचा नवा अर्थ शोधायला पाहिजे. नवी प्रयोजने शोधली पाहिजेत. स्वतःसाठी जगता आले पाहिजे.हे सर्व जेष्ठ नागरिकांनी समजून घेतले पाहिजे.
आपण बहुतेक जण जीवनात मिळालेले संकेत समजून घेत नाहीत. त्यामुळे आपली गोची होते.  आयुष्य महत्वाचे नाही. आयुष्याचा प्रवास महत्वाचा असतो. आपण आपल्यापेक्षा इतरावर अधिक प्रेम करणे महत्वाचे आहे. तसेच स्वतःवरही प्रेम केले पाहिजे. स्वतःची काळजी घेतली पाहिजे.स्वतः करिता जगले पाहिजे.
आपल्या ओंजळीत असलेल्या द्राक्षाकडे बघा. त्या द्राक्षांना जीवन मिळालं आहे. त्यांत सूर्याचे प्रेम, पावसाची सुंदरता आणि परमेश्वराची कल्पकता साठलेली आहे. हा तर निसर्गाचा प्रभाव आहे. आपण ही तसेच असतो. निसर्गही आपल्याला असेच देत असतो. तो एक चमत्कार आहे. आनंद आणि समाधानाची वलये आपल्याभोवती  फिरत असतात. तेंव्हा त्या दिव्य प्रेमशक्तीच्या  जाणीवेमुळे आपण आनंदात राहिले पाहिजे. "आनंद वाटत रहा. दु:ख सहन  करा.' हेच मला सांगावेसे वाटते .अधिक काय सांगू ?
कोणत्या वेळी काय होईल हे सांगता येत नाही. Expect the Unexpected. त्याकरिता आनंद उधळीत जगणे हाच खरा उपाय. उरलेल्या आयुष्याचा प्रवास करतांना नको असलेले गाठोडे सोडून देऊन प्रवास केला पाहिजे.
आपण मरावे परंतु जिवंत असावे असे वाटते ना? म्हणजेच"  मरावे परी किर्ती रुपी उरावे ...".आपली आठवण आपल्या आप्तस्वकीयांना सतत होत राहावी असे वाटते ना? मग आनंद वाटत जा. ... आनंद  सगळ्यांनाच हवा असतो.
आपल्या ह्या धकाधकीच्या आयुष्यात आपण  रोज जगतां जगतां मरत असतो. He died while he was alive. असं आपलं जगणं असतं.
मला तर वाटतं की ... While dyeing , we must live. आणि Distribute Happiness to All.
आपण मरणार आहोतच मग जगायचे कशासाठी ? ह्या प्रश्नाचे उत्तर , जगण्यात आनंद लुटता आला पाहिजे हेच आहे. लक्षात ठेवा , आकाशाचा रंग निळा असतो तरीही  ते काळ्याकुट्ट ढगांनी व्यापलेले असते. आयुष्य असेच असते. निळ्या रंगाकडे बघा. आणि काळाकुट्ट अंधार आणणारे ढग विसरून जा ........
आनंद लुटा. आनंद वाटा . शुभेच्छा. धन्यवाद.
( जेष्ठ नागरिक संघ , अंधेरी पूर्व च्या  वर्धापन दिनाच्या दिवशी रोटरी क्लबचा प्रतिनिधी म्हणून  केलेले हे भाषण )

No comments:

Post a Comment