Tuesday, June 25, 2013

केदारनाथ : देव नाही देव्हाऱ्यात

केदारनाथ 

उत्तराखंडात झालेल्या जलप्रलयामुळे तीर्थक्षेत्र असलेल्या केदारनाथाचे रूपांतर अक्षरशः स्मशानात झाले आहे.मंदिराचा बाह्यभाग सुरक्षित दिसत असला, तरी प्रवेशद्वारापुढे पार्थिवांची जणू रांग लागली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरामागे असलेल्या डोंगरावरून आलेल्या पाण्याने सोबत प्रचंड आकाराचे दगड वाहून आणले आणि त्यांच्या मार्गात येणारी प्रत्येक वस्तू उद्‌ध्वस्त झाली.
हे परमेश्वराचे प्रतिक असणार्या केदारनाथा , तुझ्या गाभार्यात आणि देवालयाच्या परिसरात असंख्य भक्तांच्या प्रेतांचा सडा पडलेले दृश्य पाहून मन विषण्ण झाले. हे कसे झाले? " देव तरी त्याला कोण मारी ?" असे म्हणतात. तुझ्यावर असीम भक्ती असणारी ही मंडळी तुला भेटण्यासाठी देशातून निरनिराळ्या ठिकाणाहून हालअपेष्टा सहन करत तेथे आली आणि नाहीशी झाली.  हे असे कसे झाले ? तुझा त्यांच्यावर एवढा राग का? तेंव्हा तू ह्या ठिकाणाहून कुठे निघून गेलास ? तुझे अस्तित्व आहे का? ह्यावरच लोकांचा विश्वास उडाला आहे. तुला भेटायला येणारी असंख्य माणसे  ह्यापूर्वी ही नाहीशी झाली आहेत . ती घरी परतली नाही. असे अनेकदा ऐकले होते. जे सुखरूप परत येत ते केदारनाथाची  कृपाच समजत असत . पण तो काळ वेगळा होता. त्यावेळी प्रवास अधिक कठीण होता. आज तो थोडासा सुखकर तरी आहे.रस्ते आहेत. चांगली वाहने आहेत . ही माणसे तुझ्या मंदिराच्या परिसरातच  गेली. तेंव्हा तूच त्या ठिकाणाहून निघून कसा गेलास? तुझे निवास तसेच उभे आहे."देव नाही देव्हार्यात" असे कसे झाले? आजूबाजूचे सर्वच  नाहीसे झालेले दिसते.
जे देव नाही असे मानतात ते म्हणतात "तुमचा देव कुठे गेला?ह्या देव भक्तांना देव दिसला कां ?,असे विचा रतात ."जे देव आहे असे मानतात ते तर गेले. पण त्यांचे जवळचे नातेवाईक विचारतात ," देवा , असे कां केलेस ? त्यांना आमच्यापासून कां हिरावून नेलेस? तुझ्या वरची असीम भक्ती फारशी उपयोगी पडली नाही ?".
आता प्रश्न पडतो देवा, तुझे अस्तित्व आहे कां ? असेल तर तू कुठे आणि कसा  आहेस? ह्या प्रश्नाचा जेंव्हा विचार करू लागतो तेंव्हा " निसर्ग हाच देवाचे रूप आहे ,असे म्हणतात ते खरे आहे पण हा निसर्ग ही फार लहरी आहे आणि रौद्र रूप धारण करून अनेकांचा विनाश करतो.त्यालाच लोक देवाचा कोप म्हणतात. 
" पृथ्वी आप तसे तेज वायू आकाश पाचवे" असे म्हणून आम्ही निसर्गाला म्हणजे ह्या पंचमहाभूताना  देव मानतो. अशा निसर्गाची आम्ही प्रतीकात्मक पूजा करतो.ह्या विश्वाचा निर्माता म्हणून तुझ्याकडे पहातो.आता तर विज्ञानाने ह्या विश्वाच्या पलिकडेही अनेक विश्वे आहेत असे शोधून काढले आहे. मग ह्या विश्वातील होणार्या घडामोडीस कोण जबाबदार आहे? ब्रम्हा,विष्णू आणि  महेश ह्या त्रि-मूर्ती पैकी तू एक  म्हणून केदारनाथला  महेशा. तुझ्या दर्शनासाठी  ही भक्त मंडळी  आली आणि तुझ्याच प्रांगणात नाहीशी झाली. हे असे कसे झाले? ह्याचेच उत्तर शोधायचे आहे.
पंचमहाभूतांची महायुती झाली की महाप्रलय होतो हे ह्या घटनेवरून सिद्ध होते. हिमालयाच्या रांगा( पृथ्वी ) , बर्फाच्छादित हिमशिखरे आणि ओसंडून वाहणाऱ्या नद्या ( आप) , सूर्याची उष्णता ( तेज ), सोसाट्याचा वारा ( वायू )आणि ढगफुटी मुळे ( आकाश ) येणारा पाऊस ह्या पंचमहाभूतानीच हा प्रलय घडवून आणला हे खरे आहे .दरडी र्कोसळणे , नद्यांना पूर येणे , रस्ते वाहून जाणे हे हिमालयात नवीन नाहीच. हा निसर्ग तसाच आहे .
 हा निसर्ग विविध रूपे घेतो. तो अतिशय सुंदर आहे . शांत आहे. प्रसन्न आहे. मनाला विलक्षण शांती देतो. हिमालयाचा हा परिसर ही देव भूमीच आहे. त्यामुळेच आदी शंकराचार्य येथे  आले. १००० वर्षापूर्वी त्यांनीच येथे तुझी प्रतिष्ठापना केली. गुरु गोविद सिंगजिना इथेच यावेसे वाटले. जवळच असलेल्या हेमकुंड येथे त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली. हिमालयाचे हे अध्यात्मिक वेड बर्याच जणांना लागले. सर्वच मोठ्या विभूती हिमालयात जावून दिव्य दृष्टी प्राप्त करून घेतात. वानप्रस्थाश्रमात गेलेले आमच्यासारखे सारेच सामान्य लोक चारधाम यात्रा करून आनंद आणि समाधान मिळवत घरी परततात. मानसिक समाधान आणि अध्यात्मिक आनंद मिळवण्यासाठी ही सारी मंडळी चारधाम यात्रा करतात .ते चारधाम आज मृत्यूधाम झाले. चारधामचा  हा निसर्ग मन:शांती देतो. जेंव्हा निसर्ग शांत असतो तेंव्हाच ते येथे येण्याची हिम्मत करतात. निसर्गाचे अक्राळविक्राळ रूप त्यांना माहीत नसते असे नाही . त्यांनी फक्त ऐकलेले असते. असा हा अक्राळविक्राळ निसर्गही  तुझेच एक रूप आहे  "शंकराचा रुद्रावतार काय असतो? हे आम्ही डोळ्यांनी पाहिले, पन्नास फूट उंच उसळणाऱ्या लाटा, काड्या आणि डब्याप्रमाणे वाहणारे लोक आणि त्यांची वाहने. जणू महादेवाने आपला तिसरा डोळाच उघडला असावा. ज्यांना सामावून घ्यायचे होते , त्यांना सामावून घेतले, मात्र आम्ही शंकराच्या इच्छेमुळेच वर जाऊ शकलो नाही. केदारनाथला गेलो असतो तर आज आम्ही जिवंत राहिलो नसतो," अशा शब्दांत या केदारनाथ यात्रेतील संकटातून सुखरुप परतलेल्या यात्रेकरूंनी आपल्या भावनांना वाट करून दिली.
"केदारनाथ दर्शनासाठी आलो, मात्र मंदिरावर गेलो नाही. घोडेवाल्यांनी जाण्यास ‌नकार दिला. तेवढ्यातच जोरात आवाज आला. अन् पाण्याचा प्रचंड प्रवाह येत असल्याचे काही लोकांनी सांगितले. आम्ही लॉजमध्ये थांबलो होतो. पाण्याचा डॅम फुटला की काय असे वाटले , पाण्याचा प्रवाह वाढलयाने आम्ही लॉजच्या तिसऱ्या मजल्यावर चढलो. आम्ही आणि आमचा ग्रुप वर चढण्यात यशस्वी झाला, मात्र जे  लोक तिसऱ्या मजल्यावर चढू शकले नाहीत. ते पाणी आणि गाळाच्या प्रवाहात हरवून गेले. हे दृष्य आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले." असे वर्णन तुझ्या भक्तांनी केले. तुझ्या प्रांगणातच जन्म आणि मृत्यू यामध्ये किती सूक्ष्म सीमारेषा आहे त्याचं भयाण दर्शन मन सुन्न करून टाकत होतं. असं हे यात्रेकरू सांगत होते." मृत्यू आमचा पाठलाग करीत होता. आम्ही केदारनाथ सोडले व काही वेळातच महाप्रलयाला सुरुवात झाली. हा प्रलय आमचा पाठलाग करीत होता व आम्ही पुढे-पुढे पळत होतो. पाण्याने रौद्ररूप घेतले होते. वाटेत येणारी घरे, झाडे, टेकडय़ा सर्वकाही बाजूला सारून पाणी पुढे जात होते. जाताना आम्ही तेथील निसर्गाचा आनंद घेतला, पण परतताना त्याच निसर्गाचे भयावह रूप पाहिले." ढगफुटी हेच प्रमुख कारण असले तरी येथील निसर्ग असाच आहे. केदारनाथ मंदिर हे बर्फाच्छादित हिमालयात आहे.फक्त चार महिने त्या ठिकाणी जाता येते. मंदिराच्या मागे ज्या हिमालयाच्या रांगा आहेत त्यामध्ये तीन ग्लेसिअर आहेत. ह्या पैकी एखादी ग्लेसिअर फुटली की प्रंचंड वेगाने पाण्याचा प्रवाह सुरु होतो , नद्या दुथड्या भरून वाहू लागतात. पाण्याने झिजलेला डोंगर कोसळू लागतो आणि असा महाप्रलय होतो. अशा ह्या निसर्गाचा तू निर्माता , संरक्षण कर्ता आणि विनाश कर्ता. बद्रीनाथचा संरक्षक देव विष्णूही हताश झालेला दिसला. गन्गौत्रीची गंगा माय ही अशीच रुसली. भागीरथी आणि अलकनंदा ह्यांनी रौद्र रूप धारण केले. अभूतपूर्व महाप्रलयाने अनेकांचे जीव घेतले. मृत्यू सातत्याने पाठलाग करीत असताना त्याच्या दाढेतून काही जण सुखरूप परतले, त्यामुळे त्यांचा नवा जन्मच झाला , अशी भावना उत्तराखंडमधून परतलेल्या अनेक यात्रेकरूंनी व्यक्त केली. तू सुखकर्ता,दुखहर्ता असूनही विघ्नकर्ता कसा झालास ? त्यामुळेच तुझे अस्तित्व आहे का? असा  प्रश्न काही जण  विचारतात तेंव्हा तू नसावास असेच काही जणांना वाटते ते स्वाभाविकच आहे.
श्रीकृष्णाने अर्जुनाला तुझी निरनिराळी रूपे समजावून सांगितली. नव्हे तुझे अक्राळविक्राळ रूपच प्रत्यक्ष अर्जुनास दाखविले. विनोबांनी "गीताई" मध्ये तुझ्या त्या भयानक रूपाचे जे  वर्णन केले तेच आज माझ्या डोळ्यासमोर उभे राहते आणि हे पटते की तू विश्वनिर्माता असल्यामुळेच ही वेगळी वेगळी रूपे घेतो.
आज जे केदारनाथच्या आणि हिमालयाच्या ह्या परिसरात घडले आहे ते घडविणारा तूच आहे. तूच निर्माता आणि तूच नष्ट करणारा.
"गीताई"तील तुझे वर्णन असे आहे ……
'उत्पत्ती-नाश भूतांचे ऐकले मी " नाश करण्याचा हा तुझाच महिमा विलक्षण विषण्ण करून गेला 
"पहा दिव्य तशी माझी रूपे शत- सहत्र तू"  हे  खरे असले तरी " पहा अनेक आश्चर्ये कधी कोणी नं पाहीली ".असे हे अघटीत घडले तुझ्या दारी असे म्हणण्याची वेळ आली.
हिमालयाच्या परिसरातील हा  निसर्ग म्हणजे ,"
 दिव्य वस्त्रे फुले गंध लेउनी सर्वतोपरी ,
 आश्चर्ये भरला देव विश्व-व्यापी अनंत तो "
म्हणूनच सारेजण चारधाम यात्रा करतात. 
जिथे जिथे तू चि अनंत-रूपे ", म्हणूनच सारे तुझी विविध रूपे ह्या निसर्गात बघत असतात...
 भागीरथी , मंदाकिनी , पुष्पावती , अलकनंदा. गंगा, यमुना ह्या सर्व नद्यांचे प्रवाह नुसते अवखळ झाले नाही तर त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील अनेकांना मुखात घेतले. एवढेच काय शिवाची प्रचंड मूर्ती ही वाहून गेली.
तुझ्या समोर तर अनेकांनी जीव सोडला. मंदाकिनीने सर्वाना गिळंकृत केले.
तसे चि लोक तुझ्या मुखात 
घेती उद्या वेग-भरे माराया 
दाही दिशा विस्तृत अंतराळ 
व्यापुनी तू एक चि राहिलासी
पाहुनी हे अद्भुत उग्र रूप 
तिन्हीजगे व्याकुळली उदारा
असे हे तुझे उग्र आणि अक्राळविक्राळ रूप पाहून मन विषण्ण आणि दिग्मूढ  होते आणि तुझ्यावरचा विश्वास उडू लागतो. तुझे हे उग्र आणि रौद्र रूप फार भयानक असे दिसून आले. पर्जन्य ही सुद्धा देवता म्हणून पूजिली जाते त्या पर्जन्याने ही हा  हाहा:कार केला. आणि मग असा प्रश पडतो की 
सांगा असा कोण तुम्ही भयाण 
नमूं तुम्हां देव-वर न कोपा 
जाणाव्या उत्सुक आदि देवा 
ध्यानी न ये की करणी कशी ही 
मनाने सर्वस्वी तुझा ध्यास असलेले , बुद्धीने तुझे श्रेष्ठत्व मान्य केलेले आणि आपला अहंकार गुंडाळून तुझ्यापुढे नतमस्तक होण्यासाठी  हे सारे भक्तगण तुझ्या दर्शनासाठी शारीरिक पीडा सहन करीत मोठा दीर्घ प्रवास करून तुझ्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी आले आणि तेथेच हे जग सोडून गेले हे पाहून तुझ्या अस्तित्वाची शंका येणार नाहीतर काय?  तुझ्या देखत हे घडलेच कसे असा प्रश्न मनाला भेडसावीत रहातो." देव नाही देव्हार्यात" असेच वाटू लागते.

महाप्रलयानंतरचे  केदारनाथ  


डॉ नरेंद्र गंगाखेडकर 
drnsg@rediffmail.com






















Thursday, June 13, 2013

दुसर्या महायुद्धाच्या खुणा ::कोहिमा आणि इम्फाळ


Second World War Memorial, Kohima

दुसर्या महायुद्धात प्रत्यक्ष ज्या भारतीय प्रदेशांना झळ बसली ते प्रदेश म्हणजे आजचा नागाल्यान्ड आणि मणिपूरचा भाग.कोहिमा आणि इम्फाळ ह्या ठिकाणी प्रत्यक्ष युद्धभूमी होती. शेजारी ब्रम्हदेश. जपानी सैन्य ह्या भागात येउन पोहोंचले होते. ब्रिटिशानीं जपानी सैन्याला थोपवून धरले होते. नेताजी सुभाष ह्यांची आझाद हिंद सेना येथेच कार्यरत होती. त्यांचे प्रमुख कार्यालय इम्फाळ पासून ३० कि. मी. अंतरावरील मोइरांग येथेच होते. त्यामुळे ह्या दोन्ही ठिकाणांना भेट देण्याचे ठरविले होते. ह्या दोन्ही ठिकाणीं दुसऱ्या महायुध्दाच्या खुणा आजही बघावयास मिळतात.
INA WAR Memorial
 पूर्वांचलचा दौरा अरुणाचलमधील तवांगपासून सुरु केला. त्याचे प्रमुख कारण म्हणजे १९६२ चे चीन बरोबर जे युद्ध झाले होते ती युद्ध भूमी पहावयाची होती. हिमालयाचा तो दुर्गम प्रदेश पहावयाचा तर होताच पण अरुणाचलचे आगळे वेगळे सौन्दर्य आणि संस्कृती जवळून पहावयाची होती. तवांगहून परतलो. काझीरंगाचा रोमांचकारक अनुभव घेतल्यानंतर आम्ही निघालो कोहिमाकडे. कोहिमा ही नागाल्यान्डची राजधानी. रस्ते तसे बरे होते. सर्वत्र हिरवाई. डोंगराळ भाग. सुखद प्रवास. तसा दुर्गम प्रदेश.
आय एन ए स्मारक 
कोहिमा हे अनगामी नागा आदिवासीचे गांव. नागा ही ह्या भागातील मुख्य आदिवासी जमात. त्यांच्यावर कोणाही राजाचे राज्य नव्हते. केवहिमाचा अपभ्रंश म्हणजे कोहिमा. एक लाख वस्तीचा हा नागा प्रदेश. १०,००० चौ.की.मी क्षेत्रफळ .ब्रिटिशानां हा प्रदेश ताब्यात घेण्यासाठी खूप वर्षे लागली . शेजारीच थोड्या अंतरावर ब्रम्हदेश.१८४० मध्ये ब्रिटीशानीं कोहीमावर पहिली स्वारी केली. त्यानंतर तब्बल ५० वर्षांनी त्यांनी कोहीमावर कबजा मिळविला.
नागा संस्कृती वेगळीच आहे. त्यांची राहणी वेगळी. खाणे-पिणेही वेगळे. चालीरीती आणि पेहराव वेगळे. त्यांच्यात अनेक पोटजाती. त्यांची बांबूची घरे फारच आकर्षक. वास्तुकलेचा उत्तम नमुना. प्रत्येक घरावर एक विशिष्ट खूण असलेले हत्यार. त्यावरून त्यांची जमात ही ओळखता येते असे म्हणतात. त्यांचे नृत्य ही विलोभनीय. नागा पेंटिंग , नागा खेळ, नागांची लाकूडकामाची कलाकुसर, त्यांची शिल्पकला, त्यांचे संगीत ,लोकनृत्य सारेच वेगळे.
नागा संस्कृतीचा इतर भारतीय संस्कृतीशी फारसा जवळचा संबंध दिसत नाही. मिशनरी प्रभाव दिसून येतो . अलीकडे साक्षरता ७० टक्क्या पर्यंत वाढली आहे . कोहिमामधील तरुण मुले- मुली जीनमध्ये आणि आधुनिक ड्रेस मध्ये फिरताना दिसतात. त्यांचा आधुनिक पेहराव म्हणजे नव्या युगाकडे वाटचाल. ब्रिटिशानीं आणि मिशनरी लोकांनी ह्या भागात बरीच वर्षे वसाहत केल्यामुळे त्यांचा प्रभाव निश्चितपणे पडला आहे हे सहज दिसून येते.
दुसर्या महायुद्धात ब्रिटीश सैन्याला जपानी सैन्याशी लढा द्यावा लागला ते कोहिमाच्या ग्यारीसन हिलवर. युमनम ह्या इतिहासकाराच्या मते ब्रिटिशानीं जपानी लोकांच्या बरोबर केलेली ही सर्वात मोठी लढाई. १९४४ चे कोहिमा आणि इम्फाळचे युद्ध हे सर्वात मोठे युद्ध असे ब्रिटीशानीं अलीकडेच जाहीर केले आहे. ह्या युद्धामुळेच खरी कलाटणी मिळाली आणि ब्रिटिशानां भारत सोडून जाण्याचा निर्णय घ्यावा लागला हे खरे सत्य आहे. ह्या युद्धात जपानचा विजय झाला असता तर सारे चित्रच  वेगळेच झाले असते. पण हे झाले जर तर. जपानची आक्रमकता संपुष्टात आली असली तरी ब्रिटीश साम्राज्य मात्र खिळखिळे झाले ते ह्या एका युद्धामुळे. " लढा किंवा मरा (Do or Die)" ह्या घोषणेला समोर ठेऊन ब्रिटीश सैन्य लढले. ३ एप्रिल१९४४ ला कोहीमाचे युद्ध सुरु झाले.१५०० ब्रिटीश सैनिक आणि १०००० जपानी सैनिक ह्यांच्यातील हे तुंबळ युद्ध. ह्या युद्ध भूमीला भेट देणे हेच कोहीमाचे प्रमुख आकर्षण. ब्रिटिशाना अभिमान वाटावा असा पराक्रम त्यांनी ह्या रणभूमीवर केला. असंख्य ब्रिटीश सैनिक ह्यात मारले गेले. त्यांत भारतीय सैनिकही होते. ते ब्रिटिशासाठी लढत होते. दोन आठवडे चाललेले हे धमासान युद्ध. त्या युद्ध भूमीवर जे सैनिक धारातीर्थी पडले त्यांचे युद्ध स्मारक म्हणजे तेथील दफनभूमी. कॉमन वेल्थ वार ग्रेव्ह कमिशन ह्या दफनभूमीची देखभाल करते. असंख्य ब्रिटीश नागरिक त्यांच्या मृत नातेवाईकाना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुद्दाम येथे येतात. ही सिमेट्री शहराच्या मध्यभागीच आहे. कोहिमा ब्याटल ऑफ टेनिस कोर्ट म्हणून ह्या ठिकाणाचा उल्लेख केला जातो. त्या ठिकाणी खालील दिलेल्या काव्यपंक्ती कोरल्या आहेत:


WHEN YOU GO HOME,
TELL THEM OF US AND SAY,
FOR YOUR TOMORROW,
WE GAVE OUR TODAY

जॉन म्याक्स एड्मोंड ह्यांच्या ह्या  काव्यपंक्ती कोहिमा काव्य म्हणून प्रसिद्ध आहेत.
नागा नृत्य
कोहीमाला नागा संस्कृतीची झलक पहावयाची असेल तर तेथील नागा मुझीयम बघितले पाहिजे. फार सुंदर पद्धतीने मांडणी केली आहे. तसेच दर डिसेम्बर मध्ये नागा व्हिलेज मध्ये होणारे होर्न बिल महोत्सव पहाण्यासारखा असतो. आम्ही तेथे गेलो तेंव्हा त्या महोत्सवाची जोरदार तयारी चालू होती. फुटीरतावादी चळवळ हाच येथील प्रमुख सामाजिक - राजकीय प्रश्न. देशातील प्रमुख राजकीय पक्ष येथे प्रभावीत नाहीत .प्रादेशिक अस्मिता हे महत्वाचे प्रमुख कारण. ते तर आपल्या सर्व प्रांतातून दिसून येतेच.
कोहिमा सोडले आणि इम्फाळकडे निघालो. आठ तासाच्या प्रवासासाठी बारा तास लागले. रस्ते फारच वाईट. ह्या सर्व राज्यामधून प्रवास  करावयाचा तर दुसरे काहींच दळणवळणाचे मार्ग नाहीत. त्यामुळे पर्यटक येत नाहीत.
नागा योद्धा
मणिपूर मधील महत्वाचे ऐतिहासिक ठिकाण म्हणजे मोइरांग. इंफाळ पासून ३० कि. मी. अंतरावर. आझाद हिंद सेनेचे प्रमुख कार्यालय ह्या  ठिकाणीच होते . त्या ठिकाणी जायचे होतेच. पण त्यापूर्वी इंफाळ ह्या राजधानी असलेल्या शहराचा फेरफटका केला.१८९१ ते १९४७ पर्यंत राज घराण्यांनी मणिपूरवर राज्य केले. १९५६ पर्यंत केंद्र शासित असलेल्या मणिपूरला १९७२ मध्ये संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. फुटीरतावादी संघटनेच्या कारवाया येथेही चालूच असतात .श्री श्री गोविंदाजी देऊळ हे सर्वात जुने मंदिर. येथील राजाचे पुजास्थान. येथील प्राचीन संस्कृतीचे एक प्रतिक. मणिपुरी नृत्य ही जुनी लोककला. त्यातील रासलीला सर्वात प्रसिद्ध. मणिपूरमध्ये संपूर्णपणे स्त्रियांनी चालविलेले लिमा मार्केट प्रसिद्ध आहे. सर्व व्यवहार फक्त स्त्रियाच बघतात. स्त्री-प्रधान संस्कृतीचे प्रतिक. लोकताक हे लेक बघण्यासारखे आहे. प्रचंड. जणू काही समुद्रच. ब्रम्हदेशाची सीमा फक्त ६९ कि. मी. अंतरावर आहे. इंडो- बर्मा रोडवर थोड्याशा उंचावर गेलेकी ब्रम्हदेश दिसतो.
नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांनी मोरीयांगहून आझाद हिंद सेनेची सूत्रे हलविली होती  त्या ठिकाणास भेट दिली.१९४३ मध्ये जेंव्हा जपानी लष्कराने मलय पेनिन्सुला ब्रिटीश लोकांच्या ताब्यातून घेतला तेंव्हा ब्रिटीश सैन्यात असलेले हजारो भारतीय सैनिक त्यांचे युद्धबंदी होते. नेताजींनी जपानी सरकार बरोबर करार केला आणि त्या भारतीय युद्ध कैद्यांना सोडविले आणि आझाद हिंद सैन्यात सामील करून घेतले. त्यावेळी सिंगापूर मध्ये स्वतंत्र भारताची घोषणा केली. त्या पूर्वी म्हणजे १९४२ मध्ये मोईरांगला आझाद हिंद सेनेचे प्रमुख कार्यालय होते. नेताजी सुभाष ह्यांनी ह्याच ठिकाणी म्हणजे १४ एप्रिल १९४४ ला भारताचा तिरंगा फडकावून स्वतंत्र भारताची घोषणा केली. आज त्या ठिकाणी INA म्युझियम उभे आहे. १९६७ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याचे उद्घाटन केले होते.
नेताजी सुभाष ह्यांनी येथे स्वातंत्र्याची घोषणा केली
 इंफाळ आणि कोहिमा ह्या ठिकाणी जे युद्ध झाले त्यावेळी जपानी लष्कराला आझाद हिंद सेनेने बरीच मदत केली. आपण अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळविले असा आपला एक समज. पण दुसर्या महायुद्धात कोहिमा आणि इंफाळच्या लढायामुळेच इंग्रजांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला असे इतिहासकारांना आजही  वाटते त्यात बरेच तथ्य आहे. " दिल्लीला चला" " अशीच घोषणा नेताजींनी केली होती. आझाद हिंद सेनेने ह्या भूमीवर रक्त सांडले आणि इंग्रजांचे धाबे दणाणले होते हे एक सत्य आहे. रॉयल इंडिया नेव्ही मधील नाविकांचे बंड आणि ब्रिटीश सैन्यात असलेल्या भारतीय सैनिकावरील उडालेला विश्वास ह्या दोन प्रमुख कारणामुळे इंग्रजांनी भारत सोडून जाण्याचा निर्णय घेतला हे आझाद हिंद सेनेचे यश. गांधीजींच्या अहिंसक चळवळीपेक्षा हा दबाव अधिक होता हे त्यावेळच्या ब्रिटीश पंतप्रधानांनी मान्य केले होते हे एक सत्य. ब्रिटीश सरकारने अजूनही काही कागदपत्रे गुप्त ठेवली आहेत. बी बी सी न्यूजने असे स्पष्टपणे सांगितले आहे की कोहीमाचे युद्ध आणि नाविकांचे बंड ह्यांच्यामूळेच भारत सोडण्याचा निर्णय घेण्याचे ठरले होते. 
गांधीजींच्या अहिंसक मार्गाने इंग्रज जातील असा विश्वास नेताजी सुभाष ह्यांना नव्हता. १९३१ चा गांधी - आयर्विन करार त्यान मान्य नव्हता. म्हणूनच त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. "शत्रूचा जो शत्रू तो आपला मित्र" ह्या युद्धनीती प्रमाणे जपानी सरकार बरोबर त्यांनी  हात मिळवणी केली. भारतीय सैनिक जे जपानचे युद्ध कैदी होते त्यांना आझाद हिंद सेनेत सामील करून घेतले. लढा तीव्र केला." तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो" ही नेताजींची घोषणा, त्यासाठी त्यांनी उभे केलेली आझाद हिंद सेना , जपान बरोबर केलेला करार, युद्धबंदी भारतीय सैनिकांची सुटका आणि त्यांचे आझाद हिंद सेनेत सामील होणे ह्या सर्व बाबींचा विचार केला आणि ही युद्धभूमी बघितलिकी त्यांच्या लढण्याच्या वृत्तीचे दर्शन होते. अशा ह्या दुर्गम भागात राहून त्यांनी हे सर्व कसे उभे केले असेल ह्याचेच आश्चर्य वाटू लागते. मोइरांगचे INA WAR मेमोरिअल बघीतले की स्वातंत्र्य लढ्याचे ते सोनेरी पान समोर येते आणि आपण नतमस्तक होतो. कोहिमा आणि इंफाळ ह्यांना भेट दिली की दुसर्या महायुद्धाच्या ह्या खुणा तर दिसतातच पण आझाद हिंद सेनेचे कार्य अचंबित करून टाकते.
आजही हा सगळा पूर्वांचल अस्थिर आहे. अशांत आहे. प्रादेशिक अस्मितेचा जसा प्रश्न आहे तसाच आदिवासी आणि आदिवासी नसलेल्यातील संघर्ष आहे.
गोविंदजी मंदिर , इम्फाळ
उत्तर पूर्व प्रांतातील अनेक तरुण आणि तरुणी दिल्ली, बंगलोर ह्या ठिकाणी शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी वास्तव्य करतात.त्यांना इतर भारतीय लोकांचा फारसा चांगला अनुभव येत नाही.त्यांचे दिसणे थोडेसे निराळे आहे. चपटे नाक आणि बारीक किलकिले डोळे.इतर भारतीय लोक उंच नाकाचे आणि मोठ्या डोळ्यांचे असतात.त्यामुळे हे थोडे वेगळे दिसतात. मंगोल वंशीय असे दिसणे इतर भारतीय लोकांना वेगळे वाटते. त्यांच्या अशा दिसण्यावरून ते भेदभाव करतात,ह्याचा पूर्वांचलाच्या मुलामुलीना फार राग येतो. त्यात चूक काहीच नाही. आपण ह्या दिसण्यावरून टीका करणे योग्य नव्हे. हे इतर भारतीयांनी समजून घेतले पाहिजे. तसेच पुर्वांचलातील ट्रायबल जमातींना मानाने वागविले पाहिजे.
लोकताक  लेक ,इंफाळ
भारतीय एकात्मतेसाठी अजून खूप प्रयत्न करावयास पाहिजेत. भारताची ही उत्तर- पूर्व सीमा सुरक्षित राहिली पाहिजे व पूर्वांचलातील लोकांना" भारत हा माझा देश आहे"  हे मनापासून वाटले पाहिजे व इतर भारतीयांनी त्यांच्याशी कसलाही भेदभाव करता कामा नये.
अविकसित भागातील ह्या जमातींना योग्य ती विकासाची संधी देणे फार महत्वाचे आहे. त्यांची संस्कृती आणि राहणीमान थोडे वेगळे आहे पण त्यांना सामावून घेणे फार महत्वाचे आहे. इतर भारतीय लोकांचे हे काम आहे हे ह्या प्रवासात विशेष जाणवले.एकात्म भारतासाठी हे करणे अत्यंत आवश्यक आहे.



डॉ नरेंद्र गंगाखेडकर
drnsg@rediffmail.com