Thursday, June 13, 2013

दुसर्या महायुद्धाच्या खुणा ::कोहिमा आणि इम्फाळ


Second World War Memorial, Kohima

दुसर्या महायुद्धात प्रत्यक्ष ज्या भारतीय प्रदेशांना झळ बसली ते प्रदेश म्हणजे आजचा नागाल्यान्ड आणि मणिपूरचा भाग.कोहिमा आणि इम्फाळ ह्या ठिकाणी प्रत्यक्ष युद्धभूमी होती. शेजारी ब्रम्हदेश. जपानी सैन्य ह्या भागात येउन पोहोंचले होते. ब्रिटिशानीं जपानी सैन्याला थोपवून धरले होते. नेताजी सुभाष ह्यांची आझाद हिंद सेना येथेच कार्यरत होती. त्यांचे प्रमुख कार्यालय इम्फाळ पासून ३० कि. मी. अंतरावरील मोइरांग येथेच होते. त्यामुळे ह्या दोन्ही ठिकाणांना भेट देण्याचे ठरविले होते. ह्या दोन्ही ठिकाणीं दुसऱ्या महायुध्दाच्या खुणा आजही बघावयास मिळतात.
INA WAR Memorial
 पूर्वांचलचा दौरा अरुणाचलमधील तवांगपासून सुरु केला. त्याचे प्रमुख कारण म्हणजे १९६२ चे चीन बरोबर जे युद्ध झाले होते ती युद्ध भूमी पहावयाची होती. हिमालयाचा तो दुर्गम प्रदेश पहावयाचा तर होताच पण अरुणाचलचे आगळे वेगळे सौन्दर्य आणि संस्कृती जवळून पहावयाची होती. तवांगहून परतलो. काझीरंगाचा रोमांचकारक अनुभव घेतल्यानंतर आम्ही निघालो कोहिमाकडे. कोहिमा ही नागाल्यान्डची राजधानी. रस्ते तसे बरे होते. सर्वत्र हिरवाई. डोंगराळ भाग. सुखद प्रवास. तसा दुर्गम प्रदेश.
आय एन ए स्मारक 
कोहिमा हे अनगामी नागा आदिवासीचे गांव. नागा ही ह्या भागातील मुख्य आदिवासी जमात. त्यांच्यावर कोणाही राजाचे राज्य नव्हते. केवहिमाचा अपभ्रंश म्हणजे कोहिमा. एक लाख वस्तीचा हा नागा प्रदेश. १०,००० चौ.की.मी क्षेत्रफळ .ब्रिटिशानां हा प्रदेश ताब्यात घेण्यासाठी खूप वर्षे लागली . शेजारीच थोड्या अंतरावर ब्रम्हदेश.१८४० मध्ये ब्रिटीशानीं कोहीमावर पहिली स्वारी केली. त्यानंतर तब्बल ५० वर्षांनी त्यांनी कोहीमावर कबजा मिळविला.
नागा संस्कृती वेगळीच आहे. त्यांची राहणी वेगळी. खाणे-पिणेही वेगळे. चालीरीती आणि पेहराव वेगळे. त्यांच्यात अनेक पोटजाती. त्यांची बांबूची घरे फारच आकर्षक. वास्तुकलेचा उत्तम नमुना. प्रत्येक घरावर एक विशिष्ट खूण असलेले हत्यार. त्यावरून त्यांची जमात ही ओळखता येते असे म्हणतात. त्यांचे नृत्य ही विलोभनीय. नागा पेंटिंग , नागा खेळ, नागांची लाकूडकामाची कलाकुसर, त्यांची शिल्पकला, त्यांचे संगीत ,लोकनृत्य सारेच वेगळे.
नागा संस्कृतीचा इतर भारतीय संस्कृतीशी फारसा जवळचा संबंध दिसत नाही. मिशनरी प्रभाव दिसून येतो . अलीकडे साक्षरता ७० टक्क्या पर्यंत वाढली आहे . कोहिमामधील तरुण मुले- मुली जीनमध्ये आणि आधुनिक ड्रेस मध्ये फिरताना दिसतात. त्यांचा आधुनिक पेहराव म्हणजे नव्या युगाकडे वाटचाल. ब्रिटिशानीं आणि मिशनरी लोकांनी ह्या भागात बरीच वर्षे वसाहत केल्यामुळे त्यांचा प्रभाव निश्चितपणे पडला आहे हे सहज दिसून येते.
दुसर्या महायुद्धात ब्रिटीश सैन्याला जपानी सैन्याशी लढा द्यावा लागला ते कोहिमाच्या ग्यारीसन हिलवर. युमनम ह्या इतिहासकाराच्या मते ब्रिटिशानीं जपानी लोकांच्या बरोबर केलेली ही सर्वात मोठी लढाई. १९४४ चे कोहिमा आणि इम्फाळचे युद्ध हे सर्वात मोठे युद्ध असे ब्रिटीशानीं अलीकडेच जाहीर केले आहे. ह्या युद्धामुळेच खरी कलाटणी मिळाली आणि ब्रिटिशानां भारत सोडून जाण्याचा निर्णय घ्यावा लागला हे खरे सत्य आहे. ह्या युद्धात जपानचा विजय झाला असता तर सारे चित्रच  वेगळेच झाले असते. पण हे झाले जर तर. जपानची आक्रमकता संपुष्टात आली असली तरी ब्रिटीश साम्राज्य मात्र खिळखिळे झाले ते ह्या एका युद्धामुळे. " लढा किंवा मरा (Do or Die)" ह्या घोषणेला समोर ठेऊन ब्रिटीश सैन्य लढले. ३ एप्रिल१९४४ ला कोहीमाचे युद्ध सुरु झाले.१५०० ब्रिटीश सैनिक आणि १०००० जपानी सैनिक ह्यांच्यातील हे तुंबळ युद्ध. ह्या युद्ध भूमीला भेट देणे हेच कोहीमाचे प्रमुख आकर्षण. ब्रिटिशाना अभिमान वाटावा असा पराक्रम त्यांनी ह्या रणभूमीवर केला. असंख्य ब्रिटीश सैनिक ह्यात मारले गेले. त्यांत भारतीय सैनिकही होते. ते ब्रिटिशासाठी लढत होते. दोन आठवडे चाललेले हे धमासान युद्ध. त्या युद्ध भूमीवर जे सैनिक धारातीर्थी पडले त्यांचे युद्ध स्मारक म्हणजे तेथील दफनभूमी. कॉमन वेल्थ वार ग्रेव्ह कमिशन ह्या दफनभूमीची देखभाल करते. असंख्य ब्रिटीश नागरिक त्यांच्या मृत नातेवाईकाना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुद्दाम येथे येतात. ही सिमेट्री शहराच्या मध्यभागीच आहे. कोहिमा ब्याटल ऑफ टेनिस कोर्ट म्हणून ह्या ठिकाणाचा उल्लेख केला जातो. त्या ठिकाणी खालील दिलेल्या काव्यपंक्ती कोरल्या आहेत:


WHEN YOU GO HOME,
TELL THEM OF US AND SAY,
FOR YOUR TOMORROW,
WE GAVE OUR TODAY

जॉन म्याक्स एड्मोंड ह्यांच्या ह्या  काव्यपंक्ती कोहिमा काव्य म्हणून प्रसिद्ध आहेत.
नागा नृत्य
कोहीमाला नागा संस्कृतीची झलक पहावयाची असेल तर तेथील नागा मुझीयम बघितले पाहिजे. फार सुंदर पद्धतीने मांडणी केली आहे. तसेच दर डिसेम्बर मध्ये नागा व्हिलेज मध्ये होणारे होर्न बिल महोत्सव पहाण्यासारखा असतो. आम्ही तेथे गेलो तेंव्हा त्या महोत्सवाची जोरदार तयारी चालू होती. फुटीरतावादी चळवळ हाच येथील प्रमुख सामाजिक - राजकीय प्रश्न. देशातील प्रमुख राजकीय पक्ष येथे प्रभावीत नाहीत .प्रादेशिक अस्मिता हे महत्वाचे प्रमुख कारण. ते तर आपल्या सर्व प्रांतातून दिसून येतेच.
कोहिमा सोडले आणि इम्फाळकडे निघालो. आठ तासाच्या प्रवासासाठी बारा तास लागले. रस्ते फारच वाईट. ह्या सर्व राज्यामधून प्रवास  करावयाचा तर दुसरे काहींच दळणवळणाचे मार्ग नाहीत. त्यामुळे पर्यटक येत नाहीत.
नागा योद्धा
मणिपूर मधील महत्वाचे ऐतिहासिक ठिकाण म्हणजे मोइरांग. इंफाळ पासून ३० कि. मी. अंतरावर. आझाद हिंद सेनेचे प्रमुख कार्यालय ह्या  ठिकाणीच होते . त्या ठिकाणी जायचे होतेच. पण त्यापूर्वी इंफाळ ह्या राजधानी असलेल्या शहराचा फेरफटका केला.१८९१ ते १९४७ पर्यंत राज घराण्यांनी मणिपूरवर राज्य केले. १९५६ पर्यंत केंद्र शासित असलेल्या मणिपूरला १९७२ मध्ये संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. फुटीरतावादी संघटनेच्या कारवाया येथेही चालूच असतात .श्री श्री गोविंदाजी देऊळ हे सर्वात जुने मंदिर. येथील राजाचे पुजास्थान. येथील प्राचीन संस्कृतीचे एक प्रतिक. मणिपुरी नृत्य ही जुनी लोककला. त्यातील रासलीला सर्वात प्रसिद्ध. मणिपूरमध्ये संपूर्णपणे स्त्रियांनी चालविलेले लिमा मार्केट प्रसिद्ध आहे. सर्व व्यवहार फक्त स्त्रियाच बघतात. स्त्री-प्रधान संस्कृतीचे प्रतिक. लोकताक हे लेक बघण्यासारखे आहे. प्रचंड. जणू काही समुद्रच. ब्रम्हदेशाची सीमा फक्त ६९ कि. मी. अंतरावर आहे. इंडो- बर्मा रोडवर थोड्याशा उंचावर गेलेकी ब्रम्हदेश दिसतो.
नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांनी मोरीयांगहून आझाद हिंद सेनेची सूत्रे हलविली होती  त्या ठिकाणास भेट दिली.१९४३ मध्ये जेंव्हा जपानी लष्कराने मलय पेनिन्सुला ब्रिटीश लोकांच्या ताब्यातून घेतला तेंव्हा ब्रिटीश सैन्यात असलेले हजारो भारतीय सैनिक त्यांचे युद्धबंदी होते. नेताजींनी जपानी सरकार बरोबर करार केला आणि त्या भारतीय युद्ध कैद्यांना सोडविले आणि आझाद हिंद सैन्यात सामील करून घेतले. त्यावेळी सिंगापूर मध्ये स्वतंत्र भारताची घोषणा केली. त्या पूर्वी म्हणजे १९४२ मध्ये मोईरांगला आझाद हिंद सेनेचे प्रमुख कार्यालय होते. नेताजी सुभाष ह्यांनी ह्याच ठिकाणी म्हणजे १४ एप्रिल १९४४ ला भारताचा तिरंगा फडकावून स्वतंत्र भारताची घोषणा केली. आज त्या ठिकाणी INA म्युझियम उभे आहे. १९६७ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याचे उद्घाटन केले होते.
नेताजी सुभाष ह्यांनी येथे स्वातंत्र्याची घोषणा केली
 इंफाळ आणि कोहिमा ह्या ठिकाणी जे युद्ध झाले त्यावेळी जपानी लष्कराला आझाद हिंद सेनेने बरीच मदत केली. आपण अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळविले असा आपला एक समज. पण दुसर्या महायुद्धात कोहिमा आणि इंफाळच्या लढायामुळेच इंग्रजांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला असे इतिहासकारांना आजही  वाटते त्यात बरेच तथ्य आहे. " दिल्लीला चला" " अशीच घोषणा नेताजींनी केली होती. आझाद हिंद सेनेने ह्या भूमीवर रक्त सांडले आणि इंग्रजांचे धाबे दणाणले होते हे एक सत्य आहे. रॉयल इंडिया नेव्ही मधील नाविकांचे बंड आणि ब्रिटीश सैन्यात असलेल्या भारतीय सैनिकावरील उडालेला विश्वास ह्या दोन प्रमुख कारणामुळे इंग्रजांनी भारत सोडून जाण्याचा निर्णय घेतला हे आझाद हिंद सेनेचे यश. गांधीजींच्या अहिंसक चळवळीपेक्षा हा दबाव अधिक होता हे त्यावेळच्या ब्रिटीश पंतप्रधानांनी मान्य केले होते हे एक सत्य. ब्रिटीश सरकारने अजूनही काही कागदपत्रे गुप्त ठेवली आहेत. बी बी सी न्यूजने असे स्पष्टपणे सांगितले आहे की कोहीमाचे युद्ध आणि नाविकांचे बंड ह्यांच्यामूळेच भारत सोडण्याचा निर्णय घेण्याचे ठरले होते. 
गांधीजींच्या अहिंसक मार्गाने इंग्रज जातील असा विश्वास नेताजी सुभाष ह्यांना नव्हता. १९३१ चा गांधी - आयर्विन करार त्यान मान्य नव्हता. म्हणूनच त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. "शत्रूचा जो शत्रू तो आपला मित्र" ह्या युद्धनीती प्रमाणे जपानी सरकार बरोबर त्यांनी  हात मिळवणी केली. भारतीय सैनिक जे जपानचे युद्ध कैदी होते त्यांना आझाद हिंद सेनेत सामील करून घेतले. लढा तीव्र केला." तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो" ही नेताजींची घोषणा, त्यासाठी त्यांनी उभे केलेली आझाद हिंद सेना , जपान बरोबर केलेला करार, युद्धबंदी भारतीय सैनिकांची सुटका आणि त्यांचे आझाद हिंद सेनेत सामील होणे ह्या सर्व बाबींचा विचार केला आणि ही युद्धभूमी बघितलिकी त्यांच्या लढण्याच्या वृत्तीचे दर्शन होते. अशा ह्या दुर्गम भागात राहून त्यांनी हे सर्व कसे उभे केले असेल ह्याचेच आश्चर्य वाटू लागते. मोइरांगचे INA WAR मेमोरिअल बघीतले की स्वातंत्र्य लढ्याचे ते सोनेरी पान समोर येते आणि आपण नतमस्तक होतो. कोहिमा आणि इंफाळ ह्यांना भेट दिली की दुसर्या महायुद्धाच्या ह्या खुणा तर दिसतातच पण आझाद हिंद सेनेचे कार्य अचंबित करून टाकते.
आजही हा सगळा पूर्वांचल अस्थिर आहे. अशांत आहे. प्रादेशिक अस्मितेचा जसा प्रश्न आहे तसाच आदिवासी आणि आदिवासी नसलेल्यातील संघर्ष आहे.
गोविंदजी मंदिर , इम्फाळ
उत्तर पूर्व प्रांतातील अनेक तरुण आणि तरुणी दिल्ली, बंगलोर ह्या ठिकाणी शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी वास्तव्य करतात.त्यांना इतर भारतीय लोकांचा फारसा चांगला अनुभव येत नाही.त्यांचे दिसणे थोडेसे निराळे आहे. चपटे नाक आणि बारीक किलकिले डोळे.इतर भारतीय लोक उंच नाकाचे आणि मोठ्या डोळ्यांचे असतात.त्यामुळे हे थोडे वेगळे दिसतात. मंगोल वंशीय असे दिसणे इतर भारतीय लोकांना वेगळे वाटते. त्यांच्या अशा दिसण्यावरून ते भेदभाव करतात,ह्याचा पूर्वांचलाच्या मुलामुलीना फार राग येतो. त्यात चूक काहीच नाही. आपण ह्या दिसण्यावरून टीका करणे योग्य नव्हे. हे इतर भारतीयांनी समजून घेतले पाहिजे. तसेच पुर्वांचलातील ट्रायबल जमातींना मानाने वागविले पाहिजे.
लोकताक  लेक ,इंफाळ
भारतीय एकात्मतेसाठी अजून खूप प्रयत्न करावयास पाहिजेत. भारताची ही उत्तर- पूर्व सीमा सुरक्षित राहिली पाहिजे व पूर्वांचलातील लोकांना" भारत हा माझा देश आहे"  हे मनापासून वाटले पाहिजे व इतर भारतीयांनी त्यांच्याशी कसलाही भेदभाव करता कामा नये.
अविकसित भागातील ह्या जमातींना योग्य ती विकासाची संधी देणे फार महत्वाचे आहे. त्यांची संस्कृती आणि राहणीमान थोडे वेगळे आहे पण त्यांना सामावून घेणे फार महत्वाचे आहे. इतर भारतीय लोकांचे हे काम आहे हे ह्या प्रवासात विशेष जाणवले.एकात्म भारतासाठी हे करणे अत्यंत आवश्यक आहे.



डॉ नरेंद्र गंगाखेडकर
drnsg@rediffmail.com



No comments:

Post a Comment