Wednesday, September 16, 2015

जात नाही ती 'जात'.


Social Justice today is the private company of the cast.- Yogendra Yadav
सामाजिक न्याय आणि बहुजन विकास ह्यांचा जप करणारे पुरोगामी व समाजवादी नेते शेवटी जातीयवादी राजकारणाचा आधार घेऊन सत्तेचे राजकारण करतात हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे लोकांना पुरोगामी आणि समाजवादी ह्या शब्दाला अर्थ नाही हे लक्षात आलं आहे. गांधीजींच्या नावाचा जप करणारे गांधीवादी आणि सेक्युलर लोक असेच राजकारण करीत होते त्याचाही लोकांना खूप वर्षे अनुभव आला आणि त्यानाही लोकांनी घरी बसवले. ‘हिंदू – हिंदू’ म्हणून हिंदुत्वाचा झेंडा घेऊन फिरणाऱ्या हिंदुत्ववादी लोकांना 'हिंदू' समजलाच नाही अशी अवस्था आहे. खरे हिंदू आणि आजचे हिंदुत्ववादी ह्यांच्यात कसलाही ताळमेळ दिसून येत नाही.
‘अल्पसंख्यांकाना बहुसंख्य लोकापासून संरक्षण देणारे आम्हीच खरे सेक्युलर’. असे सांगणारे राजकारणी त्यांच्यासाठी काहीही करीत  नाहीत हे अल्पसंख्य लोकांना पुरते कळले असल्यामुळे ते पुन्हा आपल्या धर्माचा आधार घेऊन स्वतःचे  संगठन बांधताना दिसत आहेत. त्यातून रझाकारी प्रवृत्ती दिसून येत आहे , हे अधिक धोक्याचे आहे. स्वातंत्र्य चळवळीत  त्यांनी गांधीनाही हिंदूंचाच पुढारी मानले होते , हेही एक सत्य.
Social Justice today is the private company of the cast. मंडल चळवळीनंतर हे प्रकर्षाने दिसून आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये शासकीय अधिकारी हे मुख्यत: एकाच जातीचे दिसून येतात. महाराष्ट्रात “ हे मराठा राज्य की मराठी राज्य”, असा प्रश्न यशवंतराव चव्हाणांना असाच विचारला गेला होता. पुढच्या काळात तो खरा होता हे सिद्ध झाले.  त्यामुळे पुढे  ओ बी सी राजकारणाचा आधार घेऊन सत्ता बदल झाला. त्यामुळे दलित मागे पडले. ब्राम्हण राजकारणातून केव्हाच बाद झाले. त्यांनी नवे मार्ग शोधून स्वतःची प्रगती करून घेतली. तामिळनाडूमध्ये आरक्षण ७० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक झाल्यामुळे खूप मोठा समाज तामिळनाडूच्या बाहेर  फेकला गेला. गुजरातमधील पटेल आज एकदम जागे झाले आहेत कारण तेथील सत्तेच्या राजकारणात ते अनेक वर्षे दूर फेकले गेले आहेत , अशी त्यांची प्रखर भावना झालेली दिसते. लोकांना ‘सामाजिक न्यायाची लढाई’, ही ढोंगी लोकांची चळवळ वाटू लागली आहे. सर्वच प्रांतामध्ये जातीपातीचे राजकारण हे तेथील जाती संख्येच्या गणितावर अवलंबून आहे. भ्रष्ट राजकारणी आणि जातीयवादी विचारसरणी असलेले हे लोक बुरखा मात्र पुरोगामी ,समाजवादी असल्याचा दाखवितात.
येणाऱ्या बिहारच्या निवडणुकीत अनेक प्रश्नाची उत्तरे मिळतील. त्याचा परिणाम पुढील उत्तर प्रदेशाच्या निवडणुकावर दिसून येईल. जातीयवादी राजकारण हाच ह्या दोन राज्यातील राजकारणाचा पाया आहे. महाराष्ट्रात मराठा – मराठेतर ह्या जातीयवादी राजकारणाचा परिणाम नेहमीच दिसून आला. ब्राम्हण – ब्राम्हणेतरवाद पुढे केला की राजकारण करता येत असे. आता मात्र परिस्थिती बदलली असून ब्राम्हण राजकारणातून जवळ जवळ हद्दपार झाला आहे.
सध्याच्या राजकारणात जातीच्या लोकसंख्येवरच पक्षाचा उमेदवार ठरवला जातो. आता दलितामध्ये महादलित असाही एक वर्ग निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार ह्या दोन राज्यात यादवांचेच वर्चस्व दिसून येते. त्यामुळे जातीवर आधारित राजकारण असेच चालू राहणार. ‘बिहारमध्ये भाजपपेक्षा कॉंग्रेसचे काय होणार?’,  हाच एक मोठा प्रश्न दिसतो आहे. लालूचे १५ वर्षे आणि नितीशकुमार ह्यांचे १० वर्षे म्हणजे गेली २५ वर्षे कॉंग्रेस सत्तेपासून दूर फेकली गेली आहे . तसेच मुलायम – मायावती ह्यांच्यामुळे उत्तर प्रदेशात कॉंग्रेसला सत्ता मिळू शकली नाही. स्वतःला पुरोगामी आणि निधर्मी म्हणवून घेणारे लोक जाती आधारित राजकारण करून सत्ता काबीज करतात तेव्हा त्यांचा प्रतिगामी चेहरा अधिक काळवंडलेला दिसतो. भारतीय समाज हा त्यामुळे एकसंध समाज होऊ शकत नाही. आपण ‘विविधतेत एकता’  असा जयघोष करीत असतो पण ह्या जाती आधारीत राजकारणामुळे आपले सामाजिक मागासलेपण वाढते आहे. त्यामुळे विकासाचे राजकारण मागे पडून सुपर पॉवर होण्याचे स्वप्न दूर जाते आहे . हे जेव्हा नव्या पिढीच्या लक्षात येईल तेव्हाच राजकारणाने निर्माण केलेली ही दशा दूर होण्याची शक्यता आहे.

‘जातीमुळे समाजातील एकोपा टिकून आहे ‘ असं काही विचारवंताना वाटते. म्हंटलं तर ह्या वाक्याला तसा खूप अर्थ आहे. ‘ जात नाही ती जात ‘ , असे हे पुरोगामी व समाजवादी विचारसरणीचे लोक सांगत असत. असे असतानाही आधी जातीत एकोपा निर्माण करण्याच्या थापा मारून सत्ता मिळवायची हे राजकारणाचे सूत्र झाले आहे . यादव , पटेल , मराठा , गुर्जर , दलित , महादलित, ओबीसी किंवा काही अल्पसंख्य असलेल्या अनेक छोट्या – मोठ्या जातींचे कडबोळे करून निवडणुकीच्या मार्गाने बहुमताचा आधार घेऊन सत्ता भोगणे हेच राजकीय उद्दिष्ट दिसून येते. ‘जात नाही ती  जात’, हेच खरे वास्तव. जातीजातीत विभागला गेलेला बहुसंख्य असलेला हिंदू समाज कधी एकवटणार हाच खरा प्रश्न आहे.
   
 राजकीय विश्लेषक मेघनाद देसाई म्हणतात .......

* It is too early to say who will win in Bihar. At most one can say it will be a close contest. 
* UP and Bihar are the last bastions of casteist politics in India. 
* Every jati vote bank has to be calculated and catered for. 
* The Congress will bring in the Brahmin vote where the BJP will be its main rival. At the other end the Dalit and Mahadalit votes will be fought over with Manjhi and Paswan by the Congress. The Yadav vote was solid for the RJD till the SP broke away.
* Whoever wins in Bihar, casteism will stay. 
* Bihar is thus a test for the Congress even more so than for the BJP.