Thursday, December 26, 2013

स्टीव जॉब्स आणि बिल गेट्स


   
स्टीव जॉब्स 
काहीं व्यक्ति प्रभावशाली असतात.त्यांचा प्रभाव त्यांच्या कामामुळे पडतो. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक गुण आकर्षित करीत असतात. माणूस हा तसा कधीच परिपूर्ण नसतो. परंतू प्रत्येकाचे स्वतःचे असे व्यक्तिमत्व असते.अशा प्रभावशाली व्यक्तिमत्वाकडून आपण काय घ्यायचे हे आपणच ठरवायचे.आपले व्यक्तिमत्व घडविण्यास थोडा उपयोग होतो. तंत्रज्ञान आणि व्यवसायातील दोन व्यक्तींचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. त्या दोन व्यक्ती म्हणजे स्टीव जॉब्स आणि बिल गेट्स.
   स्टीव जॉब्स ह्यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काहीं जणांना आमंत्रित केले होते. एका हिंदू म्हणीचा आधार घेऊन त्यांनी निमंत्रण पत्रिकेत असे लिहिले होते ...
In the first 30 years of your life, you make your habits. For the last 30 years of your life , your habits make you. Come and help me celebrating mine.”
वयाच्या ३०व्या वर्षी व्यक्त झालेले हे मनोगत खूप काहीं सांगून जाते. स्टीव जॉब्स म्हणाले होते ,My goal has always been not only to make great products , but to build great companies. Walt Disney did that.”  आज स्टीव जॉब्स गेल्यानंतर सुद्धा नवे नवे products त्यांच्या कंपनीकडून बाजारात येतच आहेत.
बिल गेट्स
   स्टीव जॉब्सच्या यशासंबंधी बोलताना बिल गेट्स म्हणाले होते , “Here I am ,merely saving the world from malaria and that sort of things , and Steve is still coming up with amazing new products. May be I should have stayed in that game. “    काय गंमत आहे बघा. बिल गेट्स ह्यांनी ज्या Microsoft ची स्थापना केली आणि भरपूर पैसा कमविला आणि ज्यांचा जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून नावलौकिक झाला त्यांनीच आपले नवे ध्येय निवडले. दहा वर्षापूर्वी कंपनीचे रोजचे कामकाज पाहणे सोडून दिले आणि पोलिओ , मलेरिया आणि HIV ह्या रोगापासून जगाला मुक्त करण्यासाठी त्यांनी अनेक योजना जगभरात अंमलात आणण्यासाठी पुढाकार तर घेतलाच पण आपण मिळविलेला पैसा मुक्त मनाने दान केला आणि अजूनही ते त्यासाठी कार्यरत आहेत. काहीं वर्षापूर्वी ,Microsoft ह्या कंपनीला काहीजण “Evil Empire” असे म्हणत असत. आज बिल गेट्स वेगळीच मानवतावादी भूमिका बजावताना दिसत आहेत. "Business @ the speed of thoughts", असे म्हणणारा हा नव्या तंत्रज्ञान युगाचा शहेनशहा आज एका वेगळ्याच भूमिकेत कार्यरत आहे.
 बिल गेट्स आणि स्टीव जॉब्स ह्यांच्यातील फरक जाणून घेताना एक विश्लेषण केले जात असे ते असे - “ Fundamental Divide In Digital Age “. किती चपखल शब्दात हे व्यक्त झाले आहे. आज गूगल आणि फेसबुक ह्या दोन कंपन्यासंबंधीही  हेच बोलले जाते आणि ते खरेच आहे.
आपण नेहमी दोन मोठ्या व्यक्तींची तुलना करीत असतो.शाळेत असताना नेहमीच तुलना करा असा एक प्रश्न विचारला जातो. मी शाळेत असताना असाच एक प्रश्न मराठीच्या प्रश्नपत्रिकेत विचारला गेला होता. प्रश्न होता, "साहित्यात कोण आवडतात ? वि स. खांडेकर की ना. सी .फडके". त्यावेळपासून मला तुलना करावयाची सवयच लागली. "पंडित नेहरू की सरदार पटेल" , “गांधीजी की सावरकर", अगदी अलीकडे टी व्ही च्यानेलवर असते ती तुलना म्हणजे “ नरेंद्र मोदी की राहुल गांधी”. अशा तुलना न कळत होत असतात . अशीच एक तुलना करावयाची आहे - "स्टीव जॉब्स की बिल गेट्स". असे जे सुपर स्टार्स असतात त्याच्यातील एकमेकांचे संबंध आणि वैमनस्य ह्यावर लोकांत फार चर्चा होते. "आईन्स्टाईन की नील भोर" ," थोमस जेफरसन की अलेक्झांडर ह्यामिलटन" अशा तुलना प्रसिद्ध आहेत. तशीच तुलना करावयाची आहे ती आय टी क्षेत्रातील स्टीव जॉब्स आणि बिल गेट्स ह्यांची. दोघातील साम्य आणि भेद ओळखणे आवश्यक आहे. दोघेही एकाच वयाचे. दोघेही मध्येच शिक्षण सोडून देणारे. दोघांनाही संगणक क्षेत्राची आवड. दोघेही व्यावसायिक. दोघांनीही भरपूर पैसा कमविला. दोघेही एकमेकाचे स्पर्धक. बिल गेट्स Software मध्ये तर स्टीव जॉब्स Hardware आणि Software मध्ये. दोघांनाही नव निर्मितीचा छंद. दोघेही आय.टी.क्षेत्रातील सुपर स्टार्स. दोघांनीही जगावर आपला प्रभाव टाकला. दोघांनीही आजचे जग बदलून टाकले.
   स्टीव जॉब्स शिस्तशीर , अंगभूत शहाणपण (Intuition) असलेला, रोम्यांटिक ,मशीन डिझायनर , Perfectionist , Demanding , एक वलयांकित व्यक्तिमत्व असलेला , बोलण्यात Rude म्हणून ओळखला जाणारा , बिनधास्त मनोवृत्तीचा , दुसर्यांना आपल्यापेक्षा खूप तुच्छ मानणारा अशा व्यक्तिमत्वाचा होता. स्वतः खूप चांगला प्रोग्रामर नव्हता. परंतु दुसर्याकडून काम करून घेण्यात यशस्वी झाला होता.  त्याच्या चरित्रात ( त्याने स्वतःचे आत्मचरित्र लिहून घेतले होते) त्याचे हे सर्व गुण दिसून येतात. प्रत्येक व्यावसायिकाने / नवा उद्योग सुरु करणाऱ्या तरुणाने हे चरित्र वाचण्यासारखे आहे. त्याच्या चरित्रापासून यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय करावे हे जसे समजून घेता येईल तसेच काय करू नये हे ही समजून घेता येईल. ज्यांना स्वतःचा नवा उद्योग किंवा व्यवसाय सुरु करावयाचा आहे त्यांनी स्टीव जॉब्स आणि बिल गेट्स ह्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांच्यापासून शिकले पाहिजे. 
   बिल गेट्स खरा व्यावसायिक वृत्तीचा , सुपर सेल्समन , सुरुवातीच्या काळात चांगला प्रोग्रामर , व्यवस्थित आणि नीटनेटकेपणासाठी प्रसिद्ध , वेळ पाळणारा , बोलण्यात Rude नसलेला पण थोडासा Polished , बुद्धिमान , चतुर, Smart and calculating ,तसेच समोरच्या व्यक्तीवर सहज प्रभाव पाडणारे व्यक्तिमत्व. स्वतःच्या व्यवसायावर विलक्षण पकड असलेला. आय.टी. क्षेत्रात अनेक वर्षे कोणालाही त्याच्या पुढे जाणे जमले नाही. त्यांनी आय.टी. व्यवसायात स्वतःची जागतिक मोनोपोली निर्माण केली व अनेक वर्षे अधिराज्य गाजविले. एक उद्योजक गंमतीने म्हणत असत की जेंव्हा बिल गेट्स झोपी जातो तेंव्हासुद्धा त्याचे पैसे कमविणे चालूच असते. २४ x ७ त्याची Microsoft कंपनी जगातून पैसे वसूल करीतच असते.उद्योग असावा तर असा.      
   स्टीव जॉब्स तुमच्याकडे भेदक नजरेने बघणारा तर बिल गेट्स डोळ्याला डोळे भिडवून संवाद साधणारा व तुम्हाला संमोहित करणारा.
   स्टीव जॉब्स Uncompromising attitude असलेला गणकयंत्र तंत्रज्ञ. बिल गेट्सने तसा कोणताही शोध लावलेला नाही (Never Invented anything). स्टीव जॉब्स स्वतःकरिताच काम करणारा तर बिल गेट्स कोणत्याही कंपनी बरोबर भागीदारी ( Partnership) करण्यास तयार.
स्टीव जॉब्स Blunt तर बिल गेट्स गोडबोल्या. बिल गेट्स आकर्षक व्यक्तिमत्वाचा, विनोदी बोलणारा तर स्टीव जॉब्स गंभीर प्रवृत्तीचा.
   स्टीव जॉब्स तात्काळ निर्णय घेणारा. एक घाव दोन तुकडे करणारा. बिल गेट्स सर्व समावेशक वृत्तीचा आदर्श व्यवस्थापक.
   स्टीव जॉब्स स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर निर्णय घेणारा तर बिल गेट्स इतर लोकांच्या कल्पनाशक्तींचा आधार घेऊन पुढे जाणारा.
   स्टीव जॉब्सने नव्या क्ल्पनावर आधारित नवे तंत्रज्ञान निर्माण केले. तशी निर्मिती बिल गेट्सला जमली नाही. स्टीव जॉब्सने जादुगाराप्रमाणे त्याच्या पोतडीतून नवे नवे products बाहेर काढले. तो खर्या अर्थाने Innovative and Poetic होता."Simplicity is the ultimate sophistication" हे तत्व डोळ्यासमोर ठेवून नवे तंत्रज्ञान जगापुढे आणणारा."Don't make it cute' असे म्हणणारा पण त्याचवेळी " People do Judge a book by its cover" असे आपला मित्र मारकुला ह्याचे म्हणणे ऐकणारा व त्याप्रमाणे यंत्र निर्मिती करणारा.    
दोघेही तसे व्हिजनरी. परंतू भिन्न स्वभावाचे.
बिल गेट्स प्रामाणिक आणि Gracious. तर स्टीव जॉब्स प्रामाणिक पण तुसडा म्हणजे आपल्या सहकार्यांशी तोडून बोलणारा आणि मन दुखावणारा. इतरांशी बोलतांना वागताना तो फार तुटक वागत असे.कधी कधी इतरांना अपमानितही करीत असे.       
     आपण ह्या जगात फार थोड्या वेळाकरीता आलेलो असतो. आपले आयुष्य हे फार थोडं असतं.आपल्याला फार थोडा वेळ मिळत असतो की ज्यामुळे आपण काहीतरी महत्वपूर्ण कामं पूर्ण करू शकतो. आपल्या हातून फार मोठं कार्य घडावं असं आपल्याला वाटत असतं पण त्यासाठी फार थोडा वेळ असतो.आपण किती वर्षे जगू हे कोणीच सांगू शकत नाही. तेंव्हा आपल्या हातून लवकरात लवकर काहीतरी महत्वपूर्ण घडावं असं स्टीव जॉब्सला वाटत असे. "मी तरुण असतानाच हे माझ्या  हातून घडावं" असं स्टीव जॉब्सला वाटत असे. तो त्याच विचारात गुंतलेला असे. त्यासाठी तो  प्रयत्नशील असताना त्याला चांगल्या सहकारी लोकांची आवश्यकता होती. तो अशा सहकारी लोकांच्या शोधात असे. जॉन स्कली ह्यांची आणि त्याची भेट झाली तेंव्हा तो त्याला म्हणाला , “ Do you want to spend rest of your life selling sugar water , or do you want a chance to change the world ? ‘ हे ऐकून जॉन स्कलीच्या पोटात गुद्दा मारल्यासारखे झाले आणि त्याने स्टीव बरोबर काम करावयाचा निर्णय घेतला. आणि दैवदुर्विलास असा की पुढे काही दिवसांनी ह्याच स्कलीने स्टीव जॉब्सला त्यानेच सुरु केलेल्या त्याच्या स्वतःच्याच कंपनीतून काढून टाकले. पुढे कंपनी डबघाईला आल्यानंतर स्टीवला पुन्हा बोलवावण्यात आलं ही गोष्ट वेगळी.म्हणजे प्रत्येकाचे भाग्य कसे असते हे लक्षात येईल.
    ह्या तंत्रज्ञानाच्या युगात लोकांना काय हवे हे माहितच नसतं. आपण त्यांना नवे तंत्रज्ञान दाखवलं तर ते त्यांना हवे असते.हे स्टीव जॉब्सला चांगले माहीत होतं म्हणून तो म्हणत असे की टेलिफोनचा शोध लावणारा ग्राहम बेल ह्यांनी कसलाही मार्केट रिसर्च केला नव्हता. मार्केट रिसर्चची आवश्यकताच नसते असं त्याला ठामपणे वाटत असे.
हेनरी फोर्ड म्हणत असत , “ मी जर लोकांना विचारलं असतं की तुम्हाला काय हवं? , तर लोक म्हणाले असते की आम्हाला वेगाने धावणारा घोडा द्या. मी जेंव्हा त्यांना घोड्यासारखी वेगाने धावणारी मोटार दाखविली तेंव्हा त्यांना ती हवी हवीशी वाटली." लोकांना काय हवं ह्यासाठी मार्केट रिसर्च करण्याची गरज नसते. त्यांना नवीन आणि उपयुक्त तंत्रज्ञान दाखवायचं असतं. स्टीव्ह जॉब्सने हेच केलं.तो तंत्रज्ञान निर्माता होता. चांगला तंत्रज्ञ होता पण विक्रेता नव्हता. त्याला नव्याचा ध्यास होता. तो जादुगार होता. नवे तंत्रज्ञान म्हणजे जादूची कांडी आहे असे त्याला वाटत असे. जादुगाराचे शहाणपण त्याच्याजवळ होते.  बिल गेट्स सुरुवातीला तंत्रज्ञान निर्माता ( Creator) होता परंतु नंतर तो उत्तम विक्रेता (Super Salesman) झाला. व्यावसायिक यशासाठी हे फार महत्वाचे असते.
 “ Don’t Compromise” असा स्टीव जॉब्सचा बाणा होता. “ Be an architect of ideas “ असा त्याचा विश्वास होता. He was Perfectionist ‘ त्याला नेहमी असे वाटे की “ THINK DIFFERENT". त्याच्या ह्या विचार पद्धतीमुळे तो इतरांच्यापेक्षा वेगळा होता. “ Stay Hungry , Stay Foolish “ ही त्याची वृत्ती होती. “ Computer Power to the People “ हे त्याचे स्वप्न होते. त्याचा सहकारी Woznaik ह्याने पहिला Apple I हा संगणक तयार केला तेंव्हा त्याला तो लोकांना फुकट द्यायचा होता. स्टीवला मात्र तसे वाटत नव्हते. त्याला त्या तंत्रज्ञानातून पैसे कमवायचे होते. बिल गेट्सचेही पैसे कसे कमवायचे हेच प्रमुख ध्येय होते. स्टीव जॉब्सचा अगदी जवळचा भांडवल पुरविणारा मित्र Mike Markulla म्हणत असे , You should never start a company with a goal of getting rich. Your goal should be making something you believe in and making a company that will last.” स्टीव जॉब्सला हे पटले होते आणि ते त्याला व्यवसायात चांगले जमले. बिल गेट्सने खूप पैसा कमावला.पण त्यासाठी त्यांनी  अनेक यशस्वी भागीदारांची मदत घेतली.
    आपलं आयुष्य म्हणजे On-Off स्वीच सारखं आहे असं स्टीव जॉब्सला वाटत असे. आपण हे सगळं जगतो. नवे नवे शोध लावतो. अनुभव मिळवतो. थोडेसे शहाणपण गाठी बांधतो आणि एक दिवस हे जग सोडून जातो. Off स्वीच दाबलं की सगळं संपतं. ह्या On-Off स्वीचचा त्याला राग होता म्हणून त्याने त्याच्या यंत्रावर असं स्वीच कधीच लावलं नाही.
“The people who are crazy enough to think can change the world” असं स्टीव जॉब्सला वाटत असे. तो तसा crazy होता.
     तरुण वयात भारताबद्दल अध्यात्मिक आकर्षण असल्यामुळे हिमालयाचा प्रवास केल्यानंतर तो अमेरिकेत परत गेला तेंव्हा भारत आणि भारतीय लोक ह्यांच्याबद्दल काय वाटते असे विचारल्यावर त्याने जे भाष्य केले ते असे.Coming back to America , for me , much more of a cultural shock than going to India. The people in Indian countryside do not use their intellect like we do, they use their intuition instead , and their intuition is far more developed than the rest of the world.  Intuition is very powerful thing , more powerful than than the intellect, in my opinion.  Power of intuition and experimental wisdom is more important .That had a big impact on my work.' भारत भेटीचा हा प्रभाव त्याच्यावर पडला होता परंतु भारत आणि भारतीय संस्कृतीचा प्रभाव असूनही त्याने आपल्या कंपनीची वाढ भारतात होऊ दिली नाही. कारण भारत हे मार्केट आहे अशी भारताची आर्थिक स्थिती नव्हती हे त्याला माहित होते.अलीकडे भारतात मार्केट मिळाले ही गोष्ट वेगळी.
     बिल गेट्स भारतास वर्षातून दोन तीन वेळा भेटी देतात. उत्तर प्रदेश - बिहार ह्या राज्यात अनेकवेळा जातात . तेथील मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि आरोग्य योजना राबविण्यासाठी सढळ हाताने मदत करतात. पोलिओ आणि मलेरिया ह्या रोगापासून जग मुक्त असावे म्हणून सढळ हाताने मदत कार्य करतात.हे त्यांचे कार्य फार महत्वाचे आहे. असा हा देणारा माणूस खरा दाता आहे . समाजासाठी आपण काहीतरी भरीव केले पाहिजे असे त्याला कळकळीने वाटते. हे त्यांचे मोठेपण लक्षात घेण्यासारखे आहे.
___________________________



  • संदर्भ : 
  • Steve Jobs
    Book by Walter Isaacson


  • PublishedOctober 24, 2011
  • आणि इतर नियतकालिकातून.



  •   


      

    Friday, December 20, 2013

    केशवराव देशपांडे


    केशवराव देशपांडे 
    रेशीम धागा हा इतर धाग्यापेक्षा खूपच वेगळा असतो. कापसाचा धागा , लोकरीचा धागा , नॉयलॉनचा धागा किंवा पॉलिएस्टरचा धागा. ह्या सर्व धाग्यापेक्षा “ रेशीम धागा “ अधिक मुलायम , देखणा, मजबूत (strong ) आणि रंग सौंदर्याने नटलेला असतो. अशाच एका सुंदर रेशीम धाग्याचा विणकर म्हणजे केशवराव देशपांडे – माझे सासरे – मी त्यांना “ काका “ असेच म्हणत असे. माझ्या जीवनात मागे वळून पाहताना काकांच्या अनेक आठवणी आजही डोळ्यासमोर उभ्या राहतात.त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू सहजपणे समोर उभे राहतात.
     “ शब्द नव्हे शस्त्र “ असा ज्यांचा बाणा त्या “मराठवाडा”कार अनंत भालेराव आणि स्वातंत्र्यसेनानी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ ह्या दोघांचे अगदी जवळचे सहकारी , जयहिंद प्रकाशनाचे प्रमुख जगन्नाथराव बर्दापूरकर ह्यांचे निकटतम मित्र आणि सहकारी  अशी त्यांची सार्वजनिक ओळख.अनंत भालेराव आणि गोविंदभाई श्रॉफ ह्यांच्या सहवासात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या बरोबर , त्यांच्याकरिता ज्या निष्ठेने काम  केले त्यामुळेच काका ह्या दोघांचेही प्रमुख सहकारी झाले. हेच त्यांचे सामर्थ्य होते. “मराठवाडा” ह्या भाषिक वर्तमानपत्राचे ते सरव्यवस्थापक होते. “ आमचे ब्रदर जॉन केशवराव देशपांडे “ असा उल्लेख अनंत भालेराव ह्यांनी “ कावड “ ह्या त्यांच्या पुस्तकात केला आहे आणि त्या लेखात अनंतरावांनी त्यांचे सुंदर व्यक्तिचित्र उभे केले आहे.  
          त्यांचा करिअरचा पूर्व इतिहास हा मोठा मनोरंजक आहे. पुण्याच्या “ प्रभात” च्या चित्रनगरीत रमलेले काका  नंतर हैद्राबादच्या चित्रपटगृहाचे व्यवस्थापन आणि चित्रपट  वितरण करीत असत. ह्या व्यवसायातील अनेक गंमतीजमती ते जेंव्हा सांगत असत तेंव्हा त्या वेळच्या चित्रपट व्यवसायाची कल्पना येते . चित्रपट व्यवसायाचा चालताबोलता इतिहास त्यांच्याकडून ऐकताना गंमत वाटत असे. त्यांच्या बरोबर केलेल्या अशाच एका मुंबई- औरंगाबाद रेल्वे प्रवासात त्यांनी त्यावेळच्या चित्रपटसृष्टीच्या अनेक  सुरस कथा सांगितल्याचे आजही आठवते.
        जगन्नाथराव बर्दापूरकर आणि अनंत भालेराव ह्यांच्या आग्रहामुळेच ते “मराठवाड्या"”त आले. वर्तमानपत्र  काढणे तसे सोपे नसते . ते चालविणे महाकठीण काम. “मराठवाडा” हे भांडवलदाराचे वर्तमानपत्र नव्हते. सरकार आणि सरकारी धोरणावर सतत हल्ले करणारे व घनघोर टीका करणारे वर्तमानपत्र म्हणून त्याचा नावलौकिक होता. " शब्द नव्हे शस्त्र " असा त्याचा बाणा होता. टिळक- आगरकरांच्या परंपरेतील वृतपत्र म्हणून ते नावाजले होते. "मराठवाड्या"चा श्वास होता. मराठवाड्याची अस्मिता होती. मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न घेऊन सरकारशी लढणारे वर्तमानपत्र होते.  अशा वर्तमानपत्राला शासकीय जाहिरातींचा पाठिंबा नसतो. असे वर्तमानपत्र चालविण्याचे अर्थशास्त्र फार कठीण असते. त्यामुळेच अनंत भालेराव नेहमी म्हणत असत की अग्रलेख लिहिणे सोपे आहे  परंतू रोजचे वर्तमानपत्र काढण्यासाठी करावे लागणारे व्यवस्थापन अतिशय अवघड आहे . त्या काळात वर्तमानपत्राला कागद मिळवण्यासाठी फार कष्ट पडत असत. टंचाईच्या काळात कागद कसा उपलब्ध करून घ्यायचा हे अतिशय कर्म कठीण काम होते.त्याच बरोबर भांडवली वर्तमानपत्राची स्पर्धा जीवघेणी होती. वृतपत्र वितरकांना फूस लाऊन देणे हे स्पर्धात्मक वर्तमानपत्राचे काम जोरांत चालू होते. आणि अशी स्पर्धा औरंगाबादेत नुकतीच सुरु झाली होती. नियमित कागद पुरवठा आणि आवश्यक असलेल्या जाहिराती ह्यावर वर्तमानपत्र चालतात. त्यामुळेच ती रोजच्या रोज प्रसिद्ध करता येतात. त्याचे गणित जमवणे हेच व्यवस्थापकाचे कठीण काम.
        मराठवाडा दैनिक झाले तेंव्हा छापखाना जुनाच होता. छपाई यंत्र फार जुने होते. सकाळपर्यंत पेपर तयार होत नसे.मराठवाड्यातील नांदेड–लातूर सारख्या ठिकाणी तो पेपर वेळेवर जात नसे . त्यासाठी छापखान्याचे आधुनिकिकरण  करणे महत्वाचे होते. फोटोटाईप सेटिंग यंत्राची आवश्यकता होती. जलदगतीने वर्तमानपत्र छापणे महत्वाचे होते. आधुनिक छपाईची यंत्रे मिळवणे , त्यासाठी निधी उभा करणे , यंत्रकुशल कामगार शोधणे , यंत्र बंद पडले तर लगेच दुरुस्तीसाठी कुशल कामगार/ तंत्रज्ञ शोधणे ,ह्या सर्व व्यवस्थापनासाठी २४ X ७ यंत्रणा उभी करणे हे काम फार जिकीरीचे होते. काकांनी ह्यासाठी अपार कष्ट घेतले. मुद्रणालयातील कामगारांचे पगार वेळेवर देणे आणि चांगले पत्रकार- बातमीदार – जाहिरातदार- वितरक बांधून ठेवणे फार अवघड काम होते. एखाद्या मोठ्या साखळी वर्तमान पत्रासाठी ते सोपे असते. भांडवलाचा प्रश्न नसतो. परंतू ध्येयवेडी पत्रकारिता करणाऱ्या वर्तमानपत्रासाठी हे सर्व कठीण काम असते व वर्तमान पत्र केंव्हाही बंद पडू शकते. असे वर्तमान पत्र त्यांनी चालवून दाखविले. त्यासाठी यंत्रणा उभी केली. एकाचवेळी विविध गोष्टींचे व्यवस्थापन करणे हे फार जिकीरीचे काम होते. त्यात वैयक्तिक असा कोणताही फायदा नव्हता. आपण जे वर्तमान पत्र चालवितो आहोत त्यासंबंधी त्यांची निष्ठा होती. आपल्या संपादकाला ह्या सर्व गोष्टींचा कसलाही त्रास होऊ नये ह्यासाठी त्यांची धडपड होती. म्हणूनच व्यवस्थापनाची लढाई ते स्वतः सक्षमतेने सांभाळत असत. कामगारांचेही अनेक प्रश्न असत. इल्नाचे अध्यक्ष असताना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर ह्या प्रश्नांची उत्तरे शोधली. वर्तमानपत्र वितरकाचे प्रश्न फार बिकट असत. पैसे वसुलीही करणे कठीण काम  होते. दैनिकात काम करणाऱ्या कर्मचार्यांच्या वर्तणुकीचे प्रश्न निर्माण होत. ह्या सर्व प्रश्नाच्याकडे ते वेगळ्या दृष्टीने पाहत असत व प्रश्न हाताळताना स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवीत असत. हे व्यवस्थापन कौशल्य त्यांनी कसे मिळविले असेल ह्याचा जेंव्हा मी शोध घेतो तेंव्हा माझ्या लक्षात येते की काही जणांना हे उपजत माहीत असते. व्यवस्थापन हे त्यांना उपजत येत होते हेच खरे. म्हणूनच अनंत भालेराव त्यांना " आमचे ब्रदर जॉन " असे म्हणत असत. 

         आणि हे सारे व्यवस्थापन केशवराव करीत असल्यामुळे अनंतराव ह्यांचा “मराठवाडा” एक प्रमुख वर्तमानपत्र म्हणून नावारूपाला आला. वर्तमानपत्राच्या आणि मुद्रणालयाच्या दुनियेत व्यवस्थितपणा कमीच असतो हे आपण कोणत्याही प्रिंटींग प्रेसला किंवा वर्तमानपत्राच्या कार्यालयास भेट दिल्यास सहज दिसून येईल. काकांचे स्वतःचे कार्यालय अतिशय टापटीप व सुंदर होते. काकांचे अक्षर फार सुंदर होते. त्यांच्या लिहीण्यातील टापटीपपणा उल्लेखनीय होता. इतकेच नव्हे तर त्यांची कामांची पद्धत अतिशय आखीवरेखीव होती. त्यांना कामातील कोणताही गलथानपणा चालत नसे.त्यांनी तीच शिस्त आपल्या हाताखालील लोकांना तर लावलीच पण त्यांच्या सर्व सहकार्यानाही लावली.  
         काकांनी अनंत भालेराव आणि गोविंदभाई श्रॉफ ह्यांना इतके जवळून पाहिले आहेकी ह्या दोन मोठ्या व्यक्तिमत्वांचे अनेक पैलू त्यांना माहीत होते. गप्पा मारताना फार क्वचित वेळा ते त्यांचा उल्लेख करीत असत. त्यांनी ह्यासंबंधी लिहावे व लोकांना ह्या दोन्ही व्यक्तीसंबंधी अधिक कळावे असे मला वाटत असे. आणीबाणीच्या काळात अनंतराव तुरुंगात गेले तेंव्हा त्यांनी मराठवाडा कसा चालविला ह्या संबंधीचा इतिहास समजून घेण्यासारखा आहे. मराठवाडा तेंव्हाच बंद पडला असता. पण तसे झाले नाही.  मी त्यांना त्यासंबंधी लिहावे असे अनेकदा सुचविले होते. त्यांनी ते लिहिण्याचे टाळले. त्यांनी जवळून पाहिलेली ही मोठी माणसे आणि तसेच  त्यांच्या आजूबाजूची सामाजिक – राजकीय चळवळीतील इतर माणसे त्यांच्या खूप परिचयाची होती. ही सारी माणसे एका राजकीय-सामाजिक कादंबरीचा विषय आहेत. त्यांचे कौटुंबिक ताण-तणाव ,आर्थिक समस्या, राजकीय – सामाजिक चळवळीतील सहभाग आणि त्यांच्या समस्या त्यांनी खूप जवळून पाहिल्या होत्या. खरं म्हणजे हा त्यांच्या रोजच्या जीवनाचा एक भाग होता. शेवटी शेवटी त्यांनी त्यावर लिहिण्यास सुरुवात केली होती. पण ते राहून गेले.

         केशवराव देशपांडे हे अखिल भारतीय भाषिक वर्तमानपत्रांची  जी संघटना -- ILNA चे अध्यक्ष होते आणि त्यांनी ह्या संस्थेचे सभासद,कार्यकारिणी सदस्य आणि अध्यक्ष असताना अतिशय भरीव असे काम  केले. इल्नाच्या कार्यक्रमासाठी ते अनेक वेळा मुंबई- दिल्ली असा प्रवास करीत असत तेंव्हा मुंबईभेटीत त्यांच्या विविध कामाचे स्वरूप मी अगदी जवळून पाहिले आहे. त्यांच्या ह्या कामावरून एखादी संस्था किंवा संघटना कशी चालवावी व शासकीय पातळीवर व्यवसायाचे प्रश्न कसे सोडवावे हे मला दिसून आले. काका विज्ञानाचे विद्यार्थी होते तसेच मुद्रणशास्त्र निपुण होते. त्यांना नव्या तंत्रज्ञानाची अचूक माहिती होती.मराठवाडा विद्यापीठात पत्रकारिता ह्या विषयाचा अभ्यासक्रम सुरु झाला त्यावेळेपासून कित्येक वर्षे त्यांनी आमंत्रित प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. "वर्तमानपत्राचे व्यवस्थापन" हा विषय ते शिकवीत असत. त्यासाठी ते भरपूर मेहनत घेत असत. भरपूर अभ्यास करीत असत. खूप तयारी करून ते वर्गावर जात असत. मी त्यांची शिकवण्यासाठी जी तयारी करावी लागते ती जवळून पाहिली आहे. अनेक पदवीधर झालेले विद्यार्थी त्यांच्या अध्यापनाविषयी भरभरून बोलताना दिसतात. आज त्यांचेच विध्यार्थी  विद्यापीठात विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात महत्वाची भूमिका बजावताना दिसतात. काही दिवसापूर्वी मी मराठवाडा विद्यापीठात गेलो होतो. डॉ. धारूरकर सध्या विभागप्रमुख आहेत. बोलताना सहज काकांचा विषय निघाला. धारूरकर काकांचे विद्यार्थी. त्यांनी काका व्यवस्थापन विषय शिकवीत असताना ज्या नोट्स काढल्या होत्या त्याचा विशेष उल्लेख केला आणि मला म्हणाले काकांनी ह्या विषयावर पुस्तक लिहावयास हवे होते. त्यांनी हे काकांना अनेकदा सुचविले होते. 
         
         मराठवाड्याचा दिवाळी अंक अगदी झोकात निघत असे. अनंत भालेरावांच्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यिक , लेखक आणि कवी मराठवाडा दिवाळी अंकासाठी आवर्जून लिहित असत. मराठवाड्यातील आजचे जे नावाजलेले साहित्यिक ,कवी आणि  चित्रकार आहेत ते मराठवाडा दिवाळी अंकातील लिखाणामुळेच पुढे आले आहेत.  “मराठवाडा’ दिवाळी अंकाला मुंबई पत्रकार संघाचा उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून लागोपाठ तीन चार वर्षे पुरस्कार मिळाला होता.त्यामुळे मराठवाडा दिवाळी अंक खूप नावाजला होता  . काकांची  दिवाळी अंकासाठी ४-५ महिने तयारी चाललेली असे. त्यासाठी त्यांच्या मुंबईला चकरा होत असत.  संपादकीय खाते त्यांचे काम  चोख करीत असे. पण रंगीत छपाई, कागद , मुखपृष्ठ , जाहिराती आणि सर्व महाराष्ट्रात वितरण ही सारी कामे करताना मी काकांना  जवळून पाहिले आहे. दिवाळी अंकासाठी रंगीत मुखपृष्ठ , कलाकार , चित्राची निवड , उत्कृष्ट छपाई ह्या अनेक गोष्टी फार महत्वाच्या असतात. त्यामुळेच अंक देखणा होतो. अनंतराव भालेराव ह्यांचे संपादन आणि केशवराव ह्यांचे दिवाळी अंकाचे व्यवस्थापन ह्यामुळेच “ मराठवाड्या” च्या   दिवाळी अंकाला सर्व दिवाळी अंकात अग्रस्थान प्राप्त झाले व "मराठवाडा" दिवाळी अंक नेहमीच लक्षवेधी ठरला.

        अनेक कारणामुळे " दै. मराठवाडा' बंद झाला. त्यामुळे त्यांना शेवटपर्यंत फार वाईट वाटत असे. दैनिक बंद झाल्यानंतर गोविंदभाई श्रॉफ ह्यांनी त्यांना सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या कामासाठी बोलावून घेतले. अनेक वर्षे त्यांनी गोविंदभाई बरोबर ह्या संस्थेचे काम बघितले आणि आपल्या व्यवस्थापनाचा ठसा उमटविला.शाळा-महाविद्यालयांच्या अनेक योजना राबविल्या.   

         टी.व्ही वर “ उंच माझा झोका “ ही न्या. माधव गोविंद रानडे ह्यांच्या जीवनावरची  मालिका बहुतेकांनी पहिली असेल.स्त्री शिक्षणाची चळवळ  स्वतःच्या घरात सुरु करताना रमाबाई रानडे ह्यांना कसा त्रास झाला हे आपणास माहीतच  आहे .मराठवाड्यात स्त्री शिक्षण फारसे पुढे गेले नव्हते. काकांनी ७०-८० वर्षापूर्वी लग्नानंतर आपल्या पत्नीला कुमुदिनी देशपांडे ह्यांना  S.Sc/ Teacher training course करण्यास प्रोत्साहन दिले.एवढेच नाहीतर आपल्या तीन मुलीना उच्चविद्याविभूषित केले. हे फार महत्वाचे आहे असे मला वाटते. आज त्यांच्या मुलींच्या मुली नुसत्या विद्याविभूषित झाल्या नाहीत तर महत्वाच्या हुद्द्यावर समर्थपणे काम करीत आहेत. त्यांनी स्त्री- शिक्षणाचे महत्त्व ओळखले म्हणूनच नवी पिढी पुढे जाताना दिसते आहे. त्याचे कारण काकाना स्त्री शिक्षणाचे महत्व ठावूक होते व त्यांनी तशी कृती केली.
    कुमुदिनी व केशवराव देशपांडे 

        कुमुदिनी देशपांडे ह्यां सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या शाळेतील प्रसिद्ध शिक्षिका. समाजकार्याचे भान असलेल्या.त्यांनी  मराठवाडा विकास आंदोलनात सक्रीय भाग घेतला होता. १९८६ साली शाळेतून निवृत्त झाल्यावर पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि आपल्या घरातच किलबिल बालक मंदिर सुरु केले. हे लहानसे रोपटे वेगाने मोठे झाले आणि त्याचे रुपांतर अनंत विद्या मंदिर ह्या प्रसिद्ध शाळेत झाले आहे. सतत स्वतःला कामात गुंतवून ठेवणारी वृत्ती असल्यामुळे जेष्ठ नागरिक संघाच्या कामात सहभागी होऊन विविध कार्यक्रम राबविले. आणि हे चालू असतानाच लेखन चालू ठेवले आहे . समृद्ध जीवनानुभव असल्यामुळे मराठी वर्तमानपत्रातून विविध विषयावर सातत्याने सदर लेखन केले. आणि त्या  लिहिता लिहिता कथाकार झाल्या. विविध मासिकातून अनेक  कथा प्रसिद्ध होऊ लागल्या.आजवर  चार पुस्तकांच्या लेखिका तर झाल्याच पण औरंगाबादच्या  स्त्री लेखिकांच्या साहित्य चळवळीत त्या  सक्रीय सहभाग घेतात. आज ८५ व्या वर्षीही तोच उत्साह दिसून येतो. 
        
           केशवराव आस्तिक होते. त्यांच्या आजूबाजूचे सर्व सहकारी नास्तिक होते. ते रोज देवपूजा करीत असत.दर वर्षी लघुरुद्र करीत असत. कर्मकांडावर त्यांचा विश्वास नव्हता. अनंतरावांनी  "कावड : मध्ये त्यांच्या देवपूजेविषयी लिहिले आहे. त्यांची देवपूजा बघण्यासारखी असे. देवानाही शिस्तीत स्थानापन्न करणारी त्यांची देव पूजा फार बघण्यासारखी असे. मला तर असं अनेक वेळा वाटलं आहे की मंदिरातील जे पुजारी असतात त्यांना पूजा कशी करावी ह्यासाठी शिक्षक हवा असेल तर त्यांनी हे शिक्षण काकांच्याकडून घ्यावे.
           त्यांनी अनेक वर्षे चित्रपट व्यवसायात काढली असली तरी त्यांनी किती सिनेमे पाहिले असतील ते मला माहीत नाही पण जून्या हिंदी गाण्यांची त्यांची आवड आणि शास्त्रीय संगीताचे प्रेम विलक्षण होते. मराठवाडा साहित्य परिषदेशी त्यांचा जवळचा संबंध होता. 

     मैत्री , दयाबुद्धी , सोशीक वृत्ती , संतुष्ट वृत्ती , दृढ-निश्चय , संयम ,लोकसंग्रह , आनंद आणि दु:ख ह्यांना सहज सामोरे जाणे , क्रोध न दाखविणे ,मौनातून सर्व व्यक्त करणे हे त्यांचे स्वभाव विशेष. "गीताई"तील खाली दिलेल्या ओळीतून  काकांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलू दिसून येतात.       

           कोणाचा न करी द्वेष दया मैत्री वसे मनीं
                  मी माझे न म्हणे सोशी सुख – दु:खे क्षमा बळे
                  सदा संतुष्ट जो योगी संयमी दृढ-निश्चयी
                  अर्पी मज मनो-बुद्धी भक्त तो आवडे मज
                  जो न लोकांस कंटाळे ज्यास कंटाळती न ते
                  हर्ष शोक भय क्रोध नेणे तो आवडे मज
                  न उल्लासे न संतापे न मागे न झुरे चि जो
                  बरे वाईट सोडूनी भजे तो आवडे मज
                  सम देखे साहे वैरी तसे मानापमान हि
                  शीत उष्ण सुखे दु:खे करुनी सम मोकळा
                  निंदा स्तुती न घे मौनी मिले ते गोड मानितो
                  स्थिर बुद्धी निराधार भक्त तो आवडे मज

    त्यांचे व्यक्तिमत्व ह्याच शब्दात चपखल बसते.  असे हे "मराठवाड्या"चे ब्रदर जॉन केशवराव देशपांडे.
                                                             
                                                ( त्यांच्या स्मृती दिनानिमित्त ही आदरांजली ) 

    Sunday, December 8, 2013

    देणाऱ्याने देत जावे

    देणाऱ्याने देत जावे
    घेणाऱ्याने घेत जावे .....
    विंदा करंदीकरांच्या कवितेच्या ह्या ओळी खूप काही सांगून जातात. जपानमधील झेन तत्वज्ञानामध्ये दान देणाऱ्या लोकांची मानसिकता लक्षात घेतली आहे . झेन तत्वज्ञानात देणारा ( दाता ) आणि घेणारा ( गरजू ) ह्यांच्यात एक समतोल साधलेला असतो.
    गरजू माणसाला दान स्विकारावे लागते कारण ती त्याची गरज असते. त्याला ती आवश्यक वाटत असल्यामुळे तो ती स्विकारीत असतो. परंतु जो दाता असतो त्याचीही ती गरज असते. दान हे दोघांच्यामधील एक दुवा असते. त्यामुळे समाजात एक चांगले वातावरण निर्माण होत असते. दान देणाऱ्याच्या दृष्टीने दान देताना तो एका तीर्थयात्रेला ( Pilgrimage) जात असतो. त्याची तशी मनोभावना असते.
    जगामध्ये अशी पुष्कळ माणसे आहेत की ज्यांना गरजूंच्याकरिता किंवा गरिबांसाठी/ उपेक्षितांसाठी काहीतरी ठोस करावे असे वाटते. त्यामुळे त्यांच्याकडे अशा गोष्टीसाठी द्रव्य किंवा इतर मदत मागितलीकी ते नेहमीच मदत देण्यासाठी उत्सुक असतात. काहीं दाते दान देतात ते त्यांच्या स्वतःसाठीच. कारण त्यांची ती आवश्यकताच असते. काहीं सेवाभावी संस्थामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्ते मंडळीना हे चांगलेच माहीत असते. एका आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष एकदा मला म्हणाला . नरेंद्र , मी हे जे काम करतो आहे त्यासाठी खूप मोठा निधी लागणार आहे. हा निधी जमा करण्यासाठी कोण दाता आहे हे मला चांगलेच माहीत आहे. ह्या कामासाठी मी त्यांच्याकडे भीक मागण्यासाठी जात असतो. त्यांना हे माहीत असते की मी माझ्यासाठी काहीही मागत नाही. ते गरजूसाठी हवे आहे. गरजू त्यांना मागावयास जात नाही. त्यांना द्यावयाचे आहे आणि मला गरजूसाठी घ्यावयाचे आहे. ते देतात आणि मी गरजूसाठी त्यांच्याकडे भीक मागतो. “द्या ,द्या” असे सांगतो. मला अशी मदत घेण्यात आनंद वाटतो व मी झोळी घेऊन भीक मागत फिरतो. देणगी  मागणाऱ्या अशा कार्यकर्त्याचा हा विचार खूप महत्वाचा आहे.
    गरजूंना किंवा उपेक्षितांना कधी कधी अशी मदत किंवा दान नकोसे वाटते किंवा ते अतिशय नाईलाजाने ते स्विकारत असतात. अशा प्रकारचे दान स्विकारणे त्यांना कमीपणाचे लक्षण वाटते. त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहणे मनापासून आवडत नसते. त्याचा त्यांना तिटकारा वाटतो. ते खूप कमीपणाचे वाटते. त्यांचा स्वाभिमान दुखावतो. त्यांना मनस्वी दु:ख होत असते. त्यांना असे वाटत असते की हे दान किंवा ह्या दान वस्तू आपण स्वतःच्या कर्तबगारीमुळे मिळवू शकत नाही. त्यामुळे ते अधिक दु:खी होतात. त्यांना असेही वाटते की आज नाही तर उद्या उपकृत करणारा हा दाता आपल्याकडून ही किमंत ह्या किंवा त्या स्वरुपात वसूल करील. त्यामुळे तो दात्याचा थोडासा मत्सर करतो. कारण त्याला त्याचा स्वाभिमान दुखावल्याचा राग आलेला असतो.
    सरकार गरिबी हटावह्या योजनेअंतर्गत अनेक योजना आखीत असते.त्या योजनेमुळे गरिबी हटत नसते. त्यामुळे गरिबांना तात्पुरता फायदा होतो. पण गरीब माणूस अधिक लाचार होतो. मग त्याला अशा दानाची सवय होऊ लागते. तो अधिक आळशी होऊ लागतो. अशा योजनामुळे त्यांना त्या फुकट मिळणाऱ्या पैशाची सवय होऊ लागते. त्यांना तो त्यांचा हक्क वाटू लागतो. एक चीनी म्हण आहे , " जे गरीब लोक आहेत त्यांना पोट भरण्यासाठी नुसते मासे देऊ नका तर त्यांना मासे कसे पकडावेत ह्याचे शिक्षण द्या म्हणजे ते  मासे पकडून स्वतःचे पोट भरु शकतील. ते स्वावलंबी होतील. "

    मी स्वतः समाजकार्य करताना अनुभवलेला एक किस्सा सांगण्यासारखा आहे. आपण समाजासाठी काहीं देणे लागतो अशा भावनेतून मी समाजसेवी संस्थेशी सलग्न आहे आणि थोडेफार समाजकार्य करीत असतो. आमच्या संस्थेतर्फे गरजूसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्याचे ठरविले. नेत्र शस्त्रक्रिया विशारद डॉक्टर मदतीला तयार होते. संस्थेसाठी एक मोठा निधी उपलब्ध झाला होता. आम्ही विक्रमगड येथे नेत्रचिकित्सा शिबीर भरविले. नेत्र तपासणीसाठी  खूप मोठ्या संख्येने लोक आले. गरजूंना चष्मे दिले गेले. ५० लोकांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. त्यांच्याजवळ शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक तेवढे पैसे नव्हते.. त्या सर्वांची शस्त्रक्रिया मुंबईच्या एका नेत्र रुग्णालयात करावयाचे ठरविले. अर्थात मुंबईला येण्याजाण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते. राहण्याचाजेवणाखाण्याचा प्रश्न होताच. आम्ही येण्याजाण्यासाठी वाहनाची सोय केली. त्यांच्या राहण्यासाठी एका धर्मशाळेची व्यवस्था केली. रुग्णाने सोबत एका नातेवाईकाला बरोबर घेऊन यावे व आम्ही त्यांचीही व्यवस्था करू असे आवर्जून सांगितले. त्या सर्वांची चहापाणी आणि जेवणाची व्यवस्थाही केली होती. अर्थात ह्यासाठी अनेक दाते तयार  झाले होते. आमचे नेत्रतज्ञ आणि रुग्णालय सज्ज होते. आम्ही दोन बसेस घेऊन गावात गेलो. ज्यांचे ऑपरेशन करावयाचे होते ती मंडळी जमली होती. त्यांना घेऊन आम्ही निघणार होतो. काहीं मंडळी आमच्या बसमध्ये चढली आणि सीटवर बसली. काहीं मंडळी बसमध्ये चढण्यास तयार नव्हती. आम्ही त्यांना तुम्ही कां येत नाही? “ असे विचारले. आणि आम्हाला आश्चर्याचा एक धक्का बसला .एकाने आम्हाला विचारले , “ आम्ही ऑपरेशन करून घेतो. आम्हाला किती पैसे देणार आहात ?  “ आम्ही विचारले, कसले पैसे ? आम्ही तर शस्त्रक्रिया फुकट करून देणार आहोत. तुमचा सगळा खर्च करणार आहोत. येण्याजाण्याचा व राहण्याचा खर्च करणार आहोत, तुम्हाला कसले पैसे हवे आहेत ? तुम्हाला यायचे असेल तर या . नाहीतर येऊ नका. असे म्हंटले आणि लगेच बसमधील काहीजण खाली उतरले. शेवटी फक्त दहाजणच आमच्याबरोबर आले. त्यांना मुंबईत नेले . त्यांच्यावर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली. चार दिवसानी त्यांना घरी नेऊन सोडले. त्यांना चष्मेही दिले. ज्यांनी शस्त्रक्रिया करून घेतली त्यांना चांगले दिसू लागले. त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी आमचे मनापासून आभार मानले.एक म्हातारी आजी तर आमच्या पाया पडू लागली.तुमच्यामुळे आम्हाला डोळे मिळाले म्हणून ती डॉक्टरच्या पाया पडली. चार आठवड्यानी आम्ही पुन्हा त्या गावात गेलो. आमच्याभोवती बाकीचे नेत्ररुग्ण जमा झाले. आणि विचारू लागले ,’ आम्हाला शस्त्रक्रिया करून घ्यावयाची आहे . तुम्ही सर्व व्यवस्था चांगली केली होती. आम्हाला शस्त्रक्रिया ज्यांनी करून घेतली आहे त्यांनी सर्व सविस्तर सांगितले आहे. त्यांना आता चांगले दिसू लागले आहे. “. आम्ही विचारले , “ तुम्ही त्यावेळी आमच्याबरोबर कां आला नाहीत ? तुम्हीतर आम्हालाच शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी पैसे मागत होतात ? “ .तेंव्हा त्यांच्यातील एकजण म्हणाला , “ आमचे चुकले. आमच्या गावात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली की पैसे दिले जात होते . आम्हाला वाटलेकी तुम्हाला सरकार पैसे देते. मग त्यातले कमिशन आम्हाला मिळेल. म्हणून आम्ही तुम्हाला पैसे मागितले. आम्ही चुकलो. आम्हाला वाटलेकी सरकारच पैसे वाटते." आणि नंतर आमच्या लक्षात आले की गरजूंना अशी पैसे मागण्याची सवय होते. कारण सरकारी योजना राबवताना असे प्रकार नेहमीच होतात आणि म्हणून हे लोक दात्याकडे अशा वृत्तीने पहात असतात. शेवटी काय ? गरीबीमुळेच माणूस असा विचार करू लागतो.
    खूप वर्षापूर्वी मी कविवर्य दत्ता हलसगीकरांची एक सुंदर कविता वाचली होती. आजही त्या कवितेची आठवण होते. ती कविता अशी ....
    ज्यांची बाग फुलून आली
    त्यांनी दोन फुले द्यावीत
    ज्यांचे सूर जुळून आले
    त्यांनी दोन गाणी द्यावीत

    ज्यांच्या अंगणात झुकले ढग
    त्यांनी ओंजळ पाणी द्यावे
    आपले श्रीमंत हृदय त्यांनी
    रिते करून भरून घ्यावे

    आभाळा एवढी ज्यांची उंची
    त्यांनी थोडे खाली यावे
    मातीत ज्यांचे जन्म मळले
    त्यांना थोडे उचलून घ्यावे.
          -    दत्ता हलसगिकर
    फारच सुंदर शब्दात व्यक्त केलेल्या ह्या भावना देणाऱ्यानी लक्षात ठेवाव्यात. जेंव्हा तुम्ही देणारे असतात तेंव्हा तुम्ही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही ह्या ना त्या स्वरुपात देण्याची सवय करून घेतली पाहिजे. 

    मध्यमवर्गीय मानसिकता ही वेगळीच असते “ आहे रे “ आणि “ नाही रे “ ह्यांच्या विचारसरणीतील फरक आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. आनंद हा शेवटी कशात शोधायचा असतो हे आपण समजून घेतले पाहिजे. Real Happiness Is Helping  Others . ह्यासाठी “ Look Beyond Yourself “ अशी मनोवृत्ती हवी.
    प्रसिद्ध कादंबरीकार Paulo Coelho आपल्या" BRIDA"  ह्या कादंबरीत एक सुंदर गोष्ट सांगतात.
    एक माणूस चालतां चालतां अनवधानाने एका खोल खड्ड्यात पडला .त्यातून बाहेर येण्यासाठी त्याला मदतीची आवश्यकता होती. त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका धर्मगुरूकडे त्याने मदतीची याचना केली. धर्मगुरूने नुसताच आशिर्वाद दिला आणि पुढे निघून गेला. थोड्यावेळाने एक डॉक्टर जातांना दिसला. त्याच्याकडे त्याने आशेने मदतीची याचना केली. डॉक्टरने दुरूनच त्याला काय जखम झाली ह्याची तपासणी केली. एका कागदावर औषधाच्या गोळ्यांची नांवे लिहून ती चिट्ठी त्याच्याकडे फेकली आणि जवळच्या औषधाच्या दुकानातून औषधे घेऊन येण्याचा सल्ला देऊन तो निघून गेला. थोड्यावेळाने असाच एक अनोळखी माणूस जात होता.त्याच्याकडे त्याने मदतीची याचना केली असतां त्या अनोळखी माणसाने त्या खड्ड्यात उडी मारली. तो माणूस हे पाहून अधिकच घाबरला . त्याला वाटले आतां हाही खड्ड्यात पडल्यावर कसली मदत करणार . आतां दोघेही संकटात सापडले .त्याने त्याला विचारले , “ तू कशाला उडी मारलीस? . आतां दोघांना कोण बाहेर काढणार ? “ तो अनोळखी माणूस उद्गारला , “ काहीं काळजी करू नकोस . मला ह्यातून बाहेर पडण्याचा मार्ग माहीत आहे . मी तुला बाहेर काढतो. तू फक्त माझ्या मार्गाने चल." तो त्याच्या मागे चालू लागला आणि सुखरूप बाहेर पडला. त्याला हायसे वाटले.
    तात्पर्य ; खड्ड्यात पडलेल्या माणसासाठी धर्मगुरू किंवा डॉक्टर फारसे उपयोगी पडू शकले नाही. मदत करणाऱ्याला मदत कशी करावयाची ह्याचे भान नव्हते.  दात्याला मदत कशी करावयाची ह्याचे भान असले पाहिजे आणि हेच भान अनेकांना नसते. आपण योग्य ती मदत, योग्य त्या वेळी, योग्य त्या माणसाला केली पाहिजे. 



    Sunday, December 1, 2013

    आनंदाचे झाड

    चित्रकाराला काढलेल्या चित्रातून मिळणारा आनंद, शिल्पकाराला शिल्पकृती पूर्ण झाल्याचा आनंद, वैज्ञानिकाला नवे शोधून काढल्याचा आनंद, ही सारी आनंदाची रूपे. आपण सामान्य माणसे कलाकार किंवा वैज्ञानिक नसतो. तरीही आपण आनंदाच्या शोधात असतो. प्रत्येकाला आनंदी असावे असेच वाटते. कोणालाही दु:ख नकोच असते. दु:ख हे आयुष्याच्या म्हणजे जगण्याच्या अवस्थेशी निगडीत असते. दु:ख आणि त्रास हा जगण्याचा अविभाज्य भाग आहे. आशा – आकांक्षा हे दु:खाचे मूळ आहे असे गौतम बुद्ध म्हणाले होते. जगातला कोणताही माणूस मरेपर्यंत आनंदी असू शकत नाही. असे म्हणतात की माणूस हा आनंद आपल्या स्मशान यात्रेलाच घेऊन जातो.
    माणूस दु:खी कां असतो? त्याची कारणे अनेक असतात. प्रेम आहे पण लग्न नाही म्हणून. लग्न आहे पण प्रेम नाही म्हणून. संसार आहे पण सुख नाही म्हणून. मुले आहेत पण त्यांच्यापासून त्रास आहे म्हणून. मुल नाही म्हणून एकटेपणा आहे म्हणून. पैसा आहे पण अनेक विवंचना आहेत म्हणून. सत्ता आहे पण लोकप्रियता नाही म्हणून. लोक मागे आहेत पण सत्ता नाही म्हणून. घर आहे पण घरपण नाही म्हणून. अशा ह्या अनेक कारणामुळे माणूस सुखी नसतो. आनंद हरवून बसतो. जगणं म्हणजे जन्मल्यापासून वेदनेला घेऊन राहणे. आपण आशेपासून दूर जाणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण भौतिक सुखापासून निवृत्त व्हावयास हवे. त्यासाठी जगण्याच्या हव्यासातून बाहेर येणे आवश्यक आहे.

    आपण जेंव्हा तरुण असतो तेंव्हा आयुष्याला कवेत घेतो. आपल्याला असे वाटते की आपल्यात सर्व क्षमता आहे. आपण सर्व बदल घडवून आणू शकतो. आपल्याला जे पाहिजे ते आपण मिळवणारच. मग आपले लग्न होते. आणि आपण एक कौटुंबिक मार्ग स्विकारतो. आपल्याला आपल्या सह्चरीला म्हणजे बायकोला आनंदी करावयाचे असते. त्यासाठी आपण झटत असतो. कारण आपले तिच्यावर अतोनात प्रेम असते. मग आपल्याला मुलं होतात. आणि आपण त्यांच्यात गुंतत जातो. त्यांच्यासाठीच जगत राहतो. धडपडत असतो. त्यांचे जीवन सुखकर व्हावे म्हणून झटत राहतो. आणि मग मुलं मोठी होतात. पंख फुटलेल्या पाखरासारखी उडून जातात. त्यांना त्यांच्या आयुष्याच्या नव्या वाटा शोधायच्या असतात. आपण दु:खी कष्टी होतो. ते आपलं घर सोडून जातात आणि आपल्या हे लक्षात येते की पुन्हा हे सारे तसेच घडत राहणार आहे. आपणास नवीन काहीं अनुभव येणार नाही. आणि आपण भौतिक सुखाचा मार्ग सोडून अध्यात्माचा मार्ग शोधू लागतो.

    आपण वर्तमान काळात नं जगतां भूतकाळात काय केलं ह्याचाच विचार करीत बसतो. आपण अधिक चांगलं कसं केलं असतं ह्याचाच विचार करू लागतो. आपल्या केलेल्या चुकांचा आणि कृतींचा काय परिणाम झाला ह्याचाच विचार आपल्या डोक्यात घोळत असतो. आपण "आज" विसरून जगत असतो. तेच एक दु:खाचे मूळ कारण असते. आपण जसजसे वयाने मोठे होत जातो म्हणजे वृद्ध होऊ लागतो तसतसे आपण भूतकाळातील आठवणी जगत जीवन जगतो. आपण आपल्या लहानपणीच्या आठवणी जागवत राहतो. ह्या भूतकाळातील जागविलेल्या आठवणी आपल्या दु:खाचे कारण असतात हेच आपल्याला कळत नाही.

    आपण जीवनपूर्तता कशी प्राप्त होईल ह्याचाच विचार करीत जगत असतो. मग मन कसे समाधानी असेल? ज्यांच्याजवळ खूप काहीं आहे त्यांच्याकडे न बघता आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे खूप काहीं नाही व आपल्याकडे त्यांच्यापेक्षा खूप जास्त आहे असा विचार केला तरच आपण समाधानी होऊ शकू. एका ख्रिस्त धर्मगुरूने म्हंटले आहे की “मी पायातल्या बुटासाठी रडत असे पण जेंव्हा एका जवळून जाणाऱ्या व्यक्तीला पायच नाहीत हे दिसले तेंव्हा मी बुटासाठी रडणे सोडून दिले". त्यानंतर मी आनंदी झालो.
    मोर हे आनंदाचे रूप. तो जेंव्हा नाचतो तेंव्हा बघणारयाला आनंद होतो. मोर हवा असेल तर आपणच मोर व्हायला पाहिजे, असे एका मराठी कथाकाराने लिहिले होते, ते आठवले. किती समर्पक. आनंद हा असा शोधायचा  असतो.  आपल्याला अनेक गोष्टी हव्याहव्याशा वाटतात व त्या मिळवण्यासाठी आपण जीवापाड कष्ट करून त्या मिळवितो. पण त्या मिळवलेल्या गोष्टीच अनेक दु:खे निर्माण करतात हेच आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे आनंदाच्या ऐवजी दु:खच निर्माण होते . जगण्याला आनंदाचा स्पर्श न झालेली माणसे मोर होऊ शकत नाहीत. कुणाला असा मोर दिसला तर तो दुसर्याला दाखवावा म्हणजे तो आनंदून जातो. म्हणजे आनंद वाटायचा असतो. ही वृत्ती अंगी बाळगली पाहिजे. 

    कित्येक लोकांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान गरजाच उपलब्ध नसतात. तरीही ही मंडळी सुखी-समाधानी कशी? ह्याचा अर्थ आनंद ही एक मनाची अवस्था आहे. ही अवस्था आपण कशी प्राप्त करून घ्यावयाची हे आपणच ठरविले पाहिजे. आपण आत्मकेंद्रित असतो. त्यामुळे आपल्यात आत्मप्रौढी असते . ती दूर करतां आली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपले मन दुभंगणे थांबले पाहिजे. तरच आपण बौद्धिक व आत्मिक आनंद मिळवू शकू. भौतिक सुखे व पारमार्थिक सुखे जशी महत्वाची आहेत तसेच आत्मिक सुखही महत्वाचे आहे. नुसती भौतिक सुखे मिळाली तरी मन पूर्णपणे समाधानी होईलच ह्याची शक्यता नाही.

    आपण फार छोट्या छोट्या कारणामुळे आनंद गमावून बसतो. एखाद्या नातेवाईकाने आपणास जेवणाचे आमंत्रण दिले नाही म्हणून किंवा एखाद्या सहकार्याला जास्त पगाराची बढती मिळाली म्हणून किंवा आपला सहकारी परदेश प्रवासाला गेला म्हणून . आपल्या मनात नकळत असूया निर्माण होते व आपण दुसर्याच्या आनंदात सहभागी होऊ शकत नाही.

    एक लक्षात ठेवणे आवश्यक आहे की जगातील सगळीच माणसे खूप छान किंवा खूप वाईट असू शकत नाहीत. माणसे सारखी नसतात. काहीं जण एका टोकांची असतात.आपण अनेक वेळा दुसर्याची इतकी काळजी करतो की त्यामुळेच आपल्याला त्रास व्हायला लागतो. आपण सर्वांच्या आनंदात सहभागी झालो तरच आनंदी होऊ शकू. आपला जवळचा मित्र किंवा सहकारी किंवा नातलग ह्यांना एखाद्या मिळालेल्या यशामुळे आनंद झाला असेल तर आपणही त्यात सहभागी व्हावयास हवे. हे जमले पाहिजे.

    आपण आपल्यातील तणाव कमी केला पाहिजे. त्यासाठी संगीत हे प्रभावी साधन आहे. संगीताप्रमाणेच नृत्य हा प्रकार तणाव कमी करण्यासाठी फार उपयुक्त आहे. आपण जेंव्हा तालावर किंवा ठेक्यावर नाचायला लागतो तेंव्हा आपण फार खुशीत असतो. मजेत असतो. ताणविरहीत असतो. जेंव्हा संगीताच्या तालावर आपण थोडावेळ वेडे वाकडे पाय हलविले तरीही आपले शरीर आणि मान ताणविरहीत होते. मनाला आनंद देणारे नृत्य आपल्या जीवनातील ताणतणाव हलके करतात. किंवा काहीं क्षणाकरता तरी तणाव नाहीसे करतात. लहान मुले त्यामुळेच संगीतावर ताल धरून नाचत असतात.असा आनंद मिळवायचा असतो. एखादे निखळ विनोदी नाटक किंवा सिनेमा पाहिल्यास आपला तणाव कमी होतो. लहान मुलांच्या बरोबर थोडा वेळ घालविला तर आपण आनंदी होतो. निसर्गामध्ये भटकंती केली म्हणजे आपण ताजेतवाने होतो. पक्षी निरीक्षण करतानाही वेगळा आनंद मिळतो. हे आनंदाचे क्षण फार महत्वाचे असतात.

    आपण आपल्या माणसात गुंतणे स्वाभाविक आहे. परंतू आपण नं गुंततां अलिप्त रहायला शिकले पाहिजे. (Detached Attachment) आपण एकरूप असूनही वेगळे असायला हवं. कोणत्याही सुखदु:खाच्या वेळी आपण हे लक्षात ठेवायला हवं की “हे ही दिवस जातील". नेहमीच सुखाचे किंवा दु:खाचे दिवस नसतात. ते येतात आणि जातात. रात्र आणि दिवस ह्यांचा फेरा चालू असतो तसाच सुखदु:खाचा फेरा चालू असतो. "रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल", हे जसे खरे तसेच "उष:काल होता होता काळ रात्र झाली", हे ही तितकेच खरे.
    आपला आत्मानंद हेच खरे आनंदाचे स्वरूप आहे. मन:शांती (Inward peace) फार महत्वाची गोष्ट असते. आपण आनंदयात्री असावयास हवे. समाधानी व्यक्तीच आनंदयात्री होऊ शकतात. समाधान शोधणे आपल्याच हातात असते. त्यासाठी आपण समरसून जगलं पाहिजे. संगीतामध्ये सूर आणि ताल असतात हे खरं आहे पण संगीत म्हणजे ध्वनी आणि शांतता ह्यांच्यामध्ये सुरांची होणारी हालचाल आहे. तसंच आनंद  आणि दु;ख ह्यांचे जगण्याशी नातं आहे. हे लक्षात ठेवावयास हवं की जेंव्हा आपण दूरवरचा प्रवास केल्यानंतरच जवळ काय आहे हे आपल्या लक्षात येते तसेच आपल्याजवळ असलेला आनंद शोधण्यासाठी दूरवर जाण्याचे कारण नाही. ते आनंदाचे झाड आपल्याजवळच असतं. दु:खाच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या गवतामध्येच एक आनंदाचे झाड असतं.

    प्रतिक्रिया
     माझ्या मते % आनंद म्हणजे " अपेक्षांच्या आपूर्तीची ताकद भागिले अपेक्षा गुणिले १००.. आपला आनंद हा, एकीकडे आपूर्तीची ताकद[क्षमता] वाढवणे व दुसरीकडे अपेक्षा कमी करण्याचा प्रयत्न करणे यावर अवलंबून असावा. हे कौशल्य ज्याला जमते तोच आनंदी राहू शकतो.म्हणूनच गरीब माणसेहि आनंदी राहतात. त्यांनी अपेक्षांचे ओझे थोडे सैल केलेले असते व जिद्दीने क्षमता वाढवीत अपेक्षा फलद्रूप
    व्हाव्यात म्हणून प्रयत्नवादहि सोडलेला नसतो.क्षमता वाढवून अपेक्षांना मूर्त रूप देत ते आनंद टिकवत असतात.
    शरद मान्नीकर