Sunday, September 16, 2012

माणूस आणि नाती


माणूस आणि नाती
आयुष्य हे तर्कशास्त्र आणि कारणमीमांसेहून वेगळे आहे . आयुष्यामध्ये अनेक घटना घडत असतात. चांगल्या आणि वाईट .. बरे वाईट अनुभव येत असतात.आपले अगदी जवळचे नातेवाईक असे काही वागत असतात की आपल्याला काहीच अर्थबोध होत नाही. एखादा वृद्ध पिता अशी तक्रार करतो की,” माझा मुलगा किंवा मुले माझी काहींच काळजी करत नाहीत.माझ्याकडे बघतही नाहीत .माझ्याशी फार तुटकपणे वागत असतात.माझी कोणतीही जबाबदारी घेत नाहीत.” भारतामध्ये तरी असा सर्व साधारण असा समज आहे की मुलांनी वृद्ध मात्यापित्यांची जबाबदारी घेणे त्यांचे आद्य कर्तव्य आहे. वृद्ध मात्यापित्यांना असे वाटते की त्यांनी मुलासाठी खूप खस्त्या खाल्या. अनेक वेळा खूप त्याग केला. त्यांच्या शिक्षणासाठी व स्थैर्य येण्यासाठी पैसा खर्च केला. त्यामुळे म्हातारपणी आपल्याकडे बघणे त्यांचे कर्तव्यच आहे.
खरं म्हणजे मुलं जेंव्हा १६-१७ वर्षाची होतात तेंव्हाच त्यांच्यात आणि आई-वडीलामध्ये दरी निर्माण होण्यास सुरुवात होत असते, हे आई-वडिलांच्या लक्षातच येत नाही, त्याला आई-वडीलच जबाबदार असतात.आपण हे लक्षात ठेवावयास हवे की आई-वडिलांचा पहिला शत्रू हा त्यांचा वयात येणारा मुलगा किंवा मुलगी असते, आपणच त्यांना इतका धाक दाखविलेला असतो. इतके नियम घालून दिलेले असतात की आपण त्यांना जणू काही गुलामासारखेच वागवीत असतो.उठ म्हंटले की उठ, बस म्हंटले बस अशी त्यांची अवस्था केलेली असते. आपल्या आवडी निवडी लादलेल्या असतात.मुलांना ते मुळीच आवडत नसते. त्यांना आपण घालून दिलेल्या नियमामधून बाहेर पडावयाचे असते.त्यामुळे मुलांच्या मनाच्या एका कप्प्यात तुमच्याबद्दल एक भीतीयुक्त आदर असतो आणि मनाच्या दुसऱ्या कप्प्यात त्यांना तुमच्यापासून स्वातंत्र्य हवे असते. त्यामुळे जेंव्हा ती मोठी होतात , जाणती होतात, तेंव्हा त्यांना तुमच्या विचारापासून मुक्तता हवी असते. तुमच्यावर डाव उलटवण्याची संधी ते शोधत असतात. हे सर्वांनाच लागू असते असे नाही. जेंव्हा तुम्ही इतरावर काही नियम किंवा बंधने लादीत असतात तेंव्हा असे हे होणारच.
आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की जगाचा असा अलिखित नियमच आहे की” कोणीही आपले आयुष्य एखाद्या नियमात बसून जगू शकत नाही.” प्रत्येकाचे आयुष्य हे फार मोठे आणि महत्वाचे आहे. नियम आणि बंधने कोणीतरी घालून दिलेली असतात. कायदा हा कोणीतरी केलेला असतो.
नियम, कायदा किंवा बंधने म्हणजे संपूर्ण आयुष्याचे किंवा जीवनाचे सीमित ज्ञान. कोणीतरी विचारतात “ हे आयुष्य का जन्माला येते ?” हे लक्षात ठेवावे की का ? ( Why?) ह्या प्रश्नाला उत्तर नसते. कारण का? (Why?)  हा प्रश्न तर्कशास्त्रावर आधारित असतो. तर्कशास्त्र म्हणजे पूर्ण सत्य नव्हे. तर्कशास्त्राचा आधार घेऊन तुम्ही कारण शोधण्याचा प्रयत्न करू शकाल परंतु हे लक्षात ठेवा की आयुष्य किंवा जीवन हे त्याच्याही पलीकडले आहे.आयुष्याची उत्तरे तर्कशास्त्र किंवा कारणे शोधून मिळत नसतात.
आयुष्याची परिसीमा विस्तारित आहे आणि केवळ तर्कशास्त्र आणि कारणांचा शोध घेउन अर्थ समजू शकत नाही. परमहंस श्री नित्यानान्दांच्या “ Life beyond Logic and Reason s” ह्या लेखाचा हा आधार घेऊन वरील विचार मांडले आहेत..त्यामुळे जीवनाची नवी जाणीव होते.एक वेगळा अर्थ समजू लागतो. जीवनाकडे बघण्याची ही दृष्टी महत्वाची आणि मोलाची आहे. आपल्या आजूबाजूची नातीगोती अशी का असतात हे त्यावरून समजून घेतले पाहिजे.


डॉ नरेंद्र गंगाखेडकर