Tuesday, March 28, 2017

मोठा कादंबरीकार व्हायचंय .....


सध्या सौम्या भट्टाचार्य ह्याची ' इफ आय कूड टेल यु 'ही कादंबरी वाचायला घेतली . त्यात खालील वाक्ये वाचण्यात आली आणि विचारचक्र सुरु झालं .
It is said that 'Fiction is the higher autobiography'. Most of the fiction writers had used large part of their lives as the material for their body work.
Most of the famous novelists draw their material from their own life.
All fictions are edited experiences. When it comes to recollection, the writer is a past master. Since narrative is what he writes, he has been trained in craft. Recollection is his quarry , his compost heap, his archive. He nurtures it as carefully as if it were a second crop.( If i could tell you - Soumya Bhattacharya )
खरं आहे . कादंबरी म्हणजे दुसरं काय ? तशी ती आत्मचरित्रात्मकच असते . कादंबरीकार हा त्यातून डोकावत असतो. त्यांनी वर्णन केलेली पात्रे , परिसर , आजूबाजूची सामाजिक - राजकीय परिस्थिती त्याच्या परिघाचीच असते. त्याच्याच आजूबाजूचे विश्व असते. कादंबरीकार गोष्टीवेल्हाळ असला की तो ते खुलवून सांगत असतो आणि आपल्याला खिळवून टाकतो . त्यातच त्याची कारागिरी असते.  तसं पाहिलं तर प्रत्येक माणसाचं आयुष्य हे छोट्या मोठ्या कादंबरी सारखंच किंवा दीर्घ कथेसारखं असतं . सर्वांना ते लिहिता येत नाही म्हणून लेखक मोठा. श्री ना पेंडसे असो का चि त्र्यं खानोलकर , भालचंद्र नेमाडे असो का भाऊ पाध्ये , ह्यांच्या कादंबर्यांचा विचार केला तर वाचकांना हा अनुभव येतो. एवढेच काय, जयवंत दळवी असो का पु ल देशपांडे , ह्यांच्या लिखाणातील माणसं त्यांच्या आजूबाजूच्या जीवनातीलच दिसून येतात .
राहता राहिला प्रश्न तो ह्या लेखकांच्या कारगिरीचा. प्रत्येकाची शैली निराळी . प्रतिभा निराळी. खूप वर्षांपूर्वी पेंडसे ह्याची ' लव्हाळी ' ही कादंबरी वाचली होती . त्या कादंबरीचा नायक रोजनिशी लिहीत असतो. त्या रोजनिशीतून कादंबरी आकार घेते. तो त्यावेळी नवा फॉर्म होता . सौम्या भट्टाचार्य ह्यांची ही कादंबरी वाचताना एक नवा फॉर्म पहावयास मिळाला. ह्या आत्मचरित्रात्मक कादंबरीचा नायक आपल्या छोट्या मुलीला पत्रें लिहितो . तिने ती पत्रें मोठी झाल्यावर वाचायची असतात . त्यात तो आपले जीवन उलगडत जातो. ह्या कादंबरीतील एकाही पात्राला नाव दिलेले नाही. नायक आपल्या अपयशाची गाथा जशी सांगत जातो तसे  जगण्यातले ताणतणाव सांगत जातो. चुका सांगतो तसे आनंदाची क्षणचित्रे सांगतो. ह्या नायकाचा एकच ध्यास. मोठा कादंबरीकार/ लेखक व्हायचे. भरपूर पैसे कमवायचे . मोठ्या गाजलेल्या इंग्रजी लेखकासारखे लेखक व्हायचे. काहीतरी वेगळ्या फॉर्ममध्ये फिक्शन लिहायचे. सुरुवातीला जे नमूद केलं ते सार. अशी ही कादंबरी वेगळ्या वळणाची . कलकत्ता , मुंबई , लंडन आणि पुन्हा मुंबई ह्या शहरात राहणाऱ्या व लेखकू होऊ इच्छिणाऱ्या नायकाची .  ही तशी शोकांतिका आहे.नव्या भारतातील नव्या पिढीच्या तरुणाची .
तशी माणसं आपण आजूबाजूला पहात असतोच . प्रत्येकाचं आत्मचरित्र थोडंफार कादंबरीसारखं असतं. ज्याला शक्य आहे त्याने लिहीत जावं. त्यातूनच सकस कादंबरी जन्माला येईल . आपण लिहीत नाही म्हणून अशी आयुष्ये वाचायला मिळत नाहीत . ज्याच्याकडे सांगण्यासाखे खूप आहे त्याने लिहीत रहावे . म्हणून हा लिहिण्याचा खटाटोप .

No comments:

Post a Comment