Wednesday, April 9, 2014

राम आणि डॉ. राम मनोहर लोहिया

काल बँकेत गेलो होतो. बँक बंद होती. मग लक्षात आले की रामनवमीची सुट्टी होती. मी देवदेव करणारा माणूस नाही. तसा सश्रद्ध. नियमितपणे देवळात जातो असेही नाही. देवळे मात्र पहात असतो. रामनवमीमुळे रामाची आठवण झाली. राम , रामनवमी, अयोद्ध्या, रामजन्मभूमी, गीतरामायण. हे गीतरामायण लोकप्रिय कशामुळे झाले ? गदिमाच्या महाकाव्यामुळे , सुधीर फडके ह्यांच्या गाण्यामुळे की प्रभू रामचंद्राच्या भक्तीमुळे ? राम आणि कृष्ण ही भारतीयांनी पडलेली सुंदर स्वप्ने आहेत असे म्हणतात. ते खरेच आहे. आणि मला आठवला तो डॉ.राम मनोहर लोहिया ह्यांचा रामावर लिहिलेला सुंदर लेख.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रामायणासंबंधात केलेल्या लिखाणाबाबत त्यावेळी म्हणजे १९८८ मध्ये बरेच वादळ माजले होते. डॉ.राम मनोहर लोहिया हे तर वादळी व्यक्तिमत्वच. पण रामाविषयी त्यांची भूमिका अगदी वेगळी होती. त्यांच्या विचारांचा हा सारांश असलेला माझा लेख “महाराष्ट्र टाइम्स” (मैफल, रविवार १४ फेब्रुवारी १९८८) मध्ये प्रसिद्ध झाला होता. आजही त्यातील मुद्दे समजून घेण्यासारखे आहेत. तोच लेख ह्या ब्लॉगमध्ये देत आहे. भारतीयांचा "राम" समजून घेण्यास मदत होईल.

माझा तो लेख 
 गेल्या काही दिवसापासून डॉ आंबेडकरांच्या ‘रामायणा’वरील लिखाणाबद्दल वादळ माजले आहे. अतिशय टोकाच्या भूमिका घेऊन लढाई लादली जात आहे.
     हा वाद जेव्हा सुरु झाला तेव्हा माझ्यासमोर एक पुस्तक दिसत होते. डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या लेखाचे मराठीमध्ये अनुवादित झालेले प्रेस्टीज प्रकाशनचे ‘ललित लेणी’ हे ते पुस्तक. या पुस्तकाचे मी अनेक वेळा वाचन केले आहे.डॉ.राम मनोहर लोहिया यांचे व्यक्तिमत्व या लेखातून प्रकट होते.
     ह्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे पद्मश्री पु.ल.देशपांडे यांनी.त्यांनी डॉ.राम मनोहर लोहियांचे व्यक्तिचित्रण फार सुरेख केले आहे यात वाद नाही.
केवळ आठवणीदाखल
या पुस्तकात डॉ. लोहियांचा लेख आहे ‘राम ,कृष्ण आणि शिव’. बहुधा सर्वच समाजवाद्यांनी लोहियांच्या साहित्याची पारायणे केली असतील ; या लेखाचे वाचन केले असेल. एक स्मरण म्हणून मी या लेखाची आठवण करून देऊ इच्छितो.
     आंबेडकर भक्तांनीही या लेखाचे वाचन करावे असे सांगावेसे वाटते. डॉ.राम मनोहर लोहिया हे जहाल विचारसरणीचे प्रखर व्यक्तिमत्व होते. डॉ. आंबेडकरापेक्षा अधिक त्वेषाने आणि संतापाने विचार मांडणारे ते पुढारी होते. जनमानसामध्ये वर्तमानपत्रांनी त्यांची प्रतिमा डागाळलेली वाटावी अशीच केली होती.या जगात सत्याची कास धरून समर्थपणे जगायचे असेल तर एकट्याने जगण्याची तयारी हवी.डॉ.लोहिया हे असे एकटे निघालेले संन्यासी होते, अशी प्रस्तावना करून पु.ल.नी प्रस्तावना लिहिली आहे.

दृष्टिकोनाचे सार

डॉ. राम मनोहर लोहिया यांचा ‘राम,कृष्ण आणि शिव’ हा लेख सर्वांनी अवश्य वाचावा. या लेखाचा शेवट असा आहे ......
“ हे भारतमाते , आम्हाला शिवाची बुद्धी दे ; कृष्णाचे हृदय दे आणि रामाचा एकवचनीपणा व कर्मशक्ती दे.असीमित बुद्धी ,उन्मुक्त हृदय आणि मर्यादायुक्त जीवन यांनी आमचे सृजन कर “
मला वाटते , डॉ राम मनोहर लोहिया यांचा रामायण-महाभारताकडे बघण्याचा दृष्टीकोन ह्यावर दिलेल्या सारामध्ये आहे.
महान परिपूर्ण स्वप्ने
डॉ. राम मनोहर लोहिया म्हणतात .....
राम-कृष्ण-शिव ही हिंदुस्तानची महान आणि परिपूर्ण स्वप्ने आहेत: उदात्त गांभीर्याची प्रतीके आहेत. ती आपापल्या मार्गाने जात आहेत. राम हा मर्यादित जीवनाचा परमोत्कर्ष आहे. तर कृष्ण उन्मुक्त जीवनाची सिद्धी आहे आणि शिव असीमित व्यक्तिमत्वाची संपूर्णता आहे. यापैकी कोण पूर्ण किंवा अपूर्ण असा प्रश्न उपस्थित होत नाही. कारण पूर्णतेचे परिमाण काय ? परीपूर्णतेचे प्रकारभेद  असू शकतात,वर्गभेद असू शकतात.
लोहिया लिहितात ....
“राम-कृष्णाच्या कथा रम्य आहेत. मन विशाल बनविणाऱ्या आहेत. त्या खऱ्या आहेत किंवा खोट्या आहेत याच्याशी मला काही कर्तव्य नाही. तो नीलकंठ शिव , तो मर्यादापुरुषोत्तम राम व तो योगेश्वर कृष्ण ! त्या प्रत्येकाच्या कथा काळीज मोठ्या करणाऱ्या आहेत.”
याउलट डॉ.आंबेडकरानी ह्या व्यक्तींचे चित्रण केले आहे. म्हणूनच आंबेडकरांचा विचार मानणाऱ्या व्यक्तींनी पुन्हा विचार करण्यास शिकले पाहिजे.

शेकडो वर्षे प्रभाव
लोहियांच्या लेखाची सुरुवात अशी होते ......
“ राम ,कृष्ण आणि शिव यांनी कोट्यावधी भारतीयांच्या मनावर शेकडो वर्षे जबरदस्त प्रभाव पाडला आहे ही वस्तुस्थिती आहे. या तिघाइतक्या ,जनमानसावर प्रभुत्व गाजविलेल्या अन्य व्यक्ती हिंदुस्तानच्या इतिहासात सापडणार नाही. गौतम बुद्ध , अशोक , अकबर या व्यक्तींची नावे माहीत असणारे लोक फारतर शंभरात पंचवीस असतील. ह्या व्यक्तीसंबंधीच्या कथा-कहाण्या माहीत असणारे तर त्याहूनही कमी म्हणजे हजारात फारतर एक-दोनच असतील; पण पुराणकाळातील राम ,कृष्ण आणि शिव केवळ नावेच नव्हे तर त्यांच्या शेकडो कथा सर्वाना माहीत असतात.”
डॉ. लोहिया यांनी समाजशास्त्रीय विचार केला . तसा आंबेडकरानी करावयास हवा होता.
लोहिया लिहितात – “ राम , कृष्ण आणि शिव यांची नावे धर्माशी जोडलेली आहेत म्हणून काही त्या व्यक्ती लोकप्रिय झाल्या नाहीत , मानवी जीवनातील आदर्श म्हणून या त्रिमूर्तीकडे भारतीय जनता पाहत आली आहे. जीवनातील प्रत्येक व्यवहाराच्या प्रसंगी या तीन व्यक्तीची जीवने आदर्श म्हणून जनतेसमोर उभी असतात व कळत-नकळत लोक या आदर्शाचे अनुकरण करीत असतात. विचारपूर्वक मानलेल्या आदर्शापेक्षा अशा प्रकारचे नकळत स्वीकारलेले आदर्शच अधिक प्रभावी असतात.’  

मतभेद ध्यानी घ्या
मला वाटते , डॉ. आंबेडकर आणि डॉ. लोहिया ह्यांच्या दृष्टिकोनातील हा मतभेद लक्षात घेण्यासारखा आहे. डॉ. आंबेडकराना जर ‘राम’ हा आदर्श वाटत नसेल तर त्यांच्या आदर्शाच्या व्याख्या तपासून बघावयास हव्यात. डॉ.आंबेडकर जर दलितांना आपले आदर्श वाटत असतील आणि त्यांचे विरुद्ध बोललेले जर त्यांना आवडत नसेल , तर कोट्यावधी भारतीयांना परमप्रिय असलेले राम आणि कृष्ण ह्यांच्यासंबंधी वाईट लिहिलेले आवडणार नाही हे दलितांनीही लक्षात घेतले पाहिजे. मनुस्मृतीची होळी करणारे आंबेडकर हिंदू समाजाने समजून घेतले; पण रामावर लिहिणारे आंबेडकरांचे विचार बहुसंख्य हिंदू समाज मान्य करणे कठीण आहे.
डॉ. लोहियांच्या मते .....
“ राम-कृष्णाच्या कथा-कहाण्यात  देशातील हास्य आणि स्वप्ने कोरलेली असतात. हास्य आणि स्वप्ने या पेक्षा श्रेष्ठ अशी दुसरी कोणतीही गोष्ट नाही. राष्ट्र हसते तेव्हा ते प्रसन्न , समाधानी असल्याचे प्रतीक असते.त्यावेळी त्याचे काळीजही विशाल असते.राष्ट्र स्वप्न पाहत असते तेव्हा ते आपल्या आदर्शामध्ये रंग भरून कथा गुंफित असते.”
     म्हणून रामकथा ही भारतीयांची स्वप्नगाथा आहे. डॉ.आंबेडकरांचा लेख हा भारतीयांचा स्वप्नभंग करतो.
     श्रेष्ठ पुराणकथा म्हणजे महाकाव्य. रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये आहेत. सामान्य भारतीयांची समर्थ सांस्कृतीक शक्तीकेंद्रे म्हणजे पुराणकथा.
भारतीय स्वप्नांचे द्योतक
राम.कृष्ण आणि शिव या महान व्यक्ती काही एका दिवसात घडलेल्या नाहीत. हजारो वर्षे हिंदी माणसे त्या व्यक्तींच्या काल्पनिक मूर्ती घडवीत आली आहेत. सामान्यपणे आपण जसे समजतो की , राम ,कृष्ण आणि शिव यांनी हिंदुस्तान बनविला आहे . एका मर्यादेपुरते हे खरे आहे. गंमत बघा, डॉ.आंबेडकरांचे नाव – डॉ. भीमराव रामजी आंबेडकर – त्यांनी ‘राम’ ह्या नावाचा त्याग केला नाही. डॉ. लोहिया यांच्या नावातही ‘राम’ आहे. दोघांच्या आई-वडिलांनी व पूर्वजांनी ‘राम’या नावात ‘स्वप्न’ बघितले. ते भारतीय ‘स्वप्न’ होते.
डॉ. लोहिया लिहितात ....
राम व कृष्ण ही विष्णूची रूपे आहेत , तर शिव हे महेशाचे. भारतीयांच्या कल्पनेप्रमाणे राम व कृष्ण हे , जे जे चांगले व मंगल आहे त्याच्या रक्षणाचे व पोषणाचे प्रतीक आहे , तर शिव हे वाईटाच्या व अमंगलाच्या विनाशाचे , संहाराचे चिन्ह आहे. हास्य व स्वप्ने अर्थशून्यच असतात; परंतु तरीदेखील माणसाच्या मनावर त्यांचा केवढा प्रभाव असतो ! त्याने माणसाचे अंत:करण विशाल बनते.
सामान्यांना न रुचणारा
डॉ. आंबेडकरांचा लेख सामान्य भारतीयांना रुचणारा नाही. अरुण कांबळे आणि इतर दलित पुढार्यांना डॉ. आंबेडकर हे दैवतासारखे आहेत व त्यानाही डॉ. आंबेडकरांच्या विरुद्ध जर काही लिहिले तर ते रुचण्यासारखे नाही.
डॉ.लोहिया सांगतात ......
“भागवतातील कथा वेधक आहेत. सीता हरवल्यानंतर रामाला अत्यंत दु:ख झाले. जरा प्रमाणाबाहेर अधिक दु:ख झाले. प्रमाणात झाले असते तर समजण्याजोगे होते. त्याप्रसंगी लक्ष्मण सारे पाहत होता. रामाने उघडपणे अश्रू ढाळावे व वृक्षाशी बोलावे हे जरा विचित्र वाटते. राम एकांतात रडला असता तर ती गोष्ट वेगळी होती; पण लक्ष्मणाच्या देखत झाडांशी बोलणे आणि रडणे जरा अधिकच वाटते.....
कोणाला माहीत? कदाचित वाल्मिकी व तुलसीदास यांना रामाच्या कृतीद्वारे त्याचे थोरपण दाखवायचे असेल. वाल्मिकी व तुलसीदास ह्यांच्यात दोन ध्रुवाइतके अंतर आहे. गेल्या तीन चार हजार वर्षात सीतेचे व्यक्तिमत्व आपल्या साहित्यात बदलत गेले आहे ......”
डॉ.आंबेडकरांच्या लेखात त्यांनी रामाला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. आंबेडकराना वाल्मिकीचा राम – महाकाव्यातील राम – समजलाच नाही असे म्हणावे लागेल.
डॉ लोहिया लिहितात –
“ राम म्हणजे मर्यादित व्यक्तिमत्व पूर्णत्वास पोचल्याचे प्रतीक आहे. नियोजन ,व्यवस्था व बाह्याचारावर  कायदेकानुनचे बंधन आणि अंतर्राचारावर स्वविवेक बुद्धीचे नियंत्रण याचे राम प्रतीक आहे. त्याच्या व्यक्तिमत्वाचे , ही उभय नियंत्रणे हे व्यवच्छेदक लक्षण आहे. राम हा उत्कृष्ट श्रोता होता. थोर माणसाने असेच असले पाहिजे. रामाला मौनातील जादू माहीत होती. रामाचे व्यक्तिमत्व म्हणजे दुसर्याला आपल्यात सामावून घेण्यापेक्षा आपल्या मर्यादित व संयत व्यक्तिमत्वाची दुसर्यावर छाप पाडण्याची आणि विस्तारापेक्षा ऐक्यावर भर देणारी महान कथा आहे .....’

डॉ लोहियांच हे विचार व डॉ आंबेडकरांचे विचार यात मोठे अंतर आहे. लोहियांच्या मते –
“ मर्यादापुरुषोत्तम राम म्हणजे एक अदभूत राजकीय व्यक्तिमत्व होते. रामराज्यातील कायदे व नियम यांचा आदर करण्याच्या हेतूने त्याने सीतेचा त्याग केला – अर्थात कायद्याच्या , नीतीबंधनाच्या मर्यादा सांभाळण्याचा आणखीही एक मार्ग त्याला उपलब्ध होता. राज्यत्याग करून सीतेसह पुन: वनवास पत्करावयाचा ; परंतु पुराणातील काय किंवा इतिहासातील घटनाविषयी काय , अशी जर – तरची भाषा निरर्थक होय. अनिर्बंध व असयंत वर्तणुकीपेक्षा मर्यादांचे बंधन पाळणारे वर्तन हे नेतृत्वाच्या दृष्टीने कधीही श्रेष्ठ होय .”
विचारपूर्वकता हवी होती
याउलट घटनाकार आंबेडकर रामाला दोषी ठरवितात. आंबेडकरानी अधिक विचारपूर्वक लेखाची मांडणी करावयास हवी होती व त्याला तर्काचा आधार द्यावयास हवा होता ! देव बनविण्याचा सतत प्रयत्न करणारा माणूस म्हणजे त्रेता युगातला राम होय आणि त्यामुळेच त्याच्यात आकाशस्थ देवांचा काहीसा अधिक अंश आहे म्हणून रामाची देवळे झाली.
रामाने माणसासारखे प्रेम केले. राम हा मर्यादापूर्ण अवतार होता. आपल्या शक्तीवरील मर्यादांचे त्याने कधी उल्लंघन केले नाही.
गांधीजींचा आदर्श
डॉ लोहिया पुढे लिहितात –
‘आजकालच्या थोर व्यक्तीकडे पाहूनदेखील राम-कृष्णाची आठवण आपणास होत असेल. तशा कोणी व्यक्ती आज दिसत नसतील , तर भावी काळात दिसतील. गांधीजींच्या मृत्युनंतर एकदा एक मित्र लोहियाना म्हणाला – ‘ साबरमती किंवा काठेवाडातील नद्यांच्या पुत्राचे यमुनेच्या किनारी दहन झाले आणि यमुनेच्या बालकाचे काठेवाडमधील नदीच्या किनारी दहन झाले .....’
या दोन्ही प्रसंगाच्या काळात हजारो वर्षाचे अंतर आहे. काठेवाड नदीचा पुत्र व यमुनेचा पुत्र ह्या दोहोंमध्ये साम्य नसेलही. काहीं वर्षापर्यंत माझ्याही हे लक्षात आले नव्हते. कारण गांधीजीनी निरंतर रामालाच पूजिले. मृत्युसमयीही ‘ हे राम' च म्हंटले. गांधीजीना  हिंदुस्तानपुढे महानतेचे एक सीमित चित्र ठेवायचे होते म्हणून त्यांनी मर्यादापुरुषोत्तमाचा आदर्श ठेवला. मर्यादापुरुषोत्तम राम म्हणजे स्वतःवर नीती ,धर्म , व्यवहाराचे बंधन घालून देणारी शक्ती होय !
    
रामाच्या लोकप्रियतेसंबंधी लिहिताना डॉ. लोहिया म्हणतात – “ राम हा मधुर ,शांत व सुसंकृत अशा त्रेतायुगाचा देव आहे. बिचाऱ्या कृष्णाने इतके निस्वार्थ परिश्रम केले , पण जनमानसात रामच वरचढ ठरला. म्हणजे साऱ्या हिंदुस्तानात दक्षिणेतील काही भाग सोडल्यास ‘राम नाम सत्य है’ म्हणतच प्रेत यात्रा काढतात. भारतात ‘जय रामजी’ म्हणून नमस्कार करतात . रस्त्यावरून जाणाऱ्या अपरिचित लोकांनादेखील ‘जय राम’ मोठे गोड वाटते”             

*****
     

    


No comments:

Post a Comment